ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

कोणत्याही प्रकारे भीतीचा लवलेश नसणे म्हणजे धैर्य.

(CWM 10 : 282)

भीती ही एक अशुद्धता आहे. पृथ्वीवरील दिव्य कृती उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या अ-दिव्य शक्तींपासून अगदी थेटपणे येणाऱ्या अशुद्धतांपैकी ही सर्वात मोठी अशुद्धता आहे. आणि जे खरोखर योगसाधना करू इच्छितात त्यांचे पहिले कर्तव्य हे असले पाहिजे की, त्यांनी त्यांच्या चेतनेमधून, सर्वशक्तिनिशी, संपूर्ण प्रामाणिकतेने, त्यांच्यापाशी आहे नाही तेवढे सगळे धैर्य एकवटून, भीतीचे, किंबहुना भीतीच्या छायेचे देखील निर्मूलन केले पाहिजे. या मार्गावर वाटचाल करायची तर व्यक्तीने निर्भय असले पाहिजे आणि तिने क्षुद्र, क्षुल्लक, चंचल, ओंगळ अशा भीतीमध्ये स्वत:चे अंग चोरून घेता कामा नये.

एक दुर्दम्य धैर्य, अगदी परिपूर्ण अशी प्रामाणिकता, प्रांजळ आत्मदान म्हणजे, ज्यामध्ये व्यक्ती कोणतेही आडाखे बांधत नाही, गणिते करत बसत नाही, किंवा घासाघीसही करत नाही, काहीतरी परत मिळेल या अपेक्षेने काही देऊ करत नाही. विश्वास ठेवते तेदेखील स्वत:ला संरक्षण मिळावे म्हणून नव्हे ! तसेच ही श्रद्धा अशीही नसते की, जी पुरावे मागत बसेल ! ही गोष्ट या मार्गावरील वाटचालीसाठी अत्यावश्यक आहे आणि केवळ ही गोष्टच तुमचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून खऱ्या अर्थाने संरक्षण करते.

(CWM 08 : 260-261)

समग्र धैर्य : क्षेत्र कोणतेही असू दे, धोका कोणताही असू दे, दृष्टिकोन एकच असला पाहिजे – शांत आणि खात्रीचा !

(CWM 14 : 169)

जशी मेणबत्तीची ज्योत इतर अनेक ज्योती प्रज्वलित करू शकते त्याप्रमाणे, ज्या व्यक्तीकडे धैर्य आहे तीच व्यक्ती इतरांना धीर देऊ शकते.

(CWM 14 : 170)

मला आठवते की, आपण एकदा परिपूर्णतेच्या अनेक अंगांपैकी एक अंग या दृष्टीने धैर्याचा विचार केला होता. पण येथे धैर्याचा अर्थ, ‘परमोच्च साहसाची चव चाखणे’ असा आहे. आणि या परमोच्च साहसाची चव तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणतेही मोजमाप न करता, काहीही हातचे राखून न ठेवता, आणि परतीचे सारे दोर कापलेले असावेत अशा प्रकारे, तुम्हाला ईश्वरी शोधाच्या परम साहसामध्ये झेप घेण्यास प्रवृत्त करते; ईश्वराच्या भेटीच्या महान साहसासाठी, किंबहुना त्याहूनही अधिक महान अशा, ईश्वरी साक्षात्काराच्या साहसासाठी प्रवृत्त करते. मागचा पुढचा विचार न करता, किंवा ‘पुढे काय होणार आहे?’ ह्याचा क्षणभरही विचार न करता, तुम्ही स्वत:ला त्या साहसामध्ये झोकून देता. कारण पुढे काय होणार आहे, असा जर तुम्ही विचार करत बसलात तर, तुम्ही कधीच प्रारंभ करू शकणार नाही, तुम्ही तिथेच कायमस्वरूपी खिळून राहाल, त्याच जागी चिकटून राहाल, काहीतरी गमावण्याच्या, तुमचा तोल जाण्याच्या भीतीने तिथेच खिळून राहाल.

(CWM 08 : 40-41)

कदाचित प्रगती मंदही असेल, कदाचित वारंवार परागतीही होत असेल, परंतु जर का धीरयुक्त इच्छा कायम राखली तर, व्यक्ती एक ना दिवस विजयी होईल, सत्य-चेतनेच्या प्रभेपुढे तिच्या अडीअडचणी विरघळून नाहीशा झालेल्या असतील हे निश्चित.

(CWM 12 : 07)

स्वत:चे दोष जाणण्यामध्ये उदात्त धैर्य असते.

(CWM 14 : 170)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

8 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

1 day ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

5 days ago