विचलित न होणे, स्थिर आणि सश्रद्ध असणे हा खचितच योग्य दृष्टिकोन आहे. परंतु त्याचबरोबर, श्रीमाताजी आपले जे संगोपन करत असतात त्यापासून कोणत्याही कारणास्तव विन्मुख न राहणे आणि श्रीमाताजींकडून मिळणाऱ्या साहाय्याचा स्वीकार करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. व्यक्तीने स्वत:ची अक्षमता, प्रतिसाद देण्याची अक्षमता यांविषयीच्या कल्पनांमध्ये गुंतून राहणे; स्वतःचे दोष, अपयश ह्या गोष्टी अती उगाळत राहणे आणि त्याबद्दल दुःखीकष्टी होत राहण्यास किंवा त्याविषयी लाज बाळगत राहायला मनाला संमती देणे, या गोष्टी करता कामा नयेत; कारण या सर्व कल्पना, भावना ह्या गोष्टी अंततः व्यक्तीला दुर्बल बनविण्यास कारणीभूत ठरतात.

दुःखसंकटे आली, अपयश आले, ठोकरा खाव्या लागल्या तर, अशा प्रत्येक वेळी व्यक्तीने अविचल राहून त्यांकडे पाहावयास हवे आणि त्यांचा निरास व्हावा म्हणून समचित्ततेने आणि सातत्याने ईश्वरी साहाय्यासाठी धावा करावयास हवा. परंतु उदास होणे, व्यथित होणे वा नाउमेद होणे, ह्या गोष्टींना कधीच थारा देता कामा नये.

योग हा काही सोपा मार्ग नाही आणि प्रकृतीमध्ये पूर्ण परिवर्तन ही काही एका दिवसात घडून येणारी गोष्ट नाही.

-श्रीअरविंद
(CWSA 32 : 294)

जर का कशाची आवश्यकता आहे, तर ती आहे प्रयत्न-सातत्याची! प्रकृतीची प्रक्रिया आणि श्रीमाताजींच्या शक्तीचे कार्य संकटकाळामध्ये देखील चालू आहे आणि जे जे आवश्यक आहे ते ते त्या करत राहतील, हे ओळखून नाऊमेद न होता, आपण मार्गक्रमण करत राहणे आवश्यक आहे. आपल्या क्षमताअक्षमतेस येथे महत्त्व नाही. येथे कोणीच मनुष्य असा नाही की, जो प्रकृतिशः सक्षम आहे. परंतु दिव्य शक्तीचे सुद्धा तेथे अस्तित्व असते. यावर जर व्यक्ती विश्वास ठेवेल तर, अक्षमतादेखील क्षमतेमध्ये परिवर्तित होईल. आणि मग अशावेळी, संकट आणि संघर्ष ह्या गोष्टीच स्वयमेव सिद्धीप्रत घेऊन जाणारे मध्यस्थ बनतील.

-श्रीअरविंद
(CWSA 31 : 727)

जो कोणी श्रीमाताजींप्रत वळलेला आहे तो माझा योग आचरत आहे. केवळ स्वबळावर, पूर्णयोग करता येईल वा पूर्णयोगाची सर्व अंगे पूर्णत्वाला नेता येतील असे समजणे ही फार मोठी चूक आहे. कोणताही मनुष्य असे करू शकत नाही. मग, व्यक्तीने काय करावयास हवे? तर स्वत:ला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यावयास हवे आणि सेवा, भक्ती, अभीप्सा यांद्वारे त्यांच्याप्रत खुले व्हावयास हवे, म्हणजे मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाश व सामर्थ्यानिशी त्या व्यक्तीमध्ये कार्य करतील, जेणेकरून त्या व्यक्तीस साधना करता येईल. महान पूर्णयोगी बनण्याची, अतिमानसिक व्यक्ती बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या दिशेने स्वत:ची किती वाटचाल झाली आहे ह्याची स्वत:शीच विचारणा करणे हीदेखील एक चूकच आहे. श्रीमाताजींविषयी भक्ती बाळगणे आणि स्वत:ला त्यांच्याप्रत समर्पित करणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे तसे बनण्याची इच्छा बाळगणे हा योग्य दृष्टिकोन आहे. उरलेल्या सर्व गोष्टी ठरविणे आणि त्या तुमच्यामध्ये घडवून आणणे ह्या गोष्टी श्रीमाताजींनीच करावयाच्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151-152)

भौतिक नियतीवादाने मार्गामध्ये अडचणी निर्माण करण्याचा जोर धरला आहे; अशावेळी त्याला अधिक धैर्याने आणि निश्चयाने तोंड देणे आवश्यक आहे.

पण कोणत्याही परिस्थितीत, काहीही झाले तरी, तुम्ही काहीही करीत असलात तरी, तुम्ही तुमच्यावर ‘भीती’चा पगडा पडू देता कामा नये. अगदी यत्किंचितही भीतीचा स्पर्श तुम्हाला होत आहे असे जाणवले तर, चटकन प्रतिकार करा आणि मदतीसाठी हाक मारा.

तुम्ही म्हणजे देह नाही हे तुम्ही शिकले पाहिजे. त्याला लहान बालकाप्रमाणे समजावले पाहिजे की, त्याने घाबरण्याची आवश्यकता नाही.

‘भीती’ हा सर्व शत्रूंपैकी सर्वात मोठा शत्रू आहे आणि आपण इथे, त्यावर एकदाच कायमची मात केली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 183)

‘ल्हासा’ या गावामध्ये प्रवेश करणाऱ्या श्रीमती अलेक्झांड्रा डेव्हिड नील ह्या पहिल्या युरोपियन बुद्धमार्गी महिला होत्या. त्यांचा तिबेटचा प्रवास खूप कष्टप्रद होता. नील जेव्हा एका जथ्याबरोबर तिबेटकडे जायला निघाल्या होत्या. तेव्हाची ही गोष्ट आहे. त्याकाळात इंडो-चायना मार्गे तिबेटमध्ये जाणे तुलनेने सोपे असल्याने नील त्या मार्गाने निघाल्या होत्या. नरभक्षक वाघांची वस्ती असलेल्या जंगलातून त्यांची वाट जात होती. नील रोजच्या रोज ठरावीक वेळी ध्यानास बसत असत. एक दिवसाचाही कधी खंड पडू देत नसत. जेव्हा त्या घनदाट अरण्यातून चालल्या होत्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांची रोजची ध्यानाची वेळ झाली आहे.

म्हणून त्यांनी त्यांच्या सोबत्यांना सांगितले,”तुम्ही पुढे व्हा, माझे ध्यान आटोपले की मी येतेच.”

त्यांच्या काळजीने त्यांचे सहप्रवासी घाबरून गेले. त्यांनी नीलला खूप समजावून पाहिले, “येथे थांबणे धोकादायक आहे. तुम्ही आमच्याबरोबर चला.”

त्यांनी असे वारंवार सांगून पाहिले पण व्यर्थ ! त्या आपल्या निर्णयावर अडिग होत्या.

शेवटी नाईलाजाने सहप्रवासी पुढे निघून गेले. त्या ध्यानाला बसल्या. थोड्या वेळाने त्यांना एका अस्तित्वाची जाणीव झाली. त्यांनी डोळे उघडून पाहिले तो त्यांना काय दिसले? एक नरभक्षक वाघ त्यांना गिळंकृत करण्याच्या तयारीत अगदी तीनचार टप्प्यांच्या अंतरावर उभा होता.

तेव्हा एखाद्या सिद्ध अशा बुद्धवाद्याप्रमाणे त्यांनी विचार केला,”मला जर अशाच मार्गाने निर्वाण मिळणार असेल, तर ठीक आहे. मी तयार आहे. मला आता माझा देह फक्त योग्य प्रकारे, योग्य वृत्तीने सोडावयाचा आहे इतकेच.” असे मनाशी म्हणत त्या ध्यानाला बसल्या. पाच मिनिटे, दहा मिनिटे, अर्धा तास निघून गेला. त्यांनी ध्यानातून बाहेर आल्यावर डोळे उघडून पाहिले… वाघ निघून गेला होता. नील मग शांतपणे पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्या आणि सहप्रवाशांना म्हणाल्या,”ही मी आले आहे.”

-श्रीमाताजी

(CWM 9:53-54)

इ. स. १९७२ च्या पूर्वसंध्येला श्रीमाताजींना येणाऱ्या वर्षाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते, त्यांच्या साधनेतील अवस्थेविषयी होते, परंतु ते उत्तर सद्य परिस्थितीलाही चपखल लागू पडते असे वाटते, म्हणून येथे देत आहोत… दर क्षणी आपली प्रार्थना काय असावी ह्याचेही मार्गदर्शन यामध्ये आले आहे.

प्रश्न : नूतन वर्षाचा आरंभ होऊ घातला आहे… या नूतन वर्षाबाबत काही विशेष असे तुम्हाला जाणवते आहे का?

श्रीमाताजी : गोष्टींनी अगदी चरम रूप धारण केले आहे. त्यामुळे जणू काही संपूर्ण वातावरणाचे कल्पनातीत अशा उज्ज्वलतेप्रत उन्नयन केले जात आहे. परंतु त्याच वेळी अशीही संवेदना होत आहे की, कोणत्याही क्षणी मृत्यू येऊ शकेल – अगदी ”मृत्यू पावू शकेल” असेही नाही, परंतु देह विसर्जित होऊ शकतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी मिळून एक अशी जाणीव उदयाला येत आहे की, ज्यामध्ये… साऱ्या गतगोष्टी पोरकट, बालीश, चेतनाशून्य भासत आहेत… हे विलक्षण व विस्मयकारक आहे.

परंतु या देहाची सदैव एकच प्रार्थना असते, ती अशी की,

तुला जाणून घेता यावे यासाठी मला सुपात्र बनव.
तुझी सेवा करता यावी यासाठी मला सुयोग्य बनव.
मी तूच व्हावे यासाठी मला सक्षम कर.

– श्रीमाताजी
(CWM 11 : 330)

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधील हा अंशभाग)

तुम्ही बाह्य गोष्टींवर फार अवलंबून असता कामा नये; कारण तुमच्या अशा प्रवृत्तीमुळेच तुम्ही परिस्थितीला एवढे अवास्तव महत्त्व देता. परिस्थिती साहाय्य किंवा अडथळा करू शकत नाही, असे माझे म्हणणे नाही – परंतु परिस्थिती ही केवळ परिस्थिती असते, ती काही आपल्यामध्ये असणारी मूलभूत गोष्ट नाही आणि त्या परिस्थितीचे साहाय्य किंवा तिचा अडथळा ही मूलभूत महत्त्वाची गोष्ट असता असता कामा नये.

कोणत्याही मानवी महत्त्प्रयासामध्ये किंवा गंभीर मानवी प्रयासांमध्ये असते त्याप्रमाणेच योगामध्येही, अधिक प्रमाणात विरोधी हस्तक्षेप आणि प्रतिकूल परिस्थिती असणे स्वाभाविकच असते; ज्यावर मात करावीच लागते. त्यांना एवढे अतिरिक्त महत्त्व देणे म्हणजे त्यांचे महत्त्व वाढविण्यासारखे आहे, आणि त्यांची संख्यावृद्धी करत करत, त्यांची ताकद वाढविण्यासारखे हे आहे; त्यामुळे जणू काही त्यांच्या आत्मविश्वासामध्ये आणि पुन्हा पुन्हा (चाल करून) येण्याच्या त्यांच्या सवयीमध्ये वाढ करण्यासारखे आहे.

व्यक्ती त्यांच्या विरोधात, विश्वासपूर्ण व निर्धारपूर्वक संकल्पाचे कौशल्यपूर्ण प्रयत्नसातत्य राखू शकत नसेल तर, किमानपक्षी जर त्या परिस्थितीला समतेने सामोरे जाईल तर, ती त्या गोष्टींचे महत्त्व, त्यांचे परिणाम क्षीण करते आणि अंततः, (अगदी क्षणार्धात असे नव्हे, पण अंततः) त्यांच्या चिवटपणापासून आणि पुनरुद्भवण्यापासून सुटका करून घेऊ शकते.

आणि म्हणूनच, आपल्या अंतरंगामध्ये असणारी ही संकल्पक शक्ती (determining power) ओळखणे – कारण हेच गहन सत्य आहे; ती व्यवस्थित मार्गी लावणे आणि बाह्य परिस्थितीच्या ताकदी विरोधात आंतरिक सामर्थ्य पुनर्स्थापित करणे हेच योगाचे तत्त्व आहे.

अगदी दुर्बलातील दुर्बल व्यक्तीमध्ये सुद्धा हे सामर्थ्य असते; व्यक्तीने ते ओळखले पाहिजे, ते प्रकट केले पाहिजे आणि सर्व जीवन-प्रवासात व समरप्रसंगांत ते सदासर्वकाळ अग्रस्थानी ठेवले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 697)

प्रश्न : कोणीतरी असे म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती व अरिष्टं, भूकंप, अतिवृष्टी व जलप्रलय यासारख्या गोष्टी म्हणजे विसंवादी व पापी मानवतेचे परिणाम आहेत आणि मानव वंशाच्या प्रगतीबरोबर व विकासाबरोबर, त्याच्या अनुषंगाने जडभौतिक प्रकृतीमध्ये देखील बदल घडून येतील. यामध्ये कितपत तथ्य आहे?

श्रीमाताजी : कदाचित त्यातील सत्य असे आहे की, आपत्ती व अरिष्टांसहित स्वार झालेली प्रकृती आणि विसंवादी मानवता यांच्यामध्ये, चेतनेची एकच आणि एकसमान गती अभिव्यक्त होत असते. या दोन गोष्टी कारणभूत निमित्त व परिणाम (cause and effect) अशा स्वरूपाच्या नाहीत, तर त्या दोन्ही एकसमान पातळीच्या आहेत.

त्या दोन्हीच्या अतीत असणारी अशी एक चेतना आविष्कृत होण्याचा प्रयत्न करू पाहत आहे, या पृथ्वीवर मूर्त रूप घेण्याचा प्रयत्न करू पाहत आहे आणि या तिच्या जडभौतिकामध्ये चाललेल्या अवतरणामध्ये, तिला सर्वत्र सारख्याच विरोधाला सामोरे जावे लागत आहे; मग तो मानव असो किंवा जडभौतिक प्रकृती असो.

आपण या पृथ्वीवर ही जी अव्यवस्था आणि विसंवाद पाहत आहोत तो सर्व या विरोधाचाच परिणाम आहे. संकटं, अरिष्ट, वितुष्ट, हिंसा, अंधकार, अज्ञान – ह्या साऱ्या अनिष्ट गोष्टींचे मूळ एकच आहे.

मनुष्य हा बाह्य प्रकृतीचे कारणभूत-निमित्त नाही किंवा बाह्य प्रकृतीदेखील मनुष्याचे कारणभूत-निमित्त नाही; तर ह्या दोन्ही गोष्टी, त्यांच्यामागे असणाऱ्या एकाच व महत्तर गोष्टीवर अवलंबून असतात; आणि दोन्हीही गोष्टी, त्या महत्तर गोष्टीला अभिव्यक्त करणाऱ्या, ह्या जडभौतिक विश्वाच्या नित्यनिरंतर व प्रगमनशील प्रक्रियेचा एक भाग असतात.
आज, त्या दिव्य चेतनेची थोडीशी जरी शुद्धता खाली उतरविण्यासाठी, पुरेशी अशी ग्रहणशीलता आणि खुलेपणा, या पृथ्वीवर जर कोठे जागृत झाला असेल तर, हे अवतरण आणि जडातील त्याचे आविष्करण यामुळे केवळ आंतरिक जीवनच नाही तर, स्थूल परिस्थिती आणि मानवातील व प्रकृतीतील भौतिक अभिव्यक्ती देखील बदलू शकते.

हे अवतरण त्याच्या संभाव्यतेसाठी अखिल मानवजातीच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. सगळी मानवजात ही सुसंवाद, एकात्मता आणि अभीप्सेच्या अवस्थेत पोहोचावी आणि ती तो प्रकाश उतरविण्यासाठी, भौतिक परिस्थिती बदलण्यासाठी आणि प्रकृतीच्या गतिविधी बदलण्यासाठी पुरेशी समर्थ बनावी, ह्यासाठी जर आपल्याला थांबत बसावे लागले असते, तर मग आशेला जराही वाव नव्हता.

मात्र एखादी व्यक्ती किंवा एखादा छोटासा समूह किंवा काही व्यक्ती अवतरण घडवून आणू शकतील अशी शक्यता आहे. त्यांची संख्या किंवा विस्तार याला फारसे महत्त्व नाही. या पृथ्वीचेतनेमध्ये प्रवेश करणारा दिव्य चेतनेचा एक थेंबसुद्धा येथील सर्वकाही बदलवू शकतो. चेतनेच्या उच्चतर आणि निम्नतर प्रतलांच्या संपर्काचे आणि त्यांच्या संमीलनाचे हेच गुह्य आहे ; हे महान रहस्य हीच गुप्त किल्ली आहे. ह्यामध्ये नेहमीच रुपांतरकारी शक्ती असते; याबाबतीत मात्र ही शक्ती अधिक मोठ्या प्रमाणात आणि उच्चतर स्तरावर असेल.

आजवर येथे ज्याचे आविष्करण झालेले नाही अशा एखाद्या प्रतलाच्या जाणिवपूर्वक संपर्कात येण्यासाठी सक्षम असणारी अशी एखादी व्यक्ती जर या पृथ्वीवर असेल आणि जर ती व्यक्ती स्वतःच्या चेतनेत राहून, त्या प्रतलामध्ये चढून गेली आणि जर का तिने, ते प्रतल आणि जडभौतिक यांचे संमीलन घडवून आणले, त्यांचा सुमेळ घडवला तर, प्रकृतीने आजवर न अनुभवलेले असे रुपांतरण घडून येण्याची एक महान निर्णायक प्रक्रिया घडून येईल. एक नवीन शक्ती येथे अवतरेल आणि या पृथ्वीवरील जीवनाची परिस्थिती बदलवून टाकेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 37-40)

• पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, मन हे आध्यात्मिक गोष्टींचे आकलन करण्यासाठी अक्षम असते. आणि तरीसुद्धा, या मार्गावर प्रगत व्हावयाचे असेल तर, सर्व मानसिक मतमतांतरे आणि प्रतिक्रिया यांपासून स्वत:ला दूर राखणे अगदी अनिवार्य असते.

• सुखसोयी, समाधान, मौजमजा, आनंद यासाठीची सर्व धडपड सोडून द्या. केवळ प्रगतीचा एक धगधगता अग्नी बनून राहा. जे काही तुमच्यापाशी येईल, ते तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यकारी आहे, असे समजून त्याचा स्वीकार करा आणि जी कोणती प्रगती करणे आवश्यक आहे, ती ताबडतोब करून मोकळे व्हा.

• तुम्ही जे काही करता, त्यामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करा; परंतु, आनंद मिळवायचा म्हणून कधीच काही करू नका.

• कधीही उत्तेजित होऊ नका, उदास होऊ नका किंवा क्षुब्ध, अस्वस्थ होऊ नका. कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: शांत राहून तिला सामोरे जा.

• आणि तरीसुद्धा, तुम्ही अजून कोणती प्रगती करणे आवश्यक आहे ह्याचा शोध घेण्यामध्ये कायम सतर्क राहा आणि तसे करण्यासाठी अजिबात वेळ दवडू नका.

• वरवर दिसणाऱ्या भौतिक घटनांकडे पाहून त्यांचे अर्थ लावू नका. कारण त्या घटना म्हणजे निराळेच काही अभिव्यक्त करण्याचा एक ओबडधोबड असा प्रयत्न असतो, खरी गोष्ट आपल्या वरवरच्या आकलनामधून निसटून जाते.

• एखादी व्यक्ती तिच्या प्रकृतीमधील अमुक एका गोष्टीमुळे, तमुक एका प्रकारे वागत असते, तिच्या प्रकृतीमधील ती गोष्ट बदलवून टाकण्याची ताकद तुमच्यामध्ये असल्याशिवाय, त्या व्यक्तीच्या वर्तणुकीविषयी कधीही तक्रार करू नका, आणि तुमच्याकडे जर ती ताकद असेलच, तर तक्रार करण्याऐवजी ती बदलून टाका.

• तुम्ही कोणतीही गोष्ट करत असलात तरी, तुम्ही जे ध्येय तुमच्या स्वत:समोर ठेवले आहे त्या ध्येयाचा कधीही विसर पडू देऊ नका.

• एकदा का तुम्ही या महान शोधासाठी प्रवृत्त झालात की, कोणतीच गोष्ट लहान वा थोर नसते; सर्व गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या एकतर तुम्हाला त्वरेने यश मिळवून देऊ शकतात किंवा त्या यशाला उशीर लावतात.

• खाण्यापूर्वी काही सेकंद अशा अभीप्सेने चित्त एकाग्र करा की, तुम्ही जे अन्न ग्रहण करणार आहात त्यामुळे, तुमचे परमशोधासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्यांना एक भरभक्कम आधार प्राप्त होईल. तुमच्या शरीराला यथायोग्य असे द्रव्य मिळावे आणि तुमच्या त्या प्रयत्नांमध्ये सातत्य, चिकाटी राहावी म्हणून, त्या अन्नाद्वारे तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल.

• झोपी जाण्यापूर्वी काही सेकंद अशी अभीप्सा बाळगा की, त्या झोपेमुळे तुमच्या थकल्याभागल्या नसा पुन्हा ताज्यातवान्या होतील, तुमच्या मेंदूला शांतता आणि शांती प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही जागे झालात की, परत ताजेतवाने होऊन, ताज्या दमाने, परमशोधाच्या मार्गावरील तुमची वाटचाल तुम्ही पुन्हा सुरु करू शकाल.

• कोणतीही कृती करण्यापूर्वी अशी इच्छा बाळगा की, तुमची कृती तुम्हाला साहाय्यकारी होईल किंवा अगदीच नाही तर, परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये किमान ती अडथळा तरी ठरणार नाही.

• जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वी, ते शब्द पडताळून पाहण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढा वेळ चित्त एकाग्र करा आणि जे शब्द बाहेर पडणे नितांत आवश्यक आहेत तेवढेच बोलण्यास संमती द्या; परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारे हानीकारक ठरणार नाहीत केवळ त्याच शब्दांना मुखावाटे बाहेर पडण्यास संमती द्या.

• सारांश रूपाने म्हणायचे तर, तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्या वर असली पाहिजे, तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात त्या प्रत्येक अस्तित्वाच्या वर असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व हालचालींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे.

• तुमच्या या सातत्यपूर्ण अथक परिश्रमांमुळे, एक दिवस अचानकपणे आंतरिक द्वार खुले होईल आणि एका लखलखीत, प्रकाशमान दीप्तिमध्ये तुमचा उदय होईल, त्यातून तुम्हाला अमर्त्यतेची खात्री पटेल, तुम्ही नेहमीच जिवंत होतात आणि पुढेही जिवंत असणार आहात, बाह्य रूपे केवळ नाहीशी होतात आणि तुम्ही वस्तुत: जे काही आहात त्याच्याशी तुलना करता, ही बाह्य रूपे म्हणजे फाटलेले कपडे जसे टाकून द्यावेत त्याप्रमाणे असतात, ह्याचा मूर्तिमंत अनुभव तुम्हाला येईल.

• आणि तेव्हा मग, सर्व बंधनातून मुक्त झालेले तुम्ही ताठपणे उभे राहाल. एरवी प्रकृतीने तुमच्यावर जे परिस्थितीचे ओझे लादलेले असते त्या ओझ्याखाली चिरडून जायला नको असेल तर, तुम्हाला मोठ्या कष्टाने ते ओझे वागवत पुढे चालावेच लागते, ते ओझे सहन करावेच लागते, आता मात्र तसे करावे न लागता, तुम्ही सरळ, खंबीरपणे मार्गक्रमण करू शकाल ; आता तुम्हाला तुमच्या नियतीची जाण असेल, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी असाल.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 33-35)

साधनेची दुसरी बाजू ही प्रकृती, मन, प्राण आणि शारीरिक जीवनाशी व त्यांच्या गतिविधींशी संबंधित आहे.

येथे तत्त्व हे आहे की, प्रकृती ही आंतरिक साक्षात्काराशी मिळतीजुळती असली पाहिजे म्हणजे, व्यक्तीचे दोन विसंगत भागात विभाजन व्हायला नको. आणि यासाठी, अनेक साधना किंवा प्रक्रिया आहेत.

समर्पण साधना :
त्यातील एक साधना म्हणजे, स्वतःच्या सर्व गतिविधी ह्या ईश्वरार्पण करायच्या आणि आंतरिक मार्गदर्शनासाठी व स्वतःची प्रकृती, उच्चतर शक्तीने हाती घ्यावी म्हणून तिला साद घालायची. जर का आंतरिक आत्म-उन्मीलन झाले असेल, जर का चैत्य पुरुष पुढे आलेला असेल तर मग, फार काही अडचण येत नाही – कारण त्याबरोबरच चैत्य विवेकसुद्धा येतो. सातत्याने सूचना मिळत राहतात, आणि अंततः त्याचे शासन सुरु होते, हे शासन सर्व अपूर्णता दाखवून देते आणि शांतपणे, धीराने त्या काढूनही टाकते; त्यामुळे योग्य मानसिक व प्राणिक हालचाली घडून येतात आणि त्यातून शारीरिक जाणिवेला सुद्धा एक आकार पुनर्प्राप्त होतो.

साक्षी भावाची साधना :
दुसरी पद्धत म्हणजे मन, प्राण आणि शारीरिक अस्तित्वाच्या साऱ्या हालचालींपासून अलिप्त होऊन मागे उभे राहवयाचे आणि त्यांच्या सर्व गतिविधी म्हणजे आपल्या सद्अस्तित्वाचा एक भाग आहेत असे न मानता; भूतकाळातील कर्मामुळे आपल्यावर लादल्या गेलेल्या, व्यक्तीमधील सामान्य प्रकृतीच्या नित्य रचना आहेत असे समजायचे.

व्यक्ती यामध्ये जितक्या प्रमाणात यशस्वी होते, म्हणजे जितक्या प्रमाणात ती निर्लिप्त होते, आणि मन व त्याच्या गतिविधी ह्या म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही ; प्राण व त्याच्या गतिविधी म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही; शरीर व त्याच्या हालचाली म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही, तेव्हा व्यक्ती शांत, स्थिर, अमर्याद, अलिप्त अशा आणि ज्यामध्ये ऊर्ध्वस्थित असणाऱ्या सद्अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसत असते आणि जे त्याचे थेट प्रतिनिधी असू शकते अशा, अंतरंगात असणाऱ्या आपल्या आंतरिक अस्तित्वाविषयी म्हणजे आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर यांविषयी जागृत व्हायला लागते. आणि अशा या शांत आंतरिक अस्तित्वातूनच मग, जे त्याज्य आहे त्याचा अस्वीकार व्हायला सुरुवात होते; जे राखावयास हवे आणि ज्याचे परिवर्तन करावयास हवे त्याचा स्वीकार सुरु होतो. परिपूर्णत्वाविषयीची अगदी आंतरतम अशी इच्छा उदयास येते किंवा प्रकृतीच्या परिवर्तनासाठी जे आवश्यक आहे तेच प्रत्येक पावलागणिक करता यावे म्हणून दिव्य शक्तीचा धावा करणे सुरु होते.

त्यातूनच मग आंतरतम अशा चैत्य अस्तित्वाप्रत आणि त्याच्या मार्गदर्शक प्रभावाप्रत किंवा त्याच्या थेट मार्गदर्शनाप्रत मन, प्राण व शरीर खुले होण्याची शक्यता असते. बऱ्याच व्यक्तींमध्ये, ह्या दोन्ही पद्धती एकदमच उदयास येतात आणि एकत्रितपणे कार्य करतात आणि शेवटी एकमेकींमध्ये मिसळून जातात. पण व्यक्ती यातील कोणत्याही एका पद्धतीपासूनही सुरुवात करू शकते. जी पद्धत अनुसरण्यास सोपी आहे आणि जी व्यक्तीला अगदी स्वाभाविक वाटते त्या पद्धतीने तिने सुरुवात करावी. अंततः, सर्व प्रकारच्या अडचणींमध्ये जेथे वैयक्तिक प्रयत्न खुंटतात, तेव्हा गुरुच्या मदतीचा हस्तक्षेप होऊ शकतो आणि साक्षात्कारासाठी जे आवश्यक आहे ते किंवा लगेचची जी कोणती पायरी आवश्यक आहे ती गोष्ट त्यांच्याद्वारे घडून येऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06-08)