ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

प्रश्न : कोणीतरी असे म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती व अरिष्टं, भूकंप, अतिवृष्टी व जलप्रलय यासारख्या गोष्टी म्हणजे विसंवादी व पापी मानवतेचे परिणाम आहेत आणि मानव वंशाच्या प्रगतीबरोबर व विकासाबरोबर, त्याच्या अनुषंगाने जडभौतिक प्रकृतीमध्ये देखील बदल घडून येतील. यामध्ये कितपत तथ्य आहे?

श्रीमाताजी : कदाचित त्यातील सत्य असे आहे की, आपत्ती व अरिष्टांसहित स्वार झालेली प्रकृती आणि विसंवादी मानवता यांच्यामध्ये, चेतनेची एकच आणि एकसमान गती अभिव्यक्त होत असते. या दोन गोष्टी कारणभूत निमित्त व परिणाम (cause and effect) अशा स्वरूपाच्या नाहीत, तर त्या दोन्ही एकसमान पातळीच्या आहेत.

त्या दोन्हीच्या अतीत असणारी अशी एक चेतना आविष्कृत होण्याचा प्रयत्न करू पाहत आहे, या पृथ्वीवर मूर्त रूप घेण्याचा प्रयत्न करू पाहत आहे आणि या तिच्या जडभौतिकामध्ये चाललेल्या अवतरणामध्ये, तिला सर्वत्र सारख्याच विरोधाला सामोरे जावे लागत आहे; मग तो मानव असो किंवा जडभौतिक प्रकृती असो.

आपण या पृथ्वीवर ही जी अव्यवस्था आणि विसंवाद पाहत आहोत तो सर्व या विरोधाचाच परिणाम आहे. संकटं, अरिष्ट, वितुष्ट, हिंसा, अंधकार, अज्ञान – ह्या साऱ्या अनिष्ट गोष्टींचे मूळ एकच आहे.

मनुष्य हा बाह्य प्रकृतीचे कारणभूत-निमित्त नाही किंवा बाह्य प्रकृतीदेखील मनुष्याचे कारणभूत-निमित्त नाही; तर ह्या दोन्ही गोष्टी, त्यांच्यामागे असणाऱ्या एकाच व महत्तर गोष्टीवर अवलंबून असतात; आणि दोन्हीही गोष्टी, त्या महत्तर गोष्टीला अभिव्यक्त करणाऱ्या, ह्या जडभौतिक विश्वाच्या नित्यनिरंतर व प्रगमनशील प्रक्रियेचा एक भाग असतात.
आज, त्या दिव्य चेतनेची थोडीशी जरी शुद्धता खाली उतरविण्यासाठी, पुरेशी अशी ग्रहणशीलता आणि खुलेपणा, या पृथ्वीवर जर कोठे जागृत झाला असेल तर, हे अवतरण आणि जडातील त्याचे आविष्करण यामुळे केवळ आंतरिक जीवनच नाही तर, स्थूल परिस्थिती आणि मानवातील व प्रकृतीतील भौतिक अभिव्यक्ती देखील बदलू शकते.

हे अवतरण त्याच्या संभाव्यतेसाठी अखिल मानवजातीच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. सगळी मानवजात ही सुसंवाद, एकात्मता आणि अभीप्सेच्या अवस्थेत पोहोचावी आणि ती तो प्रकाश उतरविण्यासाठी, भौतिक परिस्थिती बदलण्यासाठी आणि प्रकृतीच्या गतिविधी बदलण्यासाठी पुरेशी समर्थ बनावी, ह्यासाठी जर आपल्याला थांबत बसावे लागले असते, तर मग आशेला जराही वाव नव्हता.

मात्र एखादी व्यक्ती किंवा एखादा छोटासा समूह किंवा काही व्यक्ती अवतरण घडवून आणू शकतील अशी शक्यता आहे. त्यांची संख्या किंवा विस्तार याला फारसे महत्त्व नाही. या पृथ्वीचेतनेमध्ये प्रवेश करणारा दिव्य चेतनेचा एक थेंबसुद्धा येथील सर्वकाही बदलवू शकतो. चेतनेच्या उच्चतर आणि निम्नतर प्रतलांच्या संपर्काचे आणि त्यांच्या संमीलनाचे हेच गुह्य आहे ; हे महान रहस्य हीच गुप्त किल्ली आहे. ह्यामध्ये नेहमीच रुपांतरकारी शक्ती असते; याबाबतीत मात्र ही शक्ती अधिक मोठ्या प्रमाणात आणि उच्चतर स्तरावर असेल.

आजवर येथे ज्याचे आविष्करण झालेले नाही अशा एखाद्या प्रतलाच्या जाणिवपूर्वक संपर्कात येण्यासाठी सक्षम असणारी अशी एखादी व्यक्ती जर या पृथ्वीवर असेल आणि जर ती व्यक्ती स्वतःच्या चेतनेत राहून, त्या प्रतलामध्ये चढून गेली आणि जर का तिने, ते प्रतल आणि जडभौतिक यांचे संमीलन घडवून आणले, त्यांचा सुमेळ घडवला तर, प्रकृतीने आजवर न अनुभवलेले असे रुपांतरण घडून येण्याची एक महान निर्णायक प्रक्रिया घडून येईल. एक नवीन शक्ती येथे अवतरेल आणि या पृथ्वीवरील जीवनाची परिस्थिती बदलवून टाकेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 37-40)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

44 minutes ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago