ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

सत्य जगावयास शिकणे महत्त्वाचे

कधीकधी असेही होते की, व्यक्ती तत्त्वज्ञानाचे एक आख्खे पुस्तक वाचून काढते पण, एका पावलाने देखील तिची पुढे प्रगती होत नाही. असेही घडते की, एखादी व्यक्ती धर्माची अगदी उत्कट भक्त असू शकते पण तिची अजिबात प्रगती होत नाही. अशीही काही माणसं आहेत की, ज्यांनी त्यांचे आख्खे आयुष्य हे ध्यानधारणेमध्ये व्यतीत केले आणि तरीदेखील त्यांना काहीच प्राप्त झाले नाही. अशी ही काही माणसं आहेत की, जी अगदी साधीसुधी कामे करायची, उदा. चांभाराने जुन्या चपलाबूट शिवणे इ. आणि त्यांना आध्यात्मिक अनुभव आलेला होता. व्यक्ती काय विचार करते, काय बोलते यापेक्षा अनुभव वगैरे गोष्टी या खूप वेगळ्या आहेत. ती एक देणगी आहे, इतकेच काय ते. आणि यासाठी काय आवश्यक असेल तर ते म्हणजे – त्या ईश्वराशी एकत्त्व पावण्यामध्ये यशस्वी होणे आणि ईश्वरामध्ये जीवन जगणे. कधीकधी तुम्ही पुस्तकातील एकच वाक्य वाचता आणि तुम्हाला ते वाक्य तेथे घेऊन जाते. तर कधी तुम्ही तत्त्वज्ञानाचे आख्खे पुस्तक वाचूनही काही उपयोग होत नाही. पण अशीही काही माणसं असतात की, तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचल्यामुळे त्यांना प्रगती करण्यासाठी काही मदत झालेली असते. पण या सर्व गोष्टी गौण असतात.

एकच गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे : प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण इच्छा, संकल्प; कारण या गोष्टी निमिषार्धात होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीने चिकाटी ठेवली पाहिजे. जेव्हा एखाद्याला असे वाटते की, त्याची प्रगती होत नाहीये, अशावेळी त्याने नाउमेद होता कामा नये. त्याच्या प्रकृतीमध्ये असे काय आहे की, जे त्याला विरोध करत आहे ते त्याने शोधून काढावयास हवे; आणि मग आवश्यक ती प्रगती करावयास हवी. त्यामुळे व्यक्ती एकाएकी पुढे जाते. आणि जेव्हा तुम्ही शेवटापर्यंत जाता तेव्हा, तुम्हाला अनुभव येतो.

आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या माणसांनी परस्परांहून अगदी विभिन्न असे मार्ग अनुसरलेले असतात, ज्यांच्या विभिन्न अशा मनोवृत्ती असतात, त्यांच्यापैकी काहीजण खूप भाविक असतात तर काही अगदी नास्तिक असतात, काही जडवादी असतात पण हे सारे एकाच प्रकारच्या अनुभवापाशी येऊन पोहोचतात; तो अनुभव सर्वांना सारखाच येतो. कारण तो सत्य आहे – तो खरा आहे, कारण ती एकमेवाद्वितीय अशी वस्तुस्थिती आहे. व्यक्ती काय बोलते ते महत्त्वाचे नाही, तर महत्त्वाचे आहे ते तुम्ही तुमच्या मार्गाचे अनुसरण करणे, भले मग तो मार्ग कोणताही असो, त्याचे अनुसरण करणे हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 26-27)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

45 minutes ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago