ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

नैतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन

….नैतिकता ही अशी ताठर, कृत्रिम स्वरूपाची असते आणि त्यामुळेच ती तिच्या तत्त्वांबाबत आणि तिच्या कार्यपद्धतीबाबत आध्यात्मिक जीवनाच्या विरोधी असते. आध्यात्मिक जीवन सर्वांमध्ये असलेले एकच तत्त्व उघड करते पण त्याचबरोबर त्याची अगणित विविधताही ते उघड करते; ते एकतेतील विविधतेसाठी आणि त्या विविधतेतील पूर्णत्वासाठी कार्य करते.

नैतिकता मात्र या जीवनाच्या विविधतेच्या आणि आत्मस्वातंत्र्याच्या विरोधी असणारे असे एक कृत्रिम जीवनमान उचलून धरते. ती काहीतरी मानसिक, ठरीव, मर्यादित असे तयार करते आणि सर्वांना त्याला मान्यता द्यावयास लावते. सर्वांनी समानच गुण आणि समानच आदर्श प्रकृती आत्मसात करावी, त्यासाठीच सर्वांनी धडपडावे असे तिला वाटते. नैतिकता ही काही दैवी नाही किंवा त्यामध्ये ईश्वरी असेदेखील काही नाही; ती मानवी असते, माणसासाठी असते. चांगल्या आणि वाईटामध्ये निश्चित असा भेद आहे असे समजून, तोच मूलभूत घटक आहे असे नैतिकता मानून चालते. पण ही एक स्वैर कल्पना आहे. ती सापेक्ष अशा काही गोष्टी घेते आणि त्या निरपवाद आहेत असे मानून दुसऱ्यांवर लादू पाहते; हे चांगले आणि हे वाईट याबद्दलच्या संकल्पना वेगवेगळ्या वातावरणामध्ये, वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या युगांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या असतात. नैतिकतेची संकल्पना पुढे जाऊन असेही सांगते की, काही वासना चांगल्या असतात आणि काही वासना वाईट असतात. आणि त्यातील चांगल्या स्वीकाराव्यात आणि दुसऱ्या नाकाराव्यात असेही ही नैतिक संकल्पना सांगते.

पण आध्यात्मिक जीवनाची मात्र अशी मागणी असते की, वासना मग त्या कोणत्याही प्रकारच्या असोत तुम्ही त्या अव्हेरल्याच पाहिजेत. जे तुम्हाला ईश्वरापासून दूर घेऊन जाते अशी सर्व प्रकारची स्पंदने तुम्ही दूर सारलीच पाहिजेत, असा त्याचा कायदा असतो. वासना वाईट आहेत म्हणून तुम्ही त्या नाकारल्या पाहिजेत असे नव्हे, कारण त्या इतरांसाठी वा एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्याही ठरू शकतात. पण वासना म्हणजे असे आवेग वा शक्ती असतात, ज्या प्रकाशहीन आणि अज्ञानी असल्याने, दिव्यत्वाकडे चालू असलेल्या तुमच्या वाटचालीमध्ये त्या अडसर बनून उभ्या ठाकतात. सर्व प्रकारच्या इच्छावासना, मग त्या चांगल्या असोत वा वाईट त्या ह्याच वर्णनामध्ये बसतात कारण, वासना ह्या मुळातच अप्रकाशमान अशा प्राणिक जीवांकडून आणि त्यांच्या अज्ञानातून उदय पावतात.

दुसऱ्या बाजूने, ज्यांच्यामुळे तुम्ही ईश्वराच्या संपर्कामध्ये येऊ शकाल अशा सर्व कृती तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत. त्या चांगल्या आहेत म्हणून, तुम्ही त्या स्वीकाराव्यात असे नव्हे तर, त्या तुम्हाला ईश्वराप्रत घेऊन जातात म्हणून, तुम्ही त्या स्वीकारावयास हव्यात. ईश्वराप्रत जे काही तुम्हाला घेऊन जाते त्याचा स्वीकार करा आणि जे त्यापासून तुम्हाला दूर नेते त्या सगळ्या गोष्टींना नकार द्या. पण ह्या गोष्टी चांगल्या आहेत किंवा ह्या वाईट आहेत असे म्हणू नका आणि तुमचा दृष्टिकोन इतरांवर लादण्याचाही प्रयत्न करू नका. कारण ज्या गोष्टीला तुम्ही वाईट असे संबोधता तीच गोष्ट तुमच्या शेजाऱ्यासाठी, की जो दिव्य जीवनाची अनुभूती यावी म्हणून प्रयत्नशील असेलच असे नाही, त्याच्यासाठी ती गोष्ट चांगलीही असू शकेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 118-119)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

8 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

16 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago