ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

“सत्य-प्रकाशाला बळाने खाली खेचायचा प्रयत्न करणे हे खचितच चुकीचे आहे. अतिमानस ही अट्टहासाने खाली खेचण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा, ते स्वत:हून आपलेआपणच खुले होईल; पण हे घडून येण्यापूर्वी, पुष्कळ काही करावे लागेल आणि ते मात्र धीराने व कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.” – श्रीअरविंद

प्रश्न : माताजी, असे येथे का म्हटले आहे? “खाली ओढणे, खेचणे” ही अनेक जणांची प्रवृत्ती असते का?

श्रीमाताजी : माणसं घाईत असतात आणि त्यांना लगेचच फळ हवे असते. आणि मग, त्यांना असे वाटायला लागते की, त्यांनी अतिमानस खाली उतरविले आहे – वास्तविक, त्यांनी एखादे छोटे प्राणिक अस्तित्व खाली खेचलेले असते, जे त्यांना वाकुल्या दाखवत असते आणि अंतत: त्याचे पर्यवसान त्यांना वेडाबावळा, मूर्ख बनविण्यात होते. बहुतेक वेळा, शंभरपैकी नव्व्याण्णव वेळा हेच घडते. असे प्राणिक व्यक्तित्व, एखादे प्राणिक अस्तित्व हा मोठा खेळ खेळते; प्रकाशाचा चकाचक, दिखाऊ असा खेळ उभा करते. आणि तो बिचारा, ज्याने त्या अस्तित्वाला खेचले होते तो त्या चकचकीत प्रकाशाने दिपून जातो आणि म्हणतो, “हे काय, हेच ते अतिमानस!” आणि तो खड्ड्यात जाऊन पडतो.

जेव्हा तुम्हाला खरंच ईश्वराचा, सत्य-प्रकाशाचा स्पर्श झालेला असतो, त्याचे थोडेसे जरी दर्शन झालेले असते, त्या सत्य प्रकाशाशी तुमचा संबंध निर्माण झालेला असतो, तेव्हाच तुम्ही तो प्रकाश, प्राणिक प्रकाशाहून वेगळेपणाने ओळखू शकता आणि तेव्हाच तुम्हाला तो चकाकणारा प्रकाश कसा कृत्रिम आहे, हे समजू शकते. जणू काही तो रंगमंचावरील कृत्रिम प्रकाशाचा खेळ आहे हे कळू शकते. परंतु तसे नसेल, तर मात्र, इतरेजन त्याने दिपून जातात, कारण तो प्रकाश तसा दिपवणाराच असतो, ‘अद्भुत’ असतो आणि मग त्या प्रकाशामुळे ते फसतात. पण, जेव्हा तुम्ही सत्यप्रकाश पाहिलेला असतो, त्या सत्याशी तुमचा संबंध प्रस्थापित झालेला असतो, तेव्हा तुम्ही त्याकडे फक्त पाहता, आणि हसता. ती भोंदूगिरी असते, फसवेगिरी असते, पण ती फसवेगिरी आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा, तुम्हाला सत्य काय आहे ते ज्ञात असावे लागते.

मूलत: प्रत्येक गोष्टीबाबत हे असेच असते. अशा प्रकारचे खेळ ज्याच्यावर चालू असतात, असा ‘प्राण’ हा जणू काही महारंगमंचच असतो – तो खूप आकर्षक, डोळे दिपवणारा, फसवा असतो. परंतु, जेव्हा तुम्हाला ‘सद्वस्तु’ काय ते माहीत असते, तेव्हाच तुम्हाला चटकन जाणवते, कोणत्याही तर्काविना, उत्स्फूर्तपणे जाणवते आणि तेव्हा तुम्ही म्हणता, “नाही, मला ते नको आहे.”

जेव्हा तुम्ही खेचता, शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी हेच घडते….लाखातूनच एखाद्या बाबतीत असे घडते की, त्याने खरंच सद्वस्तु खाली खेचलेली असते – पण तेव्हा हे सिद्ध होते की, तो तयार झालेला होता. अन्यथा नेहमीच, तुम्ही जे खेचता ते प्राणिक अस्तित्व असते, वरवरचे असे काहीतरी, ते त्या वस्तुचे रंगमंचीय रूप असते, ती सद्वस्तु नव्हे.

खेचणे ही अहंमन्य प्रतिक्रिया आहे. ते अभीप्सेचे विकृत रूप होय. खऱ्या अभीप्सेमध्ये देणे, आत्मदान समाविष्ट असते तर खेचण्यामध्ये, ओढण्यामध्ये स्वत:साठी काहीतरी मागणी असते. अगदी तुमच्या मनामध्ये कितीही विशाल अशी आकांक्षा का असेना – अगदी पृथ्वीएवढी, ब्रह्मांडाएवढी का असेना, तिचा काहीच उपयोग नाही, कारण अशी आकांक्षा म्हणजे केवळ मानसिक क्रियाव्यवहार!

– श्रीमाताजी
(CWM 11 :22-23)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

45 minutes ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago