ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

पूर्णयोगामध्ये लौकिक आणि पारलौकिकाचा समावेश

(श्रीअरविंदांना त्यांच्या पूर्वजीवनाविषयी एका शिष्याने प्रश्न विचारला होता, त्याला उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रातील हा मजकूर.)

जर कोणाला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करावयाची असेल, आणि त्यात त्याला शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून, लौकिकतेचा त्याग करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या परिघामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य चेतना आणि दिव्य शक्ती लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो असे मला आढळून आले.

हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक आध्यात्मिक ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा मागोवा घेणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला काळिमा फासला जाईल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. माझा तरी वास्तवाचा आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप, याविषयीचा हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुचरण करणे ह्याला मी पूर्णयोग म्हणतो.

अर्थातच, एखाद्याला पूर्णतेची ही संकल्पना मान्य नसेल आणि ती तो नाकारत असेल किंवा या लौकिक जीवनाचा संपूर्णतया परित्याग करून, पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिकतेवर तो विश्वास ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे, पण तसे असेल तर माझा योग करणे त्याला अशक्य होईल.

माझ्या योगामध्ये, परमात्मलोकाचा, आपल्या भूलोकाचा आणि या दरम्यानच्या सर्व जगतांचा आणि त्यांच्या आपल्या जीवनावरील व भौतिक जगतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आणि त्यांच्या पूर्ण अनुभवांचा समावेश होतो.

पण हेही शक्य आहे की, आधी केवळ परमपुरुषाच्या साक्षात्कारावर भर द्यायचा किंवा त्याच्या एखाद्या अंगावर भर द्यायचा, जसे की, आपला आणि आपल्या कर्मांचा स्वामी असलेल्या विश्वाधिपती कृष्ण, शिव यांच्या साक्षात्कारावर भर द्यायचा आणि या योगासाठी आवश्यक असे परिणाम साध्य करून घ्यावयाचे आणि नंतर (दिव्य जीवनाकडे वाटचाल आणि आत्म्याचा भौतिक जीवनावर विजय हे ध्येय जर एखाद्याने स्वीकारलेले असेल तर) त्याच्या पूर्ण परिणामांकडे वळणे शक्य आहे. वस्तुविषयक हा अनुभव, अस्तित्वविषयक हे सत्य आणि हा दृष्टिकोन यामुळेच ‘दिव्य जीवन’ आणि ‘सावित्री’ लिहिणे मला शक्य झाले.

ईश्वराचा, पुरुषोत्तमाचा साक्षात्कार ही निश्चितच आवश्यक गोष्ट आहे. पण प्रेम, श्रद्धा, भक्ती यांतून त्या ईश्वराकडे वळणे, स्वत:च्या कर्मांच्या द्वारे त्याची सेवा करणे आणि केवळ बौद्धिक जाणिवेने नव्हे तर, आध्यात्मिक अनुभूतीच्या माध्यमातून त्याला जाणणे ह्यादेखील पूर्णयोगाच्या मार्गावरील आवश्यक गोष्टी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 234-235)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

8 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

1 day ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

5 days ago