ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

भक्तिमार्ग हा परम प्रेम व परम आनंद यांच्या भोगाला आपले साध्य मानतो. ईश्वर हा व्यक्तिरूपात विश्वाचा दिव्य प्रेमी व भोक्ता आहे, या कल्पनेचा उपयोग सामान्यतः भक्तियोगात करण्यात येतो. भक्तियोगामध्ये जग म्हणजे ईश्वराची लीला आहे या भूमिकेतून पाहिले जाते; आत्मविलोपन व आत्मप्रकटीकरण यांच्या निरनिराळ्या अवस्थांमधून जात जात, त्या लीलेच्या शेवटच्या अंकामध्ये, जीवाचा मानवी जीवनात प्रवेश होतो.

मानवी जीवनाच्या सर्व भावनामय स्वाभाविक संबंधांचा उपयोग करून, सर्वप्रेमी, सर्वसुंदर, सर्वानंदी ईश्वराच्या संपर्काचा आनंद भोगावयाचा; सांसारिक नश्वर नात्यांतील भावनासुख टाकून द्यावयाचे हे भक्तियोगाचे तत्त्व आहे. या योगात पूजा व ध्यान हे केवळ साधन आहे; ईश्वराशी नाते जोडता यावे व ईश्वराशी जोडलेल्या नात्याची उत्कटता वाढावी यासाठीच केवळ या योगात पूजा व ध्यान यांचा उपयोग करण्यात येत असतो. हा योग भावनात्मक संबंधांचा उपयोग करण्यात अत्यंत उदार आहे. इतका की, ईश्वराशी शत्रुत्व किंवा विरोध ही भावना ही तीव्र उतावळ्या प्रेमाची भ्रष्टरूपातील भावना आहे असे हा योग मानतो आणि ही विरोधी भावना देखील साक्षात्काराला व मोक्षाला साधन म्हणून उपयोगी पडू शकते असे या योगाचे म्हणणे आहे. सर्वसाधारणत: ह्या भक्तिमार्गाकडे पाहता असे दिसते कि, तो या मार्गातील साधकांना ज्ञानमार्गातील साधाकांप्रमाणेच जगाच्या संसारापासून दूर नेणारा ठरतो; भक्तियोगानुसार, भक्त सर्वातीत, विश्वातीत अशा ईश्वरांत विलीन होतो.

परंतु भक्तिमार्गातहि संसारत्याग करून ईश्वरात विलीन होणे हा परिणाम टाळता येणे शक्य असते. या मार्गात हा परिणाम टाळणारी एक व्यवस्थाही आहे, ती अशी की, दिव्य प्रेम हे ईश्वर आणि साधकाचा आत्मा या नात्यातच प्रकट व्हावे, असा निर्बध नसून; त्याचा व्याप याहूनहि अधिक असतो –

परमात्म्याचे प्रेम व आनंद यांचा समान साक्षात्कार झालेले ईश्वराचे जे भक्त असतात त्यांचा एक मेळा बनतो व या मेळ्यातील भक्तांनी एकमेकांवर दिव्य प्रेम करावें, एकमेकांनी एकमेकांची पूजा करावी असा भक्तिमार्गाचा कटाक्ष असतो.

भक्तिमार्गात आणखीहि एक याहूनहि अधिक व्यापक अशी संसार-त्याग-विरोधी व्यवस्था आहे. भक्ताचा साक्षात्कार असा असतो की, केवळ सर्व प्राण्यात, मानवात व पशूतच नव्हे, तर सर्व रूपधारी वस्तूंत व निर्जिवांतहि भक्ताच्या प्रेमाचा दिव्य विषय असणारा ईश्वर उपस्थित आहे.
भक्तियोगाचे हे व्यापक दर्शन मानवी भावना, संवेदना, सौंदर्यप्रतीति यांचे एकंदर क्षेत्र उन्नत करून त्याला दिव्य पातळीवर नेऊ शकते, या क्षेत्रात सर्वत्र आध्यात्मिकता भरू शकते, हे आपण समजू शकतो आणि मानवता सर्व विश्वभर प्रेम आणि आनंद यांजकडे वाटचाल करण्याचा जो जागतिक परिश्रम करीत आहे तो योग्यच आहे असे भक्तियोगाच्या वरील फळावरून आपण म्हणू शकतो.

– श्रीअरविन्द
(CWSA 23 : 39)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…

12 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

6 days ago