Tag Archive for: साधना

जीवन जगण्याचे शास्त्र – २०

(मानसिक आणि प्राणिक अविचलता म्हणजे काय ते कालच्या भागात आपण समजावून घेतले. आता हा त्याचा पुढील भाग…)

तुम्ही जडता अथवा सुस्त निष्क्रियता या गोष्टींना स्थिरशांती (calm) समजण्याची गल्लत कधीही करू नका. अविचलता (Quietude) ही अत्यंत सकारात्मक स्थिती असते. संघर्ष नाही म्हणजे आता शांती आहे असा येथे अर्थ नसून, ती खऱ्या अर्थाने सकारात्मक शांती असते. ती शांती सक्रिय, संक्रमणशील, शक्तिशाली असते; ती प्रत्येक गोष्ट सुव्यवस्थित करते, संघटित करते, त्यावर नियंत्रण ठेवते आणि स्थिरता आणते. मी नेहमी त्या स्थिरशांतीबद्दल सांगत असते.

मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगते की, “शांत व्हा,” तेव्हा “जा आणि झोप काढा, सुस्त व निष्क्रिय व्हा आणि काहीही न करता नुसते बसून राहा;” असे काही मला सांगायचे नसते. खरंतर, मला याच्या अगदी विरूद्ध सांगायचे असते. खरी स्थिरता, अविचलता ही एक फार मोठी शक्ती असते, ते एक फार मोठे सामर्थ्य असते.

खरंतर या समस्येकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर असे म्हणता येते की, जे खरोखरच खूप बलवान, सशक्त, शक्तिशाली असतात ते नेहमीच स्थिरशांत असतात. जे दुर्बल असतात तेच प्रक्षुब्ध असतात. तुम्ही जेव्हा खरोखरच सुदृढ, सशक्त बनता तेव्हा शांतियुक्त, शांत, स्थिर होता आणि तेव्हा, तुम्हाला अस्वस्थ करण्याच्या इराद्याने बाहेरून तुमच्यावर धावून येणाऱ्या विरोधी लाटांचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारी तग धरून राहण्याची क्षमता तुमच्यापाशी असते.

खरी अविचलता ही नेहमी शक्तीची खूण असते. बलवान व्यक्तींकडेच स्थिरशांती असते. आणि हे अगदी प्राकृतिक क्षेत्रामध्येसुद्धा (physical field) तितकेच खरे असते. सिंह, वाघ, हत्ती यांसारख्या प्राण्यांचे तुम्ही निरीक्षण केले आहे की नाही मला माहीत नाही, पण जेव्हा ते सक्रिय नसतात, तेव्हा ते नेहमीच पूर्णतया शांत असतात, स्तब्ध असतात. एखादा सिंह जेव्हा स्वस्थ बसून तुमच्याकडे पाहत असतो तेव्हा जणूकाही तो तुम्हाला म्हणत असतो, “किती अस्वस्थ आहात तुम्ही!” तो तुमच्याकडे अशा शहाणीवेच्या प्रशांत वातावरणात पाहत राहतो. आणि तेथे त्याची सारी ताकद, ऊर्जा, शारीरिक सामर्थ्य या गोष्टी एकवटलेल्या, गोळा झालेल्या आणि केंद्रित झालेल्या असतात आणि जेव्हा त्याला आज्ञा दिली जाते तेव्हा कोणत्याही क्षोभाशिवाय कृती करण्यासाठी तो सज्ज असतो.

मी अशी अनेक माणसं पाहिली आहेत की, जी अर्धा तास सुद्धा चुळबूळ न करता शांत बसू शकत नाहीत. ते पाय तरी हलवतील, हात किंवा डोकंतरी हलवतील; त्यांना सातत्याने सर्वकाळ अस्वस्थपणे हालचाली करत राहावे लागते, कारण त्यांच्यापाशी स्थिरशांत बसण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती किंवा सामर्थ्य नसते. आवश्यक असेल तेव्हा स्तब्ध राहायचे, स्वतःच्या सर्व ऊर्जा एकत्रित करायच्या आणि तुमच्या इच्छेनुसार त्या खर्च करायच्या. तुम्हाला जर आवश्यक असेल तर पूर्णपणे; अन्यथा, तुम्हाला अमुक एक कृती करण्यासाठी आवश्यकता असेल त्या प्रमाणात त्या खर्च करायच्या; आणि प्रत्येक कृतीमध्येसुद्धा परिपूर्ण स्थिरशांती बाळगायची, ही नेहमीच सामर्थ्याची खूण असते. ते सामर्थ्य शारीरिक किंवा प्राणिक किंवा मानसिक असू शकते. परंतु तुम्ही थोडेजरी क्षुब्ध, अस्वस्थ असाल तर तुम्ही कोणत्यातरी एखाद्या बाबतीत दुर्बल आहात हे खात्रीने धरून चाला. आणि तुमची अस्वस्थता जर सर्वांगीण असेल तर तुम्ही पूर्णतः दुर्बल आहात असे समजा.

– श्रीमाताजी (CWM 08 : 329-330)

जीवन जगण्याचे शास्त्र – १९

(पूर्वार्ध)

(श्रीमाताजी येथे मनाच्या आणि प्राणाच्या अविचलतेसंबंधी मार्गदर्शन करत आहेत.)

साधक : माताजी, तुम्ही आम्हाला जेव्हा सांगता की, ‘आम्ही शांतस्थिर असलेच पाहिजे,’ तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो?

श्रीमाताजी : मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला ‘शांतस्थिर (calm) राहा,’ असे सांगते, तेव्हा त्याचे व्यक्तिपरत्वे भिन्नभिन्न अर्थ असतात. परंतु पहिली अगदी आवश्यक असणारी स्थिरशांती म्हणजे मानसिक अविचलता (mental quietude). कारण सहसा व्यक्तीमध्ये त्याचाच अभाव असतो. मी जेव्हा ‘शांतस्थिर राहा,’ असे सांगते, तेव्हा मला असे म्हणायचे असते की, तुमचे विचार अस्वस्थ, उत्तेजित, प्रक्षुब्ध असता कामा नयेत. तुम्ही तुमचे मन अविचल (quiet) करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुमच्या कल्पना, तुमची निरीक्षणे, तुमच्या मानसिक रचना यांच्या भोवती घुटमळणे तुम्ही थांबविले पाहिजे.

आता कोणी मला आणखी एक असा प्रश्न विचारेल की, “तुम्ही आम्हाला शांतस्थिर राहायला सांगता, पण आम्ही त्यासाठी काय केले पाहिजे?” त्याचे उत्तर कमीअधिक प्रमाणात नेहमी एकसारखेच असते. ते म्हणजे, प्रथम तुम्हाला त्याची गरज वाटली पाहिजे आणि तशी गरज भासल्यानंतर, तुम्ही त्यासाठी आस बाळगली पाहिजे आणि मग त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

यासाठी आजवर अनेकांनी अगणित पद्धती सुचविलेल्या आणि अवलंबलेल्या आहेत. बहुधा या पद्धती नेहमीच दीर्घकालीन, कष्टसाध्य आणि कठीण असतात. आणि बहुधा बरेचसे लोक त्यांच्या ध्येयाप्रत पोहोचण्यापूर्वीच नाउमेद होऊन जातात. कारण ते जितका जास्त प्रयत्न करू लागतात तेवढे त्यांच्या डोक्यात अधिकाधिक विचार घोळू लागतात आणि त्या विचारांचे काहूर त्यांच्या मनात उठते.

प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी पद्धत असते; परंतु प्रथम व्यक्तीला शांतस्थिर राहण्याची गरज भासली पाहिजे, मग त्यासाठीचे कारण कोणतेही का असेना. म्हणजे एखादी व्यक्ती थकलेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीने खूप ताणतणाव सहन केलेला असेल म्हणून तिला अशी आवश्यकता जाणवत असेल; किंवा एखादी व्यक्ती अशीही असू शकेल की, जिला तिच्या सद्यस्थितीतील जीवनाच्या पलीकडे उन्नत होण्याची खरोखरच इच्छा असेल; आणि म्हणून तिला तशी आवश्यकता जाणवत असेल. कारण कोणतेही असले तरीही व्यक्तीला त्या स्थिरशांतीची, त्या मन:शांतीची गरज वाटली पाहिजे. आणि मग, योग्य तो परिणाम साध्य करून घेण्यासाठी, व्यक्ती सर्व रूढ आणि त्याचप्रमाणे नवीन पद्धतींचा एकापाठोपाठ एक अवलंब करू शकते.

असे केल्यावर व्यक्तीला लगेचच असे जाणवते की, आणखी एका अविचलतेची आवश्यकता आहे आणि इतकेच नव्हे तर ती त्वरेने अंमलात आणणे गरजेचे आहे. ही अविचलता म्हणजे ‘प्राणिक अविचलता’ (vital quietude)! म्हणजे येथे इच्छावासनांचा निरास झालेला असणे आवश्यक असते. जेव्हा प्राण पुरेसा विकसित झालेला नसतो, तेव्हा जर त्याला शांत बसण्यास सांगण्यात आले तर तो लगेचच एकतर झोपी जातो किंवा मग तो संप पुकारतो. आणि म्हणतो, “ते काही नाही. असे अजिबात चालणार नाही. मी आता इथून पुढे कामच करणार नाही. तुम्ही मला आवश्यक असणारे पोषण, उत्तेजकता, उत्साह, इच्छा, आवेग या गोष्टी पुरविल्या नाहीत तर मी जागचा हलणार नाही आणि आता इथून पुढे मी काहीच करणार नाही.” आणि त्यामुळे समस्या अधिकच नाजूक आणि कदाचित अधिक अवघड होऊन बसते. कारण, क्षुब्धतेमधून जडत्वामध्ये जाऊन पडणे म्हणजे नक्कीच प्रगतीपासून खूप खूप दूर जाणेच असते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 08 : 328-329)

जीवन जगण्याचे शास्त्र – १८

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

जे मन अस्वस्थतेपासून, त्रासापासून मुक्त आहे; जे स्थिर, प्रकाशमान, आनंदी आणि उत्साही आहे; परिणामत: जे तुमच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या शक्तीप्रत खुले आहे, असे (अविचल) मन मला येथे अभिप्रेत आहे.

त्रस्त करणारे विचार, चुकीच्या भावभावना, कल्पनांचा गोंधळ, दुख:कारक गतिप्रवृत्ती यांच्या नेहमी होणाऱ्या आक्रमणापासून सुटका करून घेणे ही गोष्ट महत्त्वाची असते. या गोष्टींमुळे तुमची प्रकृती प्रक्षुब्ध होते, त्यावर एक प्रकारचे सावट येते आणि त्यामुळे ईश्वरी शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करणे अधिक कठीण जाते. पण तेच मन जर का अविचल असेल, शांतिपूर्ण असेल तर, ईश्वरी शक्ती अधिक सहजतेने, सुकरतेने कार्य करू शकते.

तुमच्यामधील ज्या गोष्टींमध्ये परिवर्तन घडविणे आवश्यकच आहे, त्या गोष्टींकडे अस्वस्थ न होता किंवा निराश न होता पाहणे तुम्हाला जमले पाहिजे; म्हणजे मग ते परिवर्तन अधिक सहजतेने होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 160-161)

जीवन जगण्याचे शास्त्र – १७

तुमच्या साधनेच्या दृष्टीने कोणती गोष्ट करणे योग्य आहे हे तुमच्या मनाला कसे काय कळू शकेल किंवा मन ते कसे ठरवू शकेल बरे? अशा प्रकारच्या विचारांमध्येच जर तुमचे मन गुंतून राहिले तर आणखीनच गोंधळ उडेल. साधनेमध्ये मन हे स्थिरशांत असले पाहिजे आणि ते ईश्वराविषयीच्या अभीप्सेवर दृढ असले पाहिजे. मन स्थिरशांत असताना, खरी अनुभूती आणि खरे परिवर्तन या गोष्टी अंतरंगातून आणि वरून घडून येतील.
*
व्यक्ती आत्म्यामध्ये धीर-स्थिर असावी यासाठी, मनाची अविचलता आणि बाह्यवर्ती प्रकृतीपासून आंतरिक पुरुषाची विलगता या गोष्टी अतिशय साहाय्यकारी, किंबहुना अत्यावश्यक असतात. जोपर्यंत व्यक्ती ही विचार-वावटळीच्या अधीन असते किंवा प्राणिक गतिविधींच्या गोंधळाच्या अधीन असते तोपर्यंत ती आत्म्यामध्ये धीर-स्थिर राहू शकत नाही. स्वतःला त्यापासून निर्लिप्त करणे, त्यापासून मागे होणे आणि आपण या वैचारिक किंवा प्राणिक वादळांपासून स्वतंत्र, निराळे आहोत असे व्यक्तीला जाणवणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 28), (CWSA 29 : 160)

जीवन जगण्याचे शास्त्र – १६

तुम्ही जर ईश्वरी शक्तीप्रत आत्मदान करू शकत नसाल आणि तिच्या कार्यावर तुमचा विश्वास नसेल तर, तुम्हाला पूर्णयोग करता येणे शक्यच होणार नाही. तुम्ही जर केवळ मनामध्ये आणि मनाच्या शंकाकुशंका व कल्पना यांच्यामध्येच जीवन जगत असाल तर, तुमच्याबाबतीत पूर्णयोगाची शक्यताच निर्माण होत नाही. त्यासाठी मन शांत करण्याची क्षमता तसेच श्रीमाताजींची शक्ती म्हणजे महत्तर ईश्वरी शक्ती तुमच्यामध्ये कार्य करत आहे यावर विश्वास ठेवण्याची आणि त्याचा अनुभव घेण्याची क्षमता तुमच्याकडे असणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे तुमच्या प्रकृतीमध्ये त्या कार्याच्या आड येणारे जे जे काही असते त्यास नकार देत, त्या कार्याला साहाय्यभूत होण्याची क्षमता तुमच्याकडे असणे आवश्यक असते. या गोष्टी म्हणजे तुमच्यामध्ये पूर्णयोग करण्याची क्षमता आहे याची कसोटी असते.
*
तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा विचार करणे थांबविणे आणि शांती व शक्ती यांना स्वतःहून आविष्कृत होण्यास आणि तुमच्यामध्ये कार्य करू देण्यास वाव देणे याचा अर्थ ‘मन स्थिर-शांत करणे’ असा होतो. असे असेल तर ‘अंतरंगामध्ये राहणे’ (living inside) ही गोष्ट आपोआप घडून येईल. मग, त्याच्या बरोबरीने येणारी आंतरिक शांती आणि चेतना म्हणजेच तुम्ही स्वतः आहात असे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल आणि अन्य सर्व गोष्टी बाह्यवर्ती, वरवरच्या, उथळ असल्याचे देखील जाणवू लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 27-28)

जीवन जगण्याचे शास्त्र – १५

सदोदित शांत, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण असणे; अस्वस्थ नसणे, तक्रार न करणे, निराश न होणे; श्रीमाताजींच्या शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करू देणे; तुम्हाला मार्गदर्शन करू देणे; तुम्हाला ज्ञान, शांती आणि आनंद प्रदान करू देणे म्हणजे श्रीमाताजींप्रति उन्मुख, खुले असणे. तुम्ही जर स्वतःला उन्मुख, खुले (open) राखू शकत नसाल तर, त्यासाठी सातत्याने पण शांतपणे अभीप्सा बाळगा.
*
चेतना ईश्वराप्रति खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 151), (CWSA 29 : 208)

जीवन जगण्याचे शास्त्र – १३

माधुर्य आणि आनंदी भावना वाढीस लागू दिली पाहिजे; कारण या गोष्टी म्हणजे तुम्ही आत्म्याप्रत, चैत्य पुरुषाप्रत जागृत झाला आहात आणि तो तुमच्या संपर्कात आहे, याची सर्वात ठळक खूण असते. विचार किंवा उच्चार किंवा आचारामधील चुकांमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका; त्या बाह्य गोष्टी असल्याप्रमाणे त्यांना तुमच्यापासून दूर लोटा. ईश्वरी शक्ती आणि ईश्वरी प्रकाश यांचे कार्य त्यांच्यावर होईल आणि त्या चुका दूर करण्यात येतील. केंद्रवर्ती सद्वस्तु म्हणजे, तुमचा आत्मा आणि त्याच्यासोबत येणाऱ्या सर्व उच्चतर वास्तविकता यांच्यावर लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 344)

*

आनंदी राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे मग तुम्ही त्वरेने ईश्वरी प्रकाशाच्या जवळ जाऊन पोहोचाल.

*

ईश्वराप्रति एक प्रगाढ, उत्कट आणि सातत्यपूर्ण संपूर्ण कृतज्ञता जाणवणे हा आनंदी आणि शांत राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 193), (CWM 16 : 314)

जीवन जगण्याचे शास्त्र – १२

पूर्णयोगाची साधना करताना नेहमी गंभीर चेहऱ्याने वावरण्याची किंवा शांत शांत राहण्याची आवश्यकता नसते, पण योगसाधना मात्र गांभीर्याने घेणे आवश्यक असते. शांती आणि अंतर्मुख एकाग्रता या गोष्टींना या योगामध्ये फार मोठे स्थान आहे. अंतरंगात वळणे आणि तेथे ईश्वराला भेटणे हे जर व्यक्तीचे ध्येय असेल तर तिने स्वतःला सदासर्वकाळ बहिर्मुख ठेवून चालत नाही. पण म्हणून व्यक्तीने सदासर्वकाळ किंवा बहुतांश काळ गंभीर आणि उदास असले पाहिजे, असाही त्याचा अर्थ होत नाही.

…‘क्ष’मध्ये (एका साधकाचा येथे निर्देश आहे.) दोन व्यक्तिमत्त्वं दडलेली आहेत. त्यातील एकाला जीवनामध्ये (बहिर्मुखी) प्राणिक विस्तार हवाहवासा वाटतो तर त्यातील दुसऱ्याला आंतरिक जीवन हवेसे वाटते. त्यातील पहिले व्यक्तिमत्त्व अस्वस्थ होते कारण आंतरिक जीवन हे काही बहिर्मुख विस्ताराचे जीवन नसते. तर (आंतरिक ओढ असलेले) दुसरे व्यक्तिमत्त्व दुःखीकष्टी होते कारण त्याचे ध्येय प्रत्यक्षात उतरत नाही.

पूर्णयोगामध्ये दोहोंपैकी (आंतरिक आणि बाह्य) कोणतेच व्यक्तिमत्त्व सोडून देण्याची आवश्यकता नसते. परंतु बाह्य प्राणिक अस्तित्वाने, आधी आंतरिक अस्तित्व प्रस्थापित होण्यासाठी वाव दिला पाहिजे, त्याला प्राधान्य दिले पाहिजे आणि त्याने (बाह्य प्राणिक अस्तित्वाने) आत्म्याचे साधन बनण्यासाठी व आंतरिक जीवनाचे कायदे पाळण्यासाठी संमती दिली पाहिजे.

ही गोष्ट मान्य करण्यास ‘क्ष’चे मन अजूनही नकार देत आहे. त्याला असे वाटते की, व्यक्तीने एकतर पूर्ण उदास, थंड आणि गंभीर असले पाहिजे; नाही तर, आंतरिक जीवनामध्ये भावनिक उकळ्या फुटल्या पाहिजेत आणि (उत्साहाचे) उधाण आणले पाहिजे. आंतरिक अस्तित्वाद्वारे प्राणिक अस्तित्वाचे शांत, आनंदी आणि प्रसन्नचित्त नियमन करणे ही गोष्ट काही अजून त्याच्या पचनी पडत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 175)

जीवन जगण्याचे शास्त्र – ११

(आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तीला आनंदाचा अनुभव कसा येतो, हे आपण अगोदरच्या भागात पाहिले. श्रीमाताजी पुढे म्हणतात…)

मात्र या आनंदाचा अनुभव मनुष्यमात्रांमध्ये येणे हे काहीसे अधिक कठीण असते. कारण या आनंदाचा बोध घेण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या मानसिक आणि प्राणिक रचना आडव्या येतात आणि त्या हे क्षेत्र बिघडवून टाकतात. तेथे त्यांच्यामध्ये असलेला तीव्र अहंकार वस्तुंमध्ये मिसळतो आणि त्यामुळे मनुष्याच्या माध्यमातून या आनंदाशी संपर्क होणे काहीसे अधिक कठीण असते.

वनस्पती आणि प्राण्यांमध्येसुद्धा तुम्हाला या आनंदाची जाणीव होऊ शकते. पण वनस्पतींपेक्षा प्राण्यांमध्ये हा अनुभव घेणे मुळातच काहीसे अधिक कठीण असते. पानाफुलांमध्ये, झाडांमध्ये ही गोष्ट अगदी मनोरम असते. पानेफुले त्यांचा आनंद बोलून दाखवितात, व्यक्त करतात. आणि मी म्हटले त्याप्रमाणे, सर्व परिचित वस्तुंमध्ये, तुम्ही ज्या वस्तू वापरता त्या तुमच्या अवतीभोवतीच्या वस्तुंमध्ये, चेतनेची अशी एक स्थिती असते, की त्यामध्ये प्रत्येक वस्तू जशी, जिथे असते तशी ती त्या स्थितीमध्ये आनंदात असते. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवते की, तुम्ही खऱ्या आनंदाला स्पर्श केला आहे.

आणि ही गोष्ट सापेक्ष नसते. म्हणजे ती गोष्ट इतर कशावरही अवलंबून नसते. हा आनंद बाह्य परिस्थितीवर, कमीअधिक अनुकूल स्थितीवर किंवा अन्य कशावरही अवलंबून नसतो. तर येथे तुम्ही या विश्व-अस्तित्वाच्या मूलकारणाशीच सायुज्य पावलेले असता. आणि असा आनंद जेव्हा तुमच्या अनुभवास येतो तेव्हा तुमच्या शरीरातील पेशी न्‌ पेशी त्या आनंदाने भरून जाते.

ही गोष्ट विचार करून समजावून घेण्याची नाही. येथे तुम्ही तर्क करत नाही, विश्लेषण करत नाही. ही अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये तुम्ही ती अवस्था जगत असता. आणि जेव्हा शरीराला हा अनुभव येत असतो तेव्हा तो अनुभव इतका टवटवीत असतो, तो इतका ताजा, इतका उत्स्फूर्त असतो… तो तुमच्याकडे कधीच पाठ फिरवत नाही. तेथे आत्म-निरीक्षणाची, आत्म-विश्लेषणाची किंवा वस्तुंचे विश्लेषण करत असल्याची कोणतीही जाणीवच शिल्लक राहात नाही.

हे सारे एखाद्या आनंदलहरींच्या गाण्यासारखे असते, परंतु त्यामध्ये कोणताही उथळपणा नसतो, कोणताही आवेग नसतो; सारे काही शांत, अगदी शांत असते. ते अतिशय सूक्ष्मही असते आणि तेवढेच उत्कटदेखील असते. जेव्हा हा आनंदाचा अनुभव येतो तेव्हा जणू अखिल विश्व हे अद्भुत रितीने सुसंवादी असल्यासारखे वाटू लागते. इतकेच काय पण सामान्य मानवी चेतनेला जे कुरूप, असुखद वाटत असते, तेसुद्धा आता अद्भुत वाटू लागते. …हा खरा आनंद, सत्य आनंद, खरा परमानंद असतो. परंतु तो अनुभवण्यासाठी आधी काही प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. आणि त्यासाठी मी सांगितले तसे प्रयत्न व्यक्तीने केले पाहिजेत.

परंतु आनंद मिळवणे हा हेतू ठेवून जर ते प्रयत्न केले तर, त्याचे फळ मिळण्यास वेळ लागेल; कारण त्यामध्ये अहंभावात्मक घटकाची भेसळ झालेली असेल. एखादा हेतू मनात ठेवून जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर मग ते अर्पण असणार नाही, त्यामध्ये एक अपेक्षा असेल, मागणी असेल आणि मग… त्याचे फळ मिळेल पण त्याला काहीसा अधिक काळ लागेल. परंतु जेव्हा तुम्ही कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, मागणी करत नाही, काही मिळावे अशी अपेक्षा बाळगत नाही, म्हणजे जेव्हा तिथे केवळ आत्म-दान व अभीप्सा असते, जेव्हा तिथे देवाणघेवाण-विरहित एक उत्स्फूर्त आवश्यकता असते, दिव्यता प्राप्त करून घ्यावी अशी निकड जेव्हा तुम्हाला जाणवते, तेव्हा तो आनंद तुम्हाला प्राप्त होतो.

– श्रीमाताजी (CWM 09 : 22)

जीवन जगण्याचे शास्त्र – १०

(मागील भागापासून पुढे…)

वासनांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ लागल्यावर, मग एक वेळ अशी येते की, व्यक्ती परिपक्व होऊ लागलेली असते. तेव्हा व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, प्रत्येक स्पंदनामध्ये, अवतीभोवतीच्या प्रत्येक वस्तुमध्ये एक प्रकारचा आनंद, अस्तित्वाचा आनंद अनुभवायला मिळतो. केवळ माणसांमध्ये आणि सचेत जिवांमध्येच नव्हे तर, वस्तुंमध्ये, गोष्टींमध्येसुद्धा तो अनुभवायला येतो. केवळ झाडाफुलांपानांमध्ये आणि सजीवांमध्ये नव्हे तर, व्यक्ती वापरत असलेल्या कोणत्याही वस्तुमध्ये, तिच्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तुंमध्येसुद्धा व्यक्तीला त्या आनंदाचा अनुभव येतो. आणि तिला असे जाणवते की, प्रत्येक गोष्टच या आनंदाने स्पंदित होत आहे. व्यक्ती एखाद्या गोष्टीला स्पर्श करते आणि तिला हा आनंद अनुभवास येतो.

परंतु अर्थातच त्यासाठी, मी सुरुवातीला सांगितले तसा अभ्यास करावा लागतो. अन्यथा, जोपर्यंत व्यक्तीमध्ये इच्छावासना असतात, आवडीनिवडी असतात, आसक्ती आणि आकर्षण किंवा प्रतिकर्षण आणि त्यासारख्या इतर गोष्टी असतात तोपर्यंत तिला या आनंदाचा अनुभव येऊ शकत नाही. व्यक्तीला एखाद्या गोष्टीमध्ये जोपर्यंत शारीरिक किंवा प्राणिक सुख अनुभवास येते तोपर्यंत तिला हा आनंद जाणवणार नाही.

हा आनंद सर्वत्र असतो. हा आनंद अतिशय सूक्ष्म असतो. तुम्ही वस्तुंमधून वावरत असता आणि जणू काही त्या वस्तू तुमच्याजवळ गाणे गुणगुणून तो आनंद व्यक्त करत असतात. आणि मग एक वेळ अशी येते की, जेव्हा तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीच्या जीवनामधील हा आनंद अगदी चिरपरिचित होऊन जातो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 22)