Tag Archive for: साधना

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०५

चेतना (consciousness) ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिक आंतरिक चेतनेमध्ये निवास करत, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे; ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरासाठी सज्ज होऊ शकेल आणि दिव्य ज्ञान, दिव्य संकल्प आणि दिव्य प्रेम यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे या योगाचे ध्येय आहे. दुसरे ध्येय म्हणजे योगिक चेतना विकसित करणे – म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, विश्व-पुरुषाविषयी आणि वैश्विक शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि अधिमानसापर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ईश्वराशी एकत्व पावून राहणे. तिसरे ध्येय असे की, अधिमानसाच्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेच्या (supramental consciousness) माध्यमातून, विश्वातीत ईश्वराच्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 20)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०४

येथे योगाचा जो मार्ग आचरला जातो त्या मार्गाचे (पूर्णयोगाचे) इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानी विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हे केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे, इहलोकामध्ये ईश्वराचे आविष्करण घडविणे आणि या जडभौतिकामध्ये दिव्य जीवन निर्माण करणे, हे या योगमार्गाचे ध्येय आहे. हे ध्येय अत्यंत कठीण आहे आणि हा योगमार्गही अत्यंत कठीण आहे; बऱ्याच जणांना किंबहुना बहुतेकांना तर तो अशक्यच भासतो. सर्वसामान्य अज्ञ विश्व-चेतनेच्या साऱ्या प्रस्थापित शक्ती या योगमार्गाच्या विरोधात असतात आणि त्या शक्ती या मार्गाला नाकारतात आणि त्या शक्ती या योगमार्गाला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. साधकाला असे आढळून येईल की, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शरीरामध्येच या साक्षात्कारासाठी प्रतिकूल असे सर्वाधिक हट्टी अडथळे ठासून भरले आहेत. जर तुम्ही हे ध्येय अगदी पूर्ण अंतःकरणाने स्वीकारलेत, साऱ्या अडीअडचणींना सामोरे गेलात, भूतकाळ आणि त्याचे सारे बंध तुम्ही मागे टाकून दिलेत, आणि सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार झालात, या दिव्य शक्यतेसाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार झालात, तरच केवळ तुम्हाला त्या पाठीमागील ‘सत्य’ हे अनुभवाच्या द्वारे सापडण्याची काही आशा असते.

या योगाची साधना, कोणत्याही ठरावीक साचेबद्ध अशा मानसिक शिक्षणाने किंवा ध्यानधारणेच्या नेमून दिलेल्या प्रकारांच्या द्वारे, कोणत्याही मंत्रांनी किंवा तत्सम गोष्टींनी, प्रगत होत नाही; तर अभीप्सेद्वारे, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख आत्म-एकाग्रतेद्वारे, ईश्वरी शक्तीच्या दिव्य प्रभावाप्रत स्वतःला खुले केल्याने, आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या दिव्य शक्तीप्रत आणि तिच्या कार्याप्रत स्वतःला खुले केल्याने, हृदयामध्ये असणाऱ्या दिव्य अस्तित्वाला खुले होत, आणि या साऱ्यांना ज्या ज्या गोष्टी परक्या असतील त्या साऱ्या गोष्टींना नकार दिल्याने ही साधना प्रगत होते. केवळ श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांच्या द्वारेच हे आत्मउन्मीलन (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 19-20)

पूर्णयोगाची योगसूत्रे – ०३

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत व्हायला हवे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेल्या अधिकांश भागाविषयी आपण अजागरूक असतो. आणि या अजागरूकतेमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि ती अजागरूकताच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडवून आणण्यास प्रतिबंध करते. या अजागरूकतेच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात. तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत याचे तुम्ही ज्ञान करून घेतले पाहिजे. जे हेतू व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. सारांश असा की, तुम्ही तुमच्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रितीने एकदा का तुम्ही जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल. योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की तुमच्या त्या ज्ञानानुसारच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे. म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, त्याच्या विरोधी असणाऱ्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल; संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, ‘निद्रारहित’ राहावे लागेल. दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 02)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०२

प्रश्न : आम्हाला योगासंबंधी काही सांगाल काय?

श्रीमाताजी : योग तुम्हाला कशासाठी हवा आहे? सामर्थ्य लाभावे म्हणून ? मन:शांती, शांतचित्तता प्राप्त व्हावी म्हणून ? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून?

परंतु, योगमार्ग स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात का हे लक्षात येण्यासाठी यांपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत : तुम्हाला ईश्वराकरता योगसाधना करायची आहे का? ईश्वर हेच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का ? ईश्वरावाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची स्थिती आहे का? ईश्वर हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ईश्वराविना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही, असे तुम्हाला वाटते का? असे असेल तरच तुम्हाला योगमार्ग स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

ईश्वराविषयीची तळमळ, अभीप्सा (Aspiration) हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे.

पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करावयाचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत राखायची. आणि त्यासाठी आवश्यकता असते एकाग्रतेची, ईश्वरावरील एकाग्रतेची ! ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांसाठी समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ईश्वराच्या ठिकाणी एकाग्रता करणे आवश्यक असते.

हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या जाणिवेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, अगदी तळाशी जाऊन बसा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यात एक अग्नी तेवत आहे. तोच तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व, तोच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची अन्य केंद्रदेखील आहेत, उदाहरणार्थ, एक असते मस्तकाच्या वर, दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये)! प्रत्येक केंद्राचा स्वतंत्र असा प्रभाव असतो आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (पुरुष) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामधूनच उत्पन्न होतात – रूपांतरासाठी आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या गोष्टीसुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01)

प्रत्येक क्षणी आपल्याला जे सर्वोत्तम शक्य असेल ते करणे आणि त्याचे फळ ईश्वराच्या निर्णयावर सोडून देणे, हा शांती, आनंद, सामर्थ्य, प्रगती आणि संपूर्ण परिपूर्णत्व मिळविण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.

– श्रीमाताजी
(CWM14 : 111)

स्वत:चा विचार न करता, स्वत:साठी न जगता, स्वतःशी काहीही निगडित न ठेवता; जे परमोच्च सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे ह्यामध्ये इतका अगाध आनंद आहे की त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 269)

…भगवंताचा गुलाम असणे हे अधिक उत्तम !

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 495)

समत्व

समत्व म्हणजे केवळ शांती नव्हे आणि तटस्थताही नव्हे किंवा अनुभवांपासून मागे हटणेही नव्हे, तर आपल्या मनाच्या व प्राणाच्या ज्या वर्तमान प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रियांच्या पलीकडे, अतीत जाणे म्हणजे समत्व. समत्व म्हणजे जीवनाला आध्यात्मिक रीतीने सामोरे जाणे, प्रतिसाद देणे. किंबहुना आध्यात्मिक रीतीने जीवनाला कवळणे आणि आपल्या जीवनाला स्वतःच्या व आपल्या आत्म्याच्या कृतीचे परिपूर्ण रूप बनण्यास प्रवृत्त करणे म्हणजे समत्व. आत्म्याची आपल्या अस्तित्वावर सत्ता प्रस्थापित झाल्याचे हे पहिले मर्म आहे. हे समत्व आपल्याला पूर्णतेने साध्य झाले की मग, दिव्य आध्यात्मिक प्रकृतीच्या मूळ भूमिमध्येच आपला प्रवेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 721)

समर्पण – ५९

हातचे काहीही राखून न ठेवता, स्वत:च्या सर्व घटकांनिशी जे स्वत:ला ‘ईश्वरा’स समर्पित करतात अशा साधकांना, ‘ईश्वर’ स्वत:लाच देऊन टाकतो. अशा साधकांना स्थिरता, प्रकाश, शक्तीसामर्थ्य, परमानंद, स्वातंत्र्य, विशालता, ज्ञानाची उत्तुंगता आणि आनंदसागर या गोष्टी प्राप्त होतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67)

समर्पण – ५८

या योगामध्ये दोन प्रक्रिया असतात, आणि त्यामध्ये एक संक्रमण-अवस्था असते; या योगाचे दोन कालावधी असतात – एक समर्पणाची प्रक्रिया आणि त्याचा परिणामस्वरूप असणारा, कळसाध्याय!

योगसाधनेचा पहिला टप्पा : पूर्वतयारी

पहिल्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती तिच्या घटकांमध्ये दिव्यत्वाचे ग्रहण करता यावे म्हणून स्वतःला तयार करत असते. या पहिल्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीला कनिष्ठ प्रकृतीच्या साधनांच्या माध्यमाद्वारेच कार्य करावे लागते, परंतु त्या प्रयत्नांना वरून अधिकाधिक प्रमाणात साहाय्य मिळत असते.

परंतु ह्या प्रक्रियेच्या पुढच्या संक्रमण-अवस्थेच्या टप्प्यावर आपले वैयक्तिक आणि त्यामुळे अर्थातच अज्ञानग्रस्त प्रयत्न हे पुढेपुढे अपुरे पडू लागतात आणि मग तेथे उच्चतर प्रकृती कार्यरत होते; शाश्वत शक्ती ही मर्त्यतेच्या या मर्यादित रूपामध्ये अवतरित होते आणि क्रमाक्रमाने त्याचा ताबा घेते आणि त्याचे रूपांतरण करते. आधी जी पहिली अटळ अशी क्रिया होती, त्या कनिष्ठ क्रियेची जागा आता दुसऱ्या कालावधीमध्ये एका अधिक श्रेष्ठ अशा क्रियेद्वारे घेतली जाते; परंतु जेव्हा आत्म-समर्पण हे पूर्णत्व पावते तेव्हाच हे घडून येते.

आपल्यामधील अहंभावात्मक पुरुष स्वतःच्या शक्तीने किंवा इच्छेने किंवा ज्ञानाने किंवा स्वतःच्या कोणत्याही गुणाने स्वतःचे रूपांतरण ‘दिव्यत्वा’मध्ये करू शकत नाही; तो फार फार तर एवढेच करू शकतो की, तो स्वतःला रूपांतरणासाठी योग्य बनवू शकतो आणि तो जे बनण्यासाठी प्रयत्नशील आहे त्याला अधिकाधिक समर्पण करू शकतो. जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार कार्यरत आहे तोपर्यंत आपली वैयक्तिक कृती ही स्वरूपतः नेहमीच अस्तित्वाच्या कनिष्ठ श्रेणींचा एक भाग असणार आणि ती तशी असणेच आवश्यक असते; ती धूसर किंवा अर्ध-प्रकाशित असते, ती तिच्या क्षेत्रामध्ये मर्यादित आणि तिच्या सामर्थ्यामध्ये अगदीच अंशतः प्रभावी असते.

आपल्या प्रकृतीमध्ये नुसते झगमगते परिवर्तन न घडविता, आध्यात्मिक रूपांतरण घडवायचे असेल तर, आपल्या व्यक्तिगत अद्भुत कार्यामध्ये प्रभावशाली व्हावे म्हणून आपण ‘दिव्य शक्ती’ला आवाहन केले पाहिजे; कारण आवश्यक असणारे अमर्याद, सर्वज्ञ, निर्णायक सामर्थ्य फक्त तिच्याकडेच असते. मात्र मानवी वैयक्तिक कृतीची जागा संपूर्णतया दिव्यत्वाने घेणे ही गोष्ट एकाएकी घडणे पूर्णपणे शक्य नसते. खालून होणारी सर्व लुडबुड की जी उच्चतर कृतीच्या सत्याला खोटे ठरविते, त्या लुडबुडीचा प्रथम प्रतिबंध केला पाहिजे किंवा ती अगदी नि:सत्त्व केली पाहिजे. आणि ही गोष्ट स्वेच्छेने केली पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीचे मिथ्यत्व आणि सारे आवेग यांना सातत्यपूर्ण, पुनःपुन्हा आणि नेहमीच नकार देणे तसेच आपल्या घटकांमध्ये वृद्धिंगत होणाऱ्या सत्याला आग्रहपूर्वक साहाय्य करणे हे आपल्याकडून अपेक्षित आहे. कारण क्रमाक्रमाने स्थिरावत जाणाऱ्या आपल्या प्रकृतीला आणि येणारा बोधक ‘प्रकाश’, ‘शुद्धता’ आणि ‘शक्ती’ टिकून राहण्यासाठी, त्यांच्या विकसनासाठी आणि त्यांच्या अंतिम परिपूर्णत्वासाठी, आपण त्यांचा मुक्तपणे स्वीकार करण्याची आवश्यकता असते; तसेच त्यांच्या विरोधात जे जे काही असेल, किंवा त्यांच्यापेक्षा जे जे काही गौण असेल किंवा त्यांच्याशी जे मिळतेजुळते नसेल त्याला आपण हट्टाग्रहाने नकार देणेच आवश्यक असते.

स्वतःची तयारी करण्याच्या या पहिल्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे वैयक्तिक प्रयत्नांच्या या कालावधीमध्ये, आपण ज्याच्या प्राप्तीसाठी धडपडत असतो त्या ‘दिव्यत्वा’वर आपल्या समग्र अस्तित्वाचे एककेंद्रीकरण करणे आणि त्याचाच स्वाभाविक परिणाम म्हणून, या ‘दिव्यत्वाचे खरे सत्य’ नसलेले असे जे जे काही आहे, त्याला घालवून देणे (katharsis), त्याला सातत्यपूर्ण नाकारणे, ही पद्धत आपण उपयोगात आणणे आवश्यक असते. आपण जे काही आहोत, आपण जो विचार करतो, आपल्याला जे संवेदित होते किंवा आपण जे काही करतो त्या साऱ्याचे संपूर्ण आत्मनिवेदन म्हणजे या प्रयत्नसातत्याचा परिणाम असेल. आपल्या या आत्मनिवेदनाची परिणती अंतिमतः त्या ‘परमोच्चा’प्रत केलेल्या संपूर्ण आत्मदानामध्ये झाली पाहिजे; कारण समग्र प्रकृतीचे सर्वसमावेशक निःशेष समर्पण म्हणजे त्याच्या पूर्णत्वाची खूण असेल; त्याचा मुकुटमणी असेल.

योगसाधनेचा दुसरा टप्पा : संक्रमण अवस्था

योगसाधनेच्या दुसऱ्या टप्प्यात, मानव आणि ईश्वरी कार्यकारित्व यांच्या संक्रमणामध्ये, एक चढतीवाढती, परिशुद्ध झालेली आणि सावध निष्क्रियता वाढीस लागलेली आढळेल; अन्य कोणत्याही शक्तीला नव्हे तर, केवळ ‘दिव्य शक्ती’ला अधिकाधिक प्रकाशमान असा दिव्य प्रतिसाद मिळताना आढळेल; आणि त्याचा परिणाम म्हणून वरून, एक महान आणि जागरूक चमत्कारसदृश्य कार्यकारितेचा चढतावाढता प्रवाह अनुभवास येईल.

योगसाधनेचा अंतिम टप्पा : दिव्यत्वाचे फूल उमलणे

अंतिम कालावधीमध्ये कोणतेही प्रयत्न शिल्लक राहात नाहीत, कोणतीही ठरावीक पद्धत असत नाही, कोणती ठरावीक साधना असत नाही; प्रयत्न आणि तपस्या या दोहोंची जागा, पार्थिव प्रकृतीच्या परिशुद्ध झालेल्या आणि परिपूर्ण झालेल्या कळीमधून एका नैसर्गिक, शुद्ध, शक्तिशाली आणि आनंददायी दिव्यत्वाचे फूल उमलण्याने घेतली जाईल. योगसाधनेच्या क्रियेचे हे स्वाभाविक टप्पे आहेत.

या प्रक्रिया नेहमीच, अगदी एकापाठोपाठ एक याच क्रमाने घडतात, असे नाही. पहिली प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेला सुरुवात झालेली असते; दुसरी प्रक्रिया पूर्णत्वाला जाईपर्यंत पहिली प्रक्रिया आंशिक रूपात चालू राहते; अंतिम दिव्य कार्यकारकत्व अंतिमतया सुस्थिर होण्यापूर्वी आणि प्रकृतीसाठी ते सामान्य होण्यापूर्वी, एक अभिवचन या स्वरूपात ते वेळोवेळी आविष्कृत होत राहते. व्यक्तीला तिच्या वैयक्तिक परिश्रमामध्ये आणि प्रयत्नामध्येसुद्धा दिशादर्शन करणारे असे, त्या व्यक्तीपेक्षा अधिक उच्चतर आणि अधिक महान असे काहीतरी नेहमीच असते. कनिष्ठ प्रकृतीच्या अप्रत्यक्ष नियंत्रणापासून व्यक्तीच्या सर्व घटकांसहित समग्र प्रकृतीची परिशुद्धता होण्यापूर्वीसुद्धा पुष्कळ आधीपासून व्यक्तीला पडद्यामागून मिळणाऱ्या या महत्तर मार्गदर्शनाची जाणीव होऊ शकते; व्यक्तीला काही कालावधीसाठी त्याची पूर्णपणे जाणीव होऊ शकते, तसेच व्यक्तीच्या अस्तित्वाच्या काही भागांना तर ही जाणीव कायमस्वरूपी होऊ शकते. तसेच, कधीकधी ती व्यक्ती अगदी आरंभापासूनसुद्धा याबाबत सजग असू शकते; जरी इतर घटक नाहीत तरी, व्यक्तीचे मन आणि हृदय हे या पकड घेणाऱ्या आणि मर्मभेदक अशा मार्गदर्शनाला एका विशिष्ट प्रारंभिक पूर्णतेनिशी योगसाधनेच्या अगदी पहिल्या पायरीपासूनच प्रतिसाद देऊ शकतात. परंतु जसजसा हा अंतिम टप्पा नजिक येऊ लागतो तसतसा, महान थेट नियंत्रणाच्या सातत्यपूर्ण, परिपूर्ण आणि एकसमान कृतीमुळे या संक्रमण-अवस्थेमध्ये आणि अंतिम टप्प्यामध्ये अधिकाधिक भेद पडू लागतो. आपल्यापुरतेच व्यक्तिगत नसलेल्या, या महत्तर दिव्यतर मार्गदर्शनाचे हे प्राबल्य म्हणजे व्यक्तीची प्रकृती ही समग्र आध्यात्मिक रूपांतरणासाठी चढत्यावाढत्या प्रमाणात परिपक्व होत चालली आहे याचे निदर्शक असते. आत्म-निवेदन हे फक्त तत्त्वतःच नव्हे तर कृतीमध्ये आणि शक्तीमध्येसुद्धा स्वीकारले गेले आहे, याचे हे अचूक लक्षण असते. निवडलेल्या, विस्मयकारी प्रकाशाच्या, शक्तीच्या आणि आनंदाच्या मानवी पात्रावर परमेश्वराने आपला प्रकाशमान वरदहस्त ठेवल्याची ती खूण असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 86-88)