Tag Archive for: साधना

ईश्वरी कृपा – ०१

संपूर्ण आविष्करणामध्ये, जग ज्या दुःखामध्ये, अंधकारामध्ये आणि ज्या मूर्खतेमध्ये पहुडले आहे त्यातून या जगाला बाहेर काढण्याचे काम ती अनंत ‘कृपा’ सातत्याने करत असते. अनंत काळापासून ही ‘ईश्वरी कृपा’ कार्यरत आहे, तिचे प्रयत्न अविरत चालू आहेत आणि असे असूनदेखील, अधिक महान, अधिक सत्य, अधिक सुंदर अशा गोष्टींच्या आवश्यकतेची जाणीव होण्यासाठी या जगाला हजारो वर्षे लागली !

आपल्या स्वतःच्याच अस्तित्वामध्ये आपल्याला विरोधाचा जो सामना करावा लागतो त्यावरून, ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याला या जगाचा किती प्रचंड विरोध होत असेल याचे अनुमान, प्रत्येकजण लावू शकतो.

आणि तेव्हाच मग ऊर्ध्वस्थित असलेल्या ‘प्रकाशा’प्रत आणि ‘शक्ती’प्रत आणि जे ‘सत्य’ स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या प्रयत्नात आहे त्या ‘सत्या’प्रत, जर सर्व गोष्टी संपूर्णपणे अर्पण केल्या नाहीत, तर सगळ्या बाह्य गोष्टी, सगळ्या मानसिक रचना, सगळे भौतिक प्रयत्न हे व्यर्थ आहेत, फोल आहेत हे व्यक्तिला उमगते; तेव्हा अशी व्यक्ती निणार्यक प्रगती करण्यासाठी सिद्ध होते. आणि मग ज्याच्यामध्येच सर्वकाही परिवर्तन करण्याची शक्ती आहे अशा, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या त्या ‘ईश्वरा’ला आपल्या अस्तित्वाचे परिपूर्ण, समग्र आणि उत्कट असे आत्मदान करणे, हाच व्यक्तिचा एकमेव खरा प्रभावी दृष्टिकोन असतो.

जेव्हा तुमच्या अंतरंगात असणाऱ्या आत्म्याप्रत तुम्ही खुले होता तेव्हा, जे जीवन खरोखरच जगण्याजोगे आहे, अशा उच्चतर जीवनाची तुम्हाला गोडी चाखायला मिळते आणि त्यानंतर तुमच्यामध्ये त्या जीवनाप्रत उन्नत होण्याची, तेथवर जाऊन पोहोचण्याची इच्छा उदयाला येते, आणि मग ‘हे शक्य आहे’ असा विश्वास निर्माण होतो आणि अंतिमतः त्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याचे सामर्थ्य निर्माण होते आणि अगदी ध्येयाच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाण्याचा संकल्प उदयास येतो.

सर्वप्रथम व्यक्तिने जागे झाले पाहिजे, तेव्हाच व्यक्ती विजय प्राप्त करून घेऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 419-420)

तुम्ही जे काही किंवा ज्या कोणाला ‘ईश्वरा’वर सोपविता, त्या गोष्टीबाबत किंवा त्या व्यक्तीबाबत तुम्ही आसक्त राहता कामा नये किंवा चिंताग्रस्तदेखील राहता कामा नये, तर त्याबाबतीत सर्वोत्तम असे जे असेल ते करावे म्हणून आपण सारे काही ‘ईश्वरा’वर सोपवून दिले पाहिजे.

*

तुम्हाला या योगाची (पूर्णयोगाची) साधना करायची असेल तर आध्यात्मिक सत्य ग्रहण करणे आणि तुमच्या विचारांद्वारे, भावनांद्वारे, कृतींद्वारे आणि तुमच्या प्रकृतीद्वारे त्या सत्याचे आविष्करण करणे ही तुमची एकच एक इच्छा व अभीप्सा असली पाहिजे. तुम्ही कोणाही बरोबरच्या कोणत्याही नातेसंबंधांबद्दल आसक्ती बाळगता कामा नये. साधकाचे इतरांबरोबर असलेले नातेसंबंध हे साधकासाठी अंतरंगातून आलेले असले पाहिजेत, साधकाला जेव्हा खरी चेतना गवसलेली असेल आणि तो साधक जेव्हा प्रकाशात राहत असेल तेव्हा हे नाते निर्माण झाले पाहिजे. असे नातेसंबंध हे अतिमानसिक (supramental) सत्यानुसार, दिव्य जीवनासाठी आणि दिव्य कार्यासाठी, दिव्य मातेच्या शक्तीने आणि इच्छेने त्या साधकाच्या अंतरंगामधूनच निर्धारित केलेले असतील. हे नातेसंबंध त्याच्या मनाने आणि त्याच्या प्राणिक इच्छांनी निर्धारित केलेले असता कामा नयेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे.

श्रीअरविंद
(CWSA 31 : 320, CWSA 32 : 142)

व्यक्ती जेव्हा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते तेव्हा सामान्य प्रकृतीशी संबंधित असणारे कौटुंबिक बंध गळून पडतात – व्यक्ती त्या जुन्या गोष्टींबाबत तटस्थ होऊन जाते. ही तटस्थता म्हणजे एक प्रकारची मुक्तता असते. त्यामध्ये कटुता असण्याची अजिबात आवश्यकता नाही. जुन्या भौतिक जिव्हाळ्याचे बंध तसेच कायम राहणे म्हणजे सामान्य प्रकृतीला धरून राहण्यासारखे असते आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीला अडसर निर्माण होतो.

*

कौटुंबिक बंध परस्परांमध्ये अनावश्यक व्यवहार निर्माण करतात. आणि ईश्वराकडे पूर्णतः वळण्याच्या मार्गात ते आड येतात. योगमार्गाचा अवलंब केल्यावर, शारीरिक चेतनेच्या सवयींवर आधारित किंवा शारीरिक नात्यांवर आधारित नातेसंबंध हे कमीत कमी असले पाहिजेत आणि ते साधनेवर अधिकाधिक आधारित असले पाहिजेत. म्हणजे हे नातेसंबंध जुन्याच दृष्टिकोनाचे किंवा सामान्य पद्धतीचे असता कामा नयेत; तर एका साधकाचे इतर साधकांशी असावेत तसे असले पाहिजेत, एकाच मार्गावरून प्रवास करणारे जीव असावेत त्याप्रमाणे किंवा एकाच मातेची मुले असावीत तसे असले पाहिजेत.

*

सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती हीच की, तुम्ही अंतरंगातून श्रीमाताजींकडे वळले पाहिजे आणि फक्त आणि फक्त त्यांच्याकडेच वळले पाहिजे. यास साहाय्य व्हावे म्हणूनच बरेचसे बाह्य संपर्क टाळणे आवश्यक ठरते. परंतु लोकांबरोबर असलेले सर्वच संपर्क टाळणे, हे अभिप्रेतही नाही किंवा त्याची आवश्यकताही नाही. जर कोणती गोष्ट आवश्यकच असेल तर ती हीच की, त्या संपर्कांमध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून न देता, तुमच्या संपर्कातील व्यक्तींना योग्य आंतरिक चेतनेनुसार भेटले पाहिजे. त्या पृष्ठवर्ती गोष्टी आहेत असे समजून त्यांना वागणूक दिली पाहिजे – त्यांच्याशी खूप सलगीने किंवा त्यांच्यामध्येच मिसळून गेल्याप्रमाणे वागता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 291, 291 & CWSA 32 : 459)

आंतरिक एकाकीपण हे केवळ ईश्वराशी एकरूप होण्याच्या आंतरिक अनुभूतीतूनच दूर होऊ शकते. कोणतेही मानवी संबंध ती पोकळी भरून काढू शकत नाहीत. त्याच प्रकारे, आध्यात्मिक जीवनासाठी, इतरांशी असलेला सुसंवाद हा मानसिक आणि प्राणिक संबंधांवर आधारित असता कामा नये तर, दिव्य चेतना आणि ईश्वराशी ऐक्य यांच्यावर आधारित असला पाहिजे. जेव्हा व्यक्तीला ईश्वर गवसतो आणि व्यक्ती ईश्वरामध्ये इतरांना पाहू लागते तेव्हा, खरा सुसंवाद घडून येतो. दरम्यानच्या काळात, ईश्वरी ध्येयाबाबतच्या समान भावनेच्या पायावर आणि आपण सारी एकाच मातेची लेकरे आहोत, या भावनेच्या पायावर सदिच्छा आणि एकोपा साधता येणे शक्य आहे. आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक पायावरच खराखुरा सुसंवाद निर्माण होणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 310-311)

जेव्हा व्यक्ती ‘ईश्वरा’वर खऱ्या अर्थाने आणि समग्रतया प्रेम करत असते तेव्हा व्यक्ती त्या ‘ईश्वरा’ने निर्माण केलेल्या सृष्टीवर आणि प्राणिमात्रांवरही प्रेम करते आणि साहजिकपणेच, या प्राणिमात्रांमधील काही जण त्या व्यक्तीला निकटचे वाटू शकतात आणि त्यांच्यावर ती व्यक्ती विशेष प्रेम करत असते. परंतु तेव्हा व्यक्तीला जे प्रेम वाटते ते सामान्य मानवी प्रकारचे स्वार्थी प्रेम नसते; आपला ताबा असावा, मालकी असावी, अशा प्रकारची इच्छा असणारे ते प्रेम नसते; तर कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता स्वतःला देऊ करणारे असे हे प्रेम असते.

प्रेमाच्या आनंदासाठी प्रेम करणे ही शांतिपूर्ण आणि आनंदी जीवनासाठीची अत्युत्तम परिस्थिती असते; दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, सर्व वस्तुमात्रांमधील ‘ईश्वरा’वर प्रेम करावे.

‘ईश्वरा’ची जी इच्छा आहे अगदी तीच इच्छा बाळगण्यामध्ये जर त्याची परिणती झाली तर, मग तेथे परिपूर्ण शांती असते.

– श्रीमाताजी
(CWM 17 : 371)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०४

…ज्या व्यक्ती स्वतःच्या भावनांमध्ये जीवन जगतात आणि भावनांना स्वतःच्या जीवनाचे नियंत्रण करू देतात अशा भावनाशील व्यक्तींबाबत मात्र ही (तर्कबुद्धीची) पद्धत तितकीशी उपयुक्त ठरू शकत नाही. निःसंशयपणे अशा व्यक्तींनी दुसऱ्या मार्गाचा म्हणजे आंतरिक शोधाच्या पद्धतीचा आश्रय घ्यायला हवा. सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो चैत्य चेतनेचा (Psychic Consciousness) प्रकाश असतो. त्या प्रकाशाचा शोध घ्या, त्यावर लक्ष एकाग्र करा, तो तुमच्या अंतरंगातच असतो. तुमच्या दृढ संकल्पाद्वारे, तो तुम्हाला निश्चितपणे गवसेल. ज्या क्षणी तुम्ही त्यामध्ये प्रवेश कराल, त्याच क्षणी तुमच्यामध्ये अमर्त्यतेची जाणीव जागृत होईल. तुम्ही कायमच जिवंत होतात, तुम्ही कायम जिवंत असणार आहात, हे तुम्हाला जाणवेल. तेव्हा, तुम्ही शरीरापासून पूर्णपणे स्वतंत्र होता. तुमचे जागृत अस्तित्व आता शरीरावर अवलंबून राहत नाही. तुम्ही आत्ता ज्यामधून आविष्कृत झाला आहात ते शरीर म्हणजे, अनेकानेक क्षणभंगुर आकारांपैकी, केवळ एक आकार आहे; हे तुम्हाला जाणवू लागते. आता मृत्यू हा अंत असत नाही तर, ते केवळ एक संक्रमण असते. मग सगळी भीती क्षणार्धात नाहीशी होते आणि तुम्ही जीवनामध्ये एखाद्या मुक्त मनुष्याप्रमाणे शांत खात्रीपूर्वक मार्गक्रमण करू लागता. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 83-84)

या जन्मात तुमच्या प्राणतत्त्वाचे परिवर्तन झाले आहे की नाही यावर, तुमची मरणोत्तर स्थिती काय असेल हे पुष्कळसे अवलंबून असते. तुम्ही स्वतः म्हणजे जर अस्ताव्यस्त प्रेरणांचे एक मिश्रण असाल, तर मृत्युसमयी, ज्यावेळी तुमची चेतना मागे सरून पार्श्वभूमीमध्ये जाते, त्यावेळी तुमच्यातील भिन्नभिन्न व्यक्तिमत्त्वे अलग अलग होतात आणि त्यांना साजेसे वातावरण मिळावे म्हणून ती व्यक्तिमत्त्वे घाईघाईने इकडेतिकडे तसे वातावरण शोधण्याची धडपड करतात. एखादा भाग त्याला अनुकूल मनोवृत्तीच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीमध्ये शिरू शकतो, दुसरा एखादा भाग एखाद्या प्राण्यामध्येही शिरू शकतो. पण जो भाग ईश्वरी उपस्थितीविषयी जागृत असतो तो भाग केंद्रीय आंतरात्मिक अस्तित्वाशी संलग्न राहू शकतो. पण जर तुम्ही पूर्णतः सुसंघटित झालेले असाल; तुमचे एकजिनसी, अखंड व्यक्तित्वामध्ये परिवर्तन झालेले असेल, आणि क्रमविकासाच्या ध्येयप्राप्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला असाल तर तुमच्या मृत्युनंतरही तुम्ही जागृत राहाल आणि तुमच्या अस्तित्वाचे सातत्य टिकवू शकाल…

…(परंतु) बहुतांशी सर्वसामान्य माणसं ही त्यांच्या देहाशी इतकी एकजीव झालेली असतात की शारीरिक विघटनानंतर त्यांच्यातील स्वतःचे असे काहीच टिकून राहत नाही. पण अगदी काहीच टिकून राहत नाही असेही नाही – प्राणिक आणि मानसिक द्रव्य नेहमीच शिल्लक राहते पण ते शारीरिक व्यक्तिमत्त्वाशी एकरूप नसते. आणि जे शिल्लक राहते त्यावर बाह्य व्यक्तिमत्त्वाचा कोणताही स्पष्ट ठसा नसतो कारण बाह्य व्यक्तिमत्त्व हे इच्छा, आवेग यांच्या गोंधळात संतुष्ट असते; शारीरिक कार्यांच्या संलग्नतेमुळे आणि सहकार्यामुळे तयार झालेली ती एक तात्पुरती संघटनात्मक एकता असते आणि जेव्हा ती कार्ये संपून जातात तशी त्यांची ही वरकरणी-एकतादेखील साहजिकपणेच संपुष्टात येते. फक्त जर का विविध भागांना एक प्रकारची मानसिक शिस्त लावण्यात आली असेल आणि सर्वांना समान मानसिक आदर्शाचे अनुसरण करण्यास शिकविण्यात आले असेल तर तेथे एक प्रकारचे खरोखरीची व्यक्तिविशिष्टता (genuine individuality) असू शकते की ज्यामध्ये या पार्थिव जीवनाची स्मृती साठून राहते आणि मग ती स्मृती (मृत्युनंतरही) जाणीवपूर्वक टिकून राहू शकते. कलाकार, तत्त्वज्ञानी आणि इतर विकसित व्यक्ती की, ज्या सुरचित, व्यक्तित्वसंपन्न झालेल्या असतात आणि ज्यांच्या प्राणिक अस्तित्वाचे काही प्रमाणात रूपांतर झालेले असते अशी अस्तित्वं (मरणोत्तरही) टिकून राहू शकतात, कारण त्यांनी आपल्या बाह्य चेतनेमध्ये चैत्य अस्तित्वाचे थोडेफार प्रतिबिंब उमटविलेले असते; हे चैत्य अस्तित्व मूलतः अमर्त्य असते आणि केंद्रवर्ती अशा दिव्य संकल्पाभोवती अस्तित्वाची क्रमाक्रमाने घडण करत नेणे हे त्याचे उद्दिष्ट असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 144-146)

आपले जीवन सत्कारणी लागावे अशी ज्यांची इच्छा असते, तेच असे म्हणतात की, ”जोवर आवश्यकता आहे तोवर मी इथे राहीन, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत! आणि माझे ध्येय साध्य करत असताना एकही क्षण मी व्यर्थ दवडणार नाही”, वेळ आली तर अशीच माणसं सर्वोत्तम कामगिरी करून दाखवितात.

असे का? – कारण अगदी सोपे आहे, कारण ते त्यांच्या ध्येयासाठी जगतात, त्यांच्या ध्येयाच्या सत्यासाठी जगत असतात, कारण त्यांचे ध्येय हीच त्यांच्यासाठी खरी गोष्ट असते, ते ध्येय हेच त्यांच्या जगण्याचे खरे प्रयोजन असते, आणि सर्व गोष्टींमध्ये त्यांना हे ध्येयच दिसत असते, अस्तित्वाचे प्रयोजन दिसत असते आणि असे लोक भौतिक जीवनाच्या हीनदीनतेमध्ये कधीच खाली उतरून येत नाहीत.

तात्पर्य असे की, व्यक्तीने मृत्युची इच्छा कधीही धरता कामा नये.
व्यक्तीने मृत्युची आस कधीही बाळगू नये.
व्यक्तीला मृत्युची भीती कधीही वाटता कामा नये.
आणि सर्व परिस्थितींमध्ये व्यक्तीने आत्मोल्लंघनाचा संकल्प करायला हवा.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 354-355)

परिस्थिती कशीही असो, तुमच्या मनाला जर त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची सवय असेल तर तुम्हाला ती असुखकारक वाटणार नाही. ही गोष्ट सर्वज्ञात आहे की, जोपर्यंत मन एखाद्या गोष्टीचा स्वीकार करण्यास नकार देते, त्याच्या विरोधात झगडत राहते, त्याच्यात अडथळा आणू पाहते, तोपर्यंत दु:खयातना, अडचणी, वादळे, आंतरिक संघर्ष आणि सर्व दु:खभोग आहेत. पण ज्या क्षणी मन म्हणते, ”ठीक आहे, हे असे होणारच होते, हे असे व्हायलाच हवे होते,” त्यानंतर मग काहीही घडले तरी तुम्ही समाधानी असता.

अशी काही माणसं आहेत की, ज्यांनी आपल्या शरीरावर आपल्या मनाचे एवढे नियंत्रण मिळविले असते की, त्यांच्या शरीराला कोणत्याही वेदनेची जाणीव होत नाही; मागे मी तुम्हाला काही विशिष्ट गूढवाद्यांबाबत ही गोष्ट सांगितली होती : त्यांनी जर असा विचार केला की – ईश्वराशी एकत्व पावण्याचे जे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे, त्याप्रत जाण्याचे टप्पे क्षणार्धातच ओलांडण्यासाठी, त्यांच्या वाट्याला आलेले दु:खभोग हे त्यांना साहाय्यक ठरणार आहेत; आणि साक्षात्कार करून घेण्यासाठी ते पायरीच्या दगडाप्रमाणे ठरणार आहेत – तर त्यांना दु:खभोग हे दु:खभोग वाटणार नाहीत. जणू त्यांच्या देहावर मानसिक संकल्पनेचा मुलामा चढविलेला असतो!

असे बरेचदा घडलेले आहे की, ज्यांच्यापाशी खरोखरी उत्साह असतो अशांमध्ये हा अनुभव अगदी सहज असतो; परंतु सरतेशेवटी काही कारणास्तव एखाद्याला आपले हे शरीर त्यागून जर नवीन देह धारण करावा लागलाच, तर मृत्युला तिरस्करणीय पराजयाचे स्वरूप देण्याऐवजी एक भव्यदिव्य, आनंदपूर्ण, आणि उत्साहवर्धक अशी घटना बनविणे अधिक चांगले नाही काय ?

…एखादी व्यक्ती या अपघाताकडे, (मृत्युकडे) साधन या दृष्टिकोनातून पाहू शकते. ती व्यक्ती जर जागृत असेल तर ती त्याला (मृत्युला), अन्य सर्व गोष्टींप्रमाणेच एका सुंदर गोष्टीचे, एका अत्यंत सुंदर गोष्टीचे रूप देऊ शकते. आणि लक्षात ठेवा, ज्यांना मृत्युची भीती वाटत नाही, जे त्यामुळे अस्वस्थ, चिंतातुर होत नाहीत, कोणत्याही अमंगल भावनेविना जे मरण स्वीकारू शकतात; ती माणसं अशी असतात की, जी मृत्युबद्दल कधीच विचार करत नाहीत. त्याच्यापासून आपली सुटका करून घ्यायलाच हवी अशी भयानक गोष्ट बनून मृत्यू त्यांच्या पुढ्यात उभा नसतो, मृत्युच्या विचाराने ते सदासर्वकाळ ग्रासलेले नसतात. आणि मृत्युला स्वत:पासून जेवढे दूर ढकलता येईल तेवढे ढकलण्याचा प्रयत्नही ते करीत नसतात. अशी माणसं, जेव्हा मृत्यु-घटिका येते तेव्हा, छातीठोकपणे, सुहास्य वदनाने मृत्युला म्हणतात, ”ये, मी तयार आहे.”

– श्रीमाताजी
(CWM 04 : 354)

अपूर्णतेमधून आपल्याला पूर्णत्वाची उभारणी करायची आहे, मर्यादेमधून आपल्याला अनंताचा शोध घ्यायचा आहे, मृत्युमधूनच आपल्याला अमर्त्यत्व शोधायचे आहे, दुःखामधून आपल्याला दिव्य आनंदाची पुनर्प्राप्ती करून घ्यायची आहे, अज्ञानामधून दिव्य आत्मज्ञान विनिर्मुक्त (rescue) करायचे आहे, जडामधून चैतन्य प्रकट करायचे आहे. आपल्या स्वत:साठी आणि मानवतेसाठी या ध्येयाप्रत कार्यरत राहणे हे आमच्या योगसाधनेचे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 97)