Tag Archive for: साधना

आपले जीवन सत्कारणी लागावे अशी ज्यांची इच्छा असते, तेच असे म्हणतात की, ”जोवर आवश्यकता आहे तोवर मी इथे राहीन, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत! आणि माझे ध्येय साध्य करत असताना एकही क्षण मी व्यर्थ दवडणार नाही”, वेळ आली तर अशीच माणसं सर्वोत्तम कामगिरी करून दाखवितात.

असे का? – कारण अगदी सोपे आहे, कारण ते त्यांच्या ध्येयासाठी जगतात, त्यांच्या ध्येयाच्या सत्यासाठी जगत असतात, कारण त्यांचे ध्येय हीच त्यांच्यासाठी खरी गोष्ट असते, ते ध्येय हेच त्यांच्या जगण्याचे खरे प्रयोजन असते, आणि सर्व गोष्टींमध्ये त्यांना हे ध्येयच दिसत असते, अस्तित्वाचे प्रयोजन दिसत असते आणि असे लोक भौतिक जीवनाच्या हीनदीनतेमध्ये कधीच खाली उतरून येत नाहीत.

तात्पर्य असे की, व्यक्तीने मृत्युची इच्छा कधीही धरता कामा नये.
व्यक्तीने मृत्युची आस कधीही बाळगू नये.
व्यक्तीला मृत्युची भीती कधीही वाटता कामा नये.
आणि सर्व परिस्थितींमध्ये व्यक्तीने आत्मोल्लंघनाचा संकल्प करायला हवा.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 354-355)

परिस्थिती कशीही असो, तुमच्या मनाला जर त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची सवय असेल तर तुम्हाला ती असुखकारक वाटणार नाही. ही गोष्ट सर्वज्ञात आहे की, जोपर्यंत मन एखाद्या गोष्टीचा स्वीकार करण्यास नकार देते, त्याच्या विरोधात झगडत राहते, त्याच्यात अडथळा आणू पाहते, तोपर्यंत दु:खयातना, अडचणी, वादळे, आंतरिक संघर्ष आणि सर्व दु:खभोग आहेत. पण ज्या क्षणी मन म्हणते, ”ठीक आहे, हे असे होणारच होते, हे असे व्हायलाच हवे होते,” त्यानंतर मग काहीही घडले तरी तुम्ही समाधानी असता.

अशी काही माणसं आहेत की, ज्यांनी आपल्या शरीरावर आपल्या मनाचे एवढे नियंत्रण मिळविले असते की, त्यांच्या शरीराला कोणत्याही वेदनेची जाणीव होत नाही; मागे मी तुम्हाला काही विशिष्ट गूढवाद्यांबाबत ही गोष्ट सांगितली होती : त्यांनी जर असा विचार केला की – ईश्वराशी एकत्व पावण्याचे जे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे, त्याप्रत जाण्याचे टप्पे क्षणार्धातच ओलांडण्यासाठी, त्यांच्या वाट्याला आलेले दु:खभोग हे त्यांना साहाय्यक ठरणार आहेत; आणि साक्षात्कार करून घेण्यासाठी ते पायरीच्या दगडाप्रमाणे ठरणार आहेत – तर त्यांना दु:खभोग हे दु:खभोग वाटणार नाहीत. जणू त्यांच्या देहावर मानसिक संकल्पनेचा मुलामा चढविलेला असतो!

असे बरेचदा घडलेले आहे की, ज्यांच्यापाशी खरोखरी उत्साह असतो अशांमध्ये हा अनुभव अगदी सहज असतो; परंतु सरतेशेवटी काही कारणास्तव एखाद्याला आपले हे शरीर त्यागून जर नवीन देह धारण करावा लागलाच, तर मृत्युला तिरस्करणीय पराजयाचे स्वरूप देण्याऐवजी एक भव्यदिव्य, आनंदपूर्ण, आणि उत्साहवर्धक अशी घटना बनविणे अधिक चांगले नाही काय ?

…एखादी व्यक्ती या अपघाताकडे, (मृत्युकडे) साधन या दृष्टिकोनातून पाहू शकते. ती व्यक्ती जर जागृत असेल तर ती त्याला (मृत्युला), अन्य सर्व गोष्टींप्रमाणेच एका सुंदर गोष्टीचे, एका अत्यंत सुंदर गोष्टीचे रूप देऊ शकते. आणि लक्षात ठेवा, ज्यांना मृत्युची भीती वाटत नाही, जे त्यामुळे अस्वस्थ, चिंतातुर होत नाहीत, कोणत्याही अमंगल भावनेविना जे मरण स्वीकारू शकतात; ती माणसं अशी असतात की, जी मृत्युबद्दल कधीच विचार करत नाहीत. त्याच्यापासून आपली सुटका करून घ्यायलाच हवी अशी भयानक गोष्ट बनून मृत्यू त्यांच्या पुढ्यात उभा नसतो, मृत्युच्या विचाराने ते सदासर्वकाळ ग्रासलेले नसतात. आणि मृत्युला स्वत:पासून जेवढे दूर ढकलता येईल तेवढे ढकलण्याचा प्रयत्नही ते करीत नसतात. अशी माणसं, जेव्हा मृत्यु-घटिका येते तेव्हा, छातीठोकपणे, सुहास्य वदनाने मृत्युला म्हणतात, ”ये, मी तयार आहे.”

– श्रीमाताजी
(CWM 04 : 354)

अपूर्णतेमधून आपल्याला पूर्णत्वाची उभारणी करायची आहे, मर्यादेमधून आपल्याला अनंताचा शोध घ्यायचा आहे, मृत्युमधूनच आपल्याला अमर्त्यत्व शोधायचे आहे, दुःखामधून आपल्याला दिव्य आनंदाची पुनर्प्राप्ती करून घ्यायची आहे, अज्ञानामधून दिव्य आत्मज्ञान विनिर्मुक्त (rescue) करायचे आहे, जडामधून चैतन्य प्रकट करायचे आहे. आपल्या स्वत:साठी आणि मानवतेसाठी या ध्येयाप्रत कार्यरत राहणे हे आमच्या योगसाधनेचे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 97)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३५

…या योगामध्ये (पूर्णयोगामध्ये) कोणताही मंत्र दिला जात नाही. अंतरंगातून श्रीमाताजींप्रत चेतना खुली होणे ही खरी दीक्षा होय आणि मन व प्राण यांच्यातील अस्वस्थता घालवून दिल्याने आणि केवळ अभीप्सेद्वारे ही दीक्षा प्राप्त होऊ शकते.

*

पूर्णयोगाच्या या साधनेचे सूत्र म्हणून केवळ एकच मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे एकतर श्रीमाताजींचे नाम किंवा श्रीअरविंदांचे व श्रीमाताजींचे नाम! हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तिष्कामध्ये एकाग्रता ह्या दोन्ही पद्धती यामध्ये चालू शकतात; त्यांचे प्रत्येकाचे स्वत:चे असे परिणाम असतात. हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता चैत्य पुरुष (Psychic being) खुला होतो आणि तो भक्ती, प्रेम आणि श्रीमाताजींशी एकत्व घडवून आणतो; हृदयामध्ये त्यांची उपस्थिती आणि प्रकृतीमध्ये त्यांच्या शक्तीचे कार्य घडवून आणतो. मस्तिष्ककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मन हे आत्मसाक्षात्काराप्रत खुले होते; मनाच्या अतीत असणाऱ्या चेतनेप्रत, देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत मन खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 326)

*

श्रीअरविंद : श्रीमाताजींकडे जो जो कोणी वळला आहे तो माझा योग आचरत आहे. व्यक्ती पूर्णयोग ‘करू’ शकते असे समजणे ही एक मोठी चूक आहे. विशेषतः स्वतःच्या प्रयत्नांनिशी व्यक्ती या योगाचे आचरण करून, या योगाच्या सर्व बाजूंची पूर्तता करू शकते असे समजणे ही चूक आहे. कोणताच मनुष्य तसे करू शकत नाही. व्यक्तीने काय करायला हवे, तर स्वतःला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यायला हवे आणि सेवेद्वारे, भक्तिद्वारे, अभीप्सेद्वारे स्वतःला त्यांच्याप्रत खुले केले पाहिजे; तेव्हा मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाशाद्वारे आणि शक्तिद्वारे त्या व्यक्तीमध्ये कार्य करू लागतील म्हणजे मग साधना घडेल. महान पूर्णयोगी बनण्याची आकांक्षा बाळगणे किंवा अतिमानसिक जीव बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या उद्दिष्टाप्रत मी कोठवर आलो आहे, हे स्वतःला विचारणे हीसुद्धा एक चूक आहे. श्रीमाताजींना समर्पित होणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे, तेच बनण्याची इच्छा बाळगणे हा खरा योग्य दृष्टिकोन आहे. उर्वरित सर्व गोष्टी या श्रीमाताजीच निश्चित करतात आणि तुमच्यामध्ये घडवून आणतात.

(Champaklal Speaks : 334-335)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३४

(पूर्णयोगामध्ये कोणतीही एकच एक पद्धत अवलंबण्यात येत नाही. प्रत्येकाची त्याच्या त्याच्या प्रकृतीशी मिळतीजुळती अशी स्वतंत्र पद्धत असते, हे या योगाचे एक प्रकारे वेगळेपण आहे. पूर्णयोगाचे हे वैशिष्ट्य श्रीअरविंद यांच्या खालील पत्रांमधून अधोरेखित होते.)

योगाचे किंबहुना विश्व-बदलविणाऱ्या आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणाऱ्या योगाचे परिपूर्ण तंत्र कोणते? एखादा हुक किंवा गळ टाकून माणसाला पकडले आणि एखाद्या पुलीद्वारे निर्वाणामध्ये किंवा स्वर्गामध्ये वर ओढून घेतले अशा प्रकारचे काही हे तंत्र नाही. विश्व-परिवर्तन करणाऱ्या योगाचे तंत्र हे, विश्वाप्रमाणेच विविधरूपी, वळणावळणाचे, सहनशील, सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. जर त्या तंत्राला सर्व अडीअडचणी किंवा शक्यता हाताळता आल्या नाहीत किंवा त्या तंत्राला, प्रत्येक आवश्यक घटकाला काळजीपूर्वकपणे हाताळता आले नाही तर, त्याला यश मिळण्याची शक्यता असेल का? आणि प्रत्येकालाच समजू शकेल अशा प्रकारचे एखादे परिपूर्ण तंत्र असे करू शकेल काय? (काव्यशास्त्रामधील) एखाद्या ठरावीक वृत्तामध्ये, थोडेफार फेरफार करून, एखादी छोटीशी कविता लिहिण्यासारखे हे नाही. तुम्ही जर ही कवितेची उपमा तशीच पुढे चालवली तर, विश्व-परिवर्तनाचे तंत्र म्हणजे महाभारताचेच महाभारत लिहिण्यासारखे आहे.

*

या योगामध्ये आत्म-निवेदनाचे आणि आत्म-दानाचे सार्वत्रिक तत्त्व सर्वांसाठी समानच आहे पण प्रत्येकाचा आत्मनिवेदनाचा आणि आत्म-दानाचा स्वतःचा असा एक मार्ग असतो. ‘क्ष’ चा मार्ग हा ‘क्ष’ साठी चांगला आहे, तसाच तुम्ही निवडलेला मार्ग हा तुमच्यासाठी चांगला आहे, कारण तो तुमच्या प्रकृतीशी मिळताजुळता आहे. अशा प्रकारची लवचीकता आणि विविधता योगामध्ये नसती आणि सर्वांना एकाच साच्यामध्ये बसवावे लागले असते तर योग म्हणजे एक कठोर मानसिक यंत्रसामग्रीच ठरला असता, तो एक जिवंत शक्ती बनला नसता.

*

योगमार्ग ही एक जिवंत गोष्ट असली पाहिजे, तो एखादा मानसिक सिद्धान्त नाही किंवा आवश्यक सर्व विभिन्नतांच्या विरोधात जिला चिकटून राहावी अशी, योग म्हणजे कोणतीही एकच एक अशी पद्धती नव्हे.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 294), (CWSA 29 : 103), (SABCL 24 : 1463)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३३

पूर्णयोगाच्या प्रक्रियेच्या तीन अवस्था आहेत; त्या एकमेकींपासून वेगळ्या ओळखता येण्यासारख्या नाहीत किंवा त्या पूर्ण वेगळ्याही नाहीत; परंतु त्या एका विशिष्ट प्रमाणात क्रमबद्ध आहेत.

प्रथम, स्वतःच्या अतीत जाण्याची आणि ईश्वराशी संपर्क साधण्याची पात्रता येण्यासाठी किमान अगदी प्राथमिक प्रयास केले पाहिजेत ही पहिली पायरी. जे अतीत आहे आणि ज्याच्याशी आपण ऐक्य साध्य केले आहे त्याचा, आपले समग्र जाणीवयुक्त अस्तित्व रूपांतरित व्हावे म्हणून आपण आपल्या स्वतःमध्ये स्वीकार करणे ही दुसरी पायरी; आणि या रूपांतरित मनुष्यत्वाचा दिव्य कार्यकेंद्र म्हणून विश्वात उपयोग करणे, ही तिसरी पायरी होय.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 58)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३२

व्यक्तीने स्वतःमध्ये असलेले सर्वकाही ईश्वराला निवेदित करणे, व्यक्ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे जे काही आहे ते ते सर्व ईश्वराला अर्पण करणे; स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी इत्यादी यांचा आग्रह न धरणे, उलट त्यांची जागा सर्वत्र, ईश्वरी ‘सत्या’ला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या संकल्पाद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे घेऊ देणे म्हणजे समर्पण.

*

ईश्वराप्रत स्वत:ला सोपवून देणे म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे जे काही आहे ते ते सारे ‘ईश्वरा’ला देऊ करणे; आपले स्वत:चे असे काहीही नाही, असा दृष्टिकोन बाळगणे; अन्य कोणत्याही नव्हे, तर केवळ ‘ईश्वरी’ इच्छेच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नव्हे तर, ‘ईश्वरा’साठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.

*

समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते हेच आपल्या साधनेचे पहिले तत्त्व आहे आणि जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या आणि इच्छावासना यांना खतपाणी घातले जाते तोपर्यंत संपूर्ण समर्पण अशक्य असते. आणि तोवर आत्मदानदेखील अपूर्ण असते. आम्ही ही गोष्ट कधीच लपविलेली नाही. समर्पण अवघड असू शकते, ते तसे असतेही परंतु तेच तर साधनेचे खरे तत्त्व आहे. समर्पण अवघड असल्यामुळेच, कार्य पूर्ती होईपर्यंत ते स्थिरपणे आणि धीराने केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67 & 75-76)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३१

नकार
(श्रीअरविंदांनी साधकांना लिहिलेल्या पत्रांमधून…)

मी ज्या योग्य स्पंदनांविषयी म्हाणालो ती स्पंदने एकतर अंतरात्म्याकडून किंवा वर असणाऱ्या आध्यात्मिक प्रांतामधून आलेली असतात अथवा अंतरात्म्याच्या किंवा आध्यात्मिक प्रभावाने मनामध्ये किंवा प्राणामध्ये (vital) आकाराला येतात. एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे अभीप्सा बाळगेल आणि जे त्याज्य आहे त्यास शक्य असेल तितका नकार देईल, तर तेव्हा आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रभाव अधिकाधिक कार्य करेल, अधिकाधिक खरा सद्सदविवेक आणेल, योग्य स्पंदनांची निर्मिती करेल, त्यांना प्रोत्साहन देईल, त्यांना आधार देईल आणि चुकीची स्पंदने शोधून, त्यांना हतोत्साहित करेल आणि ती वगळेल. श्रीमाताजी आणि मी हीच पद्धत सर्वांना सांगत असतो.

*

इच्छांचा विलय म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, हे मला समजले नाही. इच्छांना व्यक्तित्वातून बाहेर काढून टाकणे, नकार देणे, हे या योगाचे एक तत्त्व आहे. जी गोष्ट मनामधून नाकारण्यात येते ती बरेचदा प्राणामध्ये जाते, प्राणाने नाकारलेली गोष्ट ही शारीरिक स्तरावर जाऊन पोहोचते आणि शरीराने नाकारलेली गोष्ट ही अवचेतनामध्ये (subconscient) जाते, हे खरे आहे. अवचेतनातून हद्दपार केलेली गोष्ट ही तरीही वातावरणातील चेतनेमध्ये रेंगाळत राहण्याची शक्यता असते – तेथे तिचा व्यक्तीवर कोणताही ताबा नसतो आणि त्यामुळे ती समूळ काढून टाकणे शक्य असते.

*

प्रत्येक गोष्ट बाहेरून, म्हणजे वैश्विक प्रकृतीमधून येत असते, हे सर्वज्ञात वास्तव आहे. परंतु येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारलीच पाहिजे असे कोणतेही बंधन व्यक्तीवर असत नाही, व्यक्ती ती गोष्ट स्वीकारू शकते किंवा नाकारू शकते. भूतकाळामध्ये स्वीकाराची एक चिवट सवय जडलेली असेल तर, एकदम नकार द्यायला जमेल असे नाही, पण जर नकार देण्यामध्ये स्थिरपणे सातत्य राखले तर सरतेशेवटी व्यक्ती त्यात यशस्वी होईल. तुम्ही काय केले पाहिजे तर, कनिष्ठ अनुभवांना नकार दिला पाहिजे आणि आपले लक्ष एकमेव आवश्यक गोष्टीवर, म्हणजे… ‘प्रकाश’, ‘स्थिरता’, ‘शांती’, ‘भक्ती’ यांवर केंद्रित केले पाहिजे, त्याबाबत स्थिर अभीप्सा बाळगली पाहिजे. तुम्ही कनिष्ठ प्राणिक अनुभवांमध्ये रुची घेता आणि त्यांचे निरीक्षण करत राहता, त्यांच्याविषयी विचार करत राहता म्हणून त्या गोष्टी तुमचा ताबा घेतात आणि त्यामुळेच ईश्वराशी असलेला ‘संपर्क’ सुटतो आणि गोंधळ निर्माण होतो. तुम्ही या आधीही अशा प्रकारचे बरेच अनुभव घेतलेले आहेत आणि आता जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना दृढपणे नकार देण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची तयारी केली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 64-65)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३०

…येथे धैर्याचा अर्थ ‘परम साहसाविषयीची आवड असणे’ असा आहे. आणि परम साहसाची ही आवड म्हणजे ‘अभीप्सा’ (Aspiration). अशी अभीप्सा जी, तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता, हातचे काहीही राखून न ठेवता, परतीच्या साऱ्या शक्यता नसतानाही, तुम्हाला ‘ईश्वरी’ शोधाच्या ‘महान साहसा’साठी झोकून देण्यास प्रवृत्त करते; ईश्वर-भेटीसाठीच्या महान साहसासाठी आणि त्याहूनही अधिक महान अशा ‘ईश्वरी साक्षात्काराच्या साहसा’साठी तुम्हाला झोकून देण्यास प्रवृत्त करते.

‘पुढे काय होईल?’ याविषयी एक क्षणभरही शंका उपस्थित न करता, मागे वळून न पाहता या साहसामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देता.

…धैर्य आणि अभीप्सा या गोष्टी हातात हात घालून नांदतात. खरीखुरी अभीप्सा ही धैर्ययुक्त असते.

– श्रीमाताजी

(CWM 08 : 40-41)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २९

(अभीप्सा, नकार आणि समर्पण या त्रयीला पूर्णयोगामध्ये योगसूत्राचे स्थान आहे.)

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ईश्वरच त्याच्या शक्तिद्वारा विद्यमान असतो पण तो त्याच्या योगमायेने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारा करत असतो.

योगामध्येदेखील ईश्वर हाच ‘साधक’ आणि ‘साधना’ही असतो; त्याचीच ‘शक्ती’ स्वतःच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने ‘आधारा’वर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे साधना शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत साधकाच्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा, नकार आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

अभीप्सा जागरुक, निरंतर आणि अविरत असली पाहिजे – मनामध्ये तोच संकल्प, अंत:करणात तोच ध्यास, प्राणतत्त्वाची त्यालाच संमती, भौतिक-शारीरिक चेतना व प्रकृती ग्रहणक्षम आणि लवचीक करण्याची तीव्र इच्छा अशा स्वरूपाची अभीप्सा पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीच्या सर्व गतिविधींना नकार – मनाच्या कल्पना, मते, आवडीनिवडी, सवयी आणि रचना यांना नकार, की ज्यामुळे निश्चल-नीरव मनामध्ये खऱ्या ज्ञानाला पूर्ण मोकळी जागा मिळेल, – प्राणिक प्रकृतीच्या वासना, मागण्या, लालसा, संवेदना, आवेग, स्वार्थीपणा, गर्व, उद्धटपणा, कामुकता, लोभ, मत्सर, हेवेदावे, ‘सत्या’शी वैर यांना नकार, की ज्यामुळे निश्चल, विशाल, समर्थ आणि समर्पित अशा प्राणमय अस्तित्वामध्ये वरून खरी शक्ती आणि आनंद यांचा वर्षाव होईल – भौतिक-शारीरिक प्रकृतीची मूढता, संशय, अविश्वास, दिङ्मूढता, दुराग्रह, दुर्बोधता, क्षुद्रता, आळस, परिवर्तन-विमुखता, तामसिकता यांना नकार, की ज्यामुळे सतत अधिकाधिक दिव्य होत जाणाऱ्या देहात ‘प्रकाश’, ‘शक्ती’ आणि ‘आनंद’ यांचे खरे स्थैर्य प्रस्थापित होईल.

‘ईश्वर’ आणि त्याची ‘शक्ती’ यांना आपण आपल्या स्वत:चे, आपण जे काही आहोत आणि आपणाजवळ जे काही आहे त्या सर्वाचे, चेतनेच्या प्रत्येक स्तराचे आणि आपल्या प्रत्येक वृत्तींचे समर्पण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 06)