साधनेची मुळाक्षरे – २५

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)
मानसिक प्रयत्नांचे, जिवंत आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे करायचे, त्यासाठी कोणती साधना करायची, असे तुम्ही विचारले आहे. तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. सामान्य मानवी मनाच्या क्रिया पृष्ठस्तरावर सुरु असतात ज्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तराच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुप्त असणारी चेतना असते आणि तिच्यामध्येच आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर सत्याची जाणीव होऊ शकते. परिणामतः आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. हे पृष्ठस्तरीय मन (surface mind) शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगायला सुरुवात करणे, हे या (चेतनेवरील) एकाग्रतेचे उद्दिष्ट असते. पृष्ठस्तरीय चेतनेव्यतिरिक्त अन्य अशी ही जी सत्य चेतना आहे तिची दोन मुख्य केंद्र असतात. एक केंद्र हृदयामध्ये (शारीरिक हृदयामध्ये नव्हे तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते. हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास व्यक्तीला व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे, आत्म्याचे किंवा चैत्य पुरुषाचे ज्ञान होते. अनावृत (unveiled) झालेला तो पुरुष मग पुढे यायला सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, तिला आणि तिच्या सर्व हालचालींना ‘सत्या’च्या दिशेने वळवू लागतो, ‘ईश्वरा’च्या दिशेने वळवू लागतो आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला साद घालतो. त्यामुळे त्याला त्या ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची जाणीव होते, त्या सर्वोच्चाप्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर ‘शक्ती’ आणि ‘चेतना’, आमच्या ऊर्ध्वस्थित राहून, आमची वाट पाहात असते, तिचे आमच्या प्रकृतीमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी तो तिला आवाहन करतो. ईश्वराप्रत स्वतःला अर्पण करत, हृदयकेंद्रावर एकाग्रता करणे आणि हृदयातील ‘ईश्वराच्या उपस्थिती’ची व आंतरिक उन्मुखतेची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.
(या पत्राचा उर्वरित भाग उद्या देत आहोत…)

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06)

श्रीअरविंद