Tag Archive for: साधना

विचार शलाका – १९

‘ईश्वराला समर्पण’ या भावाने केलेल्या कार्यामधून चेतनेचा सर्वोत्तम विकास घडून येतो.

*

आळस आणि निष्क्रियता ह्या बाबींचा परिणाम म्हणजे तमस. त्यातून व्यक्ती अचेतनतेमध्ये जाऊन पडते आणि ती गोष्ट प्रगती व प्रकाशाच्या पूर्णपणे विरोधी असते. अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वर’सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे, हा ‘सत्यचेतना’ प्राप्त करून घेण्याचा निकटतम व आदर्श असा मार्ग आहे.

*

तुमच्यामध्ये जोपर्यंत दुसऱ्यांविषयी आपपर भाव शिल्लक असतो तोवर निश्चितपणे तुम्ही ‘सत्या’च्या परिघाबाहेर असता. तुम्ही तुमच्या हृदयात नित्य सद्भाव आणि प्रेमभाव जतन केला पाहिजे. आणि त्यांचा प्रगाढ शांतीने आणि समतेने सर्वांवर वर्षाव होऊ द्यावा.

*

जोपर्यंत जुन्या सवयी आणि पूर्व-समजुती यांना छेद दिला जात नाही, तोपर्यंत भविष्याप्रत वेगाने पुढे सरसावण्याची फारशी आशा बाळगता येणार नाही.

*

समाधान हे बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून आंतरिक अवस्थेवर अवलंबून असते.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 211), (CWM 13 : 212), (CWM 13 : 191), (CWM 15 : 197), (CWM 14 : 215)

विचार शलाका – १५

एकदा का तुम्ही योगमार्गामध्ये प्रवेश केलात की, तुम्ही सर्व प्रकारच्या भीतीपासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे. मनामधील, प्राणामधील, शरीरामधील भीती, ही भीती तर शरीराच्या पेशीपेशींमध्ये भिनलेली असते; या सर्व प्रकारच्या भीतीपासून सुटका करून घेतली पाहिजे. तुम्हाला योगमार्गावर जे धक्के खावे लागतात त्याचा एक उपयोग म्हणजे या भीतीपासून तुमची सुटका करणे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या या भीतीच्या कारणांपासून मुक्त, निर्लिप्त, अस्पर्शित आणि शुद्ध असे त्यांच्यासमोर उभे ठाकू शकत नाही तोपर्यंत ही भीतीची कारणे तुमच्यावर पुन्हापुन्हा हल्ला करतच राहतात. एखाद्याला समुद्राची भीती वाटते तर दुसऱ्या एखाद्याला आगीची भीती वाटते. दुसऱ्याला कदाचित असे आढळेल की, त्याला वारंवार वणव्यापाठीमागून वणव्याला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या शरीरातील एकूण एक पेशीचे भीतीने थरकापणे बंद होण्याइतपत जोवर तो प्रशिक्षित होत नाही, तोपर्यंत हे चालूच राहते. ज्याला तुम्ही घाबरत असता, ती भीती जोवर जात नाही तोवर ती गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्यापाशी येत राहते. जो रूपांतरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि जो या मार्गाचे अनुसरण करणारा आहे त्याने पूर्णतः निर्भय बनले पाहिजे. त्याच्या प्रकृतीच्या कोणत्याही भागामध्ये भीतीचा लवलेशदेखील राहता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 57)

विचार शलाका – १४

तुम्ही जर ‘दिव्य चेतने’शी एकरूप झालेले असाल तर, जी गोष्ट करायची आहे ती करायला मानवी गणनेनुसार एक वर्ष लागते की हजार वर्षे लागतात, या गोष्टीला फारसे काही महत्त्व नाही; कारण तेव्हा तुम्ही मानवी प्रकृतीच्या सर्व गोष्टी तुमच्या बाहेर ठेवता आणि ‘दिव्य प्रकृती’च्या अनंततेमध्ये आणि शाश्वततेमध्ये प्रवेश करता. तेव्हा मग, घाईगडबडीच्या अतीव उत्सुकतेच्या भावनेपासून तुमची सुटका झालेली असते. माणसं अक्षरशः या भावनेमुळे पछाडलेली असतात कारण त्यांना गोष्टी पूर्ण झालेल्या पाहायच्या असतात. क्षोभ, घाईगडबड, अस्वस्थता या गोष्टीतून काहीच साध्य होत नाही. या गोष्टी समुद्रावरील फेसासारख्या असतात; जर सतत धावपळ करत राहिले नाही आणि कोणत्यातरी कार्यांत स्वतःला झपाटल्यासारखे गुंतवून घेतले नाही तर, आपण काहीच करत नाहीये अशी माणसांची एक समजूत झालेली असते. या सगळ्या तथाकथित हालचालींमुळे गोष्टी बदलतात असे मानणे हा एक भ्रम आहे. जणू एखादा कप घ्यावा आणि त्यामध्ये पाणी ढवळत राहावे तसे हे आहे. ते पाणी हिंदकळताना दिसते पण तुमच्या त्या ढवळण्याने त्या पाण्यामध्ये तीळमात्रही बदल झालेला नसतो. असा कार्यभ्रम हा मानवी प्रकृतीच्या मोठमोठ्या भ्रमांपैकी एक मोठा भ्रम आहे. यामुळे प्रगतीला बाधा पोहोचते कारण त्यामुळे सतत काहीतरी उत्तेजित हालचाली करत राहण्याची घाई करण्याची आवश्यकता तुम्हाला भासत असते. जर तुम्हाला यातील भ्रम कळेल आणि हे किती निरुपयोगी आहे, त्यामुळे कोणतीच गोष्ट बदलत नाही, हे कळेल तर किती बरे होईल! तुम्हाला यामधून काहीच साध्य होत नसते. अशा रीतीने जे घाईगडबडीत असतात ती माणसं शक्तींच्या हातातील साधने असतात, आणि अशा माणसांना त्या शक्ती स्वतःच्या मनोरंजनासाठी नाचायला लावत असतात; आणि या शक्ती चांगल्या नसतात.

या जगामध्ये ज्या कोणत्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा व्यक्तींकडून घडलेल्या आहेत की ज्या व्यक्ती कृतींच्या पलीकडे, शांतीमध्ये उभ्या राहू शकतात. कारण या व्यक्ती ‘ईश्वरी शक्ती’ची माध्यमं असतात. अशा व्यक्ती सक्रिय प्रतिनिधी असतात, जागृत साधने असतात. या व्यक्ती अशा शक्तींचे अवतरण घडवितात ज्यामुळे हे विश्व बदलून जाते. गोष्टी अशा प्रकारे घडविल्या जातात, घाईगर्दीच्या कृतीमुळे नाहीत. शांती, शांतता आणि स्थिरतेमध्येच या विश्वाची रचना झाली आणि जेव्हा कधी खरेखुरे असे काही घडवायचे असते, तेव्हा ते शांती, शांतता आणि स्थिरतेमध्येच केले पाहिजे. जगासाठी काही करावयाचे तर सर्व प्रकारच्या निष्फळ गोष्टींवर काम करत सकाळपासून रात्रीपर्यंत धावत राहिले पाहिजे, ही समजूत अज्ञानीपणाची आहे.

एकदा का तुम्ही या गरगर फिरणाऱ्या शक्तींपासून मागे हटून शांत प्रांतामध्ये प्रवेश केलात की, मग तुमच्या लक्षात येईल की, तो केवढा मोठा भ्रम होता. माणसं म्हणजे आंधळ्या प्राण्यांचा एक समूह आहे आणि ते काय करत आहेत, ते का करत आहेत हे काहीही माहीत नसताना उगाच धडपडणाऱ्या, एकमेकांवर आदळणाऱ्या आणि ठोकरा खाणाऱ्या प्राण्यांचा तो समूह आहे, असे तुम्हाला वाटू लागेल. आणि यालाच ते कर्म आणि जीवन असे संबोधत असतात. ही तर फक्त पोकळ खळबळ असते, हे कर्म नव्हे, हे खरे जीवन नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 66-67)

विचार शलाका – १३

तुमच्यामध्ये एक इच्छा असते आणि ती तुम्ही अर्पण करू शकता. आपल्या रात्रींविषयी जागरूक होण्याच्या इच्छेचे उदाहरण घेऊया. जर तुम्ही निष्क्रिय समर्पणाचा दृष्टिकोन स्वीकारलात तर तुम्ही म्हणाल, “मी जेव्हा जागरूक बनावे अशी ‘ईश्वरा’ची इच्छा असेल तेव्हा मी जागरूक होईन.” दुसऱ्या बाजूने, जर तुम्ही तुमची इच्छा ‘ईश्वरा’ला समर्पित कराल तर तुम्ही अशी इच्छा बाळगायला सुरुवात कराल आणि तुम्ही म्हणाल, “मी माझ्या रात्रींविषयी जागरूक होईन.” येथे तुम्ही, तसे व्हावे अशी इच्छा बाळगता, तुम्ही निष्क्रिय राहून नुसती वाट पाहत बसत नाही. “मी माझी इच्छा ‘ईश्वरार्पण’ करत आहे. मला माझ्या रात्रींविषयी जागरूक बनण्याची उत्कट इच्छा आहे, परंतु मला त्याचे ज्ञान नाही, ‘ईश्वरी’ संकल्पाद्वारे ते माझ्यामध्ये घडून यावे.” असा दृष्टिकोन जेव्हा तुम्ही बाळगता त्या वेळी समर्पण घडून येते. तुमची इच्छा ही स्थिरपणे कार्यरत असली पाहिजे, एखादी विशिष्ट कृती किंवा एखादी विशिष्ट गोष्ट हवी म्हणून नव्हे तर, तुम्हाला अंतिमतः जे ध्येय साध्य करून घ्यायचे आहे त्यावर तुमची सारी उत्कट अभीप्सा एकवटलेली असली पाहिजे. ही असते पहिली पायरी. जर तुम्ही दक्ष असाल, जर तुम्ही सावधचित्त असाल तर, तुम्हाला काय केले पाहिजे यासंबंधी प्रेरणा स्वरूपात एखादी गोष्ट निश्चितपणे उमगेल आणि मग मात्र तुम्ही त्या पद्धतीने ती गोष्ट केली पाहिजे. मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, तुमच्या कृतीचे जे काही परिणाम असतील ते स्वीकारणे म्हणजे समर्पण. अगदी ते परिणाम तुम्ही जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा वेगळे देखील असतील; पण त्यांचाही स्वीकार करणे म्हणजे समर्पण. या उलट दुसरीकडे, जर तुमचे समर्पण निष्क्रिय असेल तर तुम्ही काहीच करणार नाही, काही प्रयत्न करणार नाही, धडपड करणार नाही; तुम्ही सुखाने झोपी जाल आणि चमत्कार घडण्याची वाट पाहत राहाल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 19)

विचार शलाका – १२

प्रश्न : आपल्या अस्तित्वामध्ये एकता आणि एकसंधता प्रस्थापित करण्याचा मार्ग कोणता?

श्रीमाताजी : आपला संकल्प दृढ ठेवा. तुमच्यातील अडेलतट्टू घटकांना, आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे वागवतात त्याप्रमाणे वागणूक द्या. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने कार्य करा. त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्या.

तुमच्या चेतनेच्या आत खोलवर चैत्य पुरुष असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये निवास करणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. हे असे केंद्र असते की, ज्याच्या भोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व घटकांचे, तुमच्या अस्तित्वामधील सगळ्या परस्परविरोधी गतीविधींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा आत्मसात झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित! एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरो’न्मुख झाला असाल आणि म्हणाला असाल की, ‘मला तुझे होऊन राहायचे आहे.’ आणि त्याने ‘हो” असे म्हटले असेल, तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला त्यापासून दूर ठेवू शकत नाही. जेव्हा जिवात्मा (the central being) स्वत:चे समर्पण करतो, तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते. बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य व्यक्तींमध्ये हे कवच इतके कठीण आणि घट्ट असते की, त्यामुळे अशा व्यक्ती त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’बाबत यत्किंचितही जागरुक नसतात. एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा म्हणाला असेल, ”मी इथे आहे आणि मी तुझाच आहे;” तर एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते कवच हळूहळू पातळ पातळ होत जाते. जोपर्यंत हे दोन्ही भाग पूर्णपणे जोडले जाऊन, आंतरिक अस्तित्व आणि बाह्य अस्तित्व एकच होऊन जात नाहीत तोवर ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 07)

साधनेची मुळाक्षरे – २६

मानसिक प्रयत्नांचे जिवंत आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे करायचे, त्यासाठी कोणती साधना करायची? या प्रश्नाला उत्तर देताना श्रीअरविंद यांनी दोन मार्ग सांगितले आहेत. त्यातील हा दुसरा मार्ग….

दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक केंद्रामध्ये करावयाची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते. हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते. पण एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने मनाच्या वर असणाऱ्या ऊर्ध्वस्थित शांत मानसिक चेतनेप्रत स्वतःला खुले केले पाहिजे. कालांतराने चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः चेतना, आजवर ज्यामुळे शरीरामध्येच बंदिस्त केली गेली होती, त्या झाकणाच्या वर पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना वैश्विक ‘आत्म्या’च्या, दिव्य ‘शांती’च्या, ‘प्रकाशा’च्या, ‘शक्ती’च्या, ‘ज्ञाना’च्या, ‘आनंदा’च्या संपर्कात येते आणि त्यामध्ये प्रवेश करते आणि प्रकृतीमध्येदेखील या गोष्टींचे अवतरण अनुभवास यावे म्हणून ती, तेच होऊन जाते. मनामध्ये स्थिरता प्रस्थापित व्हावी म्हणून अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे आणि ‘आत्म्या’चा व ऊर्ध्वस्थित अशा ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये चेतनेचे केंद्रीकरण करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कदाचित व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये (transcendence) चढून तेथे जीवन जगण्याऐवजी, फार फार तर, ऊर्ध्वस्थित ‘सत्या’चे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते. काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते – जर एखाद्याला हृदय केंद्रापासून सुरुवात करणे शक्य झाले, तर ते अधिक इष्ट असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 07)

साधनेची मुळाक्षरे – २५

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)
मानसिक प्रयत्नांचे, जिवंत आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे करायचे, त्यासाठी कोणती साधना करायची, असे तुम्ही विचारले आहे. तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. सामान्य मानवी मनाच्या क्रिया पृष्ठस्तरावर सुरु असतात ज्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तराच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुप्त असणारी चेतना असते आणि तिच्यामध्येच आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर सत्याची जाणीव होऊ शकते. परिणामतः आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. हे पृष्ठस्तरीय मन (surface mind) शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगायला सुरुवात करणे, हे या (चेतनेवरील) एकाग्रतेचे उद्दिष्ट असते. पृष्ठस्तरीय चेतनेव्यतिरिक्त अन्य अशी ही जी सत्य चेतना आहे तिची दोन मुख्य केंद्र असतात. एक केंद्र हृदयामध्ये (शारीरिक हृदयामध्ये नव्हे तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते. हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास व्यक्तीला व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे, आत्म्याचे किंवा चैत्य पुरुषाचे ज्ञान होते. अनावृत (unveiled) झालेला तो पुरुष मग पुढे यायला सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, तिला आणि तिच्या सर्व हालचालींना ‘सत्या’च्या दिशेने वळवू लागतो, ‘ईश्वरा’च्या दिशेने वळवू लागतो आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला साद घालतो. त्यामुळे त्याला त्या ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची जाणीव होते, त्या सर्वोच्चाप्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर ‘शक्ती’ आणि ‘चेतना’, आमच्या ऊर्ध्वस्थित राहून, आमची वाट पाहात असते, तिचे आमच्या प्रकृतीमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी तो तिला आवाहन करतो. ईश्वराप्रत स्वतःला अर्पण करत, हृदयकेंद्रावर एकाग्रता करणे आणि हृदयातील ‘ईश्वराच्या उपस्थिती’ची व आंतरिक उन्मुखतेची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.
(या पत्राचा उर्वरित भाग उद्या देत आहोत…)

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06)

साधनेची मुळाक्षरे – २४

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
आपल्या अंतरंगातील आध्यात्मिक ‘सत्य’ जसजसे वृद्धिंगत होत जाते तसतसे – ‘ईश्वरी प्रकाश’ व ‘सत्य’, ईश्वरी ‘शक्ती’ व तिची ‘ऊर्जा’, ईश्वरी ‘विशुद्धता’ व ‘शांती’ आपल्यामध्ये कार्य करत आहेत; आपल्या कर्मांवर तसेच चेतनेवर त्या कार्य करत आहेत; आपल्यामधील हीणकसपणा काढून, त्या जागी आत्मरूपी विशुद्ध सोन्याची प्रस्थापना करून, ‘ईश्वरी’ प्रतिमेमध्ये आपली पुनर्रचना घडविण्यासाठी आपल्या कर्मांचा व चेतनेचा वापर केला जात आहे – हे आपल्याला जाणवले पाहिजे. ‘ईश्वरी उपस्थिती’ जेव्हा सातत्याने आपल्यामध्ये असेल आणि आपली चेतना रूपांतरित झालेली असेल तेव्हाच, या भौतिक स्तरावर ‘ईश्वरा’चे आविष्करण करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार पोहोचतो. एखादा मानसिक आदर्श किंवा तत्त्व मनाशी दृढ बाळगणे आणि ते आपल्या आंतरिक कार्यावर लादणे यामधून आपण आपल्या स्वतःला मानसिक साक्षात्कारामध्येच मर्यादाबद्ध करण्याचा धोका संभवतो. ‘ईश्वराच्या इच्छे’चा आपल्या आयुष्यात येणारा मुक्त व जीवलग बहर तसेच ‘ईश्वराशी संपर्क’ व एकत्व यांची खरी पूर्ण वाढ होण्याऐवजी अर्ध्या-कच्च्या घडणीद्वारे त्याचा आभास निर्माण होण्याचा किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका संभवतो. एकमेव आवश्यक असणाऱ्या गोष्टीवरून आपले चित्त विचलित करणाऱ्या अशा क्षुल्लक गोष्टी जवळ करण्यापेक्षा, जी ईश्वराचा साक्षात्कार प्रदान करू शकते ती ‘शांती’ किंवा ‘प्रकाश’ किंवा ‘आनंद’ मिळविण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे हे अधिक उत्तम. आंतरिक जीवनाप्रमाणे भौतिक जीवनाचे ईश्वरीकरण (divinization) करणे हा देखील, आम्ही जो दिव्य आराखडा पाहत आहोत त्याचाच एक भाग आहे, पण आंतरिक साक्षात्काराच्या बहरातूनच तो पूर्णत्वाला जाऊ शकतो; ही अशी एक गोष्ट आहे की जी एखाद्या मानसिक तत्त्वाच्या कार्यामधून होऊ शकत नाही; तर अंतरंगातून बाह्य दिशेनेच ती विकसित होत जाते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 05-06)

साधनेची मुळाक्षरे – २३

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
ईश्वराचा शोध घेणे हेच आध्यात्मिक सत्याच्या आणि आध्यात्मिक जीवनाच्या धडपडीचे खरोखर पहिले कारण आहे; हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि त्या व्यतिरिक्त बाकी सारे शून्यवत आहे. एकदा का ईश्वराचा शोध लागला की त्याचे आविष्करण करणे – म्हणजे, सर्वप्रथम आपल्या मर्यादित चेतनेचे रूपांतर दिव्य चेतनेमध्ये करणे; अनंत शांती, प्रकाश, प्रेम, सामर्थ्य, परमानंद यांमध्ये जीवन जगणे; आपल्या मूलभूत प्रकृतीमध्ये आपण तो ईश्वरच होणे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या क्रियाशील प्रकृतीने, त्याचे वाहन, त्याचे माध्यम, त्याचे साधन बनणे होय. पण भौतिक स्तरावर एकतेचे तत्त्व प्रत्यक्ष कृतीत आणणे किंवा मानवतेसाठी कार्य करणे या गोष्टी म्हणजे सत्याचा चुकीच्या पद्धतीने केला गेलेला मानसिक अनुवाद आहे – या गोष्टी आध्यात्मिक साधनेचे पहिले किंवा खरे उद्दिष्ट असू शकत नाहीत. आधी आपण आपला आत्मा शोधला पाहिजे, ईश्वर शोधला पाहिजे, तेव्हाच आपल्याला, आपला आत्मा किंवा ईश्वर आपल्याकडून ज्या कार्याची अपेक्षा करत आहे, ते कार्य काय ते समजून येईल. तोपर्यंत आपले जीवन आणि आपली कर्में ही त्या ईश्वराचा शोध घेण्याची साधने किंवा त्या शोधासाठी साहाय्यक अशी ठरू शकतात पण त्यांचे इतर कोणतेही उद्दिष्ट असता कामा नये. जसजसे आपण आंतरिक चेतनेमध्ये विकसित होऊ लागतो, किंवा आपल्यामध्ये ईश्वराचे आध्यात्मिक सत्य जसजसे वृद्धिंगत होऊ लागते, तसतसे आपले जीवन आणि आपली कर्मे ही खरेतर, त्यामधूनच प्रवाहित झाली पाहिजेत, त्याच्याशीच एकात्म पावली पाहिजेत. पण त्याआधीच आपल्या मर्यादित मानसिक संकल्पनांच्या आधारे आपले जीवन आणि आपली कर्मे काय असावीत हे ठरविणे म्हणजे आंतरिक आध्यात्मिक सत्याच्या विकसनामध्येच खोडा घालण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 05)

साधनेची मुळाक्षरे – २२

तुम्ही कोणतीही गोष्ट करत असलात तरी, तुम्ही जे ध्येय तुमच्या स्वत:समोर ठेवले आहे त्या ध्येयाचा कधीही विसर पडू देऊ नका. एकदा का तुम्ही या महान शोधासाठी प्रवृत्त झालात की, कोणतीच गोष्ट लहान वा थोर नसते; सर्व गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या एकतर तुम्हाला त्वरेने यश मिळवून देऊ शकतात किंवा त्या यशाला उशीर लावतात. भोजनापूर्वी काही सेकंद अशा अभीप्सेने चित्त एकाग्र करा की, तुम्ही जे अन्न ग्रहण करणार आहात त्यामुळे, तुमचे परमशोधासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना एक भरभक्कम आधार प्राप्त होईल. तुमच्या शरीराला यथायोग्य असे द्रव्य मिळावे आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य, चिकाटी राहावी म्हणून, त्या अन्नाद्वारे तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल.

झोपी जाण्यापूर्वी काही सेकंद अशी इच्छा बाळगा की, त्या झोपेमुळे तुमच्या थकल्याभागल्या नसा पुन्हा ताज्यातवान्या होतील, तुमच्या मेंदूला शांतता आणि शांती प्राप्त होईल. त्यामुळे जागे झालात की, परत ताजेतवाने होऊन, ताज्या दमाने, परमशोधाच्या मार्गावरील तुमची वाटचाल तुम्ही पुन्हा सुरु करू शकाल.

कोणतीही कृती करण्यापूर्वी अशी इच्छा बाळगा की, तुमची कृती तुम्हाला साहाय्यकारी होईल किंवा अगदीच काही नाही तर, परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये किमान ती अडथळा तरी ठरणार नाही.

तुम्ही जेव्हा बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वी, ते शब्द पडताळून पाहण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढा वेळ चित्त एकाग्र करा आणि जे शब्द बाहेर पडणे नितांत आवश्यक आहेत फक्त त्याच शब्दांना अनुमती द्या; परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारे हानीकारक ठरणार नाहीत केवळ त्याच शब्दांना मुखावाटे बाहेर पडण्यास अनुमती द्या.

सारांश रूपाने म्हणायचे तर, तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्या वर असली पाहिजे, तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात त्या प्रत्येक अस्तित्वाच्या वर असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व हालचालींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे.

तुमच्या या सातत्यपूर्ण अथक परिश्रमांमुळे, एक दिवस अचानकपणे आंतरिक द्वार खुले होईल आणि एका लखलखीत, प्रकाशमान दीप्तिमध्ये तुमचा उदय होईल, त्यातून तुम्हाला अमर्त्यतेची खात्री पटेल, तुम्ही नेहमीच जिवंत होतात आणि पुढेही जिवंत असणार आहात, केवळ बाह्य रूपे नाहीशी होतात आणि तुम्ही वस्तुत: जे काही आहात त्याच्याशी तुलना करता, ही बाह्य रूपे म्हणजे जणू टाकून दिलेली जीर्ण वस्त्रे असतात, ह्याचा मूर्तिमंत अनुभव तुम्हाला येईल. आणि तेव्हा मग, सर्व बंधनातून मुक्त झालेले तुम्ही ताठपणे उभे राहाल. एरवी प्रकृतीने तुमच्यावर जे परिस्थितीचे ओझे लादलेले असते त्या ओझ्याखाली चिरडून जायला नको असेल तर, तुम्हाला मोठ्या कष्टाने ते ओझे वागवत पुढे चालावेच लागते, ते ओझे सहन करावेच लागते, आता मात्र तसे करावे न लागता, तुम्ही सरळ, खंबीरपणे मार्गक्रमण करू शकाल; आता तुम्हाला तुमच्या नियतीची जाण असेल, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी असाल.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 32-35)