Tag Archive for: साधना

श्रीअरविंद : निर्भरतेची वृत्ती हे परिपूर्ण साधनेचे महान रहस्य आहे. कोणतीही परिस्थिती असली तरी किंवा कोणतीही अडचण आली तरी, ईश्वरावर विसंबून राहणे म्हणजे ‘निर्भर’ असणे. जेव्हा सारे काही सुरळीत चालू असते तेव्हा ‘निर्भर’ असणे याला विशेष काही अर्थ नाही.

साधक : जेव्हा प्राणाचा क्षोभ होतो तेव्हा हे निर्भर असणे मी कायम कसे टिकवून ठेवू ? नकार देऊन ? की अलिप्त राहून ?

श्रीअरविंद : प्रथम अलिप्तता, नंतर अलिप्ततेसहित नकार.

साधक : पण जेव्हा आतूनच एक प्रकारचा असमाधानाचा सूक्ष्मसा ताण जाणवत असतो तेव्हा मी स्वतःला अलिप्त कसे ठेवू?

श्रीअरविंद : त्या असमाधानापासून अलिप्त होऊन. …स्वतःमधील जो ‘साक्षी’ आहे त्याने मागे उभे राहणे आणि येणाऱ्या स्पंदनांकडे ती स्वतःची (आपल्या आत्म्याची स्पंदने) आहेत असे समजण्यास नकार देणे, ती स्पंदने म्हणजे आपल्या गतकालीन प्रकृतीची सवय आहे किंवा सार्वत्रिक प्रकृतीचे आपल्यावर झालेले आक्रमण आहे, अशा रीतीने त्यांच्याकडे पाहाणे. असे समजून त्यांना हाताळणे म्हणजे अलिप्त होणे. हे अवघड आहे असे वाटू शकते पण व्यक्ती चिकाटीने प्रयत्न करत राहिली तर तिला ते चांगल्या रीतीने साध्य होते.

– [Nirodbaran’s Correspondence with Sri Aurobindo, Vol. II : 650-657]

श्रीमाताजी : मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात असू दे. ‘मी’चा शोध घेण्यासाठी कष्ट घ्या. तुमच्यासमोर जो मार्ग मी आखून दिला आहे त्यावर मार्गक्रमण करा. या कार्याइतके अन्य कोणतेच कार्य महत्त्वाचे नाही. याच्याशी तुलना करता इतर कोणतेच कार्य इतके महत्त्वाचे नाही. ‘ईश्वरा’चा शोध घ्यायचा. हेच जीवन आहे, हेच ध्येय आहे, हाच आनंदठेवा आहे. ‘ईश्वरा’वर निस्सीम ‘प्रेम’ करा जेणेकरून ‘तो’ नेहमीच तुमच्यासोबत राहील. सर्व कार्याचा कर्ता-करविता ‘तो’च असू द्यावा. ‘तो’ तुमच्यासोबत कर्म करतो. ‘तो’ तुमच्याबरोबर धडपड करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. ‘तो’ प्रत्येक पावलागणिक तुम्हाला मार्गदर्शन करतो. फक्त ‘ईश्वर’च.

– [The Supreme by Mona Sarkar : 97]

तुम्ही जितके दुःखीकष्टी असाल आणि जितके शोक-विलाप करत राहाल तितके तुम्ही माझ्यापासून दूर होत जाता. ‘ईश्वर’ हा दुःखी नाही आणि ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर सर्व प्रकारच्या भावनिक कमकुवतपणाला आणि सर्व दुःखांना तुम्ही तुमच्यापासून दूर केले पाहिजे.

*

शोक करू नका. एकच लढाई पुन्हापुन्हा अनेक वेळा जिंकावी लागते, विशेषतः ती लढाई जेव्हा विरोधी शक्तींच्या विरोधात लढली जात असते तेव्हा ती पुन्हापुन्हा जिंकावी लागते. आणि म्हणूनच व्यक्तीने संयम बाळगत स्वतःला सुसज्ज ठेवलेच पाहिजे आणि अंतिम विजयाबद्दल श्रद्धा बाळगली पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 16 : 171], [CWM 16 : 184]

श्रीमाताजी : मी सतत तुमच्या सोबत असते आणि या आंतरिक ‘उपस्थिती’विषयी जागृत होणे हा साधनेमधील सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ‘क्ष’ला विचारा, तो तुम्हाला सांगेल की ही ‘उपस्थिती’ हा काही केवळ श्रद्धेचा विषय किंवा केवळ मानसिक कल्पनेचा खेळ नाही, तर ती अतिशय सघन अशी वस्तुस्थिती आहे, आणि चेतनेसाठी ती अगदी एखाद्या जडभौतिक गोष्टीप्रमाणे खरीखुरी आणि इंद्रियगम्य असते.

*

साधक : ज्याच्यामुळे मला ईश्वरी ‘उपस्थिती’ची जाणीव सदासर्वदा आणि सर्वत्र होईल अशा प्रकारच्या ईश्वरी ‘प्रेमा’चा उगम मी कोठे व कसा शोधू?

श्रीमाताजी : त्यासाठी तुम्ही आधी ‘ईश्वरा’चा शोध घेतला पाहिजे, एकतर तो शोध तुम्ही आंतरिकीकरणाच्या (interiorisation) आणि एकाग्रतेच्या साहाय्याने तुमच्या स्वतःमध्ये घेतला पाहिजे, किंवा तो शोध तुम्ही प्रेमाच्या आणि आत्म-त्यागाच्या माध्यमातून माझ्यामध्ये किंवा श्रीअरविंदांमध्ये घेतला पाहिजे. एकदा का तुम्हाला ‘ईश्वरा’चा शोध लागला की मग अगदी स्वाभाविकपणे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, सर्वत्र त्याचेच दर्शन घडू लागेल.

*

‘ईश्वरा’शी ऐक्य पावण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे हृदयामध्ये चित्त एकाग्र करायचे आणि ‘त्या’च्या ‘अस्तित्वा’चा शोध लागेपर्यंत अंतरंगामध्ये, आत आत खोलवर जायचे. आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘ईश्वरा’च्या हाती स्वतःला सोपवून द्यायचे, आणि आईच्या कुशीत जसे लहानगे मूल विसावते तसे त्याच्या कुशीमध्ये, संपूर्ण समर्पणाच्या भावनेने विसावायचे. आणि या दोन मार्गांपैकी दुसरा मार्ग मला स्वतःला अधिक सोपा वाटतो.

– श्रीमाताजी [CWM 16 : 160-161]

एखादा माणूस जेव्हा ‘दिव्यत्वा’ला गवसणी घालू पाहतो, तेव्हा तो अप्राप्याच्या (inaccessible) दिशेने कलेकलेने उन्नत होत जाण्याची धडपड करू लागतो, त्यावेळी तो हे विसरून जातो की, त्याच्याकडे असलेला सर्व ज्ञानसंचय आणि त्याच्याकडे असणारे अगदी अंतर्ज्ञानदेखील त्या अनंताच्या दिशेने जाण्याच्या वाटेवरील एक पाऊलसुद्धा नसते. तसेच जे प्राप्त करण्याची इच्छा तो बाळगत आहे, जे त्याच्यापासून कित्येक योजने दूर आहे असे त्याला वाटत असते, ते त्याच्या स्वत:च्याच अंतरंगामध्ये असते, हे सुद्धा त्याला माहीत नसते. जोपर्यंत स्वत:मध्ये असलेल्या या ‘आद्या’विषयी (origin) तो जागृत होत नाही तोवर माणसाला विश्वाच्या ‘आद्या’विषयी ज्ञान कसे बरे होईल?

– श्रीमाताजी [CWM 02 : 40]

व्यक्तीमध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्व नसते, व्यक्तीच्या गाभ्यामध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्वच नसते, तर व्यक्तीला ‘ईश्वरा’ची जाणीव कधीच होऊ शकली नसती, ती एक अशक्यप्राय गोष्ट ठरली असती. …तुमच्या अंतरंगामध्ये ‘ईश्वर’ आहे आणि तुम्ही ‘ईश्वरा’मध्ये आहात, हे ज्या क्षणी तुम्हाला या किंवा त्या मार्गाने आकलन होते, जाणवते, किंवा जाणवायला सुरूवात होते, आणि जेव्हा तुम्ही ते मान्य करता, तेव्हा तुमचे दार साक्षात्काराच्या दिशेने किंचितसे खुले होते, किलकिले होते. नंतर कधीतरी मग अभीप्सा निर्माण झाली, ‘ईश्वरा’ला जाणून घेण्याची आणि ‘ईश्वर’च बनण्याची तीव्र निकड निर्माण झाली तर त्यामुळे, म्हणजे त्या तीव्र निकडीमुळे, ते किलकिले झालेले दार, व्यक्तीचा आतपर्यंत शिरकाव होईल इतके खुले होते. आणि एकदा का व्यक्तीचा आत शिरकाव झाला की, व्यक्तीला ‘आपण कोण आहोत’ याची जाणीव होते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 236]

कोणत्याही परिस्थितीत अंतरंगामध्ये अविचल राहणे म्हणजे समत्व.
*
सुदृढ मनाच्या नियमनामुळे समता प्राप्त होऊ शकते. (संसारी माणूस सर्व प्रकारच्या अडचणी पेलूशकतो.) पण ती ‘समता’ नव्हे;तर ती ‘तितिक्षा’ असते. सहन करण्याची ही शक्ती समतेची पहिली पायरी आहे किंवा समतेचे पहिले तत्त्व आहे.
*
समता म्हणजे अहंकाराचा अभाव नव्हे तर, इच्छेचा आणि आसक्तीचा अभाव म्हणजे समत्व.
*
इतर लोक काय बोलतात किंवा काय सुचवितात याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही. या दोन्ही गोष्टींमुळे प्रभावित न होण्यास शिकले पाहिजे. खरे संतुलन प्राप्त करून घेण्यासाठी, एक विशिष्ट अशी समता आवश्यक असते. ईश्वराचा साक्षात्कार हीच एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130,135,133),(CWSA 31 : 314)

ज्या व्यक्तीची चेतना ईश्वरी चेतनेशी एकत्व पावलेली असते अशी व्यक्ती सर्व गोष्टींना परिपूर्ण समत्वानेच सामोरी जाते.

– श्रीमाताजी
(Conversation with a Disciple, August 9, 1969)

*

समता हा या योगाचा (पूर्णयोगाचा) अत्यंत महत्त्वाचा भाग आहे; वेदना आणि दुःखभोग असतानादेखील समता बाळगणे आवश्यक आहे आणि त्याचा अर्थ असा की, दृढपणे आणि शांतपणे चिकाटी बाळगली पाहिजे; अस्वस्थ वा त्रस्त किंवा निराश वा उद्विग्न होता कामा नये तर, ईश्वरी संकल्पावर अविचल श्रद्धा ठेवून वाटचाल केली पाहिजे.मात्र समत्वामध्ये उदासीन स्वीकाराचा समावेश होत नाही. एखाद्या वेळी साधनेतील काही प्रयत्नांबाबत तात्पुरते अपयश आले तरी व्यक्तीने समत्व राखले पाहिजे; व्यक्तीने त्रस्त किंवा निराश होता कामा नये; तसेच ते अपयश म्हणजे ‘ईश्वरी इच्छे’चा संकेत आहे असे समजून, प्रयत्न सोडता कामा नयेत. उलट, तुम्ही त्यामागचे कारण शोधून काढले पाहिजे, त्या अपयशाचा अर्थ शोधून काढला पाहिजे आणि विजयाच्या दिशेने श्रद्धापूर्वक मार्गक्रमण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)

सर्व प्रकारच्या पसंती-नापसंतीपासून मुक्त असणे आणि ईश्वरी इच्छेकडून जे काही प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करणे ही गोष्ट कोणत्याही माणसाला अगदी सुरुवातीलाच शक्य होत नाही. त्यासाठी व्यक्तीकडे प्रथमतः काय असावयास हवे तर, ईश्वरी इच्छा जे करेल ते भल्यासाठीच असते अशी नित्य धारणा! आणि हे असे कसे हे मनाला कळले नाही तरीही, ही धारणा असली पाहिजे. तसेच जी गोष्ट व्यक्तीला अजूनपर्यंत आनंदाने स्वीकारता येऊ शकली नाही, ती गोष्ट तिने संन्यस्त वृत्तीने स्वीकारली पाहिजे. आणि अशा रीतीने एका स्थिर समत्वाकडे जाऊन पोहोचले पाहिजे. पृष्ठभागावर, बाह्य घटनांबद्दलच्या तात्कालिक प्रतिक्रियांच्या काही तात्पुरत्या हालचाली कदाचित असू शकतील परंतु तेव्हाही या स्थिर समत्वापासून विचलित होता कामा नये. आणि एकदा का हे समत्व दृढपणे प्रस्थापित झाले, की मग इतर सर्व गोष्टी येऊ शकतील.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)

आपण भलेही अज्ञानी असलो, चुका करत असलो, दुर्बल असलो आणि आपल्यावर विरोधी शक्तींचे हल्ले होत असले तरी, आणि बाह्यतः तत्काळ अपयश आलेले दिसत असले तरीही, तो ‘ईश्वरी संकल्प’ आपल्याला मार्गदर्शन करत आहे, तो आपल्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीमधून, त्या अंतिम साक्षात्काराकडेच घेऊन जात आहे, अशी श्रद्धा आपण बाळगली पाहिजे. ही श्रद्धा आपल्याला समत्व प्रदान करेल; आणि ही श्रद्धाच, जे काही घडते ते अंतिम स्वरूपाचे नसून, मार्गावर वाटचाल करत असताना, या सर्व गोष्टींमधून जावेच लागते, या गोष्टीचा स्वीकार करते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 91)