Tag Archive for: साधना

साधना, योग आणि रूपांतरण – १४४

पूर्णयोगांतर्गत भक्ती

साधक : आज संध्याकाळी श्रीमाताजींच्या दर्शनाच्या वेळी त्यांची दृष्टी माझ्यावर पडली आणि मला माझ्यामध्ये भक्तीचा एक उमाळा दाटून आलेला आढळला. आणि आजवर मी यासाठीच आसुसलेलो होतो असे मला वाटले. जोपर्यंत अशी भक्ती माझ्या हृदयामध्ये जिवंत आहे तोपर्यंत मला अन्य कोणतीच इच्छा नाही, असे मला वाटले. मला ‘अहैतुकी भक्ती’ लाभावी, असे आपण वरदान द्यावे. श्रीरामकृष्ण परमहंस असे म्हणत की, ‘भक्तीची इच्छा ही काही इच्छा-वासना म्हणता यायची नाही.’ त्यामुळे मला असा विश्वास वाटतो की, मीही अशाच भक्तीची इच्छा बाळगत आहे म्हणजेच, मी काही कोणताही व्यवहार करत नाहीये, कारण भक्ती हा ‘दिव्यत्वा’चा गाभा आहे, त्यामुळे भक्तीसाठी मी केलेली मागणी रास्त आहे ना?

श्रीअरविंद : ‘ईश्वरा’विषयी इच्छा किंवा ‘ईश्वरा’विषयी भक्ती ही एक अशी इच्छा असते की, जी इच्छा व्यक्तीला अन्य सर्व इच्छांपासून मुक्त करते. त्या इच्छेच्या अगदी गाभ्यात शिरून जर आपण पाहिले तर असे आढळते की, ती इच्छा नसते तर ती ‘अभीप्सा’ असते, ती ‘आत्म्याची निकड’ असते, आपल्या अंतरात्म्याच्या अस्तित्वाचा ती श्वास असते आणि त्यामुळेच तिची गणना इच्छा-वासना यांच्यामध्ये होत नाही.

साधक : श्रीमाताजींविषयी माझ्या मनामध्ये शुद्ध भक्तीचा उदय कसा होईल?

श्रीअरविंद : विशुद्ध उपासना, आराधना, कोणताही दावा किंवा मागणी न बाळगता ‘ईश्वरा’विषयी प्रेम बाळगणे याला म्हणतात ‘शुद्ध भक्ती’.

साधक : ती आपल्यामध्ये कोठून आविष्कृत होते?

श्रीअरविंद : अंतरात्म्यामधून.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 476)

साधना, योग आणि रूपांतरण – १२९

एक क्षण असा येईल की, जेव्हा तुम्ही कर्ते नसून फक्त एक साधन आहात, हे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल. सुरुवातीला तुमच्या भक्तीच्या शक्तीने ‘दिव्य माते’बरोबर असलेला तुमचा संपर्क इतका प्रगाढ होईल की, तिचे मार्गदर्शन मिळावे, तिची थेट आज्ञा किंवा प्रेरणा मिळावी, नेमकी कोणती गोष्ट केली पाहिजे याबाबत खात्रीशीर संकेत मिळावा, ती गोष्ट करण्याचा मार्ग सापडावा आणि त्याचा परिणाम दिसून यावा, म्हणून तुम्ही सदा सर्वकाळ फक्त एकाग्रता करणे आणि सारे काही तिच्या हाती सोपविणे पुरेसे ठरेल. आणि मग कालांतराने तुमच्या हे लक्षात येईल की, दिव्य ‘शक्ती’ आपल्याला केवळ प्रेरणा देते किंवा मार्गदर्शनच करते असे नाही तर ती आपल्या कर्माचा आरंभही करते आणि तीच ते कर्म घडवते देखील! तेव्हा तुम्हाला तुमच्या साऱ्या गतिविधी, हालचाली, कृती या तिच्यापासूनच उगम पावत आहेत, तुमच्या साऱ्या शक्ती या तिच्याच आहेत; तुमचे मन, प्राण, शरीर यांना तिच्या कार्याचे सचेत आणि आनंदी साधन बनले असल्याची, तिच्या लीलेचे माध्यम बनले असल्याची जाणीव होईल; या जडभौतिक विश्वामध्ये आपण तिच्या आविष्करणाचे साचे बनलो आहोत अशी जाणीव तुम्हाला होईल. एकत्वाच्या आणि अवलंबित्वाच्या अवस्थेएवढी दुसरी कोणतीही आनंदी अवस्था असू शकत नाही; कारण ही पायरी तुम्हाला तुमच्या अज्ञानजन्य दुःखपूर्ण व तणावपूर्ण जीवनाच्या सीमारेषेच्या पलीकडे, तुमच्या आध्यात्मिक अस्तित्वाच्या सत्यामध्ये, सखोल शांतीमध्ये आणि त्याच्या उत्कट आनंदामध्ये घेऊन जाते.

हे रूपांतरण होत असताना, अहंकारात्मक विकृतीच्या सर्व कलंकापासून तुम्ही स्वतःला अ-बाधित ठेवण्याची नेहमीपेक्षाही अधिक आवश्यकता असते. तसेच आत्म-दानाच्या आणि त्यागाच्या शुद्धतेला कलंक लागेल अशी कोणतीही मागणी वा कोणताही आग्रहदेखील तुम्ही धरता कामा नये. कर्म किंवा त्याचे फळ यासंबंधी कोणतीही आसक्ती तुमच्यामध्ये असता कामा नये, तुम्ही कोणत्याही अटी त्या दिव्य शक्तीवर लादता कामा नयेत. मी त्या दिव्य शक्तीचे साधन बनलो आहे असा कोणताही ताठा, घमेंड किंवा अहंकार तुम्हाला असता कामा नये. त्या दिव्य शक्तींचा वापर तुमच्या मनाच्या, प्राणाच्या किंवा शरीराच्या वैयक्तिक समाधानासाठी किंवा वापरासाठी करून, तुमच्या माध्यमाद्वारे कार्यरत असणाऱ्या त्या शक्तींची महानता तुम्ही विकृत करता कामा नये. तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा, तुमच्या अभीप्सेची शुद्धता तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या स्तरांना, साऱ्या प्रतलांना व्यापणारी असली पाहिजे, ती निरपेक्ष असली पाहिजे; तेव्हा मग अस्वस्थ करणारा प्रत्येक घटक, विकृत करणारा प्रत्येक प्रभाव तुमच्या प्रकृतीमधून एकेक करून निघून जाईल. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 12-13)

साधना, योग आणि रूपांतरण – १२८

तुम्हाला जर ईश्वरी कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता व्हायचे असेल तर, सर्व इच्छा- वासनांपासून आणि स्व-केंद्रित अहंकारापासून पूर्णतः मुक्त असणे हे तुमचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. तुमचे संपूर्ण जीवन म्हणजे ‘परमेश्वरा’प्रत केलेले एक अर्पण असले पाहिजे, एक यज्ञ असला पाहिजे. कर्म करण्यामागचे तुमचे एकमेव उद्दिष्ट (ईश्वराची) सेवा करणे, (दिव्य शक्ती) ग्रहण करणे, परिपूर्ण होणे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कार्यामध्ये तिचे आविष्करण करणारे एक साधन बनणे हेच असले पाहिजे. तुम्ही दिव्य चेतनेमध्ये अशा रीतीने वृद्धिंगत होत राहिले पाहिजे की, एक दिवस तुमची इच्छा आणि तिचा संकल्प यामध्ये कोणताही भेद शिल्लक राहणार नाही. तिच्या ऊर्मीखेरीज अन्य कोणतीही प्रेरणा तुमच्यामध्ये असता कामा नये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या माध्यमातून घडणाऱ्या तिच्या सचेत कार्याशिवाय अन्य कोणतेही कर्म (तुमच्यामध्ये शिल्लक) असता कामा नये. अशा प्रकारचे गतिमान एकत्व साधण्याची क्षमता जोवर तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत, आपण स्वतः म्हणजे दिव्य शक्तीच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेला, सारी कर्मे तिच्यासाठीच करणारा एक देह आणि आत्मा आहोत, असे तुम्ही स्वतःला समजले पाहिजे.

स्वतंत्र कर्तेपणाची भावना तुमच्यामध्ये अजूनही खूप प्रभावी असली आणि कर्म करणारा मीच आहे, अशी तुमची भावना असली तरीसुद्धा तुम्ही ते कर्म त्या दिव्य शक्तीसाठीच केले पाहिजे. अहंकारी निवडीवरील भर व त्याचा सर्व ताणतणाव, वैयक्तिक लाभासाठीची सर्व लालसा, स्वार्थी इच्छांच्या सर्व अटी या (तुमच्या) प्रकृतीमधून तुम्ही काढून टाकल्या पाहिजेत. तेथे फळाची कोणतीही मागणी असता कामा नये, तसेच काहीतरी बक्षीस मिळावे म्हणून धडपड असता कामा नये. ‘दिव्य माते’चा संतोष आणि तिच्या कार्याची परिपूर्ती हेच तुमचे एकमेव फळ आणि दिव्य चेतनेमध्ये सातत्यपूर्ण प्रगती आणि स्थिरता, सामर्थ्य, आणि आनंद हेच तुमचे पारितोषिक! सेवेचा आनंद आणि कर्मामधून मिळणारा आंतरिक विकासाचा आनंद हा निःस्वार्थी कार्यकर्त्यासाठी पुरेसा मोबदला असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 12)

साधना, योग आणि रूपांतरण – १२७

कर्मासाठी केलेले कर्म किंवा परतफेडीची, पारितोषिकाची किंवा कोणत्याही वैयक्तिक फळाची वा मोबदल्याची अपेक्षा न करता, इतरांसाठी केलेले कर्म असा सर्वसाधारणपणे, निरपेक्ष कर्माचा अर्थ होतो. परंतु ‘योगा’मध्ये मात्र ‘ईश्वरा’साठी केलेले इच्छाविरहित कर्म, हे कोणत्याही अटीविना वा मागणीविना एक अर्पण म्हणून केले जाते; केवळ ‘ईश्वरेच्छा’ म्हणूनच केले जाते अथवा ‘ईश्वरा’च्या प्रेमापोटी ते केले जाते, असा त्याचा अर्थ होतो.

*

स्वतःची आंतरिक प्रगती आणि परिपूर्णता यासाठी योगसाधना करणे हेच केवळ तुमचे उद्दिष्ट असता कामा नये तर, ‘ईश्वरा’साठी कार्य करायचे हेदेखील तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 231)

साधना, योग आणि रूपांतरण – १२६

अहंभावामध्ये राहू नये तर ‘ईश्वरा’मध्ये राहून जीवन जगावे; लहानशा, अहंभावयुक्त चेतनेमध्ये राहून नव्हे, तर ‘सर्वात्मक’ आणि ‘सर्वातीत’ पुरुषाच्या चेतनेमध्ये राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन, जीवन जगावे. सर्व प्रसंगांमध्ये व सर्व जिवांशी पूर्णपणे समत्वाने वागावे; आपले स्वतःबरोबर आणि आपले ‘ईश्वरा’बरोबर जसे वर्तन असते त्याप्रमाणे, आपण इतरांकडे पाहावे व त्यांना जाणून घ्यावे. आपल्या स्वतःमध्ये इतर सर्वांना पाहावे व सर्वांना ‘ईश्वरा’ मध्ये पाहावे; आणि ईश्वर सर्वांमध्ये आहे, आपण स्वतःदेखील इतर सर्वांमध्ये आहोत, ही जाणीव बाळगावी. अहंभावात राहून नव्हे, तर ‘ईश्वरा’मध्ये निमग्न राहून कर्म करावे.

आणि येथे पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, वैयक्तिक गरजा वा वैयक्तिक प्रमाण डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही कृतीची निवड करायची नाही; तर आपल्या ऊर्ध्वस्थित असणारे असे जे जिवंत सर्वोच्च ‘सत्य’ आहे त्याची आज्ञा असेल त्यानुसार कृतीची निवड करायची.

दुसरी गोष्ट, आपण आध्यात्मिक चेतनेच्या पायावर पुरेसे सुस्थिर झालो तरीही आपल्या स्वत:च्या स्वतंत्र इच्छेने वा विचाराने, कृती करायची नाही; तर आपल्या अतीत असणाऱ्या ‘ईश्वरी इच्छे’च्या मार्गदर्शनानुसार आणि तिच्या प्रेरणेच्या प्रभावाने आपल्या कृतीला घडू देण्यास आणि विकसित होण्यास मुभा द्यायची.

आणि शेवटी या साधनेचा सर्वश्रेष्ठ परिणाम म्हणजे, आपण स्वतःला उन्नत करून, ‘ईश्वरी शक्ती’शी एकरूप व्हायचे; ज्ञान, शक्ती, चेतना, कृती आणि अस्तित्वाचा आनंद या सर्व बाबतीत आपण ‘ईश्वरी शक्ती’शी एकरूप व्हायचे; आपली क्रियाशीलता मर्त्य अशा वासनेने, प्राणिक प्रेरणेने, भ्रामक मानसिक ‘स्वतंत्र’ इच्छेने प्रेरित व शासित होत नसून, ती अमृत आत्मानंद आणि अनंत आत्मज्ञान यांच्या प्रेरणेने, स्वच्छ ज्ञानाच्या प्रकाशात योजली जात आहे आणि विकसित होत आहे, ही जाणीव व भावना आपल्या ठिकाणी स्थिर करायची. (आपल्यातील) प्रकृतीजन्य मनुष्याला दिव्य ‘आत्म्या’च्या आणि शाश्वत ‘चैतन्या’च्या जाणीवपूर्वक आधीन केल्याने आणि विलीन केल्यानेच ही गोष्ट घडून येते…

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 101)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

साधना, योग आणि रूपांतरण – १२५

कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता ही अर्थातच आंतरिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. कर्मामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला अर्पण-भाव हा महत्त्वाचा असतो. याच्या जोडीला, एखादी व्यक्ती जर कर्म करताना श्रीमाताजींचे स्मरण करू शकत असेल किंवा एका विशिष्ट प्रकारच्या एकाग्रतेद्वारे श्रीमाताजींच्या उपस्थितीची तिला जाणीव होत असेल किंवा एक शक्ती हे कार्य करत आहे, हे कार्य सांभाळत आहे, याची जर व्यक्तीला जाण असेल तर त्यामुळे आध्यात्मिक परिणामकारकता अधिकच वाढीला लागते. पण मनावर मळभ आलेले असताना, नैराश्य आलेले असताना किंवा संघर्षाच्या प्रसंगी व्यक्ती जरी या गोष्टी करू शकली नाही तरी, त्या कर्माची प्रारंभिक प्रेरकशक्ती असणारे प्रेम वा भक्ती या साऱ्याच्या पाठीमागे तशीच टिकून राहू शकते; ही शक्ती त्या मळभाच्या मागे उपस्थित राहू शकते आणि अंधकारानंतर पुन्हा सूर्यासारखी पूर्ववत उदय पावू शकते.

सर्व साधना ही अशीच असते आणि म्हणूनच या अंधकारमय क्षणांमुळे व्यक्तीने नाउमेद होता कामा नये, तर (ईश्वरविषयक) मूळ उत्कट आस (urge) आपल्या अंतरंगामध्ये तशीच टिकून आहे आणि हे अंधकारमय क्षण हा प्रवासामधील केवळ एक टप्पा आहे, तो टप्पा ओलांडल्यानंतर तो स्वतःच आपल्याला एका महत्तर प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, याची व्यक्तीला जाणीव असली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 242)

साधना, योग आणि रूपांतरण – १२४

(उत्तरार्ध)

आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून भगवद्गीता सातत्याने कर्माचे समर्थन करत आहे. भक्ती आणि ज्ञानमार्गाप्रमाणेच कर्ममार्गाचे महत्त्वही प्रतिपादन करत आहे. कृष्ण कर्माचा एक अधिक उच्चतर अर्थ लावू पाहत आहे. कर्म निरपेक्षपणे केले पाहिजे, बक्षिसाच्या किंवा कर्मफलाच्या आसक्तीविना, निरहंकारी भूमिकेतून वा वृत्तीने, ‘ईश्वरा’प्रत केलेले अर्पण किंवा अर्पण केलेली समिधा या स्वरूपात कर्म केले गेले पाहिजे, असे त्याचे सांगणे आहे. धर्माला अनुसरून आणि योग्य प्रकारे कर्म केल्यास, कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास हरकत नाही, अशा कर्माने ‘ईश्वरा’कडे जाण्याच्या मार्गात कोणतीही बाधा येत नाही किंवा आध्यात्मिक ज्ञानाचा आणि आध्यात्मिक जीवनाचा मार्गही त्याने अवरूद्ध (prevent) होत नाही. या गोष्टींकडे पाहण्याचा भारताचा हा दृष्टिकोन पूर्वापार चालत आलेला आहे.

अर्थातच एक संन्यासवादी ध्येयसुद्धा काही जणांसाठी आवश्यक असते आणि आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्यालाही स्थान आहे. मी स्वतःसुद्धा असे म्हणतो की, व्यक्तीला जर एखाद्या तपस्व्याप्रमाणे जीवन जगता आले नाही किंवा एखाद्या एकान्तवासामध्ये राहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे अगदी किमान गरजांमध्ये जीवन जगता आले नाही तर ती व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण होऊ शकत नाही. हे उघडच आहे की, हावरटपणा, किंवा इतर कोणताही लोभ, किंवा अशा प्रकारची कोणतीही आसक्ती ही गोष्ट व्यक्तीच्या चेतनेमधून त्यागणे जितके आवश्यक असते त्याचप्रकारे संपत्तीची हाव आणि नफेखोरी या गोष्टीदेखील त्याच्या प्रकृतीमधून नाहीशा झाल्या पाहिजेत.

परंतु आध्यात्मिक पूर्णतेसाठी संन्यासमार्ग हा अगदी अनिवार्य आहे किंवा संन्यासमार्ग म्हणजेच आध्यात्मिक मार्ग, असे मी मानत नाही. एखाद्या कार्यामध्ये किंवा कोणत्याही कर्मामध्ये, किंवा ‘ईश्वरा’ला आपल्याकडून ज्या कर्माची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कर्मांमध्येसुद्धा अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रत समर्पण करण्याचा, आध्यात्मिक आत्मदान करण्याचा आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्वाचा आणखी एक मार्गदेखील आहे. तसे नसते तर, भारतामध्ये जनक किंवा विदुरासारख्या थोर आध्यात्मिक व्यक्ती आढळल्या नसत्या; इतकेच काय कृष्णदेखील आढळला नसता; किंवा अगदी असताच तर तो कृष्ण वृंदावन, मथुरा, द्वारका यांचा अधिपती झाला नसता; तो राजपुत्र आणि योद्धा किंवा कुरूक्षेत्रातील सारथी झाला नसता; तर तो फक्त एक थोर तपस्वीच बनून राहिला असता. महाभारतामध्ये किंवा अन्यत्र, भारतीय धर्मशास्त्रामध्ये आणि भारतीय परंपरेमध्ये, जीवनाच्या परित्यागावर आधारित आध्यात्मिकतेला आणि कर्मप्रधान आध्यात्मिक जीवनाला समान स्थान देण्यात आलेले आहे. जीवनाच्या परित्यागावर भर देणारा संन्यासमार्ग हाच तेवढा भारतीय परंपरेतून आलेला आहे, आणि ‘सर्वकर्माणि’, सर्वप्रकारच्या कर्मांचा आणि जीवनाचा स्वीकार हा मार्ग युरोपियन किंवा पाश्चात्त्य आहे, तो आध्यात्मिक नाही, किंवा तो भारतीय नाही असे म्हणता येत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 249-250)

साधना, योग आणि रूपांतरण – १२२

(स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय जीवनात सक्रिय असणाऱ्या एका लोकप्रिय नेत्याने, जे गीताप्रणीत योगाचे आचरण करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी श्रीअरविंदांना विनंती केली होती की, आपल्याला मार्गदर्शन करावे. राजकीय जीवनाचा मार्ग सोडून नवीन कार्य हाती घ्यावे का असा प्रश्न त्यांनी श्रीअरविंदांना विचारला आहे. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही तुमच्या कार्याची आणि जीवनाची जी दिशा निवडली आहे त्यामध्ये बदल करण्याची कोणतीच गरज नाही. जोपर्यंत ते कार्य म्हणजे तुमचा स्वभावधर्म आहे असे तुम्हाला वाटते किंवा तुमच्या आंतरिक अस्तित्वाने ते कार्य करण्यास तुम्हाला प्रवृत्त केले असेल तर किंवा अन्य कोणत्याही कारणाने, ते कार्य म्हणजे तुमचा विहीत धर्म आहे, असे तुम्हाला वाटते तोपर्यंत त्यात बदल करण्याची गरज नाही. हे तीन निकष आहेत. या व्यतिरिक्त गीताप्रणीत योगाने, आचरणाची कोणती एखादी निश्चित दिशा किंवा कर्माचा किंवा जीवनाचा कोणता मार्ग नेमून दिला आहे किंवा कसे ते मला माहीत नाही.

कार्य कोणत्या वृत्तीने वा कोणत्या चेतनेने केले जाते ते सर्वाधिक महत्त्वाचे असते. त्याचे बाह्य रूप हे विविध स्वभावधर्मानुरूप बदलू शकते. ‘ईश्वरी शक्ती’ ने आपले कार्य हाती घेतले आहे आणि ती ‘शक्ती’च ते कार्य करत आहे, असा सुस्थिर स्वरूपाचा अनुभव व्यक्तीला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे असे चालू राहते; त्यानंतर कोणते कार्य करायचे किंवा कोणते कार्य करायचे नाही हे ती ‘शक्ती’च निर्धारित करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 236)

साधना, योग आणि रूपांतरण – १२१

एक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे, ती अशी की, तुमचे यश किंवा अपयश हे प्रथम आणि नेहमीच, योग्य दृष्टिकोन आणि खरे आंतरात्मिक व आध्यात्मिक वातावरण बाळगण्यावर, तसेच श्रीमाताजींच्या शक्तीला तुमच्या माध्यमातून कार्य करण्यास सहमती देण्यावर अवलंबून असते.

मला तुमच्या पत्रांवरून असे लक्षात आले की, तुम्ही त्या शक्तीचा आधार फारच गृहीत धरत आहात आणि पहिला भर स्वतःच्या कल्पना, योजना आणि कामासंबंधीच्या चर्चांवर देता. परंतु या साऱ्या गोष्टी चांगल्या असू देत किंवा वाईट, त्या योग्य असू देत किंवा चुकीच्या, त्या जर ‘सत् – शक्ती’ची साधने नसतील तर त्या असफलच होणार. तुम्ही नेहमी एकाग्र असले पाहिजे, तुमच्या सर्व अडचणींच्या निराकरणासाठी तुम्ही येथून (पाँडिचेरीहून) पाठविल्या जाणाऱ्या शक्तीवर विसंबून राहिले पाहिजे, तुम्ही त्या शक्तीला कार्य करण्यासाठी वाव दिला पाहिजे, म्हणजे त्या शक्तीची जागा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला आणि स्वतंत्र प्राणिक इच्छा किंवा आवेगाला घेऊ देता कामा नये.

यशाची ही जी अट आहे ती कधीही न विसरता, तुम्ही तुमचे कार्य करत रहा. स्वतःला त्या कार्यामध्ये किंवा तुमच्या कल्पनांमध्ये किंवा त्यासंबंधीच्या योजनांमध्ये हरवून बसू नका आणि स्वतःस खऱ्या उगमाच्या नित्य संपर्कात ठेवण्यास विसरू नका. अन्य कोणाचाही मानसिक किंवा प्राणिक प्रभाव किंवा सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव किंवा सामान्य मानवी मानसिकता यांना तुमच्या आणि श्रीमाताजींच्या शक्तीच्या व उपस्थितीच्या आड येऊ देऊ नका.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 242-243)

साधना, योग आणि रूपांतरण – १२०

ज्ञानासाठी, प्रेमासाठी किंवा कर्मासाठी ‘ईश्वरा’शी सायुज्य पावणे म्हणजे ‘योग’. माणसाच्या अंतरंगात आणि बाहेर असणाऱ्या, सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ‘ईश्वरा’शी योगी स्वतःचे थेट नाते प्रस्थापित करतो. तो त्या अनंताशी जोडलेला असतो; या विश्वामध्ये ‘ईश्वरा’चे सामर्थ्य प्रवाहित करण्याची तो एक वाहिनी (channel) बनतो. मग ते शांत परोपकाराच्या भूमिकेद्वारे असेल किंवा सक्रिय उपकाराच्या भूमिकेद्वारे असेल.

– जेव्हा एखादा मनुष्य स्वतःची व्यक्तिगत दलदल सोडून, इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन, इतरांसाठी जगू लागतो;
– जेव्हा तो सुयोग्य रीतीने आणि प्रेमाने व उत्साहाने कर्म करू लागतो; मात्र परिणामांची चिंता सोडून देतो, तो विजयासाठी उत्सुक नसतो किंवा पराजयाची भीतीही बाळगत नाही;
– जेव्हा तो त्याची सारी कर्मे ‘ईश्वरा’ला अर्पण करतो आणि आपला प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती दिव्यत्वाच्या वेदीवर अर्पण करतो;
– जेव्हा तो भीती व द्वेष, घृणा व किळस, आसक्ती यांपासून मुक्त होतो आणि ‘प्रकृती’च्या शक्तींप्रमाणे, कोणतीही घाईगडबड न करता, अविश्रांतपणे, अपरिहार्यपणे, परिपूर्णपणे कर्म करतो;
– जेव्हा तो, ‘मी म्हणजे देह आहे’, ‘मी म्हणजे हृदय आहे’ किंवा ‘मी म्हणजे मन आहे’ किंवा ‘मी म्हणजे या तिन्हींची गोळाबेरीज आहे’; या विचारांच्या वर उठतो आणि जेव्हा तो स्वतःच्या, खऱ्या ‘स्व’ चा शोध घेतो;
– जेव्हा त्याला स्वतःच्या अमर्त्यतेची आणि मृत्युच्या अ-वास्तवतेची जाण येते;
– जेव्हा त्याला ज्ञानाच्या आगमनाची अनुभूती येते आणि जेव्हा मी स्वतः अकर्ता आहे, आणि ती दिव्य शक्ती माझ्या मनाच्या द्वारे, माझ्या वाणीच्या द्वारे, माझ्या इंद्रियांच्या द्वारे, आणि माझ्या सर्व अवयवांद्वारे अप्रतिहत (unresisted) रीतीने कार्य करत आहे, अशी जाण त्याला येते;
– अशा रीतीने, सर्वांचा ‘स्वामी’, मानवतेचा ‘साहाय्यक’ आणि ‘सखा’ असणाऱ्या ‘ईश्वरा’प्रत तो मनुष्य स्वतः जे काही आहे, तो स्वतः जे काही करतो ते आणि त्याच्यापाशी जे काही आहे, अशा सर्व गोष्टींचा, जेव्हा परित्याग करतो तेव्हा मग, तो नित्य त्या ‘ईश्वरा’मध्ये निवास करू लागतो आणि मग अशा तऱ्हेने दुःख, अस्वस्थता किंवा मिथ्या क्षोभ यांची त्याला बाधा होत नाही; तेव्हा तोच ‘योग’ असतो.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 11)