Tag Archive for: साधना

श्रीमाताजी आणि समीपता – ११

साधक : मी माझ्या खोलीत एकटा होतो तेव्हा खूप खुश होतो, तेव्हा मला श्रीमाताजींच्या चेतनेची आंतरिक जाणीव होती. जेव्हा मी ‘क्ष’ला भेटायला बाहेर गेलो तेव्हा मात्र श्रीमाताजींसोबत असलेला माझा आंतरिक संपर्क तुटला आणि मला लगेचच अस्वस्थ वाटू लागले. लोकांमध्ये मिसळल्याने (श्रीमाताजींच्या सन्निध असल्याची) माझी ही आंतरिक जाणीव नष्ट होते, पण मी कायम एकांतवासात तर राहू शकत नाही. मग अशा वेळी काय केले पाहिजे?

श्रीअरविंद : तुम्ही तुमच्या अंतरंगामध्येच, श्रीमाताजींच्या सन्निध राहायला शिकले पाहिजे, त्यांच्या चेतनेच्या संपर्कात राहायला शिकले पाहिजे आणि इतरांना तुम्ही केवळ तुमच्या पृष्ठवर्ती, बाह्य व्यक्तिमत्त्वाद्वारे भेटले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 457-458)

श्रीमाताजी आणि समीपता – १०

व्यक्ती जोपर्यंत अंतरंगामध्ये जीवन जगत नाही तोपर्यंत व्यक्तीला चिरकाळ टिकेल अशा स्वरूपाचा आनंद मिळणे शक्य नाही. आपले कर्म, आपल्या कृती या श्रीमाताजींना अर्पण केल्याच पाहिजेत, त्या त्यांच्यासाठी म्हणूनच केल्या गेल्या पाहिजेत, त्यामध्ये तुमचा स्वतःसाठीचा विचार, तुमच्या स्वतःच्या कल्पना, तुमचे अग्रक्रम, तुमच्या भावना, पसंती-नापसंती या गोष्टी असता कामा नयेत. आणि जर अशा गोष्टींवर व्यक्तीची नजर असेल तर तिला प्रत्येक पावलागणिक मन किंवा प्राणामध्ये संघर्षाचा सामना करावा लागतो. तसेच समजा जरी व्यक्तीचे मन व प्राण तुलनेने शांत झालेले असले तरीही शरीरामधील आणि मज्जातंतूमधील संघर्षाला तिने सामोरे जाणे अजून बाकी असते. व्यक्ती जेव्हा अंतरंगातून श्रीमाताजींपाशी राहते तेव्हाच फक्त शांती आणि आनंद स्थिर राहू शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 460)

श्रीमाताजी आणि समीपता – ०९

पूर्णयोगाच्या साधनेसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे अविचलता आणि शांती, विशेषतः प्राणाची (vital) शांती. ही शांती बाह्य परिस्थितीवर किंवा आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून नसते; तर ती उच्चतर चेतनेशी, म्हणजे ईश्वरी चेतनेशी असलेल्या आंतरिक नात्यावर, म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या चेतनेशी असलेल्या आंतरिक नात्यावर अवलंबून असते.

ज्या व्यक्ती आपले मन आणि प्राण श्रीमाताजींच्या सामर्थ्याप्रत आणि शांतीप्रत खुले करतात त्यांना ते सामर्थ्य आणि ती शांती अत्यंत कठीण, अतिशय अप्रिय कामामध्ये आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये असतानासुद्धा लाभू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 458)

श्रीमाताजी आणि समीपता – ०८

साधक : श्रीमाताजींबरोबर असलेले कोणते नाते हे सर्वात खरे आणि सत्य असल्याचे म्हणता येईल? त्यांच्याशी असणारे आत्मत्वाचे नाते (soul relation) हेच एकमेव खरे नाते आहे, असे म्हणता येईल का? आणि आत्मत्वाचे नाते म्हणजे काय? मला ते कसे ओळखता येईल?

श्रीअरविंद : आंतरिक (आत्मत्वाचे) नाते म्हणजे व्यक्तीला श्रीमाताजींच्या अस्तित्वाची जाणीव असणे. अशी व्यक्ती सदोदित त्यांच्याकडे अभिमुख असते. त्यांची शक्ती आपल्याला संचालित करत आहे, त्यांची शक्ती आपल्याला मार्गदर्शन करत आहे, साहाय्य करत आहे याची व्यक्तीला जाणीव असते. अशी व्यक्ती श्रीमाताजींच्या प्रेमभक्तीने आकंठ भारलेली असते. अशी व्यक्ती त्यांच्या भौतिकदृष्ट्या जवळ असो किंवा नसो, तिला त्यांच्या समीपतेची जाणीव असते. व्यक्तीला आपले मन श्रीमाताजींच्या मनाच्या समीप असल्याचे, आपला प्राण हा श्रीमाताजींच्या प्राणाशी सुमेळ राखत असल्याचे, आपली शारीरिक चेतना त्यांच्या चेतनेने परिपूर्ण असल्याचे जाणवेपर्यंत मन, प्राण आणि आंतरिक शरीराच्या बाबतीत या नात्याचा विकास होत राहतो. आंतरिक एकत्वाचे हे सारे घटक असतात, त्यामुळे (अशा प्रकारचे असलेले) हे एकत्व केवळ आत्म्यामध्ये, जिवामध्येच असते असे नाही, तर ते प्रकृतीमध्येही असते. असे आंतरिक नाते घनिष्ठ असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 453-454)

श्रीमाताजी आणि समीपता – ०७

भौतिकदृष्ट्या ज्या व्यक्ती श्रीमाताजींच्या निकट आहेत केवळ त्याच व्यक्ती त्यांना जवळच्या आहेत असे नव्हे; तर ज्या व्यक्ती श्रीमाताजींप्रति खुल्या असतात, आंतरिक अस्तित्वातून त्यांच्याजवळ असतात, श्रीमाताजींच्या इच्छेशी एकरूप झालेल्या असतात, त्या व्यक्ती श्रीमाताजींची खरी लेकरे असतात आणि ती श्रीमाताजींना अधिक जवळची असतात.

*

साधक : कधीकधी मी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा मी ‘माँ – माँ – माँ’ असे म्हणत असतो. आणि मग सारे काही निःस्तब्ध होते आणि मला माझ्या अंतरंगामध्ये आणि बाहेरही एक प्रकारच्या महान शांतीचा अनुभव येतो. अगदी अवतीभोवतीच्या वातावरणामधूनसुद्धा मला ‘माँ – माँ – माँ’ असे ऐकू येते. हे खरे आहे का? की, हा केवळ एक प्रतिध्वनी आहे?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगामध्ये येणारा हा अनुभव जसा तुमच्या चेतनेचा एक भाग असतो अगदी त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या अवतीभोवती निर्माण केलेले वातावरण हाही तुमच्या चेतनेचाच भाग असतो. जेव्हा तुम्ही श्रीमाताजींचे नामस्मरण करत असता, तेव्हा त्याचा प्रतिध्वनी तुमच्या चेतनेमध्ये म्हणजे, तुमच्या अंतरंगामध्ये तसेच तुमच्या बाहेरदेखील उमटायला सुरूवात होते. त्यामुळे तुम्हाला हा जो अनुभव आला तो खरा अनुभव आहे आणि तो चांगला अनुभव आहे.

*

साधक : माताजी, माझ्यामध्ये हजारो अपूर्णता असल्या तरीदेखील एक गोष्ट मात्र माझ्या मनात दृढ झाली आहे ती म्हणजे – तुम्ही माझी मायमाऊली आहात आणि मी तुमच्या हृदयातून जन्माला आलो आहे. गेल्या सहा वर्षांत हे एकच सत्य माझ्या प्रचितीस आले आहे. निदान ही गोष्ट जाणवण्याइतपत का होईना, पण मी पात्र ठरलो म्हणून मी तुमच्याप्रति कृतज्ञ आहे.
श्रीअरविंद : येऊ घातलेल्या सत्यांसाठी हे अत्युत्तम असे अधिष्ठान आहे; कारण ती सत्यं या अधिष्ठानाचा परिणाम म्हणूनच उदयाला यायची आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 496, 478-479, 478)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

श्रीमाताजी आणि समीपता – ०६

(एका साधकाला मार्गदर्शन करणारे श्रीअरविंद लिखित पत्र…)

“श्रीमाताजींपासून लपवावीशी वाटेल अशी कोणतीही गोष्ट करू नका, अशी कोणतीही गोष्ट बोलू नका अथवा अशा कोणत्या गोष्टीचा विचारही करू नका.” आणि येथेच, तुमच्याकडून म्हणजे तुमच्या प्राणाकडून जी शंका उपस्थित करण्यात आली आहे त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. अशा ‘किरकोळ गोष्टी’ श्रीमाताजींच्या नजरेस कशा आणून द्यायच्या ही तुमची शंका आहे. श्रीमाताजींना या गोष्टींचा त्रास होईल किंवा त्या या गोष्टींना क्षुल्लक मानतील असे तुम्हाला का वाटते? सर्व जीवन योगमय करायचे असेल तर, येथे क्षुल्लक किंवा बिनमहत्त्वाचे असे काही कसे काय असू शकेल?

तुमच्या कृतीची आणि स्वयं-विकासाची कोणतीही गोष्ट सुयोग्य वृत्तीने त्यांच्यासमोर मांडणे म्हणजे ती गोष्ट श्रीमाताजींच्या संरक्षणछत्राखाली नेण्यासारखी आहे; रूपांतरणासाठी कार्यरत असणाऱ्या त्यांच्या शक्तीकिरणांमध्ये, ‘सत्या’च्या प्रकाशात नेण्यासारखी आहे. कारण श्रीमाताजींच्या नजरेला जे आणून देण्यात आलेले असते त्या गोष्टीवर त्यांचे शक्तीकिरण लगेचच कार्य करू लागतात. तुमचा अंतरात्मा तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरित करत असेल आणि तेव्हा तुमच्यामधीलच कोणीतरी, तुम्हाला ती गोष्ट तुम्ही करू नये असे सुचवत असेल तर ते म्हणजे, तो ‘प्रकाश’किरण आणि त्या ‘शक्ती’चे कार्य टाळण्यासाठी तुमच्या प्राणाने वापरलेले ते एक हत्यार असण्याची खूपच शक्यता असते.

आणखी एक गोष्टसुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि ती अशी की, तुम्ही जर तुमच्या कोणत्याही भागाच्या वृत्ती-प्रवृत्ती श्रीमाताजींनी पाहाव्यात म्हणून त्यांच्या नजरेसमोर ठेवून, श्रीमाताजींप्रति स्वतःला खुले केलेत तर, त्यातूनच स्वयमेव त्यांच्याबरोबरचे तुमचे एक नाते तयार होते आणि त्यातून एक वैयक्तिक जवळीक निर्माण होते. त्यांचे सर्व साधकांबरोबर जे एक सर्वसाधारण, मूक नाते असते किंवा श्रीमाताजींनी आपल्यामध्ये कार्य करावे अशी कोणतीही विनवणी व्यक्तीने केलेली नसतानाचे त्या व्यक्तीचे श्रीमाताजींशी जे नाते असते (not directly invited action) त्यापेक्षा हे जवळीकीचे नाते काहीसे निराळे असते.

अर्थातच, हे सारे केव्हा घडून येऊ शकते? अशा प्रकारच्या खुलेपणासाठी तुम्ही तयार झाले आहात, असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या अंतरंगामध्ये जे काही आहे ते जसेच्या तसे अगदी उघडपणे श्रीमाताजींसमोर ठेवण्यासाठी तुमचा अंतरात्मा तुम्हाला प्रेरित करत असेल तेव्हाच हे घडून येऊ शकते. जेव्हा ही गोष्ट अंतरंगातून उमलून येते आणि जेव्हा ती उत्स्फूर्त, खरीखुरी असते तेव्हाच ती फलदायी ठरते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 449)

श्रीमाताजी आणि समीपता – ०२

साधक : श्रीमाताजींबरोबरचे आमचे खरे नाते कोणते? माता आणि बालक हेच नाते खरे ना?

श्रीअरविंद : एखादे बालक मातेवर ज्याप्रमाणे संपूर्णतया, प्रामाणिकपणे आणि साध्यासुध्या विश्वासाने, प्रेमाने विसंबून असते तेच नाते हे श्रीमाताजींबरोबर असलेले खरे नाते होय.

*

तुम्ही श्रीमाताजींचे बालक आहात आणि मातेचे तिच्या बालकांवर अतोनात प्रेम असते आणि त्यांच्या प्रकृतीमधील दोष ती धीराने सहन करत राहते. श्रीमाताजींचे खरेखुरे बालक होण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्यामध्ये आहे, पण तुमचे बाह्य मन व्यर्थपणे किरकोळ गोष्टींमध्ये गुंतलेले राहते आणि बरेचदा उगाचच तुम्ही त्या गोष्टींचा बाऊ करत बसता. श्रीमाताजींचे दर्शन तुम्ही फक्त स्वप्नातच घेता कामा नये तर, त्यांना तुमच्यासमवेत आणि तुमच्या अंतरंगात सदासर्वकाळ पाहण्याचा आणि त्यांचे अस्तित्व अनुभवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा मग तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणणे सोपे जाईल. कारण त्या तेथे (तुमच्या अंतरंगात) राहून तुमच्यासाठी ती गोष्ट करू शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 448, 452-453)

साधना, योग आणि रूपांतरण – ३१२

भव्य आणि गौरवशाली रूपांतरण

मानवाची महानता तो काय आहे यामध्ये नसून, तो काय करू शकतो यामध्ये सामावलेली आहे. मानव ही अशी एक बंदिस्त जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या ‘दिव्य कारागीरा’कडून ‘अतिमानवता’ घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळाली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न ‘कारागीर’ होण्याची, त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची परवानगी त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतर शक्य व्हावे याकरिता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची एकदिश झालेली इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. त्याची ‘अभीप्सा’ ही पृथ्वीने त्या अतिमानसिक निर्मिकाला (Creator) दिलेली हाक आहे.

पृथ्वी आवाहन करेल आणि ‘परमेश्वर’ जर त्यास प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 160)

(ही मालिका येथे समाप्त होत आहे.)

साधना, योग आणि रूपांतरण – ३११

रूपांतरण

(रूपांतरण प्रक्रिया कशी स्वारस्यपूर्ण असते व त्यादरम्यान व्यक्तीला स्वत:विषयी कसे नवनवे शोध लागतात, हे आपण कालच्या भागात समजावून घेतले.)

उदाहरणादाखल, एका अगदी साध्याशा निश्चयाचा विचार करू या. (तो वरवर पाहता साधासा आहे.) “मी पुन्हा कधीही खोटं बोलणार नाही,” असे तुम्ही ठरविता. आणि अचानकपणे, तुम्हाला माहीतही नसते की तुम्ही खोटं का आणि कसे बोललात; पण तुम्ही अनाहूतपणे खोटं बोलता आणि बोलणं झाल्यानंतर मग ते तुमच्या लक्षात येते. तुम्ही म्हणता, “पण हे काही बरोबर नाही. मी जे आत्ता काही बोललो ते बरोबर नाही. मला काही तरी वेगळेच म्हणायचे होते.” मग तुम्ही शोध घेता. “हे असे कसे काय घडले? मी असा कसा विचार केला आणि मी असे कसे काय बोललो? माझ्या तोंडातून हे उद्गार कोणी काढले? मला असे बोलण्यास कोणी भाग पाडलं?…” असा खूप शोध तुम्ही घेता. अशा वेळी तुम्ही स्वतःच्या वागण्याचे समर्थन करता आणि म्हणता की, “ते उद्गार माझे नव्हते, ते बाहेरून आले होते” किंवा “ती गोष्ट अनाहूतपणे झाली होती, तो एक निसटता क्षण होता.” आणि नंतर मग तुम्ही त्याचा विचारही करत नाही. आणि मग पुन्हा पुढच्या वेळी तीच गोष्ट घडते.

त्या ऐवजी तुम्ही जर शोध घेतलात, “तुमच्यामधील जो कोणी खोटं बोलत आहे त्याचा हेतू काय असेल?” आणि मग तुम्ही शोध घेतच राहता, आणि मग तुम्हाला तुमच्यामध्येच एका कोपऱ्यात असे काहीतरी दडलेले आढळते की जे स्वतःला पुढे दामटू पाहात असते, किंवा ते त्याचा दृष्टिकोन ठामपणे रेटू इच्छित असते. (अनेकानेक कारणं सांगता येऊ शकतात.) लोकांचे तुमच्याविषयी मत चांगले झाले पाहिजे आणि तुम्ही कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आहात असे त्यांना वाटले पाहिजे, म्हणून तुम्ही वस्तुतः जसे आहात त्याच्यापेक्षा तुम्ही काहीसे वेगळे असल्याचे ते भासवत असते. आणि तो तुमच्यामधील खोटं बोलण्यास प्रवृत्त झालेला घटक असतो. तुमच्या सक्रिय चेतनेमधून नाही, तर तुमच्या चेतनेच्या पाठीमागे जे दडून बसले होते त्याने तुम्हाला खोटं बोलण्यास भाग पाडलेले असते. तुम्ही जेव्हा सजग नसता तेव्हा मग तो घटक तुमचे तोंड, तुमची जीभ वापरतो आणि तुमच्या तोंडातून ते वदवून घेतो. आणि अशा रीतीने तुमच्या तोंडातून खोटं बाहेर पडते.

मी तुम्हाला हे एक उदाहरण दिले. अशी लाखो उदाहरणं आहेत आणि हे सारे मोठे रोचक असते. आणि व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगामध्ये या सगळ्याचा शोध लागतो, आणि ती प्रामाणिकपणे म्हणते, “मला यामध्ये बदल केलाच पाहिजे,” तेव्हा तिला असे आढळते की, आता तिला एक प्रकारची आंतरिक स्वच्छ दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि मग इतरांमध्येसुद्धा कसे, काय चाललेले असते याविषयी ती हळूहळू सजग होऊ लागते आणि त्यांनी जसे वागावे असे या व्यक्तीला वाटत असते तसे जरी समोरची व्यक्ती वागली नाही तरीही आता त्याचा व्यक्तीला राग येत नाही. उलट गोष्टी कशा घडतात ते व्यक्तीला कळायला लागते; अमुक एक व्यक्ती ‘अशी का आहे’, ‘प्रतिक्रिया कशा तयार होतात’ हे आता व्यक्तीला उमगू लागते. आणि या ज्ञानामुळे व्यक्ती आता (रागराग करत नाही) तर नुसतेच स्मित करते. आता ती व्यक्ती कठोरपणे निष्कर्ष काढत नाही, तर आता व्यक्ती स्वतःमधील आणि इतरांमधील अडचणी दिव्य चेतनेला अर्पण करते. त्या अडचणींच्या अभिव्यक्तीचे केंद्र कोणते का असेना, त्यामध्ये रूपांतरण घडून यावे यासाठी व्यक्ती त्या गोष्टी दिव्य चेतनेला अर्पण करते.

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३१०

रूपांतरण

(आपले व्यक्तित्व एकसंध, एकजिनसी नसल्यामुळे रूपांतरणाच्या प्रक्रियेमध्ये एकच गोष्ट पुन्हापुन्हा करावी लागते, त्यासाठी चिकाटी कशी आवश्यक असते हे आपण कालच्या भागात पाहिले.)

आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते आणि ती अशी की, तुम्ही जर खरोखरच प्रामाणिकपणे, काळजीपूर्वक ही गोष्ट अंमलात आणण्याचा प्रयत्न कराल तर ती अतिशय स्वारस्यपूर्ण गोष्ट आहे.

जे लोक अगदी एकसुरी, कंटाळवाणे जीवन जगत राहतात त्यांच्यासाठीसुद्धा ही गोष्ट स्वारस्यपूर्ण ठरते. अशी लोकं असतात की, ज्यांना अगदी नीरस असे काम करावे लागते. नेहमी एकच गोष्ट आणि तीही त्याच त्याच वातावरणात करावी लागते. आणि त्या गोष्टीमध्ये किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये रुची कशी घ्यायची हे कळण्यासाठी आवश्यक असणारी जागरुकता त्यांच्या मनामध्ये नसते. अशा व्यक्तीसुद्धा जर स्वतःवर हे नियंत्रण ठेवण्याचे, आणि स्वतःमधील (अनावश्यक असणाऱ्या अशा) गोष्टी वगळायचे काम करू लागतील तर ती गोष्ट स्वारस्यपूर्ण ठरते. म्हणजे असे की, जी जी गोष्ट आपल्यासोबत अज्ञान, अचेतना आणि अहंकार घेऊन येते ती गोष्ट व्यक्तीने परिवर्तनाच्या इच्छेपुढे ठेवली आणि व्यक्ती जर जागरूक राहिली आणि तिने निरीक्षण केले, अभ्यास केला आणि हळूहळू त्याप्रमाणे आचरण करण्यास सुरुवात केली तर हे सारे खूपच रोचक बनते. आणि हे करता-करता व्यक्तीला अनेक अद्भुत आणि अनपेक्षित असे शोध लागतात.

स्वतःमध्ये दडलेेले अनेक छोटे पदर व्यक्तीसमोर उलगडायला लागतात, सुरुवातीला न दिसलेल्या अनेक गोष्टी आता तिला दिसायला लागतात. व्यक्ती एक प्रकारचा आंतरिक मागोवा घ्यायला लागते, स्वतःमधील छोट्याछोट्या काळोख्या कोपऱ्यांचा शोध घ्यायला लागते आणि मग स्वतःशीच म्हणते, “अरेच्चा! मी अशी होते? अमुक एक गोष्ट माझ्यात आहे, ही अमुक एक गोष्ट माझ्यात दबा धरून बसली होती!” कधीकधी अत्यंत घृणास्पद, अगदी नीच, आणि ओंगळ अशा गोष्टीसुद्धा आपल्या आतमध्ये दडून बसलेल्या असतात. आणि एकदा का तिचा शोध लागला की मग अगदी अद्भुत असते ते! मग व्यक्ती त्यावर प्रकाश टाकते आणि ती गोष्ट तिच्यामधून नाहीशी होते. “मी कधीच तिथवर जाऊन पोहोचू शकणार नाही,” असे जे तुम्हाला एकेकाळी वाटले होते आणि ज्यामुळे तुम्ही कष्टी झालेला होतात, तशी स्थिती राहिलेली नसते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)