Tag Archive for: समर्पण

समर्पण ५६

प्रश्न : ‘ईश्वरा’प्रत समर्पण केल्याचा साधकाने जो निश्चय केलेला असतो त्याचा, त्याच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये काही परिणाम झाला आहे, हे दर्शविणारे लक्षण कोणते ?

श्रीमाताजी : समर्पणाच्या निश्चयातून काही विशिष्ट असे परिणाम दिसून येतात, असे श्रीअरविंद म्हणतात. पहिला परिणाम म्हणजे कोणताही प्रश्न उपस्थित न करता, अगदी सहजतेने (ईश्वराचे) आज्ञाधारक बनणे आणि दुसरा परिणाम म्हणजे, ‘ईश्वरा’च्या प्रभावाखेरीज इतर सर्व प्रभाव नाकारण्याची शक्ती असणे. हे फार मोठे परिणाम आहेत. एखाद्या व्यक्तीने जर या गोष्टी साध्य केलेल्या असतील तर, ती व्यक्ती आधीपासूनच बऱ्यापैकी प्रगत दशेत आहे, असे समजावे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 129)

समर्पण ५५

समर्पणाची प्रक्रिया म्हणजेच एक तपस्या आहे. इतकेच नव्हे तर, वास्तविक ती तपस्येची दुहेरी प्रक्रिया आहे; समर्पणाची प्रक्रिया चांगल्या रीतीने सुरू झालेली असली तरीदेखील, चढतेवाढते समर्पण दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. नंतर मग एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्तीला ‘ईश्वरी अस्तित्व’ आणि ‘ईश्वरी शक्ती’ सातत्याने आणि अधिकाधिक रीतीने जाणवू लागते; तीच सारे काही करत आहे असे अधिकाधिक जाणवू लागते – त्यामुळे अगदी अतिशय अवघड अडचणीसुद्धा ह्या जाणिवेला धक्का पोहोचवू शकत नाहीत. आणि वैयक्तिक प्रयत्नांची आता आवश्यकता उरत नाही आणि ते शक्यही होत नाहीत. प्रकृतीचे ईश्वराच्या हाती पूर्ण समर्पण झाल्याची ही खूण असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82)

समर्पण – ५४

कोणताच मार्ग हा पूर्णतः सोपा नसतो आणि समर्पणाच्या मार्गाबाबत सांगायचे तर, खरेखुरे आणि संपूर्ण समर्पण करणे हीच एक मोठी अवघड गोष्ट असते. परंतु एकदा का ते घडून आले की मग त्यामुळे गोष्टी निश्चितपणे अधिक सोप्या होतात – म्हणजे या साऱ्या गोष्टी क्षणार्धात घडून येतात असे नाही किंवा अडीअडचणी नाहीशा होतात असेही नाही; पण तेथे एक प्रकारची आश्वासकता असते, एक आधार असतो, आणि एक तणावरहितता असते की जी प्रतिकाराच्या वाईटातल्या वाईट रूपांपासून स्वातंत्र्य प्रदान करते आणि चेतनेला शांती तसेच सामर्थ्य प्रदान करते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 81-82)

समर्पण – ५३

समर्पण नसेल तर संपूर्ण अस्तित्वाचे रूपांतरण शक्य नाही.

– श्रीअरविन्द
(CWSA 29 : 79)

*

आपल्याला शारीर चेतनेचा त्याग नव्हे तर, तिचे रूपांतरण करायचे आहे. आणि म्हणूनच, येथे श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा मार्ग सुचविला आहे. तो मार्ग आहे ‘ईश्वरा’प्रत समर्पणाचा मार्ग – शारीरिक क्रिया आणि शारीरचेतना यांचा समावेश करून घेणारा, क्रमाक्रमाने परिपूर्ण होत जाणाऱ्या समर्पणाचा मार्ग त्यांनी सुचविला आहे. आणि व्यक्ती जर त्यामध्ये यशस्वी झाली तर, शरीर हे अडथळा बनण्याऐवजी ते साहाय्यक ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 300)

समर्पण – ५२

तुम्ही तुमचे जीवन ईश्वरार्पण करायचे ठरविलेले असते, तसा निर्णय तुम्ही घेतलेला असतो. परंतु तुमच्या बाबतीत अचानक, काहीतरी असुखद असे घडते, अनपेक्षित असे घडते आणि तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया ही विरोध करण्याचीच असते. परंतु तुम्ही तुमचे जीवन ईश्वरार्पण केलेले असते, तुम्ही एकदाच कायमचे म्हटलेले असते की, “आता माझे जीवन हे ईश्वराचे आहे.” आणि मग अचानक एखादा अतिशय असुखद प्रसंग घडतो (आणि तसा तो खरोखरच घडू शकतो.) आणि मग तुमच्यामधीलच असा एखादा घटक की ज्याला समर्पण नको असते, तो घटक विरोधी प्रतिक्रिया देतो. परंतु इथे, जर तुम्हाला तुमच्या अर्पणाच्याबाबतीत खरेखुरे तर्कशुद्ध राहायचे असेल तर तुम्ही तो असुखद प्रसंग पुढे आणला पाहिजे आणि तो सुद्धा ईश्वरार्पण केला पाहिजे आणि त्या ईश्वराला अतीव प्रामाणिकपणे म्हटले पाहिजे की, “तुझीच इच्छा पूर्ण होवो; जर तू त्या पद्धतीने ठरविले असशील, तर ते त्या पद्धतीनेच घडेल.” अशी स्वेच्छापूर्वक आणि उत्स्फूर्त निष्ठा पाहिजे, आणि म्हणूनच हे अतिशय अवघड आहे.

ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत घेतली होती, पण जी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडली नाही, अशा अगदी लहानातील लहान गोष्टीबाबत सुद्धा, विरोधी प्रतिक्रिया येण्याऐवजी तुम्ही अगदी आपोआपच, दुर्दम्यपणे, दोन पावले मागे जाता आणि म्हणता, “नाही, विरोध करता कामा नये.” – जर तुम्ही संपूर्ण समर्पण केले असेल, अगदी समग्र समर्पण केले असेल, तर विरोधी प्रतिक्रिया उमटत नाही. सुखद प्रसंगाबाबत जितके तुम्ही अविचल, शांत, स्थिरचित्त असता, तितकेच तुम्ही असुखद प्रसंगाबाबतदेखील अविचल, शांत, स्थिरचित्त असता. जर एखादी गोष्ट अमुक एका प्रकारे घडली तर बरे होईल, अशी तुमची कल्पना असू शकते, पण जर का ती काही वेगळ्याच पद्धतीने घडली तरी, हे योग्यच झाले, असे तुम्हाला वाटते.

उदाहरणार्थ, तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी पुष्कळ मेहनत घेतलेली असते, काहीतरी घडावे म्हणून, तुम्ही पुष्कळ वेळ दिलेला असतो, तुमची बरीच ऊर्जा, बरीचशी इच्छाशक्ती वापरलेली असते; परंतु, हे सारे ईश्वरी कार्यासाठी खर्च केलेले असते. (याला म्हणतात, अर्पण.) आता असे समजूया की, एवढे सगळे कष्ट घेतल्यानंतर, एवढे सगळे कार्य केल्यानंतर, एवढे सारे प्रयत्न केल्यानंतरही, ती गोष्ट अगदी वेगळ्याच पद्धतीने घडून आली, म्हणजे त्यात यश आले नाही. जर तुम्ही खरोखर समर्पित असाल तर अशा वेळी तुम्ही म्हणाल, “चांगले झाले, हे योग्यच आहे. मला जे करता येणे शक्य होते ते सारे मी केले, जितक्या चांगल्या पद्धतीने करता येणे शक्य होते तितके चांगले केले, आता हा माझा निर्णय नाही, हा ईश्वराचा निर्णय आहे, त्याने जे काही ठरविले आहे ते मी पूर्णतया स्वीकारत आहे.” आणि तेच जर दुसऱ्या बाजूला, जर तुम्ही प्रगाढ आणि सहजस्फूर्त असे समर्पण केलेले नसेल तर तुम्ही स्वतःशीच म्हणता, “हे असे कसे झाले? मी निःस्वार्थीपणे ही गोष्ट केली होती, त्याच्यासाठी इतके कष्ट उपसले होते, त्रास सहन केला होता, तो ईश्वरी कार्यासाठी सहन केला होता आणि आता हे असे फळ पदरी पडले, यश मिळालेच नाही.” शंभरापैकी नव्याण्णव वेळा तरी असेच घडते. म्हणूनच खरेखुरे समर्पण ही खूप अवघड गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 52-53)

समर्पण – ५१

स्वतः काही केल्याशिवाय श्रीमाताजींकडे (कशाचीही) मागणी न करणे; तर आनंद आणि शांती अवतरतात तेव्हा त्यांचा प्रभाव आणि त्यांचे मार्गदर्शन पूर्ण मनोभावे स्वीकारणे; कोणतेही प्रश्न उपस्थित न करता, दोष शोधत न बसता तो आनंद आणि ती शांती स्वीकारणे आणि त्यांची आपल्यामध्ये वृद्धी होऊ देणे; ‘शक्ती’ कार्यरत झाल्याचा अनुभव येतो तेव्हा कोणताही विरोध न करता, त्या शक्तीला कार्य करू देणे; ज्ञान प्रदान केले जाते तेव्हा ते स्वीकारणे आणि त्याचे अनुसरण करणे; ‘ईश्वरी इच्छा’ प्रकट केली जाते तेव्हा स्वतःला त्या इच्छेचे साधन बनवणे; हा समर्पणाचा गाभा आहे. ‘ईश्वर’ नेतृत्व करू शकतो, पण तो व्यक्तीला चालवत नाही. प्रत्येक मनोमय जीवाला म्हणजे ज्याला ‘मनुष्य’ असे संबोधले जाते अशा प्रत्येक व्यक्तीला एक आंतरिक स्वातंत्र्य असते; आपले नेतृत्व करण्याची अनुमती त्या ‘ईश्वरी नेतृत्वा’ला द्यायची की द्यायची नाही, हे ठरविण्याचे आंतरिक स्वातंत्र्य व्यक्तीला असते. तसे नसेल तर खरी आध्यात्मिक उत्क्रांती कशी काय शक्य होईल?

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67-68)

समर्पण – ५०

परिपूर्ण असा आत्म-समर्पणाचा दृष्टिकोन अगदी थोड्या प्रमाणात जरी प्रस्थापित करता आला तरी, योग-क्रियांची सारी आवश्यकता अपरिहार्यपणे संपुष्टात येते. कारण तेव्हा आपल्या अंतर्यामीचा ‘देव’ स्वतःच साधक आणि सिद्ध बनतो आणि त्याची दिव्य शक्ती आपल्यामध्ये कार्य करते,… अगदी सर्वाधिक शक्तिशाली राजयोगांतर्गत संयम, सर्वाधिक विकसित प्राणायाम, अत्यंत कठोर ध्यान, अतीव आनंददायी ‘भक्ती’, आत्म-त्यागाची कृती; या साऱ्या गोष्टी एरवी खूपच बलशाली आणि परिणामकारक असतात; परंतु त्या सुद्धा देव कार्याच्या तुलनेत परिणामांच्या दृष्टीने अगदीच क्षीण ठरतात. कारण या साऱ्या गोष्टींवर आपल्या क्षमतेच्या विशिष्ट मर्यादा पडतात, परंतु हे देव कार्य मात्र सामर्थ्याच्या बाबतीत अमर्याद असते कारण ती ‘देवा’ची क्षमता असते. या विश्वासाठी व विश्वातील आपल्या प्रत्येकासाठी आणि त्याव्यतिरिक्त इतरांसाठी देखील सर्वोत्तम काय आहे हे ज्या इच्छेला ज्ञात असते, अशा ईश्वरी इच्छेनेच केवळ ते कार्य परिमित (limited) होते.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 74)

समर्पण – ४९

…(आपल्या व्यक्तित्वामध्ये असे काही घटक असतात, ) त्यांना ईश्वराप्रत संपूर्ण समर्पण करण्याची इच्छा असते, त्या ईश्वराची ‘इच्छा’ आणि त्याचे ‘मार्गदर्शन’ यांच्याप्रत स्वतःचे आत्मदान करण्याची त्यांची इच्छा असते; आणि त्याच वेळी, म्हणजे जेव्हा तसा अनुभव येतो – जेव्हा व्यक्ती अगदी प्रामाणिकपणे ईश्वराप्रत आत्मदान करू पाहते तेव्हा, या मार्गावर येणारा हा समान अनुभव आहे, – व्यक्तीला असे वाटू लागते की, मी कोणीच नाही, मी काहीच करू शकत नाही, ‘ईश्वरा’व्यतिरिक्त मला स्वतंत्र अस्तित्वच नाही म्हणजे, जर ‘ईश्वर’ नसेल तर मी जिवंतच राहू शकणार नाही, काहीच करू शकणार नाही, मी म्हणजे कोणीच नसेन… हा अनुभव, अर्थातच, संपूर्ण आत्मदानाच्या मार्गावरील एक साहाय्यकारी अनुभव म्हणून येतो; परंतु जेव्हा हा असा अनुभव येतो तेव्हा, आपल्याच अस्तित्वामध्ये असलेला एखादा घटक भयंकर बंड करून उठतो आणि म्हणतो, “मला मात्र माफ करा! मला जिवंत राहायचे आहे, मला काहीतरी बनायचेच आहे, मला स्वतःला म्हणून काही गोष्टी करायच्याच आहेत, मला माझे स्वतःचे व्यक्तिमत्त्व हवे आहे.” आणि अर्थातच, या दुसऱ्या घटकाच्या अशा वृत्तीमुळे पहिल्या घटकाने केलेले समर्पण मातीमोल ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 284)

समर्पण – ४८

व्यक्ती जर संपूर्ण समर्पणाच्या स्थितीत असेल आणि तिने स्वत:चे सर्वस्व समर्पित केले असेल, जर तिने त्या ‘ईश्वरी कृपे’स स्वत:ला देऊ केले असेल आणि त्या कृपेला जे योग्य वाटते ते तिने आपल्या बाबतीत करावे, अशी त्या व्यक्तीची भावना असेल तर ते त्याहूनही अधिक चांगले! पण त्यानंतर मात्र ईश्वरी कृपेने असे का केले अन् तसे का केले, असे प्रश्न तिला विचारता कामा नयेत. व्यक्तीने असे म्हणता कामा नये की, “मला असे असे होईल असे वाटले होते, म्हणून मी तसे केले,” कारण व्यक्तीला खरोखरच काहीतरी हवे असेल आणि त्या भावनेने साद घालायची असेल तर जे काही हवे, जसे हवे ते अगदी साधेपणाने, प्रामाणिकपणाने शब्दांत मांडणे केव्हाही चांगले. त्यानंतर, ‘ईश्वरी कृपा’ ते तसे करायचे किंवा नाही ते ठरवेल; पण कोणत्याही परिस्थितीत, व्यक्तीने तिला काय अपेक्षित आहे ते स्पष्टपणे मांडणे केव्हाही चांगले; त्यात काही गैर नाही.

केलेली विनंती मान्य केली जात नाही आणि व्यक्ती बंड करते, तेव्हा मात्र गोष्टी बिघडून जातात. तेव्हा अर्थातच सारे काही बिनसते. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा व्यक्तीने समजून घेतले पाहिजे की, व्यक्तीची जी इच्छा असते, आकांक्षा असते, ती नेहमीच प्रबुद्ध असेल असे नाही. तसेच केलेली मागणी ही त्या व्यक्तीसाठी हितावहच असेल असेही नाही. अशा घडीला व्यक्तीने थोडेसे अधिक समंजस होऊन म्हटले पाहिजे, “ईश्वरा, जशी ‘तुझी’ इच्छा.” पण जोवर व्यक्तीला आतून काही आवडीनिवडी व अग्रक्रम असतात तोवर तिने ते शब्दांमध्ये मांडण्यात गैर असे काही नाही. ती अगदी स्वाभाविक अशी क्रिया आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्याने वेडेपणा केला असेल, काहीतरी चूक केली असेल आणि तशी चूक परत होऊ नये असे त्या व्यक्तीला खरोखर, मनापासून वाटत असेल, तर तशी विनवणी करण्यामध्ये काही गैर आहे, असे मला वाटत नाही. आणि खरंतर, व्यक्तीने अगदी सच्चेपणाने, आंतरिक सचोटीने तशी विनवणी केली तर तिची ती प्रार्थना मंजूर केली जाण्याची खूपच शक्यता असते. तुम्हाला विरोध करणे हे ईश्वराला आवडते, असा तुम्ही विचार करता कामा नये. त्याला तसे करण्यामध्ये कोणताही रस नसतो. तुमच्यासाठी काय हिताचे आहे हे तुमच्यापेक्षा त्याला अधिक चांगले समजते; परंतु अगदी अनिवार्य असेल तेव्हाच तो तुमच्या अभिलाषेला विरोध करतो. अन्यथा तुम्ही जे काही मागाल ते द्यायला तो नेहमीच तयार असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 254-255)

समर्पण – ४७

‘विश्वात्मक’ ईश्वराप्रत असो की ‘विश्वातीत’ ईश्वराप्रत असो, आत्मसमर्पण करण्यातील खरा अडथळा कोणता असेल तर तो म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या मर्यादांविषयी वाटणारे प्रेम हा होय. हे प्रेम स्वाभाविक असते, कारण अगदी मूळ घडणीपासूनच व्यक्तिपर अस्तित्वामध्ये मर्यादांवर लक्ष केंद्रित करण्याची प्रवृत्ती आढळून येते. अन्यथा, पृथगात्मतेची (separateness) जाणीवच असणार नाही – सारे काही एकमेकांमध्ये मिसळल्यासारखे होईल, चेतनेच्या मानसिक आणि प्राणिक गतिविधींमध्ये बरेचदा तसे घडताना दिसते. मन आणि प्राण यांच्याइतके शरीर प्रवाही नसल्यामुळे विशेषतः ते मात्र व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तित्व राखून ठेवते. पण एकदा का ही पृथगात्मता प्रस्थापित झाली की, मग ती गमावण्याची भीतीसुद्धा तेथे हळूच प्रवेश करते – वास्तविक, अनेक बाबतीत पृथगात्मतेची प्रेरणा हितकर असते, परंतु ईश्वराच्या संदर्भात मात्र ती चुकीच्या रीतीने अंमलात आणली जाते. कारण वास्तविक, ईश्वरामध्ये तुम्ही तुमचे व्यक्तित्व गमावत नसता; तर तुम्ही फक्त तुमचा अहंकार सोडून देत असता आणि खरीखुरी व्यक्ती बनत असता; एक दिव्य व्यक्तिमत्त्व बनत असता. ज्या शारीर चेतनेला सहसा तुम्ही तुमचा ‘स्व’ असे समजता, त्या शारीर चेतनेच्या घडणीप्रमाणे हे व्यक्तिमत्त्व अस्थायी नसते. दिव्य चेतनेचा एक स्पर्श जरी तुम्हाला झाला तर तुम्हाला तत्क्षणी असे जाणवेल की, त्यामध्ये तुम्ही काहीही गमावलेले नाही. उलटपक्षी, शरीराला शंभर वेळा मरण जरी आले तरी टिकून राहणारी, आणि प्राणिक व मानसिक उत्क्रांतीच्या सर्व स्थित्यंतरातून टिकून राहणारी अशी खरी व्यक्तिपर चिरस्थायिता तुम्हाला प्राप्त होते.

*

या किंवा त्या अशा कोणत्याही अडचणीला तोंड द्यावे न लागता, एखाद्या व्यक्तीला ‘ईश्वरी इच्छे’प्रत पूर्णतया समर्पण करता येणे, ही फारच दुर्मिळ गोष्ट आहे. एकदा का व्यक्तित्वाची घडण झाली की, आपले आत्मदान करण्यासाठी, समर्पणासाठी व्यक्तीला पुन्हा पुन्हा कितीतरी प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावा लागतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 169), (CWM 14 : 113)