Tag Archive for: समर्पण

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५

उत्तरार्ध

पूर्णयोगामध्ये साधकाने प्रत्येक आदर्शवादी मानसिक संस्कारांच्या अतीत जाणे अभिप्रेत असते. संकल्पना आणि आदर्श हे मनाशी संबंधित असतात आणि या गोष्टी केवळ अर्धसत्य असतात; कोणतातरी एखादा आदर्श मी मानतो यामध्येच मन बरेचदा संतुष्ट असते; आदर्शवादाच्या आनंदामध्ये ते संतुष्ट असते आणि तेव्हा जीवनामध्ये मात्र कोणताही बदल न होता ते आहे तसेच राहते किंवा बदल झालाच तर तो बदल अगदी आंशिक आणि बरेचदा वरकरणी असतो.

आध्यात्मिक साधक हा केवळ आदर्शवादामध्ये रममाण होऊन, साक्षात्काराच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांकडे पाठ फिरवीत नाही; ‘दिव्य सत्या’चा केवळ आदर्श ठेवणे नव्हे तर, ते सत्य प्रत्यक्षात उतरविणे – मग ते परलोकामध्ये असो किंवा इहलोकामध्ये असो – हे त्याचे ध्येय असते. आणि तो हे ध्येय जर इहलोकामध्ये प्रत्यक्षात उतरवू इच्छित असेल तर, मन आणि प्राण यांच्यात रूपांतरण घडविणे आवश्यक असते आणि (तुमच्यामध्ये चालू असणाऱ्या) श्रीमाताजींच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याला समर्पित झाल्याशिवाय हे रूपांतरण घडू शकत नाही.

‘निर्गुण-निराकार’ ईश्वराचा (Impersonal) शोध घेण्यासाठी धडपडणे हा अशा लोकांचा मार्ग असतो की, जे या जीवनापासून दूर जाऊ पाहतात; आणि ते सहसा ही गोष्ट त्यांच्या स्व-प्रयत्नाच्या बळावर करू पाहतात; परंतु उच्चतर ‘शक्ती’प्रत स्वतःला खुले करून अथवा समर्पणाच्या मार्गाने ते ही गोष्ट करत नाहीत; पण निर्गुण-निराकार ईश्वर हा काही कोणी साहाय्य करणारा किंवा मार्गदर्शन करणारा नसतो; तर तो प्राप्त करून घ्यायचा असतो आणि प्रत्येक मनुष्याला त्याच्या त्याच्या मार्गाने आणि त्याच्या प्रकृतीच्या क्षमतेनुसार तो प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वर मोकळीक देतो. तर दुसरीकडे, श्रीमाताजींप्रत खुले राहिले आणि समर्पण केले तर निर्गुण-निराकार ईश्वराबरोबरच ‘सत्या’च्या अन्य प्रत्येक पैलूचा देखील व्यक्ती साक्षात्कार करून घेऊ शकते.

समर्पण हे अगदी अनिवार्यपणे प्रगमनशीलच (progressive) असले पाहिजे. कोणतीही व्यक्ती अगदी प्रारंभापासूनच संपूर्ण समर्पण करू शकत नाही, त्यामुळे व्यक्ती जेव्हा स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करते तेव्हा व्यक्तीला तेथे समर्पणाचा अभावच आढळतो, परंतु हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे, समर्पणाचे तत्त्वच न स्वीकारण्याचे आणि एकेक पायरी, एकेक क्षेत्र ओलांडत स्थिरपणे, प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये क्रमाक्रमाने समर्पणचा अवलंब करत करत वाटचाल न करण्याचे कोणतेच कारण दिसत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 141)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १४

पूर्वार्ध

एकीकडे तुम्ही असे म्हणत असाल की, मी स्वतःला ‘श्रीमाताजीं’प्रति खुले ठेवले आहे आणि त्याच वेळी तुम्ही समर्पण मात्र हातचे राखून ठेवत असाल तर, तुमच्या त्या म्हणण्याला फारसा आध्यात्मिक अर्थ नाही. जे पूर्णयोगाची साधना करतात त्यांनी आत्मदान करावे किंवा समर्पण करावे असे अभिप्रेत असते. कारण, व्यक्तीच्या अशा प्रकारच्या प्रगमनशील (progressive) समर्पणाखेरीज, ध्येयाच्या जवळपास पोहोचणे देखील अशक्यप्राय असते.

स्वतःला खुले ठेवणे म्हणजे तुमच्यामध्ये कार्य करावे यासाठी श्रीमाताजींच्या ‘शक्ती’स आवाहन करणे. पण तुम्ही जर त्या शक्तीला समर्पित झाला नाहीत तर, त्याचा परिणाम असा होतो की, एकतर तुम्ही तुमच्यामध्ये त्या शक्तीला कार्य करण्यास संमती देत नाही किंवा तुम्हाला ते कार्य ज्या पद्धतीने व्हावे असे वाटते त्या पद्धतीने होणार असेल तरच, तुम्ही त्या शक्तीला कार्य करण्यास संमती देता. म्हणजेच, त्या शक्तीला तुम्ही तिच्या पद्धतीने म्हणजे दिव्य सत्याच्या पद्धतीने कार्य करू देत नाही.

अशा प्रकारच्या अटी घालणे हे सहसा कोणत्यातरी विरोधी शक्तीकडून केले जाते किंवा मनाच्या किंवा प्राणाच्या एखाद्या अहंभावात्मक घटकाकडून केले जाते. त्याला ईश्वरी ‘कृपा’ किंवा ‘शक्ती’ हवी असते पण ती त्याला स्वतःच्या हेतुसाठी वापरायची असते; त्याला ईश्वरी उद्दिष्टासाठी जीवन जगण्याची इच्छा नसते. त्याला ईश्वराकडून जे जे मिळविणे शक्य असते ते सर्व हवे असते पण तो स्वतःला मात्र ईश्वराप्रति अर्पण करू इच्छित नसतो. उलटपक्षी, सत्-अस्तित्व (true being), आत्मा हा ईश्वराभिमुख होतो आणि त्याला ईश्वराप्रति समर्पण करण्याची केवळ इच्छाच असते असे नाही तर, तो आनंदाने समर्पण करण्यासाठी तत्पर असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 140-141)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १२

योगसाधनेचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असतो ज्ञानाचा व व्यक्तीच्या स्वत:च्या प्रयत्नांचा आणि दुसरा मार्ग असतो श्रीमाताजींवर भिस्त ठेवण्याचा. या दुसऱ्या मार्गामध्ये, श्रीमाताजींच्या शक्तीने आपल्यावर कार्य करावे म्हणून, व्यक्तीने आपले मन व हृदय आणि सर्वकाही श्रीमाताजींना अर्पण करणे अभिप्रेत असते तसेच सर्व अडीअडचणींच्या वेळी त्यांना आवाहन करणे आणि त्यांच्यावर श्रद्धा व भक्ती ठेवणे अभिप्रेत असते.

चेतनेची ही अशी तयारी होण्यासाठी सुरुवातीला वेळ लागतो, बरेचदा खूप काळ लागतो आणि त्या दरम्यान पुष्कळ अडचणी येऊ शकतात. परंतु व्यक्तीने प्रयत्नसातत्य ठेवले तर एक वेळ अशी येते की, जेव्हा सर्व तयारी झालेली असते, अशा वेळी ‘श्रीमाताजींची शक्ती‌’ व्यक्तीच्या चेतनेला पूर्णत: ईश्वराभिमुख करते. अशा वेळी, जे जे काही विकसित होणे आवश्यक असते ते ते सारे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये विकसित होते, आध्यात्मिक अनुभूती येतात आणि त्यासोबतच ज्ञान येते आणि ईश्वराशी ऐक्य घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 200)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३६

साधकासमोर ‘कर्माधिपती’ (Master of the work) स्वतःला अचानक प्रकट करत नाही. त्याची ‘शक्ती’ नेहमीच पडद्याआडून कार्य करत असते, आणि आपण जेव्हा कार्य-कर्ते असल्याचा अहंकार सोडून देतो तेव्हाच तो कर्माधिपती आविष्कृत होतो. आणि हा अहंकार-त्याग जितका अधिकाधिक परिपूर्ण होत जातो तेवढ्या प्रमाणात त्या कर्माधिपतीचे प्रत्यक्ष कार्य वाढीस लागते. जेव्हा त्याच्या ‘ईश्वरी शक्ती’प्रति असलेले आपले समर्पण हे निरपवाद, निःशेष होईल तेव्हाच त्याच्या असीम उपस्थितीमध्ये जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 243)

जीवन जगण्याचे शास्त्र – २९

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ईश्वरच त्याच्या शक्तिद्वारे विद्यमान असतो; पण तो त्याच्या योगमायेने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जिवाच्या अहंकाराद्वारे कार्य करत असतो. योगामध्ये ईश्वर हाच साधक आणि तोच साधनाही असतो; त्याचीच शक्ती ही तिच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि आनंद यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करत असते आणि जेव्हा तो आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा त्या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये झिरपवल्या जातात आणि त्यामुळे साधना शक्य होते.

परंतु जोपर्यंत साधकाची कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत त्याच्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा (aspiration), नकार (rejection) आणि समर्पण (surrender) अशी त्रिविध तपस्या होय.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 06)

जीवन जगण्याचे शास्त्र – २८

तुम्ही जे कोणते कर्म कराल ते शक्य तेवढे परिपूर्णपणे करण्याचा प्रयत्न करा. मनुष्याच्या अंतर्यामी असणाऱ्या ईश्वराची ही सर्वोत्तम सेवा असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 306)

*

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे. प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ईश्वरी ‘उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म एक उत्तम संधी प्राप्त करून देते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

आत्मसाक्षात्कार – १३

(मनाच्या पृथगात्मतेविषयी (individualised) श्रीमाताजींनी काय सांगितले होते ते आपण काल पाहिले. अहंची आवश्यकता काय असते, हे त्या आता समजावून सांगत आहेत.)

मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की, ईश्वरामध्ये आपला अहंकार विलीन करण्यापूर्वी आपण काय आहोत, हे आधी व्यक्तीने थोडेतरी जाणून घेतले पाहिजे. व्यक्तीमध्ये अहंकार असतो. तुम्ही जागृत, स्वतंत्र, पृथगात्म (individual) व्यक्ती म्हणून तयार होण्यासाठी अहं आवश्यक असतो. म्हणजे पृथगात्मकतेची जाणीव आवश्यक असते, असे मला म्हणायचे आहे. म्हणजे जिथे सर्व गोष्टी एकमेकांवर येऊन आदळतात असा एखादा चव्हाटा तुम्ही असता कामा नये. तुमचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व असले पाहिजे आणि त्यासाठी अहं आवश्यक असतो.

…नंतर, व्यक्ती हे सारे काही ईश्वराला अर्पण करते. पण त्यापूर्वी अनेक वर्षं प्रयत्न करावे लागतात. म्हणजे तुम्ही केवळ, स्वतःविषयी, अगदी प्रत्येक तपशिलामध्ये शिरून सचेत होणे एवढेच पुरेसे नसते, तर तुम्ही ज्याला ‘अहं, मी’ असे संबोधता त्याचे तुमच्या चैत्य केंद्राभोवती (psychic centre), म्हणजे तुमच्या अस्तित्वाच्या दिव्य केंद्राभोवती संघटन करावे लागते, जेणेकरून, तुमचे एकच एक, एकसंध असे, सुसंगत, पूर्णपणे जागृत असे व्यक्तित्व तयार होईल.

आणि हे दिव्य केंद्र आधीपासून ईश्वराशी पूर्णतया समर्पित असल्याने, (श्रीमाताजी अर्पण केल्याप्रमाणे हातांची ओंजळ करून दाखवितात.) त्याभोवती जर प्रत्येक गोष्टीची सुव्यवस्थित बांधणी झाली असेल तर, आपोआपच ती प्रत्येक गोष्ट ईश्वराप्रत समर्पित होते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 260)

अस्वस्थतेपासून सुटका करून घेण्यासाठी श्रीमाताजींकडे प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही आणि ते उपयोगाचे देखील नाही. तुम्ही आंतरिकरित्या त्यांच्या आश्रयाला गेले पाहिजे आणि चुकीची वृत्ती टाकून दिली पाहिजे.

त्यांना प्रत्यक्ष भेटायला येण्यामुळे, तुम्ही चूक करायची आणि ती दुरूस्त करण्यासाठी श्रीमाताजींकडे यायचे अशी सवयच तुम्हाला लागण्याची शक्यता असते. आणि त्यातून आणखी एक चुकीची गोष्ट घडण्याची शक्यता असते; ती म्हणजे, अंतरंगातून, मुळातून ती चुकीची गोष्ट सोडून देण्याऐवजी आणि ती त्यांना समर्पित करण्याऐवजी, तुम्ही ती चुकीची गोष्ट त्यांच्यावर सोपवून मोकळे होण्याची शक्यता असते. येथे एका सर्वसमावेशक समर्पणाची आवश्यकता असते. असे समर्पण करता आले तर, किरकोळ गोष्टींवरून अस्वस्थता, अहंकार, स्वतःच्या दृष्टिकोनावर अतिरिक्त भर, राग या गोष्टींना आळा बसतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 499-500)

श्रीमाताजी आणि समीपता – १५

माणसं ज्याला ‘प्रेम’ असे संबोधतात तशा प्रकारची सामान्य प्राणिक भावना ‘ईश्वराभिमुख’ प्रेमामध्ये असता कामा नये; कारण सामान्य प्रेम हे प्रेम नसते, तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, उपजत प्रवृत्ती असते, आणि स्वामित्वाची व वर्चस्व गाजविण्याची ती प्रेरणा असते. हे दिव्य ‘प्रेम’ तर नसतेच, पण इतकेच नव्हे तर ‘योगा’मध्ये या तथाकथित प्रेमाचा अंशभागसुद्धा मिसळलेला असता कामा नये. ईश्वराबद्दलचे खरे प्रेम म्हणजे आत्मदान (self-giving) असते, ते निरपेक्ष असते, ते शरणागती आणि समर्पण यांनी परिपूर्ण असते; ते कोणताही हक्क सांगत नाही, ते कोणत्याही अटी लादत नाही, कोणताही व्यवहार करत नाही; मत्सर, अभिमान किंवा क्रोधाच्या हिंसेमध्येही सहभागी होत नाही कारण या गोष्टी मूलतःच सामान्य प्रेमामध्ये नसतात.

खऱ्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून, ‘दिव्य माता’ स्वतःच तुमची होऊन जाते, अगदी मुक्तपणे! अर्थात हे सारे आंतरिकरित्या घडत असते. तिची उपस्थिती तुम्हाला तुमच्या मनात, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये जाणवते; तिची शक्ती तुमचे दिव्य प्रकृतीमध्ये पुनःसृजन करत असल्याचे तुम्हाला जाणवते; ती तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या वृत्ती-प्रवृत्ती हाती घेऊन त्यांना पूर्णत्वप्राप्तीचे आणि कृतार्थतेचे वळण देत असल्याचे तुम्हाला जाणवते; तिचे प्रेम तुम्हाला कवळून घेत आहे आणि आपल्या कडेवर घेऊन ती तुम्हाला ईश्वराच्या दिशेने घेऊन चालली आहे, असे तुम्हाला जाणवू लागते. या गोष्टींचा अनुभव यावा आणि अगदी जडभौतिकापर्यंत तुमचे सर्वांग तिने व्यापून टाकावे अशी आस तुम्ही बाळगली पाहिजे. आणि येथे काळाची किंवा पूर्णतेची कोणतीच मर्यादा असत नाही. एखादी व्यक्ती जर खरोखरच तशी आस बाळगेल आणि तिला ईप्सित ते साध्य होईल तर, तेथे अन्य कोणत्याही गोष्टीसाठी किंवा एखादी इच्छा पूर्ण झाली नाही वगैरे गोष्टींना वावच उरणार नाही. व्यक्ती जर खरोखर तशी आस बाळगेल तर तिला ते निश्चितपणे प्राप्त होते, व्यक्तीचे जसजसे शुद्धीकरण होत जाईल आणि तिच्या प्रकृतीमध्ये आवश्यक असणारा बदल जसजसा होत जाईल तसतसे तिला ते अधिकाधिक प्राप्त होते.

कोणत्याही स्वार्थी हक्काच्या आणि इच्छांच्या मागण्यांपासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; तसे ते झाले तर तुम्हाला असे आढळेल की, तुम्ही जेवढे पेलू शकता, आत्मसात करू शकता तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 461)

साधना, योग आणि रूपांतरण – २३७

तुम्ही जर मानवी प्रकृतीचे रूपांतरण (transformation) गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही कुरबूर न करता, किंवा कोणताही प्रतिकार न करता, स्वत:ला श्रीमाताजींच्या व त्यांच्या शक्तींच्या हाती सोपवा आणि त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. चेतना, घडणसुलभता (plasticity) आणि नि:शेष समर्पण या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.

श्रीमाताजी आणि त्यांच्या शक्ती व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, श्रीमाताजी तुमच्यातील अंधकारामध्ये आणि तुमच्या अचेतन भागांमध्ये, अचेतन क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी चैतन्यमय संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट निराळी असते.

तुमची समग्र प्रकृतीच श्रीमाताजींच्या स्पर्शाला घडणसुलभ असली पाहिजे, म्हणजे –
१) स्वयंपर्याप्त (self-sufficient) अज्ञानी मन जसे प्रश्नह विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये.
२) ज्याप्रमाणे माणसातील प्राण स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक दिव्य प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देणारी असता कामा नये.
३) माणसाची शारीरिक चेतना जशी अडथळा निर्माण करत राहते आणि ती जशी शरीराच्या अंधकारमय गोष्टींमधील किरकोळ सुखाला चिकटून राहते तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी असता कामा नये. तसेच शरीराच्या कंटाळवाण्या दिनचर्येला, आळसाला किंवा त्याच्या जड निद्रेला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाच्या विरोधात शारीरिक चेतना जशी आकांडतांडव करते; तशी तुमची प्रकृती ही स्वत:च्या अक्षमतेला, जडतेला आणि तामसिकतेला हटवादीपणे चिकटून राहणारी असता कामा नये.

नि:शेष समर्पण आणि तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण हे तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभता घडवून आणेल. वरून प्रवाहित होणाऱ्या प्रज्ञा आणि प्रकाश, शक्ती, सुसंवाद आणि सौंदर्य, पूर्णता या साऱ्या गोष्टींप्रत तुम्ही सातत्याने खुले राहिलात तर, तुमच्यामधील सर्व घटकांमध्ये चेतना जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची चेतना ही त्यानंतर अर्धचेतन चेतनेशी एकत्व न पावता, अतिमानसिक अतिचेतन शक्तीशी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परमप्रेमाने व आनंदाने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 24-25)