Tag Archive for: सत्य

नैराश्यापासून सुटका – २८

(एका साधकाला ‘सत्या’ची हाक आलेली आहे. त्या मार्गावर वाटचाल करताना त्याची वृत्ती कशी असली पाहिजे हे श्रीअरविंद त्या साधकाला पत्राद्वारे लिहीत आहेत.)

मनामध्ये शंकाकुशंका आल्या किंवा नैराश्य आले तर असे म्हणावे की, ”ईश्वर माझा पाठीराखा आहे, मला अपयश कसे बरे येईल?” तुम्ही पुरेसे शुद्ध नाही किंवा पात्र नाही अशा सर्व सूचनांना उत्तरादाखल म्हणावे की, “मी अमृतपुत्र आहे आणि स्वत: ईश्वराने माझी निवड केली आहे. मी स्वत:शी व ईश्वराशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे आणि मी तसा प्रामाणिक राहिलो तर विजय निश्चित आहे; अगदी मी पडलो, धडपडलो तरी मी निश्चितपणे पुन्हा उभा राहीन.”

या उच्चतर ध्येयाकडे (सत्याच्या हाकेकडे) पाठ फिरवून, कोणतेतरी कनिष्ठ ध्येय पूर्ण करू पाहणाऱ्या सर्व उर्मींना उत्तर द्या की, “माझ्या अंतरंगात वसणाऱ्या आत्म्याचे ज्यामुळे समाधान होऊ शकेल असे हे सर्वात महान ध्येय आहे, एकमेव ‘सत्य’ आहे; दिव्यत्वाच्या दिशेने चाललेल्या या वाटचालीमध्ये मला कोणत्याही कसोट्यांना आणि कितीही संकटांना सामोरे जावे लागले, तरी मी धीराने त्या ध्येयापर्यंत पोहोचेनच.”

‘दिव्य प्रकाश आणि दिव्य हाक यांच्याप्रत निष्ठा‌’ याचा मला अभिप्रेत असणारा अर्थ हा असा आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 99)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०२

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनाला (subconscient) प्रकाशाने भेदले पाहिजे आणि अवचेतन हे सत्याची आधारशिला तसेच योग्य संस्कारांचे आणि ‘सत्या’ला दिलेल्या योग्य शारीरिक प्रतिसादांचे भांडार झाले पाहिजे. नेमकेपणाने सांगायचे तर, असे झाल्यास ते अवचेतन म्हणून शिल्लकच राहणार नाही, तर अवचेतन हे उपयोगात आणता येईल अशा खऱ्या मूल्यांची एक प्रकारची पेढीच (bank) तयार झालेली असेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 612)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२९)

महत्तर चेतना जर मनाच्या अतीत असेल आणि त्या चेतनेप्रत आपण पोहोचू शकलो तरच आपण त्या ‘परब्रह्मा’ला जाणू शकतो आणि त्यामध्ये प्रवेश करू शकतो. अशा प्रकारची महत्तर चेतना असते किंवा नाही यासंबंधीची कोणतीही बौद्धिक अटकळ, तार्किक विचार यांच्या आधारे आपण प्रगतिपथावर फार दूरवर जाऊन पोहोचू शकत नाही. परब्रह्माची अनुभूती मिळविण्यासाठी, तेथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, आणि त्यामध्येच जीवन जगण्यासाठी आपल्याला एका मार्गाची आवश्यकता असते. आपल्याला जर तो मार्ग सापडला तर, बौद्धिक अटकळ आणि तर्क हे अपरिहार्यपणे अगदी दुय्यम स्थानी जाऊन पडले पाहिजेत आणि (तसे झाल्यास) त्यांच्या असण्याचे प्रयोजनच शिल्लक राहणार नाही. तरीही तत्त्वज्ञान, ‘सत्या’ची बौद्धिक अभिव्यक्ती या गोष्टी शिल्लक राहू शकतील. आणि प्रामुख्याने, या महान शोधाला अभिव्यक्त करण्याचे साधन म्हणूनच त्या गोष्टी असतील आणि ती परब्रह्माची अनुभूती मानसिक परिभाषेमध्ये मांडता येत असेल, आणि शक्य असेल तेवढ्या प्रमाणात ती मांडली तर, आशय तेवढा शिल्लक राहील आणि तोही अशा लोकांसाठी शिल्लक राहील की जे अजूनही मानसिक बौद्धिक स्तरावरच जीवन जगत आहेत.

(बुद्धीच्या आधारे ‘परतत्त्वा’चे, ‘सत्या’चे आकलन करून घेण्याच्या भारतीय किंवा पाश्चात्त्य चिंतनांबद्दल विस्ताराने ऊहापोह करून झाल्यानंतर, हे प्रयत्न कसे अपुरेच ठरतात, यासंबंधी श्रीअरविंद यांनी आधी सांगितले आहे. आणि आता, ‘पूर्णयोगा’च्या परिभाषेत ‘सत्य’ कशाला म्हणायचे हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत…)

अखिल ब्रह्माचा ‘बुद्धिपूर्वक विचार’ केल्याने नव्हे तर, चेतनेच्या परिवर्तनामुळे व्यक्ती अज्ञानातून ‘ज्ञाना’कडे जाऊ शकते. हे ‘ज्ञान’ अशा प्रकारचे असते की, आपण जे जाणतो ते आपण स्वतः बनतो. बाह्यवर्ती चेतनेमधून थेट आणि सखोल आंतरिक चेतनेमध्ये प्रवेश करणे, अहंकार आणि शरीराच्या कक्षा ओलांडून चेतना विशाल करणे, आंतरिक संकल्प आणि अभीप्सेद्वारा चेतना उन्नत करणे आणि मनाच्या अतीत होईपर्यंत चेतनेचे आरोहण करत करत, तिला ‘प्रकाशा’प्रत खुली करणे, आत्मदान आणि समर्पणाच्या माध्यमातून अतिमानसिक ‘ईश्वरा’चे अवतरण घडविणे आणि परिणामतः मन, प्राण आणि शरीराचे रूपांतर घडविणे हा ‘सत्या’प्रत जाण्याचा ‘पूर्णयोगा’चा मार्ग आहे. याला इथे आम्ही ‘सत्य’ असे संबोधतो आणि आमच्या ‘योगा’मध्ये (‘पूर्णयोगा’मध्ये) तेच आमचे ध्येय असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 352 and 355)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०२)

जगातील प्रत्येक गोष्टीकडून माणसाचा नेहमीच अपेक्षाभंग होतो, हा जीवनाकडून मिळणारा धडा आहे – पण मनुष्य जर पूर्णतया ‘ईश्वरा’कडे वळला तर ‘ईश्वर’च एक असा आहे की, ज्याच्याकडून त्याचा कधीच अपेक्षाभंग होत नाही. तुमच्यामध्ये काहीतरी वाईट आहे म्हणून तुमच्यावर संकटे येऊन कोसळतात असे नाही तर, सगळ्याच माणसांना अपेक्षाभंगाचा धक्का बसत असतो कारण ज्या गोष्टी चिरस्थायी नसतात (अशाश्वत असतात) त्यांच्याविषयीच्या कामना (desires) ते बाळगून असतात. आणि मग ते त्या गोष्टी गमावून तरी बसतात किंवा अगदी जरी त्या गोष्टी त्यांना मिळाल्या तरी त्या गोष्टींपासून त्यांच्या पदरी निराशाच पडते, त्या गोष्टी त्यांचे समाधान करू शकत नाहीत.

‘ईश्वराभिमुख होणे’ हेच जीवनातील एकमेव सत्य आहे.

श्रीअरविंद (CWSA 31 : 625)

आपल्या कर्मांचा ‘अधिपती’ असणारा ईश्वर, हा आपल्या प्रकृतीचे रूपांतरण करत असतानादेखील आपल्या प्रकृतीचा आदर करत असतो; कोणत्याही स्वैर लहरीनुसार नव्हे तर, तो नेहमीच प्रकृतीच्या माध्यमातून कार्य करत असतो. आपल्या या अपूर्ण प्रकृतीमध्येच आपल्या पूर्णत्वाची सामग्री सामावलेली असते. पण ती अपरिपक्व दशेत असते, ती विरूप झालेली, अस्थानी, कशीही अव्यवस्थितपणे फेकून दिलेली किंवा अगदीच बापुडवाण्या अयोग्य अशा क्रमाने मांडलेली असते.

ही सर्व सामग्री धीराने पूर्णत्वाला नेली पाहिजे, ती शुद्ध केली पाहिजे, तिची पुनर्रचना केली पाहिजे, तिची पुनर्घडण केली पाहिजे, तिचे रूपांतरण केले पाहिजे. तिला कशाही तऱ्हेने छिन्नविछिन्न करता कामा नये वा तिचे भंजनही करता कामा नये, तिला मारून टाकता कामा नये किंवा विकृत करता कामा नये, जोरजबरदस्तीने किंवा नकाराने तिचा नाशही करता कामा नये.

हे जग आणि या जगात राहणारे आपण सर्व म्हणजे ‘त्याची’ निर्मिती आहोत, त्याचे आविष्करण आहोत. आपल्या संकुचित आणि अज्ञानी मनाला समजू शकणार नाही अशा रीतीने तो आपल्याला आणि या विश्वाला हाताळत असतो. जोपर्यंत मन शांत होऊन दिव्य ज्ञानाप्रत खुले होत नाही तोपर्यंत आपल्या मनाला ते समजू शकणार नाही. आपल्या दोषांमध्ये सत्याचे असे एक द्रव्य असते की जे, आपल्या चाचपडणाऱ्या बुद्धीला, त्याचा अर्थ उलगडवून दाखवावा म्हणून परिश्रम करत असते. मानवी बुद्धी दोष काढून टाकते पण त्याचबरोबर त्यामध्ये अंतर्भूत असणारे सत्यही काढून टाकते आणि ती आधीच्या दोषाच्या जागी तितक्याच एका अर्ध-सत्याची, अर्ध-दोषाची स्थापना करते.

परंतु जोपर्यंत आपण त्यामध्ये दडलेल्या आणि प्रत्येक मिथ्या आवरणाच्या खाली सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सत्याप्रत पोहोचण्याइतपत सक्षम होत नाही तोपर्यंत ‘दिव्य प्रज्ञा’ आपल्या चुका सहन करते. पापाचरणाकडे नव्हे तर पूर्णत्वाकडे जाणे, तसेच ज्याला आपण ‘ईश्वरी गुण’ असे संबोधू शकतो त्याप्रत जाणे हेच ज्या धडपडणाऱ्या ‘शक्ती’चे उद्दिष्ट असते; अशा ‘शक्ती’ची चुकीच्या दिशेने पडलेली पावले म्हणजे आपली पापं असतात. बरेचदा ही पापं म्हणजे जो गुण रूपांतरित केला जाणे आवश्यक असतो अशा एखाद्या गुणावरील आवरणं असतात, त्या ओंगळवाण्या आवरणांपासून तो गुण मुक्त करावा लागतो…

– श्रीअरविंद [CWSA 23 : 245-246]

प्रश्न : एखाद्याला जर कोणत्या एका गोष्टीची माहिती हवी असेल, किंवा कोणाला मार्गदर्शन हवे असेल किंवा इतर काही, तर त्याच्या त्याच्या गरजेनुसार, त्या त्या व्यक्तीने ती गोष्ट, ईश्वराकडून कशी प्राप्त करून घ्यावी?

श्रीमाताजी : ईश्वराकडे त्याची मागणी करूनसुद्धा जर तुम्ही त्याची याचनाच केली नाहीत, तर ती तुम्हाला कशी मिळेल? तुम्ही ईश्वराकडे वळलात आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवलात आणि त्याच्याकडे याचना केलीत तर, आवश्यक असलेली गोष्ट तुम्हाला निश्चितपणे मिळेल – अर्थात् तुम्हाला जी गोष्ट गरजेची आहे अशी तुमची कल्पना असेल ती नव्हे तर, खरोखरीच तुम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता असेल, ती गोष्ट तुम्हाला मिळेल. परंतु त्या गोष्टीची तुम्ही त्याच्याकडे याचना केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही मन:पूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आधी स्वत:हूनच एखादी गोष्ट मिळविण्याचे इतर मार्ग अवलंबायचे, धडपड करायची आणि नंतर मग मात्र ईश्वराकडून अपेक्षा बाळगायची की, त्याने तुम्हाला ती द्यावी, आणि तीसुद्धा तुम्ही ती त्याच्याकडे न मागता; असे करता कामा नये.

खरे म्हणजे, दुसऱ्यांकडून जेव्हा तुम्हाला काही हवे असते, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे ते मागता, आणि ईश्वराच्या बाबतीत मात्र तुम्ही त्याच्याकडे काही न मागता, त्याने ते तुम्हाला द्यावे अशी त्याच्याकडून अपेक्षा का बाळगता?

सामान्य चेतनेच्या स्तरावर मात्र ही प्रक्रिया याउलट घडते. तुम्ही काहीतरी गृहीत धरता आणि म्हणता, “मला अमुक एका गोष्टीची गरज आहे, मला ह्या नात्याची आवश्यकता आहे, मला हे प्रेम, ही ममता हवी आहे, मला हे ज्ञान हवे आहे इ.इ. आणि ईश्वराने ते मला द्यायलाच हवे, नाहीतर तो ईश्वरच नाही” म्हणजेच असे की, तुम्ही समस्या पूर्णपणे उलट करून टाकता.

सर्वात प्रथम तुम्ही म्हणता, “मला गरज आहे.” पण त्या गोष्टीची तुम्हाला खरोखरीच गरज असते का? की, तशी तुमच्या मनात काहीतरी अस्फुट कल्पना असते? की, ती केवळ एक वासना असते? की, ती खरोखरच एक अज्ञानी हालचाल असते? तुम्हाला ह्याविषयी खरंच जाण असते का? पहिला मुद्दा असा की, तुम्हाला त्याविषयी काहीच माहीत नसते.

दुसरा मुद्दा हा की, खरंतर तुम्ही तुमचीच इच्छा ईश्वरावर लादू पाहत असता आणि त्याला म्हणत असता, “मला ह्याची आवश्यकता आहे. परंतु, “मला ते दे”, अशी याचनासुद्धा तुम्ही त्याच्याजवळ करत नाही. तुम्ही म्हणता, “मला ते हवे आहे. आणि ज्याअर्थी मला अमुक एक गोष्ट हवी आहे, त्याअर्थी मला ती मिळालीच पाहिजे, अगदी स्वाभाविकपणे, सहजपणे मला ती मिळालीच पाहिजे, मला जे हवे ते देणे, हे ईश्वराचे कामच आहे.”

पण जेव्हा असे घडते तेव्हा, तुम्हाला खरंच कशाची गरज आहे, हे तुम्हाला माहीत नसते. तो केवळ तुमच्या मनाचा खेळ असतो, आणि त्यात काही तथ्य नसते आणि त्या देवघेवीमध्येही, तुम्ही ती गोष्ट तुमच्या आजूबाजूच्या जीवनाकडून मिळावी अशी अपेक्षा बाळगता आणि त्या ईश्वराकडे वळतसुद्धा नाही, त्याच्यामध्ये व तुमच्यामध्ये कोणतेही नाते निर्माण करत नाही, त्याचा क्षणभरही विचार करत नाही, किंवा तुमच्या दृष्टिकोनात थोडीफारसुद्धा मन:पूर्वकता बाळगत नाही. आणि तुम्ही त्या ईश्वराकडे काहीच मागितलेले नसते त्यामुळे, त्याने तुम्हाला देण्याचे काही कारणच उरत नाही. पण जर तुम्ही ईश्वराकडे याचना केलीत, तर तो ईश्वरच असल्यामुळे, तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे हे त्याला अधिक चांगले कळत असते आणि त्यामुळे तो ते तुम्हाला देईलच.

आणि तरीही जर तुम्ही हट्ट धराल आणि तुमची इच्छा त्याच्यावर लादू पहाल, तर तुम्हाला जागृत करण्यासाठी, तुमच्या चुकीची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी आणि खरोखरीच तुम्हाला त्या गोष्टीची काही गरज नव्हती, हे दाखवून देण्यासाठी तो तुम्हाला पाहिजे असलेली गोष्ट कदाचित देईलही. पण नंतर तुम्ही तक्रार करू लागता आणि तुम्ही म्हणू लागता की, “ईश्वराने मला त्रास होईल अशी गोष्ट का दिली?” पण तेव्हा तुम्ही हे पूर्णपणे विसरलेले असता, की ती गोष्ट तुम्हीच मागितलेली होती.

दोन्ही बाबतीत, कसेही असले, तरी तुम्ही तक्रारच करता. तुम्ही जे काही मागितले असेल, ते त्याने तुम्हाला दिले आणि त्यामुळे तुम्हाला उपयोग होण्याऐवजी अपायच झाला, तरी तुम्ही तक्रार करता आणि त्याने ते तुम्हाला दिले नाही तरी, तुम्ही तक्रारच करता. “हे काय ! मी त्याला सांगितले, की मला याची गरज आहे आणि तरी तो मला ते देत का नाही?” दोन्ही बाबतीत तुम्ही तक्रारच करता आणि बिचाऱ्या ईश्वरालाच दोषी ठरवता.

या सर्व गोष्टींपेक्षा, तुमच्या ठिकाणी जीवनाचे परम सत्य शोधून काढण्याची अभीप्सा असेल, उत्कंठा असेल, तीव्र, आर्त इच्छा असेल, ज्याला साधारणत: तुम्ही स्पष्टपणे तुमच्या जीवनाचे सारभूत सत्य समजता, वस्तुजाताचे मूळ उगमस्थान, सर्वोत्तम हितकारक अशी बाब समजता, आपल्या सर्व इच्छांवरील समाधान मानता, आपल्या सर्व समस्यांवरील उपाय मानता, त्याविषयी तीव्र निकड तुम्हाला भासत असेल, ते प्राप्त करून घेण्याची अभीप्सा तुम्ही बाळगत असाल, तर त्यानंतर तुम्ही ईश्वराला असे कधीच म्हणणार नाही, की “मला हे दे, मला ते दे.” किंवा “याची मला गरज आहे, ते मला मिळालेच पाहिजे.” तुम्ही त्याला अशी विनवणी कराल की, “माझ्यासाठी जे गरजेचे आहे ते तू कर आणि माझ्या अस्तित्वाच्या सत्याप्रत तू मला घेऊन चल; हे ईश्वरा, तुझ्या परमप्रज्ञेला जे दिसते की, अमुक एक गोष्ट माझ्यासाठी आवश्यक आहे, ती तू मला प्रदान कर.”

त्यानंतर मात्र, मग तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही, ह्याची तुम्हाला खात्री असेल. आणि ईश्वरही मग तुम्हाला अपायकारक असे काही तुम्हाला देणार नाही.

पुष्कळ धडपड केल्यानंतर, पुष्कळ चुका केल्यानंतर, बऱ्यापैकी दुःखकष्ट सहन केल्यानंतर, आणि खूप नाऊमेद झाल्यानंतर, मग सरतेशेवटी कधीतरी, एखादी व्यक्ती शहाणी, समजदार बनायला सुरुवात होते आणि स्तंभित होऊन, अकुंठित होऊन, जाणू पाहते की, ह्या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही का? म्हणजेच असे की, स्वत:च्या अज्ञानातून बाहेर पडण्याचा एखाद्याला काही तरणोपायच नसतो का? आणि तेव्हा मग, त्या क्षणी ती व्यक्ती बाहू फैलावून असे म्हणू शकते की, “ही मी इथे आहे, माझा स्वीकार कर; मला सत्याच्या मार्गाने घेऊन चल.”

मग सारे काही सुरळीत व्हायला सुरुवात होते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 121-124)