Tag Archive for: श्रीमाताजी

साधना, योग आणि रूपांतरण – २३७

तुम्ही जर मानवी प्रकृतीचे रूपांतरण (transformation) गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही कुरबूर न करता, किंवा कोणताही प्रतिकार न करता, स्वत:ला श्रीमाताजींच्या व त्यांच्या शक्तींच्या हाती सोपवा आणि त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. चेतना, घडणसुलभता (plasticity) आणि नि:शेष समर्पण या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.

श्रीमाताजी आणि त्यांच्या शक्ती व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, श्रीमाताजी तुमच्यातील अंधकारामध्ये आणि तुमच्या अचेतन भागांमध्ये, अचेतन क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी चैतन्यमय संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट निराळी असते.

तुमची समग्र प्रकृतीच श्रीमाताजींच्या स्पर्शाला घडणसुलभ असली पाहिजे, म्हणजे –
१) स्वयंपर्याप्त (self-sufficient) अज्ञानी मन जसे प्रश्नह विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये.
२) ज्याप्रमाणे माणसातील प्राण स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक दिव्य प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देणारी असता कामा नये.
३) माणसाची शारीरिक चेतना जशी अडथळा निर्माण करत राहते आणि ती जशी शरीराच्या अंधकारमय गोष्टींमधील किरकोळ सुखाला चिकटून राहते तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी असता कामा नये. तसेच शरीराच्या कंटाळवाण्या दिनचर्येला, आळसाला किंवा त्याच्या जड निद्रेला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाच्या विरोधात शारीरिक चेतना जशी आकांडतांडव करते; तशी तुमची प्रकृती ही स्वत:च्या अक्षमतेला, जडतेला आणि तामसिकतेला हटवादीपणे चिकटून राहणारी असता कामा नये.

नि:शेष समर्पण आणि तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण हे तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभता घडवून आणेल. वरून प्रवाहित होणाऱ्या प्रज्ञा आणि प्रकाश, शक्ती, सुसंवाद आणि सौंदर्य, पूर्णता या साऱ्या गोष्टींप्रत तुम्ही सातत्याने खुले राहिलात तर, तुमच्यामधील सर्व घटकांमध्ये चेतना जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची चेतना ही त्यानंतर अर्धचेतन चेतनेशी एकत्व न पावता, अतिमानसिक अतिचेतन शक्तीशी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परमप्रेमाने व आनंदाने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 24-25)

साधना, योग आणि रूपांतरण – १८४

साधक : मी योगसाधना करत आहे की नाही हे मला समजत नाहीये. मी ‘पूर्णयोगा’ची साधना करत आहे असे म्हणता येईल का?

श्रीअरविंद : जो कोणी श्रीमाताजींकडे वळला आहे तो प्रत्येक जण माझा योग करत आहे. व्यक्ती (स्व-प्रयत्नाने) पूर्णयोग ‘करू’ शकते असे समजणे ही एक मोठी चूक आहे; म्हणजे स्व-प्रयत्नाने व्यक्ती या योगाचे आचरण करून, या योगाच्या सर्व बाजूंची पूर्तता करू शकते, असे समजणे ही घोडचूक आहे. कोणीच तसे करू शकत नाही.

व्यक्तीने काय केले पाहिजे? तर तिने स्वतःला ‘श्रीमाताजीं’च्या हाती सोपवले पाहिजे आणि सेवेच्या, भक्तीच्या, अभीप्सेच्या माध्यमातून स्वतःला त्यांच्याप्रत खुले, उन्मुख केले पाहिजे. तेव्हा मग ‘श्रीमाताजी’ त्यांच्या प्रकाशाद्वारे आणि शक्तीद्वारे त्या व्यक्तीमध्ये कार्य करू लागतील, त्यामुळे मग साधना घडेल.

एक महान ‘पूर्णयोगी’ बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे किंवा अतिमानसिक जीव बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे आणि त्या उद्दिष्टाच्या दिशेने मी कुठपर्यंत आलो आहे, हे स्वतःला विचारणे हीसुद्धा एक चूक आहे. ‘श्रीमाताजीं’ना समर्पित होणे आणि तुम्ही जे व्हावे अशी त्यांची इच्छा आहे, तेच बनण्याची इच्छा बाळगणे हा खरा योग्य दृष्टिकोन आहे. उर्वरित सर्व गोष्टी श्रीमाताजींनीच ठरवायच्या असतात आणि तुमच्यामध्ये घडवून आणायच्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 151-152)

विचारशलाका – ०३

आंतरिक एकाग्रतेच्या साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो –

१) हृदयामध्ये चेतना स्थिर करणे आणि तिथे ‘दिव्य माते’चे नाम, प्रतिमा किंवा संकल्पना, यांपैकी जे तुमच्यासाठी सहजस्वाभाविक असेल त्यावर, चित्त एकाग्र करणे.

२) हृदयातील या एकाग्रतेच्या साहाय्याने मन हळूहळू आणि क्रमश: शांत शांत करत नेणे.

३) हृदयामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती असावी आणि त्यांनी मन, प्राण आणि कृती यांचे नियंत्रण करावे यासाठी आस बाळगणे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 225]

तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये स्वतःचे एकत्रीकरण अधिक दृढपणे केले पाहिजे. तुम्ही जर स्वतःला सतत विखरत (disperse) राहिलात आणि आंतरिक वर्तुळ ओलांडून पलीकडे गेलात, तर सामान्य बाह्यवर्ती प्रकृतीच्या क्षुद्रतेमध्ये आणि ती प्रकृती ज्या गोष्टींप्रति खुली आहे अशाच गोष्टींच्या प्रभावाखाली राहाल. तुम्ही सतत वावरत राहाल.

अंतरंगामध्ये राहून जीवन जगायला शिका, तसेच नेहमी अंतरंगात राहून, श्रीमाताजींशी नित्य आंतरिक संपर्क ठेवून कृती करायला शिका. सुरुवातीला ही गोष्ट नेहमी आणि समग्रपणे करणे कठीण वाटू शकेल, परंतु व्यक्ती जर नेटाने तसे करत राहिली तर तसे करता येणे शक्य असते, आणि असे करायला शिकणे ही किंमत चुकती करूनच, व्यक्तीला ‘योगा’मध्ये सिद्धी प्राप्त होऊ शकते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 227]

एकदा का एखाद्याने योगमार्गामध्ये प्रवेश केला की, मग अगदी काहीही झाले, किंवा कोणत्याही अडचणी उद्भवल्या तरी ध्येयापर्यंत जाण्याचा निश्चय दृढ ठेवायचा, एवढी एकच गोष्ट त्याने करायची असते. खरेतर, योगाची परिपूर्ती कोणीही स्वतःच्या क्षमतेद्वारे करू शकत नाही – तुमच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या महत्तर ‘शक्ती’द्वारेच ही परिपूर्ती होऊ शकते – सर्व प्रकारच्या चढउतारांमध्ये, त्या ‘शक्ती’ला नेटाने केलेल्या आवाहनामुळे ही परिपूर्ती होऊ शकते. तुम्ही अगदी सक्रियपणे ‘अभीप्सा’ बाळगू शकत नसलात तरीदेखील, साहाय्य लाभावे म्हणून श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख राहा – ही एकच गोष्ट अशी आहे की, जी नित्य केली पाहिजे.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 294]

कर्म आराधना – ३५

एखादी व्यक्ती हिमालयात निघून गेली तर, ती स्वतःला अक्रिय ध्यानासाठी (inactive meditation) सुयोग्य बनवू शकेल, पण ती जीवन जगण्यासाठी आणि ‘श्रीमाताजीं’ची सेवा करण्यासाठी काहीशी अपात्र ठरण्याची शक्यता आहे, आणि असे झाले तर, पुढच्या जन्मामध्येही तिचे ते व्यक्तित्व तसेच कायम राहील. (हिमालयात निघून जाणे इ.) हा निव्वळ पारंपरिक कल्पनांचा प्रभाव आहे, त्यांचा पूर्णयोगात काहीही उपयोग नाही. या इथल्या जीवनात, ‘श्रीमाताजीं’च्या जवळ राहून, कर्म करत असतानाच, व्यक्तीने ‘श्रीमाताजीं’चे परिपूर्ण साधन बनण्यासाठी स्वतःला सुपात्र बनविले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 246]

साधनेची मुळाक्षरे – २३

(श्रीअरविंद The Mother या ग्रंथामध्ये श्रीमाताजींचे स्वरूप उलगडवून दाखवीत आहेत, त्या ग्रंथातील हा अंशभाग…)

त्या एकमेवाद्वितीय आद्य विश्वातीत ‘शक्ती’चे – ‘श्रीमाताजीं’चे स्थान सर्व विश्वांच्या वर असते आणि त्या स्वतःमध्ये ‘परम ईश्वरा’ची शाश्वत चेतना बाळगून असतात. त्या एकट्या, परम ‘शक्ती’ आणि अनिर्वचनीय अशी ‘उपस्थिती’ स्वतःमध्ये साठवून असतात; जी ‘सत्यं’ आविष्कृत होणे आवश्यकच आहेत अशा ‘सत्यां’ना त्यांनी साद घातलेली असते; अशी सत्यं त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतलेली असतात; श्रीमाताजींच्या अनंत चेतनेच्या प्रकाशामध्ये गुप्त असणारी अशी जी सत्यं असतात, ती ‘सत्यं’ ‘परमरहस्या’मधून त्या खाली आणतात आणि श्रीमाताजी स्वत:च्या सर्वसामर्थ्यवान शक्तीमध्ये व असीम जीवनामध्ये आणि विश्वगत शरीरामध्ये, त्या सत्यांना शक्तिरूप प्रदान करतात. ‘परमेश्वर’ श्रीमाताजींमध्ये शाश्वत ‘सच्चिदानंद’ म्हणून कायमस्वरूपी आविष्कृत झालेला आहे; श्रीमाताजींद्वारे तो विश्वांमध्ये ‘ईश्वर-शक्ती’ या एका आणि दुहेरी चेतनेमध्ये आणि ‘पुरुष-प्रकृती’ या दुहेरी ‘तत्त्वां’द्वारे आविष्कृत झालेला आहे; श्रीमाताजींद्वारे त्याने ‘विश्वां’मध्ये आणि विविध ‘स्तरां’वर, ‘देवदेवता’ आणि त्यांच्या ‘शक्ती’ यांच्या माध्यमातून मूर्तरूप धारण केले आहे; आणि ज्ञात तसेच अज्ञात विश्वांमधील सर्वकाही त्यांच्याचमुळे साकार झाले आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 14-15)

साधनेची मुळाक्षरे – ११

आंतरिक एकाग्रतेच्या साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो –

१) हृदयामध्ये चेतना स्थिर करणे आणि तिथे ‘दिव्य माते’च्या संकल्पनेवर, प्रतिमेवर किंवा नामावर, यांपैकी जे तुमच्यासाठी सहजस्वाभाविक असेल त्यावर, चित्त एकाग्र करणे.

२) हृदयातील या एकाग्रतेच्या साहाय्याने मन हळूहळू आणि क्रमश: शांत शांत करत नेणे.

३) हृदयामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती असावी म्हणून आणि त्यांनी आपले मन, प्राण व कर्म यांचे नियंत्रण करावे म्हणून अभीप्सा बाळगणे.

परंतु मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती येण्यासाठी, प्रथम प्रकृतीचे शुद्धीकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 225-226)

जो कोणी श्रीमाताजींप्रत वळलेला आहे तो माझा योग आचरत आहे. केवळ स्वबळावर, पूर्णयोग करता येईल वा पूर्णयोगाची सर्व अंगे पूर्णत्वाला नेता येतील असे समजणे ही फार मोठी चूक आहे. कोणताही मनुष्य असे करू शकत नाही. मग, व्यक्तीने काय करावयास हवे? तर स्वत:ला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यावयास हवे आणि सेवा, भक्ती, अभीप्सा यांद्वारे त्यांच्याप्रत खुले व्हावयास हवे, म्हणजे मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाश व सामर्थ्यानिशी त्या व्यक्तीमध्ये कार्य करतील, जेणेकरून त्या व्यक्तीस साधना करता येईल. महान पूर्णयोगी बनण्याची, अतिमानसिक व्यक्ती बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या दिशेने स्वत:ची किती वाटचाल झाली आहे ह्याची स्वत:शीच विचारणा करणे हीदेखील एक चूकच आहे. श्रीमाताजींविषयी भक्ती बाळगणे आणि स्वत:ला त्यांच्याप्रत समर्पित करणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे तसे बनण्याची इच्छा बाळगणे हा योग्य दृष्टिकोन आहे. उरलेल्या सर्व गोष्टी ठरविणे आणि त्या तुमच्यामध्ये घडवून आणणे ह्या गोष्टी श्रीमाताजींनीच करावयाच्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151-152)

मी जेव्हा प्रथमच भारतात जपानच्या बोटीतून आले, त्या बोटीवर दोन पाद्री होते. ते दोघेही भिन्न पंथांचे होते. रविवारचा धार्मिक कार्यक्रम कोणी करावयाचा ह्यावरून त्या दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. बऱ्याच वेळाने त्यापैकी एकाने माघार घेतली, दुसऱ्याने कार्यक्रमाला सुरुवात केली. बोटीवर हा कार्यक्रम जिथे होणार होता तिथे जाण्यासाठी खाली उतरून जावयाचे होते. मला वाटते, तेव्हा आम्ही लाल समुद्रातून प्रवास करीत होतो. त्या दिवशी खूप उकाडा होता, पण सर्वांनी जाकीटे घातली होती, टाय लावले होते, चामडी बूट घातले होते, डोक्यावर टोप्या घातल्या होत्या, हातामध्ये बायबल ग्रंथ धरलेला होता. सगळे जण तयार होऊन रांगेने जणू काही मिरवणूकच निघाली असावी अशा रीतीने त्या ठिकाणी गोळा झाले. बोटीवरचे जवळपास सर्व लोक त्यामध्ये मोठ्या धार्मिकतेने सहभागी झाले. प्रार्थना संपली आणि लगेचच कोणी बारमध्ये, कोणी पत्ते खेळण्यामध्ये, कोणी काही तर कोणी काही करण्यामध्ये गुंगून गेले.

नंतर ते पाद्री माझ्यापाशी आले आणि म्हणाले, “तुम्ही प्रार्थनेला आला नाहीत?”

मी म्हटले, “माझा धर्मावर विश्वास नाही.”

ते म्हणाले,”अच्छा! म्हणजे तुम्ही जडवादी आहात तर!”

मी म्हटले,”नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला काही सांगितले तर तुम्ही नाराज व्हाल, त्यापेक्षा न बोलणेच बरे.”

त्यांनी खूप आग्रह केल्यावर मी त्यांना सांगितले,”तुम्ही आणि इतर लोकही प्रामाणिक आहेत असे मला वाटत नाही. तुम्ही केवळ एक सामाजिक कर्तव्य व सामाजिक प्रथा म्हणून प्रार्थना केलीत, त्यामध्ये ईश्वराशी संपर्क साधण्याचा कोणताही भाव नव्हता.”

ते म्हणाले, “पण ते तर आम्हाला जमत नाही.”

मी म्हणाले, “म्हणूनच तर मी तेथे आले नाही. कारण मला त्यात स्वारस्य वाटत नाही.”

– श्रीमाताजी

(CWM 08:149)