Posts

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२३)

भारतात परतल्यापासूनच, लौकिक किंवा पारलौकिक असा कोणताही भेद मी माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या ‘योगा’मध्ये कधीही केला नाही. मला वाटते, माणसांना ज्या गोष्टींमध्ये रस असतो, त्या सर्व गोष्टी बहुधा ऐहिक असतात आणि त्यातील बहुतांशी सर्वच गोष्टींचा माझ्या मानसिक क्षेत्रात प्रवेश झाला होता. उदाहरणार्थ, राजकारण. त्याचा तर माझ्या जीवनातच प्रवेश झाला होता. पण त्याच वेळी, मी मुंबईतील अपोलो बंदरावर, या भारतभूमीवर जेव्हा पहिले पाऊल ठेवले तेव्हा मला आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली; पण त्या अनुभवांची या जगापासून कधीच फारकत झालेली नव्हती तर त्यांचा या जगाशी आंतरिक आणि जवळचा संबंध होता. भौतिक क्षेत्राला ‘अनंत’ व्यापून आहे आणि भौतिक वस्तुंमध्ये, देहांमध्ये तो ‘अंतर्यामी’ वास्तव्य करतो, असे मला जाणवत असे. अगदी त्याच वेळी, पारलौकिक जगतांमध्ये आणि स्तरांमध्ये माझा प्रवेश होत आहे आणि त्यांचा प्रभाव व परिणाम या भौतिक जगतावर घडत आहे असे मला दिसत असे. त्यामुळे ज्याला मी ‘अस्तित्वाची दोन टोकं’ (जडभौतिक आणि सच्चिदानंद) असे संबोधतो ती टोकं आणि त्या दोहोंच्या दरम्यान येणारे सर्वकाही यांमध्ये मी कधीच कट्टर विरोध वा फारकत करू शकलो नाही. माझ्यासाठी सर्व काही ‘ब्रह्म’च आहे आणि मला सर्वत्र ‘ईश्वरर’च दिसतो. पण लौकिकाचा त्याग करून, फक्त पारलौकिकाची निवड करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे आणि एखाद्या व्यक्तीला त्या निवडीमुळे जर शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून असे करणे मला स्वत:ला तरी आवश्यसक वाटले नाही.

माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही जगतांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या हृदयात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो, असे मला आढळून आले. हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक ‘आध्यात्मिक’ ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनाने लौकिक, पार्थिव गोष्टींचा, गतिविधींचा मागोवा घेतल्यामुळे आणि त्यांचा आपल्या परिघात समावेश केल्यामुळे, आध्यात्मिकतेला कलंक लागेल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. वास्तव (reality) आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ‘ईश्वरा’चे स्वरूप, याविषयीचा माझा तरी हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुसरण करणे याला मी ’पूर्णयोग’ म्हणतो.

अर्थातच, एखाद्याला पूर्णत्वाची ही संकल्पना मान्य नसेल आणि तो ती नाकारू इच्छित असेल किंवा या लौकिक जीवनाचा पूर्णपणे त्याग करून, समग्रतया पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिक आवश्यकतेवर तो विश्वा स ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे पण तसे असेल तर माझा ’योग’ करणे त्याला अशक्य होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 374-375)

विचारशलाका २०

 

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

एखाद्याला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करायची असेल आणि त्याच्या या निवडीमुळे त्याला जर शांती लाभत असेल तर त्याने खुशाल तसे करावे. शांती लाभावी म्हणून, लौकिकतेचा त्याग करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या ‘योगा’मध्ये (पूर्णयोग) सुद्धा, माझ्या कार्यक्षेत्रात भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करण्यासाठी आणि केवळ वैयक्तिक मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्यासाठी मी प्रवृत्त झालो आहे, असे मला आढळून आले.

अन्य ध्येयं जशी आध्यात्मिक आहेत, तसेच हे ध्येयदेखील ‘आध्यात्मिक’ आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा पाठपुरावा करणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला कलंक लागेल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. माझा तरी वास्तवाबद्दलचा आणि विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप याविषयीचा हा अनुभव व हा दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ समग्र सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुचरण (pursuit) करणे याला मी ‘पूर्णयोग’ म्हणतो. पण अर्थातच, एखाद्याला पूर्णतेची ही संकल्पना मान्य नसेल आणि तो ती नाकारत असेल किंवा या लौकिक जीवनाचा संपूर्णतया परित्याग करून, पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिक आवश्यकतेवर तो विश्वास ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे, पण तसे असेल तर माझा ‘योग’ (पूर्णयोग) आचरणे त्याला शक्य होणार नाही.

– श्रीअरविंद [CWSA 35 : 234]

आध्यात्मिकता ४८

माणसं बाह्य गोष्टींमध्येच गुंतलेली असतात. म्हणजे असे की, त्यांची चेतना, अधिक गहन सत्य, ईश्वयरी ‘उपस्थिती’ यांच्या शोधासाठी अंतर्मुख होण्याऐवजी, बाह्य गोष्टींकडेच वळलेली असते – म्हणजे व्यक्ती जीवनात ज्या गोष्टी बघते, जाणते, करते त्या गोष्टींकडेच तिची चेतना वळलेली असते. तुम्ही जे काही करत असता त्यामध्ये व्यग्र असता, तुमच्या अवतीभोवती वावरणाऱ्या माणसांमध्ये, तुम्ही ज्या वस्तू वापरता त्या वस्तुंमध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे झोपणे, खाणे, गप्पा मारणे, थोडेसे काम, थोडीशी मौजमजा यांमध्ये व्यग्र असता आणि मग पुन्हा एकदा तीच सुरुवात होते – परत झोपणे, खाणे इ. इ. आणि पुन्हा तेच चालू राहते. आणि मग, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, त्याने काय केले पाहिजे, मी बरी आहे ना, माझी तब्येत चांगली आहे ना, इ. इ. अशा गोष्टींचा व्यक्ती सहसा विचार करत असते.

या साऱ्या गोष्टी मागे सोडून द्यायच्या आणि चेतनेसमोर व चेतनेत फक्त एकच गोष्ट येऊ द्यायची आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या मूळ हेतुचा शोध घेणे, आपण कोण आहोत, आपण का जगतो, या साऱ्याच्या मागे काय आहे याचा शोध घ्यायचा. ही पहिली पायरी असते आणि ती काही इतकी सोपी नसते. प्रत्यक्षात काय आविष्कृत झाले आहे यापेक्षा, त्यामागील कारणामध्ये आणि त्याच्या ध्येयामध्ये असणारे स्वारस्य ही पहिली पायरी असते. म्हणजे, वरकरणी आणि बाह्यवर्ती गोष्टींशी असणाऱ्या पूर्ण तादात्म्यापासून स्वतःची चेतना काढून घेऊन ती आत वळविणे आणि आपल्याला ज्याचा शोध घ्यायचा आहे, जे ‘सत्य’ आपण शोधू पाहत आहोत त्यावर एक प्रकारची आंतरिक एकाग्रता करणे, ही असते पहिली प्रक्रिया.

आणि म्हणून, व्यक्तीने प्रथम स्वत:चा आत्मा आणि त्यावर स्वामित्व असणाऱ्या ईश्वराचा केवळ शोधच घेतला पाहिजे असे नाही तर, व्यक्ती त्याच्याशी तादात्म्य पावली पाहिजे. त्यानंतर मग ती व्यक्ती पुन्हा एकदा बाह्यवर्ती गोष्टींकडे वळण्यास आणि त्यांचे रुपांतर करण्यास आरंभ करू शकते. कारण तेव्हाच त्या गोष्टींना कोणत्या दिशेला वळवायचे आणि त्यांचे रुपांतर कशात करायचे याची व्यक्तीला जाण येते. ही पायरी सोडून एकदम पुढे उडी मारता येत नाही. आपण आधी स्वतःचा आत्मा शोधला पाहिजे, आणि त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे ही अगदी अपरिहार्य गोष्ट आहे. आणि नंतर मग आपण रूपांतराकडे वळू शकतो.

श्रीअरविंदांनी एके ठिकाणी लिहिले आहे की, “जिथे इतरांच्या योगाची परिसमाप्ती होते तेथे आमच्या योगाचा (पूर्णयोगाचा) प्रारंभ होतो.” सहसा योग हा आत्म्याशी होणाऱ्या सायुज्याप्रत, ईश्वणराशी होणाऱ्या एकत्वाप्रत घेऊन जातो; खरं तर म्हणूनच त्याला ‘योग’ असे म्हणतात. आणि जेव्हा लोकं हे साध्य करतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने ते मार्गाच्या अखेरीस येऊन पोहोचलेले असतात आणि त्यावरच ते समाधानी असतात. परंतु येथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “जेव्हा इतरांच्या दृष्टीने मार्ग पूर्णत्वाला पोहोचलेला असतो तेव्हा आपला मार्ग सुरू होतो.” तुम्हाला आता ईश्वूराचा शोध लागलेला असतो पण निरुपयोगी झालेल्या देहामधून ईश्वराने तुम्हाला बाहेर काढावे म्हणून वाट पाहत ध्यानाला बसून राहण्याऐवजी, उलट, आता या चेतनेनिशी तुम्ही तुमच्या शरीराकडे, जीवनाकडे वळता आणि रूपांतरणाच्या कार्याला सुरुवात करता, की जे अत्यंत कठीण परिश्रमाचे काम असते. इथेच श्रीअरविंदांनी या कार्याची तुलना, निबिड अरण्यामधून स्वतःचा मार्ग स्वतःच शोधत जाण्याशी केली आहे. कारण अशा प्रकारचे कार्य याआधी इतर कोणीही केलेले नाही, अशावेळी, म्हणजे आजवर ज्या मार्गाने कोणीच वाटचाल केलेली नाही, तो मार्ग प्रत्येकाने स्वतःचा स्वतःच तयार करणे आवश्यक असते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 349-351]

आध्यात्मिकता ३६

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला? सत्य-चेतना खाली उतरविण्यासाठी तिला हाक देण्याची ही केवळ एक पद्धत आहे. सत्य-चेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, केवळ हीच गोष्ट महत्त्वाची आहे आणि जर का ती कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल, – जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे, – तर ते अधिक चांगले आहे. ध्यान हे केवळ एक साधन किंवा उपकरण आहे, चालता, बोलता, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 300)

*

(बडोदा येथील वास्तव्यामध्ये महाराष्ट्रातील योगी विष्णु भास्कर लेले यांनी श्री. अरविंद घोष यांना मन कसे निःस्तब्ध करावे यासंबंधी मार्गदर्शन केले होते. आणि तीन दिवसांच्या साधनेने श्री. अरविंद घोष ‘शांत-ब्रह्मा’च्या साक्षात्काराप्रत जाऊन पोहोचले होते. पुढे त्याच अवस्थेमध्ये ते लेले यांच्यासमवेत (इ. स. १९०८ मध्ये) मुंबई येथे राजकीय दौऱ्यावर गेले होते. लेले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी उपस्थित जनसमुदायाला ईश्वर समजून अभिवादन केले आणि भाषणास सुरूवात केली होती. या सर्व अनुभवमालिकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या, आपल्या साधनेबाबत श्रीअरविंद १९३८ साली सांगत आहेत…)

कलकत्त्याला जाण्यासाठी मी मुंबईहून निघालो होतो, तेव्हा मी लेले यांना विचारले की, “मी माझ्या साधनेबाबत काय केले पाहिजे?”

ते काही काळ शांत राहिले, कदाचित त्यांच्या अंतरंगातून येणाऱ्या आवाजाची ते प्रतीक्षा करत असावेत. आणि मग त्यांनी उत्तर दिले, “दिवसातील एका ठरावीक वेळी ध्यान करत जा आणि अंतःकरणातून येणारा आतला आवाज ऐकत जा.”

मला अंतःकरणातून कोणताही आवाज ऐकू आला नाही पण मस्तकाच्या वरच्या बाजूने एक काहीसा निराळा असा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर मी एका ठरावीक वेळी ध्यान करणे सोडून दिले – कारण माझे ध्यान सदासर्वकाळ चालू असे.

(Talks with Sri Aurobindo – Vol 01 by Nirodbaran : 03)

(उत्तरार्ध – भाग ०१ चा सारांश – आजवर जडभौतिक, प्राण आणि मन अशा क्रमाने उत्क्रांती झालेली आहे. अतिमानसाचे विकसन हे पुढील पाऊल असणार आहे, असे श्रीअरविंद म्हणतात…)

(उत्तरार्ध) – भाग ०२

श्रीअरविंद अशी शिकवण देतात की, अशा एका उच्चतर तत्त्वाचे अवतरण शक्य आहे की, ज्यामुळे आध्यात्मिक ‘स्व’ची मुक्ती केवळ या जगापासून दूर जाऊन नाही तर या जगात राहूनच शक्य होईल. एवढेच नव्हे तर, त्या उच्चतर तत्त्वाच्या अवतरणामुळे मनाच्या अज्ञानाची किंवा मर्यादित, अपुऱ्या ज्ञानाची जागा अशी अतिमानसिक सत्य-चेतना (truth-consciousness) घेईल, जी आंतरिक ‘स्व’चे पुरेसे माध्यम असेल आणि ज्यामुळे मानवाला अंतरंगामध्ये तसेच गतिशीलपणे स्वत:चा शोध घेता येईल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत शिल्लक असलेल्या प्राणिसदृश मानवतेचे विकसन दिव्यतर वंशामध्ये करता येईल. उच्चतर चेतनेच्या म्हणजे अजूनही सुप्त असलेल्या अतिमानस तत्त्वाच्या कार्याद्वारे आणि अवतरणाद्वारे होणाऱ्या परिवर्तनासाठी किंवा रुपांतरणासाठी अस्तित्वाची सर्व अंगे खुली करून देणे या ध्येयापर्यंत ‘योगा’ची मानसिक तपस्या उपयोगात आणता येणे शक्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

(पूर्वार्धाचा सारांश – चेतना जडामध्ये गर्भित असते. जडामध्ये सुप्त स्वरूपामध्ये असलेली ही चेतना उत्क्रांतीच्या प्रक्रियेद्वारे विमुक्त केली जाते.)

(उत्तरार्ध) – भाग ०१

प्राण ही चेतनेच्या विमुक्ततेची पहिली पायरी आहे; मन ही दुसरी पायरी आहे; पण उत्क्रांती मनापाशी संपत नाही; तर त्याहून अधिक महान अशा आध्यात्मिक (spiritual) आणि अतिमानसिक (supramental) चेतनेमध्ये विमुक्त होण्याची ती वाट पाहत राहते. ‘अतिमानसा’चे विकसन आणि सचेतन जीवामध्ये ‘आत्म्या’चे प्राबल्य हे निश्चितच उत्क्रांतीचे पुढचे पाऊल असणार आहे. तसे झाले तरच, वस्तुजातामध्ये अंतर्हित (involved) असणारे ‘दिव्यत्व’ पूर्णत: बहरून येईल आणि जीवनाला त्याचे निर्दोष आविष्करण करणे शक्य होईल.

परंतु ‘प्रकृती’कडून उत्क्रांतीची या आधीची पावले, वनस्पती आणि प्राणीजीवनाच्या जागृत इच्छाशक्तीच्या सहकार्याविनाच उचलली गेली; मनुष्यामध्ये मात्र, त्याच्या (मन, प्राण, देह) या आधारामध्ये, जागृत इच्छाशक्तीद्वारे विकसन करण्यास ‘प्रकृती’ समर्थ ठरली आहे. तथापि, मनुष्यामध्ये असलेल्या मानसिक इच्छाशक्तीद्वारेच हे संपूर्णत: घडून येईल असे संभवनीय नाही, कारण मन हे एका ठरावीक बिंदूपर्यंतच जाऊ शकते आणि त्यानंतर ते एका वर्तुळातच फिरत राहते. ज्यामुळे मन उच्चतर तत्त्वात बदलून जाईल असे वळण चेतनेला देणे आवश्यक आहे; असे एक परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. ती पद्धत प्राचीन काळातील मानसिक तपस्येच्या आणि ‘योगाभ्यासा’च्या माध्यमातून शोधून काढणे गरजेचे आहे. प्राचीन काळी, जगापासून स्वत:ला दूर राखणे आणि ‘स्व’च्या किंवा ‘आत्म्या’च्या उच्चतर चेतनेमध्ये स्वत:चा विलय करून घेणे या मार्गाने हे प्रयत्न झाले आहेत.

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

(पूर्वार्ध) जगताच्या दृश्यमानतेच्या पाठीमागे ‘अस्तित्वाची आणि चेतनेची’ एक ‘वास्तविकता’ आहे; सर्व गोष्टींमागे एकच शाश्वत आत्मा आहे, अशी शिकवण ज्या प्राचीन ऋषीमुनींची आहे, त्या ऋषीमुनींच्या प्राचीन शिकवणुकीपासून श्रीअरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो. सर्व अस्तित्वं वस्तुतः त्या ‘एका’ ‘आत्म्या’मध्ये आणि ‘चैतन्या’मध्ये एकात्म असतात पण ‘चेतने’च्या विशिष्ट विलगीकरणामुळे तसेच स्वत:च्या खऱ्याखुऱ्या ‘आत्म्या’विषयी आणि मन, प्राण, देह यांतील ‘वास्तविकते’विषयी असलेल्या अज्ञानामुळे ती अस्तित्वं विभागली गेली आहेत. एका विशिष्ट अशा मानसिक साधनेद्वारे हा विभक्त ‘चेतने’चा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या ‘आत्म्या’विषयी, स्वत:मधील व सर्वांमधील ‘दिव्यत्वा’विषयी जागृत होणे शक्य आहे.

श्रीअरविंदांची शिकवण असे सांगते की, ‘सद्वस्तु’ (One Being) आणि ‘चेतना’ (Consciousness) ही ‘जडभौतिका’मध्ये अंतर्हित (involved) आहे. उत्क्रांती (Evolution) ही अशी पद्धती आहे की, जिच्याद्वारे ही सद्वस्तु स्वत:ला मुक्त करवून घेते; जे अचेतन भासते त्यामध्येसुद्धा चेतना प्रकट होते आणि एकदा का ती प्रकट झाली की, उच्च उच्चतर वाढण्याकडे आणि त्याच वेळी जास्तीत जास्त पूर्णत्वाकडे विकसित होण्यासाठी व विस्तारण्यासाठी ती स्वत:ला प्रवृत्त करते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

प्रकृतीमध्ये पाषाणातून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे, प्राण्याकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या शारीरिक प्रकृतीच्या (physical nature) दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे प्राणीच आहे; विचार करणारा आणि बोलणारा प्राणी आहे इतकेच. मात्र त्याच्या शारीरिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित.

प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. प्राण्याच्या दृष्टीने जसा मानव, त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची चेतना मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल. मनुष्याला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक चेतनेमध्ये जगणारा मनुष्य हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, ‘सत्य-चेतना’ प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी सांगितले आहे. ही चेतना, जिला त्यांनी ‘अतिमानस’ (Supermind) असे संबोधले आहे, ती चेतना स्वत:मध्ये (पृथ्वीकरिता) प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.

– श्रीमाताजी [CWM 12 : 116]

इसवी सन १९१४. ‘बॉम्बे क्रॉनिकल’ या नियतकालिकामध्ये, पाँडिचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या श्री. अरविंद घोष यांच्या ‘आर्य’ मासिकाविषयीचे निवेदन आले होते, आणि ते निवेदन तेव्हा नवयुवक असलेल्या अंबालाल पुराणी यांच्या वाचनात आले. त्यांनी त्याची वर्गणी भरली. तत्पूर्वी बडोद्याच्या ‘दांडिया बाजार’ येथे झालेली लोकाग्रणी असलेल्या श्री. अरविंद घोष यांची व्याख्याने त्यांनी ऐकलेली होती. पुराणी तत्कालीन स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेले होते. गुजराथमध्ये कार्यरत असणाऱ्या त्यांच्या एका छोट्या गटाने भारताची स्वातंत्र्यप्राप्ती हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कार्याला सुरुवातही केलेली होती. भारताचे स्वातंत्र्य हे अंतिम साध्य नसून, भारताच्या सांस्कृतिक आत्म्याच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक असणारी ती पूर्वअट आहे, असे अंबालाल पुराणी यांचे विचार होते. त्यामुळे स्वामी श्रद्धानंद, पंडित मदन मोहन मालवीय, रविन्द्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी या सगळ्या नेत्यांच्या तुलनेत त्यांना श्री. अरविंद घोष यांचे विचार अधिक तर्कशुद्ध आणि अधिक समाधानकारक वाटले. श्री. अरविंद घोष यांच्या विचारांशी पुराणी यांना एक आत्मीय जवळीक जाणवू लागली. आणि त्यांच्याच परवानगीने इ. स. १९१६ साली ‘आर्य’मधील लिखाणाचे श्री. पुराणी यांनी गुजराथीमध्ये भाषांतर करायला सुरुवात केली. इ. स. १९०७ साली सुरत काँग्रेसच्या निमित्ताने झालेल्या भेटीत पुराणी यांच्या बंधुना श्री. अरविंद घोष यांनी क्रांतिकार्याची काही योजना सांगितली होती. ती प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वी, त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची एकदा परवानगी घ्यावी, अशी आवश्यकता अंबालाल पुराणी यांना जाणवली.

डिसेंबर १९१८ साली श्रीअरविंद यांना भेटण्यासाठी म्हणून, पुराणी ‘आर्य’ मासिकाच्या कार्यालयात जाऊन पोहोचले. श्रीअरविंदांचे वास्तव्य तेव्हा तेथेच होते. पुराणी सकाळी आठ वाजता तेथे पोहोचले आणि भेटीची वेळ ठरली होती दुपारी तीनची.

*

(श्री. अंबालाल पुराणी स्वत: या भेटीची साद्यंत हकिकत येथे सांगत आहेत…)

मी जेव्हा श्रीअरविंदांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा ते वरच्या मजल्यावर असलेल्या व्हरांड्यामध्ये बसलेले होते. त्यांच्या समोर एक छोटे टेबल होते आणि त्या पाठीमागे असलेल्या एका लाकडी खुर्चीमध्ये ते बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्याभोवती एक आध्यात्मिक आभा पसरलेली मला जाणवली. त्यांची दृष्टी अंतःकरणाचा ठाव घेणारी होती. आधी झालेल्या पत्रव्यवहाराच्या निमित्ताने ते मला ओळखत होते. बडोद्यामध्ये माझ्या भावासोबत झालेल्या त्यांच्या भेटीची आठवणही मी त्यांना करून दिली. ती भेट ते विसरले नव्हते. मी त्यांना असे सांगितले की, आता आमचा गट क्रांतिकार्यासाठी सुसज्ज झालेला आहे. (आम्हाला संघटित होण्यासाठी अकरा वर्षांचा कालावधी लागला होता.) श्रीअरविंद काही काळ स्तब्ध राहिले. नंतर त्यांनी मला माझ्या साधनेसंबधी काही प्रश्न विचारले. त्यांना मी काय करतो, ते सांगितले आणि म्हणालो की, “साधना वगैरे सगळे ठीक आहे. परंतु जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही, तोपर्यंत माझ्या चित्ताची एकाग्रता होणे कठीण आहे.”

श्रीअरविंद म्हणाले, “भारत स्वतंत्र होण्यासाठी कदाचित क्रांतिकार्याची आवश्यकता भासणार नाही, असे दिसते.”

“पण त्याशिवाय ब्रिटिश सरकार भारतातून कसे निघून जाईल?” मी त्यांना विचारले.

“तो एक वेगळाच प्रश्न आहे. पण कोणत्याही क्रांतिकारक कृतीची आवश्यकता न भासता भारत स्वतंत्र झाला तर? मग तुम्हाला तुमची योजना प्रत्यक्षात आणण्याची गरजच काय? तेव्हा तुम्ही आता आपले लक्ष योगसाधनेवर केंद्रित केलेले बरे,” ते म्हणाले.

“भारतभूमीच्या धमन्यांमध्येच साधना आहे. त्यामुळे, मला असे वाटते की, भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा, हजारो लोक योगसाधनेसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावतील. परंतु आजच्या घडीला या जगामध्ये, सत्याविषयी किंवा आध्यात्मिकतेविषयी, आमच्यासारख्या गुलामांकडून कोण ऐकून घेईल?” मी विचारले.

ते म्हणाले, “स्वातंत्र्य मिळवायचेच आहे हे भारताने अगोदरच निर्धारित केले आहे आणि त्या उद्दिष्टाप्रत कार्य करण्यासाठी आवश्यक ती नेतेमंडळी आणि कार्यकर्ते भारताला निश्चितपणे मिळतील. परंतु योगाची हाक काही प्रत्येकालाच येत नाही. तेव्हा, तुम्हाला जर ती हाक आलेली आहे, तर तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करणे बरे नाही का? आणि याउपरही तुम्हाला जर क्रांतिकारक कृतिकार्यक्रम हाती घ्यायचा असेल तर, तुम्ही तो खुशाल हाती घ्या, पण मी मात्र त्याला संमती देणार नाही.”

तेव्हा मी म्हणालो की, “पण आमच्या क्रांतिकारक चळवळीचा प्रारंभ तुम्हीच करून दिला होतात, आणि त्यामागची प्रेरणादेखील तुमचीच होती. तर मग आता त्याची अंमलबजावणी करतेवेळी मात्र त्याला संमती देण्यास तुम्ही नकार का बरे देत आहात?”

“कारण एकेकाळी मी तसे कार्य केलेले आहे आणि मला त्यातल्या अडचणींची चांगली कल्पना आहे. आदर्शवादाने भारावून जाऊन, उत्साहाच्या भरात, तरुण मुले या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येतात. परंतु या गोष्टी दीर्घकाळ टिकून राहात नाहीत. शिस्तीचे पालन करणे आणि त्यात निभाव लागणे हे अतिशय कठीण होऊन बसते. एकाच संघटनेमध्ये छोटेछोटे गट निर्माण होतात, त्यांच्यामध्ये गटबाजी सुरु होते, इतकेच काय पण माणसांमध्येसुद्धा आपापसात शत्रुत्व वाढीस लागते. नेतृत्वासाठी स्पर्धा सुरु होते. आणि अशा या संघटनांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच सरकारचे काही हस्तक बेमालूमपणे मिसळून गेलेले असतात. आणि त्यामुळे अशा चळवळी प्रभावीरीतीने कार्य करू शकत नाहीत. कधीकधी त्या इतक्या हीन पातळीवर उतरतात की त्यांच्यामध्ये पैशावरूनसुद्धा भांडणे सुरु होतात”, ते शांतपणाने म्हणाले.

“पण समजा, साधनेचे महत्त्व हे काकणभर अधिक आहे, असे मी मान्य केले आणि मी त्यावर लक्ष केंद्रित करायचे असे अगदी बुद्धिपूर्वक ठरविले तरी, आता माझी अडचण अशी आहे की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी मी काहीतरी केलेच पाहिजे, असे मला खूप तीव्रपणे वाटते आहे. या विचारांनी गेले अडीच वर्षे मला सुखाची झोपसुद्धा लागलेली नाही. तसाच जोरकस प्रयत्न केला तरच मी शांत राहू शकेन, असे मला वाटते. भारताच्या स्वातंत्र्यावरच माझे सारे लक्ष खिळलेले आहे. आणि ते मिळाल्याशिवाय मला झोप लागणेसुद्धा अवघड आहे.” असे मी सांगितले.

श्रीअरविंद दोन ते तीन मिनिटे स्तब्ध राहिले. ती दोनतीन मिनिटे मला खूप मोठी वाटली. नंतर ते म्हणाले, ” भारत स्वतंत्र होईल अशी खात्री तुम्हाला समजा कोणी दिली तर?”

“पण अशी खात्री कोण देऊ शकेल?” मला माझ्या स्वतःच्याच प्रश्नामध्ये शंकेचा आणि आव्हानाचा सूर जाणवला.

परत ते दोनतीन मिनिटांसाठी स्तब्ध राहिले. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, “समजा मी तुम्हाला तशी खात्री दिली तर?”

मी एक क्षणभर थांबलो आणि माझ्या मनाशीच विचार करून म्हटले, “तुम्ही खात्री दिलीत, तर मग मात्र मी ते मान्य करेन.”

अत्यंत गंभीरपणे ते उद्गारले, “तर मग, भारत स्वतंत्र होईल अशी खात्री मी तुम्हाला देतो.”

माझे काम झाले होते – माझा पाँडिचेरीच्या भेटीचा हेतू सफल झाला होता. माझा वैयक्तिक प्रश्न आणि आमच्या गटाची समस्या अशा रीतीने सुटली होती. त्यानंतर बडोद्यातील परिचितांविषयी काही गप्पागोष्टी झाल्या.

आता माझी निरोप घेण्याची वेळ आली. पुन्हा एकदा माझ्या मनात भारताच्या स्वातंत्र्यासंबंधीचा प्रश्न उफाळून आला. निघण्यासाठी मी जेव्हा उठलो तेव्हा तो प्रश्न मला मनात तसाच दाबून ठेवता आला नाही – कारण माझ्यासाठी तो जीवन-मरणाचा प्रश्न होता, “भारत स्वतंत्र होईल अशी खरंच तुम्हाला खात्री आहे?” मी पुन्हा एकदा त्यांना विचारले. माझ्या स्वतःच्याच या प्रश्नाचा खरा गर्भितार्थ मला तत्क्षणी तरी जाणवला नव्हता. वास्तविक, त्यांनी मला खात्री दिली होती आणि तरीसुद्धा माझ्या मनातील शंकांचे पूर्णतः निरसन झाले नव्हते, मला वचन हवे होते.

श्रीअरविंदांची चर्या अतिशय गंभीर झाली. खिडकीमधून पलीकडे दिसणाऱ्या आकाशामध्ये दूरवर त्यांची नजर खिळली. नंतर त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि समोरच्या टेबलावर अत्यंत ठाशीवपणाने आपली मूठ काहीशी आपटत ते म्हणाले, “माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवा, उद्याच्या उगवत्या सूर्याइतकेच भारताचे स्वातंत्र्य निश्चित आहे. तसा ईश्वरी आदेश अगोदरच निघालेला आहे. – आता तो प्रत्यक्षात उतरायला फार काळ लागणार नाही.”

मी त्यांच्यासमोर नतमस्तक झालो.

आगगाडीमध्ये परतीच्या प्रवासात असताना, सुमारे दोन-अडीच वर्षानंतर प्रथमच मला अगदी निवांत झोप लागली. माझ्या मनामध्ये त्या दृश्याने आयुष्यभरासाठी घर केले. ते चित्र असे – एका छोट्या टेबलापाशी आम्ही दोघे उभे आहोत, माझा कळकळीचा प्रश्न, त्यांची ती ऊर्ध्वाभिमुख खिळलेली नजर, आणि त्यांचा तो धीरगंभीर पण ठाम असा आवाज, ज्यामध्ये जगाला हादरवण्याची ताकद होती, आणि त्या टेबलावर घट्ट आवळलेली त्यांची ती मूठ, जी ईश्वरी सत्यावरील त्यांच्या आत्म-विश्वासाची निदर्शक अशी खूण होती.

संपूर्ण जगभरामध्ये कलियुग असेल, लोहयुग असेल पण भारतमातेचे हे सद्भाग्य आहे की, तिची मुले सत्यज्ञानी आहेत, आणि त्यांची त्या सत्यावर अविचल श्रद्धा आहे आणि प्रसंगी त्यासाठी प्राण पणाला लावण्याचीदेखील त्यांची तयारी असते. आणि मला वाटते, या महत्त्वपूर्ण गोष्टीमध्येच भारताचे आणि संपूर्ण विश्वाचे दिव्य सद्भाग्य सामावलेले आहे!

(Evening talks : 16-19)

*

वाचक मित्रांनो, हा प्रसंग घडला आहे इ. स. १९१८ मध्ये; म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी साधारण एकोणतीस वर्षं आधी आणि याला म्हणतात, ‘क्रांतदर्शित्व’.
स्वातंत्र्यसैनिक बनू पाहणाऱ्या अंबालाल पुराणी यांचे येथे मन-परिवर्तन झाले आणि पुढे ते आयुष्यभर श्रीअरविंद यांचे निकटवर्ती अनुयायी बनून, अंधाराशी झुंज देणाऱ्या प्रकाश-सेनेचे सैनिक बनले.

भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि श्रीअरविंद यांची १५० वी जयंती या सुवर्ण-मुहूर्तावर उद्यापासून आपण – ‘क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला भारत’ – ही मालिका सुरु करत आहोत.

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

गेले काही दिवस आपण अमर्त्यत्व, शरीराचे रूपांतरण, अतिमानस यासंबंधीचे तत्त्वज्ञान समजावून घेतले. आपण पाहिले की, अतिमानसिक देहाच्या चार वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे दीप्तिमानता (luminosity). अशा देहाचे विवेचन करताना श्रीमाताजींनी म्हटले आहे की, ”अंततः तो देह दीप्तिमान होऊन जाईल, त्याच्या प्रत्येक पेशीमधून अतिमानसिक उज्ज्वलता प्रस्फुरित होत राहील. सूक्ष्म दृष्टी खुली होण्याइतपत ज्यांचा विकास झाला आहे केवळ अशा व्यक्तींनाच नव्हे; तर अगदी सामान्य माणसालादेखील ही प्रभा जाणवेल. अगदी हरएक व्यक्तीसाठी ती गोष्ट उघड सत्य असेल, अगदी शंकेखोर माणसाची सुद्धा ज्यामुळे खात्री पटेल असा तो रूपांतरणाचा स्थायी पुरावा असेल.”

तत्त्वज्ञान स्वरूपातील हे विधान, श्रीअरविंदांनी देह ठेवला तेव्हा मूर्त झालेले आपणास आढळते. ‘रूपांतरणाचा स्थायी पुरावा’ असे त्याचे वर्णन करता येईल. आयुष्यभर ज्या कारणार्थ देह झिजवला, किंबहुना देहधारणाच ज्या कारणार्थ घडली, ज्या कारणार्थ अवतार घेतला त्या अतिमानसिक प्रकाशाचे अवतरण स्वतःच्या देहामध्ये करून, तो देह श्रीअरविंदांनी या पृथ्वी-चेतनेच्या रूपांतरणासाठी विसर्जित केला.

“दिव्य चेतना प्राप्त करून घेणे आणि दिव्यत्वामध्ये जीवन जगणे म्हणजे स्वयमेव अमर्त्यत्व आणि शरीरसुद्धा दिव्य बनविणे आणि ते ईश्वरी कार्यासाठीचे व दिव्य जीवनासाठीचे सुयोग्य साधन बनविणे, ही त्याची (अमर्त्यत्वाची) भौतिक अभिव्यक्ती असेल” – असे श्रीअरविंदांचे सांगणे आहे. हे केवळ सांगणे नाही, हे केवळ पोकळ तत्त्वज्ञान नाही तर त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीअरविंद!

शंकेखोर मनाला याची खात्री कशी पटावी? श्रीअरविंदांनी दि.०५ डिसेंबर १९५० रोजी रात्री ०१ वाजून २६ मिनिटांनी देह ठेवला आणि नंतर दि. ०९ डिसेंबर १९५० रोजी सायंकाळी ०५ वाजता म्हणजे सुमारे शंभर तासांनी त्यांना समाधीस्थ करण्यात आले. या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांच्या देहामध्ये विघटनाच्या कोणत्याही खाणाखुणा दिसत नव्हत्या, विघटनाचा लवलेशदेखील आढळून येत नव्हता.

“श्रीअरविंदांच्या देहामध्ये अतिमानसिक प्रकाशाचे संघनीकरण झालेले आहे, आणि म्हणून जोवर त्यामध्ये विघटनाची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत तोवर तो देह तसाच ठेवण्यात येईल”, अशी घोषणा श्रीमाताजींनी केली होती.

पाँडिचेरी हा भारताचा पूर्व किनारा, उष्णकटिबंधीय प्रांत, आणि अशा प्रांतांमध्ये कोणत्याही बाह्य अथवा कृत्रिम उपायांचा अवलंब न करता, एखाद्याने देह ठेवल्यानंतर त्या देहाचे विघटन न होता तो टिकून राहणे, हेच शास्त्रज्ञांसाठी आणि डॉक्टरांसाठी देखील थक्क करणारे असे आश्चर्य होते. आणि त्याची नोंद त्यावेळच्या डॉक्टरांनी, प्रशासकांनी, वृत्तपत्रांनीसुद्धा घेतली होती. ‘प्रचंड भौतिकतावादाच्या या युगात आत्माच्या वर्चस्वाचे अविनाशी साक्षीदार’ अशा शब्दात सुविख्यात ‘हिंदु’ या वृत्तपत्राने या घटनेची नोंद घेतली होती. शंकेखोर व्यक्तींना, बुद्धिवाद्यांना मिळालेला हा एक भक्कम पुरावा होता.

देहाचे विघटन तर नाहीच, उलट शांतपणे ध्यानस्थ पहुडलेल्या देहाला व्यापून असणारा निळसर, सोनेरी दीप्तिमानतेचा अनुभव तेथील उपस्थितांना येत होता, त्याची वर्णने प्रत्यक्षदर्शींनी लिहून ठेवली आहेत. श्रीअरविंदांनी देह ठेवल्यानंतर आश्रमाच्या छायाचित्रकाराने काढलेले त्यांचे छायाचित्र आजही त्याची साक्ष देत आहे. (आजच्या post सोबत ते छायाचित्र दिले आहे आणि ते बघितल्यावर कोणालाही वाटावे की, जणूकाही श्रीअरविंद झोपलेले असताना कोणीतरी त्यांचे छायाचित्र घेतले आहे की काय?)

श्रीअरविंदानी देह ठेवण्यापूर्वी एक वर्ष आधी, अतिमानस अवतरणाच्या त्यांच्या जीवितकार्याबद्दल, श्रीमाताजी आणि त्यांची चर्चा झाली होती. तेव्हा या कार्यासाठी आवश्यकता भासल्यास आपले बलिदान देण्याची तयारी श्रीमाताजींनी दर्शविली होती, परंतु श्रीअरविंदांनी त्यांना सांगितले होते, “जर तशीच आवश्यकता भासली तर ते बलिदान मी करेन, तुम्ही अतिमानस अवतरणाचे आणि रूपांतरणाचे आपले कार्य चालू ठेवा.” आणि खरोखरच श्रीअरविंदांनी पुढे देह ठेवला आणि श्रीमाताजी त्यानंतर २३ वर्षे श्रीअरविंदप्रणित अतिमानस अवतरणाचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत करत राहिल्या. श्रीमाताजींचे प्राणोत्क्रमण हा देखील श्रीअरविंदांप्रमाणेच, मानवाच्या अमर्त्यत्वाच्या वाटचालीमधील महत्त्वपूर्ण टप्पा मानावा लागेल असाच आहे.

श्रीअरविंदांनी देह ठेवला ही वैश्विक परिस्थितीपुढे पत्करलेली शरणागती नव्हती किंवा मोक्षादी स्वार्थासाठी परलोकामध्ये निघून जाणेदेखील नव्हते, तर ते एक वीरमरण होते. पृथ्वीची जडभौतिक चेतना आणि अतिमानसिक चेतना यांमधील ते युद्ध होते. आज या पृथ्वीचेतनेमध्ये शरीर, प्राण आणि मन जसे स्थायी आहेत तशी अतिमानसिक चेतना या पृथ्वीचेतनेमध्ये स्थायी करायची तर त्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचा निर्धार करून, प्राणपणाने दिलेली ती झुंज होती. पृथ्वी-चेतनेच्या उत्थानासाठी केलेला तो दिव्य त्याग होता.

या दिव्य त्यागाचे वर्णन करताना श्रीमाताजी म्हणतात, “ज्यांनी आमच्या साठी इतके काही केले, ज्यांनी कार्य केले, ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी दु:खभोग सहन केले, ज्यांनी आशा बाळगली, ज्यांनी खूप चिकाटी बाळगली; ज्यांनी सर्वासाठी संकल्प केला, सर्वासाठी प्रयत्न केले, आमच्यासाठी सारे काही तयार करून दिले, ज्यांनी आमच्यासाठी सारे काही प्राप्त करून घेतले; त्यांच्याप्रत आमची अनंत कृतज्ञता! त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत आणि अशी प्रार्थना करत आहोत की, आम्हाला त्यांचे कधीही विस्मरण होऊ नये; अगदी एक क्षणदेखील आपण हे विसरू नये की, आपण सारे त्यांचे ऋणी आहोत.” श्रीअरविंदांच्या समाधीवर कोरलेली ही वाक्यं आपल्याला त्यांच्या कार्याची सतत आठवण करून देत राहतात.

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक