Tag Archive for: शुद्धीकरण

श्रीमाताजी आणि समीपता – १५

माणसं ज्याला ‘प्रेम’ असे संबोधतात तशा प्रकारची सामान्य प्राणिक भावना ‘ईश्वराभिमुख’ प्रेमामध्ये असता कामा नये; कारण सामान्य प्रेम हे प्रेम नसते, तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, उपजत प्रवृत्ती असते, आणि स्वामित्वाची व वर्चस्व गाजविण्याची ती प्रेरणा असते. हे दिव्य ‘प्रेम’ तर नसतेच, पण इतकेच नव्हे तर ‘योगा’मध्ये या तथाकथित प्रेमाचा अंशभागसुद्धा मिसळलेला असता कामा नये. ईश्वराबद्दलचे खरे प्रेम म्हणजे आत्मदान (self-giving) असते, ते निरपेक्ष असते, ते शरणागती आणि समर्पण यांनी परिपूर्ण असते; ते कोणताही हक्क सांगत नाही, ते कोणत्याही अटी लादत नाही, कोणताही व्यवहार करत नाही; मत्सर, अभिमान किंवा क्रोधाच्या हिंसेमध्येही सहभागी होत नाही कारण या गोष्टी मूलतःच सामान्य प्रेमामध्ये नसतात.

खऱ्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून, ‘दिव्य माता’ स्वतःच तुमची होऊन जाते, अगदी मुक्तपणे! अर्थात हे सारे आंतरिकरित्या घडत असते. तिची उपस्थिती तुम्हाला तुमच्या मनात, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये जाणवते; तिची शक्ती तुमचे दिव्य प्रकृतीमध्ये पुनःसृजन करत असल्याचे तुम्हाला जाणवते; ती तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या वृत्ती-प्रवृत्ती हाती घेऊन त्यांना पूर्णत्वप्राप्तीचे आणि कृतार्थतेचे वळण देत असल्याचे तुम्हाला जाणवते; तिचे प्रेम तुम्हाला कवळून घेत आहे आणि आपल्या कडेवर घेऊन ती तुम्हाला ईश्वराच्या दिशेने घेऊन चालली आहे, असे तुम्हाला जाणवू लागते. या गोष्टींचा अनुभव यावा आणि अगदी जडभौतिकापर्यंत तुमचे सर्वांग तिने व्यापून टाकावे अशी आस तुम्ही बाळगली पाहिजे. आणि येथे काळाची किंवा पूर्णतेची कोणतीच मर्यादा असत नाही. एखादी व्यक्ती जर खरोखरच तशी आस बाळगेल आणि तिला ईप्सित ते साध्य होईल तर, तेथे अन्य कोणत्याही गोष्टीसाठी किंवा एखादी इच्छा पूर्ण झाली नाही वगैरे गोष्टींना वावच उरणार नाही. व्यक्ती जर खरोखर तशी आस बाळगेल तर तिला ते निश्चितपणे प्राप्त होते, व्यक्तीचे जसजसे शुद्धीकरण होत जाईल आणि तिच्या प्रकृतीमध्ये आवश्यक असणारा बदल जसजसा होत जाईल तसतसे तिला ते अधिकाधिक प्राप्त होते.

कोणत्याही स्वार्थी हक्काच्या आणि इच्छांच्या मागण्यांपासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; तसे ते झाले तर तुम्हाला असे आढळेल की, तुम्ही जेवढे पेलू शकता, आत्मसात करू शकता तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 461)

साधना, योग आणि रूपांतरण – २६६

प्राणाचे रूपांतरण

संपूर्ण प्राणिक प्रकृतीचे शुद्धीकरण व्हावे आणि सर्व अहंभावात्मक इच्छावासना व आवेग नाहीसे होऊन, ‘ईश्वरी संकल्पा’शी सुसंगत असतील तेवढ्याच शुद्ध, सात्त्विक वृत्तीप्रवृत्ती शिल्लक राहाव्यात यासाठी, संपूर्ण प्राणिक प्रकृती आणि तिच्या वृत्तीप्रवृत्ती ‘ईश्वरा’ला अर्पण करणे म्हणजे प्राणाचे स्वाहाकरण (vital consecration) होय.
*
साधक : ‘प्राणाचे स्वाहाकरण’ म्हणजे काय ?
श्रीअरविंद : समग्र प्राणिक प्रकृती ही कनिष्ठ प्रकृतीशी नव्हे तर, श्रीमाताजींशी संबंधित व्हावी यासाठी, समग्र प्राणिक प्रकृती श्रीमाताजींना समर्पित करणे आणि ती शुद्ध बनविणे, म्हणजे ‘प्राणाचे स्वाहाकरण’.
*
तुम्हाला ज्या मुक्तीची आस लागली आहे ती साधकासाठी खरोखरच अत्यंत आवश्यक असते. आणि याचा अर्थ, प्रकृतीच्या समग्र प्राणिक भागाच्या मुक्तीची आस असा आहे. मात्र ही गोष्ट एकाएकी किंवा इतक्या सहजतेने करता येणे शक्य नसते. तुमची तळमळ ही सातत्यपूर्ण, धीरयुक्त आणि चिकाटीची असली पाहिजे, (ती तशी असेल तरच) अंतिमतः तिचा विजय होईल. वरून उच्चतर स्थिरता आणि शांती आपल्या प्रणालीमध्ये (system) खाली अवतरावी म्हणून तिला आवाहन करणे ही मुख्य गोष्ट असते; ती अवतरित होत आहे अशी जाणीव जर तुम्हाला होत असेल तर तो मुक्तीचा आरंभ असतो.
*
खरी चेतना तुमच्या प्राणामध्ये अवतरित होत होती, परंतु तुमच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा जुनीच अडचण उफाळून आली आहे, पुन्हा एकदा प्राणिक हल्ला झालेला आहे. जेव्हा तुमचा प्राण अशांत, विचलित न होता, किंवा आक्रंदन न करता, सदोदित या हल्ल्याला सामोरा जाऊ शकेल आणि तुमच्या अंतरंगात स्थिरशांत असणारी प्रतिकार व अस्वीकार करणारी शक्ती जेव्हा दूर लोटून तिचा प्रतिबंध करेल, तेव्हा ती संपूर्ण मुक्तीची खूण असेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 113, 313), (CWSA 31 : 111, 111 )

साधना, योग आणि रूपांतरण – २५६

प्राणाचे रूपांतरण

आंतरात्मिक प्राणशक्ती म्हणजे अशी प्राणशक्ती की जी अंतरंगामधून उदित झालेली असते आणि जी चैत्य पुरुषाशी (psychic being) सुसंवादी असते. ती शुद्ध प्राणमय पुरुषाची (vital being) ऊर्जा असते, परंतु सर्वसामान्य अज्ञानी प्राणामध्ये ती इच्छावासनांच्या रूपात विकारित झालेली असते.

तुम्ही तुमचा प्राण अविचल आणि शुद्ध केला पाहिजे, आणि खरा, शुद्ध प्राण उदयास येऊ दिला पाहिजे. किंवा तुमच्यामधील चैत्य पुरुष अग्रभागी आणला पाहिजे, म्हणजे तो चैत्य पुरुष तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करेल आणि त्याचे आंतरात्मिकीकरण (psychicise) करेल आणि मग तुम्हाला शुद्ध प्राणिक ऊर्जा मिळेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 112)

साधना, योग आणि रूपांतरण – २५३

प्राणाचे रूपांतरण

प्राणशक्ती (Vitality) म्हणजे जीवन-शक्ती. जेथे कोठे जीवन असते, मग ते वनस्पतींमध्ये असू दे, प्राण्यांमध्ये असू दे किंवा माणसामध्ये असू दे, तेथे जीवन-शक्ती असते. प्राणाशिवाय जडभौतिकामध्ये जीवन असू शकत नाही, प्राणाशिवाय कोणतीही जिवंत कृती घडू शकत नाही. प्राण ही एक आवश्यक अशी शक्ती असते आणि जर प्राण हा साधनभूत म्हणून तेथे नसेल तर, शारीरिक अस्तित्वामध्ये कोणतीच गोष्ट निर्माण होऊ शकत नाही किंवा केली जाऊ शकत नाही. इतकेच काय पण साधनेसाठीसुद्धा प्राणशक्तीची आवश्यकता असते.

हा प्राण जितका उपयुक्त ठरू शकतो तेवढाच तो घातकदेखील ठरू शकतो. प्राण पुनर्जीवित न होता जर तसाच राहिलेला असेल, आणि तो जर इच्छावासना आणि अहंकाराचा गुलाम झालेला असेल तर, तो घातक ठरू शकतो. अगदी आपल्या सामान्य जीवनातसुद्धा मनाद्वारे आणि मानसिक इच्छाशक्तीद्वारे या प्राणाचे नियंत्रण करावे लागते, अन्यथा तो अव्यवस्था निर्माण करू शकतो किंवा अनर्थ घडवू शकतो. लोकं जेव्हा प्राणप्रधान मनुष्यासंबंधी बोलतात तेव्हा ती, मन किंवा आत्म्याद्वारे नियंत्रित न झालेल्या प्राणशक्तीचे वर्चस्व असलेल्या व्यक्तीविषयी बोलत असतात.

प्राण हा एक चांगले साधन बनू शकतो पण तो अगदी वाईट मालक असतो. या प्राणाला मारायची किंवा त्याला नष्ट करायची आवश्यकता नसते पण त्याला आंतरात्मिक आणि आध्यात्मिक नियमनाने शुद्ध करण्याची आणि त्याचे रूपांतर करण्याची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 106)

साधना, योग आणि रूपांतरण – २१९

चेतना ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिकरित्या आंतरिक चेतनेमध्ये राहून, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे अशा रीतीने शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे की ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरणासाठी सज्ज होऊ शकेल आणि ‘दिव्य ज्ञान’, ‘दिव्य संकल्प’ आणि ‘दिव्य प्रेम’ यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे पूर्णयोगाचे पहिले ध्येय आहे.

योगिक चेतना विकसित करणे म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, ब्रह्मांड-पुरुषाविषयी आणि ब्रह्मांड-शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ‘ईश्वरा’शी एकत्व पावणे, हे पूर्णयोगाचे दुसरे ध्येय आहे.

‘अधिमानसा’च्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेद्वारे (supramental consciousness), परात्पर ‘ईश्वरा’च्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे, हे पूर्णयोगाचे तिसरे ध्येय आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 20)

साधना, योग आणि रूपांतरण – १०९

जे कर्म कोणत्याही वैयक्तिक हेतुविना, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा यांच्या इच्छेविना केले जाते; ज्यामध्ये स्वतःच्या मानसिक प्रेरणा किंवा प्राणिक लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसतो; जे कर्म कोणताही गर्व न बाळगता किंवा असभ्य हेकेखोरपणा न करता केले जाते किंवा कोणत्याही पदासाठी वा प्रतिष्ठेसाठी दावा न करता जे कर्म केले जाते; जे कर्म केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’साठीच आणि ‘ईश्वरी आदेशा’नेच केले जाते, केवळ तेच कर्म आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धीकरण करणारे असते. जे जे कर्म अहंभावात्मक वृत्तीने केले जाते ते, या अज्ञानमय जगातील लोकांच्या दृष्टीने भले कितीही चांगले असू दे, पण योगसाधना करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने त्या कर्माचा काहीच उपयोग नसतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 232)

साधना, योग आणि रूपांतरण – १०८

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती येण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धीकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा त्यासाठीचा सर्वांत सोपा मार्ग आहे. इच्छा किंवा अहंकार विरहित कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत केलेले कर्म; ‘दिव्य माते’ला अर्पण म्हणून केलेले कर्म; दिव्य मातेचे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि सर्व कर्म तिने हाती घ्यावे म्हणून तिची प्रार्थना करून केलेले कर्म, अशा प्रकारे केलेले कर्म म्हणजे योग्य वृत्तीने केलेले कर्म होय. त्यामुळे ‘दिव्य माते’ची उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व तुम्हाला फक्त आंतरिक नीरवतेमध्येच जाणवू शकेल असे नाही तर, कर्म करत असताना देखील ते जाणवू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 226)

ज्यांना स्वतःचे शुद्धीकरण करून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पाऊस असतो. तो तुमच्यातील सारे दोष, साऱ्या त्रुटी आणि साऱ्या अशुद्धता दूर करतो. पावसामध्ये पृथ्वीचे, पृथ्वीवर जीवन जगणाऱ्या माणसांचे आणि पृथ्वीवरील वातावरणाचे शुद्धीकरण करण्याची शक्ती असते.

परंतु त्यासाठी व्यक्तीने स्वतःला खुले ठेवले पाहिजे, तिच्या मनात किंचितही भीती असता उपयोगी नाही; ताप येईल किंवा आपण आजारी पडू अशी कोणतीही भीती असता कामा नये. आपल्या वर असणाऱ्या त्या ‘विशालते’प्रत आपण स्वतःला खुले ठेवले आणि पावसाला आपले शुद्धीकरण करू दिले, तर त्याचे ठोस परिणाम दिसून येतात.

– श्रीमाताजी
(Throb of Nature : 197)