Tag Archive for: व्यावहारिक जीवन

विचारशलाका १०

साधक : आम्ही आमची चेतना विशाल कशी करावी?

श्रीमाताजी : चेतना विशाल करण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात सोपा मार्ग म्हणजे, कोणत्यातरी विशाल गोष्टीशी तादात्म्य पावणे. उदाहरणार्थ, अगदी संकुचित व मर्यादित असा एखादा विचार, एखादी इच्छा, चेतना यामध्ये तुम्ही पूर्णपणे बंदिस्त झाले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, आणि जणुकाही एखाद्या कवचात तुम्ही कोंडले गेले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, अशा वेळी जर कोणत्या तरी विशाल गोष्टीबद्दल विचार करण्यास तुम्ही सुरुवात केलीत तर तुमची चेतना तुम्ही काहीशी विशाल करू शकाल…

उदाहरणार्थ, महासागराच्या पाण्याचा अफाट विस्तार. तुम्ही जर खरोखरच अशा महासागराचा विचार करू लागलात आणि तो सर्व बाजूंनी किती दूर, दूरवर पसरला आहे असा विचार केलात तर, तुमच्या मानाने तो इतका विशाल, इतका अथांग असतो की, तुम्हाला त्याचा किनारा दिसू शकत नाही, तुमची दृष्टी त्याच्या कोणत्याच टोकापर्यंत पोहोचू शकत नाही, मागे नाही, पुढे नाही, उजवीकडे नाही, डावीकडे नाही… तो विशाल, खूप विशाल, खूप खूप विशाल आहे… असा विचार तुम्ही केलात, तर तुम्हाला असे जाणवू लागते की, आपण अशा महासागरावर तरंगत आहोत की, ज्याला कोणतीच मर्यादा नाही. अशी कल्पना करणे सोपे आहे. असे केले म्हणजे तुमची चेतना तुम्ही काहीशी विशाल करू शकाल.

काहीजण आकाशाकडे पाहायला लागतात आणि नंतर ते त्या तारकांच्या मधल्या अवकाशाची कल्पना करतात… त्या अनंत विस्तारामध्ये पृथ्वी अगदी एखाद्या ठिपक्याप्रमाणे आहे आणि तुम्ही तर या पृथ्वीवर त्याहूनही लहानशा ठिपक्याप्रमाणे, मुंगीपेक्षाही लहानशा ठिपक्याप्रमाणे आहात असे तुम्हाला वाटते. अशा आकाशाकडे पाहता पाहता तुम्हाला असे वाटू लागते की, आपण या अनंत अवकाशात, तारका, ग्रह यांच्या मधील अवकाशात तरंगत आहोत. पुढे पुढे जाण्यासाठी तुम्ही अधिकाधिक विशाल होत जाता. काही जण अशा रीतीने विशाल होण्यात यशस्वी होतात.

– श्रीमाताजी [CWM 06 : 344-345]

आध्यात्मिकता ४५

(चेतना विशाल कशी करावी, या प्रश्नावर उत्तर देताना श्रीमाताजींनी आधी काही मार्ग सांगितले आणि त्या आता येथे त्याचा बौद्धिक मार्ग सांगत आहेत…)

तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो, तुम्हाला एखादी गोष्ट वेदनादायी किंवा अगदी असुखद वाटत असते, अशा वेळी जर तुम्ही काळाच्या (time) अनंततेचा आणि अवकाशाच्या (space) असीमतेचा विचार करायला सुरुवात केलीत, आजवर जे काही घडून गेले आहे आणि येथून पुढे जे घडणार आहे, त्याचा तुम्ही विचार केलात आणि आत्ताचा क्षण हा अनंत काळामधील खरोखरच एका उच्छ्वासाइतकाच आहे असा तुम्ही विचार केलात तर, काळाच्या अनंततेमध्ये असणाऱ्या या एका एवढ्याशा क्षणामुळे अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच हास्यास्पद वाटू लागेल. …खरोखरच, काळाच्या अनंततेमध्ये एका क्षणाचे मोल ते काय? खरोखरच व्यक्तीला हे प्रत्यक्षात उतरवता आले तर….

डोळ्यांसमोर दृश्य उभे करा, ज्या इवल्याशा पृथ्वीवर आपण वावरत असतो, ते आपण म्हणजे एक किती किरकोळ व्यक्ती आहोत, आणि त्यामध्ये चेतनेचा हा एक चिमुकला क्षण, जो आत्ता तुम्हाला त्रासदायक ठरतो आहे किंवा तुम्हाला तो असुखद वाटत आहे तो डोळ्यांसमोर आणा. वास्तविक, हा क्षण तुमच्या अस्तित्वाचा देखील एक अगदी छोटासा क्षण आहे. आणि खुद्द तुम्हीसुद्धा यापूर्वी अनेक जीवयोनींमधून येथवर आलेला असता आणि यापुढेही अनेक गोष्टी घडायच्या असतात. तेव्हा ज्या गोष्टी आत्ता तुमच्यावर एवढा परिणाम करत आहेत त्या अजून दहा वर्षांनी तुम्ही कदाचित पूर्णपणे विसरून गेला असाल किंवा जरी अगदी त्या आठवल्याच तर तुम्ही स्वतःच म्हणाल की, “मी या गोष्टीला इतके महत्त्व का दिले होते बरे?”

तुम्हाला खरोखरच जाणवू लागते… आपल्या जीवनाला, स्वतःला आणि आपल्याबाबतीत जे घडते आहे त्याला इतके महत्त्व देणे, हे किती हास्यास्पद आहे हे तुम्हाला जाणवू लागते. आणि तुम्ही जर ही गोष्ट अगदी सुयोग्य रीतीने केलीत तर, अगदी तीन मिनिटांच्या अवधीमध्ये, सारे दुःख नाहीसे होईल. इतकेच काय पण एखादी अगदी तीव्र वेदनासुद्धा या पद्धतीने नाहीशी होईल. आत्ता सांगितले त्याप्रमाणे एकाग्रता करायची आणि स्वतःला अनंताच्या आणि काळाच्या पटलावर ठेवायचे. सारे काही निघून जाते. आणि व्यक्ती शुद्ध होऊन बाहेर पडते. ही गोष्ट योग्य पद्धतीने कशी करायची हे माहीत असेल तर, व्यक्ती सर्व आसक्तीपासून, आणि अगदी निरतिशय दुःखामधून, सर्व गोष्टींमधून अशा पद्धतीने बाहेर पडू शकते. ही पद्धत तुम्हाला तुमच्या क्षुद्र अहंकारामधूनसुद्धा त्वरित बाहेर काढते.

– श्रीमाताजी [CWM 06 : 345-346]

आध्यात्मिकता ४२

आपल्याच व्यक्तिमत्त्वामध्ये प्रकाशमय आणि अंधकारमय अशा दोन बाजू असतात. त्यातील अंधकारमय बाजूपासून स्वत:ची सोडवणूक कशी करून घ्यावी हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत. ‘तिमिर जावो…’ या तीन भागांच्या मालिकेद्वारे आपण तो विचार समजावून घेऊ. (तिमिर जावो… भाग ०१)

साधक : व्यक्तीला जेव्हा अशी जाणीव होते की, आपल्यामधील अमुक एक घटक आपल्याला मूर्खपणाच्या गोष्टी करायला लावतो आहे, तेव्हा, त्या व्यक्तीने ती मूर्खता करण्यापासून स्वतःला इच्छाशक्तीच्या साहाय्याने प्रयत्नपूर्वक दूर राखले, तर त्या व्यक्तीने त्याच्यातील तो घटक बाहेर फेकला आहे, असे म्हणता येईल का?

श्रीमाताजी : त्यासाठी, सर्वप्रथम, तुम्हाला त्या घटकाची जाणीव झाली पाहिजे, तुम्ही तो घटक न्याहाळला पाहिजे, त्याला अगदी तुमच्यासमोर उभे केले पाहिजे आणि तुमच्या चेतनेशी संलग्न असलेले त्याचे सारे धागेदोरे तुम्ही कापून टाकले पाहिजेत. तुम्हाला माहीत आहे का की, हे आंतरिक मनोविज्ञानाचे काम आहे.

व्यक्ती जेव्हा अगदी लक्षपूर्वक स्वतःचा अभ्यास करते तेव्हा व्यक्तीला या गोष्टी दिसायला लागतात…

उदाहरणार्थ, तुम्ही जर स्वतःचे निरीक्षण करू लागलात तर तुम्हाला असे आढळते की, एखाद्या दिवशी तुम्ही अगदी उदार असता. म्हणजे तुमच्या भावना उदार असतात, तुमच्या संवेदना उदार असतात, तुमचे विचार उदार असतात, इतकेच काय पण अगदी भौतिक वस्तुंबाबतसुद्धा तुम्ही उदार असता; म्हणजे त्या वेळी, तुम्ही इतरांचे दोष समजून घेता; त्यांचे हेतू, त्यांच्या मर्यादा, इतकेच काय पण त्यांचे अगदी वाईट वर्तनसुद्धा तुम्ही समजून घेता. तुम्हाला हे सारे दिसते पण तेव्हा तुम्ही सद्भावनापूर्ण असता, तुम्ही उदारचित्त असता. तुम्ही स्वतःशीच म्हणता, “ठीक आहे, प्रत्येक जण त्याला जेवढे सर्वोत्तम करणे शक्य आहे तेवढे करतो.” आणि असेच आणखी काहीसे सांगून स्वतःची समजूत घालता.

आणि अगदी दुसऱ्याच दिवशी किंवा कदाचित अगदी पुढच्या काही मिनिटांनी, तुम्हाला तुमच्यामध्ये एक प्रकारची शुष्कता, कठोरपणा आढळतो, काहीतरी कडवटपणा आढळतो, तो खूप निष्ठुरपणे न्यायनिवाडा करत असतो, कधीकधी तर तो कडवटपणा इतका वाढतो की, त्यामुळे अढी निर्माण होते, विद्वेष निर्माण होतो. तुम्हाला असे वाटते की, दुष्कृत्य करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. यामागे एक प्रकारची सुडाची भावना असते, ही भावना अगोदरच्या भावनेच्या अगदी पूर्णपणे विरोधी असते. एके दिवशी कोणीतरी तुम्हाला त्रास देतो आणि तुम्ही म्हणता, “काही हरकत नाही. त्याला ते माहीत नव्हते.” किंवा “नाही रे, त्याला दुसऱ्या प्रकारे वागताच येत नाही.” किंवा मग कधीकधी “नाही, त्याचा स्वभावच तसा आहे,” किंवा “नाही, त्याला काहीच समजणार नाही.” आणि अगदी दुसऱ्या दिवशी, किंबहुना अगदी एक तासभरानंतर – तुम्ही अगदी त्वेषाने म्हणता, “त्याला अद्दल घडलीच पाहिजे, त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागेल. तो चुकीचे वागला आहे याची त्याला जाणीव करून दिलीच पाहिजे.” आणि तुम्ही ती गोष्ट मनाला लावून घेता, तुम्ही ती गोष्ट मनात धरून ठेवता; तुमच्या मनामध्ये मत्सर, हेवा, संकुचितपणा अशा सगळ्या भावना भरलेल्या असतात. आधीच्या सद्भावनेच्या अगदी विरोधी अशा त्या भावना असतात. ही झाली काळोखी बाजू! (क्रमश:…)

– श्रीमाताजी [CWM 06 : 262-263]

आध्यात्मिकता ३९ (उत्तरार्ध)

तुम्ही कोणतीही गोष्ट करत असा – अभ्यास असो, खेळ असो, कोणतेही काम असो – कोणत्याही गोष्टीसाठी एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे व्यक्तीने आपली एकाग्रतेची शक्ती वाढविणे. आणि जेव्हा तुम्ही अशी एकाग्रता साध्य करता, तेव्हा मग ती एकाग्रता तुम्हाला थकवणारी नसते. साहजिकच आहे की, सुरुवाती-सुरुवातीला त्यामुळे काहीसा ताण निर्माण होतो पण तुम्हाला एकाग्रतेचा अवलंब करण्याची सवय झाली की तो ताण नाहीसा होतो आणि मग एक वेळ अशी येते की जेव्हा तुम्ही अशा रीतीने एकाग्र नसता, जेव्हा तुम्ही विखुरलेले असता, अनेकानेक गोष्टींनी तुम्हाला गिळंकृत केले तरी चालेल अशी मुभा जेव्हा तुम्ही त्यांना देता, म्हणजेच तुम्ही जे करत आहात त्याकडेच तुम्ही लक्ष एकाग्र केलेले नसते, तेव्हाच तुम्हाला थकवा येतो.

एकाग्रताशक्तीमुळे व्यक्ती कोणत्याही गोष्टी अधिक चांगल्या रीतीने आणि अधिक वेगाने करण्यामध्ये यशस्वी होते. आणि अशा प्रकारे, तुम्ही विकसनाचे एक साधन म्हणून दैनंदिन कामाचा उपयोग करू शकता…

(उत्तरार्ध समाप्त)

श्रीमाताजी [CWM 04 : 138]

आध्यात्मिकता ३८

(पूर्वार्ध)

 

साधक : आम्ही जेव्हा एखादे काम करत असतो आणि ते काम आम्ही सर्वोत्तम करू इच्छित असतो, तेव्हा ते करण्यासाठी आम्हाला अधिक वेळ आवश्यक असतो. पण सर्वसाधारणपणे आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, आपण घाईत असतो. मग घाईगडबडीत असतानादेखील सर्वोत्तमप्रकारे काम कसे करावे ?

श्रीमाताजी : हा अतिशय रोचक विषय आहे आणि एक ना एक दिवस मला तुमच्याशी या विषयाबाबतीत सविस्तर बोलायचेच होते. सहसा, माणसं जेव्हा घाईगडबडीत असतात तेव्हा, जे काम करायचे असते ते काम, ते पूर्णपणे करत नाहीत; अथवा, त्यांनी जर ते काम केलेच तर ते काम अगदी वाईट पद्धतीने करतात. खरंतर आणखीही एक मार्ग असतो, तो मार्ग म्हणजे व्यक्तीने आपली एकाग्रता अधिक तीव्र करायची. तुम्ही जर एकाग्रता वाढवलीत तर, तुम्ही निम्मा वेळ वाचविलेला असतो, तोही अगदी कमीत कमी वेळामध्ये! एक अगदी साधे उदाहरण घ्या. स्नान करून, कपडे घालून तयार व्हायला लागणारा वेळ प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असतो, नाही का? पण असे गृहीत धरूया की, वेळेचा अपव्यय न करता, किंवा अजिबात घाईगडबड न करता, व्यक्तीला या साऱ्या गोष्टी करण्यासाठी सर्वसाधारणपणे अर्धा तास लागतो. तुम्ही जर गडबडीत असाल तर दोनपैकी एक गोष्ट हमखास घडते – एकतर तुम्ही स्नान नीट करत नाही किंवा मग तुम्ही कपडे वगैरे नीट आवरत नाही.

पण अन्यही एक मार्ग असतो – व्यक्तीने आपले अवधान आणि आपली सर्व ऊर्जा एकवटली पाहिजे. आपण जे काही करत आहोत फक्त त्याच गोष्टीचा विचार करायचा, अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, घाईघाईने खूप हालचाली करायच्या नाहीत, अचूक तेवढ्याच गोष्टी अगदी अचूक रीतीने करायच्या, (हा अनुभवाचा भाग आहे.) त्यामुळे तुम्हाला पूर्वी जी गोष्ट करायला अर्धा तास लागत होता तीच गोष्ट आता तुम्ही पंधरा मिनिटांमध्ये करू शकता आणि ती सुद्धा अगदी उत्तम रीतीने, कधीकधी तर अधिक चांगल्या रीतीने तुम्ही ती करता, कोणतीही गोष्ट न विसरता, करायचे काहीही शिल्लक न ठेवता, केवळ एकाग्रतेच्या तीव्रतेमुळे तुम्ही ही गोष्ट साध्य करू शकता.

(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी [CWM 04 : 137-138]

धम्मपद : रस्त्याच्या कडेलासुद्धा एखादे सुंदर सुवासिक फूल उमललेले आढळते, त्याचप्रमाणे स्वयंप्रकाशित बुद्धांचे शिष्यदेखील, त्यांच्या बुद्धिप्रकाशाच्या योगे, अंध व अज्ञानी जनसमूहात, चारचौघांमध्ये उठून दिसतात.

श्रीमाताजी : येथे काही चांगल्या सूचना करण्यात आल्या आहेत, उदाहरणार्थ, इतर जणं काय करतात किंवा ते कोणत्या चुका करतात याच्याशी तुमचा संबंध असता कामा नये, तर स्वत:चे दोष, निष्काळजीपणा यांकडेच तुम्ही लक्ष पुरविले पाहिजे आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

दुसरी एक सुजाण सूचना अशी की, अशा कोणत्याही गोष्टी, ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये कार्यान्वित होत नाहीत, अशा गोष्टींचे वर्णन करताना आपले शब्दपांडित्य खर्च करू नये. कमी बोलावे आणि उत्तम कृती करावी. पोकळ शब्द हे सुगंध नसलेल्या फुलाप्रमाणे असतात.

तुम्ही तुमच्या स्वत:च्या दोषांनी, त्रुटींनी नाउमेद होऊ नका. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्येसुद्धा अतिशय निर्मळ फूल उमललेले आढळून येते. मथितार्थ असा की, ज्यामधून विशुद्ध अशा साक्षात्काराचा जन्मच होणार नाही इतके त्याज्य काहीच नसते.

व्यक्तीचा भूतकाळ कसा का असेना, हातून कोणत्याही चुका का घडलेल्या असेना, माणूस किती का घोर अज्ञानात जगलेला असेना, तरीही प्रत्येकाच्या अंत:करणात खोलवर एक परमोच्च असे पावित्र्य, शुद्धता दडलेली असते की ज्याचे सुंदर अशा साक्षात्कारामध्ये रूपांतर होऊ शकते. केवळ त्याचाच विचार करा, त्यावरच लक्ष केंद्रित करा, इतर सर्व अडचणी, अडथळे, संकटे यांची चिंता करू नका.

तुम्ही जे बनू इच्छिता केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करा, तुम्ही जे बनू इच्छित नाही ते संपूर्णपणे, शक्य तितके नि:शेषतया विसरण्याचा प्रयत्न करा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 215)

तुमच्या कर्मांमुळे तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्याभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता; तुम्ही केलेली कर्मे ही जर सत्कर्मे असतील; ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थीभावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार म्हणजेच सारखे दुःख, सततचा असंतोष तुमच्या वाट्यास येणार; म्हणजेच अंतिमतः निराशाच पदरी पडणार. आपले स्वत:चेच वातावरण सदोदित आपल्या सोबत असते.

…जेव्हा तुम्ही सदाचारी असता; उदार, उदात्त, नि:स्वार्थी, दयाळू असता, त्यावेळी तुम्ही तुमच्यामध्ये व तुमच्याभोवती एक विशिष्ट वातावरण निर्माण करीत असता. हे वातावरण म्हणजे एक प्रकारचा प्रकाशमय विश्राम असतो. सूर्यप्रकाशात बहरून येणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे तुम्ही खुलून येता, त्याच प्रकाशमयतेमध्ये श्वासोच्छ्वास करता. त्यामुळे जीवनात कोणतीही कटुता, विद्रोह, क्लेश, दुःखद प्रतिघात तुमच्यावर होत नाहीत. अगदी सहज स्वाभाविकपणे तुमच्या भोवतालचे वातावरण प्रकाशमय होते आणि ज्या हवेत तुम्ही श्वासोच्छ्वास करता ते वातावरण आनंदमय होऊन जाते. देहामध्ये असताना किंवा देहातून बाहेर गेल्यावरही, जागृती किंवा निद्रेमध्ये, जीवनामध्ये किंवा मरणोत्तर नवीन जन्म मिळेपर्यंतच्या जीवनातही तुम्ही त्याच वातावरणात जगता. छिन्नविछिन्न करून टाकणाऱ्या वाऱ्याप्रमाणे, गोठवून टाकणाच्या थंडीप्रमाणे, किंवा भस्मसात करून टाकणाऱ्या अग्निज्वालेप्रमाणे, दुष्कृत्ये ही मनुष्याच्या चेतनेवर प्रतिकूल परिणाम घडवून आणतात. सर्व सत्कृत्ये, शुभ कर्म ही जीवनात प्रकाश, स्वास्थ्य, आनंद आणि पुष्पविकासी सूर्यप्रकाश भरत असतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 199-200)

धम्मपद : दुष्कृत्य करणारा मनुष्य इहलोकामध्ये व परलोकामध्येही क्लेश भोगतो. तो त्याची दुष्कृत्ये आठवून विलाप करतो आणि दुःखभोग भोगतो.

श्रीमाताजी : आपण करत असलेले कृत्य वाईट, ओंगळ आहे हे दिसण्यासाठी, समजण्यासाठीसुद्धा मनुष्य एका उंचीवर पोहोचलेला असला पाहिजे. त्याला आत गाभ्यात कोठेतरी सौंदर्य, उदात्तता, उदारता या गोष्टींची पूर्वप्रचिती आलेली असावी लागते, तरच त्याला या गोष्टींच्या अभावामुळे सहन करावे लागणारे दुःख नेमके कसे असते याची कल्पना येऊ शकते.

मला वाटते, सुंदर काय, उदात्त काय हे माहीत असूनही जे लोक जाणूनबुजून, मुद्दाम वाईट वागतात, त्यांच्यासाठी जीवन हे खरोखरच वेदनामय ठरते. काय करू नये ते माहीत असतानासुद्धा, एकसारखे तीच गोष्ट करत राहायची तर त्याच्या मोबदल्यात, शांती, स्वास्थ्य याची किंमत मोजावी लागणारच. जो खोटे बोलतो तो त्याचे पितळ कधीतरी उघडे पडेल या भीतीखाली सतत वावरत असतो. जो चुकीचे वागला आहे तो सतत या चिंतेत असतो की त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा तर होणार नाही ना! जो दुसऱ्याला फसविण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याला त्याची चोरी उघडकीला येईल की काय याची कायमच धास्ती वाटत असते. वास्तविक अगदी पूर्ण स्वार्थी दृष्टीने पाहिले तरीसुद्धा सत्कृत्य करणे, न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत आणि समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.

आणि या उपर, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल, कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्माने तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्याभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता; जर तुम्ही केलेली कर्मे ही सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थीभावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार म्हणजेच सारखे दुःख, सततचा असंतोष तुमच्या वाट्यास येणार; म्हणजेच अंतिमत: निराशाच पदरी पडणार..

– श्रीमाताजी
(CWM 03 : 197-198)

(‘अतिमानस आविष्करण आणि पूर्णत्व-संपादन’ या विषयी श्रीअरविंद लिखित एका उताऱ्याचे वाचन श्रीमाताजींनी केले. त्या उताऱ्यामध्ये मन, प्राण तसेच शरीर या आधाराचे महत्त्व प्रतिपादन करण्यात आले होते. त्याच दृष्टीने ‘श्रीअरविंद आश्रमा’त व्यायाम, योग-आसने, प्राणायामादी शरीर-साधनेला महत्त्व दिलेले आढळते. या पार्श्वभूमीवर पुढील संवाद झालेला आहे.)

साधक : माताजी, प्रगतीसाठी क्रीडा-स्पर्धा आवश्यक आहेत का ?

श्रीमाताजी : नैतिक शिक्षणाच्या दृष्टीने विचार करता, खरंतर, त्या आवश्यक असतात कारण जर एखाद्याने त्या स्पर्धांमध्ये योग्य वृत्तीने सहभाग घेतला तर स्वत:च्या अहंकारावर ताबा मिळविण्याची ती एक उत्तम संधी असते. पण स्वत:च्या दुर्बलता व कनिष्ठ वृत्ती ह्यांच्यावर मात करण्याच्या भूमिकेतून त्याकडे न पाहता, जर का एखादा नुसताच खेळत राहिला तर साहजिकच आहे की, त्याला त्यांपासून कसा व काय फायदा करून घ्यायचा ते माहीत नसेल आणि त्यामुळे त्याला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. परंतु कोणत्याही हीन प्रकारच्या प्रवृत्तींशिवाय, म्हणजे द्वेषभाव वा महत्त्वाकांक्षा न बाळगता, जर एखादा योग्य वृत्तीने खेळायची इच्छा बाळगेल; एखादा जर, ज्याला ‘खिलाडू वृत्तीने खेळलेला नि:पक्षपाती खेळ’ (fair play) असे म्हटले जाते अशा अभिवृत्तीने (spirit) खेळ खेळेल, म्हणजेच सर्वोत्तम तेच करण्याचा प्रयत्न करणे आणि यशापयशाची चिंता न करणे, अशी अभिवृत्ती राखेल; समजा त्याला यश मिळाले नाही किंवा त्याला अनुकूल अशा गोष्टी घडल्या नाहीत तरी त्यामुळे अस्वस्थ न होता तो जर प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकेल, तर त्या गोष्टी उपयुक्त ठरतील. याचा परिणाम म्हणून, या अशा स्पर्धांमधून, स्व-नियंत्रण व कर्मफलापासून अलिप्तवृत्ती या गुणांनी व्यक्ती संपन्न होईल. या गोष्टी व्यक्तीचे असामान्य चारित्र्य घडविण्यामध्ये अतिशय साहाय्यकारी ठरतात.

अर्थातच, तुम्ही जर त्या स्पर्धा अगदी सामान्य पद्धतीने, सर्व प्रकारच्या सामान्य व हीन क्रियाप्रतिक्रिया राखत खेळलात, तर त्यांपासून तुम्हाला काहीच लाभ होणार नाही. पण हे तर कोणत्याही कृतीबाबत म्हणता येईल. मग ते खेळात असो किंवा बौद्धिक क्षेत्रात असो, जर कोणी कोणतीही कृती सामान्य पद्धतीने करेल, तर तसे करणे म्हणजे वेळ वाया घालावणेच आहे.

पण जर तुम्ही स्पर्धेमध्ये, वा सामूहिक क्रीडास्पर्धांमध्ये योग्य वृत्तीने खेळलात, योग्य वृत्तीने सहभागी झालात तर, ते एक चांगले शिक्षण आहे कारण ते तुम्हाला विशेष प्रयत्न करायला आणि तुमच्या स्वत:च्या अशा मर्यादा ओलांडण्यास भाग पाडते. ज्या एरवी बहुधा सुप्तच राहिल्या असत्या अशा तुमच्यातील बऱ्याच गोष्टींबाबत, हालचालींबाबत सजग करण्याकरता तुम्हाला मिळालेली ती एक नक्कीच उत्तम संधी असते. पण अर्थातच, तुम्हाला मिळालेली ही एक संधी आहे आणि प्रगतीचे साधन आहे हे तुम्ही कधीही विसरता कामा नये.

जर तुम्ही स्वत:ला नुसतेच मोकळे सोडलेत आणि सामान्य पद्धतीनेच, नुसतेच खेळत राहिलात तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालविता आहात. पण हे सर्वच बाबतीत खरे आहे; केवळ खेळाबाबत आहे असे नाही, अगदी अभ्यास आणि इतर सर्व बाबतीतसुद्धा तेच खरे आहे. एखादा काय करतो यापेक्षा तो त्या गोष्टी कशा करतो, तो कोणत्या वृत्तीने त्या गोष्टी करतो यावर सारे काही अवलंबून असते.

…कोणतीही महत्त्वाकांक्षा बाळगू नका, कोणतेही ढोंग करू नका, आव आणू नका, प्रत्येक क्षणी तुमच्यातील चरम स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. कोणतेही काम करीत असताना अशा स्थितीत राहणे, ही सर्वांगीण जीवनाच्या दृष्टीने आदर्श स्थिती आहे. आणि अशी स्थिती जर एखाद्याला साध्य झाली तर, तो पूर्णत्वाच्या मार्गावर फार पुढे निघून गेला आहे हे निश्चित…. पण अर्थातच हे सारे खरोखर प्रामाणिकपणे करायचे असेल तर, एक प्रकारची आंतरिक परिपक्वता आवश्यक आहे.

– श्रीमाताजी [CWM 09 : 97-98]

बालक अगदी लहान असल्यापासूनच जोपासायला हवा असा एक गुण आहे, तो म्हणजे अस्वस्थ करणारी भावना (uneasiness). जेव्हा हातून एखादी चुकीची गोष्ट घडते तेव्हा स्वाभाविकपणे मनात निर्माण होणारी नैतिक असमतोलाची अस्वस्थ करणारी भावना! “अमुक अमुक गोष्टी करायच्या नाहीत” असे सांगितले असते म्हणून नव्हे किंवा शिक्षेला घाबरूनही नव्हे, तर ती अस्वस्थता स्वाभाविकपणे मनात उत्पन्न होते.

उदाहरणार्थ, एखादे बालक खोड्या करून जेव्हा त्याच्या वर्गमित्राला इजा करते तेव्हा, जर ते सहज, स्वाभाविक अशा अवस्थेत असेल तर त्याला अस्वस्थ वाटते. त्याला त्याच्या अस्तित्वाच्या खोल आत कुठेतरी दुःख जाणवते, कारण त्याने जे काही केलेले असते ते त्याच्या आंतरिक सत्याच्या विरूद्ध असते.

…अंतरंगात खोलवर असे काहीतरी असते की, ज्याला पूर्णत्वाची, महानतेची, सत्याची संवेदना असते आणि या सत्याला विरोध करणाऱ्या सर्व प्रकारच्या गतिविधींबाबत एक दु:खदायक संवेदना असते. आणि अवतीभोवतीच्या शोचनीय अशा उदाहरणांमुळे, बाह्य वातावरणामुळे ते बालक बिघडलेले नसेल, म्हणजेच ते त्याच्या सहज स्वाभाविक अवस्थेमध्ये असेल, तर जेव्हा त्याच्याकडून त्याच्या अस्तित्वाच्या सत्याच्या विरोधी असे काही घडते तेव्हा कोणीही काहीही न सांगता देखील, त्या बालकाला एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. आणि म्हणून त्याच्यामध्ये टिकून असलेल्या या अस्तित्वाच्या सत्यावरच त्याच्या प्रगतीसाठीचे पुढचे सारे प्रयत्न आधारले गेले पाहिजेत.

…..केवळ एकच सच्चा मार्गदर्शक असतो, तो म्हणजे आंतरिक मार्गदर्शक. जर एखाद्या बालकाला अनर्थकारक अशी शिकवण मिळाली तर, अंतरंगातील ती छोटीशी गोष्ट (मार्गदर्शक) नाहीशी करण्याचा ते जोरकस प्रयत्न करते. आणि कधीकधी हा प्रयत्न इतका यशस्वी होतो की, त्यामुळे त्या आंतरिक मार्गदर्शकाबरोबरचा त्याचा सर्व संपर्कच तुटतो. आणि त्याचबरोबर चांगले आणि वाईट यांतील फरक ओळखण्याची शक्तीही ते बालक गमावून बसते. म्हणून मी सांगत असते की, अगदी लहानपणापासूनच मुलांना त्यांच्या अंतरंगी असणाऱ्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला हवी.

…लहान मुलाला तात्त्विक स्पष्टीकरण देणे गरजेचे नसते, पण त्याला या आंतरिक स्वस्थतेच्या, समाधानाच्या भावनेचा अनुभव द्यायला हवा. जेव्हा एखादी चुकीची, विरोधी गोष्ट करण्यापासून ती आंतरिक छोटीशी गोष्ट त्याला अडविते, तेव्हा त्याला जो मनस्वी आनंद होतो त्याची जाणीव त्याला करून द्यायला हवी. आणि अशा प्रकारच्या अनुभवावरच सर्व प्रकारचे शिक्षण आधारलेले असले पाहिजे. मुलाची अशी धारणा व्हायला हवी की, जर त्याला हे आंतरिक समाधान मिळाले नाही तर, काहीच टिकू शकणार नाही कारण आंतरिक समाधान हीच एकमेव गोष्ट ‘चिरस्थायी’ असते.

– श्रीमाताजी [CWM 04 : 24-25]