Tag Archive for: व्यावहारिक जीवन

भारताचे पुनरुत्थान – १४

उत्तरार्ध

इच्छाशक्ती ही सर्वशक्तिमान असते परंतु ती ‘ईश्वरी इच्छा’ असली पाहिजे; म्हणजे ती निःस्वार्थ, स्थिरचित्त आणि परिणामांबाबत निश्चिंत असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने म्हटले होते की, “तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याएवढी जरी श्रद्धा असेल तरी तुम्ही एखाद्या पर्वतासमोर उभे राहून त्याला आवाहन करू शकता आणि तुम्ही तसे केल्यावर तो खरोखरच तुमच्यापाशी येईल.” येथे ‘श्रद्धा’ या शब्दाचा अर्थ वास्तविक ‘ईश्वरी इच्छे’सहित परिपूर्ण श्रद्धा असा आहे. श्रद्धा तर्कवितर्क करत बसत नाही, तिला जाण असते. कारण दृष्टीवर तिची सत्ता असल्याने, ईश्वरी इच्छा काय आहे हे त्या दृष्टीला स्पष्ट दिसते आणि तिला हेसुद्धा ज्ञात असते की, जे घडणार आहे ते ईश्वराच्या इच्छेनुसारच घडणार आहे. श्रद्धा अंध नसते; उलट आध्यात्मिक दृष्टी उपयोगात आणल्यामुळे श्रद्धा सर्वज्ञ बनू शकते.

इच्छाशक्ती ही सर्वव्यापीसुद्धा असते. ती ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येते त्या सर्वांमध्ये स्वतःहून झेपावून प्रवेश करू शकते आणि स्वतःची शक्ती, तिचा विचार, तिचा सळसळता उत्साह तात्पुरत्या किंवा स्थायी स्वरूपात ती त्या सर्वांना प्रदान करू शकते. एकांतवासात राहणाऱ्या एखाद्या माणसाचा विचार हा, निःस्वार्थ व निःशंक संकल्पशक्तीचा अवलंब केल्यामुळे, राष्ट्राचा विचार बनू शकतो. एखाद्या एकट्या वीराची इच्छा ही लाखो भित्र्या लोकांच्या हृदयांमध्येदेखील धैर्य निर्माण करू शकते. ही साधना आपण सिद्धीस नेलीच पाहिजे. आपल्या मुक्तीची ही पूर्वअट आहे.

आपण आजवर अपरिपूर्ण श्रद्धेसहित सदोष व अपूर्ण इच्छा आणि अपरिपूर्ण निरपेक्षता यांचा अवलंब करत आलो आहोत. वास्तविक, आपल्यासमोर असलेले कार्य हे पर्वत हलविण्यापेक्षा काही कमी कठीण आहे असे नाही. ते कार्य करू शकेल अशी शक्ती अस्तित्वात आहे. परंतु ती शक्ती आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या एका गुप्त दालनामध्ये दडून बसलेली आहे. आणि त्या दालनाच्या किल्ल्या ईश्वराच्या हातात आहेत. चला, आपण त्याचा शोध घेऊ या आणि त्याच्याकडे त्या किल्ल्या मागू या.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

भारताचे पुनरुत्थान – १३

पूर्वार्ध

लेखनकाळ : इ.स.१९१०
खरी अडचण ही आपल्या अवतीभोवती नसते; तर ती नेहमी आपल्या स्वत:मध्येच असते. व्यक्तीला अजेय बनविण्यासाठी संकल्पशक्ती, निरपेक्ष वृत्ती (Disinterestedness) आणि श्रद्धा या तीन गोष्टींची आवश्यकता असते. स्वतःला बंधमुक्त करून घेण्याची आपली इच्छा असू शकते, तसा संकल्पही केलेला असू शकतो पण पुरेशा श्रद्धेचा अभाव असू शकतो. आपल्यामध्ये स्वतःच्या परममोक्षाबद्दल श्रद्धा असू शकते पण त्यासाठी आवश्यक असणारी साधने वापरण्यासाठी जी इच्छा लागते त्या इच्छेचा अभाव आपल्याकडे असू शकतो. आणि जरी इच्छा व श्रद्धा या दोन्ही गोष्टी असल्या तरीसुद्धा, त्यांचा अवलंब आपण आपल्या कार्यफलाच्या आसक्तीला चिकटून राहून करत असण्याची शक्यता असते. किंवा तो अवलंब आपण अनिष्टकारक प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या द्वेषमूलक आवेगांनी, अंध उत्तेजनेने किंवा घाईघाईने जबरदस्तीने करत असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच, अशा प्रकारच्या भव्य कार्यामध्ये, (स्वतःला बंधमुक्त करण्यासारख्या कार्यामध्ये) न भूतो न भविष्यति अशा अडथळ्यांवर मात करण्यासाठी म्हणून, मनाच्या आणि शरीराच्या शक्तींहूनही अधिक उच्च असणाऱ्या ‘शक्ती’चा आश्रय घेण्याची आवश्यकता असते. ही साधनेची गरज असते.

ईश्वर आपल्या अंतरंगामध्येच आहे; ‘सर्वशक्तिमान’, ‘सर्वव्यापी’, ‘सर्वज्ञ’ शक्ती’ या रूपामध्ये तो आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहे. त्या ईश्वराचे आणि आपले स्वरूप मूलतः एकसमानच आहे. आपण त्याच्या संपर्कात आलो आणि स्वतःला जर त्याच्या हाती सोपविले तर, तो आपल्यामध्ये त्याची स्वतःची शक्ती ओतेल आणि मग, आपल्यामध्येसुद्धा देवत्वाचा अंश आहे, आपल्यामध्ये त्या सर्वशक्तिमानतेचा, सर्वव्यापकत्वाचा आणि सर्वज्ञतेचा काही अंश आहे, ही अनुभूती आपल्याला येईल. मार्ग दीर्घ आहे, पण आत्मसमर्पणामुळे तो जवळचा होतो; मार्ग कठीण आहे पण परिपूर्ण विश्वासामुळे तो सुकर होतो.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

भारताचे पुनरुत्थान – १२

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. १६ मार्च १९०८

मानवतेला पुन्हा एकदा मानवी स्वातंत्र्य, मानवी समता, मानवी बंधुता यांच्या खऱ्या उगमस्रोताकडे वळविणे हे भारताचे जीवितकार्य आहे. मनुष्य जेव्हा आत्मस्वातंत्र्य अनुभवतो तेव्हा इतर सर्व स्वातंत्र्य त्याच्या सेवेला हजर असतात; कारण ईश्वर हा ‘मुक्त’ असतो आणि तो कशानेही बांधला जाऊ शकत नाही. मनुष्य जेव्हा भ्रांतीपासून मुक्त झालेला असतो तेव्हा त्याला या जगामध्ये अंतर्भूत असलेल्या दिव्य समत्वाचा बोध होतो. प्रेम आणि न्याय यांच्या माध्यमातून हे दिव्य समत्व स्वतःची परिपूर्ती करत असते. व्यक्तीला जेव्हा असा बोध होतो तेव्हा तो बोधच स्वयमेव शासनाच्या व समाजाच्या कायद्यामध्ये रूपांतरित होतो.

एखाद्या व्यक्तीला जेव्हा या दिव्य समत्वाचा बोध होतो तेव्हा तो अखिल जगाचा बंधू होतो आणि त्याला कोणत्याही पदावर विराजमान केले तरी तो प्रेमाच्या व न्यायाच्या कायद्याने, बंधुत्वाच्या नात्याने, सर्व मानवांची सेवा करतो. जेव्हा हा बोध धर्म, तत्त्वज्ञान आणि सामाजिक अनुमानांचा तसेच राजकीय आकांक्षांचा आधार बनेल तेव्हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समाजव्यवस्थेच्या रचनेमध्ये त्यांच्या त्यांच्या योग्य जागी विराजमान होतील आणि मग पुन्हा ‘सत्ययुग’ अवतरेल.

हे लोकशाहीचे आशियाई आकलन आहे आणि ते जगाला ज्ञात करून देण्यापूर्वी भारताने प्रथम लोकशाहीचा स्वत:साठी म्हणून पुनर्शोध घेतला पाहिजे. मनुष्याने आत्म्यामध्ये मुक्त असावे आणि सक्तीने नव्हे तर, प्रेमाने सेवाकार्यास बांधील असावे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. आत्म्याप्रमाणे समान असावे आणि इतरांच्या स्वार्थी हितसंबंधांनुसार नव्हे तर, समाजाची सेवा करण्याची त्याची जी क्षमता असेल त्यानुसार त्याने स्वत:चे समाजातील स्थान निर्धारित करावे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. त्याच्या बंधुभगिनींशी त्याचे नाते सुसंवादी असावे, दोघांमध्ये शोषक व शोषिताचे किंवा भक्ष्य व भक्ष्यकाचे नाते नसावे, तसेच दास्यत्वाच्या बेड्यांनी नव्हे तर परस्परांच्या प्रेमाने व सेवाभावामुळे एकमेकांशी संबंधित असावे; हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे.

लोकशाही ही माणसाच्या हक्कांवर आधारलेली असते असे म्हटले जाते; त्याला प्रत्युत्तर देताना असे म्हटले जाते की, ती हक्कांपेक्षा मनुष्याच्या कर्तव्यांवर आधारली गेली पाहिजे; परंतु हक्क असोत वा कर्तव्य या दोन्ही संकल्पनाच मुळात युरोपियन आहेत. जेथे स्वार्थीपणा हाच कृतीचा मूलाधार असतो अशा जगाच्या दृष्टिकोनातून, हक्क आणि कर्तव्य हे द्वंद्व (कृत्रिमरित्या) तयार करण्यात आलेले असते. मात्र धर्म ही अशी एक भारतीय संकल्पना आहे की, ज्या संकल्पनेमध्ये हक्क आणि कर्तव्य या दोहोंमधील कृत्रिम द्वंद्व मावळून जाते आणि त्यांच्यामधील सखोल व शाश्वत ऐक्य त्यांना पुन्हा प्राप्त होते. धर्म हाच लोकशाहीचा आधार आहे हे सत्य आशियाने ओळखले पाहिजे. कारण युरोपचा आत्मा आणि आशियाचा आत्मा या दोहोंमधील फरक नेमका येथेच आहे. आशियाई उत्क्रांती धर्माच्या माध्यमातून तिच्या परिपूर्णतेला पोहोचते, हे तिचे रहस्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 931-932)

भारताचे पुनरुत्थान – ११

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. ०५ मार्च १९०८

भारताला आता जर का एका महान सामाजिक क्रांतीची आवश्यकता असेल तर ती याच कारणासाठी की, भारताचा प्राचीन व अविचल आत्मा ज्यामधून अभिव्यक्त होऊ शकत नाही अशा रूपांशी आपण अजूनही जखडून राहिलो तर, त्यामुळे स्वराज्याचा आदर्श सिद्धीस जाऊ शकणार नाही. भारतमातेने भूतकाळात पांघरलेली जीर्ण वस्त्रं बदलली पाहिजेत म्हणजे तिचे सौंदर्य पुन्हा एकदा उजळून निघेल. तिने तिच्या देहरूपामध्येदेखील बदल केला पाहिजे म्हणजे त्यामधून तिचा आत्मा नव्याने अभिव्यक्त होऊ शकेल. असा बदल केला तर ती युरोपाची नक्कल होईल अशी भीती बाळगण्याचे काही कारण नाही. कारण तिची व्यक्तिविशिष्टता (individuality) इतकी बलशाली आहे की, तिच्याबाबतीत अशा प्रकारचे अवमूल्यन होऊच शकणार नाही. तसेच तिचा आत्मा एवढा स्थिरचित्त आणि स्वयंपूर्ण आहे की, ती अशा तऱ्हेची शरणागती पत्करणेही शक्य नाही.

भारतामध्ये पुन्हा आर्थिक क्रांतीची आवश्यकता असेल तर ती एवढ्यासाठीच की, अन्यथा वाणिज्य-क्षेत्रातील व उद्योग-क्षेत्रातील स्वराज्याला तिच्या जुन्या औद्योगिक जीवनाच्या सुरेख पण अरूंद इमारतीमध्ये वाव मिळणार नाही. स्वतंत्र आणि परिपूर्ण राष्ट्रीय जीवनाच्या औद्योगिक उर्जांना बलशाली क्षेत्राची आणि विशाल जलप्रवाहांची आवश्यकता असते. युरोपने आत्ता ज्याप्रमाणे मानवतेच्या उदात्त भावभावनांची पायमल्ली चालविली आहे, तशाच प्रकारच्या रोगग्रस्त आणि विस्कळीत समाजस्थितीमध्ये आर्थिक क्रांती आपल्याला नेऊन ठेवेल अशी भीती बाळगण्याचेदेखील कारण नाही. जी शिकवण म्हणजे भारतमातेचे जणू जीवनच आहे, जी तिच्या अमरत्वाचे रहस्य आहे अशी शिकवण ही – पाश्चात्त्य देशांमध्ये ‘उद्योगधंद्या’च्या नावाखाली संघटित स्वार्थीपणा, क्रूरपणा आणि लोभ, हाव यांना जी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे – त्याचीच प्रतिकृती ठरण्याइतपत कदापिही विस्मरणात जाऊ शकणार नाही. भारतमाता स्वत:ची परिस्थिती स्वतः निर्माण करेल, समाजामध्ये व्यवस्थेचे रहस्य शोधण्यासाठी समाजवाद जो व्यर्थ आटापिटा करत असतो ते रहस्य भारतमाता शोधून काढेल आणि जग व आत्मा यांच्यामध्ये सुसंवाद कसा प्रस्थापित करायचा असतो हेदेखील ती पृथ्वीवासियांना पुन्हा एकदा शिकवेल.

सध्या जे काही घडत आहे त्यामध्ये एक महान आणि महत्त्वाचे रूपांतर घडून येत आहे, आणि हे रूपांतर केवळ आपल्यासाठीच नव्हे तर अखिल जगासाठी महत्त्वाचे असणार आहे, याचा बोध आपल्याला होऊ शकला आणि त्यामागील सत्य आपल्याला प्रतीत झाले तर येणाऱ्या काळात, कोणतीही भीती वा शंका न बाळगता आपण स्वतःला त्यात झोकून देऊ.

भारत हा राष्ट्रांचा गुरू आहे. मानवी जिवाला गंभीर आजारांमधून बाहेर काढणारा जणू धन्वंतरी म्हणजे भारत आहे. जगत्-जीवनाची पुन्हा एकवार नवरचना करावी आणि मनुष्याला त्याच्या आत्म्याची शांती पुन्हा एकदा प्राप्त करून द्यावी हे भारताचे नियत कार्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 905-906)

भारताचे पुनरुत्थान – १०

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २२ फेब्रुवारी १९०८

मनुष्याच्या अंतरंगामध्ये ईश्वराचे वास्तव्य असते (याचे प्रत्यंतर येणे) म्हणजे संपूर्ण साक्षात्कार आणि तोच समग्र धर्म आहे. जेव्हा भारताला (आद्य) शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांच्याकडून मिळालेल्या शिकवणुकीचे स्मरण होईल; श्रीरामकृष्ण (परमहंस) कोणते सत्य प्रकट करण्यासाठी आले होते याची जेव्हा भारताला जाणीव होईल तेव्हा भारताचा अभ्युदय होईल. वेदान्त हेच भारताचे जीवन आहे.

जो हिंदू आहे तो कधीच आपण (मानव) म्हणजे केवळ बौद्धिक जीव आहोत, असा विचार करणार नाही. ज्याने ईश्वर कधीच पाहिलेला नाही त्याने खुशाल बुद्धीचे गुणगान करावे, असे हिंदुधर्म मानतो. केवळ ईश्वराच्याच महानतेचे आणि तेजस्वितेचे गुणगान करावे असा आदेश त्या ईश्वरानेच हिंदुधर्माला दिला आहे आणि हिंदुधर्म हजारो वर्षे त्याचेच गुणगान करत आला आहे.

पहिल्यांदा जेव्हा कधी आपण युरोपियन शिक्षण स्वीकारले, तेव्हाच आपण विज्ञानाच्या (science) प्रकाशाने स्वत:ची दिशाभूल होऊ देण्यास संमती दिली. विज्ञान हा एका मर्यादित खोलीतील प्रकाश आहे, जग उजळवून टाकू शकेल असा सूर्य नव्हे. विज्ञानाची गोळाबेरीज म्हणजे अपराविद्या. पण त्याहून अधिक उच्च अशी एक विद्या आहे, महान असे एक ज्ञान आहे. जेव्हा आपण अपरा विद्येच्या प्रभावाखाली वावरत असतो, तेव्हा आपणच कर्ते आहोत अशा भ्रमात आपण वावरत असतो आणि जणू काही बुद्धीच सार्वभौम व सर्वशक्तिमान आहे असे समजून, आपण ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती बुद्धीच्या साहाय्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा भ्रामक आणि मायिक दृष्टिकोन असतो.

एखाद्याने एकदा जरी स्वत:च्या अंतरंगात वसलेल्या ईश्वराची दिव्य प्रभा अनुभवलेली असेल तर बुद्धी हीच सर्वोच्च असते, यावर तो पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही. (बुद्धीपेक्षा श्रेष्ठ) एक उच्चतर आवाज असतो, एक अमोघ अशी आकाशवाणी असते. हृदयामध्ये ईश्वराचा अधिवास असतो. ईश्वर मेंदुद्वारे कार्य करतो, पण मेंदू हे त्याच्या अनेक साधनांपैकी एक साधन असते. मेंदू ज्या गोष्टीची योजना आखण्याची शक्यता असते, ती गोष्ट हृदयाला आधीच ज्ञात असते. आणि जो कोणी मेंदुच्या पलीकडे जाऊन, हृदयापर्यंत पोहोचू शकतो तोच शाश्वताची (Eternal) वाणी ऐकू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 891-892)

भारताचे पुनरुत्थान – ०९

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २१ फेब्रुवारी १९०८

जगाचे भवितव्य हे भारतावर अवलंबून आहे. जेव्हा कधी भारत त्याच्या निद्रेमधून जागा होतो तेव्हा तो झळाळणारे काही अद्भुत प्रकाशकिरण जगाला प्रदान करतो आणि ते प्रकाशकिरण अनेकानेक राष्ट्रांना प्रकाशित करण्यासाठी पुरेसे असतात. भारताला एखादा विचार करण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो मात्र तोच विचार करण्यासाठी इतर राष्ट्रांना शतकानुशतके व्यतीत करावी लागतात.

ईश्वराने भारताच्या हाती प्राचीन वेदविद्येचा ग्रंथ दिला आणि तो ग्रंथ उघडण्याची योग्य वेळ येत नाही तोपर्यंत तो ग्रंथ त्याच्या हृदयामध्ये कुलूपबंद करून ठेवण्याचा आदेशही त्याला दिला. कधीकधी त्यातील एखादे प्रकरण तर कधी एखादे पान उघड करून दिले जात असे, तर कधीकधी अगदी एखादे वाक्यसुद्धा! आणि अशी वाक्यं ही पुढे युगानुयुगांसाठी प्रेरणा बनून राहिली आहेत आणि त्यांनी मानवतेचे शेकडो वर्षे भरणपोषण केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 890)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०६

अचेतनाचे रूपांतरण

(जुलै १९४८ मध्ये जागतिक परिस्थितीबद्दल खंत व्यक्त करणाऱ्या काही व्यक्तींसंबंधी, एका साधकाला उद्देशून लिहिलेले हे पत्र…)

सध्या गोष्टी काही ठीक चालल्या आहेत असे नाही, त्या दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालल्या आहेत आणि कोणत्याही क्षणी त्या अजूनही वाईट होतील किंवा वाईटाहूनही वाईट असे काही घडणे शक्य असेल तर तसेही घडू शकेल. सध्याच्या अस्वस्थ जगामध्ये, गोष्टी कितीही विरोधाभासी असल्या तरी त्या घडणे शक्य आहे, असे आता वाटू लागले आहे. त्या तुमच्या स्नेह्यांसाठी सर्वोत्तम गोष्ट कोणती असेल तर ती हीच की जे चाललेले होते ते सर्व आवश्यक होते, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. कारण एक नूतन आणि अधिक चांगले जग प्रत्यक्षात येण्यासाठी, काही विशिष्ट शक्यता उदयास येऊन, त्यांच्यापासून सुटका होण्याची आवश्यकता होती. ‘नंतर कधीतरी करू’ असे म्हणून त्या पुढे ढकलता येण्यासारख्या नव्हत्या.

योगामध्ये ज्याप्रमाणे, व्यक्तित्वामध्ये सक्रिय किंवा सुप्त अशा ज्या कोणत्या गोष्टी असतात, त्यांना प्रकाशामध्ये आणून कार्यान्वित करावे लागते म्हणजे त्यांचा सामना करता येतो आणि त्यांना हद्दपार करता येते किंवा तळाशी सुप्तपणे पडून असलेल्या गोष्टींना शुद्धिकरणाच्या हेतुने पृष्ठभागावर आणावे लागते, अगदी तसेच येथेही आहे.

‘उषःकालापूर्वीची रात्र ही अधिक काळोखी असते आणि उषेचे आगमन हे अपरिहार्य असते,’ ही म्हण त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. मात्र त्यांनी ही गोष्टदेखील लक्षात ठेवली पाहिजे की, ज्या नवीन जगताचे आगमन आमच्या दृष्टीस (स्पष्टपणे) दिसत आहे ते जगत म्हणजे जुन्याच जगताच्या पोतापासून (texture) बनलेले पण प्रकाराने काहीसे वेगळे असणारे, असे नाही तर, त्या नूतन जगताचा उदय हा अन्य मार्गाने, म्हणजे बाहेरून नव्हे तर, अंतरंगातूनच झाला पाहिजे. म्हणून बाहेर घडणाऱ्या शोचनीय गोष्टींविषयी खूप जास्त चिंतित राहू नये, तर आपण अंतरंगामध्ये वृद्धिंगत होत राहावे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. अंतरंगामध्ये वृद्धिंगत होत राहिल्याने, नवीन जगत, मग ते कोणत्याही रूपात साकार झाले तरी, तुमचे ते (स्नेही) त्यासाठी सज्ज राहू शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 691)
*

साधना, योग आणि रूपांतरण – ०४

सन्मार्गाचे अनुसरण करण्याची ज्यांना इच्छा असते त्यांच्यावर सर्व प्रकारच्या दुरिच्छांचे हल्ले होण्याची शक्यता असते; (कारण) त्यांना ते समजत नाही आणि एवढेच नाही तर, त्यांना जे समजत नाही त्याचा ते बहुधा तिरस्कारच करतात.

लोक तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात, तुम्हाला मूर्खात काढतात त्यामुळे तुम्ही जर चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही (योग)मार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. आणि अशा गोष्टी तुमच्यापर्यंत येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे मुळीच नाही, तर उलट दिव्य ‘चेतने’ने व दिव्य ‘कृपे’ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही किती खंबीर आहात, याची पारख करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा कसोटीच्या दगडाप्रमाणे (सोन्याची पारख करण्याचा सोनाराकडे असणारा कसोटीचा दगड) दिव्य ‘चेतने’कडून व दिव्य ‘कृपे’कडून वापर केला जात आहे, हे त्यामागचे कारण असते.

म्हणून कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदाजनक शब्द उच्चारले तर अशावेळी पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे; आणि तुमच्या खऱ्या गुणांची लोकांना कदरच नाही असे वाटून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये. उलट तुमच्यातील कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती तुम्ही दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य ‘कृपे’चे कृतज्ञ असले पाहिजे. दुःखीकष्टी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे समाधानी व्हायला पाहिजे आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घालण्यात आला होता, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 282)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१५)

व्यक्तीला जेव्हा सामान्य नोकरीव्यवसायात आणि सामान्य परिस्थितीमध्ये राहून जीवन जगावे लागते तेव्हा आध्यात्मिक जीवनासाठी स्वतःला तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यक्तीने संपूर्ण समत्व व अनासक्ती बाळगली पाहिजे; तसेच ‘ईश्वर’ आहे आणि आत्ता जरी सर्व गोष्टी ‘अज्ञान’मय जगताच्या परिस्थितीमध्ये असल्या तरी त्यांच्यामध्येसुद्धा ‘ईश्वरी संकल्प’ कार्यकारी आहे या श्रद्धेनिशी व्यक्तीने भगवद्गीतेमधील समता-भावाची जोपासना केली पाहिजे. याच्यापलीकडे (या अज्ञानमय जगताच्या पलीकडे) ‘प्रकाश’ आणि ‘आनंद’ आहेत आणि त्यांच्याप्रत जाण्यासाठी जीवन कार्यरत आहे. व्यक्तीमधील आणि तिच्या प्रकृतीमधील त्यांच्या आगमनासाठीचा आणि त्यांच्या सुस्थिर होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिने या समत्वामध्ये स्वत:ला वृद्धिंगत करत नेले पाहिजे. त्यामुळे असुखकर, असहमत गोष्टींविषयीची तुमची अडचणदेखील दूर होईल. सर्व प्रकारच्या असुखदतेला समता-भावाने सामोरे गेले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 344)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०१)

सामान्य माणसाचे बहुतांशी जीवन हे बाह्यवर्ती जाणिवेमध्येच व्यतीत होत असते. पण कधीतरी जीवनात असेही क्षण येतात की जेव्हा तो अंतर्मुख होतो. तो ज्याला देव, ईश्वर, परमेश्वर इत्यादी नावांनी संबोधतो त्याचा अतीव उत्कटतेने, तळमळीने, आर्ततेने धावा करतो. ज्या प्रसंगाच्या कात्रीत सापडल्यामुळे त्याने त्याचा धावा केलेला असतो, ईश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला असतो, तो प्रसंग पार पडतो आणि तो माणूस पुन्हा पहिल्याप्रमाणेच संसाराच्या रहाटगाडग्यामध्ये गरागरा फिरत राहतो. त्याच्या जीवनातून ईश्वर पुन्हा दूरस्थ होतो.

असेच वारंवार, कदाचित जन्मानुजन्मे होत राहते. आणि या संसारी जीवनाचा, आजूबाजूच्या मंडळींचा, जीवनव्यवहाराचा अनुभव घेऊन पूर्ण होताहोताच त्याला या जीवनाचे अधिक काही महान, अधिक काही गहन प्रयोजन असले पाहिजे, असे आतून जाणवू लागते. त्याचा शोध घेतला पाहिजे असे त्याला वाटू लागते. माणूस म्हणून जन्माला आलेलो आपण, आपणही किड्यामुंगीसारखे जीवन जगून एक दिवस निघून जायचे का? आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर आपले काही कर्तव्य आहे का ? लाभलेल्या जीवनाचा आपण कशा प्रकारे विनियोग करायचा आहे, आपल्याकडून माणूस म्हणून नेमके काय अपेक्षित आहे? हे व यासारखे प्रश्न मनात डोकावू लागतात.

आणि मग कधीतरी ‘ईश्वरीकृपे’ने त्या जिवाची ‘आत्मशोधा’ला सुरुवात होते. त्या शोध – प्रवासामध्ये विविध तीर्थस्थाने, मठ, मंदिर, आश्रम इत्यादी ठिकाणांना भेटी दिल्या जातात. संत-सत्पुरुष, बुवा, बाबा, महाराज म्हणून ज्यांना समाजात मान्यता मिळालेली असते, त्यांच्याकडे जाऊन, त्यांच्याशी चर्चा करून, आपले प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. पण आपल्या आत्मशोधाची तहान कशानेच भागत नाही.

आणि मग त्या वाटचालीने श्रांतक्लांत झालेला तो जीव थकूनभागून एका झाडाखाली विसाव्याला बसावा आणि जवळून झुळूझुळू वाहणाऱ्या पाण्याचा नाद त्याच्या कानी पडावा तसे काहीसे होते. जवळच असलेल्या पाण्याच्या नादाच्या दिशेने तो जातो, त्या प्रवाहामधून ओंजळभर पाणी घेतो आणि त्या शीतल पाण्याने त्याची तहान भागते. तसेच काहीसे आत्मशोधाच्या या प्रवासात होत असावे.

श्रीअरविंदरूपी महासागर त्या शीतल पाण्याच्या प्रवाहासारखाच पत्ररूपाने अखंडपणे प्रवाहित होत राहिला होता. प्रत्येकाची तहान वेगळी, प्रत्येकाचा प्रश्न वेगळा, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, प्रत्येकाची मानसिक ठेवण वेगळी, प्रत्येकाच्या जीवनाची धाटणी वेगळी. पण येणाऱ्या प्रत्येक पांथस्थाची तहान शमविण्याचे सामर्थ्य श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये आहे. त्यातील काही निवडक पत्रे उद्यापासून सुरु होणाऱ्या ‘आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर…’ या मालिकेमध्ये आपण विचारात घेणार आहोत.

संपादक,
अभीप्सा मराठी मासिक