Tag Archive for: व्यावहारिक जीवन

नैराश्यापासून सुटका – ०५

सत्कृत्य करणे; न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत व समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. अगदी पूर्ण स्वार्थी हेतुने पाहिले तरीसुद्धा ही गोष्ट खरी असल्याचे दिसते. याशिवाय खरोखरच, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल आणि कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्मांमुळे तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्या सभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता. तुम्ही केलेली कर्मे ही जर सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमच्या आजूबाजूचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थी भावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर, तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार; म्हणजे सतत दु:ख, सततचा असंतोषच तुमच्या वाट्यास येणार; म्हणजे अंतिमत: तुमच्या पदरी नैराश्यच पडणार.

तुम्ही देह-त्याग केलात तर तुमची या वातावरणापासून सुटका होईल असे तुम्ही मानता कामा नये; उलट, देह हा एक प्रकारे अचेतनाचा (unconsciousness) पडदा असल्यासारखा असतो, जो दुःखभोगाची तीव्रता कमी करतो. जडभौतिक प्राणिक जीवनामध्ये (vital life) वावरत असताना जर तुम्ही देहाच्या संरक्षणाविना असाल तर, दुःखभोग हे अधिक तीव्र होतात आणि ज्यामध्ये बदल घडविणेच आवश्यक असते त्यामध्ये बदल घडविण्याची, ज्यामध्ये सुधारणा घडविणे आवश्यक असते त्यामध्ये सुधारणा घडविण्याची, आणि अधिक उच्चतर, अधिक आनंदी व अधिक प्रकाशमय जीवन व चेतना यांच्याप्रत स्वतःला खुले करण्याची संधीही (देह नसल्याने) आता तुमच्यापाशी नसते.

म्हणून तुम्ही तुमचे कार्य येथेच (या पृथ्वीवर असतानाच) करण्याची त्वरा केली पाहिजे; कारण तुम्ही तुमचे कार्य इथेच खऱ्या अर्थाने करू शकता. मृत्युकडून कोणतीही अपेक्षा बाळगू नका. जीवन हीच तुमची मुक्ती आहे. या जीवनात राहूनच तुम्ही स्वतःचे रूपांतरण केले पाहिजे. पृथ्वीवरच तुमची प्रगती होऊ शकते आणि पृथ्वीवरच तुम्हाला साक्षात्कार होऊ शकतो. या देहामध्ये असतानाच तुम्ही विजय संपादन करू शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 197-198)

नैराश्यापासून सुटका – ०४

 

अडचणींना सामोरे गेलेच पाहिजे आणि जेवढ्या आनंदाने तुम्ही त्या अडचणींना सामोरे जाल, तेवढ्या लवकर तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल. ”अमुक एक गोष्ट मी केलीच पाहिजे आणि ती मी करीनच,” असा दृढ संकल्प कायम राखणे हा यशाचा मूलमंत्र, हा विजयाचा निर्धार तुम्ही केला पाहिजे. हे अशक्य वाटते आहे का? अशक्य अशी कोणती गोष्टच मुळात अस्तित्वात नसते. अडचणी असू शकतात, गोष्टींना वेळ लागू शकतो, पण अशक्य असे काहीच नसते. व्यक्तीने एखादी गोष्ट करण्याचा एकदा का दृढ निश्चय केला की, आज ना उद्या ती शक्य होते.

 

– श्रीअरविंद (CWSA 29 : 116)

नैराश्यापासून सुटका – ०२

तुम्ही कधीच एकाकी नसता, हे कधीही विसरू नका. ‘ईश्वर’ तुमच्या सोबत असून तो तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे. ‘तो’ असा सोबती आहे की जो कधीच साथसंगत सोडत नाही; ‘तो’ असा मित्र आहे, ज्याचे प्रेम तुम्हाला सामर्थ्यवान बनविते आणि समाधान देते. तुम्हाला जितका जास्त एकाकीपणा जाणवेल, तेवढे तुम्ही त्या ईश्वराच्या तेजोमय उपस्थितीची जाणीव होण्यासाठी अधिक तयार व्हाल. श्रद्धा बाळगा, ‘तो’ तुमच्यासाठी सारेकाही करेल.
*
जेव्हा परिस्थिती वाईटाहून अधिक वाईट होत आहे असे वाटते, तत्क्षणी, आपण श्रद्धेची परमोच्च कृती केली पाहिजे आणि ‘ईश्वरी कृपा’ आपल्याला कधीच अंतर देणार नाही, हे आपण जाणून असले पाहिजे. अरूणोदयापूर्वीच्या घटिका या नेहमीच सर्वाधिक अंधकारमय असतात. स्वातंत्र्य जवळ येण्यापूर्वीची गुलामी ही सर्वात जास्त वेदनादायी असते. परंतु श्रद्धायुक्त अंतःकरणामध्ये आशेची चिरंतन ज्योत तेवत असते आणि ती निराशेला जागाच ठेवत नाही.

– श्रीमाताजी (CWM 14 : 09), (CWM 15 : 177)

नैराश्यापासून सुटका – ०१

जीवन विविधरंगी असते. कधी चैत्रपालवी तर कधी वैशाख-वणवा, कधी नयनरम्य तर कधी ओसाडरुक्ष दृश्य, कधी मोरपंखी कोमलता तर कधी पाषाणाची कठोरता; अशा बहुरंगी, बहुढंगी चढ-उतारावरून, खाच-खळग्यातून जीवनप्रवाह खळाळता राहतो. मानवी जीवनही आशा-निराशेच्या हिंदोळ्यांवर हेलकावत राहते. कधी तप्त वाळूवर अनवाणी पावलांनी चालण्याचा अनुभव येतो तर कधी दवबिंदू-भिजल्या कोवळ्या गवतावर फेरफटका मारण्याचा स्पर्श-सुखद अनुभव येतो. यापैकी कोणताही अनुभव आला तरी, अध्यात्म आपल्याला या सगळ्याकडे पाहण्याची एक सम-दृष्टी प्रदान करते. आजच्या स्पर्धात्मक जगात आशेपेक्षा निराशेचे प्रसंगच अधिक येताना दिसतात. अशा वेळी तर हमखास आपल्या मदतीला येतो तो अध्याम-विचार! व्यक्तीला निराशेकडून आशेकडे आणि नंतर आशा-निराशातीत अवस्थेकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य या विचारामध्ये असते.

उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘नैराश्यापासून सुटका’ या मालिकेमध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे या विषयावरील विचार आपण समजावून घेणार आहोत. वाचक नेहमीप्रमाणेच या मालिकेचे स्वागत करतील अशी आशा आहे.

यदाकदाचित मनावर निराशेची काजळी जमली असेल तर, ती झटकून टाकू या आणि नव-वर्षानिमित्त नव-आशेचा स्फुल्लिंग मनात तेवता ठेवू या.

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक

जीवन जगण्याचे शास्त्र – २७

प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या अभीप्सारूपी संकल्पाची भेट (ईश्वराला) देऊ शकता. “हे प्रभो, सारे काही तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे” अशा शब्दांतच ती अभीप्सा शब्दबद्ध होत नाही तर, “जी सर्वोत्तम गोष्ट आहे ती मला शक्य तितक्या चांगल्या रितीने करता येऊ दे,” अशा शब्दात ती अभीप्सा अगदी सहजस्वाभाविक रितीने अभिव्यक्त होते.

सर्वोत्तम गोष्ट कोणती आणि ती कशी करायची हे तुम्हाला प्रत्येक क्षणाला माहीत असतेच असे नाही. परंतु सर्वोत्तम शक्य गोष्ट करण्याच्या दृष्टीने, तुम्ही तुमचा संकल्प ईश्वराच्या हाती सोपवू शकता. त्याचे आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील.

ही गोष्ट चेतनेसहित (with consciousness), प्रामाणिकपणाने आणि चिकाटीने करा. तसे केलेत तर एकेका पल्ल्यामध्ये तुम्ही अफाट प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळून येईल. तुम्ही सर्व गोष्टी स्वतःच्या संकल्पाच्या पूर्ण ताकदीनिशी अगदी अंतःकरणपूर्वक, तळमळीने केल्या पाहिजेत. प्रत्येक क्षणी जे सर्वोत्तम शक्य आहे, तेच केले पाहिजे. इतर काय करतात हा तुमच्या चिंतेचा विषय असता कामा नये. “तो ‘क्ष’ हे असे करत नाही, तर तो तसे करतो,” “तो ‘य’ असे करतो, पण त्याने तसे करता कामा नये,” हे असे कधीही म्हणू नका. कारण ती गोष्ट तुमच्याशी निगडित नाही.

तुम्हाला या पृथ्वीवर एका विशिष्ट उद्दिष्टानिशी एक देह देऊन पाठविण्यात आले आहे. तो शक्य तेवढा सचेत बनविणे, तो ईश्वराचे सर्वाधिक परिपूर्ण आणि सर्वाधिक सचेत साधन बनविणे या हेतुने तुम्हाला देह देण्यात आला आहे. ईश्वराने तुम्हाला मानसिक, प्राणिक, शारीरिक या सर्व क्षेत्रांमध्ये विशिष्ट प्रमाणात काही द्रव्यं देऊ केली आहेत. तो तुमच्याकडून ज्याची अपेक्षा बाळगतो त्या प्रमाणात, ती द्रव्यं तुम्हाला प्रदान करण्यात आलेली असतात. तसेच तो तुमच्याकडून ज्याची अपेक्षा बाळगतो त्या प्रमाणात, तिला साजेशी अशीच परिस्थिती तुम्हाला प्रदान करण्यात आलेली असते. आणि म्हणून “माझे जीवन अगदी असह्य आहे, जगातील सर्वात दुःखी जीवन माझ्या वाट्याला आले आहे,” असे जे कोणी म्हणतात, ते मूढ असतात. प्रत्येकाला त्याच्या विकासासाठी यथायोग्य असे जीवन देण्यात आलेले असते, त्याच्या संपूर्ण विकसनासाठी जे अनुभव त्याला उपयुक्त ठरतात, तेच अनुभव त्याला प्रदान करण्यात आलेले असतात आणि त्याच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या त्याच्या संपूर्ण साक्षात्कारासाठी साहाय्यकारी ठरतील अशाच असतात.

– श्रीमाताजी (CWM 04 : 117-118)

जीवन जगण्याचे शास्त्र – २५

धीटपणा, धैर्य आणि चिकाटी हे आवश्यक असे पहिले गुण आहेत. तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे की, तुम्ही जे जाणले पाहिजे त्याच्या तुलनेत तुम्ही जे जाणता ते म्हणजे काहीच नाही; तुम्ही जे करणे आवश्यक आहे त्याच्या तुलनेत तुम्ही जे करू शकता ते म्हणजे काहीच नाही आणि तुम्ही जे बनले पाहिजे त्याच्या तुलनेत तुम्ही आत्ता जे आहात ते म्हणजे काहीच नाही.

तुमच्या प्रकृतीमध्ये ज्याचा अभाव आहे ते प्राप्त करून घेण्याची, तुम्हाला अजूनपर्यंत जे माहीत नाही ते जाणून घेण्याची आणि तुम्हाला अजूनपर्यंत जे करता आलेले नाही ते करता यावे असा एक दृढ, अविचल संकल्प तुमच्यामध्ये असला पाहिजे. वैयक्तिक इच्छा-वासनारहिततेमधून येणाऱ्या शांतीमध्ये आणि प्रकाशामध्ये तुम्ही सतत प्रगती करत राहिले पाहिजे. “नेहमी अधिक चांगले, प्रगतिपथावर अधिक पुढे!” असा कृतिकार्यक्रमच तुम्ही ठरवून घेऊ शकता. ईश्वराचे आविष्करण करता यावे यासाठी त्याला जाणणे हेच तुमचे एकमेव ध्येय असले पाहिजे. चिकाटी बाळगा म्हणजे मग, तुम्ही आज जे करू शकत नाही ते तुम्हाला उद्या साध्य होऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 16 : 430)

जीवन जगण्याचे शास्त्र – १४

तुमच्यामधील निराशाजनक विचारांना आळा घालण्याचा करता येईल तेवढा जास्तीतजास्त प्रयत्न करा आणि स्वेच्छापूर्वक आशावादी बना.
*
आपण नेहमीच योग्य ती गोष्ट करू या म्हणजे मग आपण नेहमीच शांत आणि आनंदी राहू शकू.
*
खरोखरच, विशुद्ध आणि निरपेक्ष प्रेमाएवढी दुसरी कोणतीच गोष्ट अधिक आनंददायी नसते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 141), (CWM 14 : 180), (CWM 16 : 172)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०१

एका साधकाने श्रीमाताजींच्या सान्निध्यात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने ‘मला काही संदेश द्यावा,’ अशी विनंती त्यांना केली.

तेव्हा श्रीमाताजींनी त्याला असा संदेश दिला की,
“साधेसरळ असा,
आनंदी राहा,
अविचल राहा,
शक्य तितक्या उत्तम रीतीने कर्म करा,
माझ्याप्रति खुले, उन्मुख राहा,
तुमच्याकडून एवढेच अपेक्षित आहे.”

‘जीवन जगण्याचे शास्त्र’ ही आपली नवीन मालिका या संदेशावर आधारित आहे. वाचक त्याचे स्वागत करतील अशी आशा आहे. धन्यवाद!

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

भारताचे पुनरुत्थान – १६

‘कर्मयोगिन्’या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. १९ जून १९०९

मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा आहे आणि त्याचेच आम्ही आग्रहाने प्रतिपादन करतो आणि त्याचेच अनुसरण करतो.

मानवतेला आमचे असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे की तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वातून वर उठून, ज्याकडे आता मानवता वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक सखोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला ज्या समस्या भेडसावत आहेत त्या समस्या, आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील. निसर्गाच्या शक्तींना आरामदायक सुखसोयींच्या दिमतीस जुंपून या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रितीने विजय मिळवत, मनुष्याचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करून आणि बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवूनच त्या सोडविता येतील. या कार्यासाठी आशिया खंडाचे पुनरुत्थान होणे गरजेचे असल्यामुळेच आशिया खंडाचा उत्कर्ष होत आहे. त्यासाठी भारताचे स्वातंत्र्य व त्याची महानता यांची आवश्यकता असल्यामुळेच, भारत त्याच्या नियत अशा स्वातंत्र्याचा व महानतेचा दावा करत आहे.”

– श्रीअरविंद (CWSA 08 : 26-27)

भारताचे पुनरुत्थान – १५

(इ. स. १९१८ साली ‘राष्ट्रीय शिक्षण सप्ताहा’निमित्त श्री. अरविंद घोष यांनी दिलेला संदेश)

हा असा काळ आहे की, जेव्हा अखिल जगाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याची पावले कोणत्या दिशेने वळण घेणार आहेत हे येणाऱ्या शतकासाठी म्हणून दमदारपणाने निर्धारित केले जात आहे. आणि हे निर्धारण कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे नाही तर, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक व बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हायच्या आहेत असे हे शतक आहे आणि हे एक महान निर्णायक वळण आहे.

आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, त्या कर्मांची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत. आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या देशवासीयांच्या अंतरात्म्याला देण्यात आलेली ही एक संधी असणार आहे; देशवासीयांना इथे एक (जाणीवपूर्वक) निवड करावी लागणार आहे आणि त्याबरोबरच, ती त्यांच्यासाठी एक कसोटीदेखील असणार आहे. ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचेल आणि त्याच्या पारड्यात ‘नियतीच्या स्वामी’चे अगदी उघडपणाने झुकते माप पडेल, अशी आपण सदिच्छा बाळगू या.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 413)