Tag Archive for: योग

(उत्तरार्ध – भाग ०१ चा सारांश – आजवर जडभौतिक, प्राण आणि मन अशा क्रमाने उत्क्रांती झालेली आहे. अतिमानसाचे विकसन हे पुढील पाऊल असणार आहे, असे श्रीअरविंद म्हणतात…)

(उत्तरार्ध) – भाग ०२

श्रीअरविंद अशी शिकवण देतात की, अशा एका उच्चतर तत्त्वाचे अवतरण शक्य आहे की, ज्यामुळे आध्यात्मिक ‘स्व’ची मुक्ती केवळ या जगापासून दूर जाऊन नाही तर या जगात राहूनच शक्य होईल. एवढेच नव्हे तर, त्या उच्चतर तत्त्वाच्या अवतरणामुळे मनाच्या अज्ञानाची किंवा मर्यादित, अपुऱ्या ज्ञानाची जागा अशी अतिमानसिक सत्य-चेतना (truth-consciousness) घेईल, जी आंतरिक ‘स्व’चे पुरेसे माध्यम असेल आणि ज्यामुळे मानवाला अंतरंगामध्ये तसेच गतिशीलपणे स्वत:चा शोध घेता येईल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत शिल्लक असलेल्या प्राणिसदृश मानवतेचे विकसन दिव्यतर वंशामध्ये करता येईल. उच्चतर चेतनेच्या म्हणजे अजूनही सुप्त असलेल्या अतिमानस तत्त्वाच्या कार्याद्वारे आणि अवतरणाद्वारे होणाऱ्या परिवर्तनासाठी किंवा रुपांतरणासाठी अस्तित्वाची सर्व अंगे खुली करून देणे या ध्येयापर्यंत ‘योगा’ची मानसिक तपस्या उपयोगात आणता येणे शक्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

साधनेची मुळाक्षरे – ०२

मनुष्य हा बहुतांशी त्याच्या पृष्ठवर्ती (surface) मनाच्या, प्राणाच्या आणि शरीराच्या पातळीवर जीवन जगत असतो पण त्याच्या अंतरंगामध्ये महत्तर शक्यता सामावलेला एक आंतरिक पुरुष असतो, त्या पुरुषाविषयी मनुष्याने जागे झाले पाहिजे; कारण आज त्याला या पुरुषाकडून अगदी मर्यादित, थोडासाच प्रभाव प्राप्त होत असतो आणि तो प्रभावच त्याला महान सौंदर्य, सुसंवाद, शक्ती आणि ज्ञान यांच्या नित्य शोधासाठी प्रवृत्त करत असतो. त्यामुळे, या आंतरिक पुरुषाच्या श्रेणींप्रत खुले होणे आणि तेथून बाह्य जीवन जगणे, तसेच या आंतरिक प्रकाशाने आणि शक्तीने बाह्यवर्ती जीवनाचे शासन करणे, ही योगाची पहिली प्रक्रिया असते. हे करत असताना त्याला स्वतःमध्येच त्याच्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो; तो आत्मा म्हणजे त्याच्या मन, प्राण आणि शारीरिक घटकांचे बाह्यवर्ती मिश्रण नसते तर, त्या सर्वांच्या पाठीशी असणारी ती सद्वस्तू (Reality) असते, ‘दिव्य अग्नी’ची ती ठिणगी असते. मनुष्याने स्वतःच्या आत्म्यामध्ये जगण्यास, शुद्धिकरण करण्यास तसेच उर्वरित प्रकृती ‘सत्या’भिमुख करण्यास शिकले पाहिजे. त्यानंतर, त्यापाठोपाठ ऊर्ध्वमुखी खुलेपण (opening) येईल आणि अस्तित्वामध्ये उच्चतर तत्त्वाचे अवतरण घडून येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 548)

विचार शलाका – ३६

योगाची पहिली प्रक्रिया म्हणजे आत्मसमर्पणाचा संकल्प करणे. तुमच्या समग्र हृदयानिशी आणि तुमच्या सर्व सामर्थ्यानिशी स्वतःला ‘देवा’च्या हाती सोपवा. कोणतीही अट लादू नका, कोणतीही मागणी मागू नका, अगदी योगसिद्धीचीही मागणी करू नका. कारण अन्य कोणत्याही माध्यमातून नव्हे तर, तुमच्यामध्ये जे आहे त्याद्वारे आणि तुमच्या माध्यमातूनच ‘देवा’ची इच्छा थेटपणे कार्यरत होते. जे कोणी त्याच्याकडे मागणी करतात, त्यांना ‘देव’ त्यांनी जे मागितले आहे ते देतो. परंतु कोणतीही मागणी न करता, जे कोणी स्वतःलाच देऊ करतात, त्यांना ‘देव’ सर्व काही प्रदान करतो, त्यांनी जे मागितले असते किंवा त्यांना जे आवश्यक असते तेही तो देतो आणि त्याशिवाय, ‘देव’ स्वतःलाही त्यांना देऊ करतो आणि त्याच्या प्रेमाचे सहजस्फूर्त असे वरदानही प्रदान करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 74)

विचार शलाका – १८

अतिमानसिक अवतरण शक्य होण्यासाठी, साधकाने त्याआधी बरीच पावले टाकली असली पाहिजेत. माणूस हा बरेचदा त्याच्या पृष्ठीय मन, प्राण आणि देहामध्येच जगत असतो पण त्याच्या आतमध्ये महत्तर शक्यता असणारे एक आंतरिक अस्तित्व असते, ज्याविषयी त्याने जागृत होणे गरजेचे असते. कारण सद्यपरिस्थितीत, मानवाला त्यातील अगदी मर्यादित प्रभावच प्राप्त होऊ शकतो. आणि तो प्रभावच त्याला एका महान सौंदर्याच्या, सुसंगतीच्या, शक्तीच्या आणि ज्ञानाच्या सातत्यपूर्ण अनुसरणासाठी प्रवृत्त करतो. म्हणून ह्या आंतरिक अस्तित्वाचे टप्पे खुले करणे आणि बाह्य जीवनात जगत असतानाही अंतरंगात राहणे, त्याचे बाह्य जीवन या आंतरिक प्रकाशाने आणि ऊर्जेने प्रशासित करणे ही योगाची पहिली प्रक्रिया होय. हे करीत असताना त्याला स्वत:मध्ये त्याच्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो, की जो मानसिक, प्राणिक आणि शारीरिक घटकांचे कोणतेही वरवरचे मिश्रण असत नाही पण त्यांच्यामागे असणाऱ्या वास्तविकतेचा (Reality) काही अंश असतो, त्या एकमेवाद्वितीय ‘दिव्य अग्नी’चा तो स्फुल्लिंग असतो. त्याने त्याच्या अंतरात्म्यात निवास करणे, शुद्धीकरण करणे आणि त्याची उर्वरित सर्व प्रकृती ही ‘सत्या’कडे असलेल्या त्याच्या प्रेरणेने अभिमुख करणे शिकायला हवे. त्याच्या पाठोपाठ उर्ध्वामुखी खुलेपण आणि ‘अस्तित्वा’च्या उच्चतर तत्त्वाचे अवतरण घडून येणे शक्य आहे. पण असे असले तरीसुद्धा ती एकदम संपूर्ण अतिमानसिक ‘प्रकाश’ किंवा ‘ऊर्जा’ असणार नाही. कारण सामान्य मानवी मन आणि अतिमानसिक ‘सत्य-चेतना’ यांच्या दरम्यान चेतनेच्या अनेक पातळ्या असतात. ह्या आंतरवर्ती पातळ्या खुल्या करून त्यांची शक्ती मन, प्राण आणि शरीरात उतरवणे आवश्यक असते. केवळ त्यानंतरच ‘सत्य-चेतने’ची पूर्ण शक्ती प्रकृतीमध्ये कार्य करू शकेल. म्हणून स्वयंशिस्तीची किंवा ‘साधने’ची ही प्रक्रिया प्रदीर्घ आणि अवघड आहे पण त्यातील थोडेच असले तरीदेखील खूप प्राप्त केल्यासारखे आहे कारण त्यामुळे अंतिम मुक्ती आणि पूर्णत्व हे अधिक शक्य होते.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 548-549)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०९

(महत्त्वाकांक्षा आणि अप्रामाणिकपणा या धोक्यांचा विचार आपण काल केला, आता आणखी एक धोका विचारात घेऊ.)

आणखी एक धोका असतो. तो धोका लैंगिक आवेगांबाबत असतो. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये योग तुम्हाला अगदी उघडावागडा करतो आणि तुमच्यामध्ये सुप्त असलेले सारे आवेग आणि इच्छावासना बाहेर काढतो. कोणत्याही गोष्टी लपवायच्या नाहीत किंवा तशाच बाजूला सोडून द्यायच्या नाहीत हे तुम्ही शिकायला हवे. तुम्ही त्यांना सामोरे गेले पाहिजे आणि जिंकले पाहिजे आणि त्यांची पुनर्घडण केली पाहिजे.

योगाचा पहिला परिणाम असा होतो की, मानसिक नियंत्रण सुटते आणि सुप्तपणे पडून असलेल्या साऱ्या वासना अचानकपणे मोकाट सुटतात आणि त्या वर उफाळून येतात आणि व्यक्तीच्या संपूर्ण अस्तित्वावर त्या आक्रमण करतात. जोपर्यंत मानसिक नियंत्रणाची जागा ईश्वरी नियंत्रणाने घेतली जात नाही तोपर्यंत एक संक्रमणकाळ असतो की, जेव्हा तुमची प्रामाणिकता आणि तुमचे समर्पण यांचा कस लागतो. लोक लैंगिक आवेगासारख्या आवेगांची खूप जास्त प्रमाणात दखल घेतात आणि सहसा त्यामुळेच या आवेगांना बळ मिळते. लोक त्या आवेगांचा खूप जोरदार प्रतिकार करतात आणि जबरदस्तीने त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दाबून ठेवतात. पण तुम्ही एखाद्या गोष्टीचा जेवढा जास्त विचार कराल आणि म्हणाल, ”मला ही गोष्ट नको आहे, मला ही गोष्ट नको आहे,” तेवढ्या अधिक प्रमाणात तुम्ही त्याने बांधले जाता. तुम्ही काय केले पाहिजे ? तर ती गोष्ट शक्यतो तुमच्यापासून दूर ठेवा, तुमचा त्या गोष्टीशी असलेला संबंध तोडा, तिची शक्य तेवढी कमीत कमी दखल घ्या आणि जरी तुमच्या मनात त्या गोष्टीचा विचार आलाच तरीही नि:संग राहा आणि त्यांच्याबाबत निश्चिंत राहा.

योगाच्या दबावामुळे जे आवेग आणि इच्छावासना पृष्ठभागावर येतील, त्या जणू काही तुम्हाला परक्या आहेत किंवा त्या बाह्य जगाशी संबंधित आहेत असे समजून, अनासक्त वृत्तीने आणि शांत चित्ताने त्यांना सामोरे जा. त्या ईश्वरार्पण केल्या पाहिजेत म्हणजे मग ईश्वर त्यांना आपल्या हाती घेईल आणि त्यांच्यात रूपांतर घडवून आणेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 05)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०५

चेतना (consciousness) ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिक आंतरिक चेतनेमध्ये निवास करत, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे; ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरासाठी सज्ज होऊ शकेल आणि दिव्य ज्ञान, दिव्य संकल्प आणि दिव्य प्रेम यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे या योगाचे ध्येय आहे. दुसरे ध्येय म्हणजे योगिक चेतना विकसित करणे – म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, विश्व-पुरुषाविषयी आणि वैश्विक शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि अधिमानसापर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ईश्वराशी एकत्व पावून राहणे. तिसरे ध्येय असे की, अधिमानसाच्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेच्या (supramental consciousness) माध्यमातून, विश्वातीत ईश्वराच्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 20)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०२

प्रश्न : आम्हाला योगासंबंधी काही सांगाल काय?

श्रीमाताजी : योग तुम्हाला कशासाठी हवा आहे? सामर्थ्य लाभावे म्हणून ? मन:शांती, शांतचित्तता प्राप्त व्हावी म्हणून ? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून?

परंतु, योगमार्ग स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात का हे लक्षात येण्यासाठी यांपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत : तुम्हाला ईश्वराकरता योगसाधना करायची आहे का? ईश्वर हेच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का ? ईश्वरावाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची स्थिती आहे का? ईश्वर हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ईश्वराविना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही, असे तुम्हाला वाटते का? असे असेल तरच तुम्हाला योगमार्ग स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

ईश्वराविषयीची तळमळ, अभीप्सा (Aspiration) हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे.

पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करावयाचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत राखायची. आणि त्यासाठी आवश्यकता असते एकाग्रतेची, ईश्वरावरील एकाग्रतेची ! ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांसाठी समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ईश्वराच्या ठिकाणी एकाग्रता करणे आवश्यक असते.

हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या जाणिवेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, अगदी तळाशी जाऊन बसा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यात एक अग्नी तेवत आहे. तोच तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व, तोच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची अन्य केंद्रदेखील आहेत, उदाहरणार्थ, एक असते मस्तकाच्या वर, दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये)! प्रत्येक केंद्राचा स्वतंत्र असा प्रभाव असतो आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (पुरुष) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामधूनच उत्पन्न होतात – रूपांतरासाठी आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या गोष्टीसुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01)

 

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०४

योग हे असे एक साधन आहे की, ज्याद्वारे आंतरिक साधनेच्या माध्यमातून व्यक्ती वस्तुमात्रांमागील सत्याशी एकत्व पावण्याप्रत येऊन पोहोचते; त्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि व्यक्त जाणिवेकडून आंतरिक आणि सत्य जाणिवेप्रत घेऊन जाण्यात येते. योग-चेतना (Yoga Consciousness) ही बाह्य, व्यक्त विश्वाचे ज्ञान वगळत नाही तर उलट, ती विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते, ती त्याकडे बाह्य दृष्टीने पाहत नाही किंवा त्याचा बाह्यात्कारी अनुभवही घेत नाही. योग-चेतना आंतरिक सखोल, महत्तर, सत्यतर चेतनेच्या प्रकाशात बाह्य विश्वाला त्याचे योग्य ते मूल्य प्रदान करते, त्यात बदल घडविते. आणि त्याला सदवस्तुचा कायदा लागू करते; प्राणिमात्रांच्या अज्ञानी कायद्याच्या जागी ईश्वरी संकल्प आणि ज्ञानाचा कायदा प्रस्थापित करते. जाणिवेमधील (Consciousness) बदल हाच योगप्रक्रियेचा समग्र अर्थ होय.

*

योग हे एक शास्त्र आहे, ती एक प्रक्रिया आहे; योग हा एक प्रयास आणि कर्म आहे. ज्यायोगे, मनुष्य त्याच्या सामान्य मानसिक जाणिवेच्या मर्यादा उल्लंघून, अधिक विशालतर अशा आध्यात्मिक चेतनेप्रत जाण्याचा प्रयत्न करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 327)

जीवनाकडे आणि योगाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास असे आढळून येते की, सर्व जीवन हे योगच आहे. मग ते पूर्ण जाणीवपुर:सर असो किंवा अर्ध-जाणिवेचे असो. “व्यक्तीमध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाद्वारे, आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न” असा ‘योग’ या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे.

या प्रयत्नांमध्ये विजय प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली उच्चतम अट म्हणजे, मानवामध्ये आणि विश्वामध्ये अंशतः आविष्कृत झालेल्या विश्वात्मक आणि विश्वातीत अस्तित्वाशी मानवी व्यक्तीचे ऐक्य, ही होय. जीवनाच्या सर्व दृश्य रुपांच्या पाठीमागे आपण नजर टाकली तर असे दिसून येईल की, हे जीवन म्हणजे प्रकृतीचा एक व्यापक योग आहे. स्वत:मधील विविध शक्ती सतत वाढत्या प्रमाणात प्रकट करत, स्वत:चे पूर्णत्व गाठण्यासाठी आणि स्वत:च्या दिव्य सत्य स्वरूपाशी एकत्व पावण्यासाठी, प्रकृती चेतन आणि अर्ध-चेतनामध्ये हा जीवनरूपी योग अभ्यासत आहे.

मानव हा प्रकृतीचा विचारशील घटक आहे; त्याच्याद्वारे प्रकृतीने, आत्मजाणीवयुक्त साधनांचा आणि कृतींच्या संकल्पयुक्त व योजनाबद्ध व्यवस्थेचा, या पृथ्वीवर प्रथमच वापर केला आहे, जेणेकरून तिचा हा महान हेतू अधिक वेगाने आणि प्रभावीपणे साध्य व्हावा. स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, व्यक्तीने आपल्या पार्थिव जीवनामध्ये, स्वत:ची विकासप्रक्रिया शीघ्रतेने एकाच जन्मात, किंबहुना काही वर्षांमध्येच, वा काही महिन्यांमध्येच साध्य करून घेण्याचे एक साधन म्हणजे ‘योग’ होय. प्रकृती तिच्या ऊर्ध्वगामी दिशेने चाललेल्या या प्रयासामध्ये ज्या साधारण पद्धती अगदी सैलपणे, विपुलपणे आणि आरामशीर पद्धतीने, रमतगमत, सढळपणे उपयोगात आणत असते, त्यामध्ये वरकरणी पाहता, द्रव्याचा आणि ऊर्जेचा अपव्यय दिसत असला तरी त्यातून ती अधिक परिपूर्ण अशी संगती लावत जात असते, त्याच पद्धती योगामध्ये अधिक आटोपशीरपणे, अधिक तीव्रतेने, अधिक ऊर्जापूर्ण रीतीने उपयोगात आणल्या जातात. योगाची एखादी विशिष्ट प्रणाली म्हणजे त्या पद्धतींपैकी एका पद्धतीची निवड वा दाबयुक्त संकोचन (compression) याशिवाय दुसरे तिसरे काही असत नाही. योगाविषयी हा दृष्टिकोन बाळगला तर आणि तरच, विविध योगपद्धतींच्या तर्कशुद्ध समन्वयास बळकट अधिष्ठान लाभू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 06)

मानसिक परिपूर्णत्व – ०२

 

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; पडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल. हे व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढती-वाढती राहील. तुमच्यामधील शंका घेणारे मन कमी सक्रिय बनले आणि तुमच्या मध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

*

व्यक्तीला जर ईश्वर हवा असेल तर, व्यक्तीच्या हृदयाची शुद्धीकरण प्रक्रिया पण ईश्वरानेच हाती घ्यावी आणि त्यानेच साधना विकसित करावी आणि त्याला आवश्यक असे अनुभवही ईश्वरानेच त्याला देऊ करावेत, ही जी तुमची योगाविषयीची आधीची कल्पना होती, त्याला अनुलक्षून उत्तर देताना, मी तसे लिहिले होते. मला असे म्हणावयाचे होते की, असे होणे शक्य आहे आणि असे घडूनही येते.

पण त्यासाठी त्या व्यक्तीचा ईश्वरावर विश्वास असावयास हवा, भरवसा असावायास हवा आणि समर्पणाची इच्छा असावयास हवी. कारण, ईश्वराने सारे काही हाती घेण्यामध्ये, व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर न विसंबता, स्वतःला ईश्वराच्या हाती सोपविणे अंतर्भूत आहे. यामध्ये व्यक्तीची सारी श्रद्धा आणि विश्वास ईश्वरावरच असणे आणि त्याने उत्तरोत्तर आत्मसमर्पण प्रगत करत राहणे अभिप्रेत आहे. खरंतर, हेच साधनेचे तत्त्व आहे आणि तेच मी स्वतःही अनुसरलेले आहे. माझ्या दृष्टीने तरी, योगसाधनेचा हा गाभा आहे. मला वाटते, रामकृष्णांनी मांजराच्या पिल्लाची जी प्रतिमा वापरली आहे, ती पद्धत हीच आहे. पण सगळ्यांना हा मार्ग एकदमच अनुसरता येत नाही. इथपर्यंत येऊन पोहोचण्यासाठी त्यांना वेळ लागतो. जेव्हा मन आणि प्राण शांत होतात तेव्हा मग हा मार्ग अधिक विकसित होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 69 – 70)