Tag Archive for: मृत्यू

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला त्याच्या पत्नीच्या निधनानंतर जे पत्र लिहिले आहे त्यातील हा अंश…)

तुझ्या पत्नीच्या भयंकर मृत्युमुळे तुला केवढा मोठा धक्का बसला असेल हे मी समजू शकतो. पण आता तू सत्याकांक्षी आहेस, सत्याचा साधक आहेस. त्यामुळे तू तुझे मन सामान्य मानवी प्रतिक्रियांच्या वर स्थिर केले पाहिजेस आणि सर्व गोष्टींकडे तू एका व्यापक, महत्तर प्रकाशातून पाहिले पाहिजेस.

अज्ञानमय जीवनाच्या उतारचढावांमधून, वाटचाल करणारा एक जीव या दृष्टीकडे तुझ्या मृत पत्नीकडे पाहा. या प्रवासात अशा काही घटना घडतात की ज्या मानवी मनाला दुर्दैवी भासतात. आयुष्यावर अकाली घाला घालणारा, असा हा आकस्मिक अपघाती किंवा विदारक मृत्यू नेहमीच, आपण ज्याला जीवन म्हणतो त्या, पार्थिव जीवनाची क्षणभंगुरता दर्शविणारा असतो. आणि मानवी मनाला हा विशेषच यातनामय व दुर्दैवी भासतो.

पण एखादा (साधक) ह्या वरपांगी दृश्यामागील संगती पाहू शकतो, तो हे जाणतो की, जीवात्म्याच्या प्रवासात जे जे काही घडते त्याला काही अर्थ असतो; त्याचे काही प्रयोजन असते. जीवाच्या अनुभव-मालिकेतील अशा घटनेचे स्थानही तो साधक ओळखून असतो; हा अनुभव त्या जीवाला अशा एका वळणबिंदूपाशी घेऊन जात असतो की जेथून तो अज्ञानाकडून प्रकाशाकडे मार्गस्थ होतो. ईश्वरी प्रारब्धानुसार जे जे काही घडते ते चांगल्यासाठीच हे तो साधक जाणतो – मनाला जरी ते तसे भासले नाही तरी!

अस्तित्वाच्या दोन अवस्थांच्या मधील सीमारेषा ओलांडून गेलेला जीव या दृष्टीने तू तुझ्या पत्नीकडे पाहा. विश्रांतिस्थळाकडे चाललेल्या तिच्या प्रवासाला, तुझ्या शांत विचारांद्वारे साहाय्य कर आणि ‘ईश्वरी साहाय्या’ने तिला त्या मार्गावर साथ द्यावी म्हणून प्रार्थना करून, तिला मदत कर. दीर्घकाळ चाललेल्या शोकामुळे मृतात्म्याला मदत तर होणार नाहीच उलट त्याच्या प्रवासाला विलंब होईल. तुझी जी हानी झाली त्याबद्दल कुढत बसू नकोस तर तिच्या आध्यात्मिक कल्याणाचा विचार कर.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 528)

आपले जीवन सत्कारणी लागावे अशी ज्यांची इच्छा असते, तेच असे म्हणतात की, ”जोवर आवश्यकता आहे तोवर मी इथे राहीन, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत! आणि माझे ध्येय साध्य करत असताना एकही क्षण मी व्यर्थ दवडणार नाही”, वेळ आली तर अशीच माणसं सर्वोत्तम कामगिरी करून दाखवितात.

असे का? – कारण अगदी सोपे आहे, कारण ते त्यांच्या ध्येयासाठी जगतात, त्यांच्या ध्येयाच्या सत्यासाठी जगत असतात, कारण त्यांचे ध्येय हीच त्यांच्यासाठी खरी गोष्ट असते, ते ध्येय हेच त्यांच्या जगण्याचे खरे प्रयोजन असते, आणि सर्व गोष्टींमध्ये त्यांना हे ध्येयच दिसत असते, अस्तित्वाचे प्रयोजन दिसत असते आणि असे लोक भौतिक जीवनाच्या हीनदीनतेमध्ये कधीच खाली उतरून येत नाहीत.

तात्पर्य असे की, व्यक्तीने मृत्युची इच्छा कधीही धरता कामा नये.
व्यक्तीने मृत्युची आस कधीही बाळगू नये.
व्यक्तीला मृत्युची भीती कधीही वाटता कामा नये.
आणि सर्व परिस्थितींमध्ये व्यक्तीने आत्मोल्लंघनाचा संकल्प करायला हवा.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 354-355)

मृत्युबद्दल शोक करण्यासारखे काहीच नाही कारण मृत्यू म्हणजे केवळ एका प्रांतांतून दुसऱ्या प्रांतांत जाण्यासारखे आहे – की कदाचित जिथे तुम्ही बरेचदा गाढ झोपेमध्ये असताना जात असता.

*

… मृत्यू म्हणजे वैयक्तिक अस्तित्वाची समाप्ती नव्हे तर मृत्यू म्हणजे केवळ देह सोडणे होय, हे खरे वास्तव आहे. माणसाचा मृत्यू होत नाही कारण तो एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जातो आणि तेथील वातावरणानुसार कपडे बदलतो.

*

जे काही घडले आहे त्याचा आता शांतपणे स्वीकार केला पाहिजे कारण घटना घडून गेली आहे. मानवी दृष्टीला – जी फक्त वर्तमान व बाह्य दृश्यच पाहत असते तिला – ते चांगले वाटले नाही तरी आत्म्याच्या एका जीवनाकडून दुसऱ्या जीवनाकडे होणाऱ्या वाटचालीसाठी तेच सर्वोत्तम असते. अध्यात्म-साधकासाठी मृत्यू म्हणजे जीवनाच्या एका रूपाकडून दुसऱ्या रूपाकडे जाणारा फक्त एक मार्ग आहे आणि म्हणून कोणाचा मृत्यू झालेला नसतो, तर ते केवळ प्रस्थान आहे; या दृष्टीने मृत्युकडे पाहा…

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 529)

तीन गोष्टींपासून माणसाने स्वतःला जपले पाहिजे.

एक म्हणजे रोगाची सामूहिक सूचना. रोग हा निःसंशयपणे अस्तित्वात असणारी गोष्ट आहे, म्हणजे कार्यामध्ये विलंब करण्याचा, कार्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही विरोधी शक्ती असतातच, ह्या अर्थाने म्हणावयाचे आहे.

बाह्यतः ते रोग काही कल्पनांवर आधारलेले असतात; रोगजंतुंविषयीच्या, जीवजंतुंविषयीच्या आणि तत्सम गोष्टींविषयीच्या ज्ञानावर ते आधारलेले असतात. (त्याला लोक ‘ज्ञान’ असे म्हणतात.) पण रोगजंतुंमुळे रोग होतात असे म्हणणे म्हणजे गोष्टी उलट्यापालट्या करण्यासारखे आहे, खाली डोकं वर पाय करण्यासारखे आहे कारण हे रोगजंतू, जीवजंतू आणि तत्सम गोष्टी ह्या कारण नसून परिणाम असतात.

तीन गोष्टींच्या एकत्रिकरणाचा त्या परिणाम असतात.

दुरिच्छा, कमीअधिक प्रमाणातील पूर्णपणे वाईट अशी इच्छा; नियम व त्याचे परिणाम यांविषयीचे अज्ञान म्हणजे कारण व त्याचा परिणाम यांविषयीचे घोर अज्ञान; आणि अर्थातच, एक प्रकारचे जडत्व – या सगळ्याच गोष्टी जडत्वाचीच रूपं आहेत पण जडत्वाचे सर्वात मोठे रूप म्हणजे स्वीकारण्याची आणि प्रतिसाद देण्याची अक्षमता. या तिन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणातून रोग निर्माण होतात आणि मग अंतिम परिणाम म्हणजे मृत्यु. म्हणजे तयार झालेल्या सुमेळाचे विघटन.

– श्रीमाताजी
(Conversation with a disciple : March 02, 1968)