Tag Archive for: मृत्यू

नैराश्यापासून सुटका – ०५

सत्कृत्य करणे; न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत व समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. अगदी पूर्ण स्वार्थी हेतुने पाहिले तरीसुद्धा ही गोष्ट खरी असल्याचे दिसते. याशिवाय खरोखरच, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल आणि कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्मांमुळे तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्या सभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता. तुम्ही केलेली कर्मे ही जर सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमच्या आजूबाजूचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थी भावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर, तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार; म्हणजे सतत दु:ख, सततचा असंतोषच तुमच्या वाट्यास येणार; म्हणजे अंतिमत: तुमच्या पदरी नैराश्यच पडणार.

तुम्ही देह-त्याग केलात तर तुमची या वातावरणापासून सुटका होईल असे तुम्ही मानता कामा नये; उलट, देह हा एक प्रकारे अचेतनाचा (unconsciousness) पडदा असल्यासारखा असतो, जो दुःखभोगाची तीव्रता कमी करतो. जडभौतिक प्राणिक जीवनामध्ये (vital life) वावरत असताना जर तुम्ही देहाच्या संरक्षणाविना असाल तर, दुःखभोग हे अधिक तीव्र होतात आणि ज्यामध्ये बदल घडविणेच आवश्यक असते त्यामध्ये बदल घडविण्याची, ज्यामध्ये सुधारणा घडविणे आवश्यक असते त्यामध्ये सुधारणा घडविण्याची, आणि अधिक उच्चतर, अधिक आनंदी व अधिक प्रकाशमय जीवन व चेतना यांच्याप्रत स्वतःला खुले करण्याची संधीही (देह नसल्याने) आता तुमच्यापाशी नसते.

म्हणून तुम्ही तुमचे कार्य येथेच (या पृथ्वीवर असतानाच) करण्याची त्वरा केली पाहिजे; कारण तुम्ही तुमचे कार्य इथेच खऱ्या अर्थाने करू शकता. मृत्युकडून कोणतीही अपेक्षा बाळगू नका. जीवन हीच तुमची मुक्ती आहे. या जीवनात राहूनच तुम्ही स्वतःचे रूपांतरण केले पाहिजे. पृथ्वीवरच तुमची प्रगती होऊ शकते आणि पृथ्वीवरच तुम्हाला साक्षात्कार होऊ शकतो. या देहामध्ये असतानाच तुम्ही विजय संपादन करू शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 197-198)

विचारशलाका १६

ज्या क्षणी तुम्ही समाधान पावून, अभीप्सा बाळगेनासे होता, तेव्हापासून तुम्ही मरणपंथाला लागलेले असता. जीवन ही एक वाटचाल आहे, जीवन हा एक प्रयास आहे; जीवन म्हणजे पुढे चालत राहणे, भावी प्रकटीकरण आणि साक्षात्काराप्रत उन्नत होणे. विश्रांती घेण्याची इच्छा बाळगणे याइतकी दुसरी कोणतीच भयानक गोष्ट नाही.

*

प्रगती हेच पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन आहे. तुम्ही जर प्रगत होत राहणे थांबविलेत तर तुम्ही मृत्युमुखी पडाल. प्रगत न होता जो कोणता क्षण तुम्ही व्यतीत करता, तो प्रत्येक क्षण तुम्हाला स्मशानाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाणारा असतो.

– श्रीमाताजी [CWM 15 : 75]

पृथ्वीवर जडद्रव्याची जी विशिष्ट परिस्थिती होती त्यामुळे ‘मृत्यू’ अपरिहार्य झाला. अचेतनतेच्या (unconsciousness) प्राथमिक पायरीपासून उत्तरोत्तर चेतनेकडे विकसित होत जाणे हाच जडतत्त्वाच्या उत्क्रांतीचा अर्थ आहे. आणि जेव्हा ही विकासाची प्रक्रिया प्रत्यक्ष घडू लागली तेव्हा या प्रक्रियेत, आकारबंधांचा विलय, विघटन ही एक अटळ अशी आवश्यकता ठरली. सुसंघटित व्यक्ति-चेतनेला एक स्थिर असा आधार मिळावा म्हणून एका निश्चित बांधीव आकाराची गरज होती. आणि असे असूनसुद्धा या आकारबंधाच्या स्थिरतेमुळेच मृत्यू अटळ बनला. जडद्रव्य आकारबद्ध होणेच भाग होते; अन्यथा वैयक्तिकीकरण (पृथकीकरण) (individualisation) होणे आणि प्राणशक्तीला वा चेतनाशक्तीला सघन असे मूर्तरूप येणे अशक्य होते. आणि त्यांच्याविना पार्थिव, जडतत्त्वाच्या पातळीवर पुढे सुसंघटित अस्तित्व निर्माण होण्यास आवश्यक अशा पायाभूत परिस्थितीची उणीव भासली असती. पण निश्चित, घनीभूत अशी घडण होताच एकाएकी त्याच्या ठिकाणी अलवचिकता, कठीणता आणि पाषाणवतता येण्याची प्रवृत्ती आढळून आली. हा पृथक आकारबंध अतिशय बंधनकारक असा साचा बनला; तो शक्तींच्या गतीचे अनुसरण करू शकत नाही; या वैश्विक गतिमानतेशी सुमेळ राखत तो स्वत:मध्ये क्रमश: बदल घडवू शकत नाही; तो प्रकृतीच्या अपेक्षा अखंडपणे भागवू शकत नाही किंवा तिची गती देखील पकडू शकत नाही; तो प्रवाहाबाहेर फेकला जातो. मात्र एका विशिष्ट क्षणी, आकारबंध आणि त्याला चालना देणारी शक्ति या दोहोंमधील वरील प्रकारच्या वाढत्या असमानतेमुळे व विसंवादामुळे त्या आकारबंधाचे संपूर्णत: विलयन, विघटन अटळ होऊन बसते. एक नवीन आकारबंध निर्माण करावयास हवा ज्यामुळे एक नवीन (आकारबंध व त्याला चालना देणारी शक्ती यांमध्ये) सुमेळ आणि समानता शक्य होईल.

हा आहे मृत्युचा खरा अर्थ आणि ही आहे मृत्यूची प्रकृतीमधील उपयुक्तता! पण हा आकारबंध जर का अधिक वेगवान व अधिक लवचिक झाला आणि बदलत्या चेतनेनुरुप स्वत:मध्ये बदल घडविण्याविषयी शरीरातील पेशींना जागृत करता आले तर मूलगामी विघटनाची गरजच उरणार नाही, आणि मृत्यू ही अटळ गोष्ट राहणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 37)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

मानवी अस्तित्वाचे वास्तविक सत्य कोणते? सर्वोच्च ध्येय कोणते ? विश्वाच्या या महान चक्रांमध्ये युगानुयुगे माणसाचा जन्म आणि मृत्यू पुन्हापुन्हा होत राहतो ती म्हणजे एक प्रदीर्घ प्रगती असते; या प्रगतीद्वारे तो स्वतःची तयारी करत असतो आणि अमर्त्यत्वासाठी स्वतःला सुयोग्य बनवत असतो. आणि तो स्वतःला कशा प्रकारे तयार करेल? त्यासाठी योग्य माणूस कोण? मी म्हणजे प्राण आहे आणि मी म्हणजे शरीर आहे या संकल्पनेच्या जो अतीत झाला आहे; जो या जगाचे भौतिक आणि संवेदनात्मक स्पर्श त्यांच्या त्यांच्या मूल्यानुसार स्वीकारत नाही किंवा भौतिक मनुष्याला (Physical man) ते स्पर्श ज्या मोलाचे वाटतात त्या मोलाने जो हे स्पर्श स्वीकारत नाही; जो मी स्वतः आत्मा आहे आणि सर्वजण देखील आत्मे आहेत हे जाणतो, जो स्वतः स्वतःच्या शरीरामध्ये नाही तर, आत्म्यामध्ये राहायला शिकलेला आहे आणि इतरांशी व्यवहार करत असतानादेखील जो त्यांच्याशी भौतिक अस्तित्व म्हणून केवळ व्यवहार करत नाही तर, इतरांबरोबर देखील जो आत्मवत व्यवहार करतो, तो मनुष्य अमर्त्यत्वासाठी योग्य असतो. मृत्युचे अस्तित्व नसणे म्हणजे अमर्त्यत्व असा त्याचा अर्थ नाही. — ज्याला जन्मतः मन मिळालेले आहे अशा प्रत्येक प्राणिमात्राला ही गोष्ट आधीच मिळालेली असते, — परंतु अमर्त्यत्व म्हणजे जन्म आणि मृत्युच्या अतीत असणे. अमर्त्यत्व हे असे एक आरोहण असते की, ज्या आरोहणामुळे मनुष्य, मनो-मार्गदर्शित शरीर (mind-informed body) म्हणून जगणे सोडून देतो आणि अंततः आत्मा म्हणून, परम आत्म्याच्या ठिकाणी जीवन जगतो.

जो कोणी दुःख आणि शोकाच्या अधीन असतो, संवेदना आणि भावना यांचा गुलाम असतो, क्षणभंगुर गोष्टींच्या स्पर्शाने व्याप्त असतो असा कोणीही अमर्त्यत्वासाठी सुयोग्य बनू शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 61-62)

विचार शलाका – ०३

माणूस त्याच्यावरच विजय प्राप्त करून घेऊ शकतो, ज्याला तो घाबरत नाही. आणि जो मरणाला घाबरतो त्याला मृत्युने आधीच पराभूत केलेले असते.

*

मृत्युवर मात करण्यासाठी आणि अमरत्व जिंकून घेण्यासाठी, व्यक्तीने मृत्युला घाबरता कामा नये तसेच त्याची आसही बाळगता कामा नये.

*

आपण प्राप्त करून घेऊ इच्छितो ते आपले साध्य आहे ‘अमरत्व’ ! आणि सर्व सवयींपैकी मृत्यू ही निश्चितपणे सर्वाधिक हटवादी सवय आहे.

*

तू संपूर्ण परित्यागाविषयी बोलत आहेस, पण देहाचा त्याग हा काही संपूर्ण परित्याग नव्हे. ‘अहं’चा त्याग हाच खरा आणि संपूर्ण परित्याग असतो की जो देहत्यागापेक्षा देखील अधिक दुःसाध्य असा प्रयत्न असतो. जर तुम्ही अहंचा परित्याग केला नसेल तर नुसत्या देहत्यागामुळे तुम्हाला मुक्तता मिळणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 120), (CWM 15 : 120), (CWM 15 : 120), (CWM 15 : 119)

अमर्त्यत्व म्हणजे काय ?

 

अमर्त्यत्व म्हणजे मृत्युनंतर मानसिक व्यक्तिमत्त्व टिकून राहणे नव्हे, (अर्थात तेही खरंच आहे) तर अमर्त्यत्व म्हणजे, शरीर हे ज्याचे केवळ एक साधन असते, एक छाया असते त्या अजन्मा आणि मृत्युहीन असलेल्या आत्म्याचे जागृत आधिपत्य असते. (श्रीअरविंदलिखित या वचनावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणतात) …अमर्त्यत्व म्हणजे अनादी आणि अनंत असे जन्मरहित किंवा मृत्युरहित जीवन होय, जे शरीरापासून पूर्णतः स्वतंत्र असते. हे आत्म्याचे जीवन असते, प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत अस्तित्वाचे ते जीवन असते आणि ते विश्वात्मक आत्म्यापासून विभक्त नसते. आणि हे जे मूलभूत अस्तित्व असते त्याला आपल्या विश्वात्मक आत्म्याशी असलेल्या एकत्वाची जाण असते; वास्तविक हे अस्तित्व म्हणजे साक्षात या विश्वात्मक आत्म्याचे व्यक्तिरूपाने अभिव्यक्त झालेले व्यक्तिमत्त्व असते आणि त्याला आदी नसतो किंवा अंतही नसतो, त्याला जन्म नसतो, मृत्युही नसतो, ते शाश्वतपणे अस्तित्वात असते आणि ते अमर्त्य असते. आपण जेव्हा या आत्म्याविषयी पूर्णपणे जागृत होतो तेव्हा आपण त्याच्या शाश्वत जीवनामध्ये सहभागी होतो आणि त्यामुळे आपणही अमर्त्य होतो.

– श्रीमाताजी

(CWM 10 : 27-28)

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

मृत्यु अशी कोणती गोष्टच अस्तित्वात नाही, कारण, शरीर नष्ट होते पण शरीर म्हणजे काही मनुष्य नव्हे. जे अस्तित्वविहीन (nonexistent) आहे ते कधीही अस्तित्वात येऊ शकत नाही, तद्वतच जे वस्तुतः अस्तित्वात आहे, त्याचे अस्तित्व कधीही लोप पावू शकत नाही; ते ज्या माध्यमांतून प्रकट होते त्या माध्यमांची रूपे बदलू शकतात परंतु त्याचे अस्तित्व मात्र लोप पावू शकत नाही. आत्मा असतोच आणि तो कधीही नष्ट होऊ शकत नाही. अस्तित्वात असणे आणि नसणे यामधील विरोध, अस्तित्व (Being) आणि अस्तित्वात येणे (Becoming) यांच्यामधील समतोल हा मनाचा अस्तित्वविषयक दृष्टिकोन असतो; आणि या दृष्टिकोनाचा निरास तेव्हाच होतो जेव्हा आत्मा हाच एकमेव अविनाशी असून, त्याच्याद्वारेच या विश्वाचा विस्तार झाला आहे; हा साक्षात्कार मनाला होतो. समर्याद शरीरांना अंत असतो, परंतु त्याच्यावर ज्याची सत्ता असते, जो या शरीराचा वापर करतो तो (आत्मा) मात्र अनंत, अमर्याद, शाश्वत आणि अविनाशी असतो. मनुष्य ज्याप्रमाणे जीर्ण झालेली वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो त्याप्रमाणेच तोसुद्धा जुने शरीर त्यजून नवीन देह धारण करतो. आणि यामध्ये दुःख करण्यासारखे, खचून जाण्यासारखे किंवा कोमेजून जाण्यासारखे काय आहे ? हा (आत्मा) जन्माला येत नाही किंवा तो मरतही नाही; जी एकदाच अस्तित्वात येते आणि ती निघून गेली तर पुन्हा अस्तित्वातच येणार नाही, अशी काही ही गोष्ट नाही. ती गोष्ट अजन्मा, पुरातन आणि शाश्वत आहे; शरीराच्या हत्येने तिची हत्या होत नाही. अमर्त्य आत्म्याची हत्या कोण करू शकेल ? शस्त्रांनी त्याचा छेद करता येत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही किंवा पाणी त्याला बुडवू शकत नाही किंवा वारा त्याला सुकवू शकत नाही. शाश्वतपणे स्थिर, अविचल, सर्वव्यापी असणारा तो आत्मा सदैव, अगदी नेहमीच अस्तित्वात असतो. शरीराप्रमाणे तो व्यक्त होत नाही पण सर्व व्यक्ताहून तो अव्यक्त आत्मा श्रेष्ठ आहे. विचारांनी त्याचे विश्लेषण करता येत नाही तरीही समग्र मनापेक्षा तो महान असतो; जीवन, त्याची अंगे आणि जीवनाच्या विषयांप्रमाणे आत्म्यामध्ये परिवर्तन आणि फेरबदल होणे शक्य नसते; परंतु, तो मन, प्राण आणि शरीराच्या परिवर्तनापलीकडचा असूनही, हे सर्व जण जिचे आकलन करून घेण्यासाठी धडपड करत असतात अशी ती एक सद्वस्तु असते.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 62-63)

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

आपण सारे एकच आत्मा आहोत, आपण तो ईश्वर आहोत, आपल्या आकलनापलीकडे असणारे अद्भुत असे म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, त्याच्याविषयी बोलतो, त्याच्याविषयी ऐकतो. आपण कितीही धडपड केली, शोध घेतला, ज्ञानी माणसांकडून ज्ञान ग्रहण केले आणि ज्ञान प्राप्त झाले असे घोषित केले तरीही कोणत्याच मानवी मनाला त्या परमतत्त्वाचे (Absolute) कधीच आकलन झालेले नाही. शरीराचा स्वामी असणारे ते परमतत्त्व, या विश्वाद्वारे झाकलेले आहे; सर्व जीवन ही केवळ त्याची पडछाया आहे; आत्म्याचे शारीरिक आविष्कारामध्ये येणे आणि मृत्युद्वारे निघून जाणे ही आत्म्याच्या अनेक गतिविधींपैकी केवळ एक किरकोळ गतिविधी आहे…

एकच गोष्ट सत्य आहे आणि त्यामध्येच आपल्याला जगायचे आहे, ते ‘शाश्वत तत्त्व’ स्वत:च्या तीर्थयात्रेच्या महान चक्रामध्ये मनुष्याचा आत्मा म्हणून स्वतःला आविष्कृत करत असते, त्या आत्म्याच्या या तीर्थयात्रेमध्ये जन्म आणि मृत्यू हे मैलाचे दगड असतात, पलीकडील विश्वं ही त्याची विश्रांतीची ठिकाणे असतात, त्यांच्या सहित तो प्रवास करत असतो. जीवनातील सर्व सुखदुःखाची परिस्थिती ही आपल्या प्रगतीची, युद्धाची, विजयाची साधने असतात, या साधनांसहित तो प्रवास करत असतो. आणि ‘अमर्त्यत्वा’सहित तो आत्मा आपल्या स्व-गृहाकडे प्रवास करत असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 63-64)

अमर्त्यत्वासंबंधी वैदिक शिकवण

मनुष्य भौतिक विश्वात राहतो, तो मरणाधीन असतो आणि मर्त्य अस्तित्वाच्या ‘पुष्कळशा असत्या’च्या तो अधीन असतो. या मरणाच्या अतीत होण्यासाठी, अमर्त्यांपैकी एक होण्यासाठी, त्याने असत्याकडून सत्याकडे वळले पाहिजे; त्याने प्रकाशाकडे वळले पाहिजे आणि अंधकाराच्या शक्तींशी लढून त्यावर विजय मिळविला पाहिजे. ईश्वरी शक्तींच्या सख्यत्वाने आणि त्यांचे साहाय्य घेऊन मनुष्य या गोष्टी करतो; ईश्वरी शक्तींच्या साहाय्यासाठी आवाहन करण्याचा हा मार्ग म्हणजे वैदिक गूढवाद्यांचे गुप्त रहस्य होते. या हेतूसाठी जगभरात, बाह्य यज्ञाच्या प्रतीकांना, गुह्य पद्धतीने आंतरिक अर्थ प्रदान करण्यात आला आहे; ती प्रतीके मानवामध्ये देवदेवतांना आवाहन करण्याचे प्रतिनिधित्व करत असतात; ती यज्ञाची प्रतीके मानव व देव यांना जोडणारी असतात, ती त्या दोहोंमध्ये घनिष्ठ विनिमय घडवत असतात, ती अन्योन्य साहाय्यक ठरतात आणि त्यांच्यामध्ये सख्य घडवून आणतात. त्यांद्वारे माणसामध्ये देवदेवतांच्या शक्ती निवास करू लागतात; तसेच त्याच्यामध्ये दिव्य प्रकृतीची विश्वव्यापकतादेखील आकाराला येते. कारण देव हे सत्याचे रक्षक आणि संवर्धक आहेत, ते अमर्त्यत्वाच्या शक्ती आहेत, ते अनंत मातेचे पुत्र आहेत; अमर्त्यत्वाकडे जाणारा मार्ग हा देवांचा ऊर्ध्वगामी मार्ग आहे, तो सत्याचा मार्ग आहे, तो एक प्रवास आहे, “ऋतस्य पंथः” असे ज्याला म्हटले जाते त्या सत्याच्या धर्मामध्ये मनुष्याचे उन्नत होणे आहे, विकसित होणे आहे. मनुष्य स्वतःच्या केवळ शारीरिक ‘स्व’ च्या मर्यादा तोडून अमर्त्यत्वाकडे जाऊन पोहोचतो असे नाही, तर तो जेव्हा त्याच्या मानसिक आणि सामान्य आत्मिक प्रकृतीच्या मर्यादा तोडून, उच्चतर स्तरावर आणि सत्याच्या सर्वश्रेष्ठ अवकाशात जातो, तेव्हाच तो अमर्त्यत्वाप्रत पोहोचतो. कारण तेथेच अमर्त्यत्वाचा पाया असतो आणि तेथे त्रिविध अनंताचे स्वाभाविक निवासस्थान आहे. या संकल्पनांवरच वैदिक ऋषींनी मनोवैज्ञानिक आणि आत्मिक साधनेची उभारणी केली; नंतर हीच साधना स्वतःच्या पलीकडे जात सर्वोच्च आध्यात्मिकतेकडे गेली आणि त्यातच उत्तरकालीन भारतीय योगाचा गाभा सामावला गेला.

*

आपल्यामध्ये असणाऱ्या ईश्वराप्रत उन्नत झाल्याने, आपण स्वतंत्र होतो, या विश्वाच्या बंधनामधून आणि मृत्युपाशापासून मुक्त होतो. कारण ईश्वर म्हणजे स्वातंत्र्य, ईश्वर म्हणजे अमर्त्यत्व. “मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्र्नुते” अर्थात मृत्युच्या अतीत होऊन आपण अमर्त्यत्व अनुभवतो.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 202-203), (CWSA 17 : 304)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – १०

आता आपण सर्वात भयंकर अशा लढाईकडे वळतो; देहामध्ये लढले जाणारे हे शारीरिक युद्ध, कोणत्याही विश्रांतीविना किंवा कोणत्याही तहाविना सुरु असते. हे युद्ध जन्माबरोबरच सुरू होते आणि दोन प्रतिस्पर्ध्यांपैकी एकाच्या पराभवानेच ते संपुष्टात येणे शक्य असते. एकतर रूपांतरण-शक्तीचा (force of transformation) पराभव होतो किंवा विघटन-शक्तीचा (force of disintegration) पराभव होतो. जन्माबरोबरच या संघर्षाला सुरुवात होते असे मी म्हटले याचे कारण असे की, बऱ्याच काळानंतर जरी या दोन प्रक्रियांमधील संघर्षामध्ये जाणीवपूर्वकता आणि हेतुपूर्वकता येत असली तरी, खरे तर व्यक्ती जेव्हा या विश्वात प्रविष्ट होते अगदी त्या क्षणीच या दोन्ही प्रक्रियांमधील संघर्षाला सुरुवात झालेली असते. कारण ज्याप्रमाणे वाढ, सुसंवादी विकास, आक्रमणाचा प्रतिकार, आजारपणापासून सुटका होऊन परत सामान्य जीवन सुरळीत होणे, प्रत्येक प्रगमनशील सुधारणा, या गोष्टी रूपांतरकारी शक्तीच्या कार्याचे परिणाम असतात; अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक अस्वास्थ्य, प्रत्येक आजार, प्रत्येक विकृती, प्रत्येक अपघात हे विघटनकारी-शक्तीच्या कार्याचे परिणाम असतात. नंतर जेव्हा, चेतनेच्या विकासाबरोबर, ही लढाई हेतुपुरस्सर होते, तेव्हा त्याची परिणती या दोन विरोधी आणि प्रतिस्पर्धी प्रक्रियांमधील उन्मत्त स्पर्धेमध्ये होते; रूपांतरण की मृत्यू, या दोहोंपैकी आधी कोण आपले ध्येय गाठणार हे पाहण्याची एक शर्यतच सुरू होते. ही शर्यत म्हणजे निरंतर प्रयत्न, पुनरुज्जीवनकारी शक्तीला तिने खाली अवतरावे म्हणून तिच्यावर सातत्याने केलेले ध्यान आणि या शक्तीप्रत पेशींची ग्रहणशीलता वाढावी म्हणून केलेले प्रयत्न असतात. ही शर्यत म्हणजे, विध्वंस व अवनती यांच्या विनाशकारी शक्तीकार्याच्या विरोधात क्रमाक्रमाने दिलेली झुंज असते. ज्या ज्या कोणत्या गोष्टी आरोहणकारी उर्मीला प्रतिसाद देण्यास सक्षम असतील; ज्या प्रबोधनाला, शुद्धीकरणाला आणि स्थिरतेला प्रतिसाद देण्यासाठी सक्षम असतील अशा प्रत्येक गोष्टीभोवती असलेली या विनाशकारी शक्तींची पकड ढिली करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न म्हणजे ही शर्यत असते. हा संघर्ष अंधकारमय आणि दुराग्रही असतो, बहुधा यामध्ये कोणतेही दृश्य परिणाम दिसून येत नाहीत किंवा जे आंशिक विजय प्राप्त केले गेले त्यांच्या कोणत्याही बाह्य खाणाखुणाही दिसून येत नाहीत आणि हे विजयदेखील नेहमीच अनिश्चित स्वरूपाचे असतात. – कारण जे कार्य झाले आहे ते पुन्हा करण्याची आवश्यकता आहे, असे नेहमीच वाटत राहते; पुढे टाकलेले प्रत्येक पाऊल हे, इतरत्र कोठेतरी माघार घ्यावी लागल्याची किंमत चुकती करूनच पुढे पडत असते. आणि आदल्या दिवशी जे काम केलेले असते ते दुसऱ्याच दिवशी पुन्हा पूर्वपदास आलेले असते. वस्तुतः, विजय तेव्हाच निश्चित आणि चिरस्थायी होऊ शकेल जेव्हा तो संपूर्ण विजय असेल. या साऱ्याला वेळ लागतो, खूप काळ लागतो, वर्षेच्या वर्षे निष्कारणपणे लोटतात, आणि त्यामुळे प्रतिकूल शक्तींची ताकद मात्र वाढते.

एखाद्या खंदकाजवळ जसा पहारेकरी उभा असावा तशी चेतना सदासर्वकाळ उभी असते; भीतीचा लवलेश नको किंवा दक्षतेमध्येही कसर नको अशा पद्धतीने, तुम्ही मात्र दृढ राहिलेच पाहिजे, कोणतीही किंमत द्यावी लागली तरीही तुम्ही दृढ राहिले पाहिजे, जे जीवितकार्य पूर्ण करायचे आहे त्यावर अविचल श्रद्धा ठेवत आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या, तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या आणि तुम्हाला टिकवून ठेवणाऱ्या शक्तीच्या साहाय्यावर तुम्ही अविचल श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण जो अतीव तितिक्षा (endurance) बाळगतो, त्याचाच शेवटी विजय होतो.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 86-87)