Tag Archive for: मुक्ती

साधना, योग आणि रूपांतरण – २६६

प्राणाचे रूपांतरण

संपूर्ण प्राणिक प्रकृतीचे शुद्धीकरण व्हावे आणि सर्व अहंभावात्मक इच्छावासना व आवेग नाहीसे होऊन, ‘ईश्वरी संकल्पा’शी सुसंगत असतील तेवढ्याच शुद्ध, सात्त्विक वृत्तीप्रवृत्ती शिल्लक राहाव्यात यासाठी, संपूर्ण प्राणिक प्रकृती आणि तिच्या वृत्तीप्रवृत्ती ‘ईश्वरा’ला अर्पण करणे म्हणजे प्राणाचे स्वाहाकरण (vital consecration) होय.
*
साधक : ‘प्राणाचे स्वाहाकरण’ म्हणजे काय ?
श्रीअरविंद : समग्र प्राणिक प्रकृती ही कनिष्ठ प्रकृतीशी नव्हे तर, श्रीमाताजींशी संबंधित व्हावी यासाठी, समग्र प्राणिक प्रकृती श्रीमाताजींना समर्पित करणे आणि ती शुद्ध बनविणे, म्हणजे ‘प्राणाचे स्वाहाकरण’.
*
तुम्हाला ज्या मुक्तीची आस लागली आहे ती साधकासाठी खरोखरच अत्यंत आवश्यक असते. आणि याचा अर्थ, प्रकृतीच्या समग्र प्राणिक भागाच्या मुक्तीची आस असा आहे. मात्र ही गोष्ट एकाएकी किंवा इतक्या सहजतेने करता येणे शक्य नसते. तुमची तळमळ ही सातत्यपूर्ण, धीरयुक्त आणि चिकाटीची असली पाहिजे, (ती तशी असेल तरच) अंतिमतः तिचा विजय होईल. वरून उच्चतर स्थिरता आणि शांती आपल्या प्रणालीमध्ये (system) खाली अवतरावी म्हणून तिला आवाहन करणे ही मुख्य गोष्ट असते; ती अवतरित होत आहे अशी जाणीव जर तुम्हाला होत असेल तर तो मुक्तीचा आरंभ असतो.
*
खरी चेतना तुमच्या प्राणामध्ये अवतरित होत होती, परंतु तुमच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा जुनीच अडचण उफाळून आली आहे, पुन्हा एकदा प्राणिक हल्ला झालेला आहे. जेव्हा तुमचा प्राण अशांत, विचलित न होता, किंवा आक्रंदन न करता, सदोदित या हल्ल्याला सामोरा जाऊ शकेल आणि तुमच्या अंतरंगात स्थिरशांत असणारी प्रतिकार व अस्वीकार करणारी शक्ती जेव्हा दूर लोटून तिचा प्रतिबंध करेल, तेव्हा ती संपूर्ण मुक्तीची खूण असेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 113, 313), (CWSA 31 : 111, 111 )

साधना, योग आणि रूपांतरण – १७६

योगमार्ग अनेक आहेत, आध्यात्मिक साधनापद्धती अनेक आहेत, मुक्ती आणि पूर्णत्वाप्रत घेऊन जाणारे मार्ग अनेक आहेत, आत्म्याचे ‘ईश्वरा’भिमुख असणारे मार्ग अनेक आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे असे स्वतंत्र ध्येय असते, त्या ‘एकमेवाद्वितीय सत्या’बाबतचे प्रत्येकाचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन असतात, प्रत्येकाच्या स्वतंत्र पद्धती असतात, प्रत्येकास साहाय्यभूत असे तत्त्वज्ञान आणि त्याची साधनापद्धती असते. ‘पूर्णयोग’ या साऱ्या पद्धतींचे सारग्रहण करतो आणि त्यांच्या ध्येयांच्या, पद्धतींच्या, दृष्टिकोनांच्या एकीकरणाप्रत (तपशिलांच्या एकीकरणाप्रत नव्हे, तर सत्त्वाच्या (essence) एकीकरणाप्रत) पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ‘पूर्णयोग’ म्हणजे जणू ‘सर्वसमावेशक तत्त्वज्ञान आणि साधना’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 356)

साधना, योग आणि रूपांतरण – ७७

[श्रीअरविंद येथे अवरोहण (descent) प्रक्रियेच्या संदर्भात काही सांगत आहेत.]

पूर्वीचे योग हे प्रामुख्याने अनुभवांच्या मनो-आध्यात्मिक अतींद्रिय श्रेणींपुरतेच मर्यादित असत. त्यामध्ये उच्चतर अनुभव हे स्थिर मनामध्ये किंवा एकाग्रचित्त हृदयामध्ये एक प्रकारे झिरपत येतात किंवा प्रतिबिंबित होतात. या अनुभवाचे क्षेत्र हे ब्रह्मरंध्रापासून खाली असते. साधक (ब्रह्मरंध्राच्या) वर फक्त समाधी अवस्थेमध्येच जात असत किंवा अचल मुक्तीच्या स्थितीमध्ये जात असत, पण त्यांना गतिशील अवरोहणाचा कोणताही अनुभव येत नसे. (मला) जे जे गतिशील अनुभव आले होते ते सर्व अनुभव, आध्यात्मिकीकरण झालेल्या मनाच्या आणि प्राणिक-शारीरिक (vital-physical) चेतनेच्या क्षेत्रामध्ये आले होते. (काही विशिष्ट मनो-आध्यात्मिक-अतींद्रिय अनुभवांद्वारे, साधकाच्या कनिष्ठ क्षेत्राची, प्रकृतीची पूर्वतयारी झाल्यानंतर), पूर्णयोगामध्ये चेतना ही ब्रह्मरंध्राच्या वर, मूलभूत आध्यात्मिक चेतनेशी संबंधित असणाऱ्या उच्चतर श्रेणींप्रत ऊर्ध्वाभिमुख केली जाते. आणि तेथून नुसते काही ग्रहण करण्याऐवजी, चेतनेने तिथे निवास करून, तेथून कनिष्ठ चेतना पूर्णपणे परिवर्तित करणे अपेक्षित असते. कारण आध्यात्मिक चेतनेला साजेशी गतिशीलता, क्रियाशक्ती (dynamism) तेथे असते. दिव्य ‘प्रकाश’, ‘ऊर्जा’, ‘आनंद’, ‘शांती’, ‘ज्ञान’ आणि अनंत ‘बृहत्व’ हे तिचे स्वरूप असते आणि त्यांचे समग्र अस्तित्वामध्ये अवरोहण झाले पाहिजे. आणि साधकाने या सर्व गोष्टी प्राप्त करून घेतल्या पाहिजेत. अन्यथा त्याला मुक्ती लाभू शकते (सापेक्ष मनो-आध्यात्मिक बदल घडू शकतो.) परंतु त्याला पूर्णत्व मिळत नाही किंवा त्याचे रूपांतरण होऊ शकत नाही.

परंतु मी जर तसे म्हटले तर, ‘प्राचीन संतमहात्म्यांना अवगत नसलेले ज्ञान माझ्यापाशी आहे,’ असा दावा मी करत आहे आणि मी संतमहात्म्यांच्या अतीत गेलो असल्याचे दाखवितो आहे, अशी लोकांची समजूत होईल आणि या अक्षम्य गृहितकाच्या विरोधात गदारोळ उठेल. या संदर्भात मी असे म्हणू शकतो की, उपनिषदांमध्ये (नेमकेपणाने सांगायचे तर तैत्तरिय उपनिषदामध्ये) या उच्चतर स्तरांचे व त्यांच्या स्वरूपाचे आणि समग्र चेतना एकवटण्याच्या व त्या स्तरांमध्ये आरोहण करण्याच्या शक्यतेचे काही संकेत मिळतात. परंतु कालांतराने हे ज्ञान विस्मृतीमध्ये गेले आणि बुद्धी हीच सर्वोच्च गोष्ट आहे, आणि तिच्या किंचित वर ‘पुरूष’ किंवा ‘आत्मा’ आहे असे लोकं म्हणू लागले. परंतु त्यांना या उच्चतर स्तरांची सुस्पष्ट कल्पना नव्हती. परिणामी, समाधी अवस्थेमध्ये संभवतः, अज्ञाताप्रति आणि अनिर्वचनीय स्वर्गीय प्रदेशांमध्ये आरोहण होण्याची शक्यता असे; पण अवरोहण शक्य होत नसे. आणि त्यामुळे तशी संसाधनेसुद्धा उपलब्ध नसत; त्यामुळेच येथे भौतिकामध्ये रूपांतरणाचीही कोणती शक्यताच नसे. केवळ या जीवनापासून सुटका आणि गोलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, शिवलोकामध्ये किंवा परब्रह्मामध्ये मुक्ती लाभत असे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 378-379)

आध्यात्मिकता २५

आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक चेतना तुम्हाला सखोल आंतरिक साक्षात्कार प्रदान करते, ती तुमचा ‘ईश्वरा’शी संपर्क करून देते, बाह्य बंधनांपासून मुक्ती देते; परंतु ही मुक्ती परिणामकारक व्हायची असेल तर, आणि या मुक्तीचा जिवाच्या इतर घटकांवरदेखील परिणाम व्हायला हवा असेल तर, ‘ज्ञाना’चा आध्यात्मिक प्रकाश धारण करण्याइतपत मन पुरेसे खुले झाले पाहिजे; दृश्य रूपांच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तींना हाताळण्याइतपत आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्याइतपत प्राण सशक्त झाला पाहिजे; हा सखोल अनुभव दैनंदिन जीवन-व्यवहारांमध्ये आणि प्रत्येक क्षणी अभिव्यक्त करणे शक्य व्हावे आणि समग्रतया तो अनुभव जगता यावा यासाठी शरीराला शिस्त लावली पाहिजे, त्याची नीट व्यवस्था लावली पाहिजे.

…आपल्याला जीव म्हणून जर समग्र, पूर्ण बनायचे असेल, पूर्ण साक्षात्कार व्हावा असे जर आपल्याला वाटत असेल तर, आलेला आध्यात्मिक अनुभव आपल्याला मनाद्वारे, प्राणाद्वारे आणि शरीराद्वारे अभिव्यक्त करता आला पाहिजे. आणि आपली अभिव्यक्ती जितकी जास्त निर्दोष असेल, आणि ती एका समग्र आणि परिपूर्ण जिवाकडून कार्यवाहीत झाली असेल, तर आपला साक्षात्कार हा अधिक समग्र आणि परिपूर्ण असेल.

– श्रीमाताजी [CWM 09 : 345-346]

कर्म आराधना – १८

(भगवद्गीता ही प्राणिक इच्छांवर मानसिक नियंत्रणाचा नियम सांगून थांबत नाही, तर ती अमर्त्य आत्म्याची अचलता प्रतिपादित करते.)

सर्व परिणामांबाबत, सर्व प्रतिक्रियांबाबत, सर्व घटनांबाबत ‘मनाची आणि हृदयाची संपूर्ण समता’ ही कसोटी असल्याचे भगवद्गीता सांगते. सद्भाग्य असो वा दुर्भाग्य, सन्मान असो वा अपमान, कीर्ती असो वा दुष्कीर्ती, जय असो वा पराभव, सुखद असोत किंवा दुःखद घटना, या गोष्टी आपल्याला हादरवून टाकत नसतील, इतकेच नव्हे तर त्याचा स्पर्शही जर आपल्याला होत नसेल, भावभावनांपासून आपण मुक्त असू, मज्जागत प्रतिक्रियांपासून आपण मुक्त असू, मानसिक दृष्ट्या आपण मुक्त असू, अस्वस्थ न होता वा आपल्या प्रकृतीमध्ये कोणतेही स्पंदन उत्पन्न होऊ न देता जर आपण त्याला प्रतिसाद देत असू, तर मग ‘गीता’ आपल्याला जिचा निर्देश करते ती संपूर्ण मुक्ती आपल्याला लाभलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो, अन्यथा नाही. (आपली) अगदी बारीकशीही प्रतिक्रिया ही साधना अपूर्ण असल्याचे द्योतक आहे आणि आपल्यामधील काही भाग अज्ञान आणि बंध हा त्यांचा धर्म आहे असे मानत असल्याचे तसेच, तो भाग अजूनही जुन्या प्रकृतीलाच चिकटून असल्याचे द्योतक आहे. आपला आत्म-जय हा अजूनही आंशिक रीतीनेच साध्य झाला आहे आणि आपल्या प्रकृतीच्या भूमीमधील एखादा अल्पसा कण, किंवा एखादा भाग किंवा काही प्रदेश हा अजूनही अपूर्ण आहे वा अ-वास्तव आहे, याचे ते निदर्शक आहे. आणि अपूर्णतेचा तो छोटासा कण आपल्या ‘योगा’ची सारी सिद्धी मातीमोल करू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 103)

(श्रीमाताजींनी ‘विश्वात्मक’ प्राणाशी किंवा ‘ईश्वरी’ आनंदाशी एकात्म पावलेल्या व्यक्तिगत प्राणासंबंधी विवेचन केले आहे. एकदा का ही एकात्मता साधली की मग प्राणाचे व्यक्तिगत अस्तित्व शिल्लक राहत नाही, असे त्या म्हणतात.)

उदाहरणार्थ, क्वचितच एखाद्या मानवी वातावरणाने दूषित न झालेल्या गावाकडील निर्जन रस्त्यावरून, जेथे निसर्ग एखाद्या अभीप्सेसारखा, एखाद्या पवित्र प्रार्थनेसारखा अगदी शांत, विशाल, विशुद्ध असतो अशा ठिकाणी किंवा पर्वतराजीमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, शेजारून खळाळणारे पाण्याचे प्रवाह जिथे वाहत आहेत अशा भटक्या वाटांवरून, किंवा अथांग सागरकिनाऱ्यावरून व्यक्ती जेव्हा एकटीच आपल्या नादात फिरत असते, किंवा ज्याच्याबरोबर त्या व्यक्तीचा पूर्ण सुसंवाद असतो अशा जोडीदाराच्या सहवासात विहार करत असते, तेव्हा तेथे तिला जी संवदेना जाणवत असते ती म्हणजे एक सूक्ष्मसा आनंद असतो, तो मधुर आणि अगाध असतो. जोपर्यंत प्राण व्यक्तिगत असतो, तोपर्यंत हा आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो. जेव्हा (व्यक्तीचा) ‘प्राण’ खऱ्या अर्थाने अवैयक्तिक, विश्वात्मक झालेला असतो, तेव्हा ‘ज्यांना ज्यांना त्याची जाणीव असते त्या सर्वांमध्ये असलेला, आल्हाददायक आनंदच’ ती व्यक्ती होऊन जाते; अशा वेळी व्यक्तीला त्या गोष्टीचा आनंदोपभोग घेण्यासाठी, आजूबाजूला कोणतीही विशिष्ट भौतिक परिस्थिती असण्याची आवश्यकता नसते. नाडीगत स्तराबाबत (Nervous plane) सांगायचे तर, अशावेळी व्यक्ती सर्व प्रकारच्या परिस्थितींपासून पूर्णतः मुक्त असते. त्यावेळी व्यक्तीला मुक्ती प्राप्त झालेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 119-120)

विचार शलाका – ३८

आपण ज्या ‘योगा’चा (पूर्णयोगाचा) अभ्यास करतो आहोत तो आपण केवळ स्वतःसाठी करत नाही, तर ‘ईश्वरा’साठी करतो; ‘ईश्वरा’ची इच्छा या जगामध्ये कार्यकारी व्हावी; आध्यात्मिक परिवर्तन घडून यावे; आणि मानसिक, प्राणिक व शारीरिक प्रकृतीमध्ये तसेच मानवी जीवनामध्ये दिव्य प्रकृती आणि दिव्य जीवन उतरवावे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. ‘मुक्ती’ ही या योगाची आवश्यक अट असली तरी, वैयक्तिक ‘मुक्ती’ हे त्याचे उद्दिष्ट नाही; तर मानवाची मुक्ती आणि त्याचे रूपांतरण हे या योगाचे उद्दिष्ट आहे. वैयक्तिक ‘आनंद’ नव्हे, तर दिव्य ‘आनंद’ खाली भूतलावर उतरविणे, ‘ख्रिस्ता’चे स्वर्गसाम्राज्य आणि आपले ‘सत्ययुग’ या पृथ्वीवर अवतरविणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. मोक्षाबाबत म्हणाल तर, आपल्याला वैयक्तिकरित्या त्याची आवश्यकता नाही, कारण आत्मा हा नित्यमुक्तच असतो आणि बंधन हा भ्रम आहे. वास्तविक आपण बद्ध नाही परंतु आपण बद्ध असल्याप्रमाणे लीलेमध्ये सहभागी होतो. जेव्हा ‘देवाची’ इच्छा होईल तेव्हा आपण मुक्त होऊ शकतो. कारण तो, आपला परम ‘आत्मा’ हाच या खेळाचा स्वामी आहे आणि त्याच्या कृपेविना आणि त्याच्या अनुमतीविना कोणताही जीव हा खेळ सोडून जाऊ शकत नाही. बरेचदा आपल्यातील ‘देवाची’ इच्छाच आपल्या मनाला अज्ञानाच्या भोगामधून, द्वैतामधून, सुख आणि दुःखामधून, मौजमजा आणि वेदना यांतून, पापपुण्यामधून, भोग आणि त्यागामधून घेऊन जात असते. युगानुयुगे, अनेकानेक देशांमध्ये त्याच्या मनाला योगाचा विचार देखील शिवत नाही आणि तो शतकानुशतके हा खेळ अथकपणे खेळत राहतो. यामध्ये गैर असे काही नाही किंवा आपण ज्याचा धिक्कार करावा असेही त्यात काही नाही किंवा आपण स्वतःचा संकोच करावा असेही त्यात काही नाही, कारण ही ‘देवाची’ लीला आहे. खरा ज्ञानी मनुष्य तोच की, जो हे सत्य ओळखतो, स्वतःचे स्वातंत्र्य ज्ञात करून घेतो आणि तरीही ‘देवा’च्या या खेळामध्ये सहभागी होतो आणि या खेळाची पद्धत बदलण्यासाठी म्हणून त्याच्या आज्ञेची वाट पाहात राहतो.

आता ही आज्ञा झाली आहे. सर्व प्रकारच्या संधी आणि संकटांमधून, काही मोजक्या किंवा अनेकांच्याद्वारे, सातत्याने उच्चतर ज्ञान जतन व्हावे म्हणून देव स्वतःसाठी असा एक खास देश निवडतो आणि सद्यस्थितीत, या चतुर्युगामध्ये तरी तो देश भारत आहे. जेव्हा तो देव अज्ञानाचे, द्वैताचे, संघर्षाचे, वेदनेचे आणि अश्रूंचे, दुर्बलतेचे, स्वार्थीपणाचे, तामसिक व राजसिक सुखोपभोगांचे, थोडक्यात म्हणजे कालीच्या लीलेचे पूर्ण सौख्य उपभोगण्याचे ठरवितो तेव्हा, तो भारतातील ज्ञान मंदावतो, भारताला दुर्बलतेमध्ये आणि अवनतीमध्ये लोटतो, जेणेकरून भारताने स्वतःमध्येच विश्राम करावा आणि त्याच्या लीलेच्या गतिविधींमध्ये हस्तक्षेप करू नये. जेव्हा त्याला स्वतःला या दलदलीमधून वर उठण्याची इच्छा होते आणि मानवातील नारायण हा पुन्हा एकदा बलवान, प्रज्ञावान आणि आनंदपूर्ण बनावा असे त्याला वाटते; तेव्हा तो भारतामध्ये ज्ञानवर्षाव करतो आणि भारताची अशा रीतीने उन्नती घडवून आणतो की ज्यामुळे, भारताने ज्ञान व त्याच्या परिणामस्वरूप येणारी बलवत्ता, प्रज्ञा आणि आनंद या गोष्टी अखिल विश्वाला प्रदान कराव्यात. जेव्हा ज्ञानाचे संकोचन झाल्याची प्रवृत्ती आढळून येते, तेव्हा भारतातील योगी हे या विश्वापासून दूर होत, स्वतःच्या मुक्तीसाठी व आनंदासाठी किंवा काही मोजक्या शिष्यांच्या मुक्तीसाठी योगाभ्यास करतात; पण जेव्हा ज्ञानप्रवृत्ती पुन्हा एकदा प्रसरण पावते तेव्हा त्याबरोबर भारताचा आत्माही विस्तार पावतो, तेव्हा ते योगी पुनश्च पुढे येतात आणि या जगामध्ये, जगासाठी कार्य करत राहतात. जनक, अजातशत्रू, कार्तवीर्य यांसारखे योगी मग पुन्हा विश्वसिंहासनावर विराजमान होतात आणि राष्ट्रांवर राज्य करू लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 71-72)

विचार शलाका – ३७

पूर्ण ज्ञान, पूर्ण कर्म आणि पूर्ण भक्ती यांचे एकत्रीकरण करणे, त्यांचा समन्वय करणे आणि त्यांना मनोमय पातळीवरून ‘विज्ञाना’च्या अतिमानसिक पातळीवर उन्नत करून, त्यांना परिपूर्ण असे पूर्णत्व प्रदान करणे, हे ‘पूर्णयोगा’चे मूलतत्त्व आहे. जुन्या योगमार्गांध्ये अशी त्रुटी होती की, मन आणि बुद्धी ज्ञात असूनही, ‘आत्मा’ ज्ञात असूनही, ते योग केवळ मनाच्या स्तरावरील आध्यात्मिक अनुभव घेण्यावरच समाधानी राहिले. परंतु मन हे अनंताचे, अ-भंगाचे केवळ आंशिकच आकलन करून घेऊ शकते; ते अनंत, अ-भंगाला पूर्णांशाने कवळू शकत नाही. त्याला कवळून घेण्याचा मनाचा मार्ग म्हणजे एकतर भावसमाधीद्वारे, मोक्षाच्या मुक्तीद्वारे किंवा निर्वाणाच्या विलयाद्वारे किंवा तत्सम गोष्टींद्वारे त्याला जाणून घेणे हा असतो. त्याच्यापाशी अन्य कोणताच मार्ग नाही. कोठे तरी कोणीतरी एखादाच खरोखरी ही अ-लक्षण मुक्ती मिळविण्यामध्ये यशस्वी होतो, पण त्याचा काय उपयोग? ‘चैतन्य’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ कायम आहेतच की! परंतु मनुष्य या इथेच मूर्तिमंत ‘ईश्वर’ व्हावा, व्यक्तिगतरित्या आणि सामूहिकरित्याही तो ‘ईश्वर’च व्हावा, त्याने या जीवनामध्येच ‘देवा’चा साक्षात्कार करून घ्यावा, अशी ‘ईश्वरा’ची अपेक्षा आहे. योगाच्या जुन्या पद्धती, आत्मा आणि जीवन यांचे ऐक्य घडवून आणू शकल्या नाहीत किंवा त्या त्यांचा समन्वयही घडवून आणू शकल्या नाहीत. एकतर माया म्हणून किंवा ‘देवा’ची ही अनित्य लीला आहे असे समजून त्यांनी ऐहिकाची उपेक्षा केली. त्याचा परिणाम म्हणून जीवनशक्तीचा ऱ्हास झाला आणि ‘भारता’ची अवनती झाली. ‘भगवद्गीते’मध्ये सांगितले आहे की, ‘उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्’ म्हणजे, ”मी जर कार्य केले नाही तर हे लोक छिन्नविछिन्न होऊन जातील.” आणि खरोखर भारतातील अशी माणसं दुर्दशेला जाऊन पोहोचली आहेत. काही मोजक्या तपस्व्यांना, संन्याशांना, पुण्यात्म्यांना आणि साक्षात्कारी जीवांना मुक्ती मिळाली; काही थोडे भक्त हे देवधुंद होऊन, त्याच्या आनंदाने, देवाविषयीच्या प्रेमावेशाने नाचूबागडू लागले पण दुसरीकडे मात्र एक संपूर्ण मानववंश प्राण आणि बुद्धी यांच्या अभावी, जर अंधकाराच्या आणि निष्क्रियतेच्या खाईत जात असेल तर, ही कोणत्या प्रकारची आध्यात्मिक सिद्धी म्हणायची?

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 360-361)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

विचार शलाका – १८

अतिमानसिक अवतरण शक्य होण्यासाठी, साधकाने त्याआधी बरीच पावले टाकली असली पाहिजेत. माणूस हा बरेचदा त्याच्या पृष्ठीय मन, प्राण आणि देहामध्येच जगत असतो पण त्याच्या आतमध्ये महत्तर शक्यता असणारे एक आंतरिक अस्तित्व असते, ज्याविषयी त्याने जागृत होणे गरजेचे असते. कारण सद्यपरिस्थितीत, मानवाला त्यातील अगदी मर्यादित प्रभावच प्राप्त होऊ शकतो. आणि तो प्रभावच त्याला एका महान सौंदर्याच्या, सुसंगतीच्या, शक्तीच्या आणि ज्ञानाच्या सातत्यपूर्ण अनुसरणासाठी प्रवृत्त करतो. म्हणून ह्या आंतरिक अस्तित्वाचे टप्पे खुले करणे आणि बाह्य जीवनात जगत असतानाही अंतरंगात राहणे, त्याचे बाह्य जीवन या आंतरिक प्रकाशाने आणि ऊर्जेने प्रशासित करणे ही योगाची पहिली प्रक्रिया होय. हे करीत असताना त्याला स्वत:मध्ये त्याच्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो, की जो मानसिक, प्राणिक आणि शारीरिक घटकांचे कोणतेही वरवरचे मिश्रण असत नाही पण त्यांच्यामागे असणाऱ्या वास्तविकतेचा (Reality) काही अंश असतो, त्या एकमेवाद्वितीय ‘दिव्य अग्नी’चा तो स्फुल्लिंग असतो. त्याने त्याच्या अंतरात्म्यात निवास करणे, शुद्धीकरण करणे आणि त्याची उर्वरित सर्व प्रकृती ही ‘सत्या’कडे असलेल्या त्याच्या प्रेरणेने अभिमुख करणे शिकायला हवे. त्याच्या पाठोपाठ उर्ध्वामुखी खुलेपण आणि ‘अस्तित्वा’च्या उच्चतर तत्त्वाचे अवतरण घडून येणे शक्य आहे. पण असे असले तरीसुद्धा ती एकदम संपूर्ण अतिमानसिक ‘प्रकाश’ किंवा ‘ऊर्जा’ असणार नाही. कारण सामान्य मानवी मन आणि अतिमानसिक ‘सत्य-चेतना’ यांच्या दरम्यान चेतनेच्या अनेक पातळ्या असतात. ह्या आंतरवर्ती पातळ्या खुल्या करून त्यांची शक्ती मन, प्राण आणि शरीरात उतरवणे आवश्यक असते. केवळ त्यानंतरच ‘सत्य-चेतने’ची पूर्ण शक्ती प्रकृतीमध्ये कार्य करू शकेल. म्हणून स्वयंशिस्तीची किंवा ‘साधने’ची ही प्रक्रिया प्रदीर्घ आणि अवघड आहे पण त्यातील थोडेच असले तरीदेखील खूप प्राप्त केल्यासारखे आहे कारण त्यामुळे अंतिम मुक्ती आणि पूर्णत्व हे अधिक शक्य होते.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 548-549)