Tag Archive for: भारत

(दिनांक : १९ जून १९०९)

आम्ही जे कार्य आमच्या डोळ्यांसमोर ठेवले आहे ते केवळ यांत्रिक नाही तर, नैतिक आणि आध्यात्मिक आहे. सरकार उलथवून लावणे हे आमचे उद्दिष्ट नसून, राष्ट्रनिर्माण हे आमचे उद्दिष्ट आहे. राजकारण हा या कार्याचा एक भाग आहे, पण केवळ अंशभागच! केवळ राजकारण, केवळ सामाजिक प्रश्न, केवळ धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य वा केवळ विज्ञान यांना आपण स्वत:ला वाहून घेता कामा नये तर, या सर्वांचा समावेश आपण ज्या एका तत्त्वामध्ये करतो, जो आपल्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा धर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, जो आमच्या दृष्टीने वैश्विक देखील आहे, त्याला आपण समर्पित झाले पाहिजे. जीवनाचा एक महत्तर कायदा आहे, मानवी उत्क्रांतीचे एक महान तत्त्व आहे; आध्यात्मिक ज्ञान आणि अनुभूतीचे एक अंग आहे की ज्याचे संरक्षण करणे, ज्याचे जितेजागते उदाहरण बनणे आणि ज्याचा प्रचार करणे, हे ‘भारता’चे आजवरचे नियत कार्य राहिले आहे. हा शाश्वत धर्म आहे. परकीय प्रभावांच्या दडपणाखाली येऊन भारताने केवळ धर्माच्या आराखड्यावरील पकडच मोठ्या प्रमाणात गमावली आहे असे नव्हे तर, त्या परकीय प्रभावांच्या दडपणामुळे भारताने ह्या धर्माचे जिवंत सत्यच गमावले आहे. भारताचा हा धर्म जर आचरणात आणला गेला नाही तर हा धर्म, धर्मच असणार नाही. तो जीवनाच्या कोणत्या तरी एका भागात उपयोगात आणून पुरेसे नाही तर, तो समग्र जीवनात उपयोगात आणला पाहिजे. त्याचा आत्मा आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या राजकारणामध्ये, आपल्या साहित्यामध्ये, आपल्या विज्ञानामध्ये, आपल्या व्यक्तिभूत चारित्र्यामध्ये, आत्मीयतांमध्ये, आपल्या आशाआकांक्षामध्ये प्रविष्ट झाला पाहिजे. या धर्माचे मर्म जाणून घेणे, त्याची सत्य म्हणून अनुभूती घेणे, तो ज्या उच्च भावनांप्रत उन्नत होत आहे त्या भावना अनुभवणे आणि त्या जीवनामध्ये अभिव्यक्त करणे व प्रत्यक्षात उतरविणे म्हणजे आमच्या दृष्टीने ‘कर्मयोग’ होय. आम्ही असे मानतो की, योगसाधनेला मानवी जीवनाचे ध्येय बनविण्यासाठी भारताची उन्नती होत आहे. योगामुळेच भारताला स्वातंत्र्य, एकता आणि महानता प्राप्त करून घेण्यासाठी बळ मिळणार आहे, आणि ते सारे टिकवून ठेवण्यासाठीचे बळदेखील भारताला या योगामुळेच मिळणार आहे. आमच्या नजरेला आध्यात्मिक क्रांती दिसत आहे आणि भौतिक ही केवळ त्याची छाया आणि प्रतिक्रिया आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 24)

(इसवी सन : १८९० ते १९०६)

आपल्याकडे ज्ञानाची कमतरता आहे का? आम्ही भारतीय तर अशा देशात जन्माला आलो आहोत, अशा देशामध्ये आमचे भरणपोषण झाले आहे की, जेथे मानववंशाच्या प्रारंभापासूनचे ज्ञानसंचित आहे, हजारो वर्षांपासून वारशाने मिळालेली संपदा आपल्याकडे आहे. या ज्ञानसंचितामध्ये भर घालण्यासाठी आजही ज्ञानाचे महामेरू आपल्यामधून उदयाला येत आहेत. आपली क्षमता आक्रसलेली नाहीये, आपल्या बुद्धीची धारही बोधट झालेली नाही किंवा कमी झालेली नाहीये, बुद्धिची ग्रहणशीलता आणि लवचीकता यांमध्ये पूर्वीइतकेच वैविध्य आहे. पण हे ज्ञान मृतवत झाले आहे, त्याच्या भाराखाली आम्ही दबून गेलो आहोत; ते ज्ञान आपल्या पायांना आधार देणारे कर्मचारी होण्याऐवजी, आणि ते ज्ञान आपल्या हातांमधील शस्त्र बनण्याऐवजी, आमचा विनाश करणारे विष बनत आहे; कारण सर्वच महान गोष्टींचे स्वरूप हे असेच असते; ते म्हणजे, जर त्या गोष्टी उपयोगात आणल्या गेल्या नाहीत किंवा त्यांचा गैरवापर झाला तर त्या गोष्टी धारण करणाऱ्यावरच उलटतात आणि त्यालाच नष्ट करतात. अशा वेळी, आपले ज्ञान तामसिकतेच्या अति अवजड भाराखाली घुसमटले आहे, नपुंसकत्व आणि जडत्व यांच्या शापाखाली दडपले गेले आहे. आजही आपण कल्पनांमध्ये रमणे पसंत करतो, आपण अशी कल्पना करतो की जर आपण विज्ञान संपादन केले तर, सर्व काही ठीक होईल. पण आपण स्वत:ला आधी हे विचारले पाहिजे की, आपल्याकडे जे ज्ञान आधीपासूनच आहे, त्याचे आपण काय केले? किंवा ज्यांना विज्ञान आधीच प्राप्त झाले आहे, त्यांनी ह्या भारतासाठी काय केले? पुढाकार घेण्यास अक्षम असलेले आणि अनुकरणप्रिय असणारे आपण, आपल्याकडे शक्तिसामर्थ्य नसूनही, इंग्लंडच्या पद्धतींची नक्कल करण्यासाठी धडपडलो आणि आता आपण जपानी लोकांच्या पद्धतींची नक्कल करू पाहणार आहोत, ते तर अधिकच उत्साही लोक आहेत; आपण आता काय त्यांच्यापेक्षाही अधिक यशस्वी होण्याची आशा बाळगत आहोत? ज्ञानाची प्रचंड शक्ती, जी युरोपियन विज्ञानाने दैत्यांच्या हाती शस्त्र म्हणून देऊ केली, ती म्हणजे भीमसेनाच्या हातातील गदा आहे. दुर्बल माणूस तिचे काय करणार, पण ती चालविण्याच्या प्रयत्नात तो स्वत:च चिरडला तर जाणार नाही नां?

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 81)

(दिनांक : १९ जून १९०९)

प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ‘ईश्वरा’चे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला आमचे असे सांगणे आहे की, “जर तुमची मने युरोपियन कल्पनांनी भारलेली असतील, जर तुम्ही आपल्या जीवनाकडे केवळ भौतिक दृष्टीने पाहत असाल, तर वरील ध्येये तुम्ही स्वत:पुढे ठेवू शकणार नाही; ती साध्य करून घेणे तर दूरच. भौतिक दृष्टीने पाहिले असता तुम्ही कोणीच नाही परंतु, आध्यात्मिक दृष्टीने पाहता तुम्ही सर्वकाही आहात. भारतीय मनुष्यच केवळ सर्व गोष्टींवर खरा विश्वास ठेवू शकतो, कोणतेही कार्य करावयास धजतो, सर्वस्वाचा त्याग करू शकतो. पण त्याकरता प्रथम भारतीय व्हा. आपल्या पूर्वजांचा वारसा परत मिळवा. ‘आर्य’ विचार, ‘आर्य’ प्रणाली, ‘आर्य’ शील व ‘आर्य’ जीवन पुन्हा संपादन करा. ‘वेदान्त’, ‘गीता’, ‘योग’ ह्या गोष्टी पुनश्च प्राप्त करून घ्या. केवळ बुद्धीने अथवा भावनेने नव्हे, तर तुमच्या प्रत्यक्ष जीवनात त्या आत्मसात करा, त्यांचे आचरण करा. म्हणजे तुम्ही थोर, समर्थ, बलाढ्य, अजिंक्य आणि निर्भय व्हाल. जगण्याची किंवा मरणाची भीती तुम्हाला वाटणार नाही. अडचण आणि अशक्य हे शब्द तुमच्या शब्दकोषात राहणार नाहीत. कारण आपल्या आत्म्याच्या ठिकाणी जे सामर्थ्य असते ते शाश्वत असते. बाह्य साम्राज्य मिळविण्यापूर्वी हे तुमचे आत्मसाम्राज्य, आंतरिक ‘स्व-राज्य’ तुम्ही प्रथम परत मिळवा. तुमचे अंतरंग हे ‘मातृदेवते’चे निवासस्थान आहे. तिने तुम्हाला सामर्थ्य प्रदान करावे म्हणून तुम्ही ‘तिची’ प्रार्थना करावी यासाठी ती वाट पाहत आहे. ‘तिच्या’वर निष्ठा ठेवा, ‘तिची’ सेवा करा, तुमच्या सर्व इच्छा ‘तिच्या’ इच्छेशी एकरूप करा. तुमचा वेगळा असलेला अहं राष्ट्राच्या अहंमध्ये विसर्जित करून टाका. तुमचा विभक्त स्वार्थ मानवजातीच्या सेवेत विलीन होऊ द्या. तुमच्या अंत:करणातील सर्व सामर्थ्याचा मूळ स्रोतच हस्तगत करून घ्या. म्हणजे मग सामाजिक दृढता, बौद्धिक श्रेष्ठत्व, राजकीय स्वातंत्र्य, मानवी विचारांचे स्वामित्व, जगाचे नेतृत्व – सर्वकाही तुम्हाला दिले जाईल.”

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 27-28)

(दिनांक : १९ जून १९०९)

मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा असून, त्याला आम्ही मानतो आणि त्याचे अनुसरण करतो. आमचे मानवतेला असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वाच्या वर उठून, ज्याकडे आता मानवता वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक खोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या ह्या आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील; केवळ निसर्गाच्या शक्ती आरामदायक अशा सुखसोयींच्या सेवेत जुंपून ह्या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रीतीने विजय मिळवीत, माणसाचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करत, बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवूनच ह्या समस्या सोडविता येतील. या कार्यासाठी आशिया खंडाचे पुनरुत्थान गरजेचे असल्यामुळेच आशिया खंडाचा उत्कर्ष होत आहे. या कार्यासाठी भारताचे स्वातंत्र्य व त्याची महानता यांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच भारत त्याच्या नियत अशा स्वातंत्र्याचा व महानतेचा दावा करीत आहे. आणि हा दावा मानवतेच्या भल्यासाठी आहे, यात इंग्लडला सुद्धा वगळलेले नाही, अशा या मानवतेच्या भल्यासाठी भारताने हा दावा प्रस्थापित केलाच पाहिजे.”

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 27)

(दिनांक : १९ जून १९०९)

भारतामध्ये राष्ट्रनिर्माणाचे जे कार्य सुरु झाले आहे, ते इतक्या वेगाने, इतक्या सुस्पष्टपणे जगासमोर येत आहे की, त्यामुळे सर्वांनाच ही प्रक्रिया दिसू शकत आहे. आणि ज्यांच्यापाशी थोडी सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते ह्या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणले गेलेले साहित्य यामधील वेगळेपण पाहू शकत आहेत.

हे राष्ट्र म्हणजे प्रकृतीच्या कार्यशाळेमध्ये कच्च्या मालातून तयार झालेला नवीन वंश नव्हे किंवा हे राष्ट्र आधुनिक परिस्थितीमुळे निर्माण झाले आहे, असेही नव्हे. तर येथील संस्कृती ही, या पृथ्वीवरील महान संस्कृतींपैकी, प्राचीन वंशांपैकी एक आहे; दुर्दम्य प्राणशक्ती, महानतेची, सखोलतेची जणू खाणच, अद्भुत क्षमता असणारी, अशी ही संस्कृती; मानवी संस्कृतीच्या इतर प्रकारांपासून तसेच परकीय वंशप्रकारांपासून सामर्थ्याचे अगणित उगमस्त्रोत स्वत:मध्ये सामावून घेत, आता ती कायमसाठी एका सुसंघटित अशा राष्ट्रीय एकात्मतेमध्ये स्वत:चे उन्नयन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आमच्या पुरातन कालापासून जो प्रयत्न आजवर आमचा वंश करत होता, तो प्रयत्न आता संपूर्णत: नवीन परिस्थितीमध्ये तो करेल. एखादा जाणकार निरीक्षक त्याच्या यशस्वितेचे भाकीत करू शकेल कारण जे काही महत्त्वाचे अडथळे होते ते दूर करण्यात आले आहेत किंवा ते दूर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु आम्ही याही पुढे जातो आणि अशी खात्री बाळगतो की, यश मिळण्याची खात्रीच आहे कारण भारताची महानता, भारताची एकात्मता, आणि भारताचे स्वातंत्र्य ही आता संपूर्ण जगाचीच आवश्यकता बनली आहे.

ही अशी श्रद्धा आहे की, जिच्यामध्ये कार्य करण्यासाठी ‘कर्मयोगिन’ने (श्रीअरविंद यांनी सुरु केलेले इंग्रजी साप्ताहिक) हात घातला आहे आणि कितीही प्रचंड आणि वरवर पाहता कितीही दुस्तर संकटे का येईनात, त्यामुळे ‘कर्मयोगिन’ नाउमेद होणार नाही आणि त्या कार्यामध्ये चिकाटीने प्रयत्नशील राहील. ईश्वर आमच्या सोबत आहे आणि या श्रद्धेमुळेच आमचा विजय होईल असा आमचा विश्वास आहे.

आम्हाला अशी खात्री आहे की, मानवतेला आमची गरज आहे आणि मानवतेविषयीचे, आमच्या देशाविषयीचे, वंशाविषयीचे, आमच्या धर्माविषयीचे आमचे प्रेम आणि तिची सेवा, आमची अंत:करणे शुद्ध करेल आणि या लढ्यातील कृतीसाठी ती आम्हाला प्रेरित करेल.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 23-24)

(दिनांक : ११ एप्रिल १९०८)

राष्ट्र उभारणीसाठी स्वयंसहाय्यतेच्या तत्त्वाआधारे, आम्ही पुनरुत्थानाच्या ज्या काही योजना आखत आहोत, मग ते औद्योगिक पुनरुत्थान असो, शैक्षणिक पुनरुत्थान असो किंवा ती राजकीय पुनरुत्थानाची योजना असो ह्या सर्व योजना म्हणजे देश स्वतंत्र होण्यापूर्वी घडून यावयासच हवे अशा एका अधिक गहन पुनरुत्थानाची केवळ दुय्यम अंगे आहेत. ‘भारत माता’ आपल्याकडून कोणत्याही योजनांची, नियोजित आराखड्यांची किंवा कोणत्या पद्धतींची मागणी करत नाहीये. आपण तयार करू शकू त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या योजना, अधिक चांगले आराखडे, अधिक चांगल्या पद्धती ती आम्हाला देऊ करेल. ती आमच्याकडून आमची हृदये, आमची जीवने यांची मागणी करत आहे; याहून काही कमी नाही किंवा काही अधिकही नाही. ‘स्वदेशी’, ‘राष्ट्रीय शिक्षण’, ‘स्वराज्या’च्या उभारणीचा प्रयास ह्या सर्व बाबी म्हणजे तिच्याप्रत स्वत:ला समर्पित करण्याच्या केवळ अनेकानेक संधी आहेत. आपण ‘स्वदेशी’साठी किती प्रयत्न केले, आम्ही किती हुशारीने स्वराज्याची आखणी केली, आम्ही शिक्षणाची पुनर्रचना किती यशस्वितेने केली हे ती पाहणार नाही तर; आम्ही तिच्याप्रत स्वत:ला किती समर्पित केले, आम्ही आमच्यातील मूलद्रव्यं किती देऊ केली, आम्ही आमचे कष्ट, आमच्या सोयीसुविधा, आमची सुरक्षितता, आमची जीवने किती प्रमाणात देऊ केली, हे ती पाहणार आहे. पुनरुत्थान हा अक्षरश: पुनर्जन्मच असतो, आणि हा पुनर्जन्म बुद्धिने नाही, केवळ पैशाच्या मुबलकतेने नाही, केवळ धोरणांमुळे, योजनांमुळे, किंवा यंत्रणेमध्ये परिवर्तन घडविल्यानेही होत नाही तर, आम्ही आज जे काही आहोत ते सारेच्या सारे त्यागरूपी अग्निमध्ये भस्मसात करून, एक नवीन हृदय प्राप्त करून घेण्यामधून आणि ‘माते’च्या कुशीतून पुन्हा जन्माला येण्यातून होतो. स्व-परित्यागाची आमच्याकडून मागणी केली जात आहे. माता आम्हाला विचारत आहे, “तुमच्यापैकी किती जणं माझ्यासाठी जगायला तयार आहात? तुमच्यापैकी किती जणं माझ्यासाठी प्राणार्पण करायला तयार आहात?” आणि ती आमच्या उत्तराची वाट पाहात आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 1032-1033)

(दिनांक : १७ सप्टेंबर १९०६)

आपला इतिहास हा इतर लोकांच्या इतिहासापेक्षा अनेक बाबतीत भिन्न राहिलेला आहे. भारतीय लोकांची जडणघडण ही जगामध्ये एकमेवाद्वितीय अशी आहे. विविध जातीजमातींची लोकं एकत्रित आल्यामुळे, त्यांच्यामध्ये अभिवृद्धी होत होत राष्ट्रांचे विकसन होत गेले, ही आधीची प्रक्रिया होती. परंतु, भारत हा केवळ विविध जातीजमातींच्या एकत्र येण्याचे स्थान नसून, तो अशा विकसित राष्ट्रांच्या एकत्र येण्याचे स्थान आहे, की जी राष्ट्र सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या स्वत:च्या वाटांवरून विकसित होत गेली आहेत; त्यांना त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या मूळ जाती आहेत आणि त्यांची त्यांची स्वत:ची अशी खास संस्कृती आहे. त्यामुळे, आगामी भारत राष्ट्राचे चारित्र्य आणि त्याची जडणघडण ही युरोपियन राष्ट्रांपेक्षा भौतिकदृष्ट्या पूर्ण वेगळी असेल; कारण तौलनिकदृष्ट्या विकसनाच्या अगदी अस्पष्ट अशा अवस्थेत असतानाच, अगदी सुरुवातीलाच, या राष्ट्रांच्या एकीकरणाची प्रक्रिया घडून आली होती. आपल्या बुरसटलेल्या विचारसरणीच्या राजकारण्यांना आणि सामाजिक सुधारणावादी लोकांना या वास्तवाचा विचार करण्यासाठी अजून पुरेसा अवधी मिळालेला दिसत नाही आणि अगदी आत्तादेखील, की जेव्हा आम्ही त्याकडे निर्देश केलेला आहे, अगदी शक्य तेवढ्या सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये ती गोष्ट मांडली आहे तरीदेखील, आपल्या बाल्यावस्थेतील राष्ट्रीय जीवनाची ही मूलभूत विशिष्टता ओळखण्यासाठी लागणारा धीर त्यांच्याकडे असेल, अशी आशाच आम्हाला वाटत नाही. ज्याला संघराज्य असे म्हणता येईल अशा दिशेने भारताची राष्ट्रीयत्वाची वाटचाल होत राहील, ती त्याद्वारे मूर्त रूप धारण करेल. ते वेगवेगळे राष्ट्रीयत्व असणाऱ्या, आणि संघटना व आदर्श या दोन्ही बाबतीत स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण घटक जतन करणाऱ्या राष्ट्रांचे एकीकरण असेल. ती राष्ट्रे इतरांमध्ये ज्या विचाराची वा चारित्र्याची उणीव आहे त्यांबाबत त्यांच्याशी संपर्क साधतील आणि सर्व मिळून एकत्रितपणे नागरिक आणि सामाजिक जीवनाच्या दृष्टीने, एकाच वैश्विक साध्याच्या दिशेने प्रगत होतील; ती राष्ट्रं आपापल्या ऐतिहासिक आणि पारंपरिक दिशेने त्याच साध्याप्रत हळूहळू प्रगत होत राहतील. आणि ती अशा रीतीने अनंतपणे आणि त्याचबरोबर तितक्याच अनंतकाळासाठी, एकमेकांच्या जवळजवळ येत असल्याने, जुन्या असो की नव्या, कोणत्याच एकच एक अशा विशिष्ट जीवनरूपामध्ये ती त्यांचे अस्तित्व पूर्णपणे गमावणार नाहीत. महान आणि महाप्रतापी अशा भारत राष्ट्रामध्ये एकत्रित येण्यासाठी भारतातील मुस्लिम, हिंदु, बौद्धधर्मीय, ख्रिश्चन यांनी त्यांचे त्यांचे ‘मुस्लिम’, ‘हिंदु’, ‘बौद्धधर्म’ किंवा ‘ख्रिस्ती’ धर्म सोडून देण्याची आवश्यकता नाही. स्वत:चे आदर्श आणि स्वत:चा समाज यांबद्दलची निष्ठा, तसेच समाजाच्या इतर घटकांच्या आदर्शाबद्दलची व संस्थांबद्दलची सहिष्णुता आणि आदर आणि सर्वांच्या सामायिक नागरीय जीवन व आदर्शाविषयी उत्कट प्रेम व आस्था ह्या गोष्टीच भारताच्या खऱ्या राष्ट्रउभारणीसाठी आता आपण विकसित केल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 168-169)

(दिनांक : ०६ नोव्हेंबर १९०९)

हिंदुत्वाला एकत्रित आणण्यासाठी केवळ दोनच गोष्टी पुरेशा समर्थ आहेत – एक अशी नवी आध्यात्मिक प्रेरणा की जी, वेदान्तावर आधारलेली असेल, मानवाच्या मूलभूत एकत्वावर भर देणारी असेल, …ती बंधुता, स्वातंत्र्य, समता यांच्या भव्यदिव्य आदर्शावर उभारलेली असेल आणि तिला भारतीय वंश तसेच हिंदु आध्यात्मिक संकल्पना आणि साधना यांच्या थोर कार्याची आणि दमदार भवितव्याची जाण असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, एक पुरेशी जोमदार राजकीय लाट की जी, त्या समाजाच्या रक्षणासाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी सर्व हिंदूंना संघटित करू शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 302-303)

(दिनांक : ०६ नोव्हेंबर १९०९)

एकेकाळी ‘भारतीय’ एकता आणि सहिष्णुता यांच्याकडे कल असणारी ‘मोगल’ सत्ता पुढे जेव्हा दडपशाही करणारी आणि विघातक अशी बनली तेव्हा ती उलथून टाकणे हे राष्ट्रीय पुनरुज्जीवनाचे उद्दिष्ट होते आणि तेव्हा म्हणजे ‘शिवाजीमहाराज’ आणि ‘समर्थ रामदास’ यांच्या काळात ‘हिंदु’ राष्ट्रीयत्वाला काही एक अर्थ होता. हे त्याकाळी शक्य होते कारण ‘भारत’ तेव्हा स्वत:च एक जग असल्यासारखा होता आणि ‘महाराष्ट्र’ व ‘राजपुताना’, हे दोन भौगोलिक प्रांत पूर्णत: ‘हिंदु’ होते, त्यांनी याला भक्कम पाया पुरविला होता. ते आवश्यकही होते कारण ‘मोगल साम्राज्यवादी’ घटकांनी त्यांच्या सत्तेचा जो गैरवापर केला होता तो ‘भारता’च्या भवितव्यासाठी घातक होता आणि त्यांना दंडित करून, ‘हिंदु’चे पुनरुत्थान आणि वर्चस्व यांच्या आधारे त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकताच होती. आणि ते आवश्यक होते, शक्यही होते त्यामुळे ते अस्तित्वात आले. परंतु आधुनिक काळातील परिस्थिती विचारात घेता, भारत हा एकसंधपणेच अस्तित्वात राहू शकतो. एखाद्या राष्ट्राचे अस्तित्व हे त्याच्या भौगोलिक सीमांवर आणि भौगोलिक सघनतेवर, एक विशिष्ट, स्वतंत्र राष्ट्र असण्यावर अवलंबून असते. वंश, भाषा, धर्म, इतिहास यांमधील भेद अखेरीस भौगोलिक भिन्नत्वाच्या अस्तित्वामुळे निश्चितच विराम पावतील. ग्रेट ब्रिटन, स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये असेच झालेले आहे. भारतातदेखील तसेच होईल. परंतु भौगोलिक एकसंधतादेखील आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, देश इतका एकसंध असला पाहिजे की परस्परांतील संवाद आणि केंद्रवर्ती शासनाचे संघटन हे सोपे झाले पाहिजे, किमान ते अवघड तरी होता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 304)

(डिसेंबर १९०९)

‘आपली माता’ ह्या स्वरूपात आम्हाला देशाचे दर्शन घडत नाही, हा आपला मुख्य अडथळा आहे. आमच्यापैकी बहुतांशी राजकारणी ‘भारतमाते’चे पूर्ण आणि जवळून दर्शन घेण्यामध्ये अक्षम ठरले आहेत. रणजितसिंग किंवा गुरु गोविंद सिंग ह्यांना भारतमातेऐवजी ‘पंचनद्यां’च्या ‘भूमाते’चेच दर्शन झाले. शिवाजीमहाराज किंवा बाजीराव पेशवे यांना भारतमातेऐवजी, ‘हिंदूंची माता’ या स्वरूपात तिचे दर्शन झाले. इतर महाराष्ट्रीय मुत्सद्द्यांनी फक्त ‘महाराष्ट्रातील लोकांची माता’ या स्वरूपातच तिच्याकडे पाहिले. वंगभंगाच्या काळामध्ये, आम्हाला ‘बंगाल-माते’च्या स्वरूपात तिचे दर्शन होण्याचे भाग्य लाभले, ते एकात्मतेचे दर्शन होते आणि त्यामुळे बंगालची भावी एकात्मता आणि प्रगती सुनिश्चित आहे. पण ‘भारतमाते’ची एकात्म प्रतिमा अजूनही साकार व्हायची आहे. आम्ही काँग्रेसमध्ये ज्या ‘भारतमाते’चे स्तुतिगान करायचो, आराधना करायचो ती पाश्चात्त्य पेहरावातील, ब्रिटिश राजवटीची उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली एक दासी होती, एक सखी होती, ती काल्पनिक मूर्ती होती, ती अदैवी (undivine) असा भ्रम होती. खरंच ती आमची माता नव्हती. पण त्याहीवेळी, एका निगूढ, धूसर अशा अंधारात लपून असलेली आमची ‘खरी माता’च आमचा आत्मा व आमचे अंत:करण वेधून घेत होती. ज्या दिवशी आपण भारतमातेची खरीखुरी अखंड प्रतिमा पाहू शकू, जेव्हा तिच्या सौंदर्याने आणि कृपाशीर्वादाने मोहित होऊन, आपण आपली जीवने तिच्या सेवेमध्ये मोठ्या आतुरतेने समर्पित करू, तेव्हा हा अडथळा दूर होईल आणि भारताची एकात्मता, स्वातंत्र्य आणि प्रगती ह्या गोष्टी साध्य करण्यास सोप्या झालेल्या असतील. भाषाभाषांमधील भेद हे तेव्हा आपल्यामध्ये दरी निर्माण करणार नाहीत. हिंदी भाषेचा मध्यस्थ भाषा म्हणून स्वीकार केल्याने, परंतु तरीही आपापल्या प्रादेशिक भाषांचा यथोचित सन्मान केल्याने, आपली अक्षमतेपासून सुटका होईल. ‘हिंदु-मुस्लीम’ संघर्षावरील खराखुरा उपाय शोधण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. ‘माता’ म्हणून देशाचे दर्शन होत नसल्यामुळे, या अडथळ्यांना भेदून जावे ही आस आमच्यामध्ये पुरेशा तीव्रतेने, गांभीर्याने जाणवत नाही. आणि म्हणूनच ते अडथळे भेदण्याचे मार्गही आम्हाला आजवर गवसलेले नाहीत आणि संघर्ष अधिकाधिकच उग्र रूप धारण करत चालला आहे. आम्हाला जर कशाची गरज असेल तर ती ‘भारतमाते’च्या खऱ्याखुऱ्या अखंड प्रतिमेची! पण, खऱ्याखुऱ्या दर्शनाऐवजी त्याच्या आभासालाच भुलून, जर का आपण केवळ हिंदुंची माता, किंवा हिंदु राष्ट्रवाद ही कल्पना जोपासली तर आपण पुन्हा एकदा त्याच जुन्या चुकांच्या भक्ष्यस्थानी पडू आणि ‘राष्ट्रवादा’च्या पूर्ण उन्मीलनापासून स्वत:ला वंचित ठेवू.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 225-226)