(दिनांक : १९ जून १९०९)

प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ‘ईश्वरा’चे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला आमचे असे सांगणे आहे की, “जर तुमची मने युरोपियन कल्पनांनी भारलेली असतील, जर तुम्ही आपल्या जीवनाकडे केवळ भौतिक दृष्टीने पाहत असाल, तर वरील ध्येये तुम्ही स्वत:पुढे ठेवू शकणार नाही; ती साध्य करून घेणे तर दूरच. भौतिक दृष्टीने पाहिले असता तुम्ही कोणीच नाही परंतु, आध्यात्मिक दृष्टीने पाहता तुम्ही सर्वकाही आहात. भारतीय मनुष्यच केवळ सर्व गोष्टींवर खरा विश्वास ठेवू शकतो, कोणतेही कार्य करावयास धजतो, सर्वस्वाचा त्याग करू शकतो. पण त्याकरता प्रथम भारतीय व्हा. आपल्या पूर्वजांचा वारसा परत मिळवा. ‘आर्य’ विचार, ‘आर्य’ प्रणाली, ‘आर्य’ शील व ‘आर्य’ जीवन पुन्हा संपादन करा. ‘वेदान्त’, ‘गीता’, ‘योग’ ह्या गोष्टी पुनश्च प्राप्त करून घ्या. केवळ बुद्धीने अथवा भावनेने नव्हे, तर तुमच्या प्रत्यक्ष जीवनात त्या आत्मसात करा, त्यांचे आचरण करा. म्हणजे तुम्ही थोर, समर्थ, बलाढ्य, अजिंक्य आणि निर्भय व्हाल. जगण्याची किंवा मरणाची भीती तुम्हाला वाटणार नाही. अडचण आणि अशक्य हे शब्द तुमच्या शब्दकोषात राहणार नाहीत. कारण आपल्या आत्म्याच्या ठिकाणी जे सामर्थ्य असते ते शाश्वत असते. बाह्य साम्राज्य मिळविण्यापूर्वी हे तुमचे आत्मसाम्राज्य, आंतरिक ‘स्व-राज्य’ तुम्ही प्रथम परत मिळवा. तुमचे अंतरंग हे ‘मातृदेवते’चे निवासस्थान आहे. तिने तुम्हाला सामर्थ्य प्रदान करावे म्हणून तुम्ही ‘तिची’ प्रार्थना करावी यासाठी ती वाट पाहत आहे. ‘तिच्या’वर निष्ठा ठेवा, ‘तिची’ सेवा करा, तुमच्या सर्व इच्छा ‘तिच्या’ इच्छेशी एकरूप करा. तुमचा वेगळा असलेला अहं राष्ट्राच्या अहंमध्ये विसर्जित करून टाका. तुमचा विभक्त स्वार्थ मानवजातीच्या सेवेत विलीन होऊ द्या. तुमच्या अंत:करणातील सर्व सामर्थ्याचा मूळ स्रोतच हस्तगत करून घ्या. म्हणजे मग सामाजिक दृढता, बौद्धिक श्रेष्ठत्व, राजकीय स्वातंत्र्य, मानवी विचारांचे स्वामित्व, जगाचे नेतृत्व – सर्वकाही तुम्हाला दिले जाईल.”

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 27-28)

श्रीअरविंद
Latest posts by श्रीअरविंद (see all)