Tag Archive for: पूर्णयोग

साधना, योग आणि रूपांतरण – २४१

‘अंतरात्म्या’ची प्राप्ती किंवा ‘ईश्वर’ प्राप्ती हा पूर्णयोगाचा पाया असला आणि त्याविना रूपांतरण शक्य नसले तरी, पूर्णयोग म्हणजे केवळ ‘अंतरात्म्या’च्या प्राप्तीचा किंवा ‘ईश्वर’ प्राप्तीचा योग नाही. तर तो व्यक्तीच्या रूपांतरणाचा योग आहे.

या रूपांतरणामध्ये चार घटक असतात. आंतरात्मिक खुलेपणा, अज्ञेय प्रांत ओलांडून जाणे किंवा अज्ञेय प्रांतामधून संक्रमण करणे, आध्यात्मिक मुक्ती, आणि अतिमानसिक परिपूर्णत्व. या चार घटकांपैकी कोणताही एक घटक जरी साध्य झाला नाही तरी हा योग अपूर्ण राहतो.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 367-368)

साधना, योग आणि रूपांतरण – २४०

दिव्य जीवनासाठी फक्त उच्चतर मानसिक चेतनेच्या संपर्कात येणे पुरेसे नसते. ती फक्त एक अनिवार्य अशी अवस्था असते. दिव्य जीवनासाठी अधिक उच्च आणि अधिक शक्तिशाली स्थानावरून ‘दिव्य शक्ती’चे अवतरण होणे आवश्यक असते.

पुढील सर्व गोष्टी सद्यस्थितीत अदृश्य असलेल्या शिखरावरून अवतरित होणाऱ्या ‘शक्ती’विना अशक्यप्राय आहेत :
१) उच्चतर चेतनेचे अतिमानसिक प्रकाश आणि शक्तीमध्ये रूपांतरण,
२) प्राण आणि त्याच्या जीवनशक्तीचे विशुद्ध, विस्तृत, स्थिरशांत, दिव्य ऊर्जेच्या शक्तिशाली आणि उत्कट साधनामध्ये रूपांतरण,
३) तसेच स्वयमेव शरीराचे दिव्य प्रकाश, दिव्य कृती, सामर्थ्य, सौंदर्य आणि हर्ष यांच्यामध्ये रूपांतरण

‘ईश्वरा’प्रत आरोहण या एका गोष्टीबाबत इतर योग आणि पूर्णयोग यांमध्ये साधर्म्य आढळते परंतु पूर्णयोगामध्ये केवळ आरोहण पुरेसे नसते तर मन, प्राण, शरीर यांच्या सर्व ऊर्जा रूपांतरित करण्यासाठी ‘ईश्वरा’चे अवतरण होणेदेखील आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 118-119)

साधना, योग आणि रूपांतरण – २३१

रूपांतरणाच्या प्रक्रियेत बाह्य चेतनेचा समावेश असणे हे ‘पूर्णयोगा’मध्ये आत्यंतिक महत्त्वाचे असते. केवळ ध्यानाद्वारे हे रूपांतरण शक्य होत नाही. कारण ध्यानाचा संबंध हा केवळ आंतरिक अस्तित्वाशी असतो. त्यामुळे कर्म हे येथे अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरते. फक्त ते योग्य वृत्तीने आणि योग्य जाणिवेने केले पाहिजे. आणि तसे जर ते केले गेले तर, कोणत्याही ध्यानाने जो परिणाम साध्य होतो तोच परिणाम अशा कर्मानेदेखील साध्य होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 221)

साधना, योग आणि रूपांतरण – २२५

साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य व्यक्तित्वातील अशुद्धता तशाच कायम राहण्याची शक्यता असेल ना?

श्रीमाताजी : हो, अर्थातच. केवळ आंतरिक चेतनेशी संबंधित असणाऱ्या प्राचीन योगपरंपरा आणि आपला पूर्णयोग यामध्ये हाच तर मूलभूत फरक आहे. प्राचीन समजूत अशी होती, आणि काही व्यक्ती भगवद्गीतेचा अर्थ या पद्धतीनेही लावत असत की, ज्याप्रमाणे धुराशिवाय अग्नी नसतो त्याप्रमाणे अज्ञानाशिवाय जीवन नसते. हा सार्वत्रिक अनुभव असतो पण ही काही आपली संकल्पना नाही, हो ना?

आपल्याला अनुभवातून हे माहीत आहे की, आपण जर शारीर-चेतनेपेक्षाही खाली म्हणजे अवचेतनेपर्यंत (subconscient) खाली उतरलो, किंबहुना त्याहूनही खाली म्हणजे अचेतनतेपर्यंत (inconscient) खाली उतरलो तर, आपल्याला आपल्यामध्ये अनुवंशिकतेमधून आलेल्या गोष्टींचे (atavism) मूळ सापडू शकते तसेच आपल्या प्रारंभिक शिक्षणामधून आणि आपण ज्या वातावरणामध्ये जीवन जगत असतो त्यामधून जे काही आलेले असते त्याचे मूळही आपल्याला सापडू शकते. आणि त्यामुळेच व्यक्तीमध्ये, म्हणजे तिच्या बाह्य प्रकृतीमध्ये, एक प्रकारची विशेष वैशिष्ट्यपूर्णता निर्माण होते आणि सर्वसाधारणतः असे समजले जाते की, आपण असेच जन्माला आलेलो आहोत आणि आयुष्यभर आपण असेच राहणार आहोत. परंतु अवचेतनेपर्यंत, अचेतनेपर्यंत खाली उतरून व्यक्ती तेथे जाऊन या घडणीचे मूळ शोधून काढू शकते. आणि जे तयार झाले आहे ते नाहीसे देखील करू शकते. म्हणजे व्यक्ती सामान्य प्रकृतीच्या गतिविधी आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये सचेत आणि जाणीवपूर्वक कृतीने परिवर्तन घडवून आणू शकते आणि अशा रीतीने ती खरोखरच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे रूपांतरण घडवून आणू शकते. ही काही सामान्य उपलब्धी नाही, परंतु ती करून घेण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे, हे असे करता येणे शक्य असते, एवढेच नव्हे, तर असे करण्यात आलेले आहे हे व्यक्ती ठामपणे म्हणू शकते. समग्र रूपांतरणाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असते. परंतु त्यानंतर, मी आधी ज्याचा उल्लेख केला ते पेशींचे रूपांतरण करणे अजूनही बाकी आहे.

अन्नमय पुरुषामध्ये (physical being) पूर्णतः परिवर्तन करणे शक्य आहे परंतु ही गोष्ट आजवर कधीही करण्यात आलेली नाही.

– श्रीमाताजी (CWM 15 : 294-295)

साधना, योग आणि रूपांतरण – २२१

उत्तरार्ध

चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला हव्याहव्याशा वाटायच्या त्यातील तुमचे स्वारस्य नाहीसे होते. परंतु हे चेतनेमधील ‘परिवर्तन’ असते; आम्ही ज्याला ‘रूपांतरण’ म्हणतो ते हे नव्हे. कारण रूपांतरण हे मूलभूत आणि परिपूर्ण असते, तो काही केवळ बदल नसतो अथवा परिवर्तन नसते, तर ते चेतनेचे प्रत्युत्क्रमण (reversal) असते. म्हणजे यामध्ये व्यक्तीचे अस्तित्व हे जणू काही अंतर्बाह्य पालटते, आणि त्यामुळे व्यक्ती पूर्णतः एका वेगळ्या अवस्थेमध्ये प्रवेश करते.

प्रत्युत्क्रमित झालेल्या या चेतनेमध्ये व्यक्ती ही जीवन आणि वस्तुमात्रांच्या ऊर्ध्वस्थित झालेली असते आणि तेथून त्यांच्याशी व्यवहार करते. ती चेतना प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असते आणि ती व्यक्तीच्या बाह्यवर्ती सर्व कृतींना तेथून दिशा दर्शन करत असते. उलट सामान्य चेतनेमध्ये व्यक्ती बाहेर आणि खालच्या बाजूस स्थित असते. बाहेरून, खालून ती केंद्रस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करत असते आणि असे करत असताना ती स्वतःच्याच अज्ञानाच्या व अंधतेच्या ओझ्यामुळे दबली जाते. त्यांच्या अतीत जाण्यासाठी ती अत्यंत निकराचा प्रयत्न करत असते. वस्तु प्रत्यक्षात कशा आहेत, त्यांचे वास्तव काय आहे याबाबत सामान्य चेतना अज्ञ असते, ती त्यांचे फक्त बाह्य आवरणच पाहू शकते. परंतु खरी चेतना ही केंद्रस्थानी असते, ती वास्तवाच्या हृदयस्थानी असते आणि तिला सर्व गतिविधींच्या उमगाबद्दलची थेट दृष्टी असते. ती अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित वसलेली असल्याने तिला सर्व गोष्टींचा व शक्तींचा उगमस्रोत आणि कार्यकारणभाव ज्ञात असतो.

मी पुन्हा एकदा सांगते की, हे प्रत्युक्रमण अचानकपणे घडून येते. तुमच्यामधील काहीतरी खुले होते आणि अचानकपणे तुमचा एका नवीन जगामध्ये प्रवेश झाला असल्याचे तुम्हाला आढळते. प्रारंभी हे परिवर्तन अंतिम आणि निर्णायक स्वरूपाचे असेलच असे नाही. ते परिवर्तन चिरस्थायी रूपात स्थिरस्थावर होऊन, तो तुमचा प्रकृतिधर्म होण्यासाठी कधीकधी अधिक कालावधीची आवश्यसकता असते. परंतु एकदा का हे परिवर्तन घडून आले की मग ते तेथे कायम राहते; तत्त्वतः कायमसाठी ते तेथे स्थिर होते. आणि नंतर मग कशाची गरज असेल तर ती म्हणजे ते परिवर्तन क्रमाक्रमाने व्यावहारिक जीवनाच्या तपशिलात अभिव्यक्त करण्याची!

रूपांतरित चेतनेचे पहिले आविष्करण हे नेहमीच अचानकपणे झाल्यासारखे दिसते. तुमचे एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये, हळूहळू, क्रमाक्रमाने परिवर्तन होत आहे हे तुम्हाला जाणवतही नाही; तर आपण अचानकपणे एका नवीन चेतनेमध्ये जागृत झालो आहोत किंवा नव्याने जन्माला आलो आहोत असे तुम्हाला जाणवते. कोणत्याही मानसिक प्रयत्नांमुळे तुम्ही या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. कारण हे रूपांतरण नक्की कसे असते याची कल्पना मनाच्या साहाय्याने तुम्ही करू शकत नाही. कोणतेच मानसिक वर्णन येथे पुरेसे ठरू शकत नाही. (पूर्णयोगांतर्गत) संपूर्ण रूपांतरणाचा आरंभबिंदू हा असा असतो.

– श्रीमाताजी (CWM 12 : 80-81)

साधना, योग आणि रूपांतरण – २१९

चेतना ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिकरित्या आंतरिक चेतनेमध्ये राहून, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे अशा रीतीने शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे की ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरणासाठी सज्ज होऊ शकेल आणि ‘दिव्य ज्ञान’, ‘दिव्य संकल्प’ आणि ‘दिव्य प्रेम’ यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे पूर्णयोगाचे पहिले ध्येय आहे.

योगिक चेतना विकसित करणे म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, ब्रह्मांड-पुरुषाविषयी आणि ब्रह्मांड-शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ‘ईश्वरा’शी एकत्व पावणे, हे पूर्णयोगाचे दुसरे ध्येय आहे.

‘अधिमानसा’च्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेद्वारे (supramental consciousness), परात्पर ‘ईश्वरा’च्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे, हे पूर्णयोगाचे तिसरे ध्येय आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 20)

साधना, योग आणि रूपांतरण – १८५

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया खुलासेवार उलगडवून दाखविली आहे. हे पत्र महत्त्वाचे पण बरेच विस्तृत आहे. त्यामुळे आपण ते क्रमश: विचारात घेणार आहोत.)

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०१

‘शांति’ (Peace) किंवा ‘नीरवता’ (Silence) लाभण्यासाठी वरून होणारे अवतरण हा निर्णायक मार्ग असतो. वास्तविक, दृश्यरूपात नेहमीच तसे दिसले नाही तरी, प्रत्यक्षात मात्र या गोष्टी नेहमीच अशा रीतीने घडून येतात. ‘दृश्यरूपात नेहमीच तसे दिसत नसले’, असे म्हणण्याचे कारण की साधकाला या प्रक्रियेची नेहमीच जाणीव असते असे नाही. त्याच्यामध्ये शांती स्थिरावते आहे किंवा किमान आविष्कृत तरी होत आहे असे त्याला जाणवते, पण ती कशी आणि केव्हा येते याची त्याला जाणीव नसते. तरीही हे सत्य आहे की, जे जे काही उच्चतर चेतनेशी संबंधित असते ते वरून येते; केवळ आध्यात्मिक शांती, नीरवता याच गोष्टी नव्हेत तर ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘ज्ञान’, उच्चतर दृष्टी आणि विचार, ‘आनंद’ या सर्वच गोष्टी वरून येतात.

एका विशिष्ट टप्प्यापर्यंत या गोष्टी अंतरंगातून सुद्धा येऊ शकतात; परंतु ते यामुळे शक्य होते कारण ‘चैत्य पुरुष’ (psychic being) त्यांच्याप्रत थेटपणे खुला झालेला असतो आणि त्यामुळे उपरोक्त गोष्टी आधी तेथे येतात आणि चैत्य पुरुषाद्वारे, किंवा त्याच्या पुढे येण्यामुळे, या गोष्टी स्वतःला, अस्तित्वाच्या इतर अंगांमध्येदेखील प्रकट करतात.

अंतरंगातून होणारे प्रकटीकरण किंवा वरून होणारे अवतरण हे ‘योगसिद्धी’चे दोन सार्वभौम मार्ग आहेत. बाह्य पृष्ठवर्ती मनाचा प्रयत्न किंवा भावना, एखाद्या प्रकारची तपस्या या सगळ्यांमधून या गोष्टींची काहीशी घडण होते असे वाटते, पण त्यांचे परिणाम हे, या दोन मूलगामी मार्गांच्या तुलनेत, बहुतेक वेळा अनिश्चित आणि आंशिक असतात. आणि म्हणूनच आम्ही या ‘पूर्णयोगा’मध्ये ‘उन्मुखते’वर, खुलेपणावर (opening) नेहमीच एवढा भर देत असतो. आपल्या आंतरिक मनाचे, प्राणाचे, शरीराचे आपल्या आंतरतम भागाप्रत, चैत्य पुरुषाप्रत असलेले खुलेपण आणि मनाच्या ऊर्ध्वदिशेस असणाऱ्या तत्त्वाप्रत उन्मुखता, या गोष्टी साधनेच्या फलप्राप्तीसाठी अपरिहार्य असतात. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 323-324)

साधना, योग आणि रूपांतरण – १८४

साधक : मी योगसाधना करत आहे की नाही हे मला समजत नाहीये. मी ‘पूर्णयोगा’ची साधना करत आहे असे म्हणता येईल का?

श्रीअरविंद : जो कोणी श्रीमाताजींकडे वळला आहे तो प्रत्येक जण माझा योग करत आहे. व्यक्ती (स्व-प्रयत्नाने) पूर्णयोग ‘करू’ शकते असे समजणे ही एक मोठी चूक आहे; म्हणजे स्व-प्रयत्नाने व्यक्ती या योगाचे आचरण करून, या योगाच्या सर्व बाजूंची पूर्तता करू शकते, असे समजणे ही घोडचूक आहे. कोणीच तसे करू शकत नाही.

व्यक्तीने काय केले पाहिजे? तर तिने स्वतःला ‘श्रीमाताजीं’च्या हाती सोपवले पाहिजे आणि सेवेच्या, भक्तीच्या, अभीप्सेच्या माध्यमातून स्वतःला त्यांच्याप्रत खुले, उन्मुख केले पाहिजे. तेव्हा मग ‘श्रीमाताजी’ त्यांच्या प्रकाशाद्वारे आणि शक्तीद्वारे त्या व्यक्तीमध्ये कार्य करू लागतील, त्यामुळे मग साधना घडेल.

एक महान ‘पूर्णयोगी’ बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे किंवा अतिमानसिक जीव बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे आणि त्या उद्दिष्टाच्या दिशेने मी कुठपर्यंत आलो आहे, हे स्वतःला विचारणे हीसुद्धा एक चूक आहे. ‘श्रीमाताजीं’ना समर्पित होणे आणि तुम्ही जे व्हावे अशी त्यांची इच्छा आहे, तेच बनण्याची इच्छा बाळगणे हा खरा योग्य दृष्टिकोन आहे. उर्वरित सर्व गोष्टी श्रीमाताजींनीच ठरवायच्या असतात आणि तुमच्यामध्ये घडवून आणायच्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 151-152)

साधना, योग आणि रूपांतरण – १८३

(श्रीअरविंद येथे पारंपरिक योग व पूर्णयोग यातील फरक स्पष्ट करत आहेत.)

प्राचीन योगांच्या तुलनेत पूर्णयोग पुढील बाबतीत नावीन्यपूर्ण आहे.

१) जगापासून किंवा जीवनापासून निवृत्त होऊन स्वर्ग, निर्वाण यांच्याकडे प्रयाण करणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. उलट, हा योग जीवनामध्ये आणि अस्तित्वामध्ये परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. ते उद्दिष्ट गौण आणि अनुषंगिक आहे, असे पूर्णयोग मानत नाही तर तो त्यास वैशिष्ट्यपूर्ण आणि केंद्रवर्ती उद्दिष्ट मानतो.

अन्य योगांमध्ये ‘अवतरण’ (descent) असलेच तर, आरोहणाच्या (ascent) मार्गावरील एक घटना म्हणून किंवा आरोहणाचा परिणाम म्हणून ते घडून आलेले असते. अन्य योगांमध्ये ‘आरोहण’ हीच सत्य गोष्ट असते. पूर्णयोगात आरोहण हे अनिवार्य आहे परंतु त्याचा परिणाम म्हणून घडून येणारे ‘अवतरण’ हीच गोष्ट येथे निर्णायक असते आणि अवतरण हेच येथे आरोहणाचे अंतिम उद्दिष्ट मानण्यात आलेले आहे. आरोहणाद्वारे नवीन चेतनेचे अवतरण घडून येणे ही या साधनेनी उमटवलेली मोहोर आहे. ‘तंत्रयोग’ आणि ‘वैष्णव’ या संप्रदायांची परिसमाप्तीसुद्धा जीवनापासून सुटका करून घेण्यामध्ये होते; तर ‘जीवनाची दिव्य परिपूर्ती’ हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे.

(२) व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेऊन, व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी, हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ पारलौकिक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेदेखील येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक चेतनेची (supramental consciousness) शक्ती येथे आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

(३) चेतनेचे आणि प्रकृतीचे संपूर्ण व समग्र परिवर्तन हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे. ते जेवढे संपूर्ण व समग्र आहे तेवढीच त्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्वनिर्धारित करण्यात आलेली साधनापद्धतीदेखील तितकीच संपूर्ण व समग्र आहे. पूर्णयोगामध्ये जुन्या पद्धतींचा स्वीकार हा केवळ एक आंशिक क्रिया म्हणूनच केला जातो आणि त्या जुन्या साधनापद्धती त्याहूनही अधिक वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या साधनापद्धतींपर्यंत नेण्यात येतात.

अशी पद्धती पूर्णतः किंवा तिच्यासारखे काही, पूर्वीच्या योगांमध्ये समग्रतया प्रस्तावित केले आहे किंवा अशी काही पद्धती पूर्वीच्या योगांमध्ये अंमलात आणली गेली आहे असे, मला आढळले नाही. मला जर तशी पद्धती आढळली असती तर, मी हा (पूर्णयोगाचा) मार्ग निर्माण करण्यामध्ये माझा वेळ व्यर्थ दवडला नसता. जर हा मार्ग अगोदरच अस्तित्वात असता, निर्धारित करण्यात आलेला असता, अगोदरच त्याचा आराखडा पूर्णतः रेखाटलेला असता, तो चांगला उजळलेला असता, सुरक्षित आणि सर्वांसाठी खुला करण्यात आलेला असता तर मी सुखाने मार्गस्थ होऊन, माझ्या उद्दिष्ट-धामापर्यंत सुरक्षितपणे, त्वरेने पोहोचलो असतो. या शोधामध्ये आणि आंतरिक निर्मितीमध्ये मला तीस वर्षे खर्च करावी लागली नसती. जुन्याच मार्गांवरून पुन्हा एकवार वाटचाल हे आमच्या योगाचे स्वरूप नाही तर आमचा योग म्हणजे एक ‘आध्यात्मिक साहस’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 400 – 401)

साधना, योग आणि रूपांतरण – १८२

आपल्या समग्र अस्तित्वाने सर्वथा आणि त्याच्या सर्व घटकांसहित, ‘दिव्य ब्रह्मा’च्या (Divine Reality) समग्र चेतनेमध्ये प्रविष्ट होणे आणि आपल्या वर्तमान अज्ञानमय आणि मर्यादित प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणे, हीच आपल्या अस्तित्वाची संपूर्ण परिपूर्ती आहे आणि हाच ‘पूर्णयोग’ आहे. तत्त्वत: आपण जे आहोत आणि आपल्या जीवात्म्यामध्ये जे ‘दिव्य ब्रह्म’ आहे त्याचे, आपण साधन व्हावे आणि त्याचे आविष्करण करावे म्हणून हे परिवर्तन आवश्यक असते.

विचारी मनाच्या मार्गाने किंवा हृदयाच्या मार्गाने किंवा कर्मामधील इच्छेच्या मार्गाने किंवा मानसिक प्रकृति-द्रव्याच्या परिवर्तनाद्वारे त्या दिव्यत्वामध्ये प्रविष्ट होणे किंवा देहांतर्गत असलेली प्राण-शक्ती मुक्त करणे, हे पुरेसे नाही; एवढेच पुरेसे नाही. या साऱ्या गोष्टी एकत्रितपणे करून ते परिवर्तन घडविले पाहिजे. आणि खुद्द आपल्या इंद्रियांमधील तसेच शारीर-चेतनेमधील, अगदी जडभौतिक अचेतनापर्यंतच्या परिवर्तनाद्वारे, सर्वकाही त्या ‘ईश्वरा’विषयी सजग आणि त्या ‘ईश्वरा’समवेत दीप्तिमान झालेच पाहिजे.

‘ईश्वरा’शी ऐक्य पावणे, ‘ईश्वरा’मध्ये आणि ‘ईश्वरा’सोबत जगणे, ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी एकत्व पावणे, हे आपल्या योगाचे उद्दिष्ट असले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 356-357)