Tag Archive for: पूर्णयोग

साधनेची मुळाक्षरे – ३२

हृदयाच्या दृष्टीने विचार केला तर, ईश्वरभेटीच्या तळमळीपोटी येणारे भावनावेग, रडू येणे, दुःखीकष्टी होणे, व्याकूळ होणे या गोष्टी ‘पूर्णयोगा’मध्ये गरजेच्या नाहीत. एक दृढ अशी अभीप्सा जरूर असली पाहिजे, त्याबरोबरच एक उत्कट आसदेखील असू शकते, उत्कट प्रेम आणि ऐक्याची इच्छा असली पाहिजे पण दु:ख किंवा अस्वस्थता असण्याचे काही कारण नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 377)

साधनेची मुळाक्षरे – ३०

श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधील मजकूर –

‘योगसाधने’मध्ये प्रार्थना किंवा ध्यान या दोन्हीचे खूप महत्त्व असते, अगदी खोल अंत:करणातून उदित झालेली प्रार्थना ही भावनांच्या किंवा अभीप्सेच्या शीर्षस्थानी असायला हवी; ईश्वरविषयक आनंद किंवा प्रकाश यांच्या समवेत आतून जिवंतपणे उमलून येणारी बाब म्हणून ‘जप’ किंवा ध्यान व्हायला हवे. जर ह्या गोष्टी केवळ यांत्रिकपणे केल्या आणि केवळ कर्तव्य म्हणून केल्या तर त्या रूक्षपणा आणि निरसता यांच्याकडे झुकतात आणि त्यामुळे त्या प्रभावहीन ठरण्याची शक्यता असते.

तुम्ही अमुक एखादा परिणाम घडून येण्यासाठी, एक साधन म्हणून जरुरीपेक्षा जरा जास्तच प्रमाणात ‘जप’ करत आहात असे मला वाटते, असे जेव्हा मी म्हणालो, तेव्हा मला असे म्हणावयाचे होते की, – तुम्ही विशिष्ट गोष्टी घडून येण्यासाठी एक प्रक्रिया म्हणून, एक साधन म्हणून जपाचा अधिक उपयोग करत आहात आणि म्हणूनच मला तुमच्यामध्ये मानसिक, आत्मिक अशी अवस्था विकसित व्हावी असे वाटत होते, कारण जेव्हा चैत्य पुरुष पुढे आलेला असतो तेव्हा प्रार्थनेमध्ये आनंद आणि जिवंतपणा यांचा अभाव नसतो; तेव्हा त्यामध्ये अभीप्सा असते, एक धडपड, एक आस असते; अशा वेळी भक्तीचा अखंड पाझर चालू राहण्यामध्ये कोणतीही अडचण नसते. मन जेव्हा शांत, स्थिर असते, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख असते तेव्हा ध्यानामध्ये कोणतीही अडचण येत नाही किंवा त्यामध्ये रस वाटत नाही असेही होत नाही. ध्यान ही ज्ञानाभिमुख अशी एक प्रक्रिया आहे आणि ती ज्ञानाच्या माध्यमातूनच प्रगत होते; ती मस्तकाशी संबंधित बाब आहे, हृदयाशी नाही; तेव्हा तुम्हाला जर ध्यान हवे असेल तर, तुम्ही ज्ञानाकडे पाठ फिरविता कामा नये.

हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे ध्यान नव्हे; तर ती आपल्या ‘प्रियकरा’ला, ‘ईश्वरा’ला दिलेली हाक आहे. ‘पूर्णयोग’ म्हणजे केवळ ‘ज्ञानयोग’ नव्हे – ज्ञानयोग हा एक मार्ग झाला; परंतु आत्मदान, समर्पण, भक्ती हा पूर्णयोगाचा पाया आहे आणि अंतिमत: हा पाया नसेल तर काहीच होऊ शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226-227)

साधनेची मुळाक्षरे – २९

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या समाधानासाठी आणि राजसिक इच्छेच्या प्रेरणेपोटी केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही. परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा तत्सम नैतिक वा आदर्शवादी अशा ज्या ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी असल्याचे मानवी मन मानते, त्या गोष्टीसुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाही.

जी कृती ‘ईश्वरा’ साठी केली जाते, जी ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ‘ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो. साहजिकच आहे की, ही गोष्ट प्रारंभी तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि प्रदीप्त ज्ञान यांच्यापेक्षा ते काही कमी सोपे नसते, किंबहुना खरेखुरे प्रेम आणि भक्ती या गोष्टी अधिक सोप्या असतात. पण इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची सुरुवातदेखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य इच्छेनिशी ही गोष्ट करण्यास तुम्ही प्रारंभ केला पाहिजे, अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील.

या वृत्तीने केलेले कर्म हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये शब्दातीत ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी इच्छे’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’ पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; व्यक्तीचे कार्य ‘विश्वशक्ती’च करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहत असल्याची किंवा तो साक्षीदार असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्वमाता किंवा परम-‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने ‘ईश्वरा’प्रत सतत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदित केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत खुले होत असल्याची जाणीव आपल्याला होऊ शकते. अंतिमतः कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते – त्यालाच आपण ‘प्रकृतीचे रूपांतरण’ (Transformation of the nature) असे संबोधतो.

अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात. ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही राजमार्ग नाही.

सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीही निश्चितच वगळण्यात आलेली नाही, कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, त्याच गोष्टी म्हणजे अनिवार्यपणे भक्तीचीही एक प्रक्रिया आहे…

एवढेच की, जीवनापासून पलायनवादी एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र योगाची संपूर्ण प्रक्रिया म्हणून येथे स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती विशुद्ध ध्यानमग्न अशा रीतीने तासन् तास बसत असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र ‘पूर्णयोग’ नव्हे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 216-218)

साधनेची मुळाक्षरे – ०८

आपल्यामधील चैत्य घटक (psychic part) हा असा भाग असतो की, जो थेट ‘ईश्वरा’कडून आलेला असतो आणि ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये असतो. मूलत: चैत्य घटक म्हणजे दिव्य शक्यतांनी गर्भित असलेले असे एक केंद्र असते की जे, मन, प्राण व शरीर या कनिष्ठ आविष्कारत्रयीला आधार पुरविते. हे ईश्वरी वा दिव्य तत्त्व सर्व सजीवांमध्ये असते पण ते सामान्य चेतनेच्या मागे लपलेले असते; ते प्रथमत: विकसित झालेले नसते… मन, प्राण व शरीर या साधनांच्या अपूर्णतांकडून जेवढी मुभा मिळेल तेवढ्यामध्येच आणि, त्यांच्या माध्यमातूनच व त्यांच्या मर्यादांमध्ये राहूनच, हे तत्त्व स्वत:ला अभिव्यक्त करते. ‘ईश्वरानुगामी’ अनुभूतींच्या योगे, या तत्त्वाची चेतनेमध्ये वृद्धी होत असते; आपल्यामध्ये जेव्हा उच्चतर अशी क्रिया घडते त्या प्रत्येक वेळी या तत्त्वाला सामर्थ्य प्राप्त होत जाते आणि सरतेशेवटी, या सखोल आणि उच्चतर अशा गतिविधींच्या संचयामधून चैत्य व्यक्तित्वाची घडण होते आणि त्यालाच आपण सर्वसाधारणत: ‘चैत्य पुरुष’ (Psychic being) असे संबोधतो. माणूस आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचे निमित्त-कारण खरंतर हाच चैत्य पुरुष असतो; ह्या चैत्यपुरुषाचीच त्याला सर्वात अधिक मदत होत असते पण बरेचदा हे निमित्त-कारण अनभिज्ञच राहते. आणि म्हणूनच आपल्याला ‘पूर्णयोगा’मध्ये त्या चैत्यपुरुषाला अग्रभागी आणावे लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 103)

विचार शलाका – २९

रूपांतरणाचा योग (पूर्णयोग) हा सर्व गोष्टींमध्ये सर्वाधिक खडतर आहे. व्यक्तीला जर का असे वाटत असेल की, मी या पृथ्वीवर केवळ त्याचसाठी आलो आहे, मला दुसरेतिसरे काहीही करावयाचे नाही, फक्त तेच करावयाचे आहे, आणि तेच माझ्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे; मग कितीही रक्ताचे पाणी करावे लागले, कितीही दु:खे सहन करावी लागली, संघर्ष करावा लागला, तरी हरकत नाही ते तितकेसे महत्त्वाचे नाही. “मला तेच हवे आहे, दुसरेतिसरे काहीही नको”, अशी जर व्यक्तीची अवस्था असेल तर मात्र गोष्ट निराळी.

 

अन्यथा मी म्हणेन, “चांगले वागा, सुखी असा, तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे.” चांगले वागा म्हणजे समजूतदार असा, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होतात ती अपवादात्मक अशी परिस्थिती होती हे जाणून असा आणि सामान्य जीवनापेक्षा अधिक उच्च, अधिक उदात्त, अधिक सत्य जीवन जगायचा प्रयत्न करा. म्हणजे मग चेतनेचा काही अंश, तिचा प्रकाश, तिचा चांगुलपणा या जगामध्ये अभिव्यक्त करण्यासाठी तुम्ही संमती देऊ शकाल. आणि ते खूप चांगले असेल. पण, एकदा का तुम्ही योगमार्गावर पाऊल ठेवलेत की, तुमचा निर्णय वज्रकठोर असला पाहिजे आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी तुम्ही थेट ध्येयाकडे वाटचाल केलीच पाहिजे.

 

– श्रीमाताजी

(CWM 07 : 200)

विचार शलाका – २३

(आम्हाला आश्रमामध्ये येऊनच योगसाधना करायची आहे, असे म्हणणाऱ्या लोकांना श्रीअरविंद सांगत आहेत…)

एखादी व्यक्ती जर दूर अंतरावर राहून साहाय्य प्राप्त करून घेऊ शकली नाही तर ती व्यक्ती येथे (आश्रमात) योगसाधना करण्याची अपेक्षा कशी बाळगू शकते? (पूर्णयोग) ही अशी योगपद्धती आहे की जी तोंडी सूचना किंवा इतर कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. तर स्वत:ला खुले (open) करण्याचे सामर्थ्य आणि अगदी संपूर्ण नि:स्तब्धतेमध्ये देखील ‘ती’ शक्ती व तिचा प्रभाव ग्रहण करण्याचे सामर्थ्य या गोष्टींवर ही योगपद्धती अवलंबलेली आहे. त्या शक्तीला जे दूर अंतरावरून ग्रहण करू शकत नाहीत ते इथेसुद्धा (आश्रमात) ती शक्ती ग्रहण करू शकणार नाहीत. स्वत:मध्ये स्थिरता, प्रामाणिकपणा, शांती, सहनशीलता आणि चिकाटी या गोष्टी प्रस्थापित केल्याशिवाय हा योग आचरता येणे शक्य नाही, कारण यामध्ये पुष्कळ अडचणींना, समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांच्यावर निश्चिततपणे व पूर्णत: मात करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 597)

विचार शलाका – ३७

पूर्ण ज्ञान, पूर्ण कर्म आणि पूर्ण भक्ती यांचे एकत्रीकरण करणे, त्यांचा समन्वय करणे आणि त्यांना मनोमय पातळीवरून ‘विज्ञाना’च्या अतिमानसिक पातळीवर उन्नत करून, त्यांना परिपूर्ण असे पूर्णत्व प्रदान करणे, हे ‘पूर्णयोगा’चे मूलतत्त्व आहे. जुन्या योगमार्गांध्ये अशी त्रुटी होती की, मन आणि बुद्धी ज्ञात असूनही, ‘आत्मा’ ज्ञात असूनही, ते योग केवळ मनाच्या स्तरावरील आध्यात्मिक अनुभव घेण्यावरच समाधानी राहिले. परंतु मन हे अनंताचे, अ-भंगाचे केवळ आंशिकच आकलन करून घेऊ शकते; ते अनंत, अ-भंगाला पूर्णांशाने कवळू शकत नाही. त्याला कवळून घेण्याचा मनाचा मार्ग म्हणजे एकतर भावसमाधीद्वारे, मोक्षाच्या मुक्तीद्वारे किंवा निर्वाणाच्या विलयाद्वारे किंवा तत्सम गोष्टींद्वारे त्याला जाणून घेणे हा असतो. त्याच्यापाशी अन्य कोणताच मार्ग नाही. कोठे तरी कोणीतरी एखादाच खरोखरी ही अ-लक्षण मुक्ती मिळविण्यामध्ये यशस्वी होतो, पण त्याचा काय उपयोग? ‘चैतन्य’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ कायम आहेतच की! परंतु मनुष्य या इथेच मूर्तिमंत ‘ईश्वर’ व्हावा, व्यक्तिगतरित्या आणि सामूहिकरित्याही तो ‘ईश्वर’च व्हावा, त्याने या जीवनामध्येच ‘देवा’चा साक्षात्कार करून घ्यावा, अशी ‘ईश्वरा’ची अपेक्षा आहे. योगाच्या जुन्या पद्धती, आत्मा आणि जीवन यांचे ऐक्य घडवून आणू शकल्या नाहीत किंवा त्या त्यांचा समन्वयही घडवून आणू शकल्या नाहीत. एकतर माया म्हणून किंवा ‘देवा’ची ही अनित्य लीला आहे असे समजून त्यांनी ऐहिकाची उपेक्षा केली. त्याचा परिणाम म्हणून जीवनशक्तीचा ऱ्हास झाला आणि ‘भारता’ची अवनती झाली. ‘भगवद्गीते’मध्ये सांगितले आहे की, ‘उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्’ म्हणजे, ”मी जर कार्य केले नाही तर हे लोक छिन्नविछिन्न होऊन जातील.” आणि खरोखर भारतातील अशी माणसं दुर्दशेला जाऊन पोहोचली आहेत. काही मोजक्या तपस्व्यांना, संन्याशांना, पुण्यात्म्यांना आणि साक्षात्कारी जीवांना मुक्ती मिळाली; काही थोडे भक्त हे देवधुंद होऊन, त्याच्या आनंदाने, देवाविषयीच्या प्रेमावेशाने नाचूबागडू लागले पण दुसरीकडे मात्र एक संपूर्ण मानववंश प्राण आणि बुद्धी यांच्या अभावी, जर अंधकाराच्या आणि निष्क्रियतेच्या खाईत जात असेल तर, ही कोणत्या प्रकारची आध्यात्मिक सिद्धी म्हणायची?

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 360-361)

विचार शलाका – ३१

जेव्हा एखाद्या व्यक्तीची ‘पूर्णयोगा’साठी निवड निश्चित झालेली असते तेव्हा सर्व परिस्थिती, मनाचे आणि जीवनाचे सारे चढउतार हे त्या व्यक्तीला, या ना त्या प्रकारे योगाकडेच घेऊन जाण्यासाठी साहाय्यकारी ठरतात. त्याच्या स्वतःच्या चैत्यपुरुषाकडून आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘ईश्वरी शक्ती’कडून, अशा व्यक्तीच्या बाह्यवर्ती परिस्थितीचे चढउतार आणि मनाचे चढउतार या दोन्हींचा वापर त्या ध्येयाप्रत घेऊन जाण्यासाठी करून घेतला जातो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 30-31)

विचार शलाका – २०

समत्व हा ‘पूर्णयोगा’चा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे; वेदना आणि दुःखभोग असतानादेखील समत्व बाळगणे आवश्यक आहे आणि त्याचा अर्थ असा की, दृढपणे आणि शांतपणे चिकाटी बाळगली पाहिजे; अस्वस्थ वा त्रस्त किंवा निराश वा उद्विग्न होता कामा नये तर, ‘ईश्वरी संकल्पा’वर अविचल श्रद्धा ठेवून वाटचाल केली पाहिजे. समत्वामध्ये उदासीन स्वीकाराचा समावेश होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या वेळी साधनेमधील काही प्रयत्नांबाबत तात्पुरते अपयश आले तरी व्यक्तीने समत्व राखले पाहिजे; व्यक्तीने त्रस्त किंवा निराश होता कामा नये; तसेच ते अपयश म्हणजे ‘ईश्वरी इच्छे’चा संकेत आहे असे समजून, प्रयत्न सोडून देताही कामा नयेत. उलट, तुम्ही त्याचे कारण शोधून काढले पाहिजे, त्या अपयशाचा अर्थ शोधून काढला पाहिजे आणि विजयाच्या दिशेने श्रद्धापूर्वक मार्गक्रमण केले पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे आजारपणाच्या बाबतीतसुद्धा – तुम्ही त्रस्त होता कामा नये, विचलित किंवा अस्वस्थही होता कामा नये, ‘ईश्वरी इच्छा’ आहे असे समजून तुम्ही ते आजारपण स्वीकारता कामा नये, तर ते शरीराचे अपूर्णत्व आहे या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे पाहिले पाहिजे; मानसिक दोष किंवा प्राणिक अपूर्णत्व यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी जसे तुम्ही प्रयत्न करता तसेच प्रयत्न हे शरीराचे अपूर्णत्व काढण्यासाठीसुद्धा केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)

विचार शलाका – १८

चक्रांमधून उन्नत होत होत, कुंडलिनी जागृत होण्याची प्रक्रिया आणि चक्रांचे शुद्धीकरण या गोष्टी ‘तंत्रयोगा’तील ज्ञानाचा भाग आहेत. आपल्या ‘योगा’मध्ये (पूर्णयोगामध्ये) चक्रांच्या हेतूपूर्वक शुद्धीकरणाची आणि उन्मीलनाची प्रक्रिया अभिप्रेत नसते, तसेच विशिष्ट अशा ठरावीक प्रक्रियेद्वारा कुंडलिनीचे उत्थापन देखील अभिप्रेत नसते. …परंतु तरीही तेथे विविध स्तरांकडून आणि विविध स्तरांद्वारे चेतनेचे आरोहण होऊन, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेशी ऐक्य घडून येते. तेथे चक्रांचे खुले होणे आणि त्या चक्रांचे ज्यांच्यावर नियंत्रण असते त्या (मानसिक, प्राणिक आणि शारीरिक) स्तरांचे खुले होणे देखील घडून येते; त्यामुळे, मी म्हटले त्याप्रमाणे या पूर्णयोगामध्ये रूपांतरणाच्या प्रक्रियेमागे ‘तंत्रयोगा’चे ज्ञान आहे.

*

‘पूर्णयोगा’मध्ये चक्रांचे प्रयत्नपूर्वक उन्मीलन केले जात नाही तर शक्तीच्या अवतरणामुळे ती चक्रे आपोआप खुली होतात. तंत्रयोगाच्या साधनेमध्ये ती ‘मूलाधारा’पासून सुरुवात करून ऊर्ध्वगामी दिशेने खुली होत जातात तर, पूर्णयोगामध्ये ती वरून खाली या दिशेने खुली होत जातात. परंतु ‘मूलाधारा’तून शक्ती वर चढत जाणे हे घडून येतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 460)