Tag Archive for: नैराश्य

नैराश्यापासून सुटका – १३

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही इतके अस्वस्थ व्हावे एवढे काही ते कारण मोठे नव्हते. खरंतर, ते कारण अगदीच किरकोळ होते. अर्ध्याकच्च्या आणि अवाजवी भावविवशतेची हीच मोठी अडचण असते. अगदी क्षुल्लक कारणामुळे, तुमच्यामधील ही भावविवशता उफाळून वर आली. साधकांमध्ये आढळून येणाऱ्या चिवट अशा अडथळ्यांपैकी ‘भावविवशता’ (sensitiveness) हा एक सर्वात मोठा अडथळा आहे.

त्यावर दोन उपाय आहेत. पहिला उपाय हा की, ‘श्रीमाताजीं‌’बद्दल आंतरात्मिक विश्वा स असला पाहिजे आणि त्याच्या जोडीला समर्पण असले पाहिजे; म्हणजे, “श्रीमाताजींची जी इच्छा असेल ती माझ्यासाठी सर्वेात्तमच असेल,” असा समर्पणाचा भाव असला पाहिजे.

आणि दुसरा उपाय म्हणजे, आत्ता तुमच्या अनुभवास येत असलेली विशालता! ही विशालता (wideness) खऱ्या आत्म्याची असते, तसेच ती खऱ्या मानसिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वाचीसुद्धा असते. त्यांपासून (भावविवशता, अस्वस्थता) या गोष्टी एखाद्या धुळीकणाप्रमाणे खाली पडतात. कारण या गोष्टींना त्यांच्या लेखी काही महत्त्वच नसते. तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे, या विशालतेमध्ये, शांतीमध्ये आणि निश्चल-निरवतेमध्ये नित्य वास्तव्य केले पाहिजे आणि त्यामध्ये तुमचा अहंकार विरघळून गेला पाहिजे आणि आसक्ती नाहीशी झाली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 211)

नैराश्यापासून सुटका – १०

(साधनाभ्यासामध्ये प्राण सहकार्य करत नाहीये, हे असे का होत असावे अशी विचारणा एका साधकाने श्रीअरविंद यांच्यापाशी केली आहे. तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर…)

तुमचा प्राण (vital) इच्छावासनांच्या कचाट्यात सापडला होता त्यामुळे आणि मानसिक इच्छाशक्तीद्वारे नियंत्रित न झाल्यामुळे, तो आता अशा रितीने स्वत:च्याच तंत्राने वागू लागला आहे. जेव्हाजेव्हा त्याच्या इच्छावासना पूर्ण केल्या जात नाहीत तेव्हातेव्हा तो असाच आक्रस्ताळेपणा करत असतो. मानसिक इच्छाशक्तीकडून जेव्हा प्राणावर नियंत्रण ठेवले जात नाही आणि त्याला त्याच्या जागी ठेवले जात नाही तेव्हा, दिसून येणारी मनुष्याच्या प्राणाची ही सार्वत्रिक प्रतिक्रिया असते.
*
पुढील दोन प्रकारच्या परिस्थितीमध्ये प्राण सहकार्य करत नाही.
१) जेव्हा त्याच्या सामान्य अहंनिष्ठ कृतींना किंवा त्या कृतीमागील हेतुंना वाव दिला जात नाही तेव्हा प्राण सहकार्य करत नाही.
२) जेव्हा व्यक्ती अगदी शारीर स्तरापर्यंत खाली उतरते आणि जोपर्यंत वरची ‘शक्ती‌’ तिथे कार्यकारी नसते तोपर्यंत, प्राण कधीकधी किंवा काही काळासाठी सुस्त होऊन जातो.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 138, 138-139)

नैराश्यापासून सुटका – ०९

माणसे ईश्वराभिमुख होत नाहीत आणि त्यामुळे ती स्वत:हूनच दु:ख आणि वेदना यांची अप्रत्यक्षरित्या निवड करत असतात. एवढेच नव्हे तर, प्राणिक चेतनेमध्येच (vital consciousness) असे काहीतरी असते की, जीवनामध्ये जर दुःखसंकटे नसतील तर तिला चुकल्या-चुकल्यासारखे वाटते. शरीराला दु:खभोगाचे भय असते, तिटकारा असतो; पण ‘प्राण’ मात्र त्याला जीवनरूपी लीलेचाच एक भाग म्हणून स्वीकारतो.
*
प्राण जीवन-नाट्याचा आनंद घेत असतो, दु:खसंकटांमध्ये देखील तो मजा घेत असतो. त्याच्या दृष्टीने नैराश्याचे क्षण म्हणजे विकृती नसते तर, जीवनलीलेचाच तो एक भाग आहे असे म्हणून तो त्यांचा स्वीकार करत असतो. अर्थात प्राणामध्ये देखील बंडखोरीची वृत्ती असते आणि त्यामध्ये तो मजा घेत असतो. ज्या भागाला दु:खभोग नकोसे असतात आणि ज्याला त्यापासून सुटका करून घेणे आवडते ती ‘शारीरिक चेतना’ (physical consciousness) असते; पण प्राण मात्र पुन्हा पुन्हा तिला रेटत राहतो आणि त्यामुळे शारीरिक चेतनेची (दु:खभोगापासून) सुटका होऊ शकत नाही. बंडखोरी असो की निराशेला कवटाळणे असो, दोन्ही बाबींना जबाबदार असतो तो राजसिक-तामसिक प्राणिक अहंकार (rajaso-tamasic vital ego)! रजोगुण प्रबळ असतो तेव्हा तेथे बंडखोरी असते व तमोगुण प्रबळ असतो तेव्हा तेथे नैराश्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 178, 178)

नैराश्यापासून सुटका – ०८

 

निराशा कोणत्या ना कोणत्यातरी निमित्ताने येते; पण वास्तविक ती कोणत्या एखाद्या विशिष्ट कारणामुळे नव्हे तर, स्वतःच्या मर्जीनुसार येत असते. निराशा प्रत्येकामध्ये अशा रितीनेच कार्य करत असते.
*
कण्हणे-विव्हळणे, रुदन करणे, किंबहुना व्यथावेदना आणि सर्व प्रकारचे दु:खभोग, यांमध्ये जो सुख घेतो तो ‘आत्मा’ नसतो, तर तो ‘प्राण’ किंवा त्याच्यातील एखादा भाग असतो.
*
कोणत्याही प्रकारचे नैराश्य वाईटच, कारण त्यामुळे चेतना निम्नस्तरावर येते, त्यामुळे ऊर्जा खर्च होते आणि मनुष्य विरोधी शक्तींच्या अंमलाखाली येतो.
*
नैराश्य मग ते कसेही आणि कोठूनही आलेले असले तरी, त्याबाबतीत एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे ते नैराश्य बाहेर फेकून दिले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 183, 178, 183, 186)

नैराश्यापासून सुटका – ०७

(नैराश्य कोणत्या कारणांनी येऊ शकते यासंबंधी श्रीअरविंद एका साधकाला पत्राद्वारे सांगत आहेत.)

सहसा निराशेच्या लाटा या सामान्य ‘प्रकृती’मधून येतात. जेव्हा कोणतेच कारण नसते तेव्हा मन निराशेसाठी आंतरिक किंवा बाह्य असे एखादे निमित्त शोधून काढते. निराशेचे कारण न कळण्याचे हे एक कारण असू शकते.

दुसरे असेही एक कारण असू शकते की, कर्माची किंवा साधनेची जी वाटचाल चालू आहे, तिचे अनुसरण करण्याची जिवामधील (being) एखाद्या भागाची उमेद नाहीशी झालेली असू शकते किंवा तो भाग त्या वाटचालीचे अनुसरण करण्यास अनिच्छुक असू शकतो किंवा तो श्रान्तक्लान्त झालेला असू शकतो.

तो जर प्राणिक अस्तित्वामधील (vital being) एखादा भाग असेल तर, आपले पितळ उघडे पडू नये म्हणून किंवा ते कारण दूर होऊ नये म्हणून तो स्वतःला दडवून ठेवू शकतो. तो जर शारीरिक अस्तित्वामधील एखादा भाग असेल तर तो नुसताच मंद आणि अंधुक, स्वतःला व्यक्त करण्यास अक्षम असणारा असा असू शकतो.

आणि शेवटचे एक कारण म्हणजे ती निराशा अवचेतन (subconscient) भागामधून आलेली असू शकते. विनाकारण नैराश्य दाटून येणे, हेही निराशेच्या अनेकविध कारणांपैकी एक कारण असू शकते. व्यक्तीने स्वतःच स्वतःचे निरीक्षण करून, नक्की काय कारण आहे ते शोधले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 185)

नैराश्यापासून सुटका – ०५

सत्कृत्य करणे; न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत व समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. अगदी पूर्ण स्वार्थी हेतुने पाहिले तरीसुद्धा ही गोष्ट खरी असल्याचे दिसते. याशिवाय खरोखरच, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल आणि कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्मांमुळे तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्या सभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता. तुम्ही केलेली कर्मे ही जर सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमच्या आजूबाजूचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थी भावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर, तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार; म्हणजे सतत दु:ख, सततचा असंतोषच तुमच्या वाट्यास येणार; म्हणजे अंतिमत: तुमच्या पदरी नैराश्यच पडणार.

तुम्ही देह-त्याग केलात तर तुमची या वातावरणापासून सुटका होईल असे तुम्ही मानता कामा नये; उलट, देह हा एक प्रकारे अचेतनाचा (unconsciousness) पडदा असल्यासारखा असतो, जो दुःखभोगाची तीव्रता कमी करतो. जडभौतिक प्राणिक जीवनामध्ये (vital life) वावरत असताना जर तुम्ही देहाच्या संरक्षणाविना असाल तर, दुःखभोग हे अधिक तीव्र होतात आणि ज्यामध्ये बदल घडविणेच आवश्यक असते त्यामध्ये बदल घडविण्याची, ज्यामध्ये सुधारणा घडविणे आवश्यक असते त्यामध्ये सुधारणा घडविण्याची, आणि अधिक उच्चतर, अधिक आनंदी व अधिक प्रकाशमय जीवन व चेतना यांच्याप्रत स्वतःला खुले करण्याची संधीही (देह नसल्याने) आता तुमच्यापाशी नसते.

म्हणून तुम्ही तुमचे कार्य येथेच (या पृथ्वीवर असतानाच) करण्याची त्वरा केली पाहिजे; कारण तुम्ही तुमचे कार्य इथेच खऱ्या अर्थाने करू शकता. मृत्युकडून कोणतीही अपेक्षा बाळगू नका. जीवन हीच तुमची मुक्ती आहे. या जीवनात राहूनच तुम्ही स्वतःचे रूपांतरण केले पाहिजे. पृथ्वीवरच तुमची प्रगती होऊ शकते आणि पृथ्वीवरच तुम्हाला साक्षात्कार होऊ शकतो. या देहामध्ये असतानाच तुम्ही विजय संपादन करू शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 197-198)

नैराश्यापासून सुटका – ०१

जीवन विविधरंगी असते. कधी चैत्रपालवी तर कधी वैशाख-वणवा, कधी नयनरम्य तर कधी ओसाडरुक्ष दृश्य, कधी मोरपंखी कोमलता तर कधी पाषाणाची कठोरता; अशा बहुरंगी, बहुढंगी चढ-उतारावरून, खाच-खळग्यातून जीवनप्रवाह खळाळता राहतो. मानवी जीवनही आशा-निराशेच्या हिंदोळ्यांवर हेलकावत राहते. कधी तप्त वाळूवर अनवाणी पावलांनी चालण्याचा अनुभव येतो तर कधी दवबिंदू-भिजल्या कोवळ्या गवतावर फेरफटका मारण्याचा स्पर्श-सुखद अनुभव येतो. यापैकी कोणताही अनुभव आला तरी, अध्यात्म आपल्याला या सगळ्याकडे पाहण्याची एक सम-दृष्टी प्रदान करते. आजच्या स्पर्धात्मक जगात आशेपेक्षा निराशेचे प्रसंगच अधिक येताना दिसतात. अशा वेळी तर हमखास आपल्या मदतीला येतो तो अध्याम-विचार! व्यक्तीला निराशेकडून आशेकडे आणि नंतर आशा-निराशातीत अवस्थेकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य या विचारामध्ये असते.

उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘नैराश्यापासून सुटका’ या मालिकेमध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे या विषयावरील विचार आपण समजावून घेणार आहोत. वाचक नेहमीप्रमाणेच या मालिकेचे स्वागत करतील अशी आशा आहे.

यदाकदाचित मनावर निराशेची काजळी जमली असेल तर, ती झटकून टाकू या आणि नव-वर्षानिमित्त नव-आशेचा स्फुल्लिंग मनात तेवता ठेवू या.

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – १२५

कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता ही अर्थातच आंतरिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. कर्मामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला अर्पण-भाव हा महत्त्वाचा असतो. याच्या जोडीला, एखादी व्यक्ती जर कर्म करताना श्रीमाताजींचे स्मरण करू शकत असेल किंवा एका विशिष्ट प्रकारच्या एकाग्रतेद्वारे श्रीमाताजींच्या उपस्थितीची तिला जाणीव होत असेल किंवा एक शक्ती हे कार्य करत आहे, हे कार्य सांभाळत आहे, याची जर व्यक्तीला जाण असेल तर त्यामुळे आध्यात्मिक परिणामकारकता अधिकच वाढीला लागते. पण मनावर मळभ आलेले असताना, नैराश्य आलेले असताना किंवा संघर्षाच्या प्रसंगी व्यक्ती जरी या गोष्टी करू शकली नाही तरी, त्या कर्माची प्रारंभिक प्रेरकशक्ती असणारे प्रेम वा भक्ती या साऱ्याच्या पाठीमागे तशीच टिकून राहू शकते; ही शक्ती त्या मळभाच्या मागे उपस्थित राहू शकते आणि अंधकारानंतर पुन्हा सूर्यासारखी पूर्ववत उदय पावू शकते.

सर्व साधना ही अशीच असते आणि म्हणूनच या अंधकारमय क्षणांमुळे व्यक्तीने नाउमेद होता कामा नये, तर (ईश्वरविषयक) मूळ उत्कट आस (urge) आपल्या अंतरंगामध्ये तशीच टिकून आहे आणि हे अंधकारमय क्षण हा प्रवासामधील केवळ एक टप्पा आहे, तो टप्पा ओलांडल्यानंतर तो स्वतःच आपल्याला एका महत्तर प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, याची व्यक्तीला जाणीव असली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 242)