नैराश्यापासून सुटका – २८
(एका साधकाला ‘सत्या’ची हाक आलेली आहे. त्या मार्गावर वाटचाल करताना त्याची वृत्ती कशी असली पाहिजे हे श्रीअरविंद त्या साधकाला पत्राद्वारे लिहीत आहेत.)
मनामध्ये शंकाकुशंका आल्या किंवा नैराश्य आले तर असे म्हणावे की, ”ईश्वर माझा पाठीराखा आहे, मला अपयश कसे बरे येईल?” तुम्ही पुरेसे शुद्ध नाही किंवा पात्र नाही अशा सर्व सूचनांना उत्तरादाखल म्हणावे की, “मी अमृतपुत्र आहे आणि स्वत: ईश्वराने माझी निवड केली आहे. मी स्वत:शी व ईश्वराशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे आणि मी तसा प्रामाणिक राहिलो तर विजय निश्चित आहे; अगदी मी पडलो, धडपडलो तरी मी निश्चितपणे पुन्हा उभा राहीन.”
या उच्चतर ध्येयाकडे (सत्याच्या हाकेकडे) पाठ फिरवून, कोणतेतरी कनिष्ठ ध्येय पूर्ण करू पाहणाऱ्या सर्व उर्मींना उत्तर द्या की, “माझ्या अंतरंगात वसणाऱ्या आत्म्याचे ज्यामुळे समाधान होऊ शकेल असे हे सर्वात महान ध्येय आहे, एकमेव ‘सत्य’ आहे; दिव्यत्वाच्या दिशेने चाललेल्या या वाटचालीमध्ये मला कोणत्याही कसोट्यांना आणि कितीही संकटांना सामोरे जावे लागले, तरी मी धीराने त्या ध्येयापर्यंत पोहोचेनच.”
‘दिव्य प्रकाश आणि दिव्य हाक यांच्याप्रत निष्ठा’ याचा मला अभिप्रेत असणारा अर्थ हा असा आहे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 99)






