Tag Archive for: ध्यान

आध्यात्मिकता ३४

एका कोपऱ्यात बसून ध्यान करण्याची क्षमता असणे ही आध्यात्मिक जीवनाची खूण आहे, असे काही जणांना वाटते. ही अगदी सार्वत्रिक कल्पना आहे. मला टिका करायची नाहीये पण, जे लोक त्यांच्या ध्यान करण्याच्या क्षमतेचे मोठे अवडंबर माजवतात त्यांच्यापैकी बहुतांश जण, एक तासाच्या ध्यानाच्या बैठकीमध्ये एक मिनिटसुद्धा खऱ्या अर्थाने ध्यानस्थ होत नाहीत. जे खऱ्या अर्थाने ध्यान करत असतात ते त्याची कधीही वाच्यता करत नाहीत, कारण त्यांच्यासाठी ती अगदी स्वाभाविक गोष्ट असते. तुम्हाला जेव्हा ध्यानाची मातब्बरी वाटत नाही आणि तुमच्यासाठी ती एक अतिशय स्वाभाविक अशी गोष्ट होते, तेव्हा तुम्ही प्रगती करत आहात, असे तुम्ही म्हणू शकता. जे लोक ध्यानाविषयी बोलत राहतात आणि ध्यान करतात म्हणून इतरांपेक्षा स्वतःला अधिक श्रेष्ठ समजू लागतात, तेव्हा तुम्ही निश्चित समजा की, ते बहुतांश वेळा पूर्णपणे जडतेच्या स्थितीमध्ये असतात.

ध्यान करणे अतिशय कठीण असते. ध्यानाचे अनेक प्रकार असतात… तुम्ही एक कल्पना करू शकता आणि त्या कल्पनेचा मागोवा घेतघेत एका निष्कर्षाप्रत येऊन पोहोचता, हे ‘सक्रिय ध्यान’ असते; ज्यांना एखादी समस्या सोडवायची असते किंवा ज्यांना काही लिखाण करायचे असते, तेव्हा त्यांच्या नकळतपणे ते अशा प्रकारचे ध्यान करत असतात. काहीजण ध्यानाला बसतात आणि एखाद्या कल्पनेचा मागोवा घेण्याऐवजी ते कोणत्यातरी एखाद्या गोष्टीवर लक्ष एकाग्र करतात — स्वतःची एकाग्रताशक्ती अधिक तीव्र करण्यासाठी एखाद्या बिंदूवर लक्ष केंद्रित करतात. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या बिंदूवर लक्ष एकाग्र करता तेव्हा सहसा पुढील गोष्टी घडून येतात : एखाद्या बिंदूवर, मग तो बिंदू मानसिक असो, प्राणिक असो किंवा भौतिक असो, जर तुम्ही तुमची एकाग्रतेची क्षमता पुरेशी एकवटण्यामध्ये यशस्वी झालात तर, तुम्ही एका विशिष्ट क्षणी त्या बिंदुतून आरपार जाता आणि एका वेगळ्या चेतनेमध्ये प्रवेश करता. आणि इतर जण मात्र त्यांच्या डोक्यातून सर्व मानसिक आंदोलने, कल्पना, प्रतिक्षिप्त क्रिया, प्रतिक्रिया हटविण्यासाठी व एका खरोखर शांत प्रशांत स्थितीप्रत पोहोचण्यासाठी धडपडत असतात. हे अतिशय कठीण असते; अशाही काही व्यक्ती आहेत की ज्यांनी पंचवीस-पंचवीस वर्षे प्रयत्न केले होते पण त्यांना यश आले नाही, कारण असे करू पाहणे म्हणजे बैलाची शिंगे पकडून त्याच्या आधारे बैलाला पकडण्यासारखे आहे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 103-104]

‘कर्म’ आणि ‘साधना’ यांमध्ये विरोध नसतो. योग्य वृत्तीने केलेले कर्म हीच स्वयमेव साधना असते. ध्यान हाच काही साधनेचा एकमेव मार्ग नाही. कर्म हाही एक मार्ग आहे; प्रेम, भक्ती आणि समर्पण हेही साधनेचे इतर मार्ग आहेत.

*

रूपांतरणाच्या प्रक्रियेत बाह्य चेतनेचा समावेश हा ‘पूर्णयोगा’मध्ये आत्यंतिक महत्त्वाचा असतो. ध्यानामुळे हे शक्य होत नाही. कारण ध्यानाचा संबंध हा केवळ आंतरिक अस्तित्वाशी असतो. त्यामुळे ‘कर्म’ हे येथे मूलभूत महत्त्वाचे ठरते. मात्र ते योग्य चेतनेमध्ये आणि योग्य वृत्तीने केले पाहिजे आणि तसे जर ते केले गेले तर, कोणत्याही ध्यानाने जो परिणाम साध्य होतो तोच परिणाम अशा कर्मानेही साध्य होतो.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 209, 221]

…कर्म हे पूर्णयोगाचे आवश्यक अंग आहे. तुम्ही कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर ‘ध्याना’मध्येच व्यतीत केलात तर तुमची साधना व तुम्ही वास्तवावरील पकड गमावून बसाल; आणि तुम्ही स्वतःला अनियंत्रित अशा वैयक्तिक कल्पनांमध्ये गमावून बसाल…

-श्रीअरविंद
(CWSA 32 : 248)

कर्म आराधना – ३७

आळस आणि अक्रियता (inaction) यांचा शेवट तामसिकतेमध्ये होतो; अचेतनेच्या गर्तेत पडण्यासारखे ते असते, या गोष्टी प्रगती आणि प्रकाश यांच्या विरोधी असतात.

स्वतःच्या अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे – हा आपला आदर्श असला पाहिजे. तोच सत्य चेतना प्राप्त करून घेण्याच्या दिशेने जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे.
*
योग्य वृत्तीने केलेले कर्म हे ध्यानच असते.

– श्रीमाताजी
[CWM 14 : 297, 298]

कर्म आराधना – ३५

एखादी व्यक्ती हिमालयात निघून गेली तर, ती स्वतःला अक्रिय ध्यानासाठी (inactive meditation) सुयोग्य बनवू शकेल, पण ती जीवन जगण्यासाठी आणि ‘श्रीमाताजीं’ची सेवा करण्यासाठी काहीशी अपात्र ठरण्याची शक्यता आहे, आणि असे झाले तर, पुढच्या जन्मामध्येही तिचे ते व्यक्तित्व तसेच कायम राहील. (हिमालयात निघून जाणे इ.) हा निव्वळ पारंपरिक कल्पनांचा प्रभाव आहे, त्यांचा पूर्णयोगात काहीही उपयोग नाही. या इथल्या जीवनात, ‘श्रीमाताजीं’च्या जवळ राहून, कर्म करत असतानाच, व्यक्तीने ‘श्रीमाताजीं’चे परिपूर्ण साधन बनण्यासाठी स्वतःला सुपात्र बनविले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 246]

साधनेची मुळाक्षरे – ३०

श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधील मजकूर –

‘योगसाधने’मध्ये प्रार्थना किंवा ध्यान या दोन्हीचे खूप महत्त्व असते, अगदी खोल अंत:करणातून उदित झालेली प्रार्थना ही भावनांच्या किंवा अभीप्सेच्या शीर्षस्थानी असायला हवी; ईश्वरविषयक आनंद किंवा प्रकाश यांच्या समवेत आतून जिवंतपणे उमलून येणारी बाब म्हणून ‘जप’ किंवा ध्यान व्हायला हवे. जर ह्या गोष्टी केवळ यांत्रिकपणे केल्या आणि केवळ कर्तव्य म्हणून केल्या तर त्या रूक्षपणा आणि निरसता यांच्याकडे झुकतात आणि त्यामुळे त्या प्रभावहीन ठरण्याची शक्यता असते.

तुम्ही अमुक एखादा परिणाम घडून येण्यासाठी, एक साधन म्हणून जरुरीपेक्षा जरा जास्तच प्रमाणात ‘जप’ करत आहात असे मला वाटते, असे जेव्हा मी म्हणालो, तेव्हा मला असे म्हणावयाचे होते की, – तुम्ही विशिष्ट गोष्टी घडून येण्यासाठी एक प्रक्रिया म्हणून, एक साधन म्हणून जपाचा अधिक उपयोग करत आहात आणि म्हणूनच मला तुमच्यामध्ये मानसिक, आत्मिक अशी अवस्था विकसित व्हावी असे वाटत होते, कारण जेव्हा चैत्य पुरुष पुढे आलेला असतो तेव्हा प्रार्थनेमध्ये आनंद आणि जिवंतपणा यांचा अभाव नसतो; तेव्हा त्यामध्ये अभीप्सा असते, एक धडपड, एक आस असते; अशा वेळी भक्तीचा अखंड पाझर चालू राहण्यामध्ये कोणतीही अडचण नसते. मन जेव्हा शांत, स्थिर असते, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख असते तेव्हा ध्यानामध्ये कोणतीही अडचण येत नाही किंवा त्यामध्ये रस वाटत नाही असेही होत नाही. ध्यान ही ज्ञानाभिमुख अशी एक प्रक्रिया आहे आणि ती ज्ञानाच्या माध्यमातूनच प्रगत होते; ती मस्तकाशी संबंधित बाब आहे, हृदयाशी नाही; तेव्हा तुम्हाला जर ध्यान हवे असेल तर, तुम्ही ज्ञानाकडे पाठ फिरविता कामा नये.

हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे ध्यान नव्हे; तर ती आपल्या ‘प्रियकरा’ला, ‘ईश्वरा’ला दिलेली हाक आहे. ‘पूर्णयोग’ म्हणजे केवळ ‘ज्ञानयोग’ नव्हे – ज्ञानयोग हा एक मार्ग झाला; परंतु आत्मदान, समर्पण, भक्ती हा पूर्णयोगाचा पाया आहे आणि अंतिमत: हा पाया नसेल तर काहीच होऊ शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226-227)

साधनेची मुळाक्षरे – २७

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला? सत्य चेतना खाली उतरविण्यासाठी तिला हाक देण्याची ही केवळ एक पद्धत आहे.

सत्यचेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, केवळ हीच गोष्ट महत्त्वाची आहे आणि जर का ती कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल – जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे – तर ते अधिक चांगले आहे. ध्यान हे एक केवळ साधन किंवा उपकरण आहे, चालता, बोलता, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 300)

साधनेची मुळाक्षरे – २६

प्रश्न : ध्यानाची उद्दिष्टे काय असायला हवीत किंवा ध्यानाच्या संकल्पना काय असायला हव्यात?

श्रीअरविंद : जी तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असतील ती! परंतु जर का तुम्ही मला निरपवाद उत्तर विचारत असाल, तर मला असे म्हटले पाहिजे की, ध्यानासाठी म्हणजे मननासाठी किंवा चिंतनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते आणि सर्वांतर्यामी असणाऱ्या ‘देवा’वर, ‘देवा’मध्ये निवास करणाऱ्या सर्वांवर आणि सर्व काही ‘देव’च आहे या संकल्पनांवर मनाने आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. मग तो ‘देव’ ‘अवैयक्तिक’ आहे की ‘वैयक्तिक’ आहे, की सापेक्ष असा ‘एकमेव आत्मा’ आहे, या गोष्टीने वस्तुतः फारसा काही फरक पडत नाही. पण मला तरी (सर्वं खल्विदं ब्रह्म) ही संकल्पना सर्वोत्तम वाटते. कारण ती सर्वोच्च आहे आणि तिच्यामध्ये, म्हणजे ‘सर्व काही ब्रह्म आहे’ या संकल्पनेमध्ये, इहलौकिक सत्य असो अथवा पारलौकिक सत्य असो, किंवा सर्व अस्तित्वाच्या अतीत असणारे सत्य असो, त्या सर्व सत्यांचा समावेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 294-295)

साधनेची मुळाक्षरे – २५

प्रश्न : ध्यानासाठी अगदी आवश्यक असणारी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी काही बाह्य परिस्थिती आवश्यक नाही, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात. परंतु बाह्य परिस्थितीमुळे व्यक्तीवर मर्यादा पडता कामा नयेत. एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठता-बसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गलक्यामध्ये, कोणत्याही परिस्थितीत ध्यान करता आले पाहिजे.

मनाचे सैरावैरा भरकटणे, विस्मरण, झोप, शारीरिक आणि स्नायुगत अधीरता व अशांती या ध्यानाच्या आड येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची आहे.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे उत्तरोत्तर वाढणारे पावित्र्य आणि जेथून विचार व भावनांचा उदय होतो, त्या आंतरिक चेतनेची (चित्ताची) स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून चित्त मुक्त असले पाहिजे. मानसिक आणि नैतिक पूर्णत्व या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 295)

साधनेची मुळाक्षरे – २४

प्रश्न : ध्यान म्हणजे नक्की काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये Meditation आणि Contemplation हे दोन शब्द वापरले जातात.

मनन –
एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘मनन’ (Meditation).

चिंतन –
एकाग्रतेच्या बळावर, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, कोणत्यातरी एकाच वस्तुवर, प्रतिमेवर किंवा संकल्पनेवर मन एकाग्र करणे म्हणजे ‘चिंतन’ (Contemplation). हे दोन्ही प्रकार ही ध्यानाचीच दोन रूपं आहेत. कारण विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मानसिक एकाग्रता हे ध्यानाचे तत्त्व आहे.

आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता –
ध्यानाचे इतरही काही प्रकार आहेत. एके ठिकाणी सामी विवेकानंदांनी तुम्हाला तुमच्या विचारांपासून अलग होऊन मागे उभे राहायला सांगितले आहे. मनात विचार जसे येत आहेत तसे येत राहू देत, तुम्ही नुसते त्यांचे निरीक्षण करत राहायचे आणि ते काय आहेत हे जाणून घ्यायचे. याला ‘आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता’ असे म्हणता येईल.

मुक्तिप्रद ध्यान –
आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता ही दुसऱ्या एका प्रकाराकडे घेऊन जाते. मनामधून सर्व विचार काढून टाकणे; जेणेकरून, ते मन एक प्रकारची विशुद्ध सावध अशी पोकळी बनले पाहिजे म्हणजे त्यामध्ये दिव्य ज्ञान अवतरू शकेल आणि त्याचा ठसा उमटवू शकेल; त्यामध्ये सामान्य मानवी मनाच्या कनिष्ठ विचारांची लुडबुड असणार नाही आणि काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहावे तितकी स्पष्टता त्यामध्ये असेल. अशा प्रकारे, सर्व मानसिक विचारांचा त्याग ही योगाची एक पद्धत असल्याचे ‘गीते’मध्ये सांगितले आहे, असे तुम्हाला आढळून येईल आणि या पद्धतीला गीतेने पसंती दिलेली दिसते. ह्याला ‘मुक्तिप्रद ध्यान’ असे म्हणता येईल. कारण या ध्यानामुळे विचारांच्या यांत्रिक पद्धतीच्या गुलामीमधून मनाची मुक्तता होते. वाटले तर विचार करायचा किंवा नाही वाटले तर विचार करायचा नाही, असे करण्यास मनाला या ध्यानामुळे, मुभा मिळते. तसेच, स्वतःच्या विचारांच्या निवडीला मुभा मिळते किंवा वाटले तर, विचारांच्या अतीत होऊन, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये ज्याला ‘विज्ञान’ असे म्हटले जाते त्या सत्याच्या शुद्ध बोधाप्रत जाण्याची मनाला मुभा मिळते.

‘मनन’ ही मानवी मनाला सर्वाधिक सोपी असणारी प्रक्रिया आहे पण त्याचे परिणाम अल्प असतात. ‘चिंतन’ ही अधिक कठीण पण परिणामांच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. आत्म-निरीक्षण आणि विचारमालिकांपासून मुक्ती (मुक्तिप्रद ध्यान) या गोष्टी सर्वाधिक कठीण आहेत परंतु त्याचे फळ मात्र विशाल आणि महान असे असते. व्यक्ती स्वतःच्या कलानुसार आणि क्षमतेनुसार यापैकी कोणत्याही प्रकाराची निवड करू शकते. योग्य पद्धती म्हणायची झाली तर, ध्यानाच्या या सर्वच प्रकारांचा वापर करावा, प्रत्येक पद्धत तिच्या तिच्या स्थानी आणि तिच्या तिच्या उद्दिष्टांसाठीच वापरण्यात यावी. परंतु यासाठी एका दृढ श्रद्धेची, स्थिर धैर्याची आणि ‘योगा’चे आत्म-उपयोजन (self-application) करण्यासाठी प्रचंड ऊर्जेची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 293-294)