Tag Archive for: ध्यान

जीवन जगण्याचे शास्त्र – २४

साधक : “सर्व कर्मं म्हणजे अनुभवाची पाठशाळा असते,” असे श्रीअरविंदांनी का म्हटले आहे?

श्रीमाताजी : तुम्ही जर कोणतेही कर्मच केले नाही, तर तुम्हाला कोणताच अनुभव येणार नाही. समग्र जीवन हे अनुभवाचे क्षेत्र आहे. तुम्ही केलेली प्रत्येक हालचाल, तुमच्या मनात उमटलेला प्रत्येक विचारतरंग, तुम्ही केलेले प्रत्येक कर्म हा एक अनुभव असू शकतो आणि तो अनुभव असलाच पाहिजे. आणि विशेषतः तुमचे कार्यक्षेत्र हे तर तुमचे अनुभवाचे क्षेत्र असते; तुम्ही जी प्रगती करण्यासाठी आंतरिकरित्या प्रयत्न करत असता ती सर्व प्रगती, त्या (बाह्य) क्षेत्रामध्येसुद्धा उपयोगात आणली गेली पाहिजे.

तुम्ही कोणतेही काम न करता केवळ ध्यानामध्ये किंवा निदिध्यासनामध्ये राहिलात, तर तुम्ही प्रगती केली आहे किंवा नाही, हे तुम्हाला कळणार नाही. आणि मग तुमची प्रगती झाली आहे अशा भ्रमात तुम्ही राहाल. उलट, जेव्हा तुम्ही एखादे काम करायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती, तुमचे इतरांशी येणारे संबंध, तुमचा नोकरीव्यवसाय या सर्व गोष्टी म्हणजे अनुभवाचे असे एक क्षेत्र असते की, जेथे तुम्हाला तुम्ही केलेल्या प्रगतीची जाणीव तर होतेच; पण अजून जी कोणती प्रगती करून घ्यायची राहिली आहे, त्याचीही जाणीव तुम्हाला होते.

तुम्ही जर काहीही काम न करता, स्वतःमध्येच बंदिस्त होऊन राहिलात तर, कदाचित पूर्णपणे व्यक्तिगत भ्रमामध्ये तुम्ही तुमचे जीवन व्यतीत कराल, अशी शक्यता असते. परंतु ज्याक्षणी तुम्ही बाह्य जगात कृती करू लागता आणि इतरांच्या संपर्कात येता; विविध प्रकारच्या परिस्थितीच्या आणि जीवनामधील विविध वस्तुंच्या संपर्कात येता, तेव्हा तुम्हाला तुम्ही प्रगती केली आहे किंवा नाही; तुम्ही अधिक स्थिर, शांत झाला आहात की नाही; अधिक सचेत, अधिक सशक्त, अधिक निःस्वार्थी झाला आहात की नाही; तुमच्यामध्ये इच्छावासना शिल्लक आहेत की नाहीत; काही अग्रक्रम, काही दुर्बलता, काही अविश्वासूपणा शिल्लक तर नाही ना, इत्यादी सर्व गोष्टींची कर्म करत असताना तुम्हाला पूर्णतया वस्तुनिष्ठपणे जाणीव होऊ लागते.

परंतु तुम्ही जर फक्त ध्यानामध्येच स्वतःला बंदिस्त करून घेतलेत तर ते पूर्णपणे वैयक्तिक असते, आणि मग तुम्ही पूर्णपणे एका भ्रमामध्ये जाण्याची आणि त्यामधून कधीही बाहेर न पडण्याची शक्यता असते. आणि मग तुम्हाला असे वाटू शकते की, तुम्हाला काही असामान्य गोष्टींचा साक्षात्कार झाला आहे. प्रत्यक्षात मात्र तुम्हाला तशी प्रचिती आली असल्याचा किंवा तुम्ही प्रगती केली असल्याचा एक आभास, एक भ्रम तुमच्यापाशी असतो. श्रीअरविंद येथे हेच सांगू इच्छित आहेत.

– श्रीमाताजी (CWM 07 : 287-288)

साधना, योग आणि रूपांतरण – २३१

रूपांतरणाच्या प्रक्रियेत बाह्य चेतनेचा समावेश असणे हे ‘पूर्णयोगा’मध्ये आत्यंतिक महत्त्वाचे असते. केवळ ध्यानाद्वारे हे रूपांतरण शक्य होत नाही. कारण ध्यानाचा संबंध हा केवळ आंतरिक अस्तित्वाशी असतो. त्यामुळे कर्म हे येथे अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरते. फक्त ते योग्य वृत्तीने आणि योग्य जाणिवेने केले पाहिजे. आणि तसे जर ते केले गेले तर, कोणत्याही ध्यानाने जो परिणाम साध्य होतो तोच परिणाम अशा कर्मानेदेखील साध्य होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 221)

साधना, योग आणि रूपांतरण – २३०

चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट आहे. ध्यान किंवा निदिध्यासन हा यांतील एक मार्ग आहे पण ते केवळ एक साधन आहे, भक्ती हे दुसरे साधन, तर कर्म हे आणखी एक साधन आहे.

साक्षात्काराच्या दिशेने पहिले साधन म्हणून योग्यांकडून चित्तशुद्धीची साधना केली जात असे आणि त्यातून त्यांना संतांच्या संतत्वाची आणि ऋषीमुनींच्या अचंचलतेची प्राप्ती होत असे. पण आम्ही प्रकृतीच्या ज्या रूपांतरणाविषयी बोलतो, ते यापेक्षा काहीतरी अधिक आहे; आणि हे रूपांतरण केवळ ध्यानसमाधीने होत नाही, त्यासाठी कर्म आवश्यक असते. कर्मातील ‘योग’ हा अनिवार्य असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 208)

साधना, योग आणि रूपांतरण – ११२

चेतनेमधील उन्मुखतेप्रमाणेच कर्मामध्येही उन्मुखता असते. ध्यानाच्या वेळी तुमच्या चेतनेमध्ये जी ‘शक्ती’ कार्य करत असते आणि तुम्ही जेव्हा तिच्याप्रत उन्मुख, खुले होता तेव्हा ती ज्याप्रमाणे शंकांचे आणि गोंधळाचे ढग दूर पळवून लावते अगदी त्याचप्रमाणे ती ‘शक्ती’ तुमच्या कृतीदेखील हाती घेऊ शकते. आणि त्याद्वारे ती तुम्हाला तुमच्यामधील दोषांची जाणीवच करून देऊ शकते असे नाही तर, काय केले पाहिजे यासंबंधी तुम्हाला ती सतर्क बनवू शकते आणि ते करण्यासाठी तुमच्या मनाला आणि हातांना ती मार्गदर्शन करू शकते. तुम्ही कर्म करत असताना तिच्याप्रत उन्मुख, खुले राहाल तर तुम्हाला या मार्गदर्शनाची अधिकाधिक जाणीव होऊ लागेल. आणि एवढेच नव्हे तर नंतर तुम्हाला, तुमच्या सर्व कृतींच्याच पाठीमागे कार्यरत असलेल्या ‘श्रीमाताजींच्या शक्ती’ची जाणीव होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 262)

साधना, योग आणि रूपांतरण – १०५

श्रीमाताजींसाठी जे कोणी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करतात त्यांच्या योग्य चेतनेची तयारी त्या कर्मामधूनच होत जाते. अगदी ते ध्यानाला बसले नाहीत किंवा त्यांनी कोणती एखादी योगसाधना केली नाही तरीही त्यांच्या चेतनेची तयारी होत असते.

ध्यान कसे करावे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर कर्म करत असताना तसेच सदासर्वकाळ प्रामाणिक असाल आणि जर तुम्ही श्रीमाताजींप्रति उन्मुख राहाल तर जे गरजेचे आहे ते आपोआप घडून येईल.

*

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म हे एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

साधना, योग आणि रूपांतरण – १०४

मी नेहमीच असे सांगत आलो आहे की, साधना म्हणून करण्यात आलेले कर्म – करण्यात आलेले कर्म म्हणजे ‘ईश्वरा’कडून आलेला ऊर्जेचा प्रवाह या भूमिकेतून केलेले कर्म, पुन्हा त्या ‘ईश्वरा’ला अर्पण करणे किंवा ‘ईश्वरा’साठी केलेले कर्म किंवा भक्तिभावाने केलेले कर्म हे साधनेचे एक प्रभावी माध्यम असते आणि अशा प्रकारचे कर्म हे विशेषतः पूर्णयोगामध्ये आवश्यक असते. कर्म, भक्ती आणि ध्यान हे योगाचे तीन आधार असतात. तुम्ही या तिन्ही आधारांच्या साहाय्याने योग करू शकता किंवा दोन किंवा एका आधाराच्या साहाय्यानेही योग करू शकता. ज्याला रुढ अर्थाने ‘ध्यान’ असे म्हटले जाते तसे ध्यान करणे काही जणांना जमत नाही, परंतु अशी माणसं कर्माच्या किंवा भक्तीच्या द्वारे किंवा कर्म आणि भक्ती या दोहोंच्या एकत्रित माध्यमातून प्रगती करून घेतात. कर्म आणि भक्ती यांच्याद्वारे चेतनेचा विकास होतो आणि सरतेशेवटी त्या चेतनेमध्ये सहजस्वाभाविक ध्यान आणि साक्षात्कार शक्य होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 209)

साधना, योग आणि रूपांतरण – १०३

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला तुम्ही ‘ध्यान’ म्हणता? खरी चेतना अवतरित करण्यासाठी तिला आवाहन करण्याची ही केवळ एक पद्धत आहे. खऱ्या चेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, हीच गोष्ट फक्त महत्त्वाची असते आणि जर ते अवतरण कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल, जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे, तर ते अधिक चांगले! ध्यान हे केवळ एक साधन आहे, उपकरण आहे. चालताना, बोलताना, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी योग-प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 300)

साधना, योग आणि रूपांतरण – १०१

आजपर्यंत आपण ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये ध्यान म्हणजे काय, एकाग्रता म्हणजे काय, या दोन्हीमध्ये काय फरक आहे, एकाग्रतेच्या विविध पद्धती कोणत्या, ध्यानामध्ये येणारे अडथळे कोणते आणि त्यावर कोणत्या मार्गांनी मात करता येते, समाधी – अवस्था म्हणजे काय, पारंपरिक योगमार्गातील समाधी आणि पूर्णयोगांतर्गत समाधी यामधील फरक, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय इत्यादी विविध गोष्टी, त्यांचे बारकावे समजावून घेतले.

ध्यानाच्या मार्गाने उन्नत होत होत, समाधी-अवस्थेपर्यंत पोहोचणे हा साधनेचा केवळ एक मार्ग झाला. तो महत्त्वाचा असला तरी एकमेव नाही. पूर्णयोगांतर्गत साधना ही फक्त ध्यानापुरती सीमित नाही. तर ध्यानावस्थेत प्राप्त झालेली शांती, प्रेम, प्रकाश, ज्ञान, आनंद या साऱ्या गोष्टी बाह्य व्यवहारामध्येही उतरविणे येथे अभिप्रेत असते. आणि येथेच महत्त्वाची भूमिका असते ती कर्माची!

ध्यानासाठी दिवसाकाठी आपण किती वेळ देऊ शकतो ? फारफार तर तास-दोन तास. पण उरलेला सर्व वेळ आपण काही ना काही कर्म करत असतो. दैनंदिन व्यवहार करत असतो, उपजीविकेसाठी कामकाज करत असतो. ते करत असताना आपली वृत्ती कशी असते, आपली भूमिका कशी असते, आपण कोणत्या भावनेने कर्म करतो, कर्मफलाबाबत आपला दृष्टिकोन काय असतो, या व यासारख्या गोष्टींवरच कर्म हे ‘कर्मबंधन’ ठरणार की त्याचे पर्यवसान ‘कर्मयोगा’ मध्ये होणार हे अवलंबून असते.

पूर्णयोगामध्ये तर कर्माला विशेषच महत्त्व दिलेले आढळते. कारण या पार्थिव जीवनाचे ‘दिव्य जीवना’मध्ये रूपांतरण घडविणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट असते. या दृष्टीने, पूर्णयोगाच्या प्रकाशात, एक साधनामार्ग या दृष्टिकोनातून ‘कर्म-व्यवहारा’कडे पाहण्याचा प्रयत्न आपण येथून पुढच्या भागांमध्ये करणार आहोत.

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – ८८

(ध्यानावस्थेत प्रकाश दिसल्याचे एका साधकाने श्रीअरविंद यांना कळविले तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर….)

प्रकाश अनेक प्रकारचे असतात. अतिमानसिक, मानसिक, प्राणिक, शारीरिक, दिव्य किंवा असुरी असे सर्व प्रकारचे प्रकाश असतात. त्यांच्याकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहिले पाहिजे, अनुभवांच्या आधारे प्रगल्भ होत गेले पाहिजे आणि त्या प्रत्येकामधील फरक ओळखायला शिकले पाहिजे. खऱ्या प्रकाशांच्या ठायी स्पष्टता आणि सौंदर्य असते आणि त्यामुळे ते ओळखणे हे तितकेसे कठीण नसते.

*

(ध्यानावस्थेमध्ये एका साधकाला काही ध्वनी ऐकू येत असल्याचे त्याने श्रीअरविंदांना पत्राने लिहून कळविले असावे, तेव्हा त्या साधकाला श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर… )

शारीरिक दृष्टीशिवाय जशी आणखी एक वेगळी अंतर्दृष्टी असते, त्याप्रमाणेच बाह्य श्रवणाप्रमाणेच आंतरिक श्रवणही (inner hearing) असते. आणि ते आंतरिक श्रवण इतर जगतांमधील, इतर स्थळकाळातील किंवा अतिभौतिक जिवांकडून येणारे आवाज, ध्वनी आणि शब्द ऐकू शकते. पण इथे तुम्ही काळजी घेतली पाहिजे.

काय करावे आणि काय करू नये, यासंबंधी परस्परविरोधी आवाजात जर तुम्हाला कोणी काही सांगायचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकता कामा नये किंवा त्यांना प्रत्युत्तरदेखील देता कामा नये. तुम्ही काय करावे किंवा काय करू नये यासंबंधी केवळ मी आणि श्रीमाताजीच तुम्हाला सांगू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो किंवा तुम्हाला सल्ला देऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 304-305, 112)

साधना, योग आणि रूपांतरण – ८०

अंतरंगामध्ये खूप खोलवर आणि दूर गेल्यावर सौख्य आणि शांती यांचा अनुभव येतो कारण या गोष्टी अंतरात्म्यामध्ये (psychic) असतात आणि अंतरात्मा हा आपल्या अंतरंगामध्ये खूप खोलवर, मन आणि प्राण यांनी झाकलेला असतो. तुम्ही जेव्हा ध्यान करता तेव्हा तुम्ही या अंतरात्म्याप्रत खुले होता, उन्मुख होता, आणि तेव्हा तुम्हाला अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या आंतरात्मिक चेतनेची जाणीव होते आणि मग तुम्हाला सौख्य, शांती या गोष्टी जाणवतात. सौख्य, शांती आणि आनंद या गोष्टी अधिक समर्थ व स्थिर व्हाव्यात आणि त्यांचा अनुभव तुमच्या सर्व व्यक्तित्वामध्ये, आणि अगदी शरीरामध्येदेखील यावा यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये अधिक खोलवर गेले पाहिजे आणि अंतरात्म्याची पूर्ण शक्ती शारीरिक अस्तित्वामध्ये आणली पाहिजे.

खऱ्या चेतनेसाठी अभीप्सा बाळगून, नियमित एकाग्रता आणि ध्यान केल्याने, हे सर्वाधिक सहजतेने शक्य होते. हे कर्माद्वारे, निष्ठेद्वारेसुद्धा शक्य होते; स्वतःसंबंधी विचार न करता, हृदयामध्ये श्रीमाताजींप्रति सातत्याने आत्मनिवेदन (consecration) करत राहण्याच्या संकल्पनेवर नेहमी लक्ष केंद्रित करून, ‘ईश्वरा’साठीच कर्म करत राहिल्यानेसुद्धा हे शक्य होते. परंतु हे परिपूर्णपणे सुयोग्य रीतीने करणे सोपे नसते.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असण्यासाठी समाधीमध्येच असले पाहिजे असे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 299), (CWSA 30 : 250)