Tag Archive for: दिव्यत्व

 

असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही?

आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण केवळ द्वेष आणि स्व-संतुष्टताच संपादन केली आहे.

आपल्याला ‘ज्ञान‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण फक्त त्रुटी, बोध आणि आकलन या गोष्टीच संपादन केल्या आहेत.

आपल्याला ‘परमानंद‌’ संपादन करायचा आहे, कारण आजवर आपण फक्त सुख व दुःख आणि तटस्थता याच गोष्टी मिळविल्या आहेत.

आपल्याला ‘शक्ती‌’ संपादन करायची आहे, कारण आजवर आपण फक्त दुर्बलता, श्रम आणि पराभूत विजय (विजय मिळालेला असूनसुद्धा पराभूत स्थिती) संपादन केले आहेत.

आपल्याला ‘जीवन‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण फक्त जन्म, वाढ आणि मृत्यू एवढेच साध्य केले आहे.

आपल्याला ‘ऐक्य‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण फक्त सहयोग आणि युद्ध एवढेच साध्य केले आहे.

एका शब्दात सांगायचे झाले तर, आपल्याला ‘दिव्यत्व‌’ संपादन करायचे आहे, दिव्य प्रतिमेमध्ये आपल्या स्वतःला घडवायचे आहे.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200-201)

(आज ही मालिका समाप्त होत आहे.)

 

अमृतवर्षा ११

 

प्रश्न : योगसाधना करण्याची पात्रता अंगी येण्यासाठी व्यक्तीने काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झाले पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेल्या भागाबद्दल आपण अनभिज्ञ असतो. अचेतनेमुळे आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अचेतनेमुळेच प्रकृतीमध्ये काही परिवर्तन किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अचेतनेच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही सजग झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतू व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत.

अशा रीतीने एकदा का तुम्ही जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या आणि तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल. योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की मग जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे. म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे.

पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 03 : 02]