Tag Archive for: तत्त्वज्ञान

पहिली गोष्ट म्हणजे स्वत:ला न फसविणे. आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे आपल्याला कळते. अत्यंत हुशार असा असुर सुद्धा ईश्वराला फसवू शकत नाही. पण सारे समजत असूनदेखील, आपण पाहतो की, जीवनात बरेचदा – दिवसाच्या धावपळीत आपण स्वत:लाच फसविण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला त्याची जाणीवसुद्धा नसते, अगदी सहजपणे, अगदी आपोआप आपण अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. व्यक्ती नेहमीच स्वत:च्या कृतींचे समर्पक समर्थन करते, स्वत:च्या शब्दांबद्दल व कृतींबद्दल समर्थन देते.

पहिल्यांदा नेहमी हेच घडते. भांडणांसारख्या गोष्टींविषयी मी येथे बोलत नाहीये; मी दैनंदिन जीवनातील बारकाव्याच्या गोष्टी सांगत आहे. नेहमी चुकतो तो दुसराच व चूक दुसऱ्यानेच केलेली असते, असे प्रत्येक जण समजत असतो. अगदी बाल्यावस्था पार केल्यावर जराशी समज आल्यावर देखील तुम्ही स्वत:चे समर्थन करताना अगदी मूर्खपणाच करता आणि म्हणता, “त्याने जर तसे केले नसते तर, मी पण असा वागलो नसतो.” पण वास्तविक, हे बरोबर याच्या उलट असायला पाहिजे. समजा तुमच्या बरोबर कोणी आहे, आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल तर, तुमची अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया जे योग्य आहे तेच करण्याची हवी, भले मग ती सोबत असणारी व्यक्ती, तसे करो वा न करो. ह्याला मी ‘प्रामाणिक असणे’ म्हणते.

एक अगदी साधेसे उदाहरण घेऊ या. समजा एखाद्याला तुमचा राग आला तर, उलटून परत त्याला दुखावणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी न बोलता, तुम्ही काहीच न बोलता, शांत राहिलात, तर, तुम्हाला त्याच्या रागाचा संसर्ग होत नाही. आणि तुम्ही स्वत:चेच निरीक्षण करून पाहिलेत तर, तुमच्या लक्षात येईल की, असे करणे किती अवघड आहे.

ही बाब तशी अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे, आपण प्रामाणिक आहोत किंवा नाही हे जाणण्यासाठीची ही एक छोटीशी सुरुवात आहे. आणि ज्या कोणाला प्रत्येक गोष्टीचा लगेचच संसर्ग होतो, जे अगदी हलक्या प्रतीचे विनोद करतात किंवा इतरांसारखाच मूर्खपणा करतात त्यांच्या विषयी तर मी बोलतच नाहीये.

तुम्ही तुमची वृत्ती भले कितीही प्रामाणिक राखण्याचा प्रयत्न करत असाल तरीसुद्धा जर तुम्ही तीक्ष्णपणे स्वत:चे निरिक्षण कराल तर, तुम्हाला शेकडो वेळा तरी स्वत:मधील अप्रामाणिकपणा आढळून येईल. प्रामाणिकपणा हा किती कठीण असतो हे तेव्हा तुमच्या लक्षात येईल.

*

जेव्हा प्रामाणिकपणा असतो तेव्हा तुम्हाला असे आढळेल की, तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी साहाय्य, मार्गदर्शन आणि ईश्वरी कृपा नेहमीच तेथे असते आणि मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.

*

पूर्णपणे प्रामाणिक राहावयाचे झाले तर, पसंती-नापसंती, वासना, आकर्षण-प्रतिकर्षण, सहानुभूती किंवा द्वेषभावना, आसक्ती वा तिटकारा नसणे ही अनिवार्यपणे आवश्यक अशी गोष्ट आहे. व्यक्तीने वस्तूंविषयी समग्र दृष्टिकोन बाळगला पाहिजे, त्या दृष्टिकोनामध्ये प्रत्येक गोष्ट आपापल्या योग्य स्थानी असते आणि सर्व गोष्टींकडे पाहण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन समानच म्हणजे, सत्यदर्शनाचा दृष्टिकोन असतो.

*

आधी साध्य झालेल्या उच्चतम चेतनेच्या आणि साक्षात्काराच्या पातळीपर्यंत, अस्तित्वाच्या सर्व हालचाली उन्नत करत नेणे म्हणजे प्रामाणिकता ! प्रामाणिकपणा हा केंद्रीय दिव्य संकल्पाच्या सभोवार संपूर्ण अस्तित्वाचे, त्याच्या अंगप्रत्यंगासह, सर्व गतिविधींसह एकसूत्रीकरण आणि सुसंवादीकरण घडवितो.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 06), (CWM 03 : 192), (CWM 08 : 398), (CWM 14 : 65)

सर्वात महत्त्वाचा एक गुण म्हणजे दीर्घोद्योग, प्रयत्न-सातत्य, चिकाटी. एक प्रकारची आंतरिक खिलाडूवृत्ती, जी तुम्हाला नाऊमेद होऊ देत नाही, दुःखी होऊ देत नाही आणि हसतहसत साऱ्या अडीअडचणींना सामोरे जाण्यास मदत करते. इंग्लिशमध्ये ह्याला एक छान शब्द आहे – Cheerfulness. जर तुम्ही अशा प्रकारची आनंदी वृत्ती किंवा खेळकरपणा तुमच्यामध्ये बाळगलात तर तुम्ही, तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखणाऱ्या वाईट प्रभावांशी चांगल्या रीतीने दोन हात करता, तुम्ही त्यांचा चांगल्या रीतीने प्रतिकार करता.

*

(CWM 08 : 23)

गरज पडली तर, एखादी गोष्ट हजार वेळा सुरु करण्याची जरी वेळ आली तरी, ती करण्याचा निश्चय करावयास हवा. माणसं अगदी निराश होऊन माझ्याकडे येतात आणि म्हणतात, ”मला वाटलं होते की, आता सगळं काही झालं आहे; पण आता मला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार. ”परंतु जर त्यांना असे सांगितले की, ”हे तर काहीच नाही. तुम्हाला कदाचित तीच गोष्ट शंभर नाही, दोनशे वेळा, कदाचित हजार वेळासुद्धा करावी लागेल. तुम्ही कुठे एक पाऊल पुढे टाकता आणि असे समजायला लागता की, तुम्ही सुरक्षित आहात, परंतु नेहमीच असे काहीतरी असते की, तुम्ही थोडेसे पुढे गेल्यावर तीच अडचण फिरुन परत येते.”

तुम्हाला असे वाटते की, तुम्ही प्रश्न सोडवला आहे, समस्या सोडविली आहे. पण तुम्हाला पुन्हा एकदा तोच प्रश्न, तीच समस्या सोडवायला लागते. ती दिसायला कदाचित काहीशी भिन्न दिसते पण समस्या तीच असते. अशावेळी “ती समस्या अगदी लाखो वेळा जरी आली तरी मी ती लाख वेळा सोडवेन, परंतु मी त्यातून पार पडेनच,” असा निश्चय जर तुम्ही केलेला नसेल, तर तुम्ही योग करूच शकणार नाही. ही अगदी अनिवार्य अशी गोष्ट आहे.

(CWM 08 : 41-42)

*

व्यक्तीला स्वत:मध्येच एक प्रकारची आश्वासकता वाटली पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये, काहीही करावे लागले तरीही ती आश्वासकता व्यक्तीने शेवटपर्यंत कायम राखली पाहिजे. जे चिकाटीने प्रयत्नशील राहतात, त्यांना विजय प्राप्त होतो.

सर्व प्रकारच्या विरोधांमध्येसुद्धा ही चिकाटी टिकवून ठेवण्यासाठी एक अविचल असा आधार आवश्यक असतो आणि असा एकमेव अविचल आधार म्हणजे ती सद्वस्तु, ते परम सत्य होय. दुसरीकडे कोठेही असा आधार शोधणे हे व्यर्थ आहे. ज्याबाबत कधीही निराश व्हावे लागणार नाही असा हा एकमेव आधार आहे.

(CWM 09 : 255)

*

प्रयत्नसातत्याद्वारेच व्यक्ती अडचणींवर मात करू शकते, त्यांच्यापासून पळ काढून नव्हे. जो चिकाटी राखतो, प्रयत्नशील राहतो त्याचा विजय निश्चित असतो. जो प्रयत्नसातत्य राखतो त्याचा जय होतो. नेहमीच सर्वोत्तम करत राहा, त्याच्या फलांची काळजी परमेश्वर करेल.

(CWM 14 : 163)

श्रीमाताजींच्या प्रतीकामधील बारा पाकळ्यांचे स्पष्टीकरण येथे त्या करत आहेत. हे ते गुण आहेत. १) प्रामाणिकपणा २) विनम्रता ३) कृतज्ञता ४) चिकाटी ५) अभीप्सा ६) ग्रहणशीलता ७) प्रगती ८) धैर्य ९) चांगुलपणा, सद्भाव १०) उदारता ११) समता १२) शांती
यातील पहिले आठ गुण ईश्वराशी संबंधित दृष्टिकोनाबाबतचे आहेत तर शेवटचे चार हे मानवाशी संबंधित आहेत.
– श्रीमाताजी
(Mother: Conversation with a disciple, January 19, 1972)

आपल्या सामर्थ्याला नेहमी दिव्य शक्तीवरील श्रद्धेचा आधार असला पाहिजे. आणि जेव्हा त्या दिव्य शक्तीचा आविष्कार होतो त्यावेळी आपली श्रद्धा सर्वांगीण आणि परिपूर्ण असली पाहिजे किंवा झाली पाहिजे.

सनातन काळापासून अखिल-सृष्टी निर्माण करत असलेल्या आणि आत्म्याच्या सर्वशक्तिमानतेने सुसज्ज असणाऱ्या अशा विश्वदेवतेला, जागृत चैतन्यमय विश्वशक्तीला अशक्य असे काहीच नाही. अखिल ज्ञानभांडार, सारी शक्तिसामर्थ्य, सर्व प्रकारचे यश आणि विजय, सर्व प्रकारची कर्मे आणि कौशल्यं तिच्याच हाती असून, ती सर्व, विविध प्रकारच्या पूर्णत्वांनी व सिद्धींनी आणि आत्म्याच्या संपदांनी संपन्न असतात.

ही ‘महेश्वरी’ आहे, सर्वोच्च ज्ञानदेवता आहे. सर्व प्रकारची सूक्ष्म दिव्य दर्शनशक्ती आणि सत्याची अपार असीमता, आध्यात्मिक संकल्पशक्तीची ऋजुता आणि तिच्या अतिमानसिक विशालतेची स्थिरता व उत्कटता त्याचबरोबर तिच्या प्रबोधन शक्तीचा परमानंद ती आपणास प्रदान करते.

ती ‘महाकाली’ आहे, सर्वोच्च सामर्थ्याची देवता आहे. सर्व दिव्यबल आणि आध्यात्मिक शक्तिसामर्थ्य तिचेच आहे. तप:शक्तीची उग्रतम तीव्रता आणि युद्धाभिमुख शीघ्र चपळता त्याचबरोबर पराजय, मृत्यू आणि अज्ञानशक्ती यांना क:पदार्थ लेखणारे अट्टहास्य व विजय तिच्याजवळ आहे.

ती ‘महालक्ष्मी’ आहे, सर्वोच्च प्रेम आणि दिव्यानंद यांची ती देवता आहे. आत्म्याचा कृपाप्रसाद, दिव्यानंदाची मोहिनी आणि सौंदर्य, त्याचबरोबर संरक्षण आणि सर्व प्रकारचे मानवी व दैवी आशीर्वचन हे तिचे वरदान आहे.

ती ‘महासरस्वती’ आहे, आत्म्याचे कर्म आणि दिव्य कौशल्य यांची ती देवता आहे. योग कर्मसु कौशलम्, दिव्य ज्ञानाचा उपयोग आणि जीवनामध्ये चैतन्याचे आत्म-उपयोजन आणि त्याच्या सुसंवादाचे सौख्य हा तिचा योग आहे. आणि तिच्या सर्वच रूपांमध्ये आणि शक्तींमध्ये, शाश्वत ‘ईश्वरी’च्या प्रभुत्वसंपन्नतेची परमश्रेष्ठ भावना ती तिच्यासोबत वागवत असते.

साधनाकडून अपेक्षित असलेली अशी सर्व प्रकारच्या कृतींची जलद आणि दिव्य क्षमता, एकत्व, सहभागी सहानुभूती, सर्व जीवांमधील सर्व शक्तींशी मुक्त अशी एकजीवता आणि या सगळयामुळे, विश्वामधील सर्व ईश्वरी संकल्पाशी एक उत्स्फूर्त आणि फलदायी अशी सुसंवादिता ती तिच्या सोबत वागवत असते. तिच्या अस्तित्वाची आणि तिच्या शक्तींची अतिशय सघन जाणीव होणे आणि आपल्या समग्र अस्तित्वाने, आपल्या सर्वांगामधील आणि आपल्या सभोवताली होणाऱ्या तिच्या कार्याविषयी समाधानपूर्वक स्वीकार करणे, ही महाशक्तीवरील श्रद्धेच्या परिपूर्तीची परमावधी असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 780-781)

ज्यांची आपण श्रीमाताजी म्हणून आराधना करतो, त्या म्हणजे अखिल अस्तित्वावर प्रभुत्व असणारी ईश्वराची चित्शक्ती आहेत. ती चित्शक्ती ‘एक’ असूनही इतकी ‘अनेकअंगी’ आहे की, तिच्या गतिविधींचे अनुसरण करणे हे अत्यंत चपळ मनाला किंवा सर्वस्वी मुक्त आणि अत्यंत विशाल बुद्धिलाही अशक्य असते. श्रीमाताजी ह्या परमेश्वराची चेतना आणि शक्ती असून, त्या त्यांनी निर्माण केलेल्या निर्मितीपासून, सृष्टीपासून खूपच दूर उच्चस्थानी आहेत.

परंतु असे असूनसुद्धा, श्रीमाताजींच्या कार्यपद्धतींमधील काही गोष्टी ह्या त्यांच्या मूर्त रूपांच्या द्वारे म्हणजे देवतारूपांच्या द्वारे आपणास पाहता आणि अनुभवता येऊ शकतात. कारण, ज्या देवतारूपांच्या माध्यमातून श्रीमाताजी, त्यांनी निर्माण केलेल्या जीवसृष्टीसमोर प्रकट होण्याचे मान्य करतात; त्या देवतारूपांचा स्वभाव आणि कार्य अधिक सुनिश्चित आणि समर्याद असते त्यामुळे त्यांच्या माध्यमातून, श्रीमाताजींच्या कार्यपद्धती आपणास अधिक सुस्पष्टपणे आकलन होऊ शकतात.

श्रीमाताजींच्या चार शक्ती म्हणजे त्यांची चार अगदी अद्वितीय अशी व्यक्तिमत्त्वं आहेत, अंश आहेत, त्यांच्या दिव्यत्वाची मूर्त रूपं आहेत. ह्या रूपांच्या माध्यमातूनच त्या त्यांच्या प्राणिमात्रांवर कार्य करतात, त्यांना आदेश देतात, या जगतातील त्यांच्या निर्मितीमध्ये सुमेळ निर्माण करतात आणि ह्या रूपांच्या माध्यमातूनच त्यांच्या हजारो शक्तींच्या कार्याला श्रीमाताजी दिशा देतात. श्रीमाताजी एकच आहेत, परंतु त्या आपल्या समोर विभिन्न रूपे धारण करून येतात; त्यांच्या शक्ती आणि व्यक्तिमत्त्वे अनेक आहेत, त्यांचे अंशावतार आणि विभूतीही अनेक आहेत; हे सारेजण या विश्वामध्ये श्रीमाताजीचे कार्य करत असतात.

*

ह्या पार्थिव लीलेमध्ये श्रीमाताजींचा जो व्यवहार चालतो, त्यांचे ह्या विश्वाला जे मार्गदर्शन लाभते त्यामध्ये, श्रीमाताजींचे चार महान पैलू, चार नेतृत्वकारी शक्ती आणि त्यांची व्यक्तिमत्त्वे अग्रस्थानी आहेत.

महेश्वरी – श्रीमाताजींचे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे शांत व्यापकता आणि आकलनकारी प्रज्ञा, प्रशांत कृपा आणि अक्षय करुणा आणि सार्वभौम व राज्यपदालाही मागे टाकणारी, सर्व-सत्ताक महत्ता.

महाकाली – दुसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीमाताजींच्या गौरवशाली सामर्थ्याची शक्ती, दुर्दम्य आवेग, त्यांची युयुत्सू भाववृत्ती, त्यांची तीव्र इच्छा, त्यांची त्वेषपूर्ण चपळता आणि विश्वाला हलविणारी ताकद.

महालक्ष्मी – त्यांचे तिसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रफुल्ल, मधुर, सौंदर्याच्या गुप्त रहस्याची अद्भुतता, सुसंवाद, उत्कृष्ट लयतालबद्धता, जटिल व सूक्ष्म समृद्धी, श्रीमाताजींचे खिळवून ठेवणारे आकर्षण व मनोहर कृपा.

महासरस्वती – त्यांचे चौथे व्यक्तिमत्त्व हे, तादात्म्यातून येणाऱ्या ज्ञानाची घनिष्ठ व गभीर क्षमता; काळजीपूर्वक व निर्दोष असे कर्म आणि स्थिरता व सर्व गोष्टींमधील अचूक अशी परिपूर्णता, या साऱ्याने सुसज्ज असलेले असे असते.

प्रज्ञा, सामर्थ्य, सुसंवाद आणि परिपूर्णता असे त्यांचे विविध गुणधर्म आहेत. ह्याच शक्तींसमवेत श्रीमाताजींची वरील चारही व्यक्तिमत्त्वं ह्या जगतामध्ये (मानवी प्रमाणात) येतात. त्यांच्या या शक्ती विभूतींच्या माध्यमातून (अर्ध-दैवी प्रमाणात) मानवी रूप धारण करून, आविष्कृत होतात. श्रीमाताजींच्या थेट व जिवंत प्रभावाला जी व्यक्ती स्वत:ची पार्थिव प्रकृती खुली करू शकते, तिच्या आरोहणामध्ये, हे गुणधर्म तिच्यामध्ये ईश्वरी प्रमाणात आढळून येतात. या चारही व्यक्तिमत्त्वांना आम्ही चार महान नावं दिली आहेत, महेश्वरी, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 14 & 17-18)

प्रश्न : कोणीतरी असे म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती व अरिष्टं, भूकंप, अतिवृष्टी व जलप्रलय यासारख्या गोष्टी म्हणजे विसंवादी व पापी मानवतेचे परिणाम आहेत आणि मानव वंशाच्या प्रगतीबरोबर व विकासाबरोबर, त्याच्या अनुषंगाने जडभौतिक प्रकृतीमध्ये देखील बदल घडून येतील. यामध्ये कितपत तथ्य आहे?

श्रीमाताजी : कदाचित त्यातील सत्य असे आहे की, आपत्ती व अरिष्टांसहित स्वार झालेली प्रकृती आणि विसंवादी मानवता यांच्यामध्ये, चेतनेची एकच आणि एकसमान गती अभिव्यक्त होत असते. या दोन गोष्टी कारणभूत निमित्त व परिणाम (cause and effect) अशा स्वरूपाच्या नाहीत, तर त्या दोन्ही एकसमान पातळीच्या आहेत.

त्या दोन्हीच्या अतीत असणारी अशी एक चेतना आविष्कृत होण्याचा प्रयत्न करू पाहत आहे, या पृथ्वीवर मूर्त रूप घेण्याचा प्रयत्न करू पाहत आहे आणि या तिच्या जडभौतिकामध्ये चाललेल्या अवतरणामध्ये, तिला सर्वत्र सारख्याच विरोधाला सामोरे जावे लागत आहे; मग तो मानव असो किंवा जडभौतिक प्रकृती असो.

आपण या पृथ्वीवर ही जी अव्यवस्था आणि विसंवाद पाहत आहोत तो सर्व या विरोधाचाच परिणाम आहे. संकटं, अरिष्ट, वितुष्ट, हिंसा, अंधकार, अज्ञान – ह्या साऱ्या अनिष्ट गोष्टींचे मूळ एकच आहे.

मनुष्य हा बाह्य प्रकृतीचे कारणभूत-निमित्त नाही किंवा बाह्य प्रकृतीदेखील मनुष्याचे कारणभूत-निमित्त नाही; तर ह्या दोन्ही गोष्टी, त्यांच्यामागे असणाऱ्या एकाच व महत्तर गोष्टीवर अवलंबून असतात; आणि दोन्हीही गोष्टी, त्या महत्तर गोष्टीला अभिव्यक्त करणाऱ्या, ह्या जडभौतिक विश्वाच्या नित्यनिरंतर व प्रगमनशील प्रक्रियेचा एक भाग असतात.
आज, त्या दिव्य चेतनेची थोडीशी जरी शुद्धता खाली उतरविण्यासाठी, पुरेशी अशी ग्रहणशीलता आणि खुलेपणा, या पृथ्वीवर जर कोठे जागृत झाला असेल तर, हे अवतरण आणि जडातील त्याचे आविष्करण यामुळे केवळ आंतरिक जीवनच नाही तर, स्थूल परिस्थिती आणि मानवातील व प्रकृतीतील भौतिक अभिव्यक्ती देखील बदलू शकते.

हे अवतरण त्याच्या संभाव्यतेसाठी अखिल मानवजातीच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. सगळी मानवजात ही सुसंवाद, एकात्मता आणि अभीप्सेच्या अवस्थेत पोहोचावी आणि ती तो प्रकाश उतरविण्यासाठी, भौतिक परिस्थिती बदलण्यासाठी आणि प्रकृतीच्या गतिविधी बदलण्यासाठी पुरेशी समर्थ बनावी, ह्यासाठी जर आपल्याला थांबत बसावे लागले असते, तर मग आशेला जराही वाव नव्हता.

मात्र एखादी व्यक्ती किंवा एखादा छोटासा समूह किंवा काही व्यक्ती अवतरण घडवून आणू शकतील अशी शक्यता आहे. त्यांची संख्या किंवा विस्तार याला फारसे महत्त्व नाही. या पृथ्वीचेतनेमध्ये प्रवेश करणारा दिव्य चेतनेचा एक थेंबसुद्धा येथील सर्वकाही बदलवू शकतो. चेतनेच्या उच्चतर आणि निम्नतर प्रतलांच्या संपर्काचे आणि त्यांच्या संमीलनाचे हेच गुह्य आहे ; हे महान रहस्य हीच गुप्त किल्ली आहे. ह्यामध्ये नेहमीच रुपांतरकारी शक्ती असते; याबाबतीत मात्र ही शक्ती अधिक मोठ्या प्रमाणात आणि उच्चतर स्तरावर असेल.

आजवर येथे ज्याचे आविष्करण झालेले नाही अशा एखाद्या प्रतलाच्या जाणिवपूर्वक संपर्कात येण्यासाठी सक्षम असणारी अशी एखादी व्यक्ती जर या पृथ्वीवर असेल आणि जर ती व्यक्ती स्वतःच्या चेतनेत राहून, त्या प्रतलामध्ये चढून गेली आणि जर का तिने, ते प्रतल आणि जडभौतिक यांचे संमीलन घडवून आणले, त्यांचा सुमेळ घडवला तर, प्रकृतीने आजवर न अनुभवलेले असे रुपांतरण घडून येण्याची एक महान निर्णायक प्रक्रिया घडून येईल. एक नवीन शक्ती येथे अवतरेल आणि या पृथ्वीवरील जीवनाची परिस्थिती बदलवून टाकेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 37-40)

(श्रीमाताजींनी शारीरिक, प्राणिक आणि मानसिक निरीक्षणाविषयी विवेचन केले आहे. त्यानंतर एकाने पुढील प्रश्न विचारला आहे.)

प्रश्न : चैत्यामध्ये निरीक्षण शक्ती असते का?

श्रीमाताजी : त्यामध्ये निरीक्षण क्षमतेपेक्षाही अधिक काही असते. वस्तुंबाबतची थेट दृष्टी तेथे असते. ज्यामध्ये वस्तु प्रतिबिंबित होतात अशा आरशासारखी ती असते, मग त्या वस्तु कोणत्याही का असेनात. आणि सर्वसाधारणत: जी मुले, जी अजूनही निष्पाप असतात, त्यांच्यामध्ये एक प्रकारची संवेदनशीलता स्पष्टपणे आढळून येते.

उदाहरणार्थ, त्यांच्याजवळ जी माणसं येतात त्यांच्या वातावरणाबद्दल अशी मुलं खूप संवेदनशील असतात. काही मुलं कोणतेही कारण नसताना देखील एखाद्या व्यक्तीकडे झेपावतात आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीपासून दूर पळतात. तुमच्या दृष्टीने ती दोन्ही माणसं सारखीच चांगली किंवा सारखीच वाईट असतात, तुम्हाला त्यात कोणताही फरक जाणवत नाही.

पण ही मुलं मात्र त्यातल्या एखाद्या व्यक्तीकडे ताबडतोब आकर्षित होतात आणि दुसऱ्या व्यक्तीबाबत मात्र, तुम्ही कितीही प्रयत्न करा, ती भोकाड पसरतील, रडतील, किंवा त्या व्यक्तीपासून पळून जातील, पण ती मुलं त्या व्यक्तीकडे जाणार नाहीत. हे आकर्षण किंवा प्रतिकर्षण म्हणजे अज्ञानाच्या जाणिवेमध्ये, चैत्य लक्षणाचा झालेला एक प्रकारचा अनुवाद असतो. त्या व्यक्तींच्या चैत्य लक्षणाचे थेट दर्शन त्या बालकाला झालेले असते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 08-09)

तुम्ही लहान मुलांच्या डोळ्यांत लक्षपूर्वक पाहा, तेथे तुम्हाला एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काहीजण त्याचे वर्णन निष्पाप असे करतात – परंतु तो प्रकाश खूप खरा असतो, खूपच सत्य असतो, जो या जगाकडे आश्चर्याने टुकूटुकू पाहत असतो.

ही आश्चर्याची भावना, ही चैत्याची (Psychic) आश्चर्यभावना असते, की जी सत्य पाहू शकते पण तिला या जगाविषयी फारसे काही अवगत नसते, कारण ती त्या पासून खूप खूप दूर असते.

लहान मुलांमध्ये ती आश्चर्यभावना असते; परंतु जसजशी मुले शिकू लागतात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिकाधिक शिक्षित होतात, तसतशी ही आश्चर्यभावना मागे पडत जाते आणि मग त्यांच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी म्हणजे विचार, इच्छा-वासना, आवेग, दुष्टपणा अशा साऱ्या गोष्टी दिसू लागतात. तेव्हा मात्र, अत्यंत शुद्ध असणारी ही छोटीशी ज्योत, तेथे असत नाही. अशावेळी तुम्ही निश्चितपणे समजा की, तेथे ‘मना’चा प्रवेश झालेला आहे आणि ‘चैत्य’ हा खूप दूरवर मागे लोटला गेला आहे.

– श्रीअरविंद
(CWM 04 : 26-27)

जे अस्तित्व आपल्यामधील इतर सर्व बाबींना आधार पुरविते आणि जन्म आणि मृत्युच्या फेऱ्यांमधूनही जे टिकून राहते अशा आपल्यातील ईश्वरांशाला, सहसा आपल्या योगामध्ये ‘केंद्रवर्ती अस्तित्व’ अशी संज्ञा वापरण्यात येते.

केंद्रवर्ती अस्तित्वाची दोन रूपे असतात – वरच्या भागात असणारे अस्तित्व म्हणजे जीवात्मा, आपले सत् अस्तित्व. आपल्याला जेव्हा उच्चतर असे आत्म-ज्ञान प्राप्त होते तेव्हा, आपल्याला ह्या अस्तित्वाची जाण येते. खालील भागात, मन, प्राण व शरीर यांच्या पाठीशी उभा असतो तो चैत्य पुरुष.

जीवात्मा हा जीवनामध्ये होणाऱ्या आविष्करणाच्या वर असतो आणि तेथून तो जीवनाचे संचालन करत असतो. तर चैत्य पुरुष हा मागे उभा राहून जीवनाच्या आविष्करणाला आधार पुरवीत असतो.

आपण बालक आहोत, ईश्वराचे मूल आहोत, भक्त आहोत असे वाटणे हा, चैत्य पुरुषाचा स्वाभाविक दृष्टिकोन असतो. चैत्य पुरुष हा ईश्वराचाच एक अंश असतो, तत्त्वत: तो एकच असतो परंतु या आविष्करणाच्या गतिविधींमध्ये या एकत्वामध्येही नेहमीच भिन्नता आढळून येते. या उलट, जीवात्मा, हा साररूपामध्येच जगत असतो आणि तो ईश्वराच्या एकत्वामध्ये स्वत:चा विलय करू शकतो. पण तो सुद्धा ज्या क्षणी जीवनामधील आविष्करणाच्या गतिविधींचे अध्यक्षपद स्वीकारतो, संचालन करू लागतो, त्या क्षणी तो स्वत:ला विविधरूपी ईश्वराच्या अनेक केंद्रांपैकी आपण केवळ एक केंद्र आहोत असे मानू लागतो, तेव्हा तो स्वत:ला परमेश्वर मानत नाही.

हा भेद लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. नाहीतर, जर का कोठेही थोडा जरी प्राणिक अहंकार असेल तर, व्यक्ती स्वत:ला अवतार समजायला लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 61)

*

आत्मा हा त्याच्या प्रकृतीनुसार एकतर विश्वातीत (परमात्मा) (Transcendent) असतो किंवा वैश्विक (आत्मा) (Universal) असतो. जेव्हा तो व्यक्तिरूप धारण करतो आणि केंद्रवर्ती अस्तित्व बनतो, तेव्हा तो जीवात्मा असतो. जीवात्म्याला विश्वाशी एकत्व जाणवत असते पण त्याचवेळी, ईश्वराचा एक भाग या नात्याने त्याला केंद्रीय पृथगात्मकतेची (central separateness) देखील जाणीव असते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 55)

जर आपली प्रगती समग्रपणे व्हावी अशी आपली इच्छा असेल तर आपल्या चेतनायुक्त अस्तित्वामध्ये आपण एक बलवान आणि शुद्ध मानसिक समन्वय (Mental Synthesis) घडविले पाहिजे की, जे सर्व बाह्य प्रलोभनांपासून आपले संरक्षण करू शकेल, जे आपल्याला इतस्तत: भटकण्यापासून रोखणाऱ्या मैलाच्या दगडाप्रमाणे असेल, जीवनाच्या या हालत्याडुलत्या सागरामधून जे आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवेल.

प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तीनुसार, आवडीनिवडीनुसार आणि आकांक्षांनुसार स्वत:ची मानसिक संरचना घडविली पाहिजे. पण जर आपल्याला ती संरचना खरोखरच जिवंत आणि प्रकाशमान अशी हवी असेल तर तिची घडण आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ईश्वराचे बौद्धिक प्रतिनिधित्व करणाऱ्या संकल्पनेभोवती झाली पाहिजे. तो ईश्वरच आपले जीवन आणि तो ईश्वरच आपला प्रकाश. ही संकल्पना अनेकविध प्रांतांमध्ये, अनेकानेक युगे सर्व महान गुरुंकडून विविध प्रकारे शिकविण्यात आलेली आहे, ती अतिशय उत्कृष्टपणे शब्दबद्ध झालेली आहे.

प्रत्येकाचा आत्मा आणि या विश्वाचा महान आत्मा हे एकच आहेत; (ही ती संकल्पना होय.) आपल्या पूर्वसुरींनी योग्य असेच सांगितले आहे की, आपले मूळ आणि आपण, आपला देव आणि आपण हे एकच आहोत. आणि हे एकत्व म्हणजे एकत्वाचे केवळ कमीअधिक जवळचे, घनिष्ठ नाते आहे असे समजता कामा नये, कारण ते खरोखरच एक आहेत.

जेव्हा माणूस त्या दिव्यत्वाला गवसणी घालू पाहतो तेव्हा तो अप्राप्याच्या दिशेने कलेकलेने उन्नत होत जाण्याची धडपड करू इच्छितो, तेव्हा तो हे विसरून जातो की, त्याच्याकडे असलेला सर्व ज्ञानसाठा आणि त्याच्याकडील अगदी अंतर्ज्ञानसुद्धा त्या अनंताच्या दिशेने जाण्याच्या वाटेवरील एक पाऊलसुद्धा नव्हे. तसेच त्याला ही जाणीवसुद्धा नसते की, जे प्राप्त करण्याची इच्छा तो बाळगत आहे, जे त्याच्यापासून कित्येक योजने दूर आहे असे त्याला वाटत असते, ते त्याच्या स्वत:च्याच अंतरंगामध्ये असते.

जोपर्यंत त्याच्यामध्ये असलेल्या ह्या ‘आद्या’ विषयी तो जागृत होत नाही तोवर त्याला उत्पत्तीविषयी ज्ञान कसे बरे होईल?

स्वत:ला समजून घेतल्यानेच आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यानेच तो परमशोध लावू शकतो आणि तो आश्चर्यचकित होऊन बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे त्या कुल-प्रमुखाप्रमाणे म्हणू शकतो, “देवाचे घर हे इथेच तर होते आणि मला ते माहीतही नव्हते.” म्हणून, ज्या शब्दांमुळे स्वर्ग आणि पृथ्वी भरून जातात असा तो, भौतिक जगताच्या निर्मिकाचा ”मी सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि सर्व जीवांमध्ये आहे;” हा जो परमबोध आहे तो आपण अभिव्यक्त केला पाहिजे; ते शब्द सर्वांना माहीत करून दिले पाहिजेत.

जेव्हा सर्वांना हे सारे ज्ञात होईल तेव्हा, ज्या दिवसाचे आश्वासन आपल्याला देण्यात आले आहे तो रूपांतरणाचा दिवस आपल्या अगदी नजीक आलेला असेल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 40-41)