Tag Archive for: तत्त्वज्ञान

“हे दुर्भाग्या, तुझे कल्याण होवो, कारण तुझ्या माध्यमातूनच मला माझ्या प्राणेश्वराचे मुखदर्शन झाले.” – असे श्रीअरविंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे त्यावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणतात,

जर दुर्भाग्यामुळे एखाद्याला ईश्वराच्या मुखदर्शन झाले तर, त्याला दुर्भाग्य तरी कसे म्हणावे, नाही का ? अर्थातच, त्याला दुर्भाग्य म्हणताच येणार नाही, तो तर कृपाशीर्वाद ठरेल. आणि नेमकेपणाने हेच श्रीअरविंदांना येथे म्हणावयाचे आहे.

आपण ज्या अपेक्षा करतो, आपण ज्याची आशा बाळगतो, आपल्याला जे हवे असते, तसे जेव्हा घडत नाही; आपल्या इच्छाआकांक्षांपेक्षा काहीतरी विपरितच घडते तेव्हा, आपल्यातील अज्ञानामुळे आपण त्याला दुर्भाग्य म्हणतो आणि शोक करतो.

पण जर का आपण थोडेसे जरी समजदार झालो आणि त्याच घटनांचे खोलवर परिणाम काय झाले याचे अवलोकन केले तर, आपल्या असे ध्यानात येईल की, ह्याच घटना आपल्याला त्वरेने ईश्वराकडे, आपल्या प्राणेश्वराकडे घेऊन जात आहेत.

उलटपक्षी, सहज-सुखासीन परिस्थिती मात्र आपल्याला मार्गावर अळमटळम करण्यास प्रोत्साहित करते, ती परिस्थिती, या मार्गावर आपल्या समोर सौख्याची फुले पसरते आणि ती वेचून घेण्यासाठी आपण मार्गावर मध्येच थांबून राहतो. आपल्या प्रगतीमध्ये विलंब होऊ नये यासाठी, अशा गोष्टींचा निर्धारपूर्वक अस्वीकार करण्याइतपत आपण प्रामाणिकही नसतो किंवा खूपच दुर्बल असतो. यश किंवा छोट्याछोट्या सुखोपभांना सामोरे जायचे आणि तरीही मार्गावरून ढळायचे नाही, हे जमण्यासाठी व्यक्ती मूळातच दृढ असावी लागते किंवा ती मार्गावर पुष्कळ प्रगत झालेली असावी लागते.

असे जे कोणी करू शकतात, जे असे दृढनिश्चयी असतात, ते यशाच्या मागे धावत नाहीत, ते यश मिळविण्यासाठी आटापिटा करत नाही आणि जर यश प्राप्त झालेच तरी ते यश अगदी निःसंगपणे स्वीकारतात. कारण दुःख व दुर्भाग्यामुळे यांना जे तडाखे बसलेले असतात त्याचे मूल्य त्यांना माहीत असते आणि त्याची त्यांना कदरही असते.

आपल्याला यश व अपयश, आनंद व दुःख, सुदैव व दुर्दैव ह्या गोष्टी सारख्याच समाधानी स्थिरचित्तवृत्तीने स्वीकारण्यासाठी जी सक्षम बनवते, ती परिपूर्ण समता ही, आपण आपल्या ध्येयाच्या निकट पोहोचलो आहोत याची खूण, याची साक्ष असते. आणि खराखुरा योग्य दृष्टिकोनदेखील तोच असतो.

तात्पर्य असे की, ईश्वराने त्याच्या अपार करूणेतून, ज्या ज्या गोष्टींचा आपल्यावर वर्षाव केलेला असतो त्या साऱ्याच गोष्टी या आपल्यासाठी अद्भुत वरदान ठरतात.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 58-59)

सत्यशोधन आणि त्याप्रत पोहोचणे या गोष्टी आपापल्या मार्गाने मुक्तपणे अनुसरता येणे, हा प्रत्येक मनुष्याचा अधिकारच आहे. परंतु प्रत्येकाला हे ठाऊक असावयास हवे की, त्याला लागलेला शोध हा केवळ त्याच्यासाठीच उचित आहे आणि तो त्याने इतरांवर लादता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 207)

जोपर्यंत धर्म अस्तित्वात राहतील तोपर्यंत समतोल राखण्यासाठी नास्तिकतावाद अपरिहार्य आहे. नंतर मात्र धार्मिकता आणि नास्तिकता या दोहोंनी निवृत्त होऊन सत्याचा प्रामाणिक आणि निरपेक्षपणे शोध घेण्यासाठी आणि या शोधाच्या उद्दिष्टाला पूर्ण समर्पण करण्यासाठी जागा करून देणे आवश्यक आहे.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 284)

प्रश्न : प्रत्येकातील चैत्य पुरुष (Psychic Being) नेहमी शुद्धच असतो का? की, तो शुद्ध करावा लागतो?
श्रीमाताजी : अस्तित्वामधील चैत्य पुरुष हा नेहमीच अतिशय शुद्ध असतो, कारण अस्तित्वाचा हा एक असा भाग आहे की, जो ईश्वराच्या संपर्कात असतो आणि अस्तित्वाचे सत्य तो अभिव्यक्त करत असतो. परंतु हा चैत्य पुरुष म्हणजे व्यक्तिच्या अस्तित्वाच्या अंधकारातील एक ठिणगी असू शकते किंवा तो जागृत, पूर्ण विकसित व स्वतंत्र असा प्रकाशमय पुरुष असू शकतो. या दोहोंच्या दरम्यान अनेक श्रेणी असतात.

प्रश्न : तो सहसा झाकलेलाच असतो का?
श्रीमाताजी : बाह्यवर्ती जाणीव (Outer consciousness) ही त्याच्या संपर्कात असत नाही, कारण ती आतमध्ये वळलेली असण्याऐवजी, बाहेरच्या दिशेला वळलेली असते कारण ती बाह्य गोंगाट, हालचाली या साऱ्यांमध्ये जगत असते. अंतरंगामध्ये पाहण्याऐवजी, अस्तित्वाच्या तळाशी पाहण्याऐवजी आणि आंतरिक प्रेरणांचे ऐकण्याऐवजी, ती जाणीव बाह्यामध्ये जे काही पाहते, जे काही करते, जे काही बोलते त्या साऱ्या गोष्टींमध्येच वावरत असते.

प्रश्न : चैत्य पुरुषाकडे कोणती शक्ती असते का?
श्रीमाताजी : सहसा, जीवाला मार्गदर्शन करणारा चैत्य पुरुषच तर असतो. व्यक्तीला त्याविषयी काहीच माहीत नसते कारण व्यक्ती त्याविषयी जागृत नसते, परंतु चैत्य पुरुषच सहसा जीवाला मार्गदर्शन करत असतो. जर का व्यक्ती सावध राहिली तर, व्यक्तीला त्याची जाण येते. परंतु बहुसंख्य लोकांना त्याची पुसटशी देखील कल्पना नसते.

उदाहरणार्थ, त्यांनी काहीतरी करावयाचे ठरविलेले असते, अर्थात त्यांच्या बाह्यवर्ती अज्ञानापोटीच, काहीतरी करावयाचे ठरविलेले असते आणि सारे काही असे घडत जाते की, जे करायचे ठरविले होते त्याऐवजी ते काहीतरी भलतेच करून बसतात आणि मग ते चिडतात, त्रागा करता, दैवाला दोष देत, संताप व्यक्त करत राहतात (ते ज्याच्या त्याच्या भावना व श्रद्धा यांवर अवलंबून असते.) ते म्हणत राहतात, प्रकृती दुष्ट आहे, किंवा नियती निर्दयी आहे किंवा मग देवच अन्यायी आहे किंवा…असेच काहीही. (ते ज्याच्या त्याच्या समजुतींवर अवलंबून असते.) खरंतर, बरेचदा तीच परिस्थिती त्यांच्या आंतरिक विकासासाठी अत्यंत अनुकूल अशी असते.

तुम्हाला आरामदायी जीवन हवे आहे, पैसा हवा आहे, कुलदीपक अशी मुलेबाळे हवी आहेत, त्या साऱ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून मला मदत कर, असे जर तुम्ही तुमच्या चैत्य पुरुषाला सांगाल तर तो तुम्हाला त्यात साहाय्य करणार नाही, हे उघडच आहे. परंतु जेणेकरून, ईश्वराशी एकरूप होण्याची निकड तुमच्या जाणिवेमध्ये उत्पन्न व्हावी, असे काहीतरी तुमच्यामध्ये जागृत होईल, अशी परिस्थिती मात्र तो तुमच्यासाठी निर्माण करेल.

तुम्ही आखलेल्या चांगल्याचांगल्या योजना जर यशस्वी झाल्या, तर तुमच्या बाह्य अज्ञानाचे, तुमच्या मूर्ख क्षुल्लक महत्त्वाकांक्षांचे आणि तुमच्या ध्येयहीन कृतींचे आवरण अधिकाधिक घट्ट होत जाईल अशी शक्यता असते. परंतु जेव्हा तुम्हाला मोठा धक्का बसतो, ज्याची तुम्ही अभिलाषा बाळगली होती ते पद तुम्हाला नाकारले जाते, तुमच्या योजना छिन्नविछिन्न होऊन जातात, जेव्हा तुम्ही पूर्णपणे विफल झालेले असता तेव्हा, कधीकधी ही प्रतिकूलताच तुमच्यासाठी अधिक सत्य आणि अधिक सखोल अशा कोणत्यातरी गोष्टींची दारे खुली करून देते.

आणि मग नंतर कधीतरी, जेव्हा तुम्ही थोडेसे जागृत असता आणि मागे वळून पाहू लागता तेव्हा, तुम्ही थोडेसे जरी प्रामाणिक असाल तर तुम्ही म्हणता, “खरंच की ! तेव्हा माझे म्हणणं बरोबर नव्हते – प्रकृती किंवा ईश्वरी कृपा किंवा माझा चैत्य पुरुष ह्यांचेच बरोबर होते, त्यांनीच हे सारे घडवून आणले आहे.” तो चैत्य पुरुषच असतो की, ज्याने हे सारे घडवून आणलेले असते.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 393-394)

आपल्यामधील चैत्य घटक हा असा भाग असतो की, जो थेट ईश्वराकडून आलेला असतो आणि ईश्वराच्या संपर्कामध्ये असतो. मूलत: चैत्य घटक म्हणजे दिव्य शक्यतांनी गर्भित असलेले असे एक केंद्र असते की जे, मन-प्राण-शरीर यांच्या कनिष्ठ आविष्कारत्रयीला आधार पुरविते. हे ईश्वरी वा दिव्य तत्त्व सर्व सजीवांमध्ये असते; पण ते सामान्य चेतनेच्या मागे लपलेले असते. ते केंद्र प्रथमत: विकसित झालेले नसते आणि जरी अगदी विकसित झालेच तरीही, ते नेहमीच किंवा बहुतांशी वेळा पुढे आलेले नसते; मन-प्राण-शरीर या साधनांच्या अपूर्णतांकडून जेवढी मुभा मिळेल तेवढेच, त्यांच्या माध्यमातूनच आणि त्यांच्या मर्यादांमध्ये राहूनच, हे तत्त्व स्वत:ला अभिव्यक्त करते.

ईश्वरानुगामी अनुभूतींच्या योगे, त्याची चेतनेमध्ये वृद्धी होत असते; आपल्यामध्ये जेव्हा जेव्हा उच्चतर क्रिया होते, त्या प्रत्येक वेळी त्याला सामर्थ्य प्राप्त होत जाते आणि सरतेशेवटी, ह्या सखोल आणि उच्चतर अशा गतिविधींच्या संचयामधून चैत्य व्यक्तित्वाची घडण होते आणि त्यालाच आपण सर्वसाधारणत: ‘चैत्य पुरुष वा चैत्य अस्तित्व’ असे म्हणतो.

मनुष्य आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचे निमित्त-कारण खरंतर हाच चैत्य पुरुष असतो; ह्या चैत्यपुरुषाचीच मनुष्याला सर्वात अधिक मदत होत असते पण बरेचदा हे निमित्त-कारणच अनभिज्ञ राहते. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या ह्या पूर्णयोगामध्ये त्याला मागून पुढे पृष्ठभागी आणले पाहिजे.

इंग्रजी भाषेमध्ये ‘आत्मा आणि चैत्य पुरुष’ (Soul & Psychic) हे दोन्ही शब्द अगदीच ढोबळमानाने आणि विविध अर्थांनी वापरले जातात. बहुतांशी वेळा तर, मन आणि आत्मा ह्यांमध्ये स्पष्ट फरकच केला जात नाही आणि त्यापेक्षा अधिक गंभीर गोंधळ पुढील बाबतीत केला जातो : ‘आत्मा’ वा ‘चैत्य’ या शब्दाद्वारे त्यांना, खराखुरा आत्मा वा चैत्य पुरुष अभिप्रेत नसतो, तर इच्छावासनांचे प्राणिक अस्तित्व – म्हणजे वासनात्मा वा भ्रामक आत्मा (desire-soul) हाच अभिप्रेत असतो.

मन वा प्राण यांपासून चैत्य पुरुष हा पूर्णत: भिन्न असतो; मन व प्राण दोघेही हृदयस्थानी जिथे एकत्रित येतात तेथे, तो त्यांच्या पाठीमागे उभा असतो. त्याचे मध्यवर्ती स्थान तेथे असते, हृदयात नव्हे तर, हृदयाच्या पाठीमागे असते. हृदय हे भावभावनांचे स्थान असते, असे लोक सहसा ज्याविषयी म्हणतात, त्या मानवी भावभावना म्हणजे मानसिक प्राणिक आवेग असतात; त्या सहसा चैत्य स्वरूपाच्या असत नाहीत. मन आणि प्राणशक्तीपेक्षा भिन्न असणारी, पार्श्वस्थानी असणारी ही बहुतांशी गुप्त शक्ती म्हणजे खरा आत्मा होय, आपल्यातील चैत्य पुरुष होय.

वास्तविक, चैत्य पुरुषाची शक्ती ही मन, प्राण व शरीर यांच्यावर कार्य करू शकते, विचारांचे, बोधाचे, भावनांचे (ह्याच भावना नंतर चैत्य भावना बनतात) तसेच संवेदना, कृती आणि आपल्यातील इतर सर्वच गोष्टींचे शुद्धीकरण करते आणि त्यांनी दिव्य गतिविधी बनावे म्हणून त्यांची पूर्वतयारी करून घेते.

भारतीय भाषांमध्ये या चैत्य पुरुषाचे वर्णन ‘हृदयामधील पुरुष’ असेही केले जाते. येथे आंतरहृदयाचा किंवा गुप्त असणाऱ्या हृदयाचा (हृदये गुहायाम्) असा बोध व्हावयास हवा.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 103-104)

मानवातील दिव्यत्वाचा प्रतिनिधी म्हणजे ‘चैत्य पुरुष’ (Psychic Being) होय. असे पाहा की, ईश्वर ही काहीतरी दूर कोठेतरी, अप्राप्य असणारी अशी गोष्ट नाही. ईश्वर तुमच्या अंतरंगामध्येच आहे पण तुम्हाला मात्र त्याची पूर्ण जाणीव नाही.

खरंतर…आत्ता तो तुमच्यामध्ये ‘अस्तित्व’ असण्यापेक्षा, ‘प्रभाव’ या स्वरूपात कृती करतो. पण तो एक जितेजागते अस्तित्व असला पाहिजे. तो काय आहे? कसा आहे? ईश्वर या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? इ. प्रश्न, तुम्ही प्रत्येक क्षणी स्वत:लाच विचारू शकला पाहिजेत. प्रथम ईश्वर कसा पाहतो, मग ईश्वर इच्छा कशी बाळगतो आणि अंतत: ईश्वर कशा रीतीने कार्य करतो; असा विचार करावयास हवा. आणि हे शोधण्यासाठी कोणत्यातरी निर्जन प्रदेशामध्ये जाण्याची जरुरी नाही, तो अगदी येथेच आहे.

फक्त इतकेच की, आत्ताच्या या घडीला आपल्यातील सर्व जुन्या सवयी व सर्वसामान्य अचेतना यांनी आपल्यावर एक प्रकारचे आवरण निर्माण केले आहे आणि ते आवरणच आपल्याला त्याला पाहण्यापासून व त्याच्या संवेदनेपासून रोखत आहे. तुम्ही ते आवरण दूर केलेच पाहिजे.

खरं तर, तुम्ही आता एक जाणीवयुक्त असे साधन बनले पाहिजे – ईश्वराविषयी जागरूक बनले पाहिजे. बहुधा यासाठी एक उभे आयुष्य खर्ची पडते, तर कधीकधी काही लोकांना त्यासाठी जन्मानुजन्मं लागू शकतात. इथे सद्यस्थितीत तुम्ही काही महिन्यातच ते करू शकता. ज्यांच्यापाशी अतिउत्कट अशी अभीप्सा आहे, ते अगदी थोड्या महिन्यातच हे साध्य करून घेऊ शकतील.

-श्रीमाताजी
(CWM 12 : 428)

आत्मा (The soul) आणि चैत्य पुरुष (The psychic being) ह्या दोघांचा गाभा जरी समान असला तरी, ह्या दोन्ही गोष्टी अगदी एकसारख्या मात्र नक्कीच नाहीत.

प्रत्येक व्यक्तीच्या केंद्रस्थानी स्थित असणारा ईश्वरी स्फुल्लिंग म्हणजे आत्मा होय; तो त्याच्या ईश्वरी उगमाशी अभिन्न असतो; तो मनुष्यातील ईश्वर असतो.

पार्थिव उत्क्रांतीच्या दरम्यान, असंख्य जन्मांच्या प्रक्रियेतून, ह्या आत्म्याभोवती, म्हणजे ह्या दिव्य केंद्राभोवती चैत्य पुरुषाची क्रमश: जडणघडण होत जाते. चैत्य पुरुष पूर्ण सुघटित आणि समग्रतेने जागृत होऊन, ज्या दिव्य केंद्राभोवती त्याची घडण होत असते त्या आत्म्याभोवतीचा तो जागृत कोश बनत नाही तोपर्यंत, अशा क्षणापर्यंत येत नाही तोपर्यंत ही जडणघडण चालूच राहते. आणि एकदा तो अशा रीतीने ईश्वराशी एकत्व पावला की मग मात्र, तो त्या ईश्वराचे या विश्वातील परिपूर्ण असे साधन बनतो.
– श्रीमाताजी
(CWM 16 : 245-246)

*

अपराप्रकृतीमध्ये, ईश्वराचा हा शाश्वत अंश आत्मा म्हणून, दिव्य अग्नीचे एक स्फुल्लिंग म्हणून प्रतीत होतो, तो व्यक्तिगत विकसन-प्रक्रियेला आधार पुरवत असतो; शारीरिक, प्राणिक, मानसिक अस्तित्वाला आधार पुरवत असतो.

जाणिवेच्या विकसनाबरोबर वृद्धिंगत होत जाणारा, स्फुल्लिंगाचे रूपांतर अग्नीमध्ये होत जाणारा ईश्वरांश म्हणजे चैत्य पुरुष होय. त्यामुळे चैत्य पुरुष हा विकसनशील असतो, तो जीवात्म्याप्रमाणे विकासपूर्व (prior to the evolution) नसतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 56)

प्रश्न : चैत्य पुरुषाचे कार्य काय असते?

श्रीमाताजी : वीजेच्या दिव्याला विद्युतजनित्राला (Power Generator) जोडणाऱ्या विजेच्या तारेप्रमाणे त्याचे कार्य असते, समजले?

श्रोता : ईश्वर म्हणजे विद्युतजनित्र आणि दिवा म्हणजे आपले शरीर, असेच ना?

श्रीमाताजी : शरीर म्हणजे आपले दृश्य अस्तित्व. म्हणजे असे की, जडभौतिकामध्ये जर चैत्य अस्तित्व नसते तर, जडाला ईश्वराशी कोणताही थेट संबंध प्रस्थापित करता आला नसता. जडातील या चैत्य अस्तित्वामुळेच, जडाचा ईश्वराशी थेटपणे, सुखाने संबंध निर्माण होऊ शकतो आणि ते अस्तित्व मानवाला सांगू शकते की, ‘तुझ्या अंतरंगामध्ये ईश्वराचा निवास आहे, तू फक्त आत प्रवेश कर म्हणजे मग तुला तेथे तो गवसेल.’ ही अशी गोष्ट आहे की, जी खासकरून मनुष्याला लागू पडते किंवा खरंतर ती पृथ्वीवासियांना लागू पडते असे म्हणता येईल. हे चैत्य अस्तित्व मनुष्यमात्रांमध्ये अधिक जागृत, अधिक सुघटित, अधिक जागृत आणि अधिक स्वतंत्रदेखील बनते. मनुष्य-प्राण्यामध्ये ते अधिक व्यक्तिभूत (individualised) होते; वास्तविक, ही पृथ्वीचीच खासियत आहे. अगदी अचेतन, अस्पष्ट अशा जडभौतिकामध्ये ते थेटपणे, खासकरून आणि मोक्षद स्वरूपात ओतण्यात आले आहे; जेणेकरून ते पुन्हा एकवार दिव्य चेतना (Divine Consciousness), दिव्य उपस्थिती (The divine Presence) आणि अंतत: स्वत:च दिव्यत्व (The Divine Himself) या स्थितींमधून जागृत होत जाईल; मनुष्यामध्ये असणाऱ्या या चैत्याच्या अस्तित्वामुळेच मनुष्य हा अपवादात्मक जीव ठरतो. …
त्यात तथ्य आहे – इतके की, या विश्वाच्या इतर पातळ्यांवर असे काही जीव असतात, ज्याला काही माणसं देवसदृश्य, किंवा देव असे म्हणतात, किंवा श्रीअरविंदांनी ज्याला ‘अधिमानसिक जीव’ (The Overmind) असे म्हटले आहे, असे जीव चैत्य अस्तित्वाचा अनुभव घेता यावा म्हणून, या पृथ्वीतलावर शरीरधारणा करण्यासाठी अतिशय उत्सुक असतात कारण त्यांना तो अनुभव मिळत नसतो. मानवाकडे नसणारे असे अनेक गुण ह्या जीवांकडे निश्चितपणे असतात पण केवळ या पृथ्वीवरच, अन्यत्र कोठेही न आढळणाऱ्या या अत्यंत खास अशा, दिव्य अस्तित्वाचा मात्र त्यांच्यामध्ये अभाव असतो. उच्चतर मन, अधिमानसिक पातळी व अशा इतर प्रांतांतील, उच्चतर विश्वांमधील या रहिवाशांमध्ये चैत्य अस्तित्व नसते.

अर्थातच, प्राणिक विश्वांमधील (The vital worlds) जीवांमध्येही ते नसते. परंतु त्यांना त्याचे काही सोयरसुतक नसते कारण त्यांना त्याची आवश्यकताच वाटत नाही. त्यातही काही अगदी अपवादात्मक, दुर्मिळ जीव असे असतात की, ज्यांना स्वत:मध्ये बदल घडून यावा असे वाटत असते, आणि त्यासाठी ते त्वरा करतात, ते ताबडतोब प्राकृतिक देह धारण करतात. इतरांना मात्र ते नको असते….परंतु ही वस्तुस्थिती आहे, आणि मला हे सांगणेच भाग आहे की, हे सारे असे असे आहे.

स्वत:मध्ये असे हे चैत्य अस्तित्व बाळगणे हा मनुष्यमात्राचा अगदी अपवादात्मक असा गुणधर्म आहे आणि खरे सांगायचे तर, मनुष्य मात्र त्याचा पूर्ण लाभ घेत नाही. ज्याची वांछा बाळगावी असा हा काही गुणधर्म आहे असे लोकांना वाटतच नाही. त्यांच्या मनातील संकल्पना, त्यांच्या प्राणाच्या इच्छावासना, आणि त्यांच्या शरीराच्या सवयी यांनाच ते प्राधान्य देतात.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 160-161)

एका विशिष्ट दृष्टीने पाहिले तर समता आणि तमस ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एकमेकींच्या उजळ व अंधाऱ्या अशा प्रतिकृती आहेत. उच्चतर प्रकृती शांतीमध्ये आराम शोधते तर, निम्नतर प्रकृती उर्जेच्या विश्रांतीमध्ये आणि तमसामध्ये, अचेतनामध्ये परतण्यामध्ये आराम मिळविण्यासाठी धडपड करते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 477)

कशामध्ये तरी गढलेली प्रगाढ अशी स्थिरता म्हणजे शांती होय. ती अतिशय सकारात्मक असते, ती जणुकाही शांत, लाटाविरहित आनंदाच्या जवळ जाणारी असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137)

उच्चतर आध्यात्मिक चेतनेची शांती, शक्ती, प्रकाश, आनंद ह्या साऱ्या गोष्टी वर आहेत, परंतु त्या झाकलेल्या स्वरूपात आहेत. त्या खाली अवतरण्यासाठी एक विशिष्ट ऊर्ध्वगामी असणारा झरोका असला पाहिजे. मनाची शांती आणि अवतरित होऊ पाहणाऱ्या प्रभावाला खुली असणारी एककेंद्री क्रियाविरहितता ह्या गोष्टी म्हणजे त्या अवतरणासाठी आवश्यक असणारी उत्तम स्थिती होय.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 482)

साधनेमधील पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल तर, ती म्हणजे मनामध्ये स्थिर शांती आणि शांतता प्राप्त करून घेणे. अन्यथा तुम्हाला साधनेतील अनुभूती येऊ शकतील पण स्थायी असे काहीही नसेल. शांत मनामध्येच खरीखुरी जाणीव निर्माण करता येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 149-150)

श्रीमाताजी : तुमच्या अस्तित्वाच्या खूप आत खोलवर, तुमच्या छातीच्या खूप खोलवर आतमध्ये, तेजोमय, शांत, प्रेमपूर्ण आणि प्रज्ञावान असे ईश्वरी अस्तित्व कायमच असते. ते तेथे असते, त्यामुळे तुम्ही त्याच्याशी एकत्व पावू शकता; मग तुम्हाला ते एका तेजोमय, प्रकाशमान अशा चेतनेमध्ये परिवर्तित करू शकेल.

तुम्ही आणि मी आपण दोघेही मिळून, तुमच्या अस्तित्वाच्या पृष्ठवर्ती स्तरावर असणारा सर्व बाह्य गोंगाट शांत करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे मग शांततेमध्ये आणि शांतीमध्ये तुम्ही आंतरिक वैभवाशी एकत्व पावू शकाल.

– श्रीमाताजी (CWM 17 : 365-366)

जीवामधील ईश्वरी उपस्थितीची पहिली खूण म्हणजे शांती होय.

– श्रीमाताजी (CWM 12 : 114)

प्रश्न : माताजी, मला अधिक शांत करा.

श्रीमाताजी : जेव्हा कधी तुम्हाला अशांत, अस्वस्थ वाटेल तेव्हा त्या प्रत्येक वेळी, माझे चिंतन करा. त्याच वेळी, कोणताही बाह्य आवाज न करता, तुमच्या आतमध्ये स्वत:शी पुन्हापुन्हा उच्चारा, “शांती, शांती, हे माझ्या हृदया, शांती!” हे सुस्थिरपणे करत राहा. तसे केलेत तर जो परिणाम दिसून येईल त्याने तुम्ही संतुष्ट व्हाल.

– श्रीमाताजी (CWM 16 : 150)

दिवसातून किमान दोनदा तरी काही क्षणांसाठी मौनाची सवय करणे चांगले. परंतु केवळ न बोलणे म्हणजे मौन नव्हे, तर ते खरेखुरे मौन असले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 196)

शांती आणि स्थिरता हे रोगावरील खात्रीशीर उपाय आहेत. जेव्हा आपण आपल्या पेशींमध्ये शांती आणू शकतो, तेव्हा आपण बरे झालेले असतो.

– श्रीमाताजी (CWM 15 : 151)