Tag Archive for: तत्त्वज्ञान

पुनर्जन्माच्या बाबतीत बोलायचे झाले तर हे मान्य करावे लागेल की, सर्व बाबतीत एकसारखाच नियम लागू होत नाही. काही लोकं मृत्युनंतर लगेचच जन्माला येतात – जर मुले त्यांच्या पालकांशी खूपच अनुबद्ध (attached) असतील तर बरेचदा अशा पालकांमधील काही भाग हा त्यांच्या मुलांमध्ये सामावला जातो. काही लोकांना मात्र, पुन्हा जन्माला येण्यासाठी शतकं आणि कधीकधी तर हजारो वर्षेही लागतात. त्यांच्यासाठी सुयोग्य असे माध्यम त्यांना लाभावे म्हणून, परिस्थिती परिपक्व होण्यापर्यंत ते थांबून राहतात.

जर एखादी व्यक्ती ही योगिक दृष्ट्या प्रगल्भ असेल तर, ती व्यक्ती पुढच्या जन्मातील स्वतःचा देह देखील (स्वत:च) घडवू शकते. ते शरीर जन्माला येण्यापूर्वी ती व्यक्ती त्याला आकार देते, साचा तयार करते, त्यामुळे त्याचा खराखुरा निर्माता ती व्यक्तीच असते, अशा वेळी या नवजात बालकाचे पालक हे आगंतुक, केवळ शारीरिक साधन असतात.

मला येथे सांगितले पाहिजे की, पुनर्जन्माबाबत काही गैरसमजुती सर्वसाधारणपणे आढळतात. व्यक्तीच्या अस्तित्वाचे काही घटक हे इतरांबरोबर सम्मीलित होतात आणि नवीन देहांच्या माध्यमातून कार्य करू लागतात, हे जरी खरे असले तरी लोकांची ही जी समजूत असते की, ते तसेच पुन्हा जन्माला येतात, ती मात्र घोडचूक आहे.

त्यांचे संपूर्ण अस्तित्व हे काही परत जन्माला येत नाही, कारण एवढेच की ‘स्वत:’ असे ते ज्याला खरोखर समजत असतात, ते त्यांचे खऱ्या अर्थाने पृथक झालेले असे व्यक्तित्व नसते; तर त्यांच्या बाह्य व्यक्तिमत्त्वालाच, नाम रूपात्मक व्यक्तिमत्त्वालाच ते ‘स्व’ असे समजत असतात. म्हणून ‘अ’ हा पुन्हा ‘ब’च्या रूपाने जन्माला आला असे म्हणणे चुकीचे आहे; कारण अ ही व्यक्ती ब ह्या व्यक्तीपासून ऐंद्रियदृष्टया भिन्न असते; त्यामुळे ब म्हणून ती जन्माला आली असे म्हणता येत नाही. जर तुम्ही असे म्हणाल की, चेतनेच्या एकाच धाग्याने, त्याच्या आविष्करणासाठी अ आणि ब यांचा साधन म्हणून उपयोग केला, तर आणि तरच ते म्हणणे योग्य ठरेल. कारण जे कायम टिकून राहते ते चैत्य अस्तित्व असते, बाह्य व्यक्तिमत्त्व म्हणजे काही चैत्य अस्तित्व नव्हे, बाह्य नाव वा रूप असणारे असे काही तरी म्हणजे चैत्य अस्तित्व नव्हे, तर चैत्य अस्तित्व हे खोल अंतरंगात असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 145-146)

जर उत्क्रांती हे सत्य असेल; ती जीवजातांची केवळ शारीरिक उत्क्रांती नसेल, पण जर का ती चेतनेची उत्क्रांती असेल, तर ती केवळ भौतिक वस्तुस्थिती असू शकत नाही, ती आध्यात्मिकच असावयास हवी. अशा परिस्थितीत, व्यक्तीच उत्क्रांत होते, अधिकाधिक विकसित आणि पूर्ण जाणिवसंपन्नतेमध्ये वृद्धिंगत पावत जाते आणि अर्थातच ही गोष्ट माणसाच्या एका तोकड्या जीवनामध्ये घडून येणे शक्य नाही.

जाणीवयुक्त व्यक्तीची उत्क्रांती जर व्हावयाची असेल तर, त्यासाठी पुनर्जन्म आवश्यकच आहे. पुनर्जन्म ही तार्किकदृष्ट्या आवश्यक गोष्ट आहे आणि ती अशी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे की जिचा आपण अनुभव घेऊ शकतो. पुनर्जन्माचे पुरावे, कधीकधी तर अगदी खात्रीलायक पुरावे आढळतात, त्यांचा तुटवडा नाही पण एवढेच की, आजवर त्यांच्या काळजीपूर्वक नोंदी झालेल्या नाहीत आणि त्या आजवर एकत्रित केल्या गेलेल्या नाहीत.

– श्रीअरविंद

प्रश्न : माताजी, आपण पुनर्जन्मावर विश्वास का ठेवतो?

श्रीमाताजी : ज्यांना गत जीवनांचे स्मरण आहे त्यांनी पुनर्जन्म ही वस्तुस्थिती असल्याचे घोषित केले आहे. आत्ताच्या देहामध्ये असलेली ही चेतना, याआधीच्या जन्मांमध्ये इतर देहांद्वारेही अभिव्यक्त झालेली होती आणि या देहाच्या अंतानंतरही ती टिकून राहणार आहे, हे जाणण्याइतपत ज्यांच्या आंतरिक चेतनेचा विकास झाला आहे, असे आजवर पुष्कळ जण होऊन गेले आणि अजूनही आहेत. ‘पुनर्जन्माचा सिद्धान्त’ चर्चा करत बसावी असा विषय नाही, तर ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्यासाठी तो वादातीत असा विषय आहे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 400)

*

शिष्य : एका विधानाची सध्या इथे चर्चा आहे. त्यात असे म्हटले आहे की, “नुकतेच ह्या विजयाच्या बरोबरीने जे काही घडले आहे, ते केवळ अवतरण नव्हते तर ते आविष्करण होते. आणि एखाद्या व्यक्तिगत घटनेपेक्षा त्याचे मोल अधिक आहे : कारण अतिमनाचा वैश्विक लीलेमध्ये उदय झालेला आहे.”

श्रीमाताजी : हो, हो. खरंतर मीच हे सारे म्हटले होते.

शिष्य : ते म्हणतात की, अतिमानस तत्त्व आता कार्यरत झाले आहे…

श्रीमाताजी : ….प्रथम जाणिवेचे आरोहण होते, नंतर जाणीव तेथील ‘सद्वस्तु’ ग्रहण करते आणि तिला घेऊन खाली येते. ही ‘व्यक्तिगत’ घटना असते. मी ह्याला ‘अवतरण’ म्हणते.

परंतु, हीच व्यक्तिगत घटना जेव्हा अशा रीतीने घडून येते की, ज्यामुळे सार्वत्रिक स्तरावरील शक्यता निर्माण होण्यास ती पुरेशी आहे असे सिद्ध होते, तेव्हा ते केवळ ‘अवतरण’ नसते तर ते ‘आविष्करण’ असते.

ज्याला मी अवतरण म्हणते ती व्यक्तीच्या जाणिवेमध्ये घडून आलेली, व्यक्तिगत क्रिया असते. पण जर उदाहरणच द्यावयाचे झाले तर, जेव्हा मन या पृथ्वीतलावर प्रसृत झाले होते त्याप्रमाणे, या जुन्या विश्वामध्ये, एखादे नवीनच विश्व आविष्कृत होते, तेव्हा त्याला मी ‘आविष्करण’ म्हणते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 133)

…एका नूतन विश्वाचे आगमन, अतिमानस विश्वाचे आगमन साजरे करणे हे एक अद्भुत आणि अपवादात्मक भाग्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 98)

श्रीमाताजी म्हणतात : दि. ०१ जानेवारी १९६९ रोजी मध्यरात्री दोन वाजताचा प्रहर होता… अतिमानवी चेतना पृथ्वी चेतनेमध्ये अवतरली आणि प्रस्थापित झाली. चेतना, ऊर्जा, शक्ती, प्रकाश, आनंद आणि शांती यांनी परिपूर्ण भरलेले असे ते अद्भुत अवतरण होते आणि त्याने संपूर्ण पृथ्वीचे वातावरण भरून गेले. सद्यकालीन मनोमय चेतना आणि अतिमानसिक चेतना यांच्या मधील हा एक दुवा आहे असे मला जाणवले. ही अतिमानवाची चेतना अवतरित होत होती. जी अजूनही मानवाची चेतनाच आहे परंतु अधिक विस्तृत श्रेणीतील, अधिक सामर्थ्यशाली, पण अतिमानसिक जीवामध्ये रुपांतरित झालेली नाही, अशी ही चेतना आहे. आता ही अतिमानवी चेतना पृथ्वी-चेतनेमध्ये फक्त अवतरित झालेली आहे असे नाही, तर ती तेथे प्रस्थापित झाली आहे आणि पूर्णपणे कार्यकारी झाली आहे.

(The Spirit of Auroville by Huta : 82)

*

ह्या अनुभवानंतर भौतिकदृष्ट्या व आध्यात्मिक दृष्ट्या कोणते बदल घडून आले, यासंबंधी श्रीमाताजींनी एका निकटवर्ती शिष्याकडे केलेले हे भाष्य –

‘ऊर्ध्वस्थित असणाऱ्या गोष्टी सर्वोत्तम आहेत, तिथे तुम्हाला चांगले चांगले अनुभव, तेजोमय, अद्भुत असे सगळे अनुभव येतील, पण इथे? इथे मात्र काहीच नाही,’ – ही मनाने पूर्वापार केलेली विभागणी होती. आणि मग एखादा जन्माला येतानाच ‘हे जग आशाहीन आहे’ ह्या धारणेनेच पुन्हा या जगतामध्ये जन्माला येतो.

ह्यावरूनच असे स्पष्ट होते की, यापेक्षा काही निराळे असू शकते ह्याची कल्पनादेखील ज्यांच्या मनाला शिवली नसेल अशी माणसे म्हणतात, “या जगामधून निघून जाणेच योग्य आहे….”

मला सारे काही स्पष्ट झाले ! परंतु आता ह्या घटनेमुळे, येथून सुटका करून घ्यायलाच हवी, असे ते जग अजिबात राहिले नाही. आणि हा मोठाच विजय आहे : सुटका करून घेणे यापुढे आवश्यक नाही. तुम्हाला ते जाणवते, दिसते आणि ते या देहाने स्वत:च अनुभवले आहे – ती शक्यता लवकरच, अगदी इथे देखील प्रत्यक्षात येईल, गोष्टी अधिक सत्यतर होत जातील.

असे काही आहे…. असे काही आहे की, ज्यामुळे ह्या विश्वामध्ये निश्चितपणे काहीतरी बदलले आहे.

अर्थातच, गोष्टी खऱ्या अर्थाने प्रस्थापित होण्यासाठी, काही कालावधी निश्चितच लागणार. तीच तर लढाई चालू आहे. ‘बाह्यत: काहीच बदललेले नाही’, असे सांगण्यासाठीच जणू काही प्रत्येक बाजूने, प्रत्येक पातळीवर, सर्व बाजूंनी गोष्टींचा मारा होत आहे, पण ते खरे नाही. ते खरे नाही, या शरीराला माहीत आहे की, हे खरे नाहीये.

श्रीअरविंदांनी Aphorisms मध्ये जे लिहिले आहे, तसे ते आत्ता मला दिसते आहे, ती केवढी भविष्यवाणी होती…. त्या सत्यवस्तूचे त्यांना झालेले ते दर्शन होते, ते केवढे भविष्यसूचक होते !

मला आता समजते आहे, त्यांचे महानिर्वाण आणि त्यांचे कार्य…. इतके अफाट, आणि तेही सूक्ष्म भौतिकातील कार्य, त्याची इतकी, इतकी मदत झाली आहे ना ! त्यांनी केवढी… (जणू एखादे जडद्रव्य मळत आहेत, याप्रमाणे श्रीमाताजी हाताने दर्शवितात) …गोष्टी घडविण्यासाठी केवढी मदत केली आहे, या भौतिकाची रचनाच बदलण्यासाठी केवढी तरी मदत केली आहे.

उच्चतर जगतांशी संपर्क साधण्याचा आजवर ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला, त्या सर्वांनी या ‘भौतिका’ला मात्र ते जसे आहे तसेच सोडून दिले…. म्हणूनच ही सगळी वर्षे तयारी करण्यामध्ये आणि तयारीमध्येच खर्ची पडली – स्वत:ला खुले करावयाचे आणि तयारी करावयाची – आणि हे अलीकडचे काही दिवस तर… देहाने ‘भौतिक’ दृष्ट्यासुद्धा ही नोंद घेतली आहे की, गोष्टी बदलल्या आहेत. त्यावर अजून काम व्हावे लागेल, प्रत्येक तपशीलानिशी गोष्टी प्रत्यक्षात आणाव्या लागतील, पण बदल घडून आला आहे, बदल झाला आहे.

भौतिक परिस्थितीतून सुटकाच नाही; (श्रीमाताजी मूठ घट्ट आवळून दाखवितात) ती मनुष्याला अगदी घट्ट बांधून ठेवते अशी, समजूत मन तिच्याविषयी करून घेते. ही समजूत इतकी दृढ असते की, ज्यांनी ज्यांनी उच्चतर जगतांचा जिवंत अनुभव घेतला होता, त्यांना असे वाटत होते की, जर एखाद्याला खरोखरच सत्यामध्ये जीवन जगावयाचे असेल, तर त्याने या जगापासून पळून जायला हवे, ह्या जडभौतिक जगाचा त्यागच करावयास हवा : (अशा प्रकारच्या सर्व सिद्धान्तांचा, श्रद्धांचा आधार हाच तर आहे), पण आता गोष्टी तशा उरलेल्या नाहीत. आता गोष्टी तशाच राहिलेल्या नाहीत.

जडभौतिक हे आता उच्चतर प्रकाश, सत्य, सत्यचेतना ग्रहण करण्यासाठी आणि त्याचे ‘आविष्करण’ करण्यासाठी सक्षम झाले आहे.

हे सोपे नाही, त्याला चिकाटी, इच्छाशक्तीची आवश्यकता आहे; पण एक दिवस असा येईल की, हे सारे सहज स्वाभाविक होईल. केवळ एक दरवाजा उघडायचा अवकाश – बस, इतकेच; आता आपल्याला फक्त पुढे चालून जायचे आहे.

(Conversation with a Disciple, March 14, 1970)

जेव्हा ज्ञानामुळे शांत झालेले, प्रेमाने काठोकाठ भरलेले हृदय परमानंदित होते आणि सामर्थ्याने स्पंदित होऊ लागते; जेव्हा शक्तीच्या सामर्थ्यशाली भुजा, विश्वासाठी आनंद आणि प्रकाशाच्या ज्योतिर्मयी पुर्णत्वामध्ये परिश्रम घेतात; जेव्हा ज्ञानाचा दीप्तिमान मेंदू, हृदयाकडून आलेल्या धूसर अंत:प्रेरणा ग्रहण करतो आणि त्या रूपांतरित करतो आणि उच्चासनस्थित अशा संकल्पशक्तीच्या कार्यासाठी स्वत:ला स्वाधीन करतो; जो जीव सर्व विश्वाच्या एकत्वामध्ये जीवन जगत असतो आणि रुपांतरित करण्याच्या भूमिकेतूनच विश्वातील सर्व गोष्टींचा स्वीकार करत असतो, अशा त्यागी जीवाच्या अधिष्ठानावर जेव्हा हे सर्व देव, एकत्रितपणे सुप्रतिष्ठित होतात; हीच ती अवस्था असते जेव्हा मनुष्य समग्रतया स्व-अतीत होतो.

… हाच तो अतिमानवत्वाकडे जाण्याचा दिव्य मार्ग !

*

अतिमानव कोण?

मनोमय मानवी अस्तित्व भंगलेले आहे हे जाणून, जो या जडभौतिकाच्या वर उठून; वैश्विकतेने स्वत:ला भारून घेतो आणि दिव्य शक्तीसामर्थ्य, दिव्य प्रेम व आनंद आणि दिव्य ज्ञान यामध्ये देवसायुज्यत्व साधतो, तोच अतिमानव !

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 157), (CWSA 12 : 439)

जे स्वत:च्या सामान्य प्रकृतीवर मात करण्यासाठी धडपडतात; दिव्य सत्याच्या संपर्कात येण्याचा जो खोलवरचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे, तो जडभौतिकामध्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी, जे प्रयत्नशील असतात; जे अतीत किंवा सर्वोच्चाप्रत निघून जाण्याऐवजी, स्वत:च्या अंतरंगात अनुभवास आलेले जाणिवेतील परिवर्तन भौतिकरित्या, बाह्यात उतरविण्यासाठीसुद्धा धडपडतात; ते सर्व अतिमानवतेचे उमेदवार असतात. आणि त्यांच्या या प्रयत्नांच्या यशस्वितेमध्ये अनेकानेक प्रकार आहेत.

ज्या ज्या वेळी आपण सामान्य माणूस म्हणून बनून राहण्याचे नाकारतो, सामान्य जीवन जगणे नाकारण्याचा प्रयत्न करतो; ज्या ज्या वेळी आपल्या हालचालींमधून, कृतींमधून, प्रतिक्रियांमधून आपण ते दिव्य सत्यच अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करतो; जेव्हा सार्वत्रिक अज्ञानाची सत्ता आपल्यावर चालू न देता, दिव्य सत्याने आपण शासित होतो, त्या वेळी आपण अतिमानवतेचे प्रशिक्षणार्थी असतो. आणि आपल्या प्रयत्नांच्या यशस्वितेनुसार, आपण कमी अधिक प्रमाणात सक्षम प्रशिक्षणार्थी असतो, कमी अधिक प्रमाणात या मार्गावर प्रगत झालेले असतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 410)

आता हे खात्रीपूर्वक ठामपणे सांगता येईल की, मनोमय जीव आणि अतिमानसिक जीव यांच्यामध्ये एक मधला दुवा असणारी प्रजाती असेल. एक अशा प्रकारचा अतिमानव असेल की ज्याच्यामध्ये मनुष्याचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये काही प्रमाणात असतील; म्हणजे असे की, तो त्याच्या बाह्य रूपाच्या दृष्टीने, त्याच्या पशुसमान जन्मप्रक्रियेनिशी अगदी मानवासारखाच असेल; पण तो त्याची चेतना इतकी रूपांतरित करेल की. साक्षात्कार आणि कृती ह्या दृष्टीने तो जणू त्या नव्या वंशाचा, अतिमानसिक वंशाचा सदस्यच असेल.

अशा ह्या प्रजातीला ‘संक्रमणशील प्रजाती’ असे संबोधता येईल. एखादी व्यक्ती तिच्या भविष्यवेधी दृष्टीद्वारे हे पाहू शकते की, ही संक्रमणशील प्रजाती जन्म देण्याच्या प्राणिजगतातील जुन्या पद्धती ऐवजी, जन्म देण्याची नवीनच मार्ग शोधून काढेल. आणि मग असे खऱ्या अर्थाने आध्यात्मिकरितीने जन्माला आलेले जीव हे त्या नवीन वंशासाठी, अतिमानसिक वंशासाठी आवश्यक असणाऱ्या घटकद्रव्यांचा भाग बनतील.

म्हणजे, प्रजननाच्या जुन्याच पद्धतीने जे जन्माला आले आहेत, परंतु अतिमानसिक साक्षात्काराच्या नवीन जगताशी, जाणीवपूर्वक आणि सक्रिय असा संपर्क प्रस्थापित करण्यात जे यशस्वी झाले आहेत त्यांना आपण ‘अतिमानव’ असे म्हणू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 313-314)

प्रकृतीमध्ये मूलतः चेतनेची उत्क्रांती आकाराला येत आहे, या पृथ्वीवर आध्यात्मिक विकसन होत आहे, हेच जर का या जडभौतिकामध्ये आपल्या (मनुष्याच्या) जन्म घेण्याचे गुप्त सत्य असेल तर, आज आहे तसा मनुष्य हा या उत्क्रांतीचा अखेरचा टप्पा असू शकणार नाही. कारण तो आत्म्याचा अगदी अपूर्ण आविष्कार आहे. आणि मनदेखील खूपच मर्यादित रूप आहे; व ते केवळ साधनभूत आहे. चेतनेची केवळ एक मधली पायरी म्हणजे मन आहे. त्यामुळेच मनोमय जीव (मनुष्य) हा केवळ संक्रमणशील जीवच असू शकतो.

आणि जर का मनुष्य अशा रीतीने स्वतःच्या मनोमयतेच्या अतीत जाण्यास अक्षम असेल तर, त्याला बाजूला सारून, अतिमानस आणि अतिमानव आविष्कृत झालेच पाहिजेत आणि त्यांनी या सृष्टीचे नेतृत्व केलेच पाहिजे.

परंतु मनाच्या अतीत असणाऱ्या अशा गोष्टीप्रत खुले होण्याची जर मनाचीच क्षमता असेल तर मग मनुष्याने स्वतःच अतिमानस आणि अतिमानत्वापर्यंत जाऊन का पोहोचू नये? किंवा किमान त्याने प्रकृतीमध्ये आविष्कृत होणारे आत्म्याचे जे महान तत्त्व आहे त्या उत्क्रांतीला आपली मनोमयता, आपला प्राण, आपले शरीर स्वाधीन का करू नये?

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 879)