Tag Archive for: तत्त्वज्ञान

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०७

पहिली लढाई लढायची तीच मुळात भीषण असते; सामूहिक सूचनेच्या विरोधात ही मानसिक लढाई असते. प्रकृतीच्या अजूनपर्यंत निरपवाद भासणाऱ्या एका नियमावर आधारित, हजारो वर्षांच्या अनुभवांवर आधारित अशा प्रचंड आणि दबाव टाकणाऱ्या, सक्ती करणाऱ्या सामूहिक सूचनेविरुद्ध ही लढाई असते. “मृत्यू हा कायमचाच आहे, तो वेगळा असा काही असूच शकत नाही; मृत्यू अटळ आहे आणि तो काहीतरी वेगळा असू शकतो अशी आशा बाळगणे म्हणजे वेडेपणा आहे,’’ अशा एका हटवादी विधानामध्ये ती सामूहिक सूचना स्वतःला अनुवादित करते. आणि याबाबतीत सर्वांचे एकमत असते आणि आजवर एखाद्या अत्यंत प्रगत अभ्यासकानेदेखील याला विसंवादी सूर लावल्याचे म्हणजे भविष्याबद्दल आशा बाळगण्याचा सूर लावल्याचे धाडस केलेले दिसत नाही. बऱ्याचशा धर्मांनी तर मृत्युच्या वास्तवावरच स्वतःच्या कार्याची शक्ती आधारित केली आहे. आणि देवाने माणसाला नश्वर बनविलेले आहे त्यामुळे माणूस मृत पावावा हेच त्याला अपेक्षित आहे असे प्रतिपादन ते धर्म करतात. त्यातील अनेक धर्मांनी मृत्युकडे एक सुटका म्हणून, मुक्ती म्हणून आणि कधीकधी तर बक्षीस म्हणूनदेखील पाहिले आहे. त्यांचा असा आदेश असतो की, “सर्वोच्चाच्या इच्छेला शरण जा, कोणतेही बंड न करता, मृत्युची संकल्पना स्वीकारा म्हणजे मग तुम्हाला शांती आणि आनंद लाभेल.’’ हे सारे असे असतानादेखील, विचलित न होणारा संकल्प तसाच टिकून राहावा यासाठी मनाने स्वत:चा दृढ विश्वास अविचल राखला पाहिजे. अर्थात ज्याने मृत्युवर विजय मिळविण्याचा निश्चय केला आहे त्याच्यावर या सगळ्या सूचनांचा कोणताही परिणाम होत नाही आणि प्रगल्भ साक्षात्कारावर आधारित असलेल्या त्याच्या दृढ विश्वासावर याचा कोणताही परिणाम होऊ शकतही नाही. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 85)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०६

आणि शेवटी ते लोक, जे उपजतच योद्धे असतात. जीवन जसे आहे तसे ते स्वीकारूच शकत नाहीत; त्यांना त्यांचा अमर्त्यतेचा अधिकार, पूर्ण आणि पार्थिव अमर्त्यतेचा अधिकार त्यांच्या अंतरंगातूनच स्पंदित होताना जाणवत असतो. मृत्यू म्हणजे एका वाईट सवयीखेरीज अन्य काही नाही याचे त्यांना एक प्रकारचे अंतर्बोधात्मक ज्ञान असते; आणि मृत्युवर विजय मिळवायचाच अशा निश्चयानिशीच जणू ते जन्माला आल्यासारखे वाटतात. मात्र या विजयासाठी त्यांना क्रूर आणि सूक्ष्म हल्लेखोरांच्या सैन्याविरुद्ध घनघोर युद्ध करावे लागते आणि हा लढा सतत द्यावा लागतो, अगदी अक्षरशः प्रति क्षणाला हा लढा द्यावा लागतो. ज्याच्याकडे दुर्दम्य वृत्ती आहे त्यानेच हा प्रयत्न करावा. ही लढाई अनेक आघाड्यांवर चालते; एकमेकांमध्ये मिसळलेल्या आणि एकमेकांना पूरक असणाऱ्या अशा अनेक पातळ्यांवर ही लढाई चालू असते. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 84)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? ०५

ज्यांची देवावर, त्यांच्या देवावर श्रद्धा आहे आणि ज्यांनी आपले जीवन देवाला वाहिले आहे अशा व्यक्तींसाठी तिसरी एक पद्धत आहे. अशा व्यक्ती पूर्णतः ईश्वराच्या झालेल्या असतात; त्यांच्या जीवनातील साऱ्या घटना या ईश्वरी इच्छेची अभिव्यक्ती असतात आणि अशा व्यक्ती त्या साऱ्या घटना केवळ शांतचित्ताने स्वीकारतात असे नाही तर,त्या घटनांचा स्वीकार त्या व्यक्ती कृतज्ञतेने करतात; कारण त्यांच्या बाबतीत जे काही घडते ते त्यांच्या भल्यासाठीच घडते याची अशा व्यक्तींना पूर्ण खात्री असते.त्यांची त्यांच्या देवावर आणि त्याच्याशी असलेल्या नात्यावर एक गूढ, गाढ श्रद्धा असते.देवाला त्यांनी त्यांच्या इच्छेचे पूर्णतया समर्पण केलेले असते आणि जीवन व मृत्युच्या अपघातांपासून संपूर्णतया स्वतंत्र असलेले असे देवाचे अविचल प्रेम व संरक्षण अशा व्यक्तींना जाणवत असते.आपल्या प्रेममूर्तीच्या चरणांशी निःशेषतया आत्म-समर्पित होऊन आपण पडून राहिलेलो आहोत किंवा त्याने त्याच्या हातांचा जणू पाळणा केला आहे आणि त्यात आपण पहुडले आहोत असा सदोदित अनुभव अशा व्यक्ती घेत असतात आणि एक प्रकारचे पूर्ण संरक्षण त्या व्यक्ती सदोदित अनुभवत असतात.त्यांच्या चित्तामध्ये कोठेही भीतीला,चिंतेला किंवा यातनांना जागाच नसते; या साऱ्या गोष्टींची जागा एका शांत, मोदयुक्त आनंदाने घेतलेली असते. परंतु असे अंतःसाक्षात्कारी (mystic) असणे हे प्रत्येकाचेच भाग्य नसते. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 84)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०३

पहिली पद्धत तर्काला आवाहन करणारी आहे. असे म्हणता येईल की, जगाची जी सद्यकालीन स्थिती आहे त्यामध्ये मृत्यू अपरिहार्य आहे; देहाने जन्म घेतला आहे तर अगदी अनिवार्यपणे तो एक ना एक दिवस नष्ट होणारच आहे आणि प्रत्येक वेळी बघा, जेव्हा मृत्यू येणे आवश्यक असतो तेव्हाच तो येतो; मृत्युची घटिका कोणी त्वरेने घडवूनही आणू शकत नाही किंवा दूरही लोटू शकत नाही. जो मृत्युची याचना करतो त्याला तो प्राप्त करून घेण्यासाठी कदाचित खूप काळ वाट पाहावी लागू शकते आणि ज्या व्यक्तीला त्याची भीती वाटते अशा व्यक्तीने कितीही काळजी घेतली तरी त्याच्यावर मृत्यू अचानकपणे येऊन घाला घालू शकतो. त्यामुळे मृत्युची वेळ ही अत्यंत कठोरपणे निश्चित केलेली असते असे दिसते. फक्त त्याला काही मोजक्या व्यक्तींचा अपवाद असतो पण अशा व्यक्तींकडे असणाऱ्या शक्ती सर्वसामान्य मानवजातीमध्ये सहसा आढळत नाहीत. जी गोष्ट आपण टाळू शकत नाही त्याची भीती बाळगणे हे निरर्थक आहे, हे तर्कबुद्धी आपल्याला शिकविते. तेव्हा काय घडणार आहे याची चिंता करत न बसता, मृत्युची संकल्पना स्वीकारून, प्रत्येक तासागणिक, प्रत्येक दिवशी आपल्याला करण्याजोगे सर्वोत्तम असे जे जे काही आहे ते शांतपणे करत राहणे, हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे. ज्यांना तर्काच्या नियमांना धरून कर्म करण्याची सवय आहे अशा बुद्धिनिष्ठ व्यक्तींच्या बाबतीत ही प्रक्रिया अतिशय प्रभावी ठरते; ज्या व्यक्ती स्वतःच्या भावनांमध्ये जीवन जगतात आणि त्या भावनांना स्वतःच्या जीवनाचे नियंत्रण करू देतात अशा भावनाशील व्यक्तींबाबत मात्र ही पद्धत तितकीशी उपयुक्त ठरू शकत नाही. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 83)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०२

जीवनाचा अंत होत नाही, पण रूपाचे मात्र विघटन होते आणि या विघटनाचीच शारीरिक चेतनेला भीती वाटत असते. आणि तरीही हे रूप सारखे बदलत राहते आणि मूलत: या बदलास प्रगत होण्यापासून रोखू शकेल असे काहीच असत नाही. हा प्रागतिक बदलच भविष्यात मृत्युची अनिवार्यता नाहीशी करू शकेल. परंतु ही गोष्ट साध्य करणे अत्यंत कठीण आहे आणि त्यासाठी अशा अटी घालण्यात येतात की, ज्या अटींची परिपूर्ती अगदी मोजकी माणसंच करू शकतील. त्यामुळे मृत्युच्या भीतीवर मात करण्याची जी पद्धत अवलंबायची, ती प्रकृतीगणिक आणि चेतनेच्या अवस्थेगणिक वेगवेगळी असेल. या प्रत्येक पद्धतीमध्ये पुष्कळ विविधता आढळत असली तरीही, या पद्धतींचे चार मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते; खरे तर, प्रत्येकाने स्वतःची प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 82)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०१

व्यक्ती मृत्युच्या भीतीवर कशी मात करू शकते? तर, यासाठी अनेक पद्धती उपयोगात आणता येऊ शकतात. परंतु, या आपल्या प्रयत्नांमध्ये साहाय्यभूत होतील अशा काही मूलभूत संकल्पना प्रथम लक्षात घेऊ. जाणून घेतली पाहिजे अशी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की, जीवन हे एकसलग आहे आणि अमर्त्य आहे; फक्त त्याची रूपे अगणित, क्षणभंगुर आणि नाशिवंत असतात – हे ज्ञान व्यक्तीने मनामध्ये सुरक्षितपणे आणि कायमस्वरूपी स्थापित केले पाहिजे आणि या प्रत्येक रूपापासून स्वतंत्र असणाऱ्या पण तरीही या सर्व रूपांमधून आविष्कृत होणाऱ्या शाश्वत जीवनाशी, व्यक्तीने स्वतःची चेतना शक्य तितकी तादात्म्य केली पाहिजे. समस्या तशीच शिल्लक असते; पण या तादात्म्यामुळे समस्येला सामोरे जाण्यासाठी अपरिहार्य असा मनोवैज्ञानिक आधार प्राप्त होतो. अगदी आंतरिक अस्तित्व जरी सर्व भीतीच्या पलीकडे जाण्याइतपत प्रदीप्त झालेले असले तरीही शरीराच्या पेशींमध्ये भीती दडून राहिलेली असते; ती धूसर, स्वाभाविक, तर्कातीत आणि बरेचदा ती अगदी अज्ञात असते. व्यक्तीने या अंधार भरल्या गहनतेमध्ये तिचा शोध घेतला पाहिजे, तिचा ताबा घेतला पाहिजे आणि तिच्यावर ज्ञानाचा आणि दृढ विश्वासाचा प्रकाश टाकला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 82-83)

प्रश्न : माणसं जर मृत्यूच पावली नाहीत, तर वाढत्या वयाबरोबर त्यांचे शरीर निरूपयोगी होणार नाही का?

श्रीमाताजी : नाही, तुम्ही चुकीच्या बाजूने पाहात आहात. त्यांच्या शरीराचा ऱ्हास झाला नाही तरच ते मृत्युपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतील. शरीराचा ऱ्हास होतो त्यामुळेच तर ते मरण पावतात. त्यांचे शरीर निरुपयोगी होते त्यामुळेच तर ते मरण पावतात. त्यांना मृत्यू नको असेल तर, त्यांचे शरीर निरुपयोगी होता कामा नये… शरीराचा ऱ्हास होतो, प्रकृती खालावत जाते आणि नंतर पूर्णतः त्याला उतरती कळा लागून, अंतीमत: ते नाश पावते म्हणूनच मृत्यू आवश्यक होऊन बसतो. परंतु शरीरानेसुद्धा अंतरात्म्याच्या (Inner being) प्रगमनशील वाटचालीचे अनुसरण केले, चैत्य पुरुषाला (Psychic being) असते तशीच प्रगतीची आणि पूर्णत्वाची जाणीव शरीरालासुद्धा झाली तर, शरीर मृत पावण्याची कोणतीच आवश्यकता उरणार नाही. वय वाढत गेले म्हणून शरीराचा ऱ्हास होण्याचे काहीच कारण नाही. प्रकृतीचा हा केवळ एक नित्य-परिपाठ, सवय आहे. ‘सद्यस्थिती’त जे काही घडत आहे, त्याचा हा एक केवळ परिपाठ आहे. आणि नेमके हेच मृत्युचे कारण आहे.

…जर शरीर टिकून राहायचे असेल तर, त्याचा ऱ्हास होता कामा नये. तेथे क्षीणता असताच कामा नये. त्याने या एका बाजूवर विजय प्राप्त करून घेतला पाहिजे, तो म्हणजे, त्याचा ऱ्हास न होता, त्याचे रूपांतर झाले पाहिजे. त्याचा जर ऱ्हास होणार असेल तर अमर्त्यत्वाची शक्यताच उरत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 111-115)

मृत्युला त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व नाही, तर मृत्यू म्हणजे शरीरामध्ये असणाऱ्या ऱ्हासकारक तत्त्वाचा केवळ परिणाम आहे. आणि ते तत्त्व आधीपासूनच तेथे अस्तित्वात असते – ते जडभौतिक प्रकृतीचाच एक भाग आहे. परंतु त्याच बरोबर, मृत्यू अटळ आहे, असेही नाही. एखाद्याकडे जर आवश्यक ती चेतना आणि ती शक्ती असेल तर, शरीराचा -हास आणि मृत्यू अटळ नाहीत.

परंतु, ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विनाशकारक तत्त्वच समूळ नाहीसे होईल अशा रितीने, ती चेतना आणि ती शक्ती समग्र जडभौतिक प्रकृतीमध्ये उतरविणे, ही सर्वाधिक कठीण गोष्ट आहे.

*

विकासक्रमामध्ये (evolution) मृत्यू आवश्यक आहे कारण शरीर याहून अधिक प्रगती करू शकत नाही – चेतनेची जी प्रगती किंवा विकास चालू आहे त्यासाठी हे शरीर यापुढे साधन म्हणून पुरे पडू शकणार नाही. – त्यामुळे चेतनेला तिचे शारीरिक साधन बदलून नवे साधन धारण करावे लागेल. आत्म्याचे विकासानुगामी साधन (plastic instrument) बनावे यासाठी शरीरामध्ये काही उतरविता आले तर मग मृत्यूची आवश्यकताच शिल्लक राहणार नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 310-311), (CWSA 28 : 310)

देहधारी जीव, आज आहे त्याच शरीरामध्ये कोणत्याही बदलाच्या आवश्यकतेशिवाय प्रगती करू शकेल, इतपत आजवर विकसित झालेला नाहीये; आणि त्यामुळेच मृत्यूचे अस्तित्व आहे. तसेच खुद्द हे शरीरदेखील अजून पुरेसे जागृत झालेले नाही.

मन आणि प्राण आणि शरीर जर स्वतःच अधिक सचेत व अधिक लवचीक असते तर मृत्युची आवश्यकताच नव्हती.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 313-314)

प्रश्न : शारीरिक देह हा संरक्षण म्हणून कशा रितीने कार्य करतो?

ज्या जडतेबद्दल आपण आपल्या देहाला नावं ठेवत असतो त्या त्याच्या जडतेमुळेच हा शारीरिक देह संरक्षणाचे काम करत असतो. शरीर सुस्त, असंवेदनशील, निबर, अलवचीक आणि कठीण असते; बाजूने मजबूत तटबंदी असलेल्या गडकोटाप्रमाणे ते असते. तर प्राणिक जगत मात्र द्रवरूप असते, त्यातील गोष्टी प्रवाही असतात, त्या एकमेकांत मिसळत असतात, त्या परस्परांमध्ये प्रविष्ट होत असतात; समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे अखंडपणे एकमेकींमध्ये मिसळत असतात, बदलत असतात, त्यांची घुसळण होत असते त्या लाटांप्रमाणे हे सारे असते. तुम्ही जर अतिशय शक्तिशाली अशा आंतरिक प्रकाशाने आणि शक्तीने या प्राणिक जगताचा विरोध करू शकला नाहीत तर, त्याच्या या प्रवाहीपणासमोर तुम्ही संरक्षणविहीन असता; अन्यथा ते तुमच्यामध्ये आतपर्यंत जाऊन मिसळते आणि त्या आक्रमक प्रभावाला थोपवू शकेल असे तुमच्याकडे काहीच नसते. परंतु देह हस्तक्षेप करतो, देह तुम्हाला प्राणिक जगतापासून तोडतो, अलग ठेवतो. त्या जगताच्या शक्तींच्या पूरापासून रोखणारा देह म्हणजे जणू एक धरणच असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 48)