Tag Archive for: तत्त्वज्ञान

विचार शलाका – ०७

व्यक्तीमध्ये एकदा का विचाराची शक्ती आली की, तेथे ताबडतोब क्षणोक्षणीच्या ह्या अगदी पशुवत अशा दैनंदिन जीवनापेक्षा काहीतरी उच्चतर अशी आकांक्षा अपरिहार्यपणे त्याच्यामध्ये उदय पावते; आणि त्यातूनच त्याला जगण्याची उमेद आणि ऊर्जा प्राप्त होते.

ही गोष्ट समूहांप्रमाणेच व्यक्तींनादेखील लागू पडते. त्या समूहाच्या धर्माच्या, त्याच्या ध्येयांच्या मूल्यावर, म्हणजे, ज्याला ते त्यांच्या अस्तित्वाची सर्वोच्च गोष्ट मानतात त्यावर त्या समूहांचे मूल्य अवलंबून असते, ते त्याच्या अगदी समप्रमाणात असते.

अर्थातच आपण जेव्हा धर्माविषयी बोलतो, तेव्हा आपल्याला जर ‘प्रमाण धर्म’ असे म्हणायचे असेल तर, व्यक्तीला त्याची जाण असो वा नसो, अगदी ती व्यक्ती ज्या धर्माचा नावलौकिक आहे, परंपरा आहे अशा एखाद्या धर्माशी संबंधित असली तरीही खरोखरच प्रत्येक व्यक्तीला तिचा तिचा एक धर्म असतो. एखादी व्यक्ती जरी त्यातील सूत्रे मुखोद्गत म्हणू शकत असेल, ती व्यक्ती विहित विधी करीत असेल तरीदेखील प्रत्येक व्यक्ती तिच्या तिच्या पद्धतीने धर्म समजून घेते आणि तशी वागते; धर्माचे नाव केवळ एकच असते पण हा समान धर्म, ज्याचे ते परिपालन करीत आहेत असे ते समजतात तो धर्म, प्रत्येक व्यक्तीगणिक समानच असतो असे नाही.

आपल्याला असे म्हणता येते की, त्या ‘अज्ञाता’विषयीच्या किंवा परमश्रेष्ठाविषयीच्या कोणत्याही अभीप्सेच्या अभिव्यक्तीविना मानवी जीवन जगणे हे खूप अवघड झाले असते. प्रत्येकाच्या हृदयात जर अधिक चांगल्या गोष्टीविषयीची, भले ती कोणत्याही प्रकारची असो, आशा नसती, तर जीवन जगत राहण्यासाठीची ऊर्जा मिळविणे व्यक्तीला कठीण झाले असते.

पण फारच थोडी माणसं स्वतंत्रपणे विचार करू शकतात, अशा वेळी त्यांनी स्वत:साठी स्वत:चाच एखादा वेगळा पंथ काढण्यापेक्षा, कोणत्यातरी धर्माचा स्वीकार करणे, त्यामध्ये सहभागी होणे, आणि त्या धार्मिक सामूहिकतेचा एक भाग बनणे हे अधिक सुकर असते. त्यामुळे वरवर पाहता, एखादी व्यक्ती ह्या धर्माची वा त्या धर्माची असते, पण हे फक्त वरवरचे भेद असतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 355-356)

विचार शलाका – ०६

प्रश्न : माताजी, सामान्य माणसाच्या जीवनात धर्माची आवश्यकता आहे का?

श्रीमाताजी : समाजजीवनात या गोष्टीची आवश्यकता असते, कारण सामूहिक अहंकारावर उपाय म्हणून धर्माचा उपयोग होतो, या नियंत्रणाविना हा सामूहिक अहंकार प्रमाणाबाहेर वाढू शकतो.

व्यक्तीच्या चेतनेच्या पातळीपेक्षा सामूहिक चेतनेची पातळी नेहमीच निम्न असते. हे लक्षात येण्यासारखे आहे, उदा. जेव्हा माणसं मोठ्या संख्येने एखाद्या गटात एकत्रित येतात तेव्हा त्यांच्या चेतनेची पातळी खूप घसरते. जमावाची चेतना ही व्यक्ती-चेतनेपेक्षा खालच्या स्तरावरची असते आणि समाजाची सामूहिक चेतना ही, ज्या व्यक्तींनी तो समाज बनलेला आहे त्या व्यक्तींच्या चेतनेपेक्षा खचितच खालच्या पातळीवरची असते.

त्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. सामान्य जीवनात, व्यक्तीला त्याची जाणीव असो वा नसो, तिला नेहमीच एक धर्म असतो… ती व्यक्ती ज्या देवाची पूजा करते ती यशाची देवता असेल, पैशाची देवता असेल, सत्तेची देवता असेल, किंवा अगदी कुलदेवता असेल : मुलाबाळांची देवता, कुटुंबाची किंवा कुळाची देवता, पूर्वजांची देवता असू शकेल.

धर्म हा नेहमीच अस्तित्वात असतो. प्रत्येक व्यक्तीगणिक त्या धर्माचा दर्जा वेगवेगळा असेल, पण अस्तित्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कोणत्याही मूलभूत आदर्शाविना नुसतेच जीवन जगत राहणे हे माणसाला कठीण असते. बऱ्याचदा त्याला त्याच्या आदर्शाची जाणीवही नसते आणि जर त्याला विचारले की, तुझा आदर्श काय तर तो ते शब्दांत सांगू शकणार नाही, पण त्याचा काही एक धर्म असतो, भले तो अस्पष्ट, धूसर असेल, पण त्याच्या जीवनाच्या दृष्टीने ती खूप मोलाची गोष्ट असते.

बहुतांशी लोकांसाठी तो आदर्श हे एक प्रकारचे संरक्षण असते. व्यक्तीला त्यामुळे जगण्यासाठी सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती प्राप्त होते. त्याच्या दृष्टीने ते फार मोठे ध्येय असते. मानवी प्रयत्नांमागची ती एक मोठी प्रेरणा असते असेही म्हणता येईल…

– श्रीमाताजी
(CWM 09 : 354-355)

विचार शलाका – ०४

भारतीय धर्माने व्यक्तीला सुप्रस्थापित, सुसंशोधित, बहुशाखीय आणि नित्य विस्तीर्ण होत जाणारा असा ज्ञानाचा तसेच आध्यात्मिक वा धार्मिक साधनेचा मार्ग दाखवून दिला.

त्या उच्च पायऱ्यांवर जाण्याची ज्यांची तयारी झालेली नाही त्यांच्याकरिता, भारतीय धर्माने व्यक्तीजीवन व समाजगत जीवन यासंबंधातील व्यवस्था घालून दिली, व्यक्तिगत शिस्त व सामाजिक शिस्त, व्यक्तिगत वर्तन व समाजगत वर्तन या संबंधात एक आराखडा पुरवला; मानसिक, नैतिक व प्राणिक संवर्धनाची चौकट पुरवली. ही व्यवस्था, आराखडा, चौकट मान्य करून कोणीही आपल्या मर्यादेत, आपल्या प्रकृतीला धरून असे वागू शकतो की, अंतत: श्रेष्ठ अस्तित्वात व जीवनात प्रविष्ट होण्याची त्याची तयारी होते.

हिंदूधर्माने…जीवनाचा कोणताही भाग धार्मिक व आध्यात्मिक जीवनाला परका मानला नाही व ठेवला नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 181)

विचार शलाका – ०३

प्राचीन भारतीय सभ्यता चार मानवी हितसंबंधाच्या पायावर स्पष्टपणे उभी केलेली होती – १) वासना आणि भोग २) मन व शरीर यांची भौतिक व आर्थिक उद्दिष्टे व गरजा ३) नैतिक वर्तन व वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचा योग्य नियम ४) आध्यात्मिक मुक्ती; म्हणजेच काम, अर्थ, धर्म, मोक्ष.

संस्कृतीचे व समाजसंघटनेचे हे कार्य होते की, त्यांनी नेतृत्व करून, मानवाच्या या हितसंबंधांना आधार देऊन, मानवाचे समाधान करावे आणि या हितसंबंधांची रूपे व हेतु यांचा शक्यतो समन्वय करावा. क्वचित काही अपवाद सोडता, मानवाच्या वरील तीन ऐहिक हेतूंचे समाधान अगोदर, आणि इतर हेतूचा विचार नंतर, अशी व्यवस्था अभिप्रेत होती; अगोदर जीवनाची पूर्णता आणि नंतर जीवनाला मागे टाकून पलीकडे जाणे, अशी व्यवस्था अभिप्रेत होती.

कुटुंबाचे ऋण, समाजाचे ऋण व देवांचे ऋण ही तीन ऋणे फेडण्यात कसूर न व्हावी असा संस्कृतीचा आदेश होता. पृथ्वीचे देणे पृथ्वीला दिले पाहिजे, सापेक्ष जीवनाला त्याची लीला करू दिली पाहिजे. या जीवनाच्या पलीकडे निरपेक्ष केवलाची शांती आहे, पृथ्वीच्या पलीकडे स्वर्गाचे वैभव आहे, म्हणून पृथ्वी व सापेक्ष जीवन यांजकडे दुर्लक्ष होता कामा नये, असा संस्कृतीचा आदेश होता. सर्वांनी गुहेत, मठात जावे असा प्रचार या संस्कृतीत मुळीच नव्हता.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 125)

विचार शलाका – ०२

आपण जेव्हा कधी प्रथमत: युरोपीयन शिक्षण स्वीकारले, तेव्हाच आपण विज्ञानाच्या प्रकाशाद्वारे स्वत:ची दिशाभूल होऊ देण्यास संमती दिली. विज्ञान हा एका मर्यादित खोलीतील प्रकाश आहे, विश्व उजळवून टाकू शकेल असा सूर्य नव्हे. विज्ञानाची सर्व गोळाबेरीज म्हणजे ‘अपराविद्या’ होय पण त्याहून अधिक उच्च अशी एक ‘विद्या’ आहे, महान असे ज्ञान आहे. जेव्हा आपण अपरा विद्येच्या प्रभावाखाली वावरत असतो तेव्हा आपण अशा कल्पनेत असतो की आपणच सर्व काही करीत आहोत आणि जणू काही बुद्धीच सार्वभौम आणि सर्वशक्तिमान असावी असे समजून, आपण ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती बुद्धीच्या साहाय्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हा भ्रमाचा आणि ‘माये’चा दृष्टिकोन आहे. एखाद्याने एकदा जरी स्वत:च्या अंतरात वसलेल्या ‘ईश्वरा’ची दिव्य प्रभा अनुभवलेली असेल तर केवळ बुद्धीच सर्वोच्च आहे असे तो पुन्हा कधीच मान्य करू शकणार नाही. तेथे एक उच्चतर ध्वनी असतो, एक अमोघ अशी आकाशवाणी असते. ईश्वराचा अधिवास हा हृदयात असतो. ‘ईश्वर’ मेंदूमार्फत कार्य करतो पण मेंदू हे त्याचे केवळ एक साधन असते. मेंदू ज्या गोष्टीची योजना आखण्याची शक्यता असते ते सर्वप्रथम हृदयाला ज्ञात असते. आणि जो कोणी मेंदूच्या पलीकडे हृदयापर्यंत जाऊ शकतो तोच ‘शाश्वता’ची वाणी ऐकू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 891-892)

विचार शलाका – ०१

विचारांना आकार, रूप (form) असते आणि त्यांचे स्वतःचे असे एक व्यक्तिगत जीवन असते. ते त्यांच्या रचयित्यापासून स्वतंत्र असते. ते विचार त्या रचयित्याकडूनच या विश्वामध्ये प्रवाहित करण्यात आलेले असतात आणि त्यांच्या अस्तित्वाच्या प्रयोजनाची परिपूर्ती करण्यासाठी म्हणून ते विचार या विश्वामध्ये फिरत राहतात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असता, तेव्हा तुमचा तो विचार आकाररूप धारण करतो आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि जेव्हा तुमच्या विचारासोबत एखादी इच्छा जोडलेली असते तेव्हा, तो विचाररूपी आकार (thought-form) तुमच्यामधून बाहेर पडून, ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतो.

उदाहरणार्थ, समजा तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्याकडे यावी असे वाटत असते, तशी तुमची तीव्र इच्छा असते आणि त्यासोबत, म्हणजे तुम्ही हे जे काही मानसिक रूप तयार केलेले असते त्याच्या सोबत एक प्राणिक आवेगयुक्त अशी इच्छा असते; मग तुम्ही अशी कल्पना करता की, “जर ती व्यक्ती आली तर असे असे घडेल किंवा तसे घडेल.” मात्र कालांतराने तुम्ही ती कल्पना करणे सोडून देता. परंतु तुम्हाला हे माहीत नसते की, तुम्ही जरी विसरून गेलात तरीही त्या विचाराचे अस्तित्व तसेच कायम शिल्लक राहिलेले असते. कारण तो विचार-आकार अजूनही तसाच कायम असतो, तो तसाच कार्यरत असतो, तुमच्यापासून तो स्वतंत्र झालेला असतो आणि त्याला त्याच्या कार्यापासून परावृत्त करण्यासाठी फार मोठी शक्ती असावी लागते. आता तो त्या व्यक्तीच्या वातावरणात त्या व्यक्तीला स्पर्श करतो आणि त्या व्यक्तीमध्ये तुमच्याकडे येण्याची इच्छा निर्माण करतो. आणि जर का तुमच्या विचार-आकारामध्ये पुरेशी इच्छाशक्ती असेल, जर तुम्ही त्याची सुव्यवस्थित रचना केलेली असेल तर, तो विचार स्वतः प्रत्यक्षीभूत होतोच होतो. परंतु रचनेचा काळ आणि ती प्रत्यक्षात येण्याचा काळ यामध्ये काही विशिष्ट अंतर असते. आणि जर दरम्यानच्या काळात तुमचे मन इतर गोष्टींनी व्याप्त झाले तर, असे घडते की तुमच्या या विस्मृत विचारांची परिपूर्ती झालेली असते, तुम्हाला स्वतःलाच आता त्याची आठवण नसते की एकेकाळी तुम्हीच त्या विचाराला खतपाणी दिले होते आणि तुम्हालाच आता जाण नसते की तुम्हीच या कृतीला उद्युक्त केले होते आणि तीच कृती आता तुमच्या समोर उभी ठाकली आहे. आणि असे बरेचदा घडते की, जेव्हा प्रत्यक्ष परिणाम दिसून येतो तेव्हा तुमची ती इच्छा नाहीशी झालेली असते किंवा तुम्हाला त्याची पर्वा नसते.

अशी बरीच माणसं असतात की ज्यांच्याकडे अशी रचना करण्याची खूप प्रबळ शक्ती असते आणि नेहमीच त्यांच्या रचना वास्तवात आलेल्या त्यांना पाहावयास मिळतात. पण त्यांच्याकडे एक शिस्तबद्ध असे मानसिक आणि प्राणिक अस्तित्व नसल्याने, आत्ता त्यांना एक गोष्ट हवीशी वाटते तर नंतर दुसरीच एखादी गोष्ट हवीशी वाटते आणि मग अशा या विविध किंवा विरोधी रचना आणि त्यांचे परिणाम एकमेकांवर आदळतात, त्यांचा परस्परांशी झगडा होतो. आणि मग अशा लोकांना आश्चर्य वाटू लागते की ते एवढे गोंधळाने आणि विसंवादाने भरलेले जीवन का जगत आहेत! परंतु त्यांना हे समजत नसते की, ते त्यांचे स्वतःचेच विचार होते. त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या इच्छांनीच त्यांच्याभोवती तशी परिस्थिती घडवली आहे आणि ती परिस्थिती आता त्यांना विसंगत, परस्परविरोधी वाटत आहे आणि त्यामुळे त्यांचे जीवन हे असह्य कोटीचे झालेले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 50-51)

ईश्वरी कृपा – २८

व्यक्ती परिश्रम करण्यासाठी आणि तपस्येसाठी जर तयार नसेल, तसेच तिचे मनावर व प्राणावर जर नियंत्रण नसेल तर, अशी व्यक्ती मोठ्या आध्यात्मिक लाभाची अपेक्षा बाळगू शकणार नाही – कारण मन व प्राण स्वतःची सत्ता दीर्घकाळ टिकून राहावी म्हणून, तसेच त्यांना त्यांच्या आवडीनिवडी लादता याव्यात म्हणून विविध युक्त्याप्रयुक्त्या आणि निमित्तं शोधत राहणार; आणि आत्म्याची व चैतन्याची खुली माध्यमे आणि आज्ञाधारक साधने बनण्याची वेळ जेव्हा त्यांच्यावर येईल तेव्हा, तो दिवस दूर लोटण्यासाठी म्हणून मन व प्राण विविध युक्त्याप्रयुक्त्या आणि निमित्तं शोधत राहणार. ‘ईश्वरी कृपा’ कधीकधी गैरवाजवी किंवा वरकरणी गैरवाजवी परिणामदेखील घडवून आणते पण व्यक्ती हक्क म्हणून किंवा अधिकार म्हणून ‘ईश्वरी कृपे’ची मागणी करू शकत नाही, कारण जर तसे झाले तर मग ती ‘ईश्वरी कृपा’ असणार नाही. व्यक्तीने केवळ उच्चरवात हाक देण्याचा अवकाश की, लगेच त्याला प्रतिसाद मिळालाच पाहिजे, असा दावा व्यक्ती करू शकत नाही, हे तुम्ही पाहिले आहे. आणि तसेच माझ्या हेही पाहण्यात आले, ‘ईश्वरी कृपे’ने हस्तक्षेप करण्यापूर्वी नकळतपणे खरंच खूप दीर्घकाळ तयारी चाललेली असते, हे माझ्या नेहमीच लक्षात आले आहे; आणि तो हस्तक्षेप झाल्यानंतरही, जे काही प्राप्त झाले आहे ते सांभाळून ठेवण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी व्यक्तीला – इतर बाबींबाबत करावे लागते तसे याबाबतीतही – जोपर्यंत पूर्ण सिद्धी प्राप्त होत नाही तोपर्यंत, पुष्कळ काम करावे लागते. अर्थातच त्यानंतर परिश्रम संपुष्टात येतात आणि मग व्यक्तीला खात्रीशीरपणे ती गोष्ट प्राप्त झालेली असते. आणि त्यामुळे या ना त्या प्रकारची तपस्या ही आवश्यकच असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 173)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

ईश्वरी कृपा – २७

‘ईश्वरी-कृपे’विना काहीच केले जाऊ शकत नाही, परंतु ती ‘कृपा’ पूर्णतः अभिव्यक्त व्हायची असेल तर, साधकाने स्वतःची सिद्धता करणे आवश्यक असते. साऱ्याच गोष्टी जर ‘ईश्वरी’ हस्तक्षेपावर अवलंबून असत्या तर, मनुष्य एक कळसूत्री बाहुली बनून राहिला असता आणि मग साधनेचा काही उपयोगच झाला नसता! आणि मग ना कोणत्या अटी, ना कोणते वस्तुंचे नियम, आणि त्यामुळे ना कोणते जग… केवळ ‘ईश्वर’ त्याच्या सुखासाठी वस्तुंशी खेळत आहे, असे झाले असते. अंतिमतः साऱ्याच गोष्टी ‘ईश्वरी’ वैश्विक कार्यामुळेच होतात, असे निःशंकपणे म्हणता येते, पण हे सारे व्यक्तींच्या माध्यमातून घडत असते, हे ईश्वरी वैश्विक कार्य शक्तींच्या माध्यमातून, ‘प्रकृति’च्या नियमांनुसार घडत असते. ‘ईश्वरा’चा विशेष हस्तक्षेप असू शकतो आणि असतो देखील पण साऱ्याच गोष्टी काही या विशेष हस्तक्षेपामुळे घडून येत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 171)

ईश्वरी कृपा – २५

हे तर अगदी स्वाभाविक आहे की, एकच संपर्क किंवा एकच घटना एखाद्या व्यक्तिमध्ये सुखाची तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तिमध्ये वेदनेची भावना निर्माण करते, प्रत्येक व्यक्ती कोणता आंतरिक दृष्टिकोन बाळगते यावर ते अवलंबून असते. आणि पुढे हेच निरीक्षण एका अधिक महान अशा साक्षात्काराप्रत घेऊन जाते. परमेश्वर हा सर्व वस्तुमात्रांचा निर्माणकर्ता आहे, हे एकदा एखाद्या व्यक्तिला उमगले, नुसते उमगलेच नाही तर जाणवलेसुद्धा, आणि जर ती व्यक्ती त्या परमेश्वराच्या नित्य संपर्कात राहिली तर, सारे काही त्या ‘ईश्वरी कृपे’ची कृतीच बनून जाते आणि सारे काही स्थिर व तेजोमय आनंदामध्ये बदलून जाते.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 245)

ईश्वरी कृपा – २३

न्याय म्हणजे वैश्विक प्रकृतिच्या गतिविधींचा काटेकोर तार्किक नियतिवाद. हा नियतिवाद जडभौतिक शरीराला लागू होतो तेव्हा त्याला आजारपण असे म्हणतात. या अपरिहार्य न्यायाच्या आधारावर, वैद्यकीय मन, उत्तम आरोग्याकडे घेऊन जाणारी परिस्थिती आणण्यासाठी तार्किकपणाने धडपडते. त्याच प्रमाणे, नैतिक चेतना ही सामाजिक देहामध्ये (social body) आणि तपस्या ही आध्यात्मिक प्रांतामध्ये कार्य करते…

केवळ ‘ईश्वरी कृपे’मध्येच, हस्तक्षेप करण्याची आणि या वैश्विक न्यायाचा क्रम बदलण्याचे सामर्थ्य असते. या पृथ्वीवर ‘ईश्वरी कृपे’चे आविष्करण घडविणे हेच अवताराचे महान कार्य असते. अवताराचे शिष्य बनणे म्हणजे ईश्वरी कृपेचे साधन बनणे. दिव्य माता ही एक महान प्रबंधक आहे – ‘ईश्वरी कृपे’च्या तादात्म्याद्वारे, परिपूर्ण ज्ञानानिशी, वैश्विक न्यायाच्या परम यंत्रणेच्या तादात्म्याद्वारे ती प्रबंधनाचे (to dispense) कार्य करते. आणि दिव्य मातेच्या मध्यस्थीद्वारे, अभीप्सेचे ईश्वराप्रत असलेले प्रत्येक प्रामाणिक व विश्वासपूर्ण स्पंदन, ईश्वराने अवतरित व्हावे यासाठी त्याला आवाहन करते. आणि त्याला प्रतिसाद म्हणून ‘ईश्वरी कृपे’चा हस्तक्षेप घडून येतो.

हे ईश्वरा, तुझ्यासमोर उभे राहून कोण अगदी प्रामाणिकपणे असे म्हणू शकेल का की, ”मी कधीच कोणतीही चूक केलेली नाही.” दिवसभरात कितीदा तरी आम्ही तुझ्या कार्यामध्ये चुका करत असतो आणि तरीही त्या चुका पुसून टाकण्यासाठी नेहमीच तुझी कृपा मदतीस धावून येते. ‘तुझ्या कृपे’चा हस्तक्षेप नसता तर, वैश्विक न्याय-धर्माच्या निर्दय पात्याखाली किती जण किती वेळा आले असते बरे? येथे प्रत्येक जण, एका अशक्यतेचे प्रतिनिधित्व करतो; या अशक्यतेचे निराकरण करणे आवश्यक आहे; आणि तुझ्या दिव्य कृपेला सारे शक्य आहे. या साऱ्या अशक्यता दिव्य साक्षात्कारामध्ये रूपांतरित होऊन पूर्णत्वाला जातील, हेच तुझे अगदी तपशीलवार आणि समग्र कार्य असेल.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 83)