Tag Archive for: तत्त्वज्ञान

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

विचार शलाका – ०३

माणूस त्याच्यावरच विजय प्राप्त करून घेऊ शकतो, ज्याला तो घाबरत नाही. आणि जो मरणाला घाबरतो त्याला मृत्युने आधीच पराभूत केलेले असते.

*

मृत्युवर मात करण्यासाठी आणि अमरत्व जिंकून घेण्यासाठी, व्यक्तीने मृत्युला घाबरता कामा नये तसेच त्याची आसही बाळगता कामा नये.

*

आपण प्राप्त करून घेऊ इच्छितो ते आपले साध्य आहे ‘अमरत्व’ ! आणि सर्व सवयींपैकी मृत्यू ही निश्चितपणे सर्वाधिक हटवादी सवय आहे.

*

तू संपूर्ण परित्यागाविषयी बोलत आहेस, पण देहाचा त्याग हा काही संपूर्ण परित्याग नव्हे. ‘अहं’चा त्याग हाच खरा आणि संपूर्ण परित्याग असतो की जो देहत्यागापेक्षा देखील अधिक दुःसाध्य असा प्रयत्न असतो. जर तुम्ही अहंचा परित्याग केला नसेल तर नुसत्या देहत्यागामुळे तुम्हाला मुक्तता मिळणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 120), (CWM 15 : 120), (CWM 15 : 120), (CWM 15 : 119)

(सप्टेंबर १९०९)

देशभक्ती आणि राष्ट्रीय चेतना हे दोन विभिन्न गुण आहेत. देशभक्त त्याच्या मातृभूमीच्या सेवेच्या हर्षोन्मादामध्ये जीवन जगत असतो, तो तिचे सर्वत्र दर्शन घेतो, तो तिच्याकडे देवता म्हणून पाहतो. देशाच्या कल्याणासाठी केलेला यज्ञ या दृष्टिकोनातून तो त्याचे सर्व कार्य अर्पण करतो; त्याचे स्वत:चे हित हे देशाच्या हितामध्ये मिसळून गेलेले असते. एकोणिसाव्या शतकातील इंग्लिश लोकांमध्ये अशी भावना नव्हती कारण कोणत्याही पाश्चात्त्य ‘भौतिकतावादी’ राष्ट्रातील व्यक्तीच्या हृदयात कायमस्वरूपी ह्या भावना घर करून राहू शकत नाहीत. ‘इंग्रज’ भारतात आले ते त्यांच्या देशाच्या भल्यासाठी म्हणून नव्हे तर ते व्यापार करायला इथे आले, स्वत:साठी पैसा मिळवायला इथे आले. स्वत:च्या देशाविषयीच्या प्रेमापोटी त्यांनी भारत जिंकून घेतला नाही किंवा त्याची लूट केली नाही तर त्यांनी स्वत:च्या स्वार्थापोटी भारतावर विजय मिळविला. असे असूनदेखील, देशभक्ती नसूनसुद्धा, त्यांच्याजवळ राष्ट्रीय भावना होती; त्यांच्याजवळ एकप्रकारचा अभिमान होता की, “आमचा देश सर्वोत्तम आहे, आमच्या रीतीपरंपरा, आमचा धर्म, आमचे चारित्र्य, नैतिकता, सामर्थ्य, धैर्य, बुद्धिमत्ता, आमची मते आणि आमच्या देशाचे कार्य हे इतरांना ज्याचे अनुकरणही करता येणार नाही इतके परिपूर्ण आहे, इतके ते अप्राप्य आहे,” ते असा विश्वास बाळगत की, “माझ्या देशाच्या हितामध्ये माझे हित सामावलेले आहे, माझ्या देशाचे वैभव हे माझे वैभव आहे, माझ्या देशबांधवांची समृद्धी ही माझी समृद्धी आहे; केवळ माझ्याच वैयक्तिक उद्दिष्टांसाठी धडपडण्याऐवजी, त्याचबरोबर मी माझ्या राष्ट्राच्या हितासाठीदेखील प्रगत होईन; देशाचा सन्मान, त्याचे वैभव, त्याची समृद्धी ह्यासाठी झगडणे हे त्या देशाच्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे; हाच नायकाचा धर्म आहे; आणि गरज पडली तर या लढ्यामध्ये वीरमरण पत्करणे हाच त्याचा धर्म होय.” या कर्तव्य – भावनेमधून राष्ट्रीय चेतनेचे मुख्य वैशिष्ट्य दिसून येते. देशभक्ती ही प्रकृतीने सात्त्विक असते, तर राष्ट्रीय चेतना ही राजसिक असते. जी व्यक्ती स्वत:चा अहं हा देशाच्या ‘अहं’मध्ये विरघळवून टाकते ती आदर्श देशभक्त असते; स्वत:विषयी अहंकार बाळगत असतानादेखील जी व्यक्ती देशाच्या अस्मितेचाही परिपोष करत असते ती व्यक्ती राष्ट्रभान असणारी व्यक्ती असते. त्या काळातील भारतीयांमध्ये अशा राष्ट्रभानाची आवश्यकता होती. आमचे असे म्हणणे नाही की, त्यांना देशहिताची कधीच पर्वा नव्हती; पण जर का त्यांचे व्यक्तिगत हित आणि देशहित यांमध्ये यत्किंचित जरी संघर्ष निर्माण झाला तर ते नेहमी स्वहितासाठी देशहिताचा त्याग करत असत. आमच्या मते, एकात्मतेच्या अभावापेक्षाही अधिक घातक असा जर कोणता दोष असेल तर तो राष्ट्रीय चेतनेचा अभाव हा होय. मात्र संपूर्ण देशभरामध्ये जर सर्वत्र ही राष्ट्रीय चेतना पसरली तर, ही भूमी भेदाभेदांनी पिडीत झालेली असली तरीसुद्धा एकात्मता अनुभवेल.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 218-219)

(इसवी सन : १९०७-१९०८)

राष्ट्र म्हणजे काय? आम्ही पाश्चात्त्य देशांमधील शाळांमध्ये शिकलो आहोत आणि स्वत:च्या सखोल संकल्पना, अधिक सत्य असणारी वाणी विसरून पाश्चात्त्यांची भाषा, त्यांचे विचार यांचे अनुकरण करावयास शिकलो आहोत. पाश्चात्त्यांच्या लेखी, राष्ट्र म्हणजे देश, अमुक एवढ्या जमिनीवर वास्तव्य करणारी काही लाख माणसं, की जी एकच भाषा बोलतात, त्यांनी निवडलेल्या एकाच नियामक सत्तेशी एकनिष्ठ राहत, एकसारखेच राजकीय जीवन जगत राहतात. परंतु, भारताची राष्ट्रीयतेची कल्पना अधिक सत्य आणि अधिक सघन असावयास हवी.

आपल्या पूर्वजांनी तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तेव्हा त्यांना वस्तुमात्रांचा एक स्थूल देह दिसला, त्याच्या आत असणाऱ्या सूक्ष्म देहाचा शोध त्यांना लागला, त्याच्याही पलीकडे जात, त्याच्याही पलीकडे अजून एका अधिक खोलवर दडून असलेल्या आणि तिसऱ्या देहाच्याही आतमध्ये असलेला, जीवनाचा आणि त्याच्या रूपाचा ‘स्रोत’ सदासाठी, अचल आणि अविनाशी अशा स्वरूपात तेथे स्थित आहे असे त्यांना आढळून आले. जे व्यक्तित्वाबाबत सत्य आहे तीच गोष्ट सामान्यत: आणि वैश्विक स्तरावर देखील सत्य आहे. जे माणसाबाबत सत्य आहे अगदी तेच राष्ट्राबाबतही सत्य आहे.

देश, जमीन हा राष्ट्राचा केवळ बाह्यवर्ती देह, त्याचा ‘अन्नमय कोश’ असतो, किंवा त्याला स्थूल शारीरिक देह असे म्हणता येईल. माणसांच्या समुहांमुळे, समाजामुळे, लाखो लोकांमुळे राष्ट्राचा हा देह व्यापून जातो आणि ते सारे केवळ त्यांच्या अस्तित्वांद्वारेच या देहामध्ये प्राणाची फुंकर घालतात, तो हा ‘प्राणमय कोश’, म्हणजे राष्ट्राचा प्राणदेह होय. हे दोन्ही देह स्थूल आहेत, ‘माते’चे ते भौतिक आविष्करण असते. स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह असतो, विचार, साहित्य, तत्त्वज्ञान, मानसिक आणि भावनिक क्रियाकलाप, आशा, सुख, आकांक्षा, परिपूर्ती, सभ्यता आणि संस्कृती ह्या साऱ्या साऱ्यांतून राष्ट्राचे ‘सूक्ष्म शरीर’ आकाराला येते. मातेच्या जीवनाचा हा भागही असा असतो, जो साध्या डोळ्यांनी देखील दिसतो.

राष्ट्राचा सूक्ष्म देह हा राष्ट्राच्या ‘कारण शरीरा’मध्ये जे खोलवर दडलेले अस्तित्व असते त्यामधून उदयाला येतो, युगानुयुगे घेतलेल्या अनुभवांमधून जी विशिष्ट अशी मानसिकता तयार झालेली असते, जी त्या राष्ट्राला इतरांपासून वैशिष्ट्यपूर्ण बनवते. ‘माते’चे हे तीन देह आहेत. परंतु त्या तिन्हीच्याही पलीकडे तिच्या जीवनाचा एक ‘उगमस्त्रोत’ आहे, जो अमर्त्य, अचल असा आहे; प्रत्येक राष्ट्र हे त्याचे केवळ आविष्करण असते, त्या वैश्विक ‘नारायणा’चे, ‘अनेकां’मध्ये वास करणाऱ्या ‘एका’चे ते आविष्करण असते, आपण सर्व जण त्याचीच बालकं आहोत.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 1115-1116)

विचार शलाका – २०

भारत हा आधुनिक मानवजातीच्या सर्व समस्यांचे प्रतिनिधित्व करणारा देश झाला आहे. भारत हाच पुनरुत्थानाची भूमी ठरेल – भारतभूमी अधिक उन्नत आणि अधिक सत्यतर जीवनाच्या पुनरुत्थानाची भूमी होईल.

मला असे स्पष्टपणे दिसते आहे की, एका बिंदूवर लक्ष केंद्रित करून कार्य करता येणे शक्य व्हावे म्हणून, ब्रह्मांडाच्या इतिहासात पृथ्वीला ब्रह्मांडाचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व देण्यात आले होते; तीच गोष्ट आता पुन्हा एकदा घडून येत आहे. भारत हा पृथ्वीवरील सर्व मानवी समस्यांचा प्रतिनिधी आहे; आणि भारतातच त्यावरील उपाय शोधला जाणार आहे.

– श्रीमाताजी
(Conversations with a disciple : Feb 3, 1968)

विचार शलाका – १८

अतिमानसिक अवतरण शक्य होण्यासाठी, साधकाने त्याआधी बरीच पावले टाकली असली पाहिजेत. माणूस हा बरेचदा त्याच्या पृष्ठीय मन, प्राण आणि देहामध्येच जगत असतो पण त्याच्या आतमध्ये महत्तर शक्यता असणारे एक आंतरिक अस्तित्व असते, ज्याविषयी त्याने जागृत होणे गरजेचे असते. कारण सद्यपरिस्थितीत, मानवाला त्यातील अगदी मर्यादित प्रभावच प्राप्त होऊ शकतो. आणि तो प्रभावच त्याला एका महान सौंदर्याच्या, सुसंगतीच्या, शक्तीच्या आणि ज्ञानाच्या सातत्यपूर्ण अनुसरणासाठी प्रवृत्त करतो. म्हणून ह्या आंतरिक अस्तित्वाचे टप्पे खुले करणे आणि बाह्य जीवनात जगत असतानाही अंतरंगात राहणे, त्याचे बाह्य जीवन या आंतरिक प्रकाशाने आणि ऊर्जेने प्रशासित करणे ही योगाची पहिली प्रक्रिया होय. हे करीत असताना त्याला स्वत:मध्ये त्याच्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो, की जो मानसिक, प्राणिक आणि शारीरिक घटकांचे कोणतेही वरवरचे मिश्रण असत नाही पण त्यांच्यामागे असणाऱ्या वास्तविकतेचा (Reality) काही अंश असतो, त्या एकमेवाद्वितीय ‘दिव्य अग्नी’चा तो स्फुल्लिंग असतो. त्याने त्याच्या अंतरात्म्यात निवास करणे, शुद्धीकरण करणे आणि त्याची उर्वरित सर्व प्रकृती ही ‘सत्या’कडे असलेल्या त्याच्या प्रेरणेने अभिमुख करणे शिकायला हवे. त्याच्या पाठोपाठ उर्ध्वामुखी खुलेपण आणि ‘अस्तित्वा’च्या उच्चतर तत्त्वाचे अवतरण घडून येणे शक्य आहे. पण असे असले तरीसुद्धा ती एकदम संपूर्ण अतिमानसिक ‘प्रकाश’ किंवा ‘ऊर्जा’ असणार नाही. कारण सामान्य मानवी मन आणि अतिमानसिक ‘सत्य-चेतना’ यांच्या दरम्यान चेतनेच्या अनेक पातळ्या असतात. ह्या आंतरवर्ती पातळ्या खुल्या करून त्यांची शक्ती मन, प्राण आणि शरीरात उतरवणे आवश्यक असते. केवळ त्यानंतरच ‘सत्य-चेतने’ची पूर्ण शक्ती प्रकृतीमध्ये कार्य करू शकेल. म्हणून स्वयंशिस्तीची किंवा ‘साधने’ची ही प्रक्रिया प्रदीर्घ आणि अवघड आहे पण त्यातील थोडेच असले तरीदेखील खूप प्राप्त केल्यासारखे आहे कारण त्यामुळे अंतिम मुक्ती आणि पूर्णत्व हे अधिक शक्य होते.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 548-549)

विचार शलाका – १७

देहरूपी आवरणापासून आत्म्याची सुटका हेच जर उद्दिष्ट असेल, तर अतिमानसिकीकरणाची (Supramentalisation) आवश्यकता नाही. त्यासाठी ‘आध्यात्मिक मुक्ती’ किंवा ‘निर्वाण’देखील पुरेसे आहे. भौतिकातीत पातळ्यांपर्यंत जाऊन पोहोचणे हे जरी उद्दिष्ट असेल तरीसुद्धा अतिमानस अवतरणाची आवश्यकता नाही. एखाद्या स्वर्गातील देवाची भक्ती करून व्यक्तीला त्या स्वर्गात प्रवेश मिळू शकतो. पण त्याला प्रगती म्हणता येणार नाही. अन्य जगतं (लोक, worlds) ही नमुनेबद्ध, नमुनेदार आहेत. ती त्यांच्या स्वत:च्या पद्धतीने, प्रकाराने आणि कायद्याने, नियमांनी बद्ध झालेले असतात. उत्क्रांती ही पृथ्वीवरच होऊ शकते आणि म्हणून योग्य असे प्रगतीचे खरे क्षेत्र, पृथ्वी हेच आहे. अन्य जगतातील अस्तित्व एका जगतातून दुसऱ्या जगतामध्ये प्रगत होऊ शकत नाहीत. ती त्यांच्या स्वत:च्या वर्गामध्येच बंदिस्त होऊन राहतात.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 288)

विचार शलाका

जीवन आणि आध्यात्मिकता या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, असा विचार करणे चुकीचे आहे, हे आम्ही पुन्हा एकदा सांगतो.

…’श्रीकृष्ण’ ‘अर्जुना’ला पुन्हापुन्हा अत्यंत तळमळीने सांगत आहे की, “युद्ध कर आणि तुझ्या विरोधकांचा पाडाव कर”. “माझे स्मरण कर आणि लढ!”, “कोणत्याही अभिलाषेपासून मुक्त असलेले कर्म, कोणत्याही स्वार्थी दाव्यांपासून मुक्त असलेले असे कर्म आणि आध्यात्मिकतेने काठोकाठ भरलेल्या हृदयानिशी केलेले सर्व कर्म मला अर्पण कर आणि लढ!” …कुरुक्षेत्राचा सारथी अर्जुनाचा रथ हा उद्ध्वस्त झालेल्या क्षेत्रामधून घेऊन जात आहे असे कर्मयोगाचे वर्णन आहे, ते कर्मयोगाचे प्रतीक आहे. कारण शरीर हा रथ आहे, इंद्रियं ही त्या रथाला जोडलेले घोडे आहेत आणि या रक्तपात आणि चिखलाने माखलेल्या जगाच्या मार्गावरून, श्रीकृष्ण मानवी आत्म्याला वैकुंठाच्या दिशेने घेऊन जात आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 12)

विचार शलाका – १०

प्रकृती गुप्तपणे विकास पावत आहे. तिच्या ठिकाणी जे दिव्य ईश्वरी तत्त्व दडलेले आहे ते शोधून काढण्याच्या व त्याची परिपूर्ती करण्याच्या दिशेने प्रकृतीचा गुप्तपणे विकास घडून येत आहे; या विकासाच्या योगाने ‘ते’ दिव्य तत्त्व अधिकाधिक स्पष्ट होत आहे, …मन, प्राण, शरीर ही आपल्या प्रकृतीची सर्व रूपे प्रकृतीच्या उपरिनिर्दिष्ट विकासाची साधने आहेत; परंतु मानव म्हणजे मन, प्राण, शरीर एवढेच अस्तित्व नव्हे, त्यांच्या पलीकडे पण तो आहे आणि त्याचे ते पलीकडले जे अस्तित्व आहे, ते त्याच्या पूर्णत्वाची गुरुकिल्ली आहे; तेथून जो प्रकाश येतो त्या प्रकाशात मानवाला त्याच्या अस्तित्वाचे उच्च व विशाल सत्यरूप समग्रतेने दिसू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 617)

विचार शलाका – ०८

सर्वसामान्य सिद्धान्त हे खूपच यांत्रिक असतात – पाप आणि पुण्याच्या कल्पनांच्या बाबतीत आणि पुढील आयुष्यातील त्यांच्या फलाबाबतीत देखील तसेच आहे. गतजन्मामध्ये ज्या ऊर्जा उपयोगात आणल्या गेल्या होत्या त्यांचे परिणाम नक्कीच होतात पण इतक्या बाळबोध तत्त्वानुसार ते होत नाहीत. पारंपरिक सिद्धान्तानुसार चांगल्या माणसाच्या वाट्याला आलेले दु:खभोग म्हणजे तो मनुष्य गत जन्मात फार मोठा दुर्जन असला पाहिजे ह्याचा पुरावाच समजला जातो आणि एखाद्या खलपुरुषाच्या वाट्याला जर समृद्धी आली असेल तर त्याच्या गतजन्मामध्ये तो पृथ्वीवर जणूकाही देवदूतासमान असावा आणि त्याने तेव्हा सद्गुणांचे आणि सत्कृत्यांचे खूप धान्य पेरले असावे आणि त्यामुळे त्याला असे हे सद्भाग्याचे पुष्कळ पीक हाती लागले आहे, ह्याचा पुरावा समजला जातो. हे इतके एकसारखे, सममित (symmetrical) आहे की हे खरे असणे शक्य नाही. जन्माचे प्रयोजन हे अनुभवाद्वारे जीवाची वाढ हे होय, गतकर्मांचे परिणाम, प्रतिक्रिया म्हणून जे काही येईल त्याद्वारे जिवाने शिकावे आणि वाढावे असे त्याचे प्रयोजन आहे. वर्गातील चांगल्या मुलांना लॉलीपॉप आणि वाईट मुलांना छडी मारण्यासारखे हे नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 533)