Tag Archive for: तत्त्वज्ञान

जीवनाचा आणि ‘योगा’चा योग्य विचार केला असता, असे दिसून येते की, सर्व जीवन म्हणजे ‘योग’च आहे. मग ते जाणीवपूर्वक असो किंवा अर्ध-जाणीवपूर्वक असो. मनुष्यामध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाच्या द्वारे, आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न हा ‘योग’ या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे. आणि या प्रयत्नांमध्ये विजय प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली उच्चतम अट म्हणजे, मानवामध्ये आणि ‘विश्वा’मध्ये अंशत: आविष्कृत झालेल्या विश्वात्मक आणि विश्वातीत ‘अस्तित्वा’शी व्यक्तिगत मानवाचे ऐक्य, ही होय.

जीवनाच्या सर्व दृश्य रुपांच्या मागे आपण दृष्टी टाकली तर, असे दिसून येईल की, हे जीवन म्हणजे ‘प्रकृती’चा एक महान ‘योग’ आहे. ही प्रकृती जाणीवपूर्वक किंवा अर्धजाणीवपूर्वक, स्वत:चे पूर्णत्व गाठावयाच्या प्रयत्नामध्ये आहे; स्वतःमधील विविध शक्ती सारख्या वाढत्या प्रमाणात प्रकट करीत, प्रकृती स्वतःचे पूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न करीत आहे. या ‘योगा’च्या आधारे, प्रकृती तिच्या दिव्य सत्य स्वरूपाशी ऐक्य पावण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून तिचा हा महान हेतू अधिक वेगाने आणि प्रभावीपणे साध्य व्हावा, म्हणून प्रकृतीने मानव या आपल्या विचारशील घटकाद्वारे, आत्मजाणीवयुक्त साधनांचा आणि कृतींच्या संकल्पयुक्त योजनाबद्ध व्यवस्थेचा, या ‘पृथ्वी’वर प्रथमच वापर केला आहे.

स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, “योग हे व्यक्तीने आपल्या पार्थिव जीवनामध्ये असताना, स्वत:ची विकासप्रक्रिया शीघ्रतेने एकाच जन्मात, किंबहुना काही वर्षांमध्येच, वा काही महिन्यांमध्येच साध्य करून घेण्याचे साधन आहे.”

– श्रीअरविंद [CWSA 23 : 06]

(उत्तरार्ध – भाग ०१ चा सारांश – आजवर जडभौतिक, प्राण आणि मन अशा क्रमाने उत्क्रांती झालेली आहे. अतिमानसाचे विकसन हे पुढील पाऊल असणार आहे, असे श्रीअरविंद म्हणतात…)

(उत्तरार्ध) – भाग ०२

श्रीअरविंद अशी शिकवण देतात की, अशा एका उच्चतर तत्त्वाचे अवतरण शक्य आहे की, ज्यामुळे आध्यात्मिक ‘स्व’ची मुक्ती केवळ या जगापासून दूर जाऊन नाही तर या जगात राहूनच शक्य होईल. एवढेच नव्हे तर, त्या उच्चतर तत्त्वाच्या अवतरणामुळे मनाच्या अज्ञानाची किंवा मर्यादित, अपुऱ्या ज्ञानाची जागा अशी अतिमानसिक सत्य-चेतना (truth-consciousness) घेईल, जी आंतरिक ‘स्व’चे पुरेसे माध्यम असेल आणि ज्यामुळे मानवाला अंतरंगामध्ये तसेच गतिशीलपणे स्वत:चा शोध घेता येईल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत शिल्लक असलेल्या प्राणिसदृश मानवतेचे विकसन दिव्यतर वंशामध्ये करता येईल. उच्चतर चेतनेच्या म्हणजे अजूनही सुप्त असलेल्या अतिमानस तत्त्वाच्या कार्याद्वारे आणि अवतरणाद्वारे होणाऱ्या परिवर्तनासाठी किंवा रुपांतरणासाठी अस्तित्वाची सर्व अंगे खुली करून देणे या ध्येयापर्यंत ‘योगा’ची मानसिक तपस्या उपयोगात आणता येणे शक्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

(पूर्वार्धाचा सारांश – चेतना जडामध्ये गर्भित असते. जडामध्ये सुप्त स्वरूपामध्ये असलेली ही चेतना उत्क्रांतीच्या प्रक्रियेद्वारे विमुक्त केली जाते.)

(उत्तरार्ध) – भाग ०१

प्राण ही चेतनेच्या विमुक्ततेची पहिली पायरी आहे; मन ही दुसरी पायरी आहे; पण उत्क्रांती मनापाशी संपत नाही; तर त्याहून अधिक महान अशा आध्यात्मिक (spiritual) आणि अतिमानसिक (supramental) चेतनेमध्ये विमुक्त होण्याची ती वाट पाहत राहते. ‘अतिमानसा’चे विकसन आणि सचेतन जीवामध्ये ‘आत्म्या’चे प्राबल्य हे निश्चितच उत्क्रांतीचे पुढचे पाऊल असणार आहे. तसे झाले तरच, वस्तुजातामध्ये अंतर्हित (involved) असणारे ‘दिव्यत्व’ पूर्णत: बहरून येईल आणि जीवनाला त्याचे निर्दोष आविष्करण करणे शक्य होईल.

परंतु ‘प्रकृती’कडून उत्क्रांतीची या आधीची पावले, वनस्पती आणि प्राणीजीवनाच्या जागृत इच्छाशक्तीच्या सहकार्याविनाच उचलली गेली; मनुष्यामध्ये मात्र, त्याच्या (मन, प्राण, देह) या आधारामध्ये, जागृत इच्छाशक्तीद्वारे विकसन करण्यास ‘प्रकृती’ समर्थ ठरली आहे. तथापि, मनुष्यामध्ये असलेल्या मानसिक इच्छाशक्तीद्वारेच हे संपूर्णत: घडून येईल असे संभवनीय नाही, कारण मन हे एका ठरावीक बिंदूपर्यंतच जाऊ शकते आणि त्यानंतर ते एका वर्तुळातच फिरत राहते. ज्यामुळे मन उच्चतर तत्त्वात बदलून जाईल असे वळण चेतनेला देणे आवश्यक आहे; असे एक परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. ती पद्धत प्राचीन काळातील मानसिक तपस्येच्या आणि ‘योगाभ्यासा’च्या माध्यमातून शोधून काढणे गरजेचे आहे. प्राचीन काळी, जगापासून स्वत:ला दूर राखणे आणि ‘स्व’च्या किंवा ‘आत्म्या’च्या उच्चतर चेतनेमध्ये स्वत:चा विलय करून घेणे या मार्गाने हे प्रयत्न झाले आहेत.

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

(पूर्वार्ध) जगताच्या दृश्यमानतेच्या पाठीमागे ‘अस्तित्वाची आणि चेतनेची’ एक ‘वास्तविकता’ आहे; सर्व गोष्टींमागे एकच शाश्वत आत्मा आहे, अशी शिकवण ज्या प्राचीन ऋषीमुनींची आहे, त्या ऋषीमुनींच्या प्राचीन शिकवणुकीपासून श्रीअरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो. सर्व अस्तित्वं वस्तुतः त्या ‘एका’ ‘आत्म्या’मध्ये आणि ‘चैतन्या’मध्ये एकात्म असतात पण ‘चेतने’च्या विशिष्ट विलगीकरणामुळे तसेच स्वत:च्या खऱ्याखुऱ्या ‘आत्म्या’विषयी आणि मन, प्राण, देह यांतील ‘वास्तविकते’विषयी असलेल्या अज्ञानामुळे ती अस्तित्वं विभागली गेली आहेत. एका विशिष्ट अशा मानसिक साधनेद्वारे हा विभक्त ‘चेतने’चा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या ‘आत्म्या’विषयी, स्वत:मधील व सर्वांमधील ‘दिव्यत्वा’विषयी जागृत होणे शक्य आहे.

श्रीअरविंदांची शिकवण असे सांगते की, ‘सद्वस्तु’ (One Being) आणि ‘चेतना’ (Consciousness) ही ‘जडभौतिका’मध्ये अंतर्हित (involved) आहे. उत्क्रांती (Evolution) ही अशी पद्धती आहे की, जिच्याद्वारे ही सद्वस्तु स्वत:ला मुक्त करवून घेते; जे अचेतन भासते त्यामध्येसुद्धा चेतना प्रकट होते आणि एकदा का ती प्रकट झाली की, उच्च उच्चतर वाढण्याकडे आणि त्याच वेळी जास्तीत जास्त पूर्णत्वाकडे विकसित होण्यासाठी व विस्तारण्यासाठी ती स्वत:ला प्रवृत्त करते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

प्रकृतीमध्ये पाषाणातून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे, प्राण्याकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या शारीरिक प्रकृतीच्या (physical nature) दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे प्राणीच आहे; विचार करणारा आणि बोलणारा प्राणी आहे इतकेच. मात्र त्याच्या शारीरिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित.

प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. प्राण्याच्या दृष्टीने जसा मानव, त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची चेतना मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल. मनुष्याला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक चेतनेमध्ये जगणारा मनुष्य हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, ‘सत्य-चेतना’ प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी सांगितले आहे. ही चेतना, जिला त्यांनी ‘अतिमानस’ (Supermind) असे संबोधले आहे, ती चेतना स्वत:मध्ये (पृथ्वीकरिता) प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.

– श्रीमाताजी [CWM 12 : 116]

तुम्ही झटून प्रयत्न केले पाहिजेत, तुम्ही तुमच्या सर्व दुर्बलता आणि मर्यादा यांवर मात करण्यासाठी धडपडले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे “आता तुझी सद्दी संपली आहे,” असे तुम्ही तुमच्या अहंकाराला सांगितले पाहिजे.

आपल्याला आता एक असा वंश हवा आहे की ज्या वंशातील लोकांना अहंकार नसेल, आणि अहंकाराची जागा ‘दिव्य चेतने’ने घेतलेली असेल. आपल्याला अशी ‘दिव्य चेतना’ हवी आहे की, जिच्यामुळे तो वंश स्वतःहूनच विकसित होईल आणि त्यामधून अतिमानसिक जीव जन्माला येईल.

– श्रीमाताजी [CWM 11 : 307]

 

साधक : माताजी, तुम्ही या छायाचित्रामध्ये प्रणाम का करत आहात ? का ? आणि कोणाला ?

श्रीमाताजी : मी ‘सत्या’चे स्वागत करत आहे. त्यासाठी ही आवश्यक अशी मुद्रा आहे. हा भक्तीचा आणि विनम्रतेचा भाव आहे. जेव्हा ‘सत्य’ हेच एकमेव मार्गदर्शक असेल अशा दिवसाची मी अगदी धीराने वाट पाहत आहे. हा भाव महत्त्वाचा आहे. येथे ‘दिव्य सत्य’ समग्रपणे स्थापित व्हावे अशी जर पृथ्वीची इच्छा असेल तर, हा भाव तिने बाळगला पाहिजे. ही एकच गोष्ट आहे की जी या पृथ्वीला वाचवू शकेल. या भूमिकेमध्ये राहायचे आणि ऊर्ध्वगामी अभीप्सा बाळगायची. या वृत्तीने ‘सत्या’समोर नतमस्तक व्हायला या पृथ्वीने शिकलेच पाहिजे. हीच आराधनाही आहे आणि तोच प्रणामही आहे. पृथ्वीने हे शिकलेच पाहिजे, या (प्रणामाच्या) मुद्रेमधून अजूनही अधिक काही, म्हणजे गहनगभीर आणि उदात्त असे काही अभिव्यक्त होते.

[Sweet Mother – Harmonises of Light, Part 01 : 15]

संन्यासवादी जीवनपद्धती ही आध्यात्मिक पूर्णतेसाठी अगदी अनिवार्यपणे आवश्यकच असते किंवा आध्यात्मिक मार्ग म्हणजे संन्यासवादी मार्गच असतो, असे मी मानत नाही.

एखाद्या कार्यामध्ये किंवा कोणत्याही कर्मामध्ये, किंवा ‘ईश्वरा’ला आपल्याकडून ज्या कर्माची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कर्मांमध्येसुद्धा अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रत समर्पण करण्याचा, आध्यात्मिक आत्मदान करण्याचा आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्वाचा आणखी एक मार्गदेखील आहे.

तसे नसते तर, भारतामध्ये ‘जनक’ किंवा ‘विदुरा’सारख्या थोर आध्यात्मिक व्यक्ती आढळल्या नसत्या; इतकेच काय ‘श्रीकृष्ण’देखील आढळला नसता; किंवा अगदी असताच तर तो ‘श्रीकृष्ण’ वृंदावन, मथुरा, द्वारका यांचा ‘अधिपती’ झाला नसता; तो राजपुत्र आणि योद्धा किंवा ‘कुरूक्षेत्रा’तील सारथी झाला नसता; तर तो फक्त एक थोर तपस्वीच बनून राहिला असता.

‘महाभारता’मध्ये किंवा अन्यत्र, ‘भारतीय धर्मशास्त्रा’मध्ये आणि ‘भारतीय परंपरे’मध्ये, जीवनाच्या परित्यागावर आधारित आध्यात्मिकतेला आणि कर्मप्रधान आध्यात्मिक जीवनाला एकसारखेच स्थान देण्यात आलेले आहे. जीवनाच्या परित्यागावर भर देणारा संन्यासवादी मार्ग हाच तेवढा ‘भारतीय परंपरे’तून आलेला आहे, आणि ‘सर्वकर्माणि’, सर्व प्रकारच्या कर्मांचा आणि जीवनाचा स्वीकार हा मार्ग ‘युरोपियन किंवा पाश्चात्त्य’ आहे, तो आध्यात्मिक नाही, किंवा तो ‘भारतीय’ नाही असे म्हणता येत नाही.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 250]

(श्रीअरविंद येथे साधकांना सांगत आहेत की, एखादी गोष्ट कोणत्या वृत्तीने केली जाते, तिची उभारणी कोणत्या तत्त्वाच्या आधारावर केली जाते आणि तिचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जातो, यावर सारे काही अवलंबून असते.)

राजकारण हा काही नेहमीच चांगला स्वच्छ कारभार असतो असे नाही, किंबहुना बरेचदा तो तसा नसतोच. असे असूनही मी राजकारण केले आणि अगदी सर्वात जहाल असे क्रांतिकारी राजकारण, ज्याला ‘घोर कर्म’ म्हणता येईल असे राजकारण केले.

युद्धालादेखील आध्यात्मिक प्रकारचे कृत्य असे म्हणता येणार नाही तरीही मी युद्धाला साहाय्य केले आणि माणसांना युद्धावर पाठविले. ‘श्रीकृष्णा’ने ‘अर्जुना’ला अत्यंत भयानक प्रकारचे युद्ध करण्याचे आवाहन केले आणि त्याच्या उदाहरणाद्वारे, माणसांनी सर्व प्रकारची मानवी कर्मे, ‘सर्वकर्माणि’ करावीत म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. आता, ‘श्रीकृष्ण हा आध्यात्मिक मनुष्य नव्हता किंवा त्याने अर्जुनाला दिलेला सल्ला चुकीचा होता किंवा तो तत्त्वतः गैरलागू होता’ असे म्हणून तुम्ही वाद घालत बसणार का? श्रीकृष्ण तर याही पुढे जात उद्घोषित करतो की, एखाद्या मनुष्यास त्याच्या मूलभूत प्रकृतिधर्मानुसार, त्याच्या स्वभावानुसार आणि त्याच्या क्षमतेनुसार जे कर्म करण्यास सांगण्यात आले आहे, ते कर्म जर त्याने त्याच्या आणि त्या कर्माच्या धर्मानुसार केले आणि योग्य प्रकारे आणि योग्य वृत्तीने केले तर, तसे कर्म केल्याने तो ‘ईश्वरा’प्रत जाऊ शकतो.

‘ब्राह्मण’, ‘क्षत्रिय’ यांच्याप्रमाणेच श्रीकृष्ण ‘वैश्य’ धर्माला आणि त्याच्या कर्मालाही मान्यता देतो. श्रीकृष्णाच्या भूमिकेतून पाहायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने व्यापारउदिम करणे, पैसे मिळविणे, नफा मिळविणे आणि तरीसुद्धा तो आध्यात्मिक असणे, त्याने ‘योगसाधना’ करणे, त्याला आंतरिक जीवन असणे शक्य आहे.

‘भगवद्गीता’ आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून सातत्याने कर्माचे समर्थन करते. ‘भक्ती’ आणि ‘ज्ञानमार्गा’प्रमाणेच ‘कर्ममार्गा’चे महत्त्वही प्रतिपादन करत आहे. श्रीकृष्ण कर्माला एक अधिक उच्चतर नियम (law) लावू पाहत आहे. कर्म निरपेक्षपणे केले पाहिजे, बक्षिसाच्या किंवा फलाच्या आसक्तीविना, निरहंकारी भूमिकेतून वा वृत्तीने, ‘ईश्वरा’प्रत केलेले अर्पण किंवा अर्पण केलेली समिधा या स्वरूपात कर्म केले गेले पाहिजे असे त्याचे सांगणे आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 249]

साधक : श्रीअरविंद नेहमीच असे सांगतात की, श्रीमाताजी तुमच्या अंतरंगात आहेत.

श्रीमाताजी : हो, खरे आहे, अगदी पूर्णपणे बरोबर आहे. मी ‘शाश्वत ज्योती’ मध्ये एक ‘ईश्वरी अस्तित्व’ या नात्याने ‘उपस्थित’ आहे, संजीवन देणारी आणि कृतिप्रवण करणारी ‘शक्ती’ या नात्याने मी उपस्थित आहे, सर्व शांतीपूर्ण गोष्टी आणि माधुर्य प्रदान करणारी ‘शांती’ या नात्याने मी उपस्थित आहे, ओसंडून वाहणारा आणि उन्नयन करणारा ‘मोद’, शुद्धिकरण करणारा ‘प्रकाश’ आणि संमती प्रदान करणारे ‘स्पंदन’ या नात्याने मी तेथे उपस्थित आहे.

श्रीअरविंद तेथे एक चिरस्थायी ‘सत्त्व’ म्हणून उपस्थित आहेत आणि मी तेथे एक ‘मार्गदर्शक’ म्हणून उपस्थित आहे. वास्तविक, दोघांमध्ये एकच अस्तित्व आहे. एक, जो निरीक्षण करतो तो साक्षी आहे आणि दुसरी प्रत्यक्षात उतरविणारी शक्ती आहे. आणि जोपर्यंत व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत तिला काहीच समजू शकत नाही…..

होय, श्री अरविंदांना आणि मला जो जाणतो, (वास्तविक, ही एकच गोष्ट आहे, एकच अस्तित्व आहे.) – त्याच्यासाठी सारे अडथळे, साऱ्या अडचणी, सर्व पाश, सत्याच्या मार्गावरील सारे तथाकथित अडथळे गळून पडतात आणि ते कायमसाठी काढून टाकले जातात. केवळ या जन्मातच असे नव्हे तर, मृत्युनंतरच्या जीवनातील आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या जीवनांमधील सुद्धा – अगदी शाश्वतकाळपर्यंत काढून टाकले जातात. अशा व्यक्तीसाठी ‘परमेश्वर’ हा सर्व शक्तिमान असतो.

[The Supreme by Mona Sarkar]