Tag Archive for: तत्त्वज्ञान

विचारशलाका २४

 

साधक : आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय…?

श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव ही एक अशी गोष्ट असते की, ज्यामुळे तुम्ही नेहमी ज्या चेतनेमध्ये (consciousness) वावरत असता त्यापेक्षा अधिक उच्च अशा चेतनेशी तुमचा संपर्क येतो. तुमची स्वत:विषयी काहीतरी एक भावना असते, भले मग कदाचित तुम्हाला त्याची जाणीवही नसेल, पण ती तुमची सामान्य स्थिती असते. पण तुम्हाला जर एकाएकी तुमच्या अंतरंगातील काही वेगळ्या आणि अधिक उच्च अशा चेतनेची जाणीव झाली तर – भले मग ती काही का असेना – तो एक ‘आध्यात्मिक अनुभव’ असेल. (अशा वेळी) तुम्ही मानसिक कल्पनेद्वारे त्याची मांडणी कराल किंवा करणारही नाही; तुम्ही ते स्वत:लाच स्पष्ट करून सांगाल किंवा सांगणारही नाही, ती जाणीव टिकून राहील किंवा राहणारही नाही; ती उत्स्फूर्त असू शकते. पण जेव्हा चेतनेमधील हा मूलभूत फरक तुम्हाला जाणवतो तेव्हा, त्याचा परिणाम म्हणून, अधिक उच्च, अधिक सुस्पष्ट, अधिक विशुद्ध असे काहीतरी तुम्हाला जाणवते तेव्हा त्याला ‘आध्यात्मिक अनुभव’ असे म्हणता येते.

– श्रीमाताजी [CWM 06 : 432]

विचारशलाका २२

 

बुद्धी, तर्कबुद्धी (Reason) ही सामान्य जीवनाच्या तर्कसंगत क्षेत्राशी संबंधित असलेल्या गोष्टींचेच मूल्यमापन करू शकते. आणि श्रीअरविंदांनी म्हटल्याप्रमाणे, मानवी जीवनातील प्राणिक आणि मानसिक कृतींचे, गतिविधींचे संयोजन आणि नियंत्रण करणे, हेच बुद्धीचे खरे कार्य असते.

समजा, जर एखाद्या व्यक्तीमध्ये प्राणिक असमतोल (vital disorder) असेल, विकार असतील, आवेग, वासना आणि तत्सम इतर गोष्टी असतील आणि तेव्हा जर त्या व्यक्तीने बुद्धीचा आश्रय घेतला आणि त्या बुद्धीचा वापर करून त्या दृष्टीने या गोष्टींकडे पाहायचा प्रयत्न केला तर अशा प्रत्येक वेळी, ती व्यक्ती या सर्व गोष्टी पुन्हा सुव्यव्यस्थित करू शकते. प्राण आणि मन यांच्या सर्व गतिविधी संघटित करणे आणि त्यांचे नियमन करणे हे बुद्धीचे खरे कार्य आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर, दोन संकल्पना एकमेकींशी मिळत्याजुळत्या आहेत, की विरोधी आहेत; तुमच्या मानसिक संरचनेमध्ये दोन सिद्धान्त एकमेकांना पूरक आहेत की मारक आहेत, हे पाहण्यासाठी तुम्ही बुद्धीचा आश्रय घेऊ शकता. या व अशा सर्व गोष्टी पारखणे आणि त्यांची सुव्यवस्था लावणे हे बुद्धीचे कार्यक्षेत्र आहे आणि कदाचित त्यापेक्षा काकणभर अधिकच असे म्हणता येईल: अमुक एखादा आवेग हा उचित म्हणजे तर्कसंगत आहे की अनुचित आहे हे पाहणे; तसेच त्यातून काही अरिष्ट तर उद्भवणार नाही ना हे पाहणे किंवा ज्यामुळे आयुष्यामध्ये फारसे काही बिघडणार नाही, त्यामुळे तो आवेग चालवून देण्यायोग्य आहे किंवा नाही, हे पाहण्याचे काम बुद्धीचे आहे. हे बुद्धीचे संपूर्ण कार्यक्षेत्र आहे, हा श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.

– श्रीमाताजी [CWM 07 : 166-167]

विचारशलाका २१

संक्रमणकाळात ‘विचारा’ची आत्यंतिक आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड हा अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या दोन प्रकारच्या मनांना जन्म देतो; एक असे मन की जे जुन्या गोष्टींना, केवळ ते जुने आहे म्हणून कडवेपणाने चिकटून राहते आणि दुसरे मन अमुक एक गोष्ट केवळ नवीन आहे म्हणून त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे धावत सुटते. या दोहोंमध्ये स्वयंघोषित मध्यममार्गी माणूस (moderate man) उभा राहतो. तो म्हणतो, जुन्यामधले काहीतरी आणि नव्यामधलेही काहीतरी असे दोन्ही घेऊया. उपरोक्त दोन टोकाच्या माणसांपेक्षा हा मध्यममार्गी, नेमस्त माणूसदेखील काही कमी अविचारी नसतो. तो मध्यममार्गाला एक सूत्र आणि दैवी प्रतिमा मानून, मध्यममार्गाच्या आणाभाका घेतो आणि अशक्य असा ताळमेळ घालू पाहतो. ‘जुन्या बाटल्यांमध्ये नवीन वाईन भरता येत नाही’ असे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात तेव्हा त्यांच्या दृष्टीपुढे अशाच प्रकारचा विचार होता.

‘विचार’ केव्हाही एखादे सूत्र ठरवत नाही, आधीच अंदाज बांधत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. एखादा माणूस जर असे म्हणेल की, प्रबुद्ध (enlightened) युरोपाच्या मार्गानुसार तुमच्या सर्व सवयी, संकल्पना बदला तर विचार त्याला उत्तर देईल, ”मला आधी विचार करू दे. युरोप हा प्रबुद्ध आहे आणि भारत अडाणी आहे असे मी का गृहीत धरू? कदाचित असेही असू शकेल की, युरोपियन लोक हेच खरे अडाणी असू शकतील आणि भारतीय ज्ञानामध्ये खरेखुरे तथ्य असेल. मला शोधले पाहिजे.” आणि दुसऱ्या बाजूने जर एखादा माणूस त्याला म्हणेल, ”भारतीय बन आणि भारतीयांप्रमाणे वाग,” तर विचार म्हणेल, ”भारतीय बनण्यासाठी मला भारतीयांप्रमाणेच वागावे लागेल का, याबाबत मी साशंक आहे. कदाचित असेही असू शकेल की, भारतीयांना जे अपेक्षित नव्हते, नेमकी तशीच सध्याच्या काळात या देशातील माणसे झाली असतील. आपल्या भारतीय सभ्यतेच्या (civilization) वेगवेगळ्या कालखंडांमध्ये भारतीय कसे होते हे मला शोधलेच पाहिजे आणि त्या सभ्यतेमध्ये नित्य, शाश्वत काय आणि अनित्य, तात्पुरते काय याचा शोध मला घेतलाच पाहिजे. असेही शक्य आहे की, आपण गमावलेल्या काही खऱ्याखुऱ्या भारतीय गोष्टी युरोपयिन लोकांकडे असू शकतील.”

भारतीय असणे चांगलेच आहे, पण भारतीय असणे म्हणजे ‘ज्ञानाने’ भारतीय असणे होय, केवळ ‘पूर्वग्रहाने’ नव्हे. मानवी समाजाच्या रक्षणासाठी, तसेच व्यक्तीच्या आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या पुरुषार्थासाठी तसेच, मानवी समूहाच्या परिपूर्णतेसाठी नेमका कोणता आचार उत्तम आहे हे विचार, विवेक आणि ज्ञान यांच्या साहाय्याने ठरविणे यावरच हिंदुधर्माची उभारणी करण्यात आलेली आहे.

– श्रीअरविंद [CWSA 01 : 499-500]

विचारशलाका २०

 

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

एखाद्याला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करायची असेल आणि त्याच्या या निवडीमुळे त्याला जर शांती लाभत असेल तर त्याने खुशाल तसे करावे. शांती लाभावी म्हणून, लौकिकतेचा त्याग करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या ‘योगा’मध्ये (पूर्णयोग) सुद्धा, माझ्या कार्यक्षेत्रात भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करण्यासाठी आणि केवळ वैयक्तिक मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्यासाठी मी प्रवृत्त झालो आहे, असे मला आढळून आले.

अन्य ध्येयं जशी आध्यात्मिक आहेत, तसेच हे ध्येयदेखील ‘आध्यात्मिक’ आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा पाठपुरावा करणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला कलंक लागेल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. माझा तरी वास्तवाबद्दलचा आणि विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप याविषयीचा हा अनुभव व हा दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ समग्र सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुचरण (pursuit) करणे याला मी ‘पूर्णयोग’ म्हणतो. पण अर्थातच, एखाद्याला पूर्णतेची ही संकल्पना मान्य नसेल आणि तो ती नाकारत असेल किंवा या लौकिक जीवनाचा संपूर्णतया परित्याग करून, पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिक आवश्यकतेवर तो विश्वास ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे, पण तसे असेल तर माझा ‘योग’ (पूर्णयोग) आचरणे त्याला शक्य होणार नाही.

– श्रीअरविंद [CWSA 35 : 234]

विचारशलाका १४

असे पाहा की, जगाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये परिस्थिती नेहमीच कठीण असते. संपूर्ण जग संघर्ष व कलहाच्या स्थितीत आहे; प्रकट होऊ पाहणाऱ्या सत्य व प्रकाश यांच्या शक्ती आणि (दुसरीकडे) त्यांना विरोध करणाऱ्या अशा सर्व शक्ती की, ज्या बदलू इच्छित नाही, ज्या हटवादी झालेल्या आणि जाण्यास नकार देणाऱ्या भूतकाळातील भागाचे प्रतिनिधित्व करतात, यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. स्वाभाविकपणेच, प्रत्येक व्यक्तीला तशाच प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि तिला स्वत:ला स्वत:च्या अडचणी जाणवत असतात.

तुमच्याकरता केवळ एकच मार्ग आहे. तो म्हणजे समग्र, संपूर्ण विनाशर्त समर्पण. म्हणजे तुमच्या कृती, तुमची कर्मे, तुमच्या आशा-आकांक्षा यांचे समर्पण तर करायचेच, पण त्याचबरोबर तुमच्या भावभावनांचेसुद्धा समर्पण करायचे, म्हणजे तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात ते ते सारे केवळ ‘ईश्वरा’साठीच असले पाहिजे, असे मला म्हणायचे आहे. आणि असे केल्यामुळे, तुमच्या सभोवती असणाऱ्या मानवी प्रतिक्रियांच्या तुम्ही अतीत झाला असल्याचे तुम्हाला जाणवते – केवळ अतीत झाल्याचेच जाणवते असे नव्हे तर, ‘ईश्वरी कृपे’च्या तटबंदीमुळे त्या मानवी प्रतिक्रियांपासून तुमचे संरक्षण होत असल्याचेही तुम्हाला जाणवते.

एकदा का तुमच्यामधील इच्छा नाहीशा झाल्या, आसक्ती उरली नाही, मनुष्यमात्रांकडून – मग ते कोणीही असोत – कोणत्याही प्रकारचे बक्षीस मिळावे ही अपेक्षा तुम्ही सोडून दिलीत आणि ‘ईश्वरा’कडून मिळणारी व कधीही व्यर्थ न जाणारी बक्षिसी हीच एकमेव मिळविण्यासारखी गोष्ट आहे हे तुम्हाला समजले – एकदा का तुम्ही सर्व बाह्य व्यक्ती व वस्तू यांविषयीची आसक्ती सोडून दिलीत की मग ‘ईश्वरा’ची ‘उपस्थिती’, त्याची ‘शक्ती’, तुमच्या सोबत सदैव असणारी त्याची ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या हृदयात लगेचच जाणवू लागते.

आणि दुसरा काहीच उपाय नाही. प्रत्येकासाठी अगदी निरपवादपणे हाच एकमेव उपाय आहे. जे जे कोणी दु:ख भोगतात त्यांना एकच गोष्ट सांगितली पाहिजे की, दु:ख असणे हे ‘समर्पण’ परिपूर्ण नसल्याचे चिन्ह आहे. त्यानंतर पुढे जेव्हा कधी तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा ‘आघात’ जाणवतो तेव्हा त्यावेळी मग “छे! किती वाईट आहे हे” किंवा परिस्थिती किती कठीण आहे” असे तुम्ही म्हणत नाही. तर आता तुम्ही म्हणता, “माझेच समर्पण अजून परिपूर्ण झालेले नसेल.” आणि मग तुम्हाला ती ‘ईश्वरी कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन करते आणि तुम्ही प्रगत होऊ लागता. आणि एक दिवस तुम्ही अशा शांतीमध्ये प्रवेश करता जी कशानेही क्षुब्ध होऊ शकणार नाही. सर्व विरोधी शक्तींना, विरोधी क्रियांना, आक्रमणांना, गैरसमजुतींना, दुर्वासनांना तुम्ही अशा स्मितहास्याने उत्तर देता जे ‘ईश्वरी कृपे’वरील पूर्ण विश्वासाने येत असते आणि तोच एक बाहेर पडण्याचा मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही.

हे जग संघर्ष, दु:खभोग, अडचणी, ताणतणाव यांनी बनलेले आहे. ते अजूनही बदललेले नाही, ते बदलण्यासाठी काही काळ लागेल. पण प्रत्येकामध्ये या सगळ्यातून बाहेर पडण्याची क्षमता असते. तुम्ही जर ‘परमोच्च कृपे’च्या अस्तित्वावर विसंबून राहिलात, तर तोच केवळ एकमेव मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 15 : 398-399]

विचारशलाका १२

आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये प्रकृतीने मनुष्यजात घडवली. मनुष्यदेखील तशीच एक प्रयोगशाळा बनू शकतो. या मनुष्यरूपी प्रयोगशाळेमध्ये अतिमानव (superman) घडविण्याचे कार्य करण्याचा प्रकृतीचा संकल्प आहे. दिव्य जीवाच्या रूपाने आत्म्याला प्रकट करण्याचा व एक दिव्य प्रकृती उदयास आणण्याचा तिचा संकल्प आहे.

– श्रीअरविंद [CWSA 13 : 502]

विचारशलाका – ०२

‘योग’ हे असे एक साधन आहे की, ज्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि व्यक्त चेतनेकडून आंतरिक आणि सत्य चेतनेप्रत घेऊन जाण्यात येते आणि त्याद्वारे आंतरिक साधनेच्या माध्यमातून आपण वस्तुमात्रांमागील ‘सत्या’शी एकत्व पावण्याप्रत येऊन पोहोचतो.

योग-चेतना (Yogic Consciousness) बाह्य व्यक्त विश्वाच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करते, असे नाही तर उलट, ती त्या विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते. ती विश्वाकडे बाह्य दृष्टीने पाहत नाही किंवा त्याचा बाह्य अनुभवही घेत नाही तर ती आंतरिक सखोल, महत्तर, सत्यतर चेतनेच्या प्रकाशात बाह्य विश्वाला त्याचे योग्य ते मूल्य प्रदान करते, त्यात परिवर्तन घडविते. आणि त्याला सद्वस्तुचा ‘कायदा’ लागू करते; प्राणिमात्रांच्या ‘अज्ञानी’ कायद्याच्या जागी ईश्वरी ‘संकल्प’ आणि ‘ज्ञाना’चा नियम प्रस्थापित करते.

चेतनेमधील (Consciousness) बदल हाच योगप्रक्रियेचा समग्र अर्थ होय.

– श्रीअरविंद [CWSA 12 : 327]

आध्यात्मिकता ३७

(श्रीमाताजींकृत प्रार्थना…)

बाह्य जीवन, दररोजची प्रत्येक कृती आणि प्रत्येक घटना, ही आपल्या तास न् तास केलेल्या चिंतनासाठी आणि ध्यानासाठी अनिवार्यपणे पूरकच नसते का?

…आपले दैनंदिन जीवन ही एक प्रकारची ऐरण आहे; आणि चिंतनामधून जी प्रदीप्तता येते ती स्वीकारण्यासाठी आणि धारण करण्यासाठी दैनंदिन जीवनातील सर्व घटनांचे शुद्धीकरण व्हावे, त्या परिशुद्ध व्हाव्यात, त्या अधिक लवचीक आणि परिपक्व व्हाव्यात, म्हणून या घटना त्या ऐरणीवरून सरकणेच आवश्यक असते. समग्र विकसनासाठी बाह्य कृती अनावश्यक ठरत नाही तोपर्यंत हे सर्व घटक एकापाठोपाठ एक मुशीमधून गेलेच पाहिजेत. नंतर, पात्र घडविणे आणि ते प्रकाशित करणे या दुहेरी कार्यासाठी चेतनेची इतर केंद्रसुद्धा जागृत व्हावीत म्हणून, हे ईश्वरा, या कृती तुला आविष्कृत करण्याची माध्यमं बनतात. आणि त्यामुळेच आत्मप्रौढी आणि आत्मसंतुष्टता या गोष्टी सर्व अडथळ्यांमधील सर्वाधिक वाईट असा अडथळा असतात.

अगणित घटकांपैकी काही घटकांचे तरी शुद्धीकरण करण्यासाठी आणि तिंबून, मळून त्यांना घडणयोग्य बनविण्यासाठी, त्यांना निर्व्यक्तिक बनविण्यासाठी, त्यांना ‘स्व’चे विस्मरण आणि परित्याग करण्यास शिकविण्यासाठी आणि भक्ती, उदारता आणि हळूवारपणा शिकविण्यासाठी, आपल्याला प्रदान करण्यात आलेल्या छोट्याछोट्या सर्व संधींचा आपण अतिशय विनम्रपणे लाभ घेतला पाहिजे. आणि अस्तित्वाच्या या सर्व पद्धती जेव्हा त्यांच्या अंगवळणी पडतील, तेव्हा ते सारे घटक या ‘निदिध्यासा’मध्ये सहभागी होण्यासाठी, परम ‘एकाग्रते’मध्ये तुझ्याबरोबर एकात्म पावण्यासाठी सिद्ध झालेले असतील.

आणि म्हणूनच मला असे वाटते की, आकस्मिकपणे झालेला बदल हा सर्वांगीण नसतो आणि म्हणूनच हे कार्य अगदी उत्तमात उत्तम साधकांसाठीसुद्धा दीर्घकालीन आणि धीम्या गतीने होणेच आवश्यक असते. आकस्मिक बदल हे व्यक्तीचा दृष्टिकोन बदलवून टाकतात, ते बदल व्यक्तीला निश्चितपणे सुयोग्य मार्गावर आणतात; परंतु खऱ्या अर्थाने उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सर्व प्रकारच्या आणि सर्व घटकांच्या अगणित अनुभवांची आवश्यकता असते, त्यापासून कोणाचीच सुटका होऊ शकत नाही.

…माझ्यामध्ये आणि प्रत्येक वस्तुमात्रामध्ये तेजोमयतेने प्रभासित होणाऱ्या हे ‘परम प्रभू’, तुझा ‘दिव्य प्रकाश’ आविष्कृत होऊ दे आणि तुझ्या ‘दिव्य शांती’चे साम्राज्य सर्वांवर पसरू दे. – श्रीमाताजी [CWM 01 : 06-07]

आध्यात्मिकता ३२

‘आध्यात्मिकता’ या मालिकेमध्ये आजपर्यंत आपण श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आधारे, आध्यात्मिकता म्हणजे काय नाही आणि खरी आध्यात्मिकता म्हणजे काय हे समजावून घेतले. आध्यात्मिकतेविषयीची पारंपरिक समजूत आणि त्याची ‘पूर्णयोगा’वर आधारित संकल्पना यामधील फरकही समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या आध्यात्मिक पुरूषाचा (spiritual being) शोध घेणे हे मनुष्याचे केवळ कर्तव्यकर्म आहे असे नव्हे तर, ते त्याचे जीवितकार्य आहे, हेही आपण समजावून घेतले. खऱ्या आध्यात्मिकतेची कसोटी म्हणजे चेतनेचे प्रतिक्रमण (Reversal of consciousness) हेही आपण जाणून घेतले.

आता प्रश्न निर्माण होतो की, आध्यात्मिक पुरुषाचा शोध कसा घ्यायचा? त्यासाठी ध्यानधारणा करायची? की अन्य काही करायचे? का मन एकाग्र करायचे? दैनंदिन व्यावहारिक जीवनाच्या धकाधकीमध्ये, त्यातील भेडसावणाऱ्या प्रश्नांमुळे सामान्य माणसाच्या जिवाला स्वस्थता नसते, मग अशा धकाधकीच्या जीवनात अध्यात्म करायचे तरी कसे? दैनंदिन व्यवहार न सोडता, भौतिक जीवनापासून पलायन न करता, आहे त्याच जीवनाला ‘दिव्यत्वा’चे वळण कसे द्यायचे? त्यासाठी नेमके काय करायला हवे ? यासारखे अनेकानेक प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण झाले असतील. हे व अशाच प्रकारचे प्रश्न त्यावेळच्या साधकांच्या मनातही निर्माण झाले होते; त्यांनी ते प्रश्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना विचारले होते, आणि त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. त्यातील काही निवडक प्रश्नोत्तरे, काही पत्रे, काही लिखाण, संवाद यांच्या माध्यमातून आपण उद्यापासून त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

‘पूर्णयोगा’च्या साधनेचे – अंतरंग साधना आणि बहिरंग साधना असे दोन प्रकार आहेत. चेतना अंतर्मुख करून चैत्य पुरुषाचा (Psychic being) शोध आणि चेतना ऊर्ध्वमुख करून आत्मतत्त्वाचा (Soul) शोध घेणे; चेतना विशाल करत करत, ती विश्वात्मक करत नेणे या सर्व गोष्टींचा समावेश अंतरंग साधनेमध्ये होतो; तर अंतरंग साधनेमधून प्राप्त झालेल्या शांती, स्थिरता, प्रकाश, प्रेम, समता यांसारख्या गोष्टी दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्यक्षात आचरणात आणणे यांचा समावेश बहिरंग साधनेमध्ये होतो. या दोन्ही साधनापद्धतींसंबंधी काही मार्गदर्शन येथे मिळेल आणि अध्यात्म मार्गावर पहिलीवहिली पावले टाकण्यासाठी ही शिदोरी आपणा सर्वांना उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

आध्यात्मिकता ३१

(भाग ०३)

व्यक्ती जोपर्यंत मानसिक चेतनेमध्ये जीवन जगत असते, – भलेही ते जीवन कितीही उच्च स्तरावरील असले तरी, जेव्हा ती बाहेरून आध्यात्मिक जीवनाकडे पाहते तेव्हा व्यक्ती स्वतःच्या मानसिक क्षमतांनुसार त्या जीवनाचे परीक्षण करते, शोधार्थ धडपडायचे, चुका करायच्या, त्या दुरूस्त करायच्या, थोडेसे प्रगत व्हायचे आणि पुन्हा शोधासाठी धडपडायचे या सवयीनुसार ती त्या जीवनाचे परीक्षण करू पाहते. ती व्यक्ती असा विचार करते की आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तींनाही अशाच अक्षमतांचा त्रास सहन करावा लागतो पण असा विचार करणे ही एक घोडचूक आहे, असे म्हणावे लागेल.

जेव्हा व्यक्तीमध्ये चेतनेचे प्रतिक्रमण घडून येते तेव्हा या साऱ्या गोष्टी संपुष्टात आलेल्या असतात. आता व्यक्ती शोधासाठी धडपडत नाही, तिला गोष्टी ‘दिसतात’. आता व्यक्ती तर्क करत नाही, अनुमाने काढत नाही, तर तिला गोष्टी ‘ज्ञात’ असतात. आता व्यक्ती चाचपडत बसत नाही, तर ती ‘ध्येयाच्या दिशेने सरळ चालत’ जाते. आणि व्यक्ती जेव्हा अशी पुढे जाते अगदी थोडीशी जरी पुढे गेली तरी व्यक्तीला परम सत्य उमगते, जाणवते, व्यक्ती ते ‘परम सत्य’ जगते; ते परम सत्य हे असते की, एकमेव ‘परमोच्च सत्य’च कार्यरत असते, ‘परम ईश्वर’च मानवी जिवांच्या माध्यमातून संकल्प करतो, तोच जाणतो आणि तोच कार्य करतो. अशावेळी मग त्रुटी राहण्याची शक्यताच कशी असू शकेल? तो जे करतो, ते तो करतो कारण तसे करण्याची ‘त्याची’ इच्छा असते.

आपल्या सदोष दृष्टीला या कृती कदाचित अनाकलनीय असतात पण त्यांना काही अर्थ असतो, त्यांचे काही उद्दिष्ट असते आणि त्या ज्या दिशेने जाणे आवश्यक असते तेथेच त्या नेल्या जातात. व्यक्तीला जर इतरांना आणि या जगाला मदत करण्याची खरी प्रामाणिक इच्छा असेल तर, व्यक्ती त्यातल्या त्यात एक गोष्ट अशी करू शकते की, इतरांनी जसे असावे असे व्यक्तीला वाटते तसे तिने स्वतः बनले पाहिजे – केवळ उदाहरण म्हणून नाही, परंतु, असे केल्याने, व्यक्ती तेजस्वी शक्तीचे एक केंद्र बनू शकते, आणि तिच्या तशा रितीने अस्तित्वात असण्यामुळेच, उर्वरित जगाला ती रूपांतर घडविण्यासाठी भाग पाडू शकते.

( ….समाप्त)

– श्रीमाताजी [CWM 09 : 415-416]