Tag Archive for: तत्त्वज्ञान

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२२)

(श्रीअरविंदाश्रमामध्ये ज्याप्रकारचे लघुउद्योग, उद्योगव्यवसाय चालविले जातात ते पाहून, एका व्यक्तीने श्रीअरविंदांना कदाचित संन्यासमार्गाची महती सांगण्याचा प्रयत्न केला असावा असे दिसते. तेव्हा संन्यासमार्ग, दैनंदिन जीवन – व्यवहार, सर्व कर्म, गीतोक्त मार्ग, आध्यात्मिक प्रगती या साऱ्यांविषयीच श्री अरविंदांनी काही टिप्पणी केली आहे. त्यामधील हा अंशभाग…)

..एक संन्यासवादी ध्येयसुद्धा असते की जे काही जणांसाठी आवश्यक असते आणि आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्यालाही स्थान असते. मी स्वतः असे म्हणेन की, एखाद्या व्यक्तीला जर तपस्व्याप्रमाणे जीवन जगता आले नाही किंवा एखाद्या विरक्त व्यक्तीप्रमाणे अगदी किमान गरजांमध्ये जीवन जगता आले नाही तर ती व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण होऊ शकणार नाही. व्यक्तीच्या प्रकृतीमधून हावरटपणा किंवा इतर कोणताही हव्यास नाहीसा होणेच जितके आवश्यक असते; तितक्याच संपत्तीचा लोभ आणि नफेखोरी या गोष्टीदेखील तिच्या प्रकृतीमधून नाहीशा होणे आवश्यक असते, हे उघड आहे. आणि या गोष्टींबद्दलची सर्व प्रकारची आसक्ती आणि अन्य कोणताही हव्यास या गोष्टी व्यक्तीने स्वतःच्या चेतनेमधून काढून टाकणेच आवश्यक असते. परंतु आध्यात्मिक पूर्णतेसाठी संन्यासमार्ग हा जगण्याचा अगदी अनिवार्य मार्ग आहे किंवा संन्यासी वृत्तीने जीवन जगणे म्हणजेच आध्यात्मिक पूर्णता असे मात्र मी मानत नाही.

आणखी एक मार्गदेखील आहे. आणि तो मार्ग म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या कर्मामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये गुंतलेली असतानाही, किंवा ‘ईश्वरा’ला त्या व्यक्तीकडून ज्या सर्व प्रकारच्या कार्याची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कार्यामध्ये निमग्न असतानासुद्धा ती अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रति समर्पित होऊ शकते, आध्यात्मिक आत्मदान करू शकते आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्व मिळवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 770-771)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२१)

…तुम्हाला योगाची हाक आलेली असू शकते आणि तुम्ही योगासाठी पात्रदेखील असू शकता, परंतु योगाचे विविध मार्ग आहेत आणि प्रत्येक मार्गाचे ध्येय व उद्दिष्ट भिन्न भिन्न असते. इच्छा-वासनांवर विजय मिळविणे आणि जीवनातील सामान्य नातेसंबंध बाजूला सारणे तसेच अनिश्चिततेकडून चिरस्थायी निश्चिततेप्रत वाटचाल करण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी सर्व योगांमध्ये समानच असतात. व्यक्ती स्वप्न व निद्रा, तहान व भूक इत्यादी गोष्टींवर विजय मिळविण्याचाही प्रयत्न करू शकते. परंतु जीवनाविषयी किंवा जगाबद्दल कोणतेही कर्तव्य न बाळगणे किंवा संवेदना मारून टाकणे किंवा त्यांच्या कृतींना पूर्णपणे प्रतिबंध करणे या गोष्टी श्रीअरविंदांच्या योगाचा (पूर्णयोगाचा) भाग असू शकत नाहीत.

दिव्य ‘सत्या’चा ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘परमानंद’ आणि त्याची गतिशील निश्चितता खाली उतरवून, त्यायोगे जीवन रूपांतरित करणे हे श्रीअरविंदांच्या ‘योगा’चे उद्दिष्ट आहे. हा ऐहिकाचा त्याग करणारा संन्यासवादी ‘योग’ नसून, हा दिव्य ‘जीवना’चा ‘योग’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 541-542)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२०)

जीवनाचा सिद्धान्त म्हणून जो सिद्धान्त मी स्थापित करू इच्छितो, तो आध्यात्मिक आहे. नैतिकतेचा प्रश्न हा मानवी मनाचा व प्राणाचा प्रश्न आहे. आणि नैतिकता ही चेतनेच्या कनिष्ठ स्तराशी संबंधित असते. त्यामुळे नैतिक पायावर आध्यात्मिक जीवनाची उभारणी करता येत नाही. ही उभारणी आध्यात्मिक अधिष्ठानावरच करणे आवश्यक असते. आध्यात्मिक मनुष्य हा अनैतिक असला पाहिजे असा याचा अर्थ नाही, मात्र नैतिक नियमापेक्षा आचरणाचे अन्य कोणते नियमच नसतात असेही नाही. आध्यात्मिक चेतनेच्या कृतीचे नियम नैतिकतेहून कनिष्ठ स्तरावरील नसतात; तर ते अधिक उच्च स्तरावरील असतात. ते नियम ‘ईश्वराशी असलेल्या ऐक्यावर आधारित असतात, त्यांचा अधिवास ‘दिव्य चेतने’मध्ये असतो आणि त्यांची कृती ही ‘ईश्वरी इच्छे’च्या आज्ञापालनावर आधारित असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 422-423)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१९)

‘अध्यात्म-जीवन’, ‘धर्म-जीवन’ आणि ज्याचा नैतिकता हा एक अंशभाग असतो ते ‘सामान्य मानवी जीवन’ या तीन भिन्नभिन्न गोष्टी आहेत आणि आपल्याला यांपैकी नक्की कोणते जीवन हवे आहे हे व्यक्तीला माहीत असलेच पाहिजे, आणि तिने वरील तीन गोष्टींमध्ये गल्लत करता कामा नये.

सामान्य मानवी जीवन हे सर्वसामान्य मानवी चेतनेचे असे जीवन असते की जे, स्वत:च्या खऱ्या ‘जीवात्म्या’पासून तसेच ‘ईश्वरा’पासून विभक्त झालेले असते. आणि या जीवनाचे संचालन मन, प्राण, शरीर यांच्या सामान्य सवयींद्वारे, म्हणजेच अज्ञानाच्या कायद्यांद्वारे केले जात असते.

धार्मिक जीवन हीदेखील त्याच अज्ञानी मानवी चेतनेची एक अशी वाटचाल असते की जी, या पृथ्वीकडे पाठ फिरवून किंवा तसा प्रयत्न करून, ‘ईश्वरा’कडे वळू पाहत असते. या पृथ्वीचेतनेच्या बंधनातून मुक्त झाल्याने, त्या पलीकडचे सौंदर्यमय असे काही गवसले आहे असा दावा जो पंथ वा संप्रदाय करीत असतो, अशा एखाद्या पंथ वा संप्रदायाच्या सिद्धान्ताच्या किंवा नियमांच्या आधारे धार्मिक जीवनाची वाटचाल चालू असते, पण तरीही ती ज्ञानविरहितच असते. धार्मिक जीवन हा आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचा पहिलावहिला प्रयत्न असू शकतो, पण बहुधा तो कर्मकांड, सणसमारंभ, विधीविधाने, काही ठरीव संकल्पना आणि रूपे यांच्या चक्रामध्येच गोलगोल फिरत राहतो.

या उलट, आध्यात्मिक जीवन चेतनेच्या परिवर्तनाद्वारे थेटपणे वाटचाल करत असते. स्वत:च्या खऱ्या जीवात्म्यापासून आणि ‘ईश्वरा’पासून विभक्त झालेल्या, अज्ञानी अशा सामान्य चेतनेकडून एका महान चेतनेकडे ही वाटचाल होत असते. या महान चेतनेमध्ये व्यक्तीला स्वत:चे खरे अस्तित्व सापडते आणि व्यक्ती प्रथमतः ‘ईश्वरा’च्या थेट व चैतन्यमय संपर्कात येते आणि नंतर ती त्या ‘ईश्वरा’बरोबर एकत्व पावते. आध्यात्मिक साधकाच्या दृष्टीने हे चेतनेचे परिवर्तन हीच एकमेव गोष्ट असते की जी मिळविण्यासाठी तो धडपडत असतो, अन्य कोणत्याच गोष्टीची त्याला मातब्बरी वाटत नाही.

नैतिकता हा सामान्य जीवनाचा एक भाग असतो. विशिष्ट मानसिक नियमांद्वारे व्यक्तीच्या बाह्य जीवनाचे नियमन करण्याचा हा एक प्रयास असतो, प्रयत्न असतो किंवा मानसिक नियमांद्वारे विशिष्ट मानसिक आदर्शानुसार चारित्र्य घडविण्याचा तो एक प्रयास असतो. आध्यात्मिक जीवन मनाच्या पलीकडे जाते; ते सखोल अशा ‘आत्म्या’च्या चेतनेमध्ये प्रवेश करते आणि ‘आत्म्या’च्या सत्यामधून कृती करते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 419-420)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१८)

मनुष्याला ज्या आदर्शांचे अनुसरण करणे शक्य आहे असे दोन आंतरिक आदर्श आहेत. पहिला आहे सामान्य मानवी जीवनाचा सर्वोच्च आदर्श आणि दुसरा आहे ‘योगमार्गा’चा दिव्य आदर्श.

..आपल्या समग्र अस्तित्वावर सुस्पष्ट, सशक्त व तर्कशुद्ध मनाचे आणि योग्य व तर्कशुद्ध इच्छाशक्तीचे नियंत्रण प्रस्थापित करणे; आपल्या भावनिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वावर प्रभुत्व संपादन करणे; आपल्या समग्र व्यक्तित्वामध्ये सुसंवाद निर्माण करणे आणि आपल्यामध्ये असलेल्या क्षमता, मग त्या कोणत्याही असोत, त्या विकसित करणे आणि जीवनामध्ये त्यांची परिपूर्ती करणे, हा मानवी जीवनाचा आदर्श आहे. विशुद्ध आणि ‘सात्त्विक बुद्धी’चे राज्य प्रस्थापित करणे, स्वतःच्या ‘स्वधर्मा’ची परिपूर्ती करत, ‘धर्मा’चे पालन करणे आणि स्वतःच्या क्षमतांनुसार सुयोग्य असे कर्म करणे आणि ‘बुद्धी’ व ‘धर्मा’च्या नियंत्रणाखाली ‘अर्थ’प्राप्ती आणि ‘काम’ पूर्ती करणे, हा हिंदू विचारप्रणालीनुसार, मानवी जीवनाचा आदर्श आहे.

तर दुसऱ्या बाजूला, स्वतःच्या सर्वोच्च ‘जीवात्म्या’चा किंवा ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेणे आणि आपले समग्र अस्तित्व त्या सर्वोच्च जीवात्म्याच्या सत्याशी किंवा दिव्य प्रकृतीच्या कायद्याशी सुसंवादी करणे; स्वतःमधील लहान-मोठ्या दिव्य क्षमतांचा शोध घेणे आणि जीवनामध्ये त्या क्षमतांची सर्वोच्च असलेल्या जीवात्म्याप्रति ‘यज्ञ’ म्हणून किंवा दिव्य ‘शक्ती’चे खरेखुरे साधन म्हणून परिपूर्ती करणे हे ‘दिव्य जीवना’चे उद्दिष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 303-304)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१६)

चेतनेच्या दोन अवस्था असतात; त्यांपैकी कोणत्याही एका अवस्थेमध्ये व्यक्ती जीवन जगू शकते. एक अवस्था असते ती म्हणजे जीवनलीलेच्या वर राहून तिला नियंत्रित करणारी ‘उच्चतर चेतना’. तिला ‘जीवात्मा’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ अशा विविध नावांनी संबोधण्यात येते. दुसरी अवस्था असते ती म्हणजे, माणसं ज्या चेतनेमध्ये जगत असतात ती ‘सामान्य चेतना.’ ही चेतना काहीशी वरवरची असते आणि ती जीवनलीलेसाठी ‘आत्म्या’ चे एक साधन म्हणून उपयोगात आणली जाते.

सामान्य चेतनेमध्ये राहून कृती करणारी, जीवन जगणारी माणसं मनाच्या सामान्य आंदोलनांनी संपूर्णपणे संचालित केली जातात आणि ती साहजिकच दुःख, सुख व काळजी, इच्छावासना आणि तत्सम सर्व गोष्टींच्या, म्हणजे ज्या गोष्टींनी हे सर्वसामान्य जीवन बनलेले असते, त्या गोष्टींच्या आधीन असतात. त्यांना मानसिक शांती आणि आनंद मिळू शकतो, पण ती शांती आणि तो आनंद कधीच चिरस्थायी किंवा सुरक्षित असू शकत नाही.

प्रकाश, शांती, शक्ती आणि परमानंद या सर्व गोष्टी म्हणजे ‘आध्यात्मिक चेतना.’ एखादी व्यक्ती जर संपूर्णपणे अशा चेतनेमध्येच राहू शकली तर काही प्रश्नच नाही; स्वाभाविकपणे आणि सुरक्षितपणे या सर्व गोष्टी तिला लाभतात. पण एखादी व्यक्ती अंशत: जरी त्यामध्ये राहू शकली किंवा व्यक्तीने स्वतःला सातत्यपूर्वक त्या चेतनेप्रत खुले ठेवले, तर जीवनातील धक्क्यांमधून सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी पुरेशा प्रमाणात आध्यात्मिक प्रकाश, शांती, सामर्थ्य आणि आनंद या गोष्टी तिला प्राप्त होतात. या आध्यात्मिक चेतनेला खुले झाल्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला काय प्राप्त होणार आहे हे ती व्यक्ती कशाचा शोध घेत आहे, यावर अवलंबून असते; व्यक्ती जर शांतीच्या शोधात असेल तर तिला शांती लाभते; व्यक्तीला जर प्रकाश वा ज्ञान हवे असेल तर ती महान प्रकाशामध्ये जीवन जगू लागते आणि सामान्य माणसाचे मन मिळवू शकेल त्यापेक्षा कितीतरी अधिक सखोल व अधिक सत्य असे ज्ञान तिला प्राप्त होते. व्यक्ती जर शक्ती वा सामर्थ्य मिळवू इच्छित असेल तर व्यक्तीला आंतरिक जीवनासाठी आध्यात्मिक सामर्थ्य किंवा बाह्य कार्य व कृती यांचे नियमन करणारी ‘योगिक’ शक्ती प्राप्त होते; अशा व्यक्तीला जर आनंद हवा असेल तर, सामान्य मानवी जीवन देऊ शकते अशा हर्ष व आनंदापेक्षा कितीतरी अधिक महान अशा परमानंदामध्ये ती व्यक्ती प्रविष्ट होते.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 440-441)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१३)

उच्चतर चेतनेमध्ये उन्नत होणे आणि केवळ सामान्य प्रेरणांनिशी नव्हे तर, त्या उच्चतर चेतनेमध्ये राहून जीवन जगणे हे, येथे (श्रीअरविंद आश्रमामध्ये) आचरल्या जाणाऱ्या योगसाधनेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये चेतनेच्या परिवर्तनाप्रमाणेच जीवनाचे परिवर्तनही अपेक्षित आहे.

सामान्य जीवनापासून संबंध तोडता येतील अशी परिस्थिती सर्वांनाच उपलब्ध असते असे नाही; आणि म्हणून अनुभवाचे एक क्षेत्र आणि साधनेतील प्राथमिक टप्प्यांवर द्यायचे स्वयं-प्रशिक्षण या भूमिकेतून ती माणसं सामान्य जीवन स्वीकारतात. पण त्यांनी सांसारिक जीवनाकडे ‘अनुभवाचे क्षेत्र’ म्हणून पाहण्याची, तसेच सहसा त्याच्याबरोबरीने ज्या ज्या गोष्टी येतात त्या साऱ्या सामान्य कल्पना, आसक्ती, सामान्य इच्छा यांपासून मुक्त होण्याची काळजी घेतली पाहिजे; अन्यथा असे जीवन म्हणजे एक लोढणे बनते, साधनेमधील तो अडथळा ठरतो. परिस्थितीमुळे व्यक्तीला जर तसे जीवन जगण्यास भाग पाडले नसेल तर, तुम्ही तुमचे सामान्य जीवन आहे तसेच चालू ठेवण्याची कोणतीच आवश्यकता नाही.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 422)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१२)

तुम्ही तुमचे जीवन इतर कोणत्याही गोष्टीसाठी नव्हे तर, ‘दिव्य-सत्य’शोधनाच्या अभीप्सेसाठी आणि त्या ‘सत्या’चे मूर्त स्वरूप बनण्याच्या अभीप्सेसाठी पूर्णतया निष्ठापूर्वक अर्पित करावे, ही या योगाची (पूर्णयोगाची) मागणी आहे. तुमचे जीवन (एकीकडे) ‘ईश्वरा’मध्ये आणि (दुसरीकडे) ज्या गोष्टीचा ‘सत्या’च्या शोधनाशी काहीही संबंध नाही अशा कोणत्यातरी बाह्य ध्येयामध्ये आणि कार्यामध्ये विभागणे या गोष्टीला येथे मान्यता नाही. अशा प्रकारे केलेल्या अगदी छोट्याशा कृतीमुळेदेखील या योगामध्ये यश मिळणे अशक्य होईल.

तुम्ही तुमच्या स्वतःच्या अंतरंगामध्येच प्रवेश केला पाहिजे आणि आध्यात्मिक जीवनाला तुम्ही पूर्णपणे निष्ठापूर्वक वाहून घेतले पाहिजे. या योगामध्ये यश मिळावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर – मानसिक अग्रक्रमांबाबत असलेला तुमचा हट्टाग्रह तुमच्यामधून निघून गेला पाहिजे; प्राणमय आवडीनिवडी, आसक्ती यांबाबतचा आग्रह बाजूला सारलाच पाहिजे; कुटुंब, मित्रपरिवार, देश यांच्याबद्दल असणारी अहंभावात्मक आसक्ती नाहीशी झालीच पाहिजे. बाहेर पडणारी ऊर्जा असेल किंवा जी कोणती कृती असेल, या सर्व गोष्टी, एकदा का तुम्हाला सत्य गवसले की त्या गवसलेल्या ‘सत्या’मधूनच उगम पावल्या पाहिजेत. त्या गोष्टी कोणत्यातरी कनिष्ठ मानसिक किंवा प्राणिक प्रेरणांमधून उत्पन्न झालेल्या असता कामा नयेत; त्या कोणत्याही वैयक्तिक आवडीनिवडीतून किंवा अहंभावात्मक अग्रक्रमातून नव्हे तर, ‘ईश्वराच्या इच्छे’मधून उगम पावल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 15)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (११)

(आश्रमात राहणाऱ्या एका साधकामधील कनिष्ठ प्राणिक प्रकृती ही ईश्वरी शक्तीच्या प्रभावाला विरोध करत आहे. कधीकधी ईश्वरी-इच्छेचे रूप घेऊन स्वत:च्या प्राणिक इच्छा-वासनांची पूर्ती करू पाहत आहे. आपली घुसमट होत आहे, आपण अडकून पडलो आहोत असे त्या साधकाला वाटत आहे. तेव्हा श्रीअरविंद त्याला त्यामधून बाहेर पडण्याचा उपाय सांगतात, आणि नंतर त्याला पूर्णयोगाचे उद्दिष्ट काय आणि आपण आश्रमात कशासाठी आहोत, हे स्पष्ट करत आहेत.)

येथे (श्रीअरविंद आश्रमात) जर कोणत्या एकमेव कृतीला स्थान असेल ती कृती म्हणजे ते अतिमानस, ते दिव्य ‘सत्य’ या पृथ्वीतलावर उतरवणे ही होय. ते दिव्य ‘सत्य’ केवळ मनामध्ये आणि प्राणामध्येच नाही तर, शरीरामध्ये आणि अगदी ‘जडभौतिका’मध्ये देखील उतरवायचे आहे. अहंच्या फैलावण्यावरील सर्व ‘मर्यादा’ काढून टाकणे किंवा त्याला मुक्त वाव देणे आणि मानवी मनाच्या संकल्पनांच्या परिपूर्तीसाठी किंवा अहं-केंद्रित प्राण-शक्तीच्या इच्छा-वासनांच्या पूर्तीसाठी अमर्याद वाव देणे हे आपले उद्दिष्ट नाही. आपण कोणीच येथे ‘आपल्याला जे वाटते ते करण्यासाठी’ आलेलो नाही, किंवा आपल्याला जे करावेसे वाटते ते ज्या जगामध्ये करता येईल असे जग निर्माण करण्यासाठीसुद्धा आपण येथे आलेलो नाही. तर ‘ईश्वराच्या इच्छे’नुसार वागण्यासाठी आपण इथे आलो आहोत. तसेच ज्या जगामध्ये, ‘ईश्वरी इच्छा’ ही तिचे सत्य – मानवी अज्ञानाने विरूप न होता किंवा प्राणिक इच्छेमुळे विकृत न होता, किंवा चुकीच्या पद्धतीने त्याचे आकलन न होता – आविष्कृत करू शकेल अशा एका जगाची निर्मिती करण्यासाठी आपण इथे आहोत.

अतिमानस योगाच्या साधकाने जे कार्य करायचे आहे ते काही त्याचे स्वतःचे कार्य नव्हे, की जिथे तो त्याच्या स्वतःच्या अटी लादू शकेल; तर हे ‘ईश्वरी’ कार्य आहे आणि ते कार्य ‘ईश्वरा’ने नेमून दिलेल्या अटींनुसारच केले गेले पाहिजे. आपला योग हा आपल्यासाठी नाही तर तो ‘ईश्वरा’साठी आहे. आपल्याला आपले स्वतःचे वैयक्तिक आविष्करण करण्यासाठी धडपडायचे नाही; किंवा सर्व मर्यादांमधून, सर्व बंधनांमधून मुक्त झालेल्या वैयक्तिक अहंच्या आविष्करणासाठी देखील धडपडायचे नाही, तर आपले सारे प्रयत्न हे ‘ईश्वरा’च्या आविष्करणासाठी असले पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 161-162)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१०)

केवळ ‘अतिमानव’ बनण्याच्या कल्पनेने या ‘योगा’कडे (पूर्णयोगाकडे) वळणे ही प्राणिक अहंकाराची एक कृती ठरेल आणि ती या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ करेल. जे कोणी त्यांच्या सर्व जीवनव्यवहारामध्ये असे उद्दिष्ट ठेवतात त्यांना निरपवादपणे आध्यात्मिक आणि अन्य प्रकारची दुःखं सहन करावी लागतात. प्रथम विभक्तकारी अहंकार (separative ego) दिव्य चेतनेमध्ये विलीन करून, त्याद्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि दुसरे म्हणजे, मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करण्यासाठी अतिमानसिक चेतना या पृथ्वीवर अवतरित करणे हे या ‘योगा’चे ध्येय आहे. (अहंकार दिव्य चेतनेमध्ये विलीन करत असताना, त्या अनुषंगाने, व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या जीवात्म्याचा (individual self) शोध लागतो; हा जीवात्मा म्हणजे मर्यादित, व्यर्थ आणि स्वार्थी मानवी अहंकार नसतो तर तो ‘ईश्वरा’चा अंश असतो.) बाकी सर्व गोष्टी म्हणजे या दोन ध्येयांचे परिणाम असू शकतात, परंतु त्या या ‘योगा’चे प्राथमिक उद्दिष्ट असू शकत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)