Tag Archive for: चैत्य पुरुष

विचार शलाका – १२

प्रश्न : आपल्या अस्तित्वामध्ये एकता आणि एकसंधता प्रस्थापित करण्याचा मार्ग कोणता?

श्रीमाताजी : आपला संकल्प दृढ ठेवा. तुमच्यातील अडेलतट्टू घटकांना, आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे वागवतात त्याप्रमाणे वागणूक द्या. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने कार्य करा. त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्या.

तुमच्या चेतनेच्या आत खोलवर चैत्य पुरुष असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये निवास करणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. हे असे केंद्र असते की, ज्याच्या भोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व घटकांचे, तुमच्या अस्तित्वामधील सगळ्या परस्परविरोधी गतीविधींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा आत्मसात झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित! एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरो’न्मुख झाला असाल आणि म्हणाला असाल की, ‘मला तुझे होऊन राहायचे आहे.’ आणि त्याने ‘हो” असे म्हटले असेल, तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला त्यापासून दूर ठेवू शकत नाही. जेव्हा जिवात्मा (the central being) स्वत:चे समर्पण करतो, तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते. बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य व्यक्तींमध्ये हे कवच इतके कठीण आणि घट्ट असते की, त्यामुळे अशा व्यक्ती त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’बाबत यत्किंचितही जागरुक नसतात. एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा म्हणाला असेल, ”मी इथे आहे आणि मी तुझाच आहे;” तर एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते कवच हळूहळू पातळ पातळ होत जाते. जोपर्यंत हे दोन्ही भाग पूर्णपणे जोडले जाऊन, आंतरिक अस्तित्व आणि बाह्य अस्तित्व एकच होऊन जात नाहीत तोवर ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 07)

आपल्यामधील अमर्त्य तत्त्व

बहुसंख्य लोकं जेव्हा ‘मी’ असे म्हणत असतात तेव्हा तो त्यांचा एक अंश असतो, त्यांच्या भावनांचा, त्यांच्या शरीराचा, त्यांच्या विचारांचा एक अंश असतो, तो त्रयस्थपणे बोलत असतो; आणि हा बोलणारा सतत बदलत असतो. त्यामुळे त्यांचे ‘मी’ अगणित असतात किंवा त्यांचा ‘मी’ नेहमीच बदलत असतो. असे असेल तर मग, नित्य असणारे असे त्यांच्यामध्ये काय असते ?… अर्थातच, चैत्य पुरुष. कारण एखादी गोष्ट स्थायी असण्यासाठी ती गोष्ट प्रथम अमर्त्य असावी लागते. अन्यथा ती स्थायी होऊ शकत नाही. तसेच ज्या अनुभवांमधून ती गोष्ट जाते, त्या अनुभवांपासून ती गोष्ट स्वतंत्र अशी असावी लागते : ते अनुभव म्हणजेच ती गोष्ट असे असून चालत नाही. म्हणजेच, नदीच्या पात्रामुळे नदी निर्माण होत नाही, तर ती म्हणजे केवळ एक परिस्थिती असते. हीच तुलना जर आपण किंचितशी पुढे नेली तर (खरे तर, तुलना व्यर्थ असतात, तुलनेमध्ये लोक त्यांना पाहिजे त्या गोष्टी शोधत असतात.) असे म्हणता येईल की, नदी हे जीवनाचे एक चांगले प्रतीक आहे, म्हणजे असे की या नदीमध्ये स्थायी असे काय असते, तर ते असते ‘पाणी’. तो एकच पाण्याचा थेंब नित्य नसतो, पण पाणी मात्र नित्य असते – पाण्याशिवाय नदी असूच शकणार नाही. आणि त्याचप्रमाणे मनुष्यामध्ये जर काही स्थायी असेल तर ती असते ‘चेतना’. मनुष्यामध्ये चेतना असते आणि त्यामुळे तो टिकून राहतो. रूपं टिकून राहत नाहीत, तर या साऱ्या रूपांना बांधून ठेवणारी शक्ती म्हणजे चेतना, तीच टिकून राहते. तीच या सर्व रूपांमधून जात असताना, त्या रूपांची स्मृती कायम ठेवते (स्मृती ही अगदीच बाह्यवर्ती अशी गोष्ट असते.), इतकेच नव्हे तर त्या चेतनेचे तेच स्पंदनही ती कायम ठेवते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 173)

पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे आविष्करण

मानव प्रथमतः जेव्हा निर्माण करण्यात आला तेव्हा अहम् हा एकीकरण करणारा घटक होता. या अहंभोवतीच अस्तित्वाच्या विविध अवस्थांचे वर्गीकरण करण्यात आले होते; परंतु आता जेव्हा अतिमानवतेच्या (superhumanity) जन्माची तयारी चालू आहे, तेव्हा अहंला नाहीसे व्हावेच लागेल, त्याने चैत्य पुरुषाला (Psychic Being) वाट करून देणे आवश्यक आहे ; मानवामध्ये दिव्यत्वाचे आविष्करण व्हावे म्हणून हळूहळू ईश्वराच्या मध्यस्थीने त्याची घडण व्हायला सुरुवात झाली आहे.

ईश्वराचे मनुष्यामध्ये आविष्करण होते ते चैत्य प्रभावाखालीच होते आणि त्याद्वारे अतिमानवतेच्या आगमनाची तयारी होते.

चैत्य पुरुष हा अमर्त्य असतो आणि त्याच्याद्वारेच पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे आविष्करण होऊ शकते.

तेव्हा महत्त्वाची गोष्ट अशी की, व्यक्तीने स्वतःच्या चैत्य पुरुषाचा शोध घेतला पाहिजे, त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे. आणि अहंची जागा त्या चैत्य पुरुषाला दिली पाहिजे; ज्यामुळे अहंला एकतर रूपांतरित व्हावे लागेल नाहीतर नाहीसे होणे भाग पडेल.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 434)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०४

…ज्या व्यक्ती स्वतःच्या भावनांमध्ये जीवन जगतात आणि भावनांना स्वतःच्या जीवनाचे नियंत्रण करू देतात अशा भावनाशील व्यक्तींबाबत मात्र ही (तर्कबुद्धीची) पद्धत तितकीशी उपयुक्त ठरू शकत नाही. निःसंशयपणे अशा व्यक्तींनी दुसऱ्या मार्गाचा म्हणजे आंतरिक शोधाच्या पद्धतीचा आश्रय घ्यायला हवा. सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो चैत्य चेतनेचा (Psychic Consciousness) प्रकाश असतो. त्या प्रकाशाचा शोध घ्या, त्यावर लक्ष एकाग्र करा, तो तुमच्या अंतरंगातच असतो. तुमच्या दृढ संकल्पाद्वारे, तो तुम्हाला निश्चितपणे गवसेल. ज्या क्षणी तुम्ही त्यामध्ये प्रवेश कराल, त्याच क्षणी तुमच्यामध्ये अमर्त्यतेची जाणीव जागृत होईल. तुम्ही कायमच जिवंत होतात, तुम्ही कायम जिवंत असणार आहात, हे तुम्हाला जाणवेल. तेव्हा, तुम्ही शरीरापासून पूर्णपणे स्वतंत्र होता. तुमचे जागृत अस्तित्व आता शरीरावर अवलंबून राहत नाही. तुम्ही आत्ता ज्यामधून आविष्कृत झाला आहात ते शरीर म्हणजे, अनेकानेक क्षणभंगुर आकारांपैकी, केवळ एक आकार आहे; हे तुम्हाला जाणवू लागते. आता मृत्यू हा अंत असत नाही तर, ते केवळ एक संक्रमण असते. मग सगळी भीती क्षणार्धात नाहीशी होते आणि तुम्ही जीवनामध्ये एखाद्या मुक्त मनुष्याप्रमाणे शांत खात्रीपूर्वक मार्गक्रमण करू लागता. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 83-84)

एकत्व – ०३

संकल्प दृढ ठेवा. तुमच्यातील अडेलतट्टू घटकांना, आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे वागवतात त्याप्रमाणे, वागणूक द्या. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने कार्य करा. त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगा.

तुमच्या जाणिवांच्या आत खोलवर चैत्य पुरुष असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ईश्वराचे मंदिर असते. हे असे केंद्र असते की, ज्याच्या भोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व घटकांचे, तुमच्या अस्तित्वामधील सगळ्या परस्परविरोधी हालचालींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा आत्मसात झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित ! एकदा जरी तुम्ही ईश्वरोन्मुख झाला असाल आणि म्हणाला असाल की, “मला तुझे होऊन रहावयाचे आहे. आणि त्याने ‘हो” असे म्हटले असेल, तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला त्यापासून रोखू शकत नाही. जेव्हा जीवात्मा स्वत:चे समर्पण करतो, तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते. बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य व्यक्तींमध्ये हे कवच इतके कठीण आणि जाड असते की, त्यामुळे ते त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ईश्वराबाबत यत्किंचितही जागरुक नसतात. एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा म्हणला असेल, ”मी इथे आहे आणि मी तुझाच आहे;” तर एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते कवच हळूहळू पातळ पातळ होत जाते. जोपर्यंत आंतरिक अस्तित्व आणि बाह्य अस्तित्व हे दोन्ही भाग पूर्णपणे जोडले जाऊन, एकच होऊन जात नाहीत तोवर ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 07)

चैत्य पुरुष जेव्हा देह सोडून जातो तेव्हा, त्याने अगदी मन आणि प्राणाला देखील मार्गावरील त्यांच्या त्यांच्या विश्रांतीस्थानी सोडलेले असते, अशा वेळीदेखील तो स्वत:सोबत त्याच्या अनुभवांचा गाभा बाळगतो. तो भौतिक घटना किंवा प्राणिक हालचाली, मानसिक रचना, क्षमता किंवा स्वभाव यांपैकी काहीच बाळगत नाही तर या सगळ्यांतून अगदी आवश्यक असे जे काही त्याने त्यांच्याकडून जमवलेले असते असे काहीतरी तो बाळगून असतो, त्याला ‘दिव्य घटक’ असे म्हणता येईल. (या दिव्य घटकासाठीच वरील भौतिक घटना वगैरे गोष्टी अस्तित्वात होत्या.) ही कायमस्वरूपी अशी अभिवृद्धी असते की जी, दिव्यत्वाकडे जो विकास चालू आहे त्यामध्ये साहाय्यकारी होते. आणि म्हणूनच बहुतेक वेळी गत जन्मांमधील बाह्य घटना वा परिस्थिती स्मरणात राहत नाहीत. अशी आठवण राहण्यासाठी मन, प्राण आणि अगदी सूक्ष्म शरीर यांच्या अ-भंग सातत्याच्या दिशेने त्यांचे विकसन झालेले असावे लागते; कारण जरी ते एक प्रकारच्या बीजरूपाने स्मरणात राहिले तरी ते सहसा उमलत नाहीत, विकसित होत नाहीत. निष्ठा, उमदेपणा, उच्च कोटीचे धैर्य या रूपाने, योद्ध्याच्या महानतेमध्ये अंतर्भूत असणारा दैवी घटक, सुसंवादी मानसिकता आणि कवीची उदारमनस्कता ह्यांद्वारे अभिव्यक्त होणारा दैवी घटक शिल्लक राहतो आणि व्यक्तित्वाच्या नव्या सुमेळामध्ये एक नवीनच रूप घेऊन व्यक्त होऊ शकतो किंवा त्याचे जीवन जर ईश्वराभिमुख झाले तर साक्षात्कारासाठी म्हणून त्या शक्ती वळविल्या जाऊ शकतात किंवा ईश्वरासाठी जे कार्य करावयाचे आहे त्यामध्ये त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 544)

प्रश्न : प्रत्येक जन्मामध्ये मन, प्राण आणि शरीर नवीन असल्यामुळे, गत जन्मांमधील अनुभव त्याला कसे उपयोगी पडू शकतील? का आपल्याला त्या सगळ्या अनुभवांमधून पुन्हा एकदा जावे लागते?

श्रीमाताजी : काही अगदी अपवादात्मक व्यक्ती आणि उत्क्रांतीची अतिप्रगत अवस्था वगळता – विकसित होणारा आणि जन्मोजन्मी प्रगत होत राहणारा असा चैत्य पुरुष असतो, मन वा प्राण नाही. तर घडते असे की : ह्या चैत्य पुरुषाचा, कार्यमग्नतेचा आणि विश्रांतीचा एका आड एक असा काळ असतो. जडदेहातील सक्रिय जीवनामध्ये, शारीरिक जीवन जगत असताना येणाऱ्या अनुभवांमुळे एक प्रगतिमय जीवन त्याच्या अनुभवाला येते; ते जीवन देह, प्राण आणि मन यांचे अनुभव घेत असते; नंतर, सहसा, चैत्य पुरुष त्याचे आत्मसातीकरण करण्यासाठी एक प्रकारच्या विश्रांत स्थितीमध्ये जातो – तो कार्यमग्न जीवनामध्ये असताना, जी प्रगती त्याने सिद्ध केलेली असते त्याच्या परिणामांवर तेथे कार्य केले जाते. आणि जेव्हा हे आत्मसातीकरण पूर्ण होते, पृथ्वीवर सक्रिय जीवनात असताना त्याने केलेली ती प्रगती आत जिरवली जाते तेव्हा, आजवर झालेल्या त्या प्रगतीचा परिपाक घेऊन तो नवीन देह धारण करतो आणि प्रगत अशा अवस्थेमध्ये अवतरतो. या किंवा त्या घटकाचा अनुभव पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे जीवन असावे, शरीर कसे असावे, वातावरण कसे असावे ह्या साऱ्याची तो निवड करतो. अतिप्रगत अवस्थेमध्ये चैत्य पुरुष, देह सोडण्यापूर्वीच, त्याच्या पुढील जन्मामध्ये तो कोणत्या प्रकारचे जीवन जगणार आहे हे ठरवू शकतो.

जेव्हा त्याची घडण जवळजवळ पूर्ण होते आणि तो जाणीवसंपन्न झालेला असतो तेव्हा तो नवीन देहाच्या घडणीमध्ये देखील सहभागी होतो आणि सहसा आंतरिक प्रभावाद्वारे, तो अशा प्रकारे त्या देहाचे घटक, द्रव्य निवडतो की, त्यामुळे त्या देहाला जे नवीन अनुभव घ्यावयाचे आहेत त्याच्या गरजा तो सहज स्वीकारू शकेल. पण हे खूपच प्रगत स्थितीमध्ये घडून येते. आणि नंतर, पूर्ण घडण झालेला तो जेव्हा या पृथ्वीतलावर सेवाभावी वृत्तीने परततो, समाजाला मदत करण्याच्या भावनेने येतो आणि ईश्वरी कार्यामध्ये सहभागी होतो तेव्हा, गत जन्मांमधील प्राण व मनाचे काही विशिष्ट घटक हे त्या देहाच्या निर्मितीमध्येही तो उतरवू शकतो. हे जे विशिष्ट घटक आहेत ते गेल्या अनेक जन्मांमधून चैत्य पुरुषाभोवती सुरचित होत गेलेले असतात, सगर्भ झालेले असतात आणि मग ते तसे घटक टिकून राहू शकतात आणि परिणामत: ते एकंदरच प्रगतीमध्ये सहभागी होऊ शकतात. पण हे फारच पुढच्या अवस्थेमध्ये घडून येते. जेव्हा चैत्य पुरुष हा पूर्ण विकसित आणि अत्यंत जाणीवसंपन्न होतो, जेव्हा तो ईश्वरी संकल्पाचे जागृत साधन बनतो तेव्हा, त्याच्याकडून प्राण व मन यांची अशा तऱ्हेने सुरचना केली जाते की, ज्यामुळे प्राण व मन देखील सर्वसाधारण सुमेळामध्ये सहभागी होऊ शकतात आणि टिकून राहू शकतात.

देहाचे जरी विघटन झाले तरी, विकसनाच्या उच्च स्तराकडून मानसिक आणि प्राणिक पुरुषाच्या काही भागांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची अनुमती दिली जाते. म्हणजे असे की, माणसाने एखाद्या कृतीचे जे भाग विशेषेकरून विकसित केले असतील ते – मनाचे वा प्राणाचे काही भाग – हे अगदी त्या आकारामध्ये, त्या रूपामध्ये देखील, (in their form) म्हणजे कृतीच्या ज्या आकारामध्ये ते जसे पूर्ण सुरचित झाले होते, तसेच्या तसे टिकवून ठेवले जातात. उदाहरणार्थ, ज्यांनी स्वत:च्या मेंदूचे विशिष्ट प्रकारे विकसन घडविलेले असते, अशा अतिशय बुद्धिमान लोकांमध्ये, त्यांच्या अस्तित्वाच्या मानसिक भागाची रचना ही एक सुविकसित, सुघटित मेंदू या रूपात तशीच टिकून राहू शकते, त्या मेंदूला त्याचे त्याचे असे स्वत:चे जीवन असू शकते आणि भावी जन्मापर्यंत ते अविकृत स्वरूपात म्हणजे जसे आहे तसेच, त्यात कोणताही बदल न होता टिकून राहू शकते की, ज्यामुळे त्याच्या सर्व लाभांनिशी ते त्या नवीन जन्मातही सहभागी होऊ शकते.

कलाकारांमध्ये, उदाहरणार्थ काही विशिष्ट वादकांमध्ये, ज्यांनी आपल्या हातांचा वापर विशिष्ट अशा जागरूकतेने केलेला होता, त्यांचे प्राणिक व मानसिक द्रव्य हे त्यांच्या हातांच्या रूपाने टिकून राहिले आणि ते हात पूर्णपणाने जागरूक राहिले होते. ज्यांच्याविषयी त्यांना विशेष जिव्हाळा आहे अशा जिवंत व्यक्तींच्या देहांचा ते उपयोग करून घेऊ शकतात.

अन्यथा, अगदी सामान्य लोकांमध्ये म्हणजे ज्यांच्यामध्ये चैत्य अस्तित्व हे पुरेसे विकसित आणि सुघटित झालेले नाही, त्यांच्या बाबतीतही जेव्हा ते चैत्य अस्तित्व देह सोडते तेव्हा, विशेषत: मृत्यूवेळी ती व्यक्ती शांतचित्त आणि एकाग्र असेल तर, त्या व्यक्तीचे मानसिक व प्राणिक आकार काही काळ पर्यंत टिकून राहू शकतात; पण जर का व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला, आवेगपूर्ण स्थितीमध्ये, अनेकविध आसक्तींमध्ये गुंतलेले असताना जर मृत्यू झाला तर, अस्तित्वाचे हे विविध भाग विखुरले जातात, त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या आयुष्यमानानुसार ते कमीअधिक काळ, त्या त्या संबंधित क्षेत्रांमध्ये जिवंत राहतात आणि नंतर नाहीसे होतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 268-270)

प्रश्न : जर मन, प्राण आणि शरीर हे पुन्हा जन्म घेणार नसतील आणि फक्त चैत्य पुरुषाचाच पुनर्जन्म होत असेल तर, मग आधी केलेल्या प्राणिक वा मानसिक प्रगतीचे पुढील जन्मासाठी काहीच मोल नाही का?

श्रीमाताजी : ही अंगे चैत्य पुरुषाच्या जेवढी निकट आणली असतील तेवढ्याच प्रगतीच्या प्रमाणात त्यांचा उपयोग होतो; म्हणजे, जेवढ्या प्रमाणात अस्तित्वाची ही सारी अंगे हळूहळू, क्रमाक्रमाने चैत्य पुरुषाच्या प्रभावाखाली आणली असतील तेवढ्या प्रमाणात त्यांचा उपयोग होतो कारण जे चैत्य पुरुषाच्या प्रभावाखाली असते, चैत्य पुरुषाशी जे एकात्म झालेले असते, तेवढे टिकून राहते व केवळ तेवढेच कायम राहते.

पण जर एखाद्या व्यक्तीबाबत चैत्य पुरुष हा त्याच्या चेतनेचे व जीवनाचे केंद्र झाला असेल आणि जर समग्र अस्तित्वाची जडणघडण या केंद्राभोवतीच झाली असेल तर, मग ते समग्र अस्तित्वच चैत्य पुरुषाच्या प्रभावाखाली येते, त्याच्याशी एकात्म पावते, आणि मग ते कायम राहू शकते – जर का ते कायम राहणे आवश्यक असेल तर.

खरोखर, जर चैत्य पुरुषाच्या प्रगतीनुसार आणि आरोहणाच्या त्याच्या क्षमतेनुसार जड देहदेखील समान प्रगती करू शकेल तर, त्याचे विघटन होण्याची गरजच उरणार नाही. पण इथेच तर खरी अडचण आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 358-360)

…अशीही काही माणसं असतात, जी थोडंफार काही शिकलेली असतात, ती कमी अधिक प्रमाणात गूढवादी असतात वा पुनर्जन्मावर त्यांचा बालीश विश्वास असतो. त्यांना असे वाटते की अशी एक छोटीशी व्यक्ती असते की जी, भौतिकाचे वस्त्र पांघरते, म्हणजे शरीर धारण करते आणि जेव्हा हे वस्त्र गळून पडते तेव्हा ती निघून जाते आणि नंतर परत दुसरे वस्त्र पुन्हा धारण करते… जणू एखाद्या बाहुलीचे कपड़े बदलावेत त्याप्रमाणे. काही लोकांनी तर यावर अगदी गांभीर्याने त्यांच्या गतजीवनातील गोष्टी सांगणारी पुस्तके लिहिली आहेत, ते अगदी माकड होते तेव्हापासूनच्या जीवनातील गोष्टी; हा निव्वळ बालीशपणा आहे.

कारण हजारापैकी नऊशे नव्व्याणव वेळी, केवळ त्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असणारी एक छोटीशी चैत्य रचना मृत्यूनंतर कायम राहते, बाकी सर्व गोष्टी विरघळून जातात, तुकडेतुकडे होऊन इथे तिथे विखरून जातात आणि त्यांची व्यक्तिविशिष्टता, व्यक्ती त्यांची पृथागात्मता टिकून राहत नाही.

आत्ता, या भौतिक जीवनामध्ये, भौतिक व्यक्ती जे काही करीत आहे त्यामध्ये चैत्य पुरुष कितीवेळा सहभागी होतो ?… जे कोणी योगसाधना करतात, थोडेफार अनुशासित आहेत त्या माणसांविषयी येथे मी बोलत नाही; जीवनामध्ये मध्यस्थी करू शकेल, मार्गदर्शन करू शकेल इतपत ज्यांचा चैत्यपुरुष विकसित झालेला आहे, चैत्यपुरुषाची अशी क्षमता ज्यांच्यापाशी आहे अशा एकंदर माणसांविषयी मी बोलत आहे – काहींची वर्षच्या वर्षं कोणत्याही चैत्य मध्यस्थीविना जातात.

आणि तरीसुद्धा ते तुम्हाला येऊन सांगतात की, ते अमुक एका देशामध्ये जन्मले होते, त्यांचे आईवडील कसे होते, ते कोणत्या घरामध्ये राहायचे, त्यांच्या चर्चचे छप्पर कसे होते, त्यांच्या शेजारी कसे जंगल होते, जीवनातील अशा प्रकारच्या खूप साधारण गोष्टी, घटना.. या सर्व गोष्टी निव्वळ मूर्खतापूर्ण आहेत कारण त्या पूर्णतया पुसल्या जातात, त्या तशाच टिकून राहत नाहीत;

एखाद्या व्यक्तीमध्ये जीवनातील एखाद्या विशिष्ट अशा क्षणाची आठवण टिकून राहू शकते : जेव्हा काही खास अशी परिस्थिती असते, काही महत्त्वाचे क्षण असतात, असे क्षण की जेव्हा चैत्य अस्तित्वाने आकस्मिकपणे त्यामध्ये सहभाग घेतलेला असतो; आंतरिक हाकेपोटी वा आत्यंतिक निकडीपोटी चैत्य अस्तित्वाने आकस्मिकपणे हस्तक्षेप केलेला असतो अशा वेळी त्या क्षणाची स्मृती चैत्य स्मृतीमध्ये कोरल्यासारखी होते. जेव्हा तुमच्याकडे अशी चैत्य स्मृती असते तेव्हा तुम्हाला जीवनातील त्या क्षणाची परिस्थिती, विशेषत: आंतरिक भावना, त्या क्षणी सक्रिय असलेली जाणीव आठवते. आणि मग ती काही सहसंबंधांनिशी, तुमच्या अवतीभोवती जे होते त्यानिशी, एखादा उच्चारलेला शब्द, एखादा ऐकलेला वाक्प्रयोग यानिशी तुमच्या जाणिवेसोबत राहते. पण सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ते म्हणजे, तुमचा आत्मा ज्या स्थितीमध्ये होता ती आत्म्याची स्थिती वा अवस्था; कारण ती अवस्थाच कोरल्याप्रमाणे स्पष्टपणे टिकून राहते. ह्याच चैत्य जीवनाच्या खाणाखुणा असतात, की ज्या गोष्टींचा खोल ठसा उमटलेला होता, त्याच्या घडणीमध्ये ज्यांचा सहभाग होता. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमच्या चैत्य अस्तित्वाचा सातत्याने, नेहमी, स्पष्टपणे असा शोध लागतो तेव्हा यासारख्या गोष्टीच तुम्हाला आठवतात.

या अगदी अल्पस्वल्प असू शकतात, पण त्या एखाद्याच्या आयुष्यातील चमकदार गोष्टी असू शकतात पण माणूस असे सांगू शकत नाही की, ”मी असा असा माणूस होतो, मी असे असे केले, मी या नावाने ओळखला जात होतो, मी असे करत असे, मी तसे करीत असे..”

अन्यथा, तारीख, स्थळ, देश, तो काळ हे सर्व सांगण्याइतपत परिस्थितीचे एकीकरण झाले असण्याची ती दुर्मिळ घटिका असली पाहिजे. असे घडू शकते. स्वाभाविकपणेच चैत्य जाणीवच त्यामध्ये अधिकाधिक अंशाने सहभागी होते आणि त्यातून स्मृतींचा साठा वाढत राहतो. अशा वेळी व्यक्तीला मागील जन्मांचे स्मरण होऊ शकते पण ते त्याच्या सर्व तपशीलानिशी नक्कीच नाही. व्यक्ती काही ठरावीक क्षणांविषयी असे म्हणू शकते, “हे असे असे होते” किंवा ‘मी अशी होते.” इ.

….पण येथे आवश्यकता कशाची आहे तर व्यक्तीचे अस्तित्व हे चैत्य पुरुषाशी पूर्णपणे एकात्म पावलेले असावे, व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्वच त्याच्याभोवती रचले गेले असावे, त्याचे संपूर्ण अस्तित्व – त्याच्या छोट्या छोट्या भागांसहित, सर्व घटकांसहित, व्यक्तित्वाच्या सर्व गतिविधी, हालचाली ह्या चैत्य केंद्राभोवती गुंफलेल्या असल्या पाहिजेत – या सर्वांनिशी एकसंध एकच एक असे, पूर्णत: ईश्वराभिमुख झालेले अस्तित्व तयार झाले असले पाहिजे; असे झाले असता, जेव्हा देह पडेल (मृत्यू येईल) तेव्हाही ते अस्तित्व टिकून राहील. पूर्णत: तयार झालेला जागृत जीवच अशा रीतीने गत जन्मामध्ये काय घडले होते ते नेमकेपणाने आठवू शकतो. त्याच्या जाणिवेतील काहीही न गमावता तो एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्येदेखील जागृतपणे जाऊ शकतो. या पृथ्वीवर अशा अवस्थेपर्यंत पोहोचलेले किती जीव असतील?… मला वाटते, फार नाहीत. आणि सहसा त्यांची ही साहसं सांगत बसण्यास असे जीव फारसे उत्सुक नसतात.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 32-34)

देह सोडल्यानंतर चैत्य पुरुष, दुसऱ्या जगातील काही विशिष्ट अनुभव घेतल्यानंतर, मानसिक आणि प्राणिक व्यक्तिमत्त्व टाकून देतो आणि गतकाळातील अर्क आत्मसात करण्यासाठी आणि पुढील जन्माची तयारी करण्यासाठी विश्रांत अशा स्थितीत निघून जातो.

नवीन जन्माची परिस्थिती कशी असेल हे, ह्या तयारीवरच अवलंबून असते. या तयारीमधूनच, नवीन व्यक्तिमत्त्वाची पुनर्रचना आणि त्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची निवड यासाठी मार्गदर्शन मिळते.

निघून गेलेला चैत्य पुरुष भूतकाळातील अनुभव अर्करूपाने स्मरणात साठवून ठेवतो, तो त्यांचे रूप वा तपशील लक्षात ठेवत नाही. आत्ताच्या आविष्करणाचा एक भाग म्हणून आत्म्याने जर गत जीवनातील एक वा अधिक व्यक्तिमत्त्वं आपल्यासोबत आणली असतील तर, त्याला गत जन्मातील काही तपशील आठवण्याची शक्यता असते. अन्यथा, केवळ योगदृष्टीनेच अशी स्मृती येते.

चैत्य पुरुषाच्या उत्क्रांतीमध्ये प्रतिगामी वाटतील अशाही काही हालचाली असतात, पण त्या केवळ आडव्यातिडव्या हालचाली असतात, ते खरोखरीचे मागे जाऊन पडणे नसते, तर ते ज्याच्यावर अद्यापि काम झालेले नाही पण परत त्यावर अधिक चांगले काम करावे म्हणून, अशा कोणत्यातरी गोष्टीकडे परत फिरून जाणे असते.

आत्मा प्राणिमात्रांच्या अवस्थेत परत मागे जात नाही; पण प्राणिक व्यक्तिमत्त्वातील काही भाग स्वत:ला विलग करून घेत, स्वत:मधील पशुप्रवृत्तीवर काम करण्यासाठी, परत पशुजन्माला जाऊन मिळू शकतो. लोभी मनुष्य साप बनून पुन्हा जन्माला येतो, या लोकरूढ कल्पनेमध्ये काही तथ्य नाही. ह्या प्रचलित काल्पनिक अंधश्रद्धा आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 534)