Tag Archive for: चैत्य पुरुष

साधना, योग आणि रूपांतरण – २१२

आंतरात्मिकीकरण (psychisation) आणि आध्यात्मिकीकरण (spiritualisation) या दोन्हींमध्ये फरक आहे. आध्यात्मिकीकरणामध्ये होणारे परिवर्तन हे वरून अवतरित होते, तर आंतरात्मिकीकरणामध्ये होणारे परिवर्तन हे अंतरंगामधून घडून येते. आंतरात्मिकीकरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्यावर अंतरात्म्याचे वर्चस्व निर्माण होते आणि त्यातून हे परिवर्तन घडून येते.

*

तुम्ही पत्रामध्ये वर्णन केलेल्या दोन्ही भावना योग्य आहेत. त्यातून साधनेमधील दोन आवश्यकतांचे सूचन होते.

त्यातील एक आवश्यकता म्हणजे अंतरंगात प्रवेश करायचा आणि चैत्य पुरुष (psychic being) व बाह्यवर्ती प्रकृती यांच्यामधील अनुबंध पूर्णत: खुला करायचा.

दुसरी आवश्यकता म्हणजे ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शांती, शक्ती, प्रकाश, आनंद’ यांच्याप्रत उन्मुख व्हायचे आणि त्यांच्यामध्ये आरोहण करायचे आणि प्रकृतीमध्ये व शरीरामध्ये त्यांचे अवतरण घडवून आणायचे.

वरील दोन्ही प्रक्रियांपैकी, म्हणजे आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक प्रक्रियांपैकी कोणतीच प्रक्रिया एकमेकींशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. आध्यात्मिक आरोहण आणि अवतरण घडून आले नाही तर प्रकृतीचे आध्यात्मिक रूपांतरण होऊ शकणार नाही. आणि संपूर्ण आंतरात्मिक खुलेपण आले नाही आणि चैत्य पुरुष व बाह्यवर्ती प्रकृती यांच्यामध्ये अनुबंध निर्माण करण्यात आला नाही तर ‘रूपांतरण’ परिपूर्ण होऊ शकणार नाही.

या दोन प्रक्रियांमध्ये विसंगती नाही. काही जण आंतरात्मिक (चैत्य) रूपांतरणापासून सुरुवात करतात तर काहीजण आध्यात्मिक रूपांतरणापासून सुरुवात करतात. तर काही जण दोन्ही रूपांतरणास एकत्रितपणे सुरुवात करतात. दोन्हीसाठी आस बाळगायची आणि गरजेनुसार आणि प्रकृतीच्या कलानुसार श्रीमाताजींच्या शक्तीला कार्य करू द्यायचे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 380, 383)

साधना, योग आणि रूपांतरण – २११

मी ‘चैत्य पुरुषाच्या रूपांतरणा’विषयी कधीही काही सांगितलेले नाही तर मी नेहमीच, ‘प्रकृतीच्या आंतरात्मिक रूपांतरणा’विषयी (psychic transformation) लिहिले आहे की जी अगदी भिन्न गोष्ट आहे. मी कधीकधी प्रकृतीच्या आंतरात्मिकीकरणाविषयी (psychisation) लिहिले आहे. चैत्य अस्तित्व हा उत्क्रांतीमधील, मनुष्यामध्ये असणारा ‘ईश्वरा’चा अंश असतो. आणि म्हणून चैत्य अस्तित्वाचे आंतरात्मिकीकरण (psychisation) हे व्यक्तीला सद्यकालीन उत्क्रांतीच्या अतीत घेऊन जाणार नाही मात्र ‘ईश्वरा’कडून किंवा ‘उच्चतर प्रकृती’कडून जे काही येते त्याला प्रतिसाद देण्यास ते व्यक्तीला सक्षम बनवेल. आणि असुर, राक्षस, पिशाच्च किंवा व्यक्तीमधील पशुता किंवा दिव्य परिवर्तनाच्या मार्गामध्ये अडथळा बनून उभ्या ठाकणाऱ्या कनिष्ठ प्रकृतीच्या कोणत्याही अट्टहासाला प्रतिसाद देण्यापासून ते व्यक्तीला परावृत्त करेल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 380-381)

साधना, योग आणि रूपांतरण – २१०

चैत्य पुरुषाचे, अंतरात्म्याचे स्थान हृदयामध्ये खोलवर असते, अगदी खोलवर असते. सामान्य भावभावना, ज्या पृष्ठवर्ती स्तरावर असतात; त्या स्तरावर चैत्य पुरुषाचे स्थान नसते. परंतु चैत्य पुरुष अग्रस्थानी येऊ शकतो आणि अंतरंगामध्ये स्थित असतानादेखील तो पृष्ठवर्ती स्तराला (मन, प्राण व शरीर) व्यापून राहू शकतो. त्यानंतर स्वयमेव भावभावना या प्राणिक गोष्टी म्हणून शिल्लक राहात नाहीत तर त्या आंतरात्मिक भावभावना आणि जाणिवा बनतात. अग्रस्थानी आलेला चैत्य पुरुष त्याचा प्रभाव सर्वत्र पसरवू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ, मनाच्या संकल्पनांमध्ये रूपांतरण घडविण्यासाठी तो मनाला प्रभावित करू शकतो किंवा शरीराच्या सवयी व त्याच्या प्रतिक्रियांमध्ये रूपांतर घडविण्यासाठी शरीराला देखील प्रभावित करू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 340-341)

साधना, योग आणि रूपांतरण – १९१

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०७

हृदय-चक्राने त्याच्या मागे असलेल्या सर्वाप्रत खुले होणे आणि मनाच्या चक्रांनी त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वाप्रत उन्मुख होणे या दोन गोष्टी येथे सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. हृदय-चक्र हे चैत्य-पुरुषाप्रत (psychic being) खुले होते आणि मनाची चक्रं ही उच्चतर चेतनेप्रत खुली होतात आणि चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर सिद्धीचे मुख्य साधन असते. ही साधनेची मूलभूत संगती (rationale) आहे.

‘ईश्वरा’ने आपल्यामध्ये आविष्कृत व्हावे यासाठी तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आपल्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे यासाठी त्यास हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिले खुलेपण (opening) घडून येते. साधनेच्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे अभीप्सा, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची अभीप्सा बाळगत असतो त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाबदेखील यामध्ये समाविष्ट असते.

आधी मस्तकामध्ये आणि नंतर मस्तकाच्या वर, चेतनेचे एककेंद्रीकरण केले असता तसेच ईश्वरी ‘शांती’, ‘सामर्थ्य’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे अस्तित्वामध्ये अवतरण घडून यावे म्हणून आवाहन केले असता, आणि आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगली असता दुसरी उन्मुखता घडून येते. (काही जणांबाबत आधी फक्त ‘शांती’ येते तर अन्य काही जणांबाबत, शांती व सामर्थ्य एकत्रितपणे येते.)

काही जणांना प्रथम ‘प्रकाशा’चा किंवा ’आनंदा’चा लाभ होतो किंवा मग त्यांच्यावर अचानकपणे ज्ञानाचा वर्षाव होतो. काही जणांच्या बाबतीत असे होते की, त्यांच्यामध्ये असणारी उन्मुखता ही, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या एका विशाल अनंत ‘निरवते’चे, ‘शक्ती’चे, ‘प्रकाशा’चे किंवा ‘आनंदा’चे त्यांच्यासमोर प्रकटीकरण करते. आणि नंतर एकतर त्या व्यक्ती या गोष्टींप्रत आरोहण करतात किंवा मग या गोष्टी त्या व्यक्तींच्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये अवरोहण करू लागतात. तर अन्य काही जणांच्या बाबतीत एकतर आधी मस्तकामध्ये अवरोहण होते नंतर हृदयाच्या पातळीवर अवरोहण होते, नंतर नाभी आणि नंतर त्याहून खाली आणि मग संपूर्ण देहाच्या माध्यमातून अवरोहण घडून येते किंवा मग एक प्रकारची अवर्णनीय (inexplicable) उन्मुखता आढळते, तेथे शांती, प्रकाश, व्यापकता किंवा शक्ती यांच्या अवरोहणाची कोणतीही जाणीव नसते. किंवा मग तेथे वैश्विक चेतनेमध्ये क्षितिजसमांतर खुलेपणा आढळून येतो किंवा अकस्मात विशाल झालेल्या मनामध्ये ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आढळतो. यापैकी जे काही घडते त्याचे स्वागत केले पाहिजे; कारण सर्वांसाठी एकच एक असा निरपवाद नियम नसतो. परंतु सुरुवातीला शांती अवतरित झाली नाही (आणि समजा नीरवता, शक्ती, प्रकाश आणि आनंद यापैकी काहीही जरी अवतरित झाले तरी), व्यक्तीने अत्यानंदाने फुलून न जाण्याची किंवा संतुलन ढळू न देण्याची काळजी घेतली पाहिजे. काहीही असले तरी, ईश्वरी शक्ती, श्रीमाताजींची शक्ती जेव्हा अवतरित होते आणि ताबा घेते तेव्हाच मुख्य प्रक्रिया घडून येते, कारण तेव्हाच चेतनेच्या सुसंघटनेला प्रारंभ होतो आणि योगाला व्यापक अधिष्ठान प्राप्त होते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 327-328)

साधना, योग आणि रूपांतरण – १९०

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०६

जेव्हा ‘शांती’ प्रस्थापित होते तेव्हा वरून ती उच्चतर किंवा ‘दिव्य शक्ती’ आपल्यामध्ये अवतरित होऊ शकते आणि आपल्यामध्ये कार्य करू शकते. ही दिव्य शक्ती सहसा प्रथम मस्तकामध्ये अवतरित होते आणि आंतरिक मनाची चक्रं मुक्त करते, नंतर ती शांती हृदय-चक्रामध्ये प्रवेश करते आणि आंतरात्मिक आणि भावनिक अस्तित्व पूर्णपणे मुक्त करते. नंतर ती शांती नाभीचक्रामध्ये आणि अन्य प्राणिक चक्रांमध्ये अवतरित होते आणि आंतरिक प्राणास मुक्त करते. नंतर ती मूलाधार आणि त्याच्याही खाली असणाऱ्या चक्रांमध्ये प्रविष्ट होते आणि आंतरिक शारीरिक अस्तित्व मुक्त करते.

ती दिव्य शक्ती एकाचवेळी मुक्तीसाठी आणि पूर्णत्वासाठी कार्य करत असते. ती संपूर्ण प्रकृतीचा एकेक भाग हाती घेते आणि त्यावर कार्य करते, जे निर्माण करणे आवश्यक आहे ते ती निर्माण करते. ज्याचे उदात्तीकरण करणे आवश्यक आहे त्याचे ती उदात्तीकरण करते. आणि नकार देण्यायोग्य जे काही आहे त्यास ती नकार देते. ती प्रकृतीमध्ये एकसूत्रता आणि सामंजस्य निर्माण करते आणि प्रकृतीमध्ये एक नवीन लय प्रस्थापित करते. ‘अतिमानसिक’ शक्ती आणि अस्तित्व अवतरित करून घेणे हे जर साधनेचे ध्येय असेल तर, ते ध्येय साध्य करणे जोपर्यंत शक्य होत नाही तोपर्यंत, ती अधिकाधिक उच्च, उच्चतर शक्ती आणि उच्चतर प्रकृतीची श्रेणीसुद्धा अवतरित करू शकते.

या गोष्टी हृदय-चक्रामध्ये असलेल्या चैत्य पुरुषाच्या (psychic being) कार्याद्वारे तयार केल्या जातात, त्या कार्याद्वारे या गोष्टींना साहाय्य पुरविले जाते आणि त्याच्या कार्याद्वारेच त्या प्रगत होत जातात. चैत्य पुरुष जेवढा अधिक खुला असेल, अग्रभागी आलेला असेल, सक्रिय असेल तेवढेच या ‘शक्ती’चे कार्य अधिक त्वरेने, अधिक सुरक्षित आणि अधिक सुलभ होऊ शकते. हृदयामध्ये जसजसे प्रेम व भक्ती आणि समर्पण वृद्धिंगत होत जाते, तसतसे साधनेचे विकसन अधिक वेगवान आणि परिपूर्ण होत जाते. कारण ज्या वेळी अवतरण आणि रूपांतरण घडून येते तेव्हा त्यामध्ये ‘ईश्वरा’शी चढतावाढता संपर्क होणे आणि ‘ईश्वरा’शी सायुज्य पावणे हे अध्याहृतच असते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 327)

साधना, योग आणि रूपांतरण – १८७

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०३

खरा आत्मा (The real Self) हा पृष्ठभागावर नसतो तर तो खोल अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित असतो. अंतरंगामध्ये आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीराला आधार देणारा आत्मा असतो, आणि त्या आत्म्यामध्ये विश्वव्यापक होण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्वतःच्या आणि वस्तुमात्रांच्या ‘सत्या’शी थेट संपर्क साधण्याची क्षमता असते. त्याच्याकडे वैश्विक आनंदाची चव चाखण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्थूल भौतिक शरीराच्या दुःखभोगापासून आणि बंदिवान झाल्यामुळे आलेल्या क्षुद्रतेपासून मुक्ती मिळविण्याची क्षमता असते.

आजकाल अगदी युरोपमध्येसुद्धा, पृष्ठवर्ती भागाच्या मागे असणाऱ्या गोष्टीचे अस्तित्व वारंवार मान्य केले जात आहे, परंतु त्याचे स्वरूप समजावून घेण्यात त्यांची चूक होत आहे, त्याला ते ‘अवचेतन’ (subconscient) किंवा ‘प्रच्छन्न चेतना’ (subliminal) असे संबोधतात. वस्तुतः ते अस्तित्व त्याच्या स्वतःच्या पद्धतीने खूप सचेत असते; ते प्रच्छन्न नसते, फक्त ते पडद्याआड दडलेले असते इतकेच.

आमच्या मनोविज्ञानानुसार, ते अस्तित्व हे या छोट्या पृष्ठवर्ती व्यक्तिमत्त्वाशी, चेतनेच्या काही विशिष्ट चक्रांद्वारे जोडलेले असते, ‘योगा’मुळे आपल्याला त्यांची जाणीव होते. आपल्या आंतरिक अस्तित्वाचा काही अंशभाग या चक्रांच्या माध्यमातून बाह्य जीवनामध्ये पाझरतो, हा अंशभागच आपल्या जीवनाचा सर्वोत्तम भाग असतो आणि तो अंशभागच आपल्या कला, काव्य, तत्त्वज्ञान, आदर्श, धार्मिक आकांक्षा, ज्ञान आणि पूर्णत्वप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न या गोष्टींना कारणीभूत ठरतो. परंतु ही आंतरिक चक्रं बहुतांशी, मिटलेली किंवा सुप्त असतात. ती खुली करणे आणि त्यांना जागृत व सक्रिय करणे हे ‘योगा’चे एक ध्येय असते.

ही चक्रं जसजशी खुली होतात, तशतशा आपल्यामध्ये आंतरिक अस्तित्वाच्या शक्ती आणि शक्यता उदयाला येऊ लागतात. प्रथमतः आपल्याला एका विशाल चेतनेची आणि नंतर वैश्विक चेतनेची जाणीव होते. त्यानंतर मात्र आपण मर्यादित जीवनं असणारी छोटीछोटी विलग व्यक्तिमत्त्वं म्हणून उरत नाही, तर आता आपण वैश्विक कृतीची केंद्र बनतो आणि त्यानंतर आपला वैश्विक शक्तींशी थेट संपर्क येतो. पृष्ठवर्ती व्यक्तित्व ज्याप्रमाणे वैश्विक शक्तींच्या हातचे अनिच्छुक बाहुले असते त्याप्रमाणे आपण बाहुले बनून राहण्याऐवजी, आता आपण विशिष्ट प्रमाणात सचेत बनू शकतो आणि प्रकृतीच्या लीलेचे ‘स्वामी’ बनू शकतो. मात्र हे किती प्रमाणात घडून येऊ शकते हे आंतरिक अस्तित्वाच्या विकासावर आणि त्याच्या उच्चतर आध्यात्मिक स्तरांप्रत असलेल्या ऊर्ध्वमुखी उन्मुखतेवर अवलंबून असते. त्याचवेळी हृदयचक्र खुले झाल्यामुळे, चैत्य पुरुषाची (psychic being) मुक्तता होते, आणि मग तो चैत्य पुरुष आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर ‘सत्या’ची आपल्याला जाणीव करून देण्याच्या दिशेने प्रगत होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325)

साधना, योग आणि रूपांतरण – १८६

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०२

(योगामध्ये आपले आंतरिक मन, प्राण व शरीर हे चैत्य पुरुषाप्रत खुले आणि ऊर्ध्वदिशेस असणाऱ्या तत्त्वाप्रत उन्मुख होण्याची आवश्यकता असते. ती आवश्यकता असण्याचे) मूलभूत कारण असे की, मन, प्राण आणि शरीर या छोट्या गोष्टी ज्यांना आपण ‘मी’ असे संबोधतो, त्या गोष्टी म्हणजे केवळ बाह्यवर्ती गतीविधी असतात, या गोष्टी म्हणजे अजिबातच आपले खरे ‘स्वरूप’ नसते. या गोष्टी म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक बाह्यवर्ती अंशभाग असतो, जो एका छोट्याशा जीवनासाठी आणि अज्ञानाच्या लीलेसाठी पुढे करण्यात आलेला असतो. त्या व्यक्तिमत्त्वामध्ये सत्याच्या तुकड्यांच्या शोधासाठी धडपडणारे, अडखळणारे अज्ञानी मन असते; सुखाच्या चार क्षणांच्या शोधासाठी धावपळ करणारा अज्ञानी प्राण असतो आणि तमोग्रस्त व बहुतांशी अवचेतन असे शरीर असते. असे हे व्यक्तिमत्त्व, परिणामस्वरूप मिळणाऱ्या वेदना किंवा सुख यांच्यावर स्वामित्व मिळविण्याऐवजी वस्तुमात्रांचे परिणाम आणि दु:खभोग झेलत राहते.

या सर्व गोष्टी कधीपर्यंत स्वीकारल्या जातात? तर जोपर्यंत मनाला उबग येत नाही आणि ते जोवर स्वतःच्या आणि वस्तुमात्रांच्या खऱ्या ‘सत्या’चा शोध घ्यायला सुरुवात करत नाही, जोपर्यंत प्राणाला वीट येत नाही आणि खरा आनंद नावाची काही चीज अस्तित्वात आहे की नाही याविषयी तो विचार करू लागत नाही, आणि जोपर्यंत शरीर थकून जात नाही आणि स्वतःपासून आणि स्वतःच्या यातना आणि सुखापासून सुटका व्हावी असे त्याला वाटत नाही तोपर्यंत हे सारे (त्या बाह्यवर्ती व्यक्तिमत्त्वाकडून) स्वीकारले जाते.

(जेव्हा मनाला उबग येतो, प्राणाला वीट येतो, आणि शरीर थकून जाते) तेव्हा मग हे छोटे, अज्ञानी, आंशिक, बाह्यवर्ती व्यक्तिमत्त्व स्वतःच्या खऱ्या ‘स्वरूपा’कडे आणि त्याबरोबरच महत्तर गोष्टींकडे परतण्याची शक्यता असते, अथवा त्याचा म्हणजे त्या व्यक्तिमत्त्वाचा स्वतः होऊनच लय होऊन, त्याचे निर्वाण होणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 324-325)

साधना, योग आणि रूपांतरण – १८५

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया खुलासेवार उलगडवून दाखविली आहे. हे पत्र महत्त्वाचे पण बरेच विस्तृत आहे. त्यामुळे आपण ते क्रमश: विचारात घेणार आहोत.)

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०१

‘शांति’ (Peace) किंवा ‘नीरवता’ (Silence) लाभण्यासाठी वरून होणारे अवतरण हा निर्णायक मार्ग असतो. वास्तविक, दृश्यरूपात नेहमीच तसे दिसले नाही तरी, प्रत्यक्षात मात्र या गोष्टी नेहमीच अशा रीतीने घडून येतात. ‘दृश्यरूपात नेहमीच तसे दिसत नसले’, असे म्हणण्याचे कारण की साधकाला या प्रक्रियेची नेहमीच जाणीव असते असे नाही. त्याच्यामध्ये शांती स्थिरावते आहे किंवा किमान आविष्कृत तरी होत आहे असे त्याला जाणवते, पण ती कशी आणि केव्हा येते याची त्याला जाणीव नसते. तरीही हे सत्य आहे की, जे जे काही उच्चतर चेतनेशी संबंधित असते ते वरून येते; केवळ आध्यात्मिक शांती, नीरवता याच गोष्टी नव्हेत तर ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘ज्ञान’, उच्चतर दृष्टी आणि विचार, ‘आनंद’ या सर्वच गोष्टी वरून येतात.

एका विशिष्ट टप्प्यापर्यंत या गोष्टी अंतरंगातून सुद्धा येऊ शकतात; परंतु ते यामुळे शक्य होते कारण ‘चैत्य पुरुष’ (psychic being) त्यांच्याप्रत थेटपणे खुला झालेला असतो आणि त्यामुळे उपरोक्त गोष्टी आधी तेथे येतात आणि चैत्य पुरुषाद्वारे, किंवा त्याच्या पुढे येण्यामुळे, या गोष्टी स्वतःला, अस्तित्वाच्या इतर अंगांमध्येदेखील प्रकट करतात.

अंतरंगातून होणारे प्रकटीकरण किंवा वरून होणारे अवतरण हे ‘योगसिद्धी’चे दोन सार्वभौम मार्ग आहेत. बाह्य पृष्ठवर्ती मनाचा प्रयत्न किंवा भावना, एखाद्या प्रकारची तपस्या या सगळ्यांमधून या गोष्टींची काहीशी घडण होते असे वाटते, पण त्यांचे परिणाम हे, या दोन मूलगामी मार्गांच्या तुलनेत, बहुतेक वेळा अनिश्चित आणि आंशिक असतात. आणि म्हणूनच आम्ही या ‘पूर्णयोगा’मध्ये ‘उन्मुखते’वर, खुलेपणावर (opening) नेहमीच एवढा भर देत असतो. आपल्या आंतरिक मनाचे, प्राणाचे, शरीराचे आपल्या आंतरतम भागाप्रत, चैत्य पुरुषाप्रत असलेले खुलेपण आणि मनाच्या ऊर्ध्वदिशेस असणाऱ्या तत्त्वाप्रत उन्मुखता, या गोष्टी साधनेच्या फलप्राप्तीसाठी अपरिहार्य असतात. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 323-324)

साधना, योग आणि रूपांतरण – १८१

पूर्णयोगाची साधना दुहेरी असते. चेतनेने अधिक उच्च स्तरांवर आरोहण करणे ही या साधनेची एक बाजू आहे आणि अज्ञान व अंधकार यांच्या ‘शक्तीं’चा निरास करता यावा व प्रकृतीचे रूपांतरण करता यावे यासाठी, उच्चतर स्तरांवरील शक्तीचे पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडविणे ही या साधनेची दुसरी बाजू आहे.

*

पूर्णयोगाच्या साधनेचे सूत्र म्हणून एकमेव मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे एकतर ‘श्रीमाताजीं’चे नाम किंवा ‘श्रीअरविंदां’चे व ‘श्रीमाताजीं’चे नाम! हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तिष्कामध्ये एकाग्रता या दोन्ही पद्धती पूर्णयोगामध्ये उपयोगात आणल्या जाऊ शकतात; त्या प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे असे परिणाम असतात.

हृदयकेंद्रावर एकाग्रता केली असता, चैत्य पुरुष (psychic being) खुला होतो तसेच त्यामुळे भक्ती, प्रेम उदित होते. हृदयकेंद्रावरील एकाग्रतेमुळे हृदयामध्ये श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव होते आणि त्यांच्याशी एकत्व घडून येते; तसेच प्रकृतीमध्ये त्यांच्या ‘शक्ती’चे कार्य घडून येते.

मस्तिष्ककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मनाच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आणि आत्म-साक्षात्काराप्रत मन खुले होते; तसेच ते देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 416) (CWSA 29 : 326)

साधना, योग आणि रूपांतरण – १४६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘ईश्वरा’चे नामस्मरण हे सहसा संरक्षणासाठी, आराधनेसाठी, भक्तीमध्ये वृद्धी व्हावी यासाठी, आंतरिक चेतना खुली व्हावी यासाठी आणि भक्तिमार्गाद्वारे ‘ईश्वरा’चा साक्षात्कार व्हावा यासाठी केले जाते.

*

पूर्णयोगाच्या साधनेचे सूत्र म्हणून केवळ एकच मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे ‘श्रीमाताजीं’चे नाम किंवा ‘श्रीअरविंदां’चे व ‘श्रीमाताजीं’चे नाम!

हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तकामध्ये एकाग्रता या दोन्ही पद्धती या योगामध्ये अवलंबल्या जातात; त्या प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे असे परिणाम असतात.

हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता चैत्य पुरुष (psychic being) खुला होतो आणि तो भक्ती, प्रेम आणि श्रीमाताजींशी एकत्व घडवून आणतो; हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता हृदयामध्ये श्रीमाताजींची उपस्थिती जाणवू लागते आणि प्रकृतीमध्ये, स्वभावामध्ये त्यांच्या शक्तीचे कार्य घडू लागते.

मस्तककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मन हे आत्मसाक्षात्काराप्रत खुले होते; मनाच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत, देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत मन खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 326 & 327)